Sunday, January 6, 2019

प्रसारमाध्यमांचे स्वरूप साहित्याला मारक ?

साहित्य निर्मिती ही अखंड प्रक्रिया आहे. मग त्यासाठी प्रसार माध्यमं असोत किंवा नसोत.मात्र प्रसार माध्यम ही नंतर साहित्य निर्मितीला पोषकच ठरतात हे नक्की. साहित्य हेसुद्धा विचारांती प्रसाराचे सर्वात मोठे प्रभावी माध्यम ठरू शकेल .त्या तुलनेत दृक-श्राव्य कला धिष्टीत प्रसार माध्यम हीसुद्धा गौण ठरतात कारण साहित्य हे त्या माध्यमाचा एक आविष्कार ठरतो जो मानसिक भावनांशी निगडित आहे. एखाद्या प्रसार माध्यमाचे खरे मूल्यमापक त्यावरील निर्मित साहित्यच असते .म्हणूनच प्रसार माध्यम आणि साहित्य या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी त्या परस्पर विरोधी मात्र नाहीत .ज्याप्रमाणे अन्न आणि पाणी या भिन्न गोष्टी परस्परपूरक आहेत अर्थात केवळ अन्न  किंवा केवळ पाणी हे आपल्याला पुरेसे नाही, त्याचप्रमाणे प्रसार माध्यम आणि साहित्य हे दोन्ही कुठल्याही प्रचारासाठी आवश्यक आहेतच .जर कुणाला गणिताच्या आकड्यांच्याच भाषेत सांगायचे तर त्यांचा ३६ चा आकडा नसून ६३ चा आकडा आहे.
 साहित्य या शब्दाखाली कथा ,कादंबऱ्या, नाटक इत्यादी अभिप्रेत असून वृत्तपत्र ,टीव्ही, रेडिओ यांचा अंतर्भाव प्रसारमाध्यमात केला जातो. आपल्याला प्रसार माध्यमां संबंधी साहित्य निर्माण करता येते त्याचप्रमाणे साहित्याचाही प्रसारकरताच येतो की!

 व्यासांचे महाभारत आणि वाल्मीकींचे रामायण या भारत भूमीत लिहून कितीतरी शे वर्षे झालीत पण आज पर्यंत निदान भारतातल्या तरी किती लोकांना त्यातल्या पात्रांची संपूर्ण नावे तरी माहित होती हो ?रामाच्या पत्नीचे नाव काय तर सीता, रामाच्या भावाचे नाव काय तर लक्ष्मण, पण रामाला किती वर्षे वनवास घडला -तर असेल पाच-सहा वर्षे किंवा सीतेच्या अपहरणाचा वेळी तिला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तर -मी नाही -अशी छातीठोक पणे उत्तर देणाऱ्या व्यक्ती आज मात्र रावणाची ही वंशावळी सांगू शकतात ही रामानंद सागर यांची कृपा म्हणावी किंवा  दूरदर्शन दिल्लीचे उपकारच! दूरदर्शन वर पु ल देशपांडे यांच्या कथांवर एक मालिका होती. स्वतः पु ल त्या कथा दर आठवड्यात वाचून दाखवत. या कथा गमतीशीर तशाच दर्जेदार असल्याने पुस्तकं सहजी मिळत नसत आणि पैसेही जास्त मोजावे लागत .त्यातूनही वाचनालयातून पुस्तक मिळालेच तर साहित्यप्रेमींच्या त्यात प्रेम कथा वाचायला मिळतात किंवा त्यांच्या प्रेमाची उत्कटता दाखवायला म्हणूनच की काय आपल्या आवडीची पान त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वतःजवळ जपून ठेवलेली असतात .या ऐवजी दर आठवड्यात विशिष्ट वेळी टीव्ही लावला की साक्षात पुल येऊनच त्यांच्या उत्तम शैलीत उत्तम साहित्याचा आस्वाद आपल्याला देत .
माझ्या सांगण्याचा उद्देश कुठल्याही विशिष्ट प्रसारमाध्यमाचा पुरस्कार करण्याचा नसला तरी टीव्ही आज खेडोपाडी पोचून सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले माध्यम  आणि कदाचित सर्वात प्रभावी असल्याने त्याबद्दल सांगणे संयुक्तिक वाटते .हल्ली नेहमी आपल्या ऐकण्यात येतं की टीव्हीमुळे मुलं बिघडतात. त्यांच्यातली साहित्याची गोडी कमी होत चालली आहे ्त्यमुळे त्या बिचाऱ्या निर्जीव टीव्हीला अगदी इडियट बॉक्स वगैरेसुद्धा म्हणून लोक मोकळे झाले. मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर एकंदरीतच हल्लीचा काळ धावपळीचा झालाय. मशीन युग असं काही उगाच म्हटलं जात नाही .कम्प्युटर, फास्ट फूड, फास्ट लोकल्स या सगळ्यांबरोबरच फास्ट नॉलेज अशीच काहीशी वृत्ती आपल्यात निर्माण झालीये. टीव्हीवरील बालचित्रवाणी .यूजीसी चे कार्यक्रम, इग्नू चे कार्यक्रम यातून हीच गोष्ट साधली जाते आहे. अंतरिक्षा सारख्या अफाट विषयाबद्दल माहिती करून घ्यायची म्हटली तर आपल्याला किमान दहा-बारा पुस्तकांचे धुड झेलावे लागेल. हीच माहिती जर सचित्र साध्या सोप्या भाषेत वर्तमानपत्र, टीव्ही इत्यादी वरून किंवा सीडीज वरून मिळाली तर कोणीही त्यासाठी तास-दीड तास देणे पसंत करेल. शिवाय केवळ वाचनापेक्षा प्रत्यक्ष बघणं ऐकणे याचा अधिक फायदा होणारच म्हणजेच काय तर अध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक कुठलीही साहित्य अंतर्गत विषय सोपे आकर्षक, रोचक करून समजून घेण्याची प्रसारमाध्यम ही साधनच आहेत.
 आणि अहो, शेवटी या टीव्ही, रेडिओ वृत्तपत्रातून काय सांगितलं जातं ?कुणीतरी लिहून ठेवलेल्या, सांगितलेल्या गोष्टी तर असतात या साऱ्या !वर्तमानपत्रात एखादं नवीन सदर सुरू केलं जातं त्यापूर्वी त्याबद्दलची माहिती संबंधित लेखकांना देऊन त्यांच्याकडून साहित्य तयार करून तेच तर प्रसिद्ध केलं जातं किंवा रेडिओवर सकाळी योगासने, व्यायाम संबंधी माहिती दिली जाते तर ती पातंजल योग शास्त्र विविध योग विषयक ग्रंथ यातीलच यांसंबंधीची माहिती असते ना !सुरेल संगीत ,भावपूर्ण कविता, अर्थपूर्ण गीतच तर आपकी पसंद ,चित्रहार ,रंगोली सारख्या कार्यक्रमातून प्रसिद्ध होतात. त्यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा फार बदललेलं हे खरं असलं तरी तो आजच्या आधुनिक साहित्याचा भाग आहे ना? तर मग प्रसारमाध्यम आणि साहित्य यांना निराळं मानण्याचं कारणच काय ?किंवा साहित्यिकांनी प्रसार माध्यमांचा किंवा त्याउलट द्वेष करायचे काय कारण ?
साहित्य आणि प्रसारमाध्यमे ही दोऱ्याची दोन विरुद्ध टोकं   नसून ती एकमेकात गुंतलेली सुकर गाठ आहे. त्यांचीच आज सुंदर रचना करून निर्मल वस्त्र रुपी मानवी मनाची रचना करण्याची आवश्यकता आहे. अनेक रंगीबेरंगी धाग्यांनी आकर्षक वस्त्र निर्मिती होऊ शकते त्याचप्रमाणे प्रसार माध्यम व साहित्य यांच्या उपयुक्त अंशाच्या सांगडी ने मानवाच्या विचाररूपी व ज्ञानरूपी कक्षा निश्चितच उंचावता येतील.
 आज प्रसारमाध्यमांच स्वरूप सॅटॅलाइट मुळे एवढे व्यापक झालं आहे की आदिवासी लोकांना सुद्धा टीव्ही रेडिओचा अर्थ कळला आहे. परवाची एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल की दूरदर्शन इंडियाचे कार्यक्रम सॅटॅलाइट द्वारे आता युरोप मधील राष्ट्रातही प्रसारित करण्यात येणार आहेत. भारतात जेव्हा रामायण मालिका गाजते तेव्हा तिचा जगभरातील 32 भाषांमध्ये अनुवाद होऊन त्याच्या कॅसेट तयार केल्या जातात .विक्रम सेठ सारखा एखादा ब्रिटनमधला लेखक  अ सूटेबल बॉय किंवा द गोल्डन गेट लिहितो किंवा तसलिमा नसरीन, सलमान रश्दी सारख्या व्यक्ती जेव्हा हजारो किमी अंतरावर काही लिहितात तेव्हा त्याची माहिती दुसऱ्याच दिवशी आपल्याला घर बसल्या होते. पुरातत्व विभागाने उत्खननातून एखाद्या पुराण ग्रंथाच्या प्रती मिळाल्या तर त्या कशा स्थितीत आहेत, कुठल्या विषयावरच्या, कुठल्या काळात रचल्या गेल्या असाव्यात याची इत्थंभूत माहिती दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळते. एखादा लिहू वाचू न शकणारा लहान मुलगाही फँटम, मिकी माऊस, लॉरेल हार्डी च्या मालिका टीव्हीवर पाहून त्याचा आनंद लुटतो बालसाहित्य प्रसाराचा एक भाग नाही का?
 थोडक्यात काय साहित्याला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रसार माध्यम ही सहाय्यभूत होत असतात. म्हणून प्रसारमाध्यमांचे स्वरूप साहित्याला मारक नसून तारक ठरते

शस्त्रं शास्त्राणि सलिलं गुणदोषप्रवृत्तये।
पात्रापेक्षीण्यत: प्रज्ञां चिकित्सार्थं विशोधयेत् ॥
 शस्त्र शास्त्र आणि जल या तिन्ही गोष्टी पात्राची अपेक्षा करतात अर्थात शस्त्राची गुणवत्ता योद्ध्यावर, शास्त्राची त्याचे अध्ययन करणाऱ्यावर ,तर जल ज्या प्रकारच्या पात्रात ठेवले जाते त्यावर त्याचे चांगले-वाईट पण अवलंबून असते .आज साहित्य काय किंवा प्रसारमाध्यम काय त्यांचे स्वरूप शास्त्राप्रमाणेच आहे .कारण लेखणीमध्ये तलवारीपेक्षा जास्त प्रभाव असतो आणि त्याशिवाय निरक्षरता, अंधश्रद्धा ,मागासलेपणा सारखे आपले शत्रू काही माघार घेणार नाहीत दलित साहित्य हे याच दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
 या शस्त्रांचा जर पुरेपूर व योग्य वापर करून घ्यायचा असेल तर आपणच प्रयत्न करायला हवेत .साहित्य तर काय वेळ काढू सिनेमांच्या कथा, आचरट गोष्टी किंवा कुठल्याही सत्याला धरून नसलेले सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा प्रसार माध्यम सुद्धा चित्रपटातील अश्लील गोष्टींना चटपटीत करून सांगणारी किंवा खून दरोड्यांच्या लांबलचक वर्णनांनी रकाने भरणारी सुद्धा असू शकतात .अशी साहित्य निर्मिती किंवा अशी प्रसार माध्यम कधीही एकमेकांना पूरक ठरू शकत नाहीत तर ती एकमेकांबरोबरच  समाजालाही घातक ठरतात. मात्र या अपप्रचाराला  मानव कारणीभूत आहे ना !
मग जर आपण निश्चयाने त्यांचा चांगला उपयोग करून घेतला तर साहित्य आणि प्रसार माध्यमे हातात हात घालून पुढे येतील आणि आपलाही त्यातून उत्कर्ष साधू शकेल हे निश्चित. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत प्रसार माध्यमांचे स्वरूप साहित्य विघातक ठरू शकत नाही तर आपणच त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांना कारणीभूत असतो. प्रसारमाध्यम जनमानसापर्यंत ,सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे स्त्रोत आहे आणि त्याचे मूलस्थान आहे साहित्य! वृक्षाचे मूळ व त्यातून फुटणाऱ्या असंख्य फांद्यांप्रमाणे हा संबंध असतो. कुठल्याही स्त्रोताचे मूलस्थान हे तितकेच महत्त्वाचे असते आणि मूलस्थान यातील भाव केवळ निकोप स्त्रोतांद्वारे प्रसारित प्रवाहित होऊ शकतात .म्हणून प्रसारमाध्यम व साहित्य यांच्या या आश्रय -आश्रयी संबंधांमुळे ते कधी परस्पर विरोधी असू शकत नाहीत.

No comments:

Post a Comment