Sunday, March 10, 2019

सुखद आठवणी!

शाळेचे दिवस ! अहाहा........शाळेचे ते फुलपाखरासारखे भिरभिरणारे दिवस  म्हणजे, आपल्या संपूर्ण  आयुष्यातील फारच रंगबिरंगी दिवस असं मी म्हणेन. शाळेचे शिक्षक! ......आवडणारे न आवडणारे, शाळेतले विषय ! ........आवडणारे  न आवडणारे. शाळेतल्या मैत्रिणी !.....आवडणार्या न आवडणार्या .......अशी ही यादी बरीच विस्मयकारक आहे. न आवडणार्या गोष्टींविषयी त्यामागची त्यावेळेसची काही बालीश कारणंही आहेत .जसे की, आमचे चित्रकलेचे वानखेडेसर न आवडणार्यांपैकी अग्रस्थानावरचे !कारण असं की, आमचं अगम्य चित्ररेखाटन ...... आणि ते बघून त्यांनी केलेली गरम कानशीलं......हो त्याकाळी आम्ही मारपण खायचो शिक्षकांच्या हातचा! आता जरा नवल वाटणं सहाजिक आहे.पण असो....तर आम्ही त्यांना मारकुटेसर  म्हणूनच आमच्या गोटात त्यांच्याबद्दल बोलताना संबोधायचो. इतिहास आणि भूगोलाशी जगनमान्य हाडवैर आणि गणिताशी नं जमलेल आमच गणित!.......आता उरल्या भाषा तर इंग्रजीशी असलेला छत्तीसचा आकडा आजतागायत आहे.आणि मराठीभाषेची शुद्धाशुद्धतेच्या गोंधळात अजुनही जीव भांबावतो आहे. संस्कृतचे पाठांतर आणि व्याकरण जीव घ्यायला टपलेलेच जणू  ! ........तर एकदंर असे सगळ्या विषयांशी सख्य असुनही  ,शाळेची ओढ कधीच कमी नव्हती . शाळेची वेळ सकाळी ६.५०ची.सकाळी ६.५०ला प्रार्थनेला हजर राहण्यासाठी ६.४५पर्यंत शाळेत हजर राहण्यासाठी कसोशिने चाललेली धडपड.  ह्या वक्तशीरपणाची शिकवण कळत-नकळतपणे तिथेच रुजली  .......हो!हो.! ....मनातली शंका एकदम बरोबर आहे. अगदी हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने उशीर जरी झाला तरी धावत वेळेच गणित कसं जुळवायच हे   ठरलेल असे .

     तर असो !..........आता इतके वर्षे उलटून गेली   तरी देखील शाळा म्हंटलं की परत लहान झाल्यासारख वाटतं .ते रुसवे फुगवे ,ती भांडणे, ते कट्टी- दो  करणे. मधल्या सुटीतले आवळे बोरं चिंचांची देवाणघेवाण .वर्गातच पिरेडच्यामध्ये चोरुन खाल्लेले  डबे .बेंचवर  उभ करुन झालेली शिक्षा  शुक्रवारच वर्गातील      सरस्वतीपुजन!............. सगळं एकदम चलचित्रासारखं सरसर धावत गेलं .वाटलं आत्ता धावत जाऊन पहिला बेंच पकडावा आणि नेहमीसाठी जागा शितुन ठेवावी आणि हजरबाई म्हणून आरोळी ठोकावी. पण आता ते कठीणच!    

           पण,एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे शाळेत नुकतच reunion पार पडल्याने बर्याच जणांच्या गाठीभेटी झाल्या. वर्गातीलच नव्हे तर अख्ख्या शाळेतील ओळखीचे चेहरे चाचपडत शोधत सुटलो. जुन्या धागादोर्यांनी आठवणींचे पट परत शिवू लागलो. आता कुणाबद्दल वाईट किंवा उणे बोलावेसे वाटतच नव्हते. तर प्रत्येकाबद्दल आपुलकी नि जिव्हाळाच ओसंडून वहात होता. जणू हे क्षण एका कुपीत बंद करुन संग्रही ठेवावे असेच काहीसे मनात होते. त्या बंद कुपीतून एक सुंगधी अत्तर दरवळू लागले ते म्हणजे आम्ही तयार केलेला शाळेचा wattsapp group !
आज! आता जवळ जवळ ३५एक वर्षांपूरवीचा मित्रमैत्रिणींचा गोतावळा एकत्र येऊन तयार झालेला  आमचा "मैत्रेय गृप!". म्हणजे शाळेच्या आठवणींचा जिवंत वाहता झरा........!

No comments:

Post a Comment