Monday, January 28, 2019

हळदी कुंकू आणि बरच काही

"हुश्श" !आटोपलं बाबा एकदाचं हे हळदी कुंकू प्रकरण.
काय  मेली ती  ताम-झाम! आज काय कुणाच्या लेकीचा संक्रांत सण, तर उद्या कुणाच्या सुनेचा.कुणाच्या नातीचे/नातूचे बोर नहाण .आणी ह्यापैकी काही नसलेच, तरी नेहमीचे हळदी कुंकू आहेच.
रोज उठून त्या ठेवणीतलया  साडया काढ़ा, दागिने (असतील ते) चढवा आणी बरयापैकी तयार होऊन पडा एकदाचे घराबाहेर." असच  स्वगत चालत असेल का  स्त्रियांच्या मनात?
दरवर्षी संक्रांति चा दिवस ते रथसप्तमी चा दिवस,ह्या संपूर्ण काळात चालणारा हा  उत्साह सोहळा पाहून मनात हा विचार  येतोच.
'हळदी-कुंकू' ह्या कार्यक्रमाचं अन स्त्रियांच्या मनाचं एक पूर्वापार चालत आलेलं आणि जवळचं नातं आहे असं वाटतं. कुठेतरी ते 'सौभाग्य' ह्या संज्ञेशी जोडलं गेलंय  म्हणूनही असेल कदाचित. 
कारण हळद,कुंकू,वाण ही सारी सौभाग्यवतीचीच लक्षणे मानली गेली आहेत.पूर्वी वाण म्हणून सुवासिनींना 'सुगडी' देत असत.त्यात वाटाण्याच्या शेंगा,बोरं, हरभरे,गाजराचे काप,तिळगुळ सह देण्याची प्रथा होती.आजही हे अशा प्रकारचं वाण बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. हे वाण देण्यामागे पोषक आणि गुणकारी तत्वांचा  विचार केला गेला होता. 

कालानुरूप,परिस्थितीनुरूप,आणि अर्थात सोयी नुरूप ह्या पारंपरिक सोहळ्यात आता बरेच बदल म्हणा,सुधारणा म्हणा, घडून येताना दिसत आहेत. जसे,गहू,बोरं, वाटाण्याच्या शेंगा ह्याची जागा  मुरमुरेनी घेतली आहे. (काही ठिकाणी) 'लुटीच्या'वस्तूंमध्येही कमालीची विविधता आली आहे.(अर्थात,आजही त्यात प्लॅस्टिकच्या छोट्या बरणीचे स्थान मात्र अढळ आहे .)तिळगुळ सोबतच काहीतरी चमचमीत पदार्थ खाऊ घालून येणाऱ्या बायकांना संतुष्ट करण्याची प्रथा देखील सुरु झालीये बऱ्याच ठिकाणी.(नाहीतरी एव्हढ्याश मेल्या त्या चमचा  वाटीसाठी   इतकया  लांब जायला पुरते तरी का? असा सूज्ञ विचार करणारया बायकांसाठीच असा ऐतिहासिक  निर्णय घेतला गेला असावा)  महत्वाचे  बदल असे ,की हळदी कुंकू ऐवजी 'तिळगूळ-समारंभ' असे संबोधन वापरणे,कार्यक्रम खाजगी रित्या न करता सार्वजनिक सवरूपात करणे,कार्यक्रमाला फक्त सुवासिनीना न बोलवता विधवा बायका देखील बोलावून त्यांच्या मनातील न्यूनगंड, नैराश्येची भावना थोडयाफार प्रमाणात का होईना,कमी करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे बदल निश्चितच उललेखनीय आहेत.

एका गोष्टीचं मात्र मला नेहमीच नवल वाटत आलेलं आहे आणी ते म्हणजे,वाणात 'लुटल्या' जाणाऱ्या वस्तूचं अप्रूप झाडून सगळयाच बायकाना असतं हो. मग ती वस्तू काही का असेना,अगदी काहीही.हयात छोटया चमचयापासून,वाटी,गाळणी,सगळच आलं. (आता साईज बदलली असेलही कदाचित)
बाई श्रीमंत घरची असो वा गरीब घरची.पारंपारिक विचाराची असो वा आधुनिक विचार बाळगणारी असो. हया लुटलया जाणाऱ्या वस्तू मधे सगळयाच (जवळजवळ) बायकाना कमालीची उत्सुकता असते. जसं कपडयाचा सेल,दागिनयाचा सेल,अथवा घरगुती वस्तूंचा सेल----कोणत्याही 'सेल' च्या ठिकाणी सर्वच स्तरातील बायका प्रचंड गर्दी करताना दिसतात.अगदी तसच,हळदी कुंकू च्या कार्यक्रमानाही बायका उत्साहाने हजेरी। लावताना दिसतात.

वर्षा ऋतूत सृष्टी जशी हिरवाईने बहरते ना,तद्दवतच हया दिवसात गावातील रस्तेही सौंदर्याने नटलेले दिसतात.घोळकया घोळकयाने जाणारं सौंदर्य बघून खराब रस्तयानाही  ऊत्तम दिवस आलयाचे भासते. समस्त पुरुष जातीला हया संपूर्ण कालावधीत,आपलया राशीला,'सुजलाम् सुफलाम्' झालयागत 'नेत्रसुख' मिळालयाचा अभिनव साक्षात्कार होत असणार.घरोघरी नवरा नावाची जातही जाम खुश रहात असणार.पहिलं कारण,एरवी अतिशय सुस्त आणी मखख् चेहरा करुन बसलेलया  (अगदी पती घरी आलयानंतरही तोंडा वरची माशीही उडू देणयाचे कष्ट न घेणाऱ्या ) त्यांच्या बायका हया कालावधीत मात्रं भलत्याच प्रसन्न आणी आनंदी दिसतात.दुसरं कारण,ज्यांना घरात बायकोची कटकट आणी वटवट नको वाटते,त्याना बराच काळ बऱ्यापैकी शांतता मिळू शकते.
अगदी पुढारलेलया विचारांचया बायका,ज्यांच्या मते,'मंगळसुत्र घालणे,पायात जोडवे घालणे,कपाळावर लाल कुंकूच किवा टिकली रेखाटणे म्हणजेच सौभागयवती असणे,असा काही नियम आहे का? आम्ही आमच्या पेहरावाला अनुसरून  मँचीग करू. कुणाचे काय जाते?' त्या देखील हळदी कुंकू च्या  कार्यक्रमाना न चुकता,न कंटाळता हजेरी लावताना आढळतात..(भले  आपण खुदद् त्या फंदात पडत नसलया तरी) 
मुखय म्हणजे बायकांचा हा उस्ताह शेवटच्या दिवसापर्यत म्हणजे रथसप्तमी पर्यंत टिकून असतो हे आणी विशेष. 
काय कारणं असतील हयामागे,खरोखर विचार करणयासारखी गोष्ट आहे,ना?
विवीध स्तरातील,भिन्न विचारसरणीच्या ,भिन्न रहाणीमान असणाऱ्या आणी भिन्न वातावरणातील बायका जेव्हा अशा कार्यक्रमांसाठी एकत्रं येतात,मनापासून आनंद घेतात,देतात,तेव्हा नक्की काय कारण असू शकतं? एकंदरीतच स्री जातीची मानसिकता? की अजून काही? तुम्हाला काय वाटतं?

पूर्वजों से हुई एक मुलाकात

 पिछले दिनों भाषा से संबंधित एक कार्यशाला में भाग  लेने के लिए प्रो. गणेश नारायण देवी के संस्थान आदिवासी अकादमी तेजगढ़ जाने का सुअवसर प्राप्त हुआ। हम लोगों के इस ग्रुप में ….सदस्य थे।हम इस अकादमी में आदिवासी भाषाओं और उन्हें बचाए रखने के लिए किए जा रहे उपायों के बारे में जानने के उद्देश्य से गए थे। तेजगढ़ के पर्वतीय इलाके में स्थित भाषा अकादमी का परिसर नैसर्गिक प्राकृतिक सौन्दर्य और जैवविविधता से संपन्न है।तेजगढ़ आदिवासियों की विरासत का अद्भुत नमूना है। आज भी उन पर्वतों में ऐसी अनेक गुफाएँ हैं, जिनमें हमें लगभग आरंभिक मानव सभ्यता के चिन्ह मिलते हैं। कई गुफाओ मे आदिमानव द्वारा सिरज दिए गए चित्र है जो हमारे पूर्वजों के अस्तित्व और उनके सहज जीवन बोध की गवाही देते है।ऐसी ही एक पहाड़ी चढ कर और गुफा के भीतर  पेट के बल धँस कर मैं और मेरे साथी अंदर पहुँचे थे, जहाँ बस किसी तरह सीधे खड़ा हुआ जा सकता था। गुफा के भीतर जगह बस इतनी कि तीन चार लोग बैठ सकें और जगह भी समतल नहीं…ठीक आदिवासियों के जीवन की तरह कठिन और कठोर! किंतु वहाँ दीवार पर चित्र बने थे, जो अभ्यासकों के अनुसार 15,000 वर्ष पुराने हैं। उन चित्रो को देखते हुए मैं अपने पूर्वजों के साथ जो कम से कम पंद्रह हजार साल पहले वहाँ रहते थे,  एक अदृश्य बंधन को महसूस करने लगी । चित्रों का कमाल जिसने, यहाँ रहने वाले मेरे आदि पूर्वजो के साथ मुझे गोया किसी धागे मे बांध लिया।
         

मैंने जब उन दीवारों को होले से छुआ तो  ऐसा लगा कि मेरे पूर्वजो का स्पर्श मुझ तक पहुँच रहा है। वाह पत्थर की इन दीवारों ने उन स्पर्शों को अब तक संभाल कर रखा है।मै उसी जमीन पर खड़ी हूँ,जहाँ वे कभी खड़े हुए थे।मै उसी हवा मे साँस ले रही हूँ, जिस हवा मे वे साँसे लिया करते थे। फिर  लगा कि ये चित्र बनाते वक्त  उन्होंने क्या सोचा होगा? किस चिज से बनाए होंगे ये चित्र,जो 15000 साल बाद भी उनकी कहानी बताते हुए साबुत हैं आज तक? क्या बताना चाहते होंगे इस माध्यम से वे? अपने बच्चो के लिए सोचा होगा उन्होने,लेकिन क्या उन्हें इस बात का अहसास था कि हजारों  सालों बाद इन चित्रों को खोजते हुए कोई वहाँ पहुंचेगा? 

और फिर मुझे अनायास सुमन केशरी एक की कविता, जो  उनकी “मोनालिसा की आँखें” संग्रह में “ मेरे पूर्वजों” शीर्षक से संकलित है, याद आई। सचमुच वैसा ही तो मैंने महसूस किया था, उन चित्रों को देखते, गुफा की दीवार का स्पर्श करते जैसे कि कवि ने महसूस किया था। मैंने अपने साथियों को इस कविता के बारे में बताया और उसका पाठ किया।कविता इस प्रकार है:  

 

 मेरे पूर्वजों

 

मैं 

एक बार

बस 

केवल एक बार

छूना चाहती हूँ

तुम्हारी उंगलियों को 

अपनी उंगलियों से

तुम्हारे गाल होंठ और बालों को

महसूसना चाहती हूँ

देखना चाहती हूँ तुम्हारी आंखों को 

जिनमें मेरा अक्स

सौ परदे पार

बीज-सा रुपा है

मेरे पूर्वजों...

 

मेरे पूर्वजों

मैं उस धरती पर एक कदम

रखना चाहती हूँ

जहाँ पड़े थे तुम्हारे पहले कदम

उस धार के बूंद भर जल को पीना चाहती हूँ

जहाँ बुझी थी 

तुम्हारी प्यास

 

एक बार उस पवन को 

देह में महसूसना चाहती हूँ

जिसमें सूखा था 

तुम्हारा पसीना

 
क्या तुम वे शब्द मुझे सौंपोगे

मेरे पूर्वजों?

जिनसे मैं तुम तक

पहुँच सकूँ

एक बार

बस

एक बार…

 

क्या इस कविता को पढ़ते हुए, मेरे अनुभवों से गुजरते हुए आपको भी कुछ कुछ वैसा ही नहीं महसूस हो रहा?

Sunday, January 27, 2019

आकार

बालक दिन आला की येतो मातीचा गोळा घेऊन बसलेला कुंभार आणि गुलाबाचे फूल कोटाला लावलेले चाचा नेहरू!  अलिकडे नाही म्हणायला दप्तरांची ओझी वाहणारी मुलेही डोकावतात याच मुहूर्तावर! 
हल्लीच्या परिस्थितीचा विचार करता मुलांना मातीचे गोळे समजण्यापेक्षा बर्फाचे गोळे म्हणावे का असे वाटते. कारण कुंभाराने आकार दिल्यावर भट्टीत भाजलेला मातीचा गोळा पुढे तसाच टिकतो. मात्र बर्फाचा तयार झालेला आकार सतत टिकवून ठेवण्याची कसरत करावी लागते----विरघळला तर? 
आजच्या अधिक कल्पकता वाढवण्याच्या, ज्ञानार्जनाचे नवनवीन साहित्य उपलब्ध होण्याच्या, वेगळ्या वाटा चोखाळण्याच्या झटपट बदलणाऱ्या युगात तोच तो आकार वर्षानुवर्षे कायम ठेवणे मागासलेपण समजावे का? याउलट दिला आकार, सांभाळला काही काळ, पुन्हा विरघळून टाकला नवीन आकार देण्यासाठी ह्याला समंजसपणा म्हणावा का?  

अगदी लहानपणापासून एक खेळणे खेळून काही तास होताच दुसर्‍या कडे धावणे, एक अभ्यासक्रम नाही झेपला तर असंख्य अनेक, एक जोडीदार नाही वाटला मनासारखा तर दुसऱ्याची तयारी हेच प्रकार भोवताली वाढताना दिसत आहेत. यातलं काय चूक काय बरोबर? 
या संदर्भात  Cattell या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला बुद्धिमत्तेचा सिद्धांत आठवला. बुद्धिमत्ता अर्थात  intelligence ही दोन प्रकारची सांगितली आहे .Fluid Intelligence हा प्रकार आपण सवयीने आत्मसात केलेल्या गोष्टींवर अवलंबून नसलेला, त्या त्या प्रसंगानुरूप कारणमिमांसा करुन वापरता येणारा आणि वाढत्या वयाबरोबर कमी होणारा आहे. दुसरा Crystal Intelligence हा प्रकार शैक्षणिक सांस्कृतिक अनुभवांनी सम्रुद्ध होणारा आणि वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. या दोन्ही प्रकारांचा पुरेपूर वापर करत आजच्या बालकांना पुढे एक समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवायला मदत करणे ही आज खरी गरज आहे. 

नवनवीन अनुभवांनी मुलांना सम्रुद्ध करणे ---निसर्गाशी जवळीक, वेगवेगळ्या कलांची ओळख, क्रिडाप्रकारांची ओळख, छोट्यामोठ्या घरगुती कामांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, इ. मधून व्यक्ती प्रसंग ओळखून त्यांना हाताळण्याचे स्वातंत्र्य मुलांना मिळावे. यातूनच सुजाणता येऊन पुढे अनुभव ज्ञानाच्या बळावर संपादित बुद्धिमत्तेचा वापर यशस्वी व्हायला मदत करतो. 
केवळ यंत्राप्रमाणे मुलांचा वापर करण्यापेक्षा जीवन जगण्याची तंत्रे शिकत मुलांना घडू द्यावे ---कधी बर्फाचा गोळा व्हावे आणि कधी मातीचा हे त्यांचे त्यांना ठरवू द्यावे ही आजच्या बालक दिनानिमित्त शुभेच्छा!

Tuesday, January 22, 2019

मला जाणवलेल्या शांताबाई

मराठी साहित्यात लोभस काव्य, सकस गद्य- ललित आणि वैचारिक दोन्ही-, रसाळ अनुवाद, कादंबरी, बालसाहित्य, वृत्तपत्रीय लेखन, संपादन अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या स्त्रिया तशा दुर्मिळच. मात्र शांताबाई शेळके यांनी ही कामगिरी लीलया करून केवळ साहित्यातच नव्हे, तर रसिक वाचक आणि अस्वादकांच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलंय.

वागीश्वरी शारदेचा वरदहस्त लाभलेली ही लेखिका. शब्द आणि संदर्भ, अर्थ आणि अन्वय, नाद आणि लय हातात हात घालून मिरवताना पहायचे असेल, तर शांताबाईंचे लेखन वाचावे. शांताबाईंनी हाताला धरून साहित्याच्या अंगणात चालायला शिकवलेले असंख्य लेखक त्यांचे ऋण मोकळेपणाने मान्य करतात. काहीही समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. गद्य लेखनात त्यांच्या ह्याच स्वभावाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. साधाच विषय किती जिव्हाळ्याने त्या रंगवतात! एखादी जुनी आठवण, एखादा प्रसंग, एखादे आवडलेले पुस्तक, एखादी व्यक्ती, अगदी त्यांची लाडकी मांजरे, त्यांची खाद्ययात्रा, नातीगोती, विषय कोणताही असो, तो मांडण्यातली आपुलकी सारखीच. या आपुलकी नि मोकळेपणा सोबतचठसठशीत पणे दिसून येतो तो त्यांचा व्यासंग! अगदी सहजच मेघदूत, भर्तृहरीची शतके, ज्ञानेश्वरी आणि इतर संत साहित्य, नलदमयन्ती स्वयंवर, ह्या सर्वांचे संदर्भ त्यांच्या लिखाणात येतात. त्या ह्या सर्वांचे उल्लेख एवढ्या अधिकाराने आणि जवळीकीने करतात, की कालिदास, भर्तृहरी, ज्ञानेश्वर, तुकोबा, मोरोपंत वगैरे मंडळी अधूनमधून त्यांच्या घरी येत असावीत अशी शंका यावी. एवढे सगळे असूनही त्यांचे लिखाण कधीच क्लिष्ट झाले नाही. साहित्याच्या प्राध्यापिका असल्यामुळे असंख्य कलाकृती वर्गात विद्यार्थ्यांना समजावून सांगायची त्यांना सवय होतीच. तीच सवय वाचकालाही सर्व उलगडून सांगताना कामी आलेली दिसते. कालिदासाच्या मेघदूतात क्षिप्रा नदीवरील वाऱ्याचा उल्लेख कालिदासाने ‘प्रार्थनाचाटुकार:’ असा केलाय. या शब्दाकडे विशेष लक्ष वेधले गेले, ते शांताबाईंनी त्या शब्दामागचे सौंदर्य उलगडून दाखवल्यावरच! अभिजात साहित्यात एवढ्या रममाण होणाऱ्या शांताबाईना लोकसाहित्याचेही मुळीसुद्धा वावडे नव्हते. कितीतरी लावण्या, लोकगीते, पारंपरिक ओव्या, गवळणी त्यांना पाठ होत्या. त्यांचा डौल, त्यांची नादमधुरता त्यांनी स्वतः अनुभवली आणि तशीच्या तशीच अचूक वाचकांपर्यंत पोहचवली. आपल्या देवभाषेचा आणि लोकभाषेचा गोडवा शांताबाईंच्या गुणग्राहक, साक्षेपी लेखणीचा पदर धरून अलगद वाचकापर्यंत झिरपला.

शांताबाई तशा ‘पूर्णवेळ समीक्षक’ नसल्या, तरी कितीतरी अभिजात साहित्यकृतींची समीक्षा त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या लेखनात समीक्षकाचा अभिनिवेश नाही, आणि ‘ह्या रचनाधीष्ठित काव्यबंधाच्या पृथगात्मतेचा समकालीन वाङमयीन वर्तुळावर होणारा साक्षेपी परिणाम अनुलक्षून...’ वगैरेसारखी क्लिष्ट भाषाही नाही. मात्र ललित म्हणता म्हणता त्या सहजच वाचकाला रसास्वादाचा आनंद देतात, नव्हे, कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद कसा घ्यावा, याचा एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवतात. आणि केवळ साहित्य नव्हे, तर नाटक, चित्रपट यांतही नेमकं काय बघायचं हे त्या सहजच सांगून जातात.

मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही विषयांत त्या एम ए असल्यामुळे त्यांचा ह्या दोन्ही भाषांचा अभ्यास आणि व्यासंग होता असे म्हणावे, तर मधूनच एखादा इंग्रजी लेखक तुमच्याकडे बघून डोळे मिचकावेल ! शॉचे एखादे नाटक, टेनिसनची एखादी कविता, इंग्रजीत अनुवादित झालेले जपानी हायकू अधूनमधून हजेरी लावताना दिसतील. इंग्रजीवर असलेले त्यांचे प्रभुत्व विशेषत्वाने पुढे आले ते त्यांच्या अनुवादांतून. संस्कृत साहित्याप्रमाणेच त्यांनी इंग्रजी चित्रपटांचेही अनुवाद ताकदीने केले. त्यांचे हे अनुवाद वाचून त्या त्या चित्रपटाची केवळ कथाच नव्हे, तर वातावरणही डोळ्यापुढे उभे राहत असे. ह्यातूनच बहुधा त्यांची चित्रपटमाध्यमाची जाण अधिक परिपक्व होत गेली असावी आणि तिला राजमान्यता मिळाली ती त्यांच्या सेन्सॉर बोर्डावर झालेल्या नेमणुकीतून. मात्र ह्या सर्व लेखनापेक्षाही त्यांना जनसामान्यांपर्यंत पोहचवणारा साहित्यप्रकार म्हणजे त्यांचे काव्य. त्यांचे काव्य अर्थवाही, नादमधुर आहे. ‘प्रासादिकता’ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य त्यांच्या काव्यातही दिसून येते. अगदी चारच शब्दांतही त्यांनी कविता करून दाखवली, ”येतेस?/ नाही/ का?/ आई!” शांताबाई ह्या जेवढ्या सरस कवयित्री होत्या, त्याहीपेक्षा सुरस गीतकार होत्या. कवी आणि गीतकार यांच्यातील फरक त्या नेमका सांगतात. गीतकार हा सर्वसाधारणपणे कारागीर आणि म्हणून कवीपेक्षा खालच्या दर्जाचा समजला जातो. मात्र हा समज खोटा ठरवत असंख्य श्रेष्ठ साहित्यिकांनी चित्रपट किंवा ध्वनिमुद्रिकांसाठी गीतलेखन केले आहे, हे त्या आवर्जून सांगतात. कवी जेव्हा कविता करतो, तेव्हा तो स्वतंत्र असतो. परंतु तो जेव्हा चित्रपटासाठी गीत लिहितो, तेव्हा त्याला अनेक बंधने काटेकोरपणे पाळावी लागतात. कधी आधीच तयार असलेल्या चालीत शब्द बांधावे लागतात, तर कधी चित्रपटातील प्रसंगानुरूप शब्दरचना करावी लागते. कवितेत कवी आपले स्वतःचे भाव व्यक्त करतो, तर गीतात त्या पात्राचे/ निवेदकाचे भाव व्यक्त करायचे असतात. रचना साधी सोपी, चटकन ओठावर रुळणारी, छंदबद्ध, नादमधुर असावी लागते. आणि तरीही रचनेत उत्स्फूर्तता हवीच! हे सर्व सांभाळायचे म्हणजे सोपे काम नाही. ह्या कसरती करता करता कधी कधी गीतातले काव्य हरवून जाते. शांताबाईंना मात्र ही किमया साधली होती. त्यांची गीते कधीच ‘पाडलेली’ वाटली नाहीत. त्यांत एक प्रकारची सहजता आणि उत्स्फूर्तता कायम जाणवत राहिली. त्यामुळेच ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

कितीतरी वैविध्यपूर्ण गीतांची अजरामर भेट त्यांनी रसिकांना दिली आहे. ‘गणराज रंगी नाचतो’,‘जय शारदे वागीश्वरी’, ‘मागे उभा मंगेश’, ‘अपर्णा तप करते काननी’ लिहिणारी ही गीतलेखिका ‘हिची चाल तुरुतुरु’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ सारखी गीते लिहून आश्चर्याचा धक्का देते आणि ‘वादलवारं सुटलं गो’, मी डोलकर डोलकर’ अशी टिपिकल ‘कोलीगीते’ लिहिता लिहिता ‘रेशमाच्या रेघांनी’सारखी फर्मास लावणी पेश करते. ‘गजानना श्री गणराया’ च्या संस्कृतप्रचुर शब्दरचनेसोबतच ‘कशी कसरत दावतुया न्यारी’ सारखी गावरान ढंगाची किंवा ‘माजे रानी माजे मोगा’ सारखी कोंकणी गाणी बाईंच्या लेखणीतून सहज झरतात. बाईंच्या लेखणीचा परीसस्पर्श होताच चांदणे उन्हात हसते, तर गगनाला गंध येतो. एखाद्या गीतात प्रियकराला भेटण्यासाठी आतुर झालेली प्रेयसी ‘जाईन विचारित रानफुला’ म्हणत निघते, तर कधी एखादी ‘घन रानी साजणा’सवे वाट चुकलेली प्रेयसी भेटते. एखादी वत्सल माता आपल्या गुणी बाळाला अंगाई म्हणताना दिसते, तर एखादा चिमुरडा ‘खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट’ म्हणत धमकावतो. मुलीच्या लग्नात बापाचा कंठ शांताबाईंच्या शब्दांतून दाटून येतो, नि त्याचवेळी मुलगी ‘साजणीबाई, येणार साजण माझा’ माझा म्हणत आपल्या संसाराचे सुखचित्र रेखते आणि मग तिची ‘सांगू कशी सख्या मी, माझे मला कळेना’ अशी अवस्था होते. जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ. ही सुखदु:खे शांताबाई तितक्याच तयारीने मांडतात. त्यांच्या लेखणीतून जसे ‘सुख भरून सांडते’ तसेच
‘विकल सांजवेळी’ डोळ्यात पाणीही भरून येते. मात्र ‘हा माझा मार्ग एकला’ आहे, हे माहिती असूनही जीवनगाणे गातच रहावे’ असं बजावायला त्या विसरत नाहीत.

शांताबाईन्चा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्या स्वभावातील नम्रपणा. स्वतःपेक्षा इतरांचे कौतुक त्या उत्साहाने करतात. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ सारखी अजरामर गीते लिहिणारी ही गीतलेखिका ग.दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम, शांताराम नांदगावकर, सुरेश भट, ना. धों. महानोर, सुधीर मोघे यांसारख्या गीतकारांचे मुक्तकंठाने गुणगान करते. त्यांच्या आधी १९६१मध्ये (ग्वाल्हेर) कुसुमावती देशपांडे आणि १९७५ मध्ये (कराड) दुर्गाबाई भागवत ह्या दोनच स्त्रिया अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या. १९९६मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या साहित्याचे चाहतेकृतकृत्य झाले.
त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून केलेले मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना उपयुक्त ठरेल. त्यांच्याच एका गीतात त्या म्हणतात, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे...’ हे शब्द त्यांच्या गीतांच्याच नव्हे, तर संपूर्ण साहित्याच्या बाबतीत पूर्णपणे खरे ठरले आहेत.

Friday, January 18, 2019

आधुनिक वैद्य असा असावा

आधुनिक वैद्य  विषयी सांगण्यापूर्वी प्राचीन काळी लिहून ठेवलेल्या ग्रंथोक्त काही गोष्टींबद्दल मला आधी सांगावेसे वाटते .कारण माझ्या विषयात "आधुनिक" हा असा शब्द वापरला असल्याने "प्राचीन काळी" वर्णन करून ठेवलेल्या वैद्यांच्या गुणांचा इथे संदर्भ देणे मला आवश्यक वाटते. शेवटी वैद्य ज्या शास्त्रामुळे ओळखला जातो त्या आयुर्वेद  शास्त्राचाही प्राचीन काळी व हल्लीच्या काळी घेतलेल्या अर्थांमध्ये आपल्याला फरक जाणवतोच. अतिप्राचीन काळी आयुर्वेद शास्त्र हे सर्व प्रकारचे शारिर मानस व्याधी ,भूतबाधा यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचे पवित्र शास्त्र आणि दैनंदिन व्यवहारात जीवनाचे काही नियम घालून देणारे उच्चकोटीचे शास्त्र या दृष्टीने ओळखले जायचे. मध्यंतरीच्या म्हणजे साधारण पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळात नाडी बघणारा तो वैद्य आणि सुई टोचणारा तो डॉक्टर अशा विचाराला सामान्य जनतेने प्राधान्य दिले होते. याच काळात झाडपाल्याचे औषध सांगणारे ते आयुर्वेद असा समज होता तर आताच्या आधुनिक युगात आयुर्वेद हा "पर्याय वैद्यक" अशा गोंडस नावारूपाला आला आहे आणि त्याचबरोबर वैद्य हा केवळ पुड्या किंवा काढे देणारा न राहता आवश्यकता पडल्यास इंजेक्शन ही देणारा ,आवश्यकता पडल्यास मायनर ऑपरेशन्स करणारा असा एक साधारण डॉक्टरच्या बरोबरीचा वैद्यक व्यावसायिक अशी प्रतिमा जनमानसात आहे. दुसरा एक समज असा की म्हाताऱ्या व्यक्तींचे आजार चिवट असतात किंवा ते जीर्ण व्याधी या स्वरूपाचे असतात व त्यावर कुठलीही चिकित्सा महिनोनमहिने वर्ष वर्ष घ्यावी लागणार असते अशावेळी आपली त्यातल्या त्यात स्वस्तातली आयुर्वेदिक औषध डॉक्टर पेक्षा कमी फी घेणाऱ्या वैद्य कडूनच घेतली जातात शिवाय म्हाताऱ्या माणसांना वेळ भरपूर त्यामुळे काढे करणे, चूर्णाच्या पुड्या करणे, मध मिसळणे, तूप मिसळणे यात त्यांचा वेळही चांगला जातो म्हणून ते सुद्धा वैद्याकडून औषध घ्यायला तयार असतात. मात्र केवळ आयुर्वेदिक औषधांवर विश्वास आहे म्हणून वैद्यांकडून औषध घेऊन जाणारी मंडळी प्रमाणात कमी असली तरी अशा व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मदतीनेच अधिकाधिक लोकांच्या मनात आयुर्वेदाविषयी विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या आधुनिक वैद्यवर आहे .लोकांच्या मनात आयुर्वेदशास्त्र विषयी असलेला आदर वाढवून त्याबद्दल विश्वासही निर्माण करणारा असा आजचा प्रत्येक वैद्य असावा. बीएएमएस ला आल्यापासून श्लोक पाठांतराचा विशेष उरक नसला तरी आम्ही आय एम पी म्हणून लिहून ठेवलेला एक श्लोक आठवतो आहे 
दक्षस्तीर्थत्त शास्त्रार्थात् दृष्ट कर्मा
 म्हणजेच वैद्य दक्ष गुरु जवळ शास्त्राभ्यास केलेला शुचिर्भूत व क्रिया पाहिलेला असा असावा. अशी अपेक्षा ग्रंथकर्त्यांनी व्यक्त केली आहे वैद्य दक्ष असावा म्हणजेच रुग्ण परिचारक व औषधी याबद्दल त्याने विशेषज्ञान ठेवावे .जेव्हा वैद्याकडे येतो विशेषतः आजच्या वैद्याकडून तेव्हा यांच्या नाडी परीक्षेने माझ्या व्याधीचे अचूक निदान होणार आहे, महागडी इन्वेस्टीगेशन फारशी करावी लागणार नाहीत आणि यांच्या औषधांनी कुठलेही साइट्स न होता माझा रोग मुळापासून दूर होणार आहे अशा आपुलकीच्या भावनेने तो रुग्ण वैद्याकडे आलेला असतो. अशावेळी रुग्णाच्या कुठल्याही भावना न दुखावता त्याला व्याधीमुक्त करण्याचा परोपरीने प्रयत्न करणे हे वैद्याचे प्रथम कर्तव्य आहे. रुग्ण लघु व्याधीत आहे गुरु व्याधीत आहे याबद्दल दक्षतेने विचार करून वैद्याने चिकित्सा करावी. मात्र दक्षता याचा आजच्या घटकेला सर्वात समर्पक अर्थ म्हणजे "BEWARE  ऑफ ग्राहक संरक्षण कायदा" आज तुम्ही पराकाष्ठेने रुग्णाचे स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करताय पण काही कारणाने जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर उद्या हाच तुम्हाला "आपलं माणूस" समजणारा रुग्ण मात्र ग्राहक संरक्षण कायद्याचा आश्रय घ्यायला कमी करत नाही, याचीही दक्षता आजच्या वैद्याने पाळायलाच हवी. तुम्ही रुग्णांविषयी सहानुभूती दाखवता, त्याला बरे करणे आपले प्रथम कर्तव्य मानता या सगळ्या सगळ्या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी आज सरकारने मात्र तुम्हाला विक्रेता आणि रुग्णाला ग्राहकच ठरवले आहे. अशा आजच्या आधुनिक युगात स्वतःला चिकित्सेसाठी झोकून देण्यापेक्षा ग्राहक संरक्षण कायद्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर पडणार नाही ना याबद्दल प्रत्येक वैद्याने दक्ष राहिलेच पाहिजे.
 आणि यासाठीच आपल्याला गरज पडणार आहे ती मॉडर्न मध्ये सांगितलेल्या क्लीनिकल मेथड्स ची आणि इन्वेस्टीगेशन ची.  यांच्या साहाय्याने आपले निदान पक्के करून चिकित्सा केल्यास त्यात कसलीही कसूर राहण्याची शक्यता कमी होते.
 याच संदर्भात शास्त्राध्ययन योग्य प्रकारे केलेला असणे या वैद्याच्या गुणाचा उल्लेख करावासा वाटतो. वैद्याला आयुर्वेदशास्त्रात यथार्थ ज्ञान असावे पण त्याचबरोबर मॉडर्नचाही अभ्यास असणे आवश्यक झालेले आहे. जे आयुर्वेदाशी अतिशय एकनिष्ठ आहेत किंवा ज्यांना मॉडर्न चा  अभ्यास करणे काहीसे अपमानास्पद वाटत असेल त्यांनी आमच्या आयुर्वेद शास्त्रात सांगितलं की कुठलेही शास्त्र परिपूर्ण नसतं त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी अनेक शास्त्रांचे अध्ययन आवश्यक आहे अशी आपल्या अनेक शास्त्राध्ययनाची पुष्टी करून का होईना चिकित्सेच्या दृष्टीने आवश्यक ते अध्ययन केलेले असावे.

 आजचा वैद्य हा शुचिर्भूत, शरीर व मनाने पवित्र असावाआणि दृष्ट कर्मा असावा. प्रायव्हेट क्लिनिक्स, नाईट शिफ्ट,हे- ते क्लिनिक्स करून त्याने दृष्ट कर्मा व्हावे. यातूनच रुग्णाशी कसे वागावे, त्यांच्या आजाराची संपूर्ण माहिती कशी मिळवावी, आपल्या बरोबर च्यां परिचारिका शी  कसे वागावे ,यांचे व्यावहारिक ज्ञान त्याला प्राप्त होते .प्रत्यक्ष औषधी निर्माण केलेले, बघितलेले असावे. कंपन्यांची तयार औषधे द्यायची झाल्यास कुठल्या कंपनीचे कुठले औषध द्यावे किंवा कुठल्या औषध स्वतः बनवून देणे जास्त योग्य आहे या सर्वांचे ज्ञान दृष्ट कर्मानेच होऊ शकते. आजच्या वैद्याने प्रथम लहान सहान प्रयोगातून स्वतःच्या मनात आयुर्वेदाविषयी विश्वास संपादन करावा त्यानंतरच रुग्णाला तो विश्वासात घेऊ शकतो. आधुनिक वैद्य पुढे आणखी एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे रुग्णाला पथ्यापथ्य सांगण्याचे !कारण आयुर्वेद शास्त्रात चिकित्सेबरोबर पथ्यापथ्य ला ही फार महत्त्व आहे .काय खावे, काय खाऊ नये, कुठल्या वेळी काय करावे काय करू नये, या सर्व गोष्टी व्याधीनुसार ,व्यक्तीनुसार वेगवेगळ्या सांगितल्या आहेत व प्रत्येक व्याधी बरा होण्यास त्याचे महत्त्व आहेच. मात्र धावपळीच्या युगात या सगळ्या गोष्टी पाळणे कितपत शक्य आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी लोकांना कितपत पटवून देणे शक्य आहे. दूध आणि केळी एकत्र खाऊ नये पण मला फ्रुट सॅलड खुपच आवडते. तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नये पण मला पावभाजी बघितलीच की तोंडाला पाणी सुटते. ब्रह्म मुहूर्तावर उठावे पण रात्री टीव्हीवर तेजाब सारखा सिनेमा असला तर झोपायलाच ब्राह्ममुहूर्त होतो .या सगळ्या गोष्टी टाळणे आज  अशक्य झालेले आहे. रुग्णांवरच नाही  तर  वैद्या बरही  आजच्या  युगानुसार  सर्व गोष्टींचे बंधन आहे. अशावेळी कुठला रुग्ण कुठली पथ्ये पाळू शकतो किंवा किती प्रमाणात अपथ्य करतो याचे गणित वैद्या नेच सोडवून त्या प्रमाणात चिकित्सेत बदल केला पाहिजे.

 थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाचा पुरस्कार करणारा पण तरी इतर शास्त्रांचा द्वेष न करणारा ,रुग्णाची चिकित्सा हे आपले प्रथम कर्तव्य समजणारा पण त्याचबरोबर आपला जीवन निर्वाह चांगला होईल याची दक्षता घेणारा आणि काळानुरूप बदललेल्या गोष्टींचा शास्त्राशी ताळमेळ साधून चिकित्सा करणारा अशी ही तारेवरची कसरत यशस्वीपणे पार पाडण्यास समर्थ असा हा आधुनिक वैद्य असावा.

Thursday, January 17, 2019

पैठण (भाग १)

 ।।पदरावरती जरतारीचा ,मोर नाचरा हवा
         आई मला नेसवं शालू नवा।।

     ।।नेसली मी काळी बाई चंद्रकळा ठिपक्यांची बाई ठिपक्यांची,
         तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरिची।।

आज नेमकी ही गाणी ओठावर कां आलीत असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे,पण त्याच उत्तर  आहे    माझ्याकडे,सांगते बरं..........!माझा प्रवास सुरु आहे पैठणच्या दिशेने .तिर्थाटन म्हणून नाही तर अहोंची बदली झाली म्हणून   !.....पैठण अगदीच छोट गांव पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक ठिकाण म्हणून ज्याची ख्याती आहे असं,त्यामुळे नितांत उत्सुकता मनात ठेवून या गावाच्या दिशेने चालली होते. 
पैठण आणि पैठणी हा ही एक अत्यंत स्त्रीसुलभ जिव्हाळ्याच विषय अशा गावात जातानाच मनात पक्की खूणगांठ बांधली की,"पैठण आणि पैठणीचे रेशीमबंध जोडूनच अकोल्याला परतायचे."
तिथली  ऐतिहासिक समृद्धी,परंपरा,रितीभाती,मराठवाडी भाषा,खानपान पद्धती आणि वरकरी परंपरा!
"संतश्रेष्ठ शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचे दिव्य अलौकिकत्व जाणून घेण्याची  जिज्ञासा मनात ठेवूनच प्रवासाचा आनंद घेत होते.
ध्यानीमनी नसतांना एखादी गोष्ट आयुष्यात अवचित घडते तेव्हा त्याला आपण "योग" म्हणतो.तोच योग माझ्याबाबतीत घडून आला नि माझा दक्षिणकाशी "पैठणनगरीत"प्रवेश झाला.
सुरुवातीचे काही दिवस जरा चाचपडण्यातच गेले......नवी जागा नवे लोक नवी बोलीभाषा (विदर्भआणि मराठवाडा) सगळच नवीन.अशा नवपरिचीत गावात ओळख व्हायलाही वेळ लागणारच.हळूहळू चाचपडत पाऊल पुढे टाकणं सुरु होतं.लोकांच्या भेटीगाठीतून काही संदर्भ,माहिती मिळत होती. आणि ओळख्यादेखिल वाढत होत्या.
'गोदातिरी वसलेल पैठण हे अतिशय पुरातन गाव',पुरातन काळातील शककर्त्या शालिवाहनाची ही "प्रतिष्ठान नगरी".
त्याकाळात दळणवळणाच्या प्रमुख मार्गावर असलेली ही नगरी आता काहीशा आडमार्गाला असल्यासारखी वाटते.गावात अनेक पुरातन संदर्भ असणार्या वास्तु,आशियाखंडातिल  सर्वात मोठ असलेल मातीच धरण 'जायकवाडी धरण'......तसेच पैठणी उद्योग कलाकेंद्र,ज्ञानेश्वर ऊद्यान,पालथी नगरी,नागघाट,जैनमंदीर,श्रीमंत लड्डुशेठ सावकाराचा वाडा आणि अर्थातच एकनाथ महाराजांचे गावातील मंदीर आणि समाधीमंदीरआकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
           इ.स.पूर्व दुसया शतकात गोदाकाठी वसलेली प्रतिष्ठान नगरीचा सातवाहन कुळातील राज्यकर्ता  'सम्राट शालिवाहन' आजही आपणास शककर्ता म्हणून ज्ञात आहे.तीच ही गौरवशाली नगरी. शिवराज्याभिषेकासाठी आमंत्रित पुरोहितांपैकी ख्यातकीर्त असलेले वे.शा.सं.गागाभट्ट हेही पैठणचेच.ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले तेही पैठण येथेच. अशा आणि अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षदेणारे पैठण हे गांव ,राजधानी,तीर्थक्षेत्र या समुच्चयांनी युक्त आहे.

       ऐतिहासिक  पाऊलखुणांमधील एक खुण म्हणजे ,गर्भश्रीमंत अशा लड्डुशेठ सावकाराच्या वाड्याची, पेशव्यांच्या स्वागतासाठी ज्याने सोन्याच्या पायघड्या अंथरल्या होत्या त्या सावकाराचा वाडा या पालथ्यानगरी परिसरात प्राचीन अवशेषांच्या खुणा जपत असलेला आपणास पाहायला मिळतो..........

।।जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ,
या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू।।
            मराठवाड्यागीतातील या ओळी सार्थ करणारी ही नगरी, तेथून जवळच पुढील ठिकाण आहे ते म्हणजे तीर्थखांब!!!
    गोदावरीच्या महापुराने पैठणनगरी वेळोवेळी सुरक्षित  ठिकाणी  वसल्या गेली, तो परिसर म्हणजेच पालथीनगरी होय, ह्याच परिसरात तीर्थखांब आपलं लक्षवेधून घेतो.एकूण चार भागात त्याची जडणघडण असुन ,शिल्पाच्या आधारे स्वर्ग ,पाताळ, मृत्युलोकाची कल्पना केल्याचे दिसते. २०००वर्षापूर्वीच्या ३५फूट उंचीच्या या धातूखांबावर अतिशय सुंदर कोरीव नक्षीकाम आहे. पर्या ,अप्सरा,हत्ती ,घोडे,पोपट,कोरलेले आहेत. शालिवाहनाच्या विजयाचे प्रतिक म्हणून आजही हा खांब दिमाखात ऊभा आहे. अशी आख्यायिका आहे की,ज्यावेळेस गोदावरीचे पाणी ह्या खांबाच्या टोकापर्यंत जाईल आणि ते पाणी कावळा पिईल त्यावेळेस जगबुडी होईल...........!

Wednesday, January 16, 2019

अदलाबदल

भूमिकांची अदलाबदल आपल्या आयुष्यात ताजेपणा आणते हे नक्की।मी धनूबरोबर अभ्यास करताना  तिची स्टाईल एकदा स्वीकारुन पाहिली।आम्ही रात्री दहा नंतर वाचायला बसलो।अकरा नंतर कॉफी प्यालो।साडेबाराला दारं उघडून गच्चीवरच्या झुल्यावर बसलो ।आणि मधला सगळा वेळ भरपूर वाचून ,कृतकृत्य होऊन अडीच नंतर झोपलो।

                 मला तर मजाच आली।पण धनूकडून इतक्या नव्या गोष्टी कळल्या,अभ्यासाच्या नव्या पध्दती कळल्या।गंमत म्हणजे आमच्यात खूप सुंदर संवादाचा पूल बांधला गेला।ती मला मध्यरात्री इंडियन पीनल कोड सांगत होती नि मी तिला मलीक मुहम्मद जायसी।
               नंतर  आमच्या भूमिकांची नकळत अदलाबदल झाली।दुसऱ्या दिवशी ती मला सेंटर वर सोडायला आली।रुम नंबर ,बेंच शोधून मी बसेपर्यंत तिनी सोबत केली।पेपर संपवून खाली उतरता क्षणी ती मला घ्यायला आलेली दिसली।

रात्री मला खूप लवकर आणि प्रचंड झोप येत होती तर तिने झकास तेलमॉलीश करून दिलं।मी  एकीकडे हातातल्या फोनमध्ये काही वाचत ,दुसरीकडे तिच्याशी बोलता बोलता झोपले।तर तिनी नीट फोन उचलून ठेवून,माझ्याअंगावर पांघरुण घालून,पंखा कमी करून,दिवे मालवले आणि दार  ओदून घेऊन ती तिच्या अभ्यासाला जाऊन बसली।

                सकाळी ती उठल्यावर तिला म्हणाले
"राणू वीस वर्षापूर्वी मी तुला असंच झोपवायचे बरं का !आणि पलंगाच्या काठाला दोन्हीकडून गादीखाली लोड लावून ठेवायचे।तू तेवढंच शिल्लक ठेवलंस नं ?"
             ती मला हसून  म्हणते कशी," कारण ' 'लोड' हा पूर्वीही आमचा विषय नव्हता आणि आताही नाही नं आई!!!"
               माझा पेपर कसा गेला ते महत्वाचं नाही। पण त्या दरम्यान मी  नव्या पिढ़ीचं नवीन काहीतरी शिकले आणि ' लोड 'न घेता खूप आनंदात झोपी गेले हे किती मस्तय नं ?

Tuesday, January 15, 2019

निमो

 मनिमाऊ आणि तिचे तीन पिल्लं आमच्या घरीच राहात होते. पिल्लाला वाचवण्यासाठी माऊने स्वतः ची जान कुर्बान केली. आधीच राहत असणाऱ्या पिल्लांची जबाबदारी अजूनच आली. तशीही होतीच. जास्त लक्षपूर्वक त्यांना खाऊपिऊ घालू लागलो. पिल्ल हळूहळू आमच्या सोबत मैत्रीपूर्ण राहू लागले. पण त्यातलं एक पिल्लू मात्र खूपच घाबरट होतं. काहीकेल्या ते आमच्या सोबत मैत्री करायला धजत नव्हतं. खायला दिले कि ते पिल्लू यायचं नाही. तोपर्यंत इतर दोन पिल्लं सगळं संपवून टाकायची. मग आम्ही दोन वेगळ्या वाट्या केल्या तेव्हा कुठे ते घाबरट पिल्लू खाऊ लागला. एव्हाना त्यांचे नामकरणही झाले होते. घाबरट पिल्लू चे ल्यूसी, दुसरी मिस्टी आणि तिसरा निमो. अवंती ने अगदी हौसेने नेट वर शोधून त्यांचे नामकरण केले होते. पिल्ल बिचारे आई विना अगदी पोरके झाले होते. आजूबाजूला असलेल्या धोक्यांचा इशारा देण्यास त्याची आई नव्हती ना! त्यांचं त्यांनाच ते शिकायचं होतं. खरच माऊ उगीचच गेली पिल्लांना एकटं करून. त्यामुळे बोक्या खूपच त्रास द्यायचा त्यांना. दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही त्या तिघांना बोक्यापासून वाचवत होतो. पण अपरात्री ते आम्हाला पण शक्य नव्हते.

 इतकं सगळं असूनही मांजरीचे पिल्लं खूप खेळकर होती. मस्त हुंदडायचे. एकमेकांच्या अंगावर लोळायचे, दबा धरून एकमेकांवर हल्ले करुन खोटखोट भांडायचे. लाॅनवर धावत सुटायचे. फुल टाईम पास. कंपाऊंड च्या भिंतीवर चढायला शिकले. तिथे बर्‍याच वेलींची दाट गर्दी  होती. त्यात लपून रस्त्यावर ची गंमत बघत बसायचे. कुत्रे, गाड्या काय काय धोके आहेत ते बघत असतील का? काय चालू असेल त्यांच्या छोट्याश्या डोक्यात? हळूहळू रस्ता ओलांडत समोरच्या घरी जाऊ येऊ लागले.
एक दिवस आम्ही नागपूर ला गेलो होतो. रात्री उशिरापर्यंत घरी पोहचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी कळलं पिल्लांवर बोक्याने हल्ला केला होता आणि एक पिल्लू जखमी झाले आहे.
बघितलं तर ल्यूसी जखमी झाली होती आणि प्रचंड घाबरलेली होती. नेमकी ती समोरच्या घरी आणि तिचे भावंड आमच्या घरी. काही केल्या ल्यूसी जवळ येऊ देईना. खायला दिले तर ते पण खात नव्हती. कसतरी करुन तिला आमच्या घरी पिटाळली. भावंड पण बिचारी भेदरलेली आणि सैरभैर झाली होती. पण एकत्र आल्याने त्यांना एकमेकांचा आधार वाटला. सगळे त्या हल्ल्यातून सावरले. थोड खाऊपिऊ लागले. बिचारी पिल्ल त्यांच्या जगाचे टक्के टोणपे खात बर्‍यापैकी जगत होते. ल्यूसी बरी झाली.  थोडीशी पुन्हा खेळू लागली. पण लंगडत चालायची. आणि... अचानक एक दिवस नाहिशी झाली. कुठे गेली? कशी गेली? काहीच कळलं नाही. आजूबाजूला शोध घेतला पण काही दिसलीच नाही.
मग मिस्टी आणि निमो दोघेच राहिले. असेच दिवस जात होते. आणि एक दिवस मिस्टी एकदम शांत शांत वाटू लागली. एरवी छान खेळणारी, एकदम फास्ट असलेली मिस्टी अशी का झाली काही समजलं नाही. तिचं खाणं खेळणं सगळच एकदम थांबलं. आम्हाला कळेना काय झालं मिश्टीला! मी तिला लाडाने मिश्टी म्हणायचे. होतीच ती तशी गोड, निरागस! पांढरी आणि थोडी काळे ठिपके असलेली. निमो खेळण्यासाठी तिची मनधरणी करायचा तर त्याला पण उडवून लावायची. मला आपली उगीच एक शंका आली मांजरी मोठ्या होतांना अशा शांत होत असतील का? कि तिला बर वाटत नसेल? पण काही दिवसात ती पण नॉर्मल झाली. आणि ल्यूसी सारखीच गायब झाली. बहुतेक मांजरी जिवाच्या भिती ने घरे बदलत असतील.


मग राहिला निमो एकटा. तो घरातच जास्त राहायचा. अवंती बरोबर खेळायचा. सेलोटेप, दोरी, पिना असं कशाशीही खेळायचा. अवंती अभ्यास करत असली कि मांडीत बस, पुस्तकावर बस अस सुरु असायचं. कितीही उठवलं आणि मनात नसलं तर ढिम्म हलायचा नाही. निमोला मांडीवर बसायला खूप आवडायचं. टिव्ही पण बघायचा कुतुहलाने. इतका गोड दिसायचा जेव्हा टिव्ही पहात बसायचा त्याचे फोटो पण काढले होते. तर असा हा निमो आमच्या कुटुंबातील एक होऊन गेला.घरात कुठल्याही कोपर्‍यात, खुर्ची वर, पलंगावर, खिडकीत कुठेही मस्त ताणून द्यायचा.इतर बोक्यांची भिती निमो ला कधी वाटली नाही.चचांगला धीट होता तो. कधी कधी आम्हाला भिती वाटायची पण तो बिनधास्त असायचा.
 अचानक एक दिवस तो ही गायबच झाला. अवंती खूप अपसेट झाली. रोज वाट पहात असायची. आणि आला कि निमो बरोबर तीनचार दिवसांत. मग काय अवंती जाम खुश झाली. पण हि खुशी फार टिकली नाही. पुन्हा निमो गायब झाला. आठ दिवस झाले तरी आला नाही. आम्ही अवंती ची समजूत घातली. यावेळी 8,10 दिवसांनी निमो आला.
असेच दिवस जात होते आणि आम्हाला निमो थोडा अंगात भरल्या सारखा वाटू लागला. असं वाटलं वाढीला लागला म्हणून असेल. मग आणखी काही दिवसांनी त्याच पोट अजूनच दिसायला लागले. मी अवंती ला तसं म्हटलं  कि हा निमो आहे का? कि दुसरी मांजर आली आपल्या कडे? मी काही दिवसांनी पुन्हा पोटाचा आकार  निर्देशित केला. तर मला सगळे म्हणू लागले कि काहीतरी खाल्ले असेल मारून. असं एक दोन वेळा झालं. कोणी म्हणे उंदीर खाल्ला असेल कोणी म्हणे कबुतर खाल्लं असेल. मी पण दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी आम्ही सुट्टीचे म्हणून पुण्याला आलो. अवंती ने हट्टाने निमो ची खिडकीतून यायची जायची छोटीशी फट उघडी ठेवली. जेणे करून निमोला केव्हाही घरात झोपायला मिळेल बोक्याची पण भिती नाही. आम्ही पुण्याला चांगले 10, 12दिवस होतो.

त्यानंतर आम्ही घरी पोहचलो आणि नेहमी प्रमाणे निमोची वाट बघत होतो. आशिष कडून त्याचा हालहवाल कळला होता. त्याचे कॅटफूड, दूध आशिष त्याला खाऊ घालत होता. चला म्हणजे बोकोबा मस्त आहे तर आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. रात्री निजानीज झाली. आणि पहाटे साडेतीन ला मला जाग आली आवाजाने. उठून पाहिले तर निमो होता. तो खुश तर झाला पण तरीही नेहमी सारखा वाटला नाही. सारखा कपाटाच्या दाराला समोरच्या पायांनी ओरबाडत होता. मॅव मॅव करत होता. लाडवला नाही नेहमी सारखा. मला वाटलं निमो नसावा त्याच्या सारखा कोणी दुसरा असेल. मग मी अवंती ला तिच्या खोलीतून उठवून आणलं म्हटलं अगं हा निमो आहे न? तर हो म्हणाली.   निमो चा एक कान थोडा कापलेला होता त्याची ओळखीची खूण होती. निमोची ओळख परेड झाली तरी कपाटाच्या दारावर पाय मारणं सुरू च होत. मला आणि अवंती ला निमो आल्यामुळे जितका आनंद झाला तितका निमोच्या वागणुकीत दिसत नव्हता. आम्ही निमोचे लाड करत होतो आणि हा सारखा कपाटाकडे धाव घेत होता. शेवटी एकदाच मी दार उघडलं...... आणि निमो अतिशय घाईने आत गेला..... आणि पहातो तर काय..... तीन गुबगुबीत पांढरे पिल्लं....??? मला भिती वाटली ह्या निमोने पिल्लांना मारून टाकले तर? दुसर्‍या कोण्या माऊचे पिल्लं, बिचारी नाहक बळी पडतील. म्हणून आम्ही निमोला बाहेर काढायचे प्रयत्न केले. तर तो जाम ऐकेना. उलट मस्त बैठक मारून दूध पाजू लागला.... पहाटे  साडेतीन, चार वाजता हा प्रकार काय काहीच कळेना. मी आणि अवंती तर बघतच बसलो.डोळे चोळून चोळून बघू लागलो. एकमेकींना आश्चर्यचकित होऊन विचारु लागलो कसं शक्य आहे हे??? मला तर वाटलं मी स्वप्नातच आहे कि काय? पण ते शक्य होत कारण तो निमो होता पण तो तो नसून ती आहे हे आम्हाला पहाटे साडेतीन/चार ला कळले आणि आम्ही उडालोच. धक्क्यातून सावरल्या वर खो खो हसत सुटलो. म्हणजे मी जे म्हणत होते कि निमोचे पोट दिसते तर माझ्या कडे लक्ष दिले नाही. ते पोट दिसणं म्हणजे 'तो' नव्हे 'ती' निमी च होती तर.... आमची तर झोपच उडाली. तरी कसंबसं निजलो. सकाळी उठल्यावर मग दोघी मायलेकी हसत सुटलो. पिल्ल फारच गोजिरवाणी होती. निमो नाही नाही निमी राखाडी काळ्या रंगाची होती पण पिल्ल पांढरी होती.  गुबगुबीत पांढरी पिल्लं पाहून मला एक खूप जुनं गाणं आठवलं 
छान छान मनिमाऊ चं बाळं कसं गोर गोरपान 
इवलीशी जिवणी इवलेसे दात 
चुटुचुटु खाती कसा दूध आणि भात 
इवलेसे डोळे आणि इवलेसे कान
छान छान.... अगदी असेच होते निमीचे पिल्लं. हळूहळू पिल्ले वाढत होते. आमचाही वेळ मस्त जात होता त्यांचे व्हिडिओ, फोटो काढण्यात. आज किती मोठे झाले आज काय नविन खेळ केला. निमी पण मस्त खाऊन पिऊन सुखी होती. पिल्लांची काळजी नव्हती तिलाही. छान सुरक्षित जागी तिचे पिल्लं वाढत होते.

आणि अचानक एका रात्री पिल्लांच्या वेगळ्याच आवाजाने मला जाग आली. अर्धवट झोपेत मला काही कळेपर्यंत एका पिल्लू तोंडात घेऊन मांजरीची आकृती आमच्या रुममध्ये दिसली मला वाटलं निमीच आहे पण पिल्लाचे भयभीत झालेल्या आवाजाने लगेचच माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. तो एखाद्या अट्टल चोरा सारखा हळूच घरात शिरला आणि सराईतपणे सगळ्यात मागच्या खोलीत पलंगा खाली सुरक्षित असलेल्या पिल्लांवर झडप घालून एक पिल्लू उचलून घेऊन गेला. आम्ही हाकले पर्यंत तर पसार झाला होता तो बोक्या. किती क्रुर असेल तो इतक्या गोंडस पिल्लाला असा कसा मारू शकतो? खूप खूप वाईट वाटलं. रडायलाच आले. पुढची रात्र झोपच उडाली आमची.
मी आणि अवंती ने उठून शोध घेतला हा निष्ठुर बोक्या आत आलाच कसा आणि कुठून? निमीला येण्यासाठी जी खिडकी ची बारीकशी फट उघडी ठेवली त्यातूनच बोक्या आला आणि डाव साधला. आम्ही ती फट लगेच बंद केली. निमी कुठे गेली असेल इतक्या रात्री? पिल्लं सोडून का गेली होती? ती असती पिल्लांजवळ तर पिल्लू वाचलं असतं. असाच किती वेळ गेला काही समजलं नाही अचानक बेडरूम च्या खिडकीवरील नेट कोणीतरी उचकटून टाकण्याचा प्रयत्न करतोय हे नाईटलॅम्प च्या अंधुक उजेडात दिसले. नीट पहातो तर मांजर. आम्हाला कळेना निमी आहे कि पुन्हा बोक्या! लाईट लावून नीट खात्री करून घेतली ती निमीच होती. मग लगेच तिला घरात घेतले. तिचा येण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता तर ही लांबून अवघड उड्या मारून कशी तरी गॅलरीत येऊन पोहचली होती. आल्या आल्या निमी च्या लक्षात आलच काय झाले ते. बिचारी माऊ मोठ्याने मॅव मॅव करत, वास घेत खोलीत फिरत होती. इतर खोल्या खराब करतील म्हणून कसतरी त्यांना मागच्या खोलीत नेले आणि दार बंद करून घेतले. सकाळ होण्याची वाट बघत बसलो. सकाळी माऊचे ओरडणे अजून वाढले. जणू विचारत होती इतक्या सुरक्षित घरातून माझं पिल्लू असं कसं बोक्याने उचलून नेलं? आम्ही पण हेल्पलेस होतो. वाईट तर खूपच वाटत होते. मी अवंती ला म्हटलं आता हिने घर बदलायला पाहिजे. बोक्या चांगलाच सोकावला आहे पुन्हा पुन्हा येऊन पिल्लं पळवून खाऊन टाकली तर? आता थोडावेळ वाट बघावी नाहीतर आपणच पिल्लांना टोपलीत घालून खालच्या अडगळीच्या खोलीत लपवून ठेऊ. निमीच्या समोरच घेवून जाऊ असं आम्ही ठरवलं. आणि काय आश्चर्य निमी एका पिल्ला ला अलगद तोंडात धरून खालच्या मजल्यावर जावू लागली...आम्हीच खूष झालो. अवंती धावतच खाली गेली आणि अडगळीची खोली उघडून दिली. निमीला जणू आमची भाषा कळली होती तिने बरोबर तेच केलं जे आम्ही बोललो होतो. मग लगेचच दुसरं पिल्लू पण घेवून गेली. आम्ही सुटकेचा श्वास सोडला. 

अडगळीच्या खोलीची खिडकीतून फक्त निमीच येऊ शकेल अशी बारीक जाळी त्या खिडकीला होती. शिवाय लपायलाही भरपूर जागा होती. आता आम्ही, निमी, पिल्लं सगळे निर्धास्त झालो. पिल्ले पण नवीन जागी एकदम खूष होती. काही दिवसांनी पिल्लं मोठी झाली ती त्या खोलीत बसेना फटीतून बाहेर येऊन अंगणात बागडू लागली. आमचा जीव पुन्हा टांगणीला लागला. पण आता पुरेशी मोठी झाली होती आणि धोका असला तर काय करायचं, कुठे दडून बसायच हे त्याच्या लक्षात आलं होतं. जरा कुठे खुट्ट वाजलं कि धूम पळायचे आणि कुठल्या तरी छोट्याश्या फटीत लपून रहायचे. आता दूध बिस्किटे, कॅट फूड खाता यायचं आवडायचं. असं सगळं व्यवस्थित वाटत असलं तरी रात्री मात्र आम्हाला बोक्याची भिती होतीच. कारण अधूनमधून निमीचे आणि बोक्याचे भांडणं सुरूच असायचे. पण बोक्याला त्या बारक्याशा फटीतून पिल्लांपर्यंत पोहचता येतं नव्हतं. पण कसे कोण जाणे दोन पिल्लातून एक पिल्लू पुन्हा एकदा नाहिसे झाले. निमिने घरं बदलले असते तर नक्कीच वाचले असते. निमीची पहिलीच वेळ असल्याने तिला सुचले नाही की काय? की आमच्या घराची तिला सवय झाली होती म्हणून ती सोडून जात नव्हती? आम्ही जेव्हा ते घर सोडले तेव्हा एका पिल्लाबरोबर निमी बागेत झोपाळ्यावर बसली होती. मी मायेने तिला थोपटले, गोंजारले. पिल्लाकडे आणि स्वतः कडे लक्ष ठेव नीट रहा असं माझ्या भाषेत सांगितले. तिला कसे कळणार ते? पण माझ्या समाधानासाठी बोलले. आणि जड अंतःकरणानी तिचा आणि घराचा निरोप घेतला. मन उदास होतं. डोळ्यात अश्रू येऊ नये यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला. निमीचे पुढे काय झाले काहीही समजले नाही.

 मांजरांना घरातील माणसांपेक्षा घर जास्त प्रिय असतं असं म्हणतात. कुत्रे मात्र घरापेक्षा मालकावर जास्त प्रेम करतात. मालक नसला तर झुरून स्वतः चा जीव सोडल्याचे कथा वाचल्या आहेत. अनुभव नाही. पण कुठलाही प्राणी पाळू नये हे मात्र नक्की आहे. मन गुंतवणे नकोच ते. त्यांना काही झाले तर मनाला यातना होतात.

Monday, January 14, 2019

पारिजात

श्रावण हा तसा आपल्या सगळ्यांचा लाडका महिना. हिरव्या रंगाच्या त्या विविध छटांनी आपला प्रत्येकच दिवस अगदी फुलून जातो जोडीला वेगवेगळ्या रंगांची गंधाची तजेलदार फुलं असतातच. अशा चैतन्यमयी महिन्यात सणही तसेच उत्साहाने ऊर्जेने भरलेले असतात. मी रोज सकाळी फिरायला जाते त्या ग्राउंडला लागून जी घरं आहेत त्या सगळ्या घरांना छान अंगण आहे..आणि त्या अंगणात छान रातराणी ,चमेली ,मोगरा अशी झाडं आहेत, त्यांच्या सुगंधानी अगदी प्रसन्न वाटतं पण मन वेधून घेतो तो 'पारिजात'. पारिजातकाच्या झाडाशी माझ्या खूप आठवणी रेंगाळल्या आहेत...

अगदी पहिल्यांदा तो भेटला ते आजीनी सांगितलेल्या गोष्टीतून, माझी आजी खूप छान गोष्टी सांगायची श्रीकृष्ण मंदिराच्या वाड्यात राहत असल्यामुळे असेल कदाचित पण सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाच्या असायच्या कित्येक गाष्टींची तर पारायणं व्हायची अर्थातच कृष्ण सगळ्यात लाडका झाला. ह्या गोष्टींमध्ये कृष्णानी सत्यभामेसाठी आणलेल्या परिजातकाची गोष्ट असायची...स्वर्गातील झाड म्हणून मला लहानपणापासूनच त्या झाडाचं जबरदस्त आकर्षण होतं... आणि त्याची फुलं तोडावी लागत नाहीत तर ती आपोआप खाली पडतात हे म्हणजे माझ्यासाठी आठव आश्चर्यच होतं. परिजातकाचं पाहिलं दर्शन मात्र माझ्या काकांच्या घरी झालं, फाटकावर कमान केलेलं ते झाड बघून स्वर्गतलं झाड आपल्या घरी आहे म्हणून माझी कॉलर टाईट व्हायची. गणपतीच्या दिवसात त्याची ती नाजूक फुलं वेचायचा माझा कार्यक्रम असायचा..हार वगैरे करण्याचं काम मात्र आजीचं असायचं. पुढे आमची बदली दुसऱ्या गावी झाली आणि परिजातकाशी तसा संपर्क तुटला... 

अमरावतीला आल्यानंतर तिथल्या आमच्या घराचं नाव 'पारिजात' होतं. आजोबांच्या आवडीचं म्हणून घराला हे नाव दिलं होतं आम्ही तिथे राहायला गेल्यानंतर घराच्या मागच्या अंगणात उभा राहिला पारिजात आईनी लावलेला....ह्या नावातच एक्प्रकारच्या मखमली स्पर्शाची भावना होते, जेवढी खरखरीत आणि टोकदार पानं तेवढाच मुलायम स्पर्श देणारं ते नाजूक फुल. निसर्गाने ह्या नाजूक फुलाला जपण्यासाठीच जणू पर्णरूपी सुरक्षा रक्षक दिले आहेत असे वाटावे . लग्नानंतर आणि माहेरचं गाव बदलल्यानंतर सुद्धा पारिजात मात्र अजूनही स्मरणात आहे...लताबाईंच्या 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या'...मधे "उभा अंगणी तुझ्या अबोल हा पारिजात आहे" हा दुःखी, विरागी भावना दाखवणारा तर आशाबाईंच्या  चांदण्यात फिरतांना... मधे "श्वास तुझे मालकंस स्पर्श तुझा पारिजात"  रेशमी मुलायम स्पर्शाची जाणीव करून देणारा पारिजात दोन अगदी टोकाच्या भावना दाखवतो. 

मला मात्र आजही पारिजात आणि दुःखी भावना हे समीकरण फारसं पटत नाही ह्याला कारण कदाचित त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणी असतील...मला पारिजात नेहमीच कुणीही नं मागता केलेल्या हलक्याफुलक्या आनंदी क्षणांची बरसात वाटते...असे  क्षण जे लगेच साजरे करायचे तरच ते दीर्घकाळ स्मरणात राहतात.

Saturday, January 12, 2019

पिंकी.

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. फोन पण केला नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलं नाही यायला आणि फोन पण केला नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. तिचं खरं नाव वेगळं आहे पण आपण तिला पिंकी म्हणूया. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात सुरु असेल तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डीश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..उदय ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’”
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ न वाचताच कोळून प्याली आहे.  ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिच्या मुलाने तरी मामासारखं वागू नये म्हणून तो कधी तिच्याबरोबर आला की मी त्याला, चांगलं शिकून आईला सांभाळ असं सांगत असते. काढून ठेवलेली पुस्तकं, त्याच्या कामाच्या वस्तू देते.’ताई म्या कलेक्टर व्हयनू’ प्रकारच्या गोष्टी सांगते. तो पण ’होय’ अशा अर्थी मान डोलावतो. दिलेला खाऊ घेऊन टीव्हीसमोर जाऊन बसतो. त्याचा अभ्यास घेता येवा, निदान तो काय शिकतो, आजूबाजूला काय चाललंय हे कळावं यासाठी टीव्हीवर तरी बातम्या लावत जा असं मी तिला सांगते.

आमच्या टीव्ही वर फक्त ’गाने आनि पिच्चर’ लागतात असं तिचा मुलगा सांगतो. चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने मी अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मी पुटपुटते.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो उद्यापासून झाडते नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर, स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं ते मुकाट्याने खा ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: दसर्‍याला झेंडूचं तोरण दाराला लावणे
पूर्वीची मी- दसर्‍याची दुपार झाली तरी अजून तोरण लावलेलं नाहीये. आता दसरा झाल्यावर उद्या लावणार का, ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
नवरोबा- नवर्‍यानेच तोरण लावले पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिले आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधं तोरण लावायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! नाही लावलं एखाद्या वर्षी तोरण तर दसरा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- दसर्‍याची दुपार झाली तरी अजून तोरण लावलेलं नाहीये.’
आताचे नवरोबा- हो नं, अजून तोरण लावलंच नाही. लावतो.
विषय समाप्त.

'मोदीसमर्थक-विरोधकांची आणि पिंकीची भेट झाली पाहिजे एकदा. ब्ला ब्ला ब्ला ..
'हो नं, अच्छे दिन आलेच नाही अजून..'

Friday, January 11, 2019

सखा माझा

तो माझा सखा...आजवरच्या वाटचालीतला आश्वासक वाटणारा साथी...त्यानं मला कधी दगा दिला नाही. पण इतरांना त्याचा तितकासा भरवसा वाटला नाही.
कधी बरं त्याची नि माझी गाठ पडली? असेल साधारणपणे वयाचं 14 वं अथवा 15 वं वर्ष! तसं जरा नासमजच! दुनियादारीची ओळख नाही. जे कोणी सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याचं ते वय! अशा त्या वयात  आम्ही एकमेकांसमोर येण्याआधी अनेकांनी अनेक भितीदायक अनुभव सांगितले होते. दडपण, भिती, धडधड अशा संमिश्र भावनांनी मी त्याला सामोरे गेले होते. आधी 'नाही नाही' म्हणत मागेमागे सरत होते. पण मग कशी कोणजाणे कधी त्याच्या प्रेमात पडले कळलंच नाही. आम्ही पहिल्यांदा एकमेकांसमोर आलो तेंव्हा मी अक्षरशः थरथरले होते. माझ्या आधी कितीजणांनी त्याची आर्जव केली होती,कोण जाणे! तो तसा बिनभरवशाचा म्हणूनच ओळखल्या जायचा. कधी धोका देईल याचा नेम नाही, हा सावधगिरीचा इशारा अनेकांनी दिलेला. त्यामुळेच की काय त्याच्यावर विश्वास ठेवणं कठिण होतं. पण मैत्रिणीने धीर दिला. म्हणाली,"ठेव ग त्याच्यावर विश्वास!" 

एवढं सांगतेय तर म्हटलं, ठेवावा  भरवसा! काहींना त्यानं दगा दिलाय, कदाचित आपल्यालाही देईल. होईल काय? फारतर दुःख! ते किती लावून घ्यायचं नि किती कुरवाळत बसायचं? ते आपल्याच हातात आहे. काळाची मलमपट्टी आहेच की...! हं...नाही म्हणायला जनापवादाची भिती होती. पण मग आठवलं की, लोकं घोड्यावर बसूही देत नाहीत की पायी चालूही देत नाहीत. मग? फक्त आपल्यातील सारासार बुद्धीवर विश्वास ठेवावा. तेच केलं. मागचा पुढचा विचार केलाच नाही. त्याच्या प्रेमात स्वतःला दिलं झोकून! तोही मोठा बिलंदर! कितीतरी रूपं बदलत माझ्यासमोर येत राहिला. प्रेम करत राहिला. 
भेटायची ठिकाणं एक का आहेत? कधी इथे तर कधी तिथे...हे गाव ते गाव...विविध जागी नाचवत राहतो सारखा! आज इतकी वर्षे झालीत पण पहिल्या भेटीत होती तिच धडधड, तेच दडपण प्रत्येक भेटीत असतं. त्याला सामोरं जाताना आताशा भिती कमी झाली आहे. अविश्वासाची जागा भरवश्यानं व्यापली आहे. तो मला धोका देणार नाही, हा समज दरवेळी दृढ होतोय. त्याच्यावरचं माझं प्रेम अधिकच वाढतंय. 

त्याला दगाबाज म्हणणा-यांनी कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवला नसावा किंवा त्याला दुखावलं तरी असावं. पण आमचं तसं नाही. मी त्याच्यावर प्रेम केलं. त्याला मी एकटीच नाही. आणिक कित्येक आहेत, ही कल्पना असूनही...मी त्याच्यावर जीव जडवला. अनेकांचा असलेला तो...कधी तरी माझ्या वाटेला येतो. पण एकदा आला की मलाच एकनिष्ठ राहतो. न् म्हणूनच तो माझा प्रिय सखा असतो. त्याच्यासमोर कसं उभं राहायचं? त्याला कसं हाताळायचं? हे मला आता सांगावं लागत नाही. किती अंतरावर त्याला आपलेपणा वाटतो नि किती जवळीकता आगावूपणा...ह्याचं आकलन मला आपोआप होवू लागलंय.तो कोण?
ओळखलं नं तुम्ही? हो तोच तो...! जो माझा आहे तोच आवाज अधिक सुबकतेनं इतरांपर्यन्त पोहचविणारा मायक्रोफोन! माईक! जुन्या काळातील जाडजूड ते आताच्या काॅर्डलेस पर्यंत अनेक रूपं पालटत आलेला. पहिल्यांदा अजस्त्र राक्षसाप्रमाणे ज्यानं घाबरवलं होतं. पण मग मात्र हळूहळू कधी नि कशी त्याची सवय झाली कळलंच नाही. असा तो माईक! स्टुडीयोच्या बंद दाराआडचा एकमेव सखा! विशाल अशा कार्यक्रमात विश्वासानं साथ देणारा सोबती! प्रियकराच्या आत्मियतेनं हाताळलं तर सहज, सरल असणारा! अन्यथा एखाद्या सापापेक्षा कमी भितीदायक नसणारा...तो माईक!

शरद पवारांची मुलाखत असो की मतमोजणी विश्लेषण...अशोक पत्कींसह स्टुडीओतली चर्चा असो की अरूण दातेंच्या संगीत मैफलीचं निवेदन...ह्रदयनाथांची गुगली परतवून लावणे असो की जगजीतसिंगचा परिचय...लोकसभा सभापती मनोहर जोशींचा नागरी सत्कार असो की शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकरांसह गप्पागोष्टी! प्रत्येक वेळी माझ्यासह होता माईक! रूप वेगवेगळं असलं तरी कशी कोण जाणे त्याच्या समोर मी सहज होते. आधीची धडधड त्याच्यासमोर आलं की कुठल्या कुठे पळते. पहिल्या उच्चाराबरोबरच तो आज मला कशी सोबत करणार, हे कळतं नि त्याप्रमाणं चढउताराला सुरूवात होते. आवाजाला धार चढते. कधी बेस मिळतो.
 परवाही तसंच काहीसं झालं की...आजवर अनेकदा जाहिर कार्यक्रमांमध्ये बोलले. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद् घाटन सोहळ्यामध्ये सूत्रसंचालनासाठी पहिल्यांदाच उभे राहिले होते. प्रचंड गदारोळाच्या पार्श्वभूमीवरचं ते सूत्र संचालन म्हणजे परिक्षाच होती. पहिला शब्द उच्चारेपर्य॔न्त स्वतःलाच स्वतःची खात्री नव्हती. पण...पण त्याच्यासमोर, म्हणजेच माईकसमोर उभे राहिले. पहिला नमस्कार उच्चारला नि खात्री पटली... की आपला हा साथी आजही आपल्याबरोबर आहे. तो आहे म्हटल्यावर मग कशाची भिती? 
म्हणून कायम जाणवलेलं पुन्हा एकदा म्हणते...तो माझा सखा आहे. तो माझा सोबती आहे.

Thursday, January 10, 2019

मला घरी सोड माझ्या..

'ती' आम्हाला बघून लगेच ओळखीच आणि मनमोकळ हसली. '' महा स्वाभाव असाच हाये व माय, मी मजाक लई करतो राग नको मानू बर '' इति 'ती' आणि लगेच मी माझ्या विमनस्क अवस्थेतून खाडकन  जागी झाले. कारण त्या स्थळी पोचल्या पासून तेथील एक एक  विदारक दृश्य आणि परिस्थिती बघून पाषाणालाही पाझर फुटेल.... 

काल कॉलेज मधील बारावीच्या विद्यार्थिनींना वृद्धाश्रमात भेट देण्यासाठी नेले होते. तेथील पाहिल्या दालनात प्रवेश करताच, एक वृद्ध स्त्री डोळ्यात पूर्ण पिकलेले मोतीबिंदू घेऊन शून्यात नजर लावून बसली होती, आम्ही तिला प्रश्न विचारले पण एक ना दोन, नजर ढिम्म हलेना, अंगावरील कपड्यांचे भान नव्हते, हातावर बुंदीचा लाडू आणि पेढा ठेवल्यावर सुद्धा तोंडात टाके ना, मग एका विद्यार्थिनीने भरवले तेव्हा जरा खाल्ले.
दुसर्‍या पलंगा वरील आजीने आम्हाला बघताच तिला तिच्या घरात मुलगा व सून कशी वाईट वागणूक देत होते आणि मी एक दिवशी कसे रागावून निघून आले याचे वर्णन केले पण आता तिला तिच्या मुलाशी फोन वर बोलायचे म्हणून आम्हाला फोन लावून द्या असा तगादा लावत होती कारण आता तिला चालताही येत नव्हते आणि ईथे काळजी घेणारे कुणी नाही हे तिच्या लक्षात आले. आम्ही जड अंतःकरणाने तिथून पुढल्या दालनात प्रवेश घेतला, तिथे एकच पलंग मच्छरदाणी लावून मध्यभागी ठेवला होता आणि त्यावरील आजी निपचित पडून होत्या पण आमची चाहूल लागताच त्यांनी कोण आहे असे विचारले आणि आम्ही कुणीतरी नवीन आहोत हे कळल्यावर रडायला सुरुवात केली आणि '' मी खूप एकटी आहो व माय , माझ्याशी बोला, मले इथून बाहेर न्या, बाहेर काय आहे मले बघू द्या'' असा टाहो फोडला, आणि माझ्या सकट सर्व मुलींच्या डोळ्यात पाणी आले  दोन मुलींना तर सावरणे कठीण झाले. सर्व मुलींना घेऊन मऊ लगेच बाहेर पडले कारण कुणालाच रडू आवारत नव्हते. बाहेर आल्यावर दोघींच्या लक्षात आले की त्या आजीला लाडू आणू पेढा द्यायचा राह्यलाय, म्हणुन त्या दोघी ते द्यायला परत आत गेल्या, त्यावर आजी त्यांना म्हणाली '' पोरी यापेक्षा मला घरी सोड माझ्या" आता मात्र त्या दोघी धाय मोकलून रडू लागल्या. कसेबसे त्यांना सावरले आणि बाहेर आणले. आता आम्ही सर्वच पुरते हेलावून गेलो होतो 

त्याच मनःस्थितीत भोजन कक्षात प्रवेश केला. तिथे 4 आजी स्वैपाक करत होत्या. एक आजी चुलीजवळ पाठमोरी बसलेली आणि  बाकीच्या आमच्या समोर भकास चेहर्‍याने यंत्रवत पोळ्या लाटणे, कांदा, लसूण चिरणे अशी कामे करत होत्या . आणि "ती " आजी पोळ्या शेकत होती आमचा आवाज येताच तोंड भरून  प्रसन्न हसली आणि म्हणाली "या व सार्‍या जणी चटणी भाकरी खायले तुमी मोठे असले म्हणून काय झाले? पोट तर देवाने सार्‍याना दिले, मंग खुशीन खाव मिळेल ते" इति आजी आणि पुढे ह्या ह्या ह्या करून दात नसलेले बोळके प्रसन्न हसले.... किती विरोधाभास. कुठे आम्हाला रडवणारी  आजी अन कुठे ही हसणारी प्रसन्न आजी. दोघींनाही घरच्यांनी नकोशी म्हणून इथे आणून सोडलेले पण एकीने स्वतः सोबत दुसर्यांना रडवले आणि दुसरीने दुःखात कसे हसुन जगावे याचा परिपाठच  दिला .

कुठे आले होते मी आज? तेही माझ्या विद्यार्थिनींना घेऊन पण एका अर्थी त्यांना इथे आणले हा निर्णय योग्यच होता असे वाटू लागले कारण 12 व्या वर्गातील मुली म्हणजे लवकरच कुणाच्या तरी सुना होणार.... आणि कदाचित त्याही आपल्या सासू सासऱ्यांना अविचाराने घराबाहेर काढू शकतात आणि नाईलाजाने त्या वृद्धांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागु शकते . त्यामुळे या विद्यार्थिनींना वृद्धाश्रमात आणून तेथील वृद्धांची दयनीय स्थिती बघून रडू कोसळले असतांना त्यांच्या या मनस्थिती चा फायदा घेऊन '' ठेवाल का तुमच्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ? '' या माझ्या प्रश्नावर एकसुरात '' अजिबात नाही '' हे उत्तर मिळाल्यावर वृद्धाश्रमाला भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले ..

Wednesday, January 9, 2019

त्याची वंदावी पाऊले

माणसांच्यावागण्यात एक आणि बोलण्यात दुसरेच, असा विरोधाभास का जाणवतो कुणास ठाऊक.
आपण जो विचार करतो किंवा इतरांसमोर प्रगट करतो, तेही जाहीररित्या, तेच विचार आत्मसात
करण्याची, आचरणात आणण्याची एक तात्विक जबाबदारी आपल्यावर असते हे लक्षात घ्यायला हवं. ती
एक नैतिक जबाबदारी देखील असतेच.आणि आपण जर अयोग्य वागत असू, अयोग्य बोलत असू तर
त्याविषयी इतरांनाही उपदेशाचे व ज्ञानाचे डोस पाजण्याचा अधिकार आपल्याला नसतो, हे देखील ध्यानात
घ्यायलाच हवं.
आता निवडणुकांचा काळ जवळ येत चालल्याने जिकडेतिकडे आश्वासने,घोषणाबाजी, आरोप-
प्रत्यारोपांची मालिका... असा माहोल रंगायला सुरुवात झाली आहे. अजून तर सुरुवातच आहे, पण आगे
आगे देखते है, होता है क्या... खरच, बघूया काय काय होते ते. तसेही सामान्य नागरिकाला घटनेने काही
विशेष अधिकार बहाल केले असले तरी बहुतेकदा बघत राहण्यापलीकडे काहीही करणे आपल्या हातात
आणि आवाक्यात नसते. कारण या अधिकारांचा आपण किती प्रमाणात व कसा वापर करतो, यावरून ते
ठरते, असो.

"मराठा विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून 39 वर्षांपूर्वी मी माझ्या तीन महिन्यांच्या मुलीला
मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले. तिला कायमचे अपंगत्व आले. आधीची गरिबी होतीच. नामांतरानंतरही
ही कायम राहिली. नेत्यांनी तात्पुरती मदत केली. जगण्याचे हाल झाले. नामांतर दिन आला की, काही
पुढारी घरी येऊन साडी, फुलं देऊन माझ्यासोबत फोटो काढतात, पण कोणीही आमच्या पोटापाण्याची
कायमची व्यवस्था करत नाही. सत्कार झाला, पण आर्थिक मदत झाली नाही. बाबासाहेबांच्या नावासाठी
लढा देण्याचे समाधान तेवढे मिळाले"... ही आहे औरंगाबादच्या लढ्यात (आंदोलनात) त्याग केलेल्या
जमनाबाईची व्यथा. आजही सर्वसाधारण हीच परिस्थिती आहे. राजकीय क्षेत्र असो वा सामाजिक.... जो
बोलण्याप्रमाणे वागतो, तोच खरा आदराला प्राप्त ठरतो. जी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी
दिलेला शब्द पाळते, आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करते आणि त्याही पलीकडे जाऊन पीडितांच्या,
वंचितांच्या वेदनेची खरी ओळख करून घेते तीच मंडळी खऱ्या अर्थाने मान-सन्मान पावते. माणसाने
माणसाच्या आतली वेदना जाणून घेणं, ती वेदना स्वतःची समजून, जाणीवपूर्वक वागणं ह्यालाच
माणुसकी म्हणायचं ना?

चोचीला चारा कुठला,
हे कोणी विचारत नाही
भरवता कसे पिल्लांना,
हे कोणी विचारत नाही
करपले पिक यंदाही,
नुसत्याच दिशा उरलेल्या
हंगाम कशाचा करता,
हे कोणी विचारत नाही

किंवा
भरतात जखमा शरीरावरील औषधाने
उरातल्या जखमा, भरतील त्या कशाने?

ह्या कवी बबन सराडकर यांच्या ओळी आठवल्या की, जाणवते. वेदनेची फक्त जाणीव होऊन
पुरेसे नाही, तर त्या वेदनेशी समरस होऊन जेव्हा त्या वेदनेची जखम स्वतःच्या जिव्हारी बोचते, तेव्हाच
धगीची तीव्रता खऱ्या अर्थाने परावर्तित होऊ शकते. याच संदर्भात एक अत्यंत विरोधाभास  दर्शवणारी एक
बातमी वाचण्यात आली, नुकतीच.
गेल्या दोन एप्रिल रोजी भारत बंद दरम्यान मध्यप्रदेशातील मुरैना ह्या ठिकाणी जोरदार दगडफेक
सुरू झाली पोलिसांचा गोळीबारही सुरू झाला दुसरीकडे, अशा स्थितीत रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना जेवण
पुरवून दहा वर्षांची चिमुकली पोर अद्रिका आणि 14 वर्षाचा तिचा भाऊ कार्तिक यांनी पोलिसांना चुकवत
लपत छपत रेल्वे पर्यंत जाऊन शक्य होईल तेवढ्या प्रवाशांना जेवण आणि पाणी पुरवले. आहे की नाही
विरोधाभास? म्हणतात ना, जे न देखे रवी, ते देखे कवि

मोठ मोठ्या तत्त्ववेत्त्यांच्या, राजकारण्यांच्या हिचे ध्यानात येत नाही, ते कोवळ्या वयाच्या निष्पाप
लेकरांच्या ध्यानात आले. नुसतेच ध्यानात आले नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरले गेले. हा आणि अशा
प्रकारचा विरोधाभास जीवनात अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी घडत असतो. भासत असतो. आपल्या संत-
महात्म्यांनी जे उपदेश केले, ते त्यांनी स्वतः देखील आचरणात आणले होते. एवढेच काय, पण आपल्या
पूर्वजांच्या काळीदेखील दिलेला शब्द प्रमाण मानला जात असे. शब्दाला किंमत होती.'प्राण जाये पर वचन न जाये' ह्या तत्वानुसार माणसं खरोखर वागतही होती. पण आता सगळंच चित्र बदलत चाललं
आहे. विज्ञानात, उद्योग धंद्यात, शिक्षणात आणि विविध क्षेत्रात जशी झपाट्याने प्रगती होते आहे तसा
माणुसही झपाट्याने पुढे सरकतो आहे. काल काय बोललो, ते त्याला आज आठवेना झालय. आपल्या
शब्दांशी आपणच प्रामाणिक राहायला हवं. हे आपण विसरलो आहे आणि म्हणूनच कदाचित, अविश्वास,
गैरसमज, अविचार, सूडबुद्धी अशा प्रकारच्या रोगांची किड नात्यांना लागते आहे. धर्म, जात, श्रीमंती,
गरीबी... ह्या बाबतीत जीवघेणी स्पर्धा, कमालीचा असंतोष आणि अस्थिर राजकीय, सामाजिक आणि
आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे.
रक्त असते लाल साऱ्यांचेच
तरी युद्ध धर्माचे लढावे लागते
रे कोण बौद्ध, हिंदू, इस्लाम आणि इसाई
धर्मात कैद केला, माणूस माणसाने... (कवी सराटकर)

शाळेत रोज प्रार्थना म्हटली जाते, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ह्या
प्रार्थने प्रमाणे आपण प्रत्यक्षात वागू शकत नाही का? वागण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना...?