Monday, March 4, 2019

अनपेक्षित

11फेब्रु. 2019!  हा दिवस आणि ह्या दिवसाची संध्याकाळ माझ्यासाठी जीवघेणी ठरली.अचानक, ध्यानी मनी नसताना तो अपघात झाला.  गेल्या वेळी  मी हळदी कुंकू आणि बरंच काही ह्यावर लेख लिहिला होता. पण हळदी कुंकूची सांगता अशा तऱ्हेने होईल हे स्वप्नात देखील वाटले नव्हते. असो.  हळदी कुंकू चे निमित्त मात्र झाले. बरं गाडी मी स्वतः चालवत नव्हते ,गाडी माझी स्वतःची नव्हती की चालवणारी व्यक्ती माझी कुणी आपली होती. तरीही,किंबहुना,म्हणूनच झाला असावा. ध्यानी मनी नसताना होतो,त्यालाच "अपघात" म्हणतो ना आपण? जाणून बुजून केलेला तो "गुन्हा" असतो.
आता अपघात कसा झाला,कुणाच्या चुकीमुळे झाला? जर असं केलं असतं तर,जर तसं  नसतं  केलं तर;--- हे सगळे प्रश्न आणि शंका नंतर निव्वळ निरर्थक ठरतात. स्वतःच्या समाधानासाठी आणि चर्चे पुरताच उरतात.

खरं सांगू,एरवी छोट्या छोटया गोष्टीनीही विनाकारण(न पटणाऱ्या अर्थात) चिडचिड करणारी मी, ह्या प्रसंगी इतकी शांत कशी राहू शकले,इतक्या संयमाने त्या वेदना कशा सहन केल्या त्याचं स्वतःलाच नवल वाटतंय. इतका जबरदस्त मार बसला,माझ्या एकुलत्या एका भाची च्या लग्नाला मी हजर राहू शकले नाही,ह्या कुठल्याच गोष्टीचा मी  मनस्ताप करून घेतला नाही. 
 कुणावर राग  नाही,देवाला वा दैवाला दोष देणं  नाही किंवा कुणावर खापर  फोडणं  नाही---- हे असं होणारच असावं, उलट जीवावरच हातावर निभावले ह्या निष्कर्षाप्रत येऊन माझी   धावती विचारधारा थांबत असे,अजूनही.
 थोडक्यात स्वभावा च्या विरुद्ध हा अपघात अगदी सहजतेनं स्वीकारला ,ह्याचे नवऱ्याने देखील कौतुकच केले.

     पण ह्या अपघाताने बऱ्याच गोष्टींची जाणीव करून दिली ,हे मात्रं नक्की. एरवी  मोठमोठं त त्वज्ञान झाडणारे आपण,स्वतःवर वेळ आली की कशी अवस्था होते,,ते कळलं.आपला एक हात काही काळापुरता निकामी झालाय ह्या भावनेने किती असहाय वाटलं  मला? आता किमान 2 ते 3 महिने पूर्णपणे परावलंबी असावे लागणार हा अपराधी भावही मनात दाटून आला. पण मग ज्यांचे दोन्ही हात,दोन्ही पाय,कधी शरीराचा अत्यंत  महत्वाचा अवयव जेव्हा जन्मतः च अपंग असतो वा अपघाताने होतो,ती माणसं कसं आयुष्य जगत असतील? कुठल्या  मनो बळाच्या जोरावर,कोणत्या आंतरिक प्रेरणेने जीवनाचे पुढील मार्ग शोधून काढत असतील?
त्यावर यशवीपणे मात देखील करत असतील?
 आपल्याला किमान खात्री तरी असते की आपला तात्पुरता निकामी अवयव कालांतराने ठीक होणारच आहे; पण  कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या व्यक्ती स्वतःला ह्यातून  कशा बाहेर काढत असतील?
Hats off to all them, the gr8 पेर्सनॅलिटीज. आज मी 5/6 वर्षांपासून लिखाण करतेय. माझ्या शेकडो लेखातून  मी सकारात्मकतेची शिकवण  देत आले आहे;  पण प्रत्यक्षात,स्वतःवर वेळ  आली की कळते हे वाटतं तेवढं सोपं नसतं, हे ह्या अपघाताच्या निमित्ताने   लक्षात आलं. कधी कधी तर वाटतं, ज्यांना आयुष्यात कधीच त्याग,समर्पण ह्या गोष्टींना सामोरे जावे लागले नसेल,तेच ह्या शब्दांचे बुडबुडे प्रभावी पणे   फेकत  असावेत.  
भरल्या पोटी तत्वज्ञान सांगणे केव्हाही सोपेच असते.असो.
दुसरं म्हणजे ह्या अपघाताने शरीरावर जरी "आघात"  केला असला तरी मनावर मात्रं हळुवार फुंकर घातल्या गेली,माझ्या जिवलगांकडून. कुणाकुणाची नावं घेऊ? 
सर्वात प्रथम आमचे धाकटे चिरंजीव. माझा समीर. साधारण 7.30 च्या जवळपास अपघात झाला होता. माझ्या नवऱ्याने म्हणे 8.30 वाजता त्याला फोन केला. त्यावेळी तो गोरेगाव ला होता. तिथून खारघर ला रूम वर जाऊन बॅग घेऊन,सरळ C S T  गाठलं आणि 12 च्या ट्रेन ने अक्षरशः  जनरल डब्व्यात बसून सकाळी थेट हॉस्पिटल मध्ये. मला बघून त्याच्या डोळ्यात जे भाव दिसले,ते मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तब्बल 15 दिवस हा वेडा मुलगा सतत माझ्या अवती भवती होता. जातीनं लक्ष देऊन जेवायला वाढणं,प्रसंगी जेऊ घालणं,वेळेवर औषधं देणं, आणि घर आणि हॉस्पिटलच्या चकरा, तेही न कंटाळता,न वैतागता. 
मला अपघात झाला ही बातमी मेधा कडून प्रचिकडे,प्राची कडून दीप्ती कडे,अशी वाऱ्याच्या वेगाने पसरली. 
रात्री दीप्ती आली आणि अक्षरशः एक शब्दही न बोलता,न विचारता  फक्त डोक्यावरून हात फिरवत राहिली,कितीतरी वेळ.
त्या स्पर्शात काय नव्हतं? मनीषा घरून ब्लॅंकेट घेऊन आली आणि कुडकुडणाऱ्या देहाला तिच्या प्रेमाच्या उबेचं पांघरून मिळालं. 
जाताना जेव्हा जवळ येऊन गालाची पप्पी घेऊन गेली,तेव्हा आपण परत लहान मूल असल्याचा भास झाला
" माणिक ताई, अजिबात बोलू नकोस काही. आराम कर." मोहिनीच्या नजरेतील आश्वासक भाव धीर देऊन गेले. 
मंजुषा,प्राची,विद्या,मेधा ह्या वात्रट😘😘 मैत्रिणींच्या फनी गप्पा हॉस्पिटल च्या रुक्ष वातावरणात  चेहऱ्यावर हास्य फुलवून गेल्या. प्राचीची तळमळ आणि तगमग तिच्या प्रत्येक हालचाली तून जाणवत होती. जखम मला झाली होती पण वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. 
Operation च्या दिवशी शेफाली मध्ये पूर्णपणे अडकलेली असूनही  स्वतः डबा घेऊन हजर असलेली सुनीता,सकाळी 6.30 वाजता walking हून येताना निव्वळ  चाहूल घेण्यासाठी 3 मजले चढून येणारी दीप्ती,घरी गेल्यावर तुझी वाचनालयाची पुस्तके बदलण्याची जबाबदारी माझी ग,म्हणून स्वतःला माझ्यासाठी "डिलिव्हरी गर्ल" म्हणवून घेणारी प्रतिभा,घरी भेटायला येताना माझा सोमवारचा उपवास लक्षात ठेवून खारीक,बदामाची खीर करून आणणारी मेधा,हॉस्पिटल मध्येही नाश्ता जेवणासाठी जबाबदारी घेणाऱ्या माझ्या गोड मैत्रिणी---- 
नावं तरी कुणाकुणाची घेऊ? ज्या काही अपरिहार्य कारणामुळे  भेटायला येऊ शकल्या नाहीत त्यांच्या,प्रत्यक्ष भेटून ,फोन वर चौकशी करून  आपुलकी दर्शवणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याची  जाणीव झाली,जी फार सुंदर होती. 
काही लागलं तर हक्कानं सांग म्हणणारे,आणि काहीच न सांगताही हक्कानं करणारे भेटले. 
Discharge मिळाल्यानंतर पटेल भाभी नी तब्बल 8 दिवस दोन्ही वेळचा टिफिन पाठवला. तर कधी रुबी भाबिनी गरम गरम नाश्ता. माझी राधा  तत्काळ तिकीट करून 3 दिवस येऊन गेली. जमेल तशी माझी सेवा करून गेली. 
खरं तर "सेवा" हा शब्द फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी असतो.आपल्या माणसांची जवळीक,भावनिक आधार हे सगळ्यात महत्त्वाचं.

समीर झाल्यानंतर म्हणजे तब्बल 27 वर्षा नंतर हॉस्पिटल,injections, सलाईन ,औषधं, ह्या सगळ्याला सामोर जायची वेळ आली. एकीकडे वेदना,बांधलेल्या हाताचं व बंधन तर दुसरीकडे सक्तीचा आराम आणि लाड,कौतुक  करून घेण्याची छान संधी---  पण माणसाला नेमके काय हवे असते तेच कळत नाही. आता ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडायचे आहे. आणि ते मी पडणारच,अर्थात. ह्या कठीण दिवसात जे आपलेपणा चं टॉनिक मिळालं आहे,ते  आता आयुष्यभर पुरणार आहे. त्यात सगळ्यात मोठी साथ आहे ती माझ्या जोडीदाराची. ज्याचं जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. कारण लग्न झाल्यापासून जी व्यक्ती खऱ्या अर्थाने माझ्या  प्रत्येक सुख दुःखात सहभागी झालेली आहे,तिचा उल्लेख करून तिचं माझ्या आयुष्यातील स्थान कमी करू इच्छित नाही. खऱ्या अर्थानं सहजीवनाचा उपभोग,आनंद घेतला आहे. असो. 
    एकंदरीत हा अपघात म्हणचे माझ्या साठी ऊन-पावसाचा खेळ ठरला,असे म्हणायला हरकत नसावी.

No comments:

Post a Comment