"ये जीना भी कोई जीना है ल लल्लू?"----अगदी अशाच अविर्भावात एकाने तिला प्रश्न केला. " हा विवाह सोहळाच आहे ना नक्की? नाही म्हणजे विवाह समारंभात दिसते तशी ताम झाम,सजावटीचा झगमगाट,नानाविध पदार्थांचे स्टॉल्स,चमकदार दागिन्यांचे आणि फॅशनेबल कपड्यां चे प्रदर्शन--- असलं इथे काहीच दिसत नाहीये ना,म्हणून विचारलं"
"हा बाबू,ये सर्कस है"-- त्याच्या स्वरातला उपरोध जाणवून तिनेही तशाच थाटात उत्तर दिले. "होय. हा विवाह सोहळाच आहे; पण त्याहीपेक्षा हे एक स्नेह मीलन आहे. परस्परांशी मनाच्या नात्यानं जोडल्या जाऊ पाहणाऱ्या दोन जिवाचं आणि त्यांना मनापासून आशीर्वाद द्यायला आलेल्या त्यांच्या जिवलगांचं. आणि स्नेह मिलनात फक्त स्नेह हवा,हो ना? रिकामा डामडौल कशाला?" अत्यंत प्रसन्न असं स्मितहास्य करत ती उद्गारली. वय असेल अवघे 23 ते 24. चेहऱ्यावर शांत,सोज्वळ भाव. तिच्याकडे बघून मला कधीतरी वाचलेल्या ओळी आठवल्या.
"Love one human being purely and warmly and you love all-----"
"श्रद्धेने जोपासलेल्या ,एका सामान्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हृदयातील दिव्यत्वा चा नंदादीपच आपले जीवन प्रज्वलीत करतो."
नेहा नाव तिचं. नेहाच्या विवाह सोहळ्यात सहभागी व्हायला आणि शुभेच्छा द्यायला तिच्या स्नेही जनां मध्ये मी देखील आमंत्रित होते. साधेपणाने लग्न,हे तिचं घोषवाक्यच होतं जणू.
फालतू,वारेमाप,वायफळ खर्च टाळणयावर तिचा विशेष कटाक्ष होता. लग्न कार्यात होणारा भरमसाठ ,कधी कधी अनावश्यक असा खर्च टाळता आला तर त्याच पैशातून वधू वराच्या पालकांचं एखादं अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकतं, एखाद्या सामाजिक कार्याला हातभार लावता येऊ शकतो,किंवा स्वतः वर वधूच्या भावी आयुष्यात शैक्षणिक,व्यावसायिक वा अन्य आवश्यक कारणासाठी हा पैसा कामी येऊ शकतो,ह्याच उद्देशाने नेहाने म्हणे तिच्या विवाह सोहळ्याचे संपूर्ण आयोजन स्वतःच केले. पर्यावरण पूरक आमंत्रण पत्रिका,अर्थात डिजिटल कार्डस, सोशल मीडिया द्वारे invitations, साधी पण औचित्यपूर्ण सजावट आणि मोजकी मंडळी.
विशेष म्हणजे मर्यादित खाद्य प्रकार. तिच्या दृष्टीने एखाद्या वधू कन्येने अशा प्रकारे पुढाकार घेऊन आणि साधेपणावर भर देऊन स्वतःच स्वतःच्या लग्नाचे उत्तम,नेटके आयोजन करणे हेच खऱ्या अर्थाने "स्त्री सक्षमीकरण" होय.
ह्या अतिशय साध्या, सुनियोजित सोहळ्याद्वारे नेहाने आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्शच घालून दिला आहे. वधू वरांच्या पालकांनी देखील ह्यावर विचार केला पाहिजे. एकंदरीतच लग्न ठरल्या क्षणापासून ते मुलीची पाठवणी होईपर्यंचा काळ ,प्रवास खूप मनस्ताप असलेला आणि आर्थिक ताण जाणवणारा असतो. उभय पक्षी खर्चिक असतो. विशेषतः त्यांच्या दृष्टीने,ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे; पण तरीही कधी लेकीच्या सुखासाठी तर कधी समाजाचं बंधन म्हणून,परंपरा म्हणून ऐपत नसताना काही पालक सजावट,जेवणावळी, कपडे,मानपान यावर अवाच्या सवा खर्च करतात,खिशाला परवडत असो वा नसो. कर्ज काढून उसनी हौस भागवणारे ही असतातच."साजरं करायचं" ह्या एकाच हेतूने,पार पडलं एकदाचं म्हणून हुश्श करायला मोकळे. मुलींनाही मोह आवरता येत नाही . मेकअप,दागिने,कपडे ह्या गोष्टींवर कधी स्वतःचीच तीव्र इच्छा म्हणून तर कधी इतरांपेक्षा आपण कुठे कमी पडायला नको म्हणून किंवा कुणाशी तरी तुलना करायची म्हणून अविचाराने खर्च केला जातो. (लग्न काय,घडी घडी थोडंच होते?) आता तर काय,प्री-वेडिंग,डेस्टिनेशन वेडिंग,और क्या क्या----अमुक ने केलं मग मी का करू नये? असं देखील होतं बरेचदा. नुकत्याच पार पडलेल्या,माफ करा,दणक्यात साजरं झालेल्या अनिल अंबानी च्या मुलीचा शाही सोहळा,tv वर दाखवलेला विक्रांत सरंजामे आणि ईशा चा विवाह सोहळा;-- आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तुलना करणे देखील कल्पनेच्या पलीकडले आहे. "बापरे" दिड आणि दोन लाखाची फक्त एक पत्रिका? कुणी सांगितला हा नसता उपद्व्याप? काय शो केस मधे ठेवायची आहे पत्रिका? एवढ्या पैशात तर गरिबांची 3/4 लग्न आरामात होतील . कितीतरी शेतकरी 10/15 हजाराच्या कर्जपायी आत्महत्या करतात,त्यांना तरी त्यापासून परावृत्त करता येईल. आपण साधारण असाच विचार करणार.अर्थात, ज्यांच्यापाशी भरमसाठ पैसा आहे,त्याने तो कसा,कुठे खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (अंबानी गृप ने तब्बल 10 ते 12 दिवस गोरगरिबांना पोटभर जेऊ घातले हे विशेष) पण ऐपतीप्रमाणे खर्च करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हे उद्देश ठेऊन कार्य करायला हरकत नाही. गेल्या महिन्यात यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या एका सत्रात
डॉक्टर राणी बंग ह्यांची मुलाखत ऐकली.ती उभयता सधन कुटुंबातील असूनही अत्यंत साधेपणाने लग्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आवाका सर्वानाच माहित आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,पु. ल. देशपांडे ह्यांचा विवाह देखील अतिशय साधेपणाने पार पडला होता. शेवटी ही ज्याची त्याची वैचारिक बैठक असते.
"सोच अपनी अपनी----" अजून काय?
शेवटी काय तर लग्न समारंभात,किती पैसा खर्च केला,कशावर आणि कुणावर केला,किती शो ऑफ केला ह्या पेक्षाही महत्वाचं हे की वधू वर एकमेकांना साजेसे आहेत की नाही? त्यांची मने जुळली आहेत की नाही? दोन्ही कडील मंडळी(फॅमिली) एकमेकांना समजून घेण्याइतके समंजस आहेत की नाही? मानसिक समाधान खरं महत्वाचं. नाहीतर होतं काय की समारंभातील इतके सारे सोपस्कार पार पाडण्यात,सगळ्यांच्या सोयी-सुविधा पाहण्यात आणि पैशाचं नियोजन करण्यात घरातील व्यक्तीचं अक्षरशः पीठ पडतं. बरं इतकं करूनही केलेला खर्च आणि पाहुणे मंडळींचं समाधान हे समीकरण फारच क्वचित जुळून येतं.. असो. विवाह सोहळा,त्यातील प्रत्येक विधीचा आनंद घरच्यांनाही मनापासून घेता आला पाहिजे. अन्यथा,आनंद राहतो एकीकडे आणि पार पाडली जाते निव्वळ कर्तव्य पूर्तीची औपचारिकता.
ह्या निमित्ताने एक छोटासा प्रसंग आठवला. आमच्या लेकीच्या लग्नात,प्रथेनुसार मी म्हणजे मुलीच्या आईने मंगलाष्टक पूर्ण होईस्तोवर,तुळशीला पाणी घालणे(मान खाली घालून) ,घालत राहणे जरुरी होते. पण माझ्या नवऱ्याने सक्त ताकीद दिली,दोन तांबे पाणी घालून तू समोर ये आणि सोहळ्याचा पूर्ण आनंद घे.( त्यावेळी माझ्यावर रोखल्या गेलेल्या काही नजरा मी सपशेल दुर्लक्षित केल्या.) घरातला मुख्य आधार मजबूत असेल तर परंपरा,रूढी ह्या गोष्टी गौण ठरतात.
थोडक्यात,चांगल्या विचारांची सुरुवात ही स्वतापासूनच व्हायला हवी. काहीतरी नव्याने सकारात्मक दृष्टीने मांडायचे असेल तर ते आधी कृतीत उतरायला हवे." विश्वातील एकच कोपरा असा आहे,जो सुधारण्याची तुम्ही काहीतरी खात्री देऊ शकता,तो म्हणजे,तुम्ही स्वतः आहात" असे aaldus हक्सले ह्या लेखकाने म्हटले आहे. आणि चांगले बदल घडून यावेत असे वाटत असेल तर त्यासाठी योग्य ती मानसिकता तयार होणं गरजेचं आहे.कुणी म्हणतंय म्हणून करण्यापेक्षा मला स्वतःला ते पटतंय म्हणून मी ते करणार,अशी मानसिकता तयार व्हायला हवी. म्हटलंच आहे ना,
" योग्य मानसिकतेच्या माणसाला त्याचं ध्येय गाठण्यापासून कुणीही रोखू शकत नाही आणि अयोग्य मानसिकतेच्या माणसाला पृथ्वीतलावरील कोणतीच गोष्ट मदत करू शकत नाही" (डब्ल्यू डब्ल्यू झाइंग)
प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे?
No comments:
Post a Comment