Wednesday, January 9, 2019

त्याची वंदावी पाऊले

माणसांच्यावागण्यात एक आणि बोलण्यात दुसरेच, असा विरोधाभास का जाणवतो कुणास ठाऊक.
आपण जो विचार करतो किंवा इतरांसमोर प्रगट करतो, तेही जाहीररित्या, तेच विचार आत्मसात
करण्याची, आचरणात आणण्याची एक तात्विक जबाबदारी आपल्यावर असते हे लक्षात घ्यायला हवं. ती
एक नैतिक जबाबदारी देखील असतेच.आणि आपण जर अयोग्य वागत असू, अयोग्य बोलत असू तर
त्याविषयी इतरांनाही उपदेशाचे व ज्ञानाचे डोस पाजण्याचा अधिकार आपल्याला नसतो, हे देखील ध्यानात
घ्यायलाच हवं.
आता निवडणुकांचा काळ जवळ येत चालल्याने जिकडेतिकडे आश्वासने,घोषणाबाजी, आरोप-
प्रत्यारोपांची मालिका... असा माहोल रंगायला सुरुवात झाली आहे. अजून तर सुरुवातच आहे, पण आगे
आगे देखते है, होता है क्या... खरच, बघूया काय काय होते ते. तसेही सामान्य नागरिकाला घटनेने काही
विशेष अधिकार बहाल केले असले तरी बहुतेकदा बघत राहण्यापलीकडे काहीही करणे आपल्या हातात
आणि आवाक्यात नसते. कारण या अधिकारांचा आपण किती प्रमाणात व कसा वापर करतो, यावरून ते
ठरते, असो.

"मराठा विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून 39 वर्षांपूर्वी मी माझ्या तीन महिन्यांच्या मुलीला
मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले. तिला कायमचे अपंगत्व आले. आधीची गरिबी होतीच. नामांतरानंतरही
ही कायम राहिली. नेत्यांनी तात्पुरती मदत केली. जगण्याचे हाल झाले. नामांतर दिन आला की, काही
पुढारी घरी येऊन साडी, फुलं देऊन माझ्यासोबत फोटो काढतात, पण कोणीही आमच्या पोटापाण्याची
कायमची व्यवस्था करत नाही. सत्कार झाला, पण आर्थिक मदत झाली नाही. बाबासाहेबांच्या नावासाठी
लढा देण्याचे समाधान तेवढे मिळाले"... ही आहे औरंगाबादच्या लढ्यात (आंदोलनात) त्याग केलेल्या
जमनाबाईची व्यथा. आजही सर्वसाधारण हीच परिस्थिती आहे. राजकीय क्षेत्र असो वा सामाजिक.... जो
बोलण्याप्रमाणे वागतो, तोच खरा आदराला प्राप्त ठरतो. जी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी
दिलेला शब्द पाळते, आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करते आणि त्याही पलीकडे जाऊन पीडितांच्या,
वंचितांच्या वेदनेची खरी ओळख करून घेते तीच मंडळी खऱ्या अर्थाने मान-सन्मान पावते. माणसाने
माणसाच्या आतली वेदना जाणून घेणं, ती वेदना स्वतःची समजून, जाणीवपूर्वक वागणं ह्यालाच
माणुसकी म्हणायचं ना?

चोचीला चारा कुठला,
हे कोणी विचारत नाही
भरवता कसे पिल्लांना,
हे कोणी विचारत नाही
करपले पिक यंदाही,
नुसत्याच दिशा उरलेल्या
हंगाम कशाचा करता,
हे कोणी विचारत नाही

किंवा
भरतात जखमा शरीरावरील औषधाने
उरातल्या जखमा, भरतील त्या कशाने?

ह्या कवी बबन सराडकर यांच्या ओळी आठवल्या की, जाणवते. वेदनेची फक्त जाणीव होऊन
पुरेसे नाही, तर त्या वेदनेशी समरस होऊन जेव्हा त्या वेदनेची जखम स्वतःच्या जिव्हारी बोचते, तेव्हाच
धगीची तीव्रता खऱ्या अर्थाने परावर्तित होऊ शकते. याच संदर्भात एक अत्यंत विरोधाभास  दर्शवणारी एक
बातमी वाचण्यात आली, नुकतीच.
गेल्या दोन एप्रिल रोजी भारत बंद दरम्यान मध्यप्रदेशातील मुरैना ह्या ठिकाणी जोरदार दगडफेक
सुरू झाली पोलिसांचा गोळीबारही सुरू झाला दुसरीकडे, अशा स्थितीत रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना जेवण
पुरवून दहा वर्षांची चिमुकली पोर अद्रिका आणि 14 वर्षाचा तिचा भाऊ कार्तिक यांनी पोलिसांना चुकवत
लपत छपत रेल्वे पर्यंत जाऊन शक्य होईल तेवढ्या प्रवाशांना जेवण आणि पाणी पुरवले. आहे की नाही
विरोधाभास? म्हणतात ना, जे न देखे रवी, ते देखे कवि

मोठ मोठ्या तत्त्ववेत्त्यांच्या, राजकारण्यांच्या हिचे ध्यानात येत नाही, ते कोवळ्या वयाच्या निष्पाप
लेकरांच्या ध्यानात आले. नुसतेच ध्यानात आले नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरले गेले. हा आणि अशा
प्रकारचा विरोधाभास जीवनात अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी घडत असतो. भासत असतो. आपल्या संत-
महात्म्यांनी जे उपदेश केले, ते त्यांनी स्वतः देखील आचरणात आणले होते. एवढेच काय, पण आपल्या
पूर्वजांच्या काळीदेखील दिलेला शब्द प्रमाण मानला जात असे. शब्दाला किंमत होती.'प्राण जाये पर वचन न जाये' ह्या तत्वानुसार माणसं खरोखर वागतही होती. पण आता सगळंच चित्र बदलत चाललं
आहे. विज्ञानात, उद्योग धंद्यात, शिक्षणात आणि विविध क्षेत्रात जशी झपाट्याने प्रगती होते आहे तसा
माणुसही झपाट्याने पुढे सरकतो आहे. काल काय बोललो, ते त्याला आज आठवेना झालय. आपल्या
शब्दांशी आपणच प्रामाणिक राहायला हवं. हे आपण विसरलो आहे आणि म्हणूनच कदाचित, अविश्वास,
गैरसमज, अविचार, सूडबुद्धी अशा प्रकारच्या रोगांची किड नात्यांना लागते आहे. धर्म, जात, श्रीमंती,
गरीबी... ह्या बाबतीत जीवघेणी स्पर्धा, कमालीचा असंतोष आणि अस्थिर राजकीय, सामाजिक आणि
आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे.
रक्त असते लाल साऱ्यांचेच
तरी युद्ध धर्माचे लढावे लागते
रे कोण बौद्ध, हिंदू, इस्लाम आणि इसाई
धर्मात कैद केला, माणूस माणसाने... (कवी सराटकर)

शाळेत रोज प्रार्थना म्हटली जाते, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ह्या
प्रार्थने प्रमाणे आपण प्रत्यक्षात वागू शकत नाही का? वागण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना...?

No comments:

Post a Comment