लहान मूल जेव्हा चालणं सुरू करण्याच्या धडपडीत पहिल्यांदा सलग ४ पावलं टाकतं तेव्हा त्याच्या चेहर्यावरचे निखळ आनंदी भाव इतरांनाही किती आनंद देऊन जातात! मी आधाराशिवाय चाललो हा विजय साजरा करणारं त्या बाळाचं हास्य त्याच्या यशाची पावती असते. त्यावेळी बाळाने तो क्षण पुरेपूर जगलेला असतो आणि म्हणून त्याचं समाधान इतर कुठल्याच गोष्टींवर अवलंबून नसतं. हेच मूल मोठं झाल्यावर आपल्या नोकरी /व्यवसायाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकतं तेव्हा तसच निरागस समाधान अनुभवता येणं म्हणजे खरं यशस्वी होणं होय. पण असं प्रत्येक वेळी घडत नसतं. दुसरी नोकरी मिळाली नाही म्हणून ही स्वीकारली, इच्छा नव्हती पण घरचे म्हणाले म्हणून या व्यवसायात उतरलो, अमुक-शिकल्यावरच उद्योग -धंदा सुरु करायचा होता पण---- हा पण, किंतु, परंतू नं येऊ देता किती जण बाळाच्या निष्पाप समाधानाने पुढे येतील त्या गोष्टी स्वीकारतात? या वाढत्या असमाधानाचे मुख्य कारण तुलना हे होय. स्वतः केलेली, घरीदारी सर्वांकडून होणारी तुलना बरेचदा मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडते. मग त्या निर्णयाला आनंदाची किनार कशी असणार?
तुलना जेव्हा मूल्यांकनासाठी होते तेव्हा ती समोरच्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल खरी माहिती, खरा अंदाज देऊ शकते. प्रत्येक गोष्टीचे उणे-अधिक परिणाम समजून सर्व बाजूंनी त्याबद्दल निर्विकारपणे माहिती घेऊन केलेले परीक्षण अर्थात मूल्यांकन करणे यामुळे प्रेरणा मिळते.उदा एखाद्या साहित्यक्रुतीचे मूल्यांकन करून त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचे साहित्य निर्माण करणे.
सामान्यपणे तुलना मात्र केवळ दोन बाजूंनी केली जाते. अहंकारापोटी केलेली सकारात्मक तुलना ईर्ष्या निर्माण करु शकते तर स्वतःला कमी लेखून केलेली नकारात्मक तुलना नैराश्य आणू शकते. उदा एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला बघून मी पण एवढी संपत्ती, ऐश्वर्य कमावणारच असा विचार ईर्ष्या, द्वेष निर्माण करू शकतो. आणि, ती दिसायला एवढी देखणी आहे की मी तिच्यापुढे काहीच नाही, माझ्याशी कोणी मैत्री करणार नाही असा उदास भाव नकारात्मक तुलना निर्माण करू शकतो.
इतरांसारखे प्रशस्त घर हवे, आपली मुले त्यांच्या मुलांसारखी गुणी असायला हवीत ,त्याला किती कमी जबाबदाऱ्या आहेत म्हणून तो माझ्या पेक्षा सुखी आहे, तिला तिच्या सासरच्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवू दिलं माझं मेलं नशीबच खराब, तो काय कुठला राजा लागून गेला का- मी पण त्याच्यासारख्या शाही समारंभ करू शकतो, इ, इ.या प्रत्येक तुलनात्मक विचार केलेल्या गोष्टींमधून जे मानसिक भाव निर्माण होतात ते माणसाला संतुलित कार्य करण्यात अडथळा आणू शकतात. तुलना सहन नं झाल्याने द्वेषापोटी समोरच्याला मागे खेचणे, समोरच्याशी बरोबरी करण्याच्या अट्टाहासाने अनैतिक काम करणे, तुलना सहन नं झाल्याने आत्मविश्वास गमावणे या सर्वांचे मूळ फक्त अयोग्य तुलना करण्यातच आहे. आणि मग कितीतरी सुखाचे, आनंदाचे क्षण नकळत निसटत जातात पण त्या व्यक्तीला त्याचे भान नसते.
"अपना हर हासिल कम ही लागे है
क्योंकि उसे हम दूसरों से आंके है"
मध्यंतरी गाजलेल्या हिंदी चित्रपटातील एक वाक्य प्रेक्षकांची दाद मिळवून गेलं होतं. " गोल्ड तो गोल्ड होता है, छोरा लावे या छोरी" उद्देश ठरलेला होता, त्याचा मार्ग अभ्यासलेला होता, त्यासाठी आवश्यक समर्पणाची तयारी होती म्हणूनच या चित्रपटातील नायक कुठल्याही तुलनेला नं घाबरता यशस्वी होऊ शकलेला आपण बघितला आहे. त्याने ठरवलेल्या सध्याचे मूल्यांकन केले, सकारात्मक किंवा नकारात्मक तुलना नाही केली.
आपण सर्व समाजात राहतो. त्यामुळे चार गोष्टींची ,चार व्यक्तींशी तुलना होणे स्वाभाविकच आहे. प्रत्येक जण स्वतःला एवढा निग्रही बनवू शकेलच असे नाही .पण प्रयत्न मात्र नक्की करता येईल. वास्तव स्विकारणे, उद्देश ठरवणे, त्याचा योग्य मार्ग अभ्यासणे, सातत्याने क्रुती करणे यातून आपण जेव्हा एक पाऊल पुढे सरकतो तेव्हा तोच निरागस आनंद मिळवत असतो. प्रत्येक पावलावर मिळालेले हेच निर्भेळ समाधान पुढची वाटचाल करण्यास प्रेरणा देत राहते. पहिली पायरी अर्थात वास्तव -जे जसे आहे तसे स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. म्हणतात ना -
आयुष्याला निरनिराळ्या ठिकाणी तोलून पाहिलं
कधी प्राणी कधी पक्षी कधी हवा म्हणून पाहिलं
दरवेळी काही ना काही कमीच वाटलं
मग आयुष्याला "आयुष्य "म्हटलं
तेव्हा कुठे खरं समाधान मिळालं
No comments:
Post a Comment