Tuesday, January 22, 2019

मला जाणवलेल्या शांताबाई

मराठी साहित्यात लोभस काव्य, सकस गद्य- ललित आणि वैचारिक दोन्ही-, रसाळ अनुवाद, कादंबरी, बालसाहित्य, वृत्तपत्रीय लेखन, संपादन अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या स्त्रिया तशा दुर्मिळच. मात्र शांताबाई शेळके यांनी ही कामगिरी लीलया करून केवळ साहित्यातच नव्हे, तर रसिक वाचक आणि अस्वादकांच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलंय.

वागीश्वरी शारदेचा वरदहस्त लाभलेली ही लेखिका. शब्द आणि संदर्भ, अर्थ आणि अन्वय, नाद आणि लय हातात हात घालून मिरवताना पहायचे असेल, तर शांताबाईंचे लेखन वाचावे. शांताबाईंनी हाताला धरून साहित्याच्या अंगणात चालायला शिकवलेले असंख्य लेखक त्यांचे ऋण मोकळेपणाने मान्य करतात. काहीही समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. गद्य लेखनात त्यांच्या ह्याच स्वभावाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. साधाच विषय किती जिव्हाळ्याने त्या रंगवतात! एखादी जुनी आठवण, एखादा प्रसंग, एखादे आवडलेले पुस्तक, एखादी व्यक्ती, अगदी त्यांची लाडकी मांजरे, त्यांची खाद्ययात्रा, नातीगोती, विषय कोणताही असो, तो मांडण्यातली आपुलकी सारखीच. या आपुलकी नि मोकळेपणा सोबतचठसठशीत पणे दिसून येतो तो त्यांचा व्यासंग! अगदी सहजच मेघदूत, भर्तृहरीची शतके, ज्ञानेश्वरी आणि इतर संत साहित्य, नलदमयन्ती स्वयंवर, ह्या सर्वांचे संदर्भ त्यांच्या लिखाणात येतात. त्या ह्या सर्वांचे उल्लेख एवढ्या अधिकाराने आणि जवळीकीने करतात, की कालिदास, भर्तृहरी, ज्ञानेश्वर, तुकोबा, मोरोपंत वगैरे मंडळी अधूनमधून त्यांच्या घरी येत असावीत अशी शंका यावी. एवढे सगळे असूनही त्यांचे लिखाण कधीच क्लिष्ट झाले नाही. साहित्याच्या प्राध्यापिका असल्यामुळे असंख्य कलाकृती वर्गात विद्यार्थ्यांना समजावून सांगायची त्यांना सवय होतीच. तीच सवय वाचकालाही सर्व उलगडून सांगताना कामी आलेली दिसते. कालिदासाच्या मेघदूतात क्षिप्रा नदीवरील वाऱ्याचा उल्लेख कालिदासाने ‘प्रार्थनाचाटुकार:’ असा केलाय. या शब्दाकडे विशेष लक्ष वेधले गेले, ते शांताबाईंनी त्या शब्दामागचे सौंदर्य उलगडून दाखवल्यावरच! अभिजात साहित्यात एवढ्या रममाण होणाऱ्या शांताबाईना लोकसाहित्याचेही मुळीसुद्धा वावडे नव्हते. कितीतरी लावण्या, लोकगीते, पारंपरिक ओव्या, गवळणी त्यांना पाठ होत्या. त्यांचा डौल, त्यांची नादमधुरता त्यांनी स्वतः अनुभवली आणि तशीच्या तशीच अचूक वाचकांपर्यंत पोहचवली. आपल्या देवभाषेचा आणि लोकभाषेचा गोडवा शांताबाईंच्या गुणग्राहक, साक्षेपी लेखणीचा पदर धरून अलगद वाचकापर्यंत झिरपला.

शांताबाई तशा ‘पूर्णवेळ समीक्षक’ नसल्या, तरी कितीतरी अभिजात साहित्यकृतींची समीक्षा त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या लेखनात समीक्षकाचा अभिनिवेश नाही, आणि ‘ह्या रचनाधीष्ठित काव्यबंधाच्या पृथगात्मतेचा समकालीन वाङमयीन वर्तुळावर होणारा साक्षेपी परिणाम अनुलक्षून...’ वगैरेसारखी क्लिष्ट भाषाही नाही. मात्र ललित म्हणता म्हणता त्या सहजच वाचकाला रसास्वादाचा आनंद देतात, नव्हे, कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद कसा घ्यावा, याचा एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवतात. आणि केवळ साहित्य नव्हे, तर नाटक, चित्रपट यांतही नेमकं काय बघायचं हे त्या सहजच सांगून जातात.

मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही विषयांत त्या एम ए असल्यामुळे त्यांचा ह्या दोन्ही भाषांचा अभ्यास आणि व्यासंग होता असे म्हणावे, तर मधूनच एखादा इंग्रजी लेखक तुमच्याकडे बघून डोळे मिचकावेल ! शॉचे एखादे नाटक, टेनिसनची एखादी कविता, इंग्रजीत अनुवादित झालेले जपानी हायकू अधूनमधून हजेरी लावताना दिसतील. इंग्रजीवर असलेले त्यांचे प्रभुत्व विशेषत्वाने पुढे आले ते त्यांच्या अनुवादांतून. संस्कृत साहित्याप्रमाणेच त्यांनी इंग्रजी चित्रपटांचेही अनुवाद ताकदीने केले. त्यांचे हे अनुवाद वाचून त्या त्या चित्रपटाची केवळ कथाच नव्हे, तर वातावरणही डोळ्यापुढे उभे राहत असे. ह्यातूनच बहुधा त्यांची चित्रपटमाध्यमाची जाण अधिक परिपक्व होत गेली असावी आणि तिला राजमान्यता मिळाली ती त्यांच्या सेन्सॉर बोर्डावर झालेल्या नेमणुकीतून. मात्र ह्या सर्व लेखनापेक्षाही त्यांना जनसामान्यांपर्यंत पोहचवणारा साहित्यप्रकार म्हणजे त्यांचे काव्य. त्यांचे काव्य अर्थवाही, नादमधुर आहे. ‘प्रासादिकता’ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य त्यांच्या काव्यातही दिसून येते. अगदी चारच शब्दांतही त्यांनी कविता करून दाखवली, ”येतेस?/ नाही/ का?/ आई!” शांताबाई ह्या जेवढ्या सरस कवयित्री होत्या, त्याहीपेक्षा सुरस गीतकार होत्या. कवी आणि गीतकार यांच्यातील फरक त्या नेमका सांगतात. गीतकार हा सर्वसाधारणपणे कारागीर आणि म्हणून कवीपेक्षा खालच्या दर्जाचा समजला जातो. मात्र हा समज खोटा ठरवत असंख्य श्रेष्ठ साहित्यिकांनी चित्रपट किंवा ध्वनिमुद्रिकांसाठी गीतलेखन केले आहे, हे त्या आवर्जून सांगतात. कवी जेव्हा कविता करतो, तेव्हा तो स्वतंत्र असतो. परंतु तो जेव्हा चित्रपटासाठी गीत लिहितो, तेव्हा त्याला अनेक बंधने काटेकोरपणे पाळावी लागतात. कधी आधीच तयार असलेल्या चालीत शब्द बांधावे लागतात, तर कधी चित्रपटातील प्रसंगानुरूप शब्दरचना करावी लागते. कवितेत कवी आपले स्वतःचे भाव व्यक्त करतो, तर गीतात त्या पात्राचे/ निवेदकाचे भाव व्यक्त करायचे असतात. रचना साधी सोपी, चटकन ओठावर रुळणारी, छंदबद्ध, नादमधुर असावी लागते. आणि तरीही रचनेत उत्स्फूर्तता हवीच! हे सर्व सांभाळायचे म्हणजे सोपे काम नाही. ह्या कसरती करता करता कधी कधी गीतातले काव्य हरवून जाते. शांताबाईंना मात्र ही किमया साधली होती. त्यांची गीते कधीच ‘पाडलेली’ वाटली नाहीत. त्यांत एक प्रकारची सहजता आणि उत्स्फूर्तता कायम जाणवत राहिली. त्यामुळेच ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

कितीतरी वैविध्यपूर्ण गीतांची अजरामर भेट त्यांनी रसिकांना दिली आहे. ‘गणराज रंगी नाचतो’,‘जय शारदे वागीश्वरी’, ‘मागे उभा मंगेश’, ‘अपर्णा तप करते काननी’ लिहिणारी ही गीतलेखिका ‘हिची चाल तुरुतुरु’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ सारखी गीते लिहून आश्चर्याचा धक्का देते आणि ‘वादलवारं सुटलं गो’, मी डोलकर डोलकर’ अशी टिपिकल ‘कोलीगीते’ लिहिता लिहिता ‘रेशमाच्या रेघांनी’सारखी फर्मास लावणी पेश करते. ‘गजानना श्री गणराया’ च्या संस्कृतप्रचुर शब्दरचनेसोबतच ‘कशी कसरत दावतुया न्यारी’ सारखी गावरान ढंगाची किंवा ‘माजे रानी माजे मोगा’ सारखी कोंकणी गाणी बाईंच्या लेखणीतून सहज झरतात. बाईंच्या लेखणीचा परीसस्पर्श होताच चांदणे उन्हात हसते, तर गगनाला गंध येतो. एखाद्या गीतात प्रियकराला भेटण्यासाठी आतुर झालेली प्रेयसी ‘जाईन विचारित रानफुला’ म्हणत निघते, तर कधी एखादी ‘घन रानी साजणा’सवे वाट चुकलेली प्रेयसी भेटते. एखादी वत्सल माता आपल्या गुणी बाळाला अंगाई म्हणताना दिसते, तर एखादा चिमुरडा ‘खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट’ म्हणत धमकावतो. मुलीच्या लग्नात बापाचा कंठ शांताबाईंच्या शब्दांतून दाटून येतो, नि त्याचवेळी मुलगी ‘साजणीबाई, येणार साजण माझा’ माझा म्हणत आपल्या संसाराचे सुखचित्र रेखते आणि मग तिची ‘सांगू कशी सख्या मी, माझे मला कळेना’ अशी अवस्था होते. जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ. ही सुखदु:खे शांताबाई तितक्याच तयारीने मांडतात. त्यांच्या लेखणीतून जसे ‘सुख भरून सांडते’ तसेच
‘विकल सांजवेळी’ डोळ्यात पाणीही भरून येते. मात्र ‘हा माझा मार्ग एकला’ आहे, हे माहिती असूनही जीवनगाणे गातच रहावे’ असं बजावायला त्या विसरत नाहीत.

शांताबाईन्चा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्या स्वभावातील नम्रपणा. स्वतःपेक्षा इतरांचे कौतुक त्या उत्साहाने करतात. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ सारखी अजरामर गीते लिहिणारी ही गीतलेखिका ग.दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम, शांताराम नांदगावकर, सुरेश भट, ना. धों. महानोर, सुधीर मोघे यांसारख्या गीतकारांचे मुक्तकंठाने गुणगान करते. त्यांच्या आधी १९६१मध्ये (ग्वाल्हेर) कुसुमावती देशपांडे आणि १९७५ मध्ये (कराड) दुर्गाबाई भागवत ह्या दोनच स्त्रिया अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या. १९९६मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या साहित्याचे चाहतेकृतकृत्य झाले.
त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून केलेले मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना उपयुक्त ठरेल. त्यांच्याच एका गीतात त्या म्हणतात, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे...’ हे शब्द त्यांच्या गीतांच्याच नव्हे, तर संपूर्ण साहित्याच्या बाबतीत पूर्णपणे खरे ठरले आहेत.

No comments:

Post a Comment