Monday, January 7, 2019

मन करा रे प्रसन्न

चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी एक प्रश्न मांडला होता, ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ आणि त्याचं उत्तर
विचारी असणाऱ्या मनाजवळच आहे हेही सूचित केल होतं. ते शोधायचं असेल तर मन आधी स्वस्थ असायला हवं. त्याच काळात तुकाराम महाराजांनीही सांगितलं, ‘मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण|’ मात्र ‘मन करा रे प्रसन्न’ म्हटल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की मुळात ते तसं (प्रसन्न) नाही. कारण प्रसन्नच असतं तर ‘प्रसन्न करा’ असं म्हणायची वेळ आलीच नसती.आपल्या काळातही मनाची परिस्थिती हीच आहे.

मन प्रसन्न का नाही? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आयुष्यातले ताण तणाव. प्रत्येकाच्याच जीवनात, अगदी
लहानांपासून वृद्धांपर्यंत, तणाव आहेतच. ताण कसे निर्माण होतात? प्रत्येकाच्या मनात आपापल्या आयुष्याचं एक आदर्श चित्र असतं. हे असं अमुक पद्धतीने घडावं, हे असं मुळीच घडू नये अशा अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, नि अनपेक्षित घटनांना बेसावध क्षणी तोंड द्यावं लागतं. बंगालीत एक म्हण आहे, “जे के आमी चाई, ते आमी पाई ना; जे के आमी पाई, ते आमी चाई ना”. म्हणजेच आम्हाला जे हवं असतं, ते आम्हाला मिळत नाही नि जे मिळतं, ते आम्हाला नको असतं. आम्हाला इतरांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. रोज नवे अपेक्षाभंग, रोज नवी आव्हाने, यात भर पडत जातेय ती बदलत्या जीवनशैलीची, वाढत्या गुन्हेगारीमुळे निर्माण होणारया असुरक्षिततेची.कारणे वेगवेगळी असतील, मात्र कुठलाही वयोगट किंवा व्यवसाय या ताण तणावाला अपवाद नाही. सभोवती दिसणारं चित्र फार भयावह आहे. कसं राहावं मन प्रसन्न? पण असं म्हणून कसं चालेल? सभोवतालची प्रत्येक गोष्ट जर अशी अस्वस्थ करू लागली तर जगायचं कसं? म्हणूनच मन करा रे प्रसन्न! होय, मन प्रसन्न करणं पूर्णपणे आपल्याच हातात आहे. मिल्टनचा सेटन म्हणतो त्याप्रमाणे “The mind is its own place and in itself can make Heaven of Hell and Hell of Heaven.” मनातल्या विचारांचा प्रभाव आपल्या वर्तनावर पडतो. वर्तन सवयीचा भाग बनत जात आणि सवयीमधून व्यक्तिमत्व घडतं (किंवा बिघडतं). आपल्या वृत्ती-प्रवृत्ती तयार होतात. आपण आशावादी बनणार की निराशावादी, सत्प्रवृत्त बनणार की दुष्प्रवृत्त हे ठरतं. मनात क्षणात हजारो विचार येत असतात. त्यांना हद्दपार करता येत नाही. मात्र ते विचार सद्विचार असतील तर मन प्रसन्न राहील. वाईट विचार मनाची प्रसन्नता घालवायला कारणीभूत ठरतात.

बरं, मन प्रसन्न ‘करायचं’ एवढंच पुरेसं नाही. ती प्रसन्नता टिकायलाही हवी. अपेक्षा हे तणावाचं आणि अपेक्षाभंग हे
निराशेचं कारण असू शकतं. पण प्रत्येक कार्य हे फळाची अपेक्षा ठेवूनच करायला हवं का? कुणासाठी काही केलं तर लगेच परतफेडीची अपेक्षा करण्यापेक्षा देण्यातला आनंद अनुभवून बघावा. निष्काम कर्मयोगाकडे केवळ एक तत्त्वज्ञान म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून अवलंब करावा. आपली वागणूक सदसद्विवेकबुद्धीच्या कसोटीवर घासून पाहावी. इतरांसाठी मनात सतत किल्मिष ठेवलं, तर आपलंच मन अस्वस्थ राहील. कुणासाठी एखादी छोटीशी गोष्ट केल्यावर त्या व्यक्तीच्या नजरेतून झळकणारा आनंद मन प्रसन्न करतो. आपण काही करायचा प्रयत्न करतो, पण सतत अपयश येत गेलं तर खचून जातो. बल्ब बनवण्यात हजारदा अपयश आल्यावर एडिसन म्हणतो, ‘बल्ब कसा बनू शकत नाही, त्याच्या हजार पद्धती मी शिकलो.’ संयम हा मनाची प्रसन्नता टिकवणारा खंदा गडी. तो ढळता कामा नये. खूप परिश्रम आणि कष्ट करून मिळवलेल्या यशाने मनाला मिळणारी प्रसन्नता अद्वितीयच.
बरेचदा परिस्थितीमुळे तणाव निर्माण होतात. अशा वेळी जे बदलता येईल ते बदलणे आणि जे बदलता येत नाही ते प्रयत्नपूर्वक आनंदाने स्वीकारणे हा उपाय आहे. जगाला आपण बदलू शकत नाही. पण स्वतःला मात्र नक्कीच बदलू शकतो. आभाळ फाटलं तर ठिगळ लावणं शक्य नसतं. मजबूत छत्री आपल्या डोक्यावर घ्यायची म्हणजे झालं.

जगण्यातली मौज शोधता यायला हवी. बाहेर वावरताना डोळे आणि कान उघडे असले तर खूप काही बघता आणि ऐकता येतं. मन सकारात्मक ठेवून, नुसतं सभोवतालच्या माणसांचं, कोण कसं चालतं, कोण कसं बोलतं याचं निरीक्षण केलं तरी खूप मजा येते. विसंगतीतून विनोद निर्माण होताना दिसतात. सुसंगतीतून काव्य सुचतं. मूड क्षणात बदलतो मन प्रसन्न ठेवण्यासाठी निसर्गाकडे वळावं. झऱ्याचा खळखळाट, भुंग्यांचा गुंजारव, पक्ष्यांचा किलबिलाट यांतलं संगीत ऐकावं. पहाटेच्या दंवाचा, मखमली गवताचा, समुद्रकाठच्या मउशार वाळूचा स्पर्श अनुभवावा. सूर्योदयाच्या वेळी आभाळात दिसणाऱ्या तांबड्या, भगव्या, सोनेरी छटा, अथांग सागराचं निळं-हिरवं पाणी, हिरवीगार वनश्री डोळ्यांत साठवावी. मोगऱ्याचा मंद, रातराणी-निशिगंधाचा मादक, ओल्या मातीचा धुंद गंध श्वासात भरून घ्यावा. एखादा छंद जोपासावा. प्रवास करावा. चांगलं संगीत ऐकावं. वाचन/लेखन करावं. चांगल्या व्यक्तीशी मैत्री करावी. विचारांची देवाणघेवाण करावी. मुख्य म्हणजे शरीर स्वस्थ राखावं आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. कस्तुरीमृगाचं आयुष्य कस्तुरीच्या शोधातच संपून जातं. असंच सुखाचही असतं. तुझे आहे तुजपाशी, फक्त जागा चुकू न देता ते शोधता यायला हवं.

आयुष्याच्या गणिताचं उत्तर म्हणजे मृत्यूरूपी शून्य, हे माहीत असतं. गुण मिळतात ते गणित सोडवण्याच्या, म्हणजेच आयुष्य जगण्याच्या रीतीला. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ही रीत शिकवणारा मास्तर म्हणजे मन आणि शिकणारा विद्यार्थीही मनच.

“मन गुरु आणि शिष्य| करी आपुलेची दास्य|
प्रसन्न आप आपणास| गती अथवा अधोगती|”

No comments:

Post a Comment