Tuesday, January 1, 2019

नवा डाव

अकोल्याला 27,28 वर्ष राहिले. तिथले संथआणि सोपे आयुष्य जगल्यावर पुण्यात येऊन राहणे निश्चितच जरा कठीण आहे. अकोल्याच्या मित्रमंडळींना सोडून येणं खरचं खूप अवघड होतं. पण तिथलं दाणापाणी संपले असणार म्हणून तर हे सगळे घडले असेल का?असेच वाटते आहे. नव्या जागेत रुळण्यात वेळ तर लागेलच आणि ते ही पुण्यात. वाचन बंदच आहे, जिवाभावाच्या मैत्रिणी पण दूर अशावेळी मन रमवायला काही तर हवेच ना! 

ह्या फ्लॅट ची  गॅलरी एकदम छान आहे. समोर बिटवाईज कंपनी वर भारताचा झेंडा दिमाखात फडकत असतो. त्यामुळे एकदम भारी वाटत राहतं. निळ्या आकाशात त्याच ते वार्‍या वर डुलत राहणं फारच विलोभनीय आहे. बरेच लोक येता जाता फोटो काढत असतात. रोज सकाळी झेंडा चढवतात आणि मावळतीला उतरवतात. कधीकधी मावळतीला आकाशात इतक्या सुंदर वेगवेगळ्या रंग छटांची मुक्त हस्ते उधळण असते. हळूहळू संध्याकाळ गडद होत जाते आणि त्या गडदपणावर रंगीबेरंगी लाईट्स मन मोहून टाकतात. निरनिराळ्या इमारती रंगीत दिवे लावून आपलं नाव उजळवून उभ्या असतात. दिवसापेक्षा रात्री जास्त चमकत असतात. शेजारीच सतत वाहणारा मुंबई बेंगलुरु हायवे जिवंतपणा ची ग्वाही देत उभा असतो. एक क्षणभर देखिल न थांबता चालत राहण्याचा मंत्रच जणू जपत असतो. असा हा रस्ता स्वतः एकाच जागी बसून असला तरी खर्या अर्थाने आपला हमसफर, मार्गदर्शक, सखा च वाटू लागतो. सतत ध्येया कडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो आहे असच वाटतं. चलते रहो मंजिल मिलेगी जरूर हा विश्वास वाटत रहातो. खर तर रस्त्याविषयी असे विचार मनात कधीच आले नाहीत कारण इतक्या जवळून कधी पाहिलेच नव्हते ना! खरच "रस्ता " या विषयावर अनेक दिग्गजांनी छान छान कविता, लेख लिहले आहे ते मला आठवू लागले. आपल्या बॉलिवुड ची तर चिक्कार गाणी मला एकापाठोपाठ आठवत असतात. आणि अशा या जिवंतपणा ची साक्ष असलेल्या रस्त्याला मी नव्याने भेटले. त्यावरील ट्रॅफिक च्या आवाजाचा त्रास आता मला जाणवेनासा झालाय. मनात कधी उदासी आली कि गॅलरीत खुर्ची टाकून या हायवे कडे बघत बसलो तरी तो हायवे न बोलता आपलं मनोरंजन करुन प्रफुल्लित करतो. एक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नहीं.... न कळत हे गाणं मी गुणगुण लागते.

या रस्त्यासारखचं अजून एक मन लुभावणारं काही खास आहे तर या हायवे ला लागूनच असलेले आणि माझ्या गॅलरीतून अगदी जवळच दिसणारे शेत! काळीशार लुसलुशीत लोण्यासारखी मऊसूत जमीन आणि त्यावर वार्‍याच्या झुळूकीवर डोलणारे हिरवेगार पिक!! त्यातच काही नारळाची आणि आंब्यांची साठसत्तर झाडं बघून हरखून जातो आपण. इतक्या जवळून आणि सतत शेत बघणं माझ्या साठी तरी अविस्मरणीय अनुभव आहे. सकाळ संध्याकाळ कोवळ्या सोनेरी पिवळ्या    उन्हात ते शेत बघणे यासारखा दुसरा आनंद नाही. इतकं विहंगम दृश्य असतं ते कि भान हरपून आपण नुसते बघत बसतो.

त्या शेतात कोणतं पिकं आहे ते मात्र मला माहित नाही. बहुतेक तांदूळ असावा कारण त्याला भरपूर पाणी देत राहतो तो शेतकरी. इतकं काम करत असतो तो शेतकरी कि बस. खरचं लाखो रुपये जमीनीवर निछावर केलेले असतात. शिवाय प्रचंड शारीरिक मेहनत असते. दिवसरात्र देहाने, मनाने आणि धनाने शेतकरी त्या मातीत राबतो. मुलाबाळांपेक्षाहि शेताला जपलं नाही तर आश्चर्य! असे हे शेत बघणे हा विरंगुळाच झाला आहे माझ्या साठी. कामातून वेळ मिळाला किंवा कामाचा कंटाळाही आला तरी शेतात जाऊन बसलं की कस मस्त वाटतं.
तसं पाहिलं तर निर्जीव रस्ता आणि सजीव शेत दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी पण जगण्याची उमेद कायम ठेवणारे आहे.  निसर्ग निर्मित आणि मानवनिर्मित ही दोन्ही साधनं मनाला, जगण्याला अर्थ देतात हे मात्र नक्की

No comments:

Post a Comment