Friday, February 15, 2019

भीती

लागोपाठ दुसर्‍यांदा दुबईला जाण्याचा योग आला. झाले असे की, आम्ही दोघे मागच्याच वर्षी माझा  50 वा वाढदिवस  दुबईत साजरा  करून  आलो होतो, पण निकीता  राहिली  होती  दुबईला  जायची! अक्षय  म्हणाला  दोघी  या म्हणजे पॅकिंग लाही मदत होईल  व निकीताचे दुबई  पहाणेही होईल. तर अशी माझी  दुबई  टूर  ठरली,  पण अचानक! कारण  निकीताचा passport expire  झाला होता, नविन  मिळालयाशिवाय flight booking करता येत नव्हते. सगळे  झटपट  झाले ,पण आता प्रश्न होता  माझ्या अकोला  मुंबई  रिझर्वेशनचा ! बघितले  तर सगळीकडे  waiting! 
फक्त first Ac मध्ये उपलब्ध होते,  काय  करावे? 
पण तत्काळची रिस्क घेऊ  शकत  नव्हतो,कारण flight बुक  झाले  होती.  म्हटलं,  चला  या निमित्ताने  फर्स्ट  एसी प्रवासाचा अनुभव! 
                    "Enjoy your journey & Dubai trip " असं  मुकुंद म्हणतअसतानाच गाडी  हलली,  आणि मी  माझी बॅग  घेऊन  आत  आले. माझ्या  केबिनमध्ये already एकजण  होते. माझा  अपर  berth होता, मी बॅग  ठेवून शांत  बसले. पण पुढे काय?  आम्ही  दोघेच  केबिनमध्ये, आपणहून बोलावे  की  नाही?  या विचारात  कुणीच  कुणाशी  बोललो  नाही. आपल्याला गाडी सुटल्यावर ,अशी  शांतता  कधी  माहितच नाही. विक्रेत्यांची  वर्दळ, 
प्रवाशांची बडबड, बरेचदा बर्थ adjustment साठी  विचारणा, गप्पा, इ. ची सवय! अगदी 2 AC,3AC
 मध्येही  हाच अनुभव!  मला चैन  पडेना, मी  उठले आणि  शेजारच्या  केबिनमध्ये  गेले, अंदाज  घ्यायला,  की आपण  तिथे  आपला  बर्थ exchange करु शकतो  का? पण तिथे  एक बर्‍यापैकी  वृद्ध  जोडपे  होते. ते  तिथून  हलण्याचा काही प्रश्नच  नव्हता .पुढे  गेले तर एका सिंगल  केबिनमध्ये अगदी  मजेत  निवांत  मद्यपान  करत 
असलेले  एक  गृहस्थ  दिसले, मी  मनातून  थोडी  घाबरलेच ! बरं अजून  TC  चा पत्ता नव्हता .पुन्हा  जागेवर  येऊन  बसले. 
                            तोपर्यंत  माझे  सहप्रवासी  यांनी  वाचन  सुरु  केले  होते, मग मला  खूप  बरे  वाटले, मीही  माझ्याजवळचे पुस्तक  काढून  वाचू लागले. कल्पना  करा, केबिनमध्ये  आम्ही  दोघेच,समोरासमोर बसून पुस्तके  वाचतोय,  गाडी धडधडत  पुढे  जात  होती. मला  सस्पेन्स सिनेमातील  एखादा  प्रसंगच  वाटत  होता. (सस्पेन्स  कारण  आता  पुढे  काय?  हे  माहित नव्हते. )
                            तेवढ्यात  TC आले, मी म्हटलं  की प्लीज  मला  लेडीज  असतील  त्या  केबिनमध्ये  शिफ्ट  करा. तर म्हणाले  की  नेक्स्ट स्टेशनला  तिथे  जे  येतील, त्यांच्याशी तुम्ही बोलून  ते  करून  घ्या. मी पुन्हा  शांत! पण  लवकरच  नेक्स्ट  स्टेशन  ला एक  वयस्कर   जोडपे, त्यांचा  मुलगा, आणि  त्याचा  मित्र  असे  चौघे  चढले . मला  किती  म्हणून  आनंद  झाला, काय  सांगू तुम्हाला?  एरवी  गर्दीला  कंटाळणारी  मी,  त्या  चौघांना  पाहून  आनंदले. मग ते सगळे आईवडलांना  पलीकडच्या  केबिनमध्ये  बसवून, माझ्या  केबिनमध्ये  येऊन  बसले. पण  बर्थ exchange  ला  काही  स्कोप  नव्हता.  कारण  आईवडिलांच्या तब्येती अशा  होत्या  की  त्यांना  एकेठिकाणी  झोपणे  जरुरी  होते.आणि विशेष म्हणजे  त्या  मुलाने  USA हून  रिझर्वेशन केले होते,पण 2 च बर्थ  मिळाले  होते,  त्याला मिळालेच नव्हते. TC ने त्याला  जळगावपर्यंत  आमच्या इथे  बसू शकता असे  सांगितले होते. त्याप्रमाणे आमच्याइथे  बसून जेवण, गप्पा मारल्या. मला  एकदम  रिलॅक्स  वाटत होते. माझा  वरचा  बर्थ  होता, मी  अगदी  प्रार्थना  करत होते की, त्या  मुलाला  खालचा  बर्थ  TC  ने  द्यावा. .........
                       मी  जागीच  होते, फक्त  बर्थवर  पडून  होते, मनात  नाना  वाईटसाईट  विचार  सुरू  होते, तेवढ्यात  जळगाव  आलं, आता  पुढे काय? तर  लगबगीने   अटेंडट  आणि आणखीन  एक  माणूस आला, त्याने  खाली  बेड  वगैरे  तयार केला. मला जरा शंका आली, म्हटलं, बेड  वगैरे  घालून  देतायत् म्हणजे  कुणी VIP  दिसतायत्!  पण विचारणार  कसे? माझे  कान बाहेरील  बोलणे  ऐकण्यात व्यस्त होते. तो  मुलगा  TC  ला विनंती  करीत  होता  की मला तो  खालचा  बर्थ द्या, नाहीतर माझ्या  आईवडिलांना  अडचण  होऊ शकते. पण  TC म्हणाले, की  बर्थ रिकामा  राहू दे,  पण  कुणाला  द्यायचा नाही, असे  सांगितलंय  साहेबांनी! बापरे! 
माझी  उरलीसुरली  आशाही  संपली. मला  अचानक  इतकी  भीती  वाटायला लागली  की  आता  या केबिनमध्ये  हे दोघे  आणि  आपण  फक्त! सर्वात  वाईट  म्हणजे  केबिनचे दार बंद  होणार! My God!

                       तेवढ्यात  मला  कसं  सुचलं  कुणास ठाऊक? मी अटेंडटला  विचारलं, जर  मला  तुम्हांला  बोलवायची  जरुर  पडली तर? त्यानी  माझ्या  डोक्याशी  असलेले  बेल चे बटण  दाखवले. मी  लगेच  त्याची  ट्रायल ही  घेतली. पण  तरीही  मनातली  भीती  वाढतच  गेली.  मी  स्वतःला  अक्षरशः  पांघरुणाने बंदिस्त  केलं, महटल काही करून  समजायला  नको  की इथे  कुणी  बाई  आहे.  मला  असं  झोपायची  सवय  नाही, तर  मला  गुदमरायला  लागलं , पण  तरी  भितीने  सगळ्या  जाणीवा जणू  गोठून गेल्या  होत्या. 
     शेवटी ते  साहेब  आले,  गाडी  सुटली, मला  उगाचच  टेन्शन  की  आता  हे  लाईट  वगैरे  लावतात  का? पण  काही  नाही, त्यांनी  शांतपणे  घरी  झोपायला  काढतात,  त्याप्रमाणे  शर्ट  काढून  तिथे  हुकला  अडकवून  ठेवला, बापरे  मी  आणखीनच  घाबरले. पण ते  लगेच  केबिनचे  दार बंद करून  झोपायला  गेले. 
     जसे केबिनचे दार बंद  झाले, तसा  माझ्या  मनातल्या  भितीने  उच्चांक गाठला.  मी  स्वतःला  सारखं  boost up करत होते की  अगदी  वयाच्या  विसाव्या  वर्षीपासून,  गेली  तीस वर्षे  मी  एकटीनेच  मुंबई  अकोला  प्रवास  केलाय,  छोटी  मुले  घेऊन. 1992 नंतरच्या  दंगलीनंतर  अकोल्यात   कर्फ्यू असताना!  वेगवेगळे  चांगले  वाईट अनुभव  घेतलेत.  एकदा तर मुंबई  अकोला  प्रवास  अनंतचतुर्दशी ला केला,  तेव्हा पूर्ण  bogie  त (तेव्हा  sleeper  ने  प्रवास  करायचे ) मी  व फक्तं  एक  कुटुंब,  तोही  थरारक अनुभव  होता,  तर  असं  सगळं  केलेली  मी, घाबरते?  माझ्या  मनात  एकच  यायचे  की  या  केबिनमध्ये  मी  व  दोन  पुरुष  आहेत बस्! काही  केल्या  झोप  लागेना असे  करता -करता  बाथरूमला  जावेसे  वाटू लागले,  देवा!  आता  खाली  उतरणे  आले,  आणि केबिनचे  lock कुठे  व कसे  आहे  माहित नाही!  आता  करू  तरी काय?  Natural  call ला काही इलाज  नव्हता. (बहुधा  भीतीपोटी  असेल ) हळूच  अजिबात  आवाज  होऊ  न देता  उतरले,  दाराचे  lock मात्र  लवकर  समजत नव्हते, थोडीशी  खटपट  केल्यावर  जमले, (आवाज  न करता  सगळे  केले ) तोपर्यंत  त्या  साहेबांना  झोप  लागली  होती  बहुदा! 

           बाहेर  जाऊन आले. त्या  अटेंडटचा चेहरा  पाहून  परत  आल्यावर, थोडं  बरं वाटल. वेळ  आली  तर बेल वाजवायची ,म्हणजे  तो येईल, असे  मनाला  समजावत  केव्हातरी  झोपी गेले. 
               हा  प्रसंग  आठवला  की, मला  नेहमी एकच  प्रश्न पडतो, "माणसाला  माणसाचीच इतकी  भीती  वाटावी? "

No comments:

Post a Comment