Friday, March 15, 2019

उड़ता पंजाब .......कैनडा की और

गेल्या 30 वर्षांपासून औषध विक्री आणि मॅन्युफॅक्चरींग व्यवसायात आहोत. पंजाब हरयाणा मधे बऱ्याच फैक्ट्री असल्याने कर्नाल, चंडीगड़ ,लुधियाना ,इथुन औषध बनवून घेतो. इतक्या वर्षांपासून डीलिंग असल्याने सगळ्यांशी व्यवसायाव्यतिरिक्त कौटुम्बिक संबंध तयार झाले आहेत. त्यामुळे तिथे अधुन मधून जाण होत.
पंजाब, हरयाणा अतिशय संमृद्ध प्रदेश आहेत. निसर्गानी काळी माती ,आणि पाण्याच भरभरून दान ,दिल्यामुळे  सगळीकडे हिरवा गालीचा पसरलेला असतो. कुठेही गेलो तरी  हिरवा रंग आपली साथ सोडत नाही.गहु, ऊस ,तांदूळ ही तिथली महत्वाची पिक. स्टील ,ऑटोमोबाइल ,हैंडलूम ,मशीनरी ,मेडिसिन्स ह्याच्या फैक्टरीज आहेत.यामुळे दोन्ही राज्य अतिशय श्रीमंत ! 

आम्ही ज्यां तीन फॅक्टरीज मधून औषध बनऊन घेतो , त्या सगळ्यांचा, 60-70 लाखाच्या वर टर्नओवर आणि व्यवस्थित जम बसलेला बिझनेस आहे. 
त्या  तिघांचीही  मुल ,कॅनडा ला जायची तयारी करतायत ,अस यावेळेस गेलो तेंव्हा कळल.
साधारणतः दुसरा देश किंवा राज्यात  जाण्याच महत्वाच कारण, उच्च शिक्षण घेण्यासाठी ,किंवा  रोजगार मिळवण्यासाठी, हे असत।( जसे बिहारी मुम्बई ला येतात ,आपल्याकडली मुल अमेरिकेला जातात).
पण पंजाब हरयाणा मधे रोजगाराचा प्रश्न नाही. बर ह्या तिघांपैकी कोणीही उच्च शिक्षणसाठी कॅनडा ला जात नव्हतं ,तर काही तरी छोटा मोठा व्यवसाय सुरु करायचा किंवा एखादी नोकरी करायची (स्वतः ची इथे फैक्ट्री असून!) आणि तिथे सेटल व्हायच. एवढाच उद्देश!

पंजाब मधून दरवर्षी अंदाजे 10- 20 k तरुण कॅनडा ला जातात ,घरटी एक तरी मुलगा तिथे आहे, अस कळल्यावर त्यामागच कारण जाणुन घेण्याची उत्सुकता वाढली.
ईशाभाभी शी बोलताना सहज विषय काढला .
अरे क्या बताए भाभी आपको अस म्हणुन त्या सुरु झाल्या.. ...त्यांच्या बोलण्याचा सारांश असा होता...

ह्या  दोन्ही ठिकाणची समृद्धी म्हणजे कॉन्वेक्स लेंस मधून बघितल्यासारखी आहे. बड़ेजाव जेवढा दिसतो ,प्रत्यक्षात तो तेवढा नाहीये.सतत दुसरयापेक्षा वरचढ़ राहण्याची जीवघेणी स्पर्धा इथे आहे .त्या नादात ओढुन ताणुन आणलेल हे सोंग आहे.मुठभर लोक गर्भश्रीमंत आहेत .बाकी पैसेवाले असले तरी ,"आमदनी अठन्नी खर्चा रुपैया "ह्या प्रकारात मोडतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात  तरुण मुलांची पाउल  कनाडा कड़े वळतायत याच मुख्य  कारण म्हणजे इथे असलेली असुरक्षितता, ड्रग्स चा विळखा,खोटा बड़ेजाव,आणि वाढती गुन्हेगारी!
घराबाहेर पडल तर घरचे सुरक्षित राहतील की नाहि ही चिंता! बर, असुरक्षित वाटत म्हणुन घरी चौकीदार ठेवला तर तोच घरात कोण  कधी येत जात याची माहिती देईल ,अशी परिस्थिति आहे.
कायदे कानून नावाची गोष्टच नाही.  छोट्या छोट्या कारणासाठी पिस्तौल काढणारे लोक इथे आहेत!

एकानी मर्सिडीज घेतली तर शेजारचा लगेच मर्सिडीज आणि फॉर्चुनर घेणार. बॉडी गार्ड बरोबर घेऊन हिंडण हे पण तिथे स्टेटस सिंबॉल आहे. या सगळ्या दिखाऊ पणामुळे खर्च भरपूर असतो ,ज्याची ऐपत नाही तो कर्ज काढून का होईना सगळ करतोच !
लग्नात ही कोणी किती खर्च केला याचीच जास्त चर्चा असते।लग्नामधे पैसा अक्षरशः पाण्यासारखा खर्च करतात, दारुचा तर महापुर असतो.
आजकाल आपल्याकडे पण 3-3 दिवस चालणारे लग्न समारंभ असतात.पण सुभाष  10-12 वर्षांपूर्वी लुधियाना ला लग्नाला गेला होता ,तिथल्या 5 दिवस चाललेल्या , लग्नाच्या गोष्टी ,आमच्यासाठी सुरम्य सुरस कथांहुन कमी नव्हत्या!मागच्या वर्षी आम्ही  चंडीगढ़ ला एका मेहन्दी ला गेलो होतो (लग्न थायलंड ला होत), आपल्या इथले 3-4 लग्न होतील एवढा खर्च फ़क्त मेहँदी ला केला होता। 

इथला सगळ्यात मोठा प्रश्न ड्रग्स चा आहे.ड्रग्स नी  दोन्ही राज्य अक्षरशः पोखरल्या गेले आहेत.ड्रग्स घेणाऱ्यांच्या संख्येत  दिवसेंदिवस वाढ होते आहे.  आई वडील सतत दड़पणाखाली असतात ,की आपल मुलगा पण ड्रग्स च्या आहारी जातो की काय! ड्रग्स मुळे मरणाऱ्या तरुणांची संख्या खुप आहे. ड्रग्स अगदी सहज मिळतात ,शाळेत असताना पासून ड्रग्स च्या आहारी जाणारी मुल आहेत. 
सरकारी दवाखान्यात  ड्रग्स सोडण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे ,इतकी गर्दी असते.
ड्रग्स घेणाऱ्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद बसावा म्हणुन, तिथे  एक क्षीण उपाय करून बघितला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरींज द्यायची नाही असा कायदा केला. पण त्यामुळे ड्रग्स घेणारे तर कमी झाले नाहीतच उलट  एकच सिरिंज वापरल्याने ,एड्स चा धोका वाढला.शेवटी तो कायदा मागे घेतला.

म्हणुन तिथले लोक  आपल्या मुलांना या  दिखाव्याच्या असुरक्षित,ड्रग्स नि बरबाद केलेल्या दुनियेत ठेऊ इच्छित नाहीत. कॅनडा ला नोकरी किंवा व्यवसाय करण त्यामानानी सोप आहे.सिटीजनशिप पण लवकर मिळते.साहजिकच तरुणांचा ओघ तिकडे वळतोय.

अशा सुजलाम सुफलांम राज्याच भविष्य असणारे तरुण जर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले तर त्या राज्यांच भविष्य काय असेल हा प्रश्नच आहे!

No comments:

Post a Comment