आधुनिक वैद्य विषयी सांगण्यापूर्वी प्राचीन काळी लिहून ठेवलेल्या ग्रंथोक्त काही गोष्टींबद्दल मला आधी सांगावेसे वाटते .कारण माझ्या विषयात "आधुनिक" हा असा शब्द वापरला असल्याने "प्राचीन काळी" वर्णन करून ठेवलेल्या वैद्यांच्या गुणांचा इथे संदर्भ देणे मला आवश्यक वाटते. शेवटी वैद्य ज्या शास्त्रामुळे ओळखला जातो त्या आयुर्वेद शास्त्राचाही प्राचीन काळी व हल्लीच्या काळी घेतलेल्या अर्थांमध्ये आपल्याला फरक जाणवतोच. अतिप्राचीन काळी आयुर्वेद शास्त्र हे सर्व प्रकारचे शारिर मानस व्याधी ,भूतबाधा यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचे पवित्र शास्त्र आणि दैनंदिन व्यवहारात जीवनाचे काही नियम घालून देणारे उच्चकोटीचे शास्त्र या दृष्टीने ओळखले जायचे. मध्यंतरीच्या म्हणजे साधारण पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळात नाडी बघणारा तो वैद्य आणि सुई टोचणारा तो डॉक्टर अशा विचाराला सामान्य जनतेने प्राधान्य दिले होते. याच काळात झाडपाल्याचे औषध सांगणारे ते आयुर्वेद असा समज होता तर आताच्या आधुनिक युगात आयुर्वेद हा "पर्याय वैद्यक" अशा गोंडस नावारूपाला आला आहे आणि त्याचबरोबर वैद्य हा केवळ पुड्या किंवा काढे देणारा न राहता आवश्यकता पडल्यास इंजेक्शन ही देणारा ,आवश्यकता पडल्यास मायनर ऑपरेशन्स करणारा असा एक साधारण डॉक्टरच्या बरोबरीचा वैद्यक व्यावसायिक अशी प्रतिमा जनमानसात आहे. दुसरा एक समज असा की म्हाताऱ्या व्यक्तींचे आजार चिवट असतात किंवा ते जीर्ण व्याधी या स्वरूपाचे असतात व त्यावर कुठलीही चिकित्सा महिनोनमहिने वर्ष वर्ष घ्यावी लागणार असते अशावेळी आपली त्यातल्या त्यात स्वस्तातली आयुर्वेदिक औषध डॉक्टर पेक्षा कमी फी घेणाऱ्या वैद्य कडूनच घेतली जातात शिवाय म्हाताऱ्या माणसांना वेळ भरपूर त्यामुळे काढे करणे, चूर्णाच्या पुड्या करणे, मध मिसळणे, तूप मिसळणे यात त्यांचा वेळही चांगला जातो म्हणून ते सुद्धा वैद्याकडून औषध घ्यायला तयार असतात. मात्र केवळ आयुर्वेदिक औषधांवर विश्वास आहे म्हणून वैद्यांकडून औषध घेऊन जाणारी मंडळी प्रमाणात कमी असली तरी अशा व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मदतीनेच अधिकाधिक लोकांच्या मनात आयुर्वेदाविषयी विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या आधुनिक वैद्यवर आहे .लोकांच्या मनात आयुर्वेदशास्त्र विषयी असलेला आदर वाढवून त्याबद्दल विश्वासही निर्माण करणारा असा आजचा प्रत्येक वैद्य असावा. बीएएमएस ला आल्यापासून श्लोक पाठांतराचा विशेष उरक नसला तरी आम्ही आय एम पी म्हणून लिहून ठेवलेला एक श्लोक आठवतो आहे
दक्षस्तीर्थत्त शास्त्रार्थात् दृष्ट कर्मा
म्हणजेच वैद्य दक्ष गुरु जवळ शास्त्राभ्यास केलेला शुचिर्भूत व क्रिया पाहिलेला असा असावा. अशी अपेक्षा ग्रंथकर्त्यांनी व्यक्त केली आहे वैद्य दक्ष असावा म्हणजेच रुग्ण परिचारक व औषधी याबद्दल त्याने विशेषज्ञान ठेवावे .जेव्हा वैद्याकडे येतो विशेषतः आजच्या वैद्याकडून तेव्हा यांच्या नाडी परीक्षेने माझ्या व्याधीचे अचूक निदान होणार आहे, महागडी इन्वेस्टीगेशन फारशी करावी लागणार नाहीत आणि यांच्या औषधांनी कुठलेही साइट्स न होता माझा रोग मुळापासून दूर होणार आहे अशा आपुलकीच्या भावनेने तो रुग्ण वैद्याकडे आलेला असतो. अशावेळी रुग्णाच्या कुठल्याही भावना न दुखावता त्याला व्याधीमुक्त करण्याचा परोपरीने प्रयत्न करणे हे वैद्याचे प्रथम कर्तव्य आहे. रुग्ण लघु व्याधीत आहे गुरु व्याधीत आहे याबद्दल दक्षतेने विचार करून वैद्याने चिकित्सा करावी. मात्र दक्षता याचा आजच्या घटकेला सर्वात समर्पक अर्थ म्हणजे "BEWARE ऑफ ग्राहक संरक्षण कायदा" आज तुम्ही पराकाष्ठेने रुग्णाचे स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करताय पण काही कारणाने जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर उद्या हाच तुम्हाला "आपलं माणूस" समजणारा रुग्ण मात्र ग्राहक संरक्षण कायद्याचा आश्रय घ्यायला कमी करत नाही, याचीही दक्षता आजच्या वैद्याने पाळायलाच हवी. तुम्ही रुग्णांविषयी सहानुभूती दाखवता, त्याला बरे करणे आपले प्रथम कर्तव्य मानता या सगळ्या सगळ्या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी आज सरकारने मात्र तुम्हाला विक्रेता आणि रुग्णाला ग्राहकच ठरवले आहे. अशा आजच्या आधुनिक युगात स्वतःला चिकित्सेसाठी झोकून देण्यापेक्षा ग्राहक संरक्षण कायद्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर पडणार नाही ना याबद्दल प्रत्येक वैद्याने दक्ष राहिलेच पाहिजे.
आणि यासाठीच आपल्याला गरज पडणार आहे ती मॉडर्न मध्ये सांगितलेल्या क्लीनिकल मेथड्स ची आणि इन्वेस्टीगेशन ची. यांच्या साहाय्याने आपले निदान पक्के करून चिकित्सा केल्यास त्यात कसलीही कसूर राहण्याची शक्यता कमी होते.
याच संदर्भात शास्त्राध्ययन योग्य प्रकारे केलेला असणे या वैद्याच्या गुणाचा उल्लेख करावासा वाटतो. वैद्याला आयुर्वेदशास्त्रात यथार्थ ज्ञान असावे पण त्याचबरोबर मॉडर्नचाही अभ्यास असणे आवश्यक झालेले आहे. जे आयुर्वेदाशी अतिशय एकनिष्ठ आहेत किंवा ज्यांना मॉडर्न चा अभ्यास करणे काहीसे अपमानास्पद वाटत असेल त्यांनी आमच्या आयुर्वेद शास्त्रात सांगितलं की कुठलेही शास्त्र परिपूर्ण नसतं त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी अनेक शास्त्रांचे अध्ययन आवश्यक आहे अशी आपल्या अनेक शास्त्राध्ययनाची पुष्टी करून का होईना चिकित्सेच्या दृष्टीने आवश्यक ते अध्ययन केलेले असावे.
आजचा वैद्य हा शुचिर्भूत, शरीर व मनाने पवित्र असावाआणि दृष्ट कर्मा असावा. प्रायव्हेट क्लिनिक्स, नाईट शिफ्ट,हे- ते क्लिनिक्स करून त्याने दृष्ट कर्मा व्हावे. यातूनच रुग्णाशी कसे वागावे, त्यांच्या आजाराची संपूर्ण माहिती कशी मिळवावी, आपल्या बरोबर च्यां परिचारिका शी कसे वागावे ,यांचे व्यावहारिक ज्ञान त्याला प्राप्त होते .प्रत्यक्ष औषधी निर्माण केलेले, बघितलेले असावे. कंपन्यांची तयार औषधे द्यायची झाल्यास कुठल्या कंपनीचे कुठले औषध द्यावे किंवा कुठल्या औषध स्वतः बनवून देणे जास्त योग्य आहे या सर्वांचे ज्ञान दृष्ट कर्मानेच होऊ शकते. आजच्या वैद्याने प्रथम लहान सहान प्रयोगातून स्वतःच्या मनात आयुर्वेदाविषयी विश्वास संपादन करावा त्यानंतरच रुग्णाला तो विश्वासात घेऊ शकतो. आधुनिक वैद्य पुढे आणखी एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे रुग्णाला पथ्यापथ्य सांगण्याचे !कारण आयुर्वेद शास्त्रात चिकित्सेबरोबर पथ्यापथ्य ला ही फार महत्त्व आहे .काय खावे, काय खाऊ नये, कुठल्या वेळी काय करावे काय करू नये, या सर्व गोष्टी व्याधीनुसार ,व्यक्तीनुसार वेगवेगळ्या सांगितल्या आहेत व प्रत्येक व्याधी बरा होण्यास त्याचे महत्त्व आहेच. मात्र धावपळीच्या युगात या सगळ्या गोष्टी पाळणे कितपत शक्य आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी लोकांना कितपत पटवून देणे शक्य आहे. दूध आणि केळी एकत्र खाऊ नये पण मला फ्रुट सॅलड खुपच आवडते. तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नये पण मला पावभाजी बघितलीच की तोंडाला पाणी सुटते. ब्रह्म मुहूर्तावर उठावे पण रात्री टीव्हीवर तेजाब सारखा सिनेमा असला तर झोपायलाच ब्राह्ममुहूर्त होतो .या सगळ्या गोष्टी टाळणे आज अशक्य झालेले आहे. रुग्णांवरच नाही तर वैद्या बरही आजच्या युगानुसार सर्व गोष्टींचे बंधन आहे. अशावेळी कुठला रुग्ण कुठली पथ्ये पाळू शकतो किंवा किती प्रमाणात अपथ्य करतो याचे गणित वैद्या नेच सोडवून त्या प्रमाणात चिकित्सेत बदल केला पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाचा पुरस्कार करणारा पण तरी इतर शास्त्रांचा द्वेष न करणारा ,रुग्णाची चिकित्सा हे आपले प्रथम कर्तव्य समजणारा पण त्याचबरोबर आपला जीवन निर्वाह चांगला होईल याची दक्षता घेणारा आणि काळानुरूप बदललेल्या गोष्टींचा शास्त्राशी ताळमेळ साधून चिकित्सा करणारा अशी ही तारेवरची कसरत यशस्वीपणे पार पाडण्यास समर्थ असा हा आधुनिक वैद्य असावा.
No comments:
Post a Comment