Thursday, January 17, 2019

पैठण (भाग १)

 ।।पदरावरती जरतारीचा ,मोर नाचरा हवा
         आई मला नेसवं शालू नवा।।

     ।।नेसली मी काळी बाई चंद्रकळा ठिपक्यांची बाई ठिपक्यांची,
         तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरिची।।

आज नेमकी ही गाणी ओठावर कां आलीत असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे,पण त्याच उत्तर  आहे    माझ्याकडे,सांगते बरं..........!माझा प्रवास सुरु आहे पैठणच्या दिशेने .तिर्थाटन म्हणून नाही तर अहोंची बदली झाली म्हणून   !.....पैठण अगदीच छोट गांव पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक ठिकाण म्हणून ज्याची ख्याती आहे असं,त्यामुळे नितांत उत्सुकता मनात ठेवून या गावाच्या दिशेने चालली होते. 
पैठण आणि पैठणी हा ही एक अत्यंत स्त्रीसुलभ जिव्हाळ्याच विषय अशा गावात जातानाच मनात पक्की खूणगांठ बांधली की,"पैठण आणि पैठणीचे रेशीमबंध जोडूनच अकोल्याला परतायचे."
तिथली  ऐतिहासिक समृद्धी,परंपरा,रितीभाती,मराठवाडी भाषा,खानपान पद्धती आणि वरकरी परंपरा!
"संतश्रेष्ठ शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचे दिव्य अलौकिकत्व जाणून घेण्याची  जिज्ञासा मनात ठेवूनच प्रवासाचा आनंद घेत होते.
ध्यानीमनी नसतांना एखादी गोष्ट आयुष्यात अवचित घडते तेव्हा त्याला आपण "योग" म्हणतो.तोच योग माझ्याबाबतीत घडून आला नि माझा दक्षिणकाशी "पैठणनगरीत"प्रवेश झाला.
सुरुवातीचे काही दिवस जरा चाचपडण्यातच गेले......नवी जागा नवे लोक नवी बोलीभाषा (विदर्भआणि मराठवाडा) सगळच नवीन.अशा नवपरिचीत गावात ओळख व्हायलाही वेळ लागणारच.हळूहळू चाचपडत पाऊल पुढे टाकणं सुरु होतं.लोकांच्या भेटीगाठीतून काही संदर्भ,माहिती मिळत होती. आणि ओळख्यादेखिल वाढत होत्या.
'गोदातिरी वसलेल पैठण हे अतिशय पुरातन गाव',पुरातन काळातील शककर्त्या शालिवाहनाची ही "प्रतिष्ठान नगरी".
त्याकाळात दळणवळणाच्या प्रमुख मार्गावर असलेली ही नगरी आता काहीशा आडमार्गाला असल्यासारखी वाटते.गावात अनेक पुरातन संदर्भ असणार्या वास्तु,आशियाखंडातिल  सर्वात मोठ असलेल मातीच धरण 'जायकवाडी धरण'......तसेच पैठणी उद्योग कलाकेंद्र,ज्ञानेश्वर ऊद्यान,पालथी नगरी,नागघाट,जैनमंदीर,श्रीमंत लड्डुशेठ सावकाराचा वाडा आणि अर्थातच एकनाथ महाराजांचे गावातील मंदीर आणि समाधीमंदीरआकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
           इ.स.पूर्व दुसया शतकात गोदाकाठी वसलेली प्रतिष्ठान नगरीचा सातवाहन कुळातील राज्यकर्ता  'सम्राट शालिवाहन' आजही आपणास शककर्ता म्हणून ज्ञात आहे.तीच ही गौरवशाली नगरी. शिवराज्याभिषेकासाठी आमंत्रित पुरोहितांपैकी ख्यातकीर्त असलेले वे.शा.सं.गागाभट्ट हेही पैठणचेच.ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले तेही पैठण येथेच. अशा आणि अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षदेणारे पैठण हे गांव ,राजधानी,तीर्थक्षेत्र या समुच्चयांनी युक्त आहे.

       ऐतिहासिक  पाऊलखुणांमधील एक खुण म्हणजे ,गर्भश्रीमंत अशा लड्डुशेठ सावकाराच्या वाड्याची, पेशव्यांच्या स्वागतासाठी ज्याने सोन्याच्या पायघड्या अंथरल्या होत्या त्या सावकाराचा वाडा या पालथ्यानगरी परिसरात प्राचीन अवशेषांच्या खुणा जपत असलेला आपणास पाहायला मिळतो..........

।।जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ,
या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू।।
            मराठवाड्यागीतातील या ओळी सार्थ करणारी ही नगरी, तेथून जवळच पुढील ठिकाण आहे ते म्हणजे तीर्थखांब!!!
    गोदावरीच्या महापुराने पैठणनगरी वेळोवेळी सुरक्षित  ठिकाणी  वसल्या गेली, तो परिसर म्हणजेच पालथीनगरी होय, ह्याच परिसरात तीर्थखांब आपलं लक्षवेधून घेतो.एकूण चार भागात त्याची जडणघडण असुन ,शिल्पाच्या आधारे स्वर्ग ,पाताळ, मृत्युलोकाची कल्पना केल्याचे दिसते. २०००वर्षापूर्वीच्या ३५फूट उंचीच्या या धातूखांबावर अतिशय सुंदर कोरीव नक्षीकाम आहे. पर्या ,अप्सरा,हत्ती ,घोडे,पोपट,कोरलेले आहेत. शालिवाहनाच्या विजयाचे प्रतिक म्हणून आजही हा खांब दिमाखात ऊभा आहे. अशी आख्यायिका आहे की,ज्यावेळेस गोदावरीचे पाणी ह्या खांबाच्या टोकापर्यंत जाईल आणि ते पाणी कावळा पिईल त्यावेळेस जगबुडी होईल...........!

No comments:

Post a Comment