देवाने वचन दिलेले नाही,
आकाश सदैव निळेच राहील.
आयुष्याच्या पाऊलवाटा
फुलांनी सजवलेल्याच राहतील
देवाने वचन दिलेले नाही,
पावसाशिवाय सूर्य,
दुःखाशिवाय सुख,
वेदनेशिवाय शांती...
पण...देवाने वचन दिले आहे
दिवसापुरती शक्ती
श्रमानंतर विश्रांती
पावलापूरता प्रकाश.
ह्या ओळी कोणा विख्यात कवीच्या नाहीत तर त्या आहेत आपले माजी राष्ट्रपती ए. पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या.अग्निपंख ह्या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्यातला हा कवी जास्त भावतो. जितकं साधं राहणं तितक्याच साध्या नितळ भावना त्यांनी ह्यात मांडल्या आहेत. मुळातच रामेश्वरम सारख्या एका शांत गावात गेलेलं त्यांच बालपण, आईवडिलांचा प्रेमळ वरदहस्त, अल्ला वर नितांत श्रद्धा असलेले वडील रामेश्वरमच्या मंदिराचे मुख्य पुजारी असलेले पक्षी लक्ष्मणशास्त्री ह्यांच्याकडून मिळालेले ज्ञान आणि भवतलातून चांगलं ते टिपण्याची नजर असतांना असं काही घडलं नसतं तर नवल. आपल्या आत्मचरित्रात आईला उद्देशून ते म्हणतात...
"तुझे प्रेम, तुझी काळजी, तुझा विश्वास...त्यांनी मला शक्ती दिली.
जगाला निर्भयतेने तोंड देण्यासाठी, त्याची शक्ती सोबतीला घेऊन, माझी आई ! कयामतच्या दिवशी आपण पुन्हा भेटू.अत्यंत कडव्या धार्मिक समाजात वावरत असतांना(तो समाज जसा हिंदू होता तसाच मुस्लिमही होता). जातीधर्माचे , परंपरांचे गारुड सागळ्यांवरच असतांना माणसाचा 'माणूस' म्हणून होणारा आदर सुद्धा त्यांनी अनुभवला होता..अय्यर नावाच्या त्यांच्या एका शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीच्या मनाविरुद्ध त्यांना घरी जेवायला बोलावले, स्वतः त्यांच्याबरोबर जेवायला बसले आणि अत्यंत सहजपणे प्रस्थापित गोष्टी बदलायच्या असतील तर अश्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष करायचे असते हा मोलाचा मंत्र दिला. मोठे झाल्यावर वैमानिक होण्याचे स्वप्न बघणारा हा तरुण वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाला. ह्या ठिकाणी काम करतांना सुद्धा यश आणि अपयश ह्याच्या खेळात ते स्थितप्रज्ञ होते. अपयश आल्यावर ते म्हणतात...'जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस
अन हातोडा होशील तेव्हा घाव घाल.' आणि यश सामोरे आल्यावर ते म्हणतात...'दीर्घ दिवसभर खरे शौर्याने प्रामाणिक प्रयत्नाने श्रम करतात 'ते हात' सर्वांगसुंदर असतात !
अनेक अयशस्वी उड्डाणानंतर जेव्हा 22 मे 1989 ला अग्नीचे यशस्वी उड्डाण झाले तेव्हा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया, परकीय देशांचा विरोध कलामांनी मागे टाकला होता. प्रत्येक भारतीयाशी ते किती जोडले गेले होते हे बघायचं असेल तर आपल्या कवितेत ते म्हणतात...
'अग्नि'कडे असे पाहू नका
ती आग आहे भारतीयांच्या हृदयातली
तिला क्षेपणास्त्राचे रूप नकाच देऊ
तिच्या समवेत आहे
राष्ट्राची जळती अस्मिता
म्हणून ती इतकी प्रकाशमान आहे.
इतकं लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेले कलाम हे मनातून कायम शिक्षकाच्या भूमिकेत राहिले तरुणांना ते म्हणतात तुमचा आतला आवाज ओळखा, प्रत्येकात एक अग्निबिंदू आहे त्याला चेतवा, स्वतःवर विश्वास ठेवा तरच पैसा प्रतिष्ठा मानसन्मान ह्या तकलादू गोष्टींपासून तुम्ही दूर जाऊ शकाल आणि तुमच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ शकाल.
No comments:
Post a Comment