Thursday, April 4, 2019

आशेचा किरण

हॉटेलमध्ये आम्ही सगळे गेलो होतो. आमच्या  पुढच्या टेबलावर एक कॉलेज ला जाणारा मुलामुलींचा गृप बसलेला होता. 22,23 ची असतील ती मुले. तीन मुली आणि तीन मुले. पाचव्या मिनिटाला त्यातल्या एका मुलाने सिगरेट पेटवली आणि झुरके मारणं सुरू केले. आता इतक्या लहान वयात मुलं हे अगदी सहज करतात.  आमच्या गप्पा, जोक्स सुरू होते. थोडावेळ जात नाही तर तीच सिगरेट दुसर्‍या मुलाच्या हातात होती. मला वाईट वाटले पण मी स्वतः ला सवय करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते. आणखी थोडावेळाने त्यात दोन मुली पण सामिल झाल्या आणि माझं खाण्यातलं, गप्पातलं लक्षच उडालं. कपड्यांचे  ताळतंत्र तर सोडलेच आहे आता आरोग्य पण दावणीला जुंपले. मला अतिशय वाईट वाटले. तब्बल तासदिड तास त्यांचे सिगरेट फुंकणे सुरू होते. 5,6 सिगरेटी फुंकल्या त्यांनी., तिन, चार झुरके मारले कि दुसरा मुलगा, तीच सिगरेट त्या मुलींजवळ. मुलांच्या बरोबरीने सिगरेट पिणाऱ्या मुलींची दया आली आणि रागही आला. अनेक प्रश्न निर्माण झाले. या मुली आईवडिलांना कशा सामोर्या जातील? त्यांचे आईवडील पण तसेच असतील का?मी माझ्या मुलाला असं म्हटलं तर तो शांतपणे म्हणाला त्या घरी राहातच नाही. पीजी म्हणून राहतात. माझ्या पेक्षा मुलाला ते दृश्य बघायची सवय झाली होती. मला म्हणाला इथे हे कॉमन आहे.10, 12 चे मुलंमुली पण हे असं सर्रास करतात. ज्याच्या हॉटेल मध्ये मी हे अस्वस्थ करणारे दृश्य बघितले ते आमच्या ओळखीचेच आहे ते म्हणाले अहो काय सांगावं मुलांच्या मांडीवर बसून बिनधास्त सिगरेटी फुंकतात काही मुली आपल्यालाच बघवत नाही पण त्या निर्लज्जपणे वागतात. हे ऐकून तर मनातल्या मनात मलाच रडू आले.

 मी आता त्या गृपकडेच बघत होते. निसर्गाने दिलेल्या निरोगी शरीराची अशी विटंबना करण्यात काही चूक आहे किंवा हानिकारक आहे असे कुठेही त्यांच्या वागण्यात बोलण्यात अजिबात दिसत नव्हते. उलटपक्षी त्या खूपच आरामात होत्या. लाईफ असेच  एन्जॉय करायची असते हेच जणू तो सगळा गृप त्यांच्या देहबोलीतून दाखवत होता. दुनिया से मेरा क्या वास्ता? हर फिक्र को धुएं में उडाता चला। 85-90% तरूणाई याला जगणे समजतात याच दु:ख होतं. Cigarette smoking is injurious to health असा वैधानिक इशारा दिला असूनही.
 निसर्गाने नवनिर्मिती चे वरदान ज्या स्त्री ला दिले आहे निदान ती जबाबदारी चांगली निभवावी. स्त्री पुरुष समानता ह्या खुळचट कल्पना नको तिथे का अमलात आणायच्या? आम्ही पुरूषांपेक्षा कुठेही कमी नाही हे म्हणायचे आहे का? ज्या समाजात आपण राहतो त्याचं काहीतरी देणं लागतो ही परिपक्वता या शिकलेल्या वयाने सज्ञान असणाऱ्या मुलींना का नाही कळत? निदान  सुदृढ, निकोप पिढी देण्याची जबाबदारी तरी निभावली तरी समाजाचे बरेच काम सुकर होईल. ही जाणिव खरंतर दोघांनी  ठेवायला हवी. मीच का…? मुले का नाही? असं म्हणून सगळ्यांनीच ताळतंत्र सोडलं तर कसं होणार?इथे मुले, मुली हा भेदभाव नाही. कारण व्यसन हे दोघांच्या आरोग्याला घातकच आहे. नुकसान पोहोचवणारेच आहे.   ही जाणीव त्यांना व्हायला हवी असं ठामपणे वाटतं.   सगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांनी हे व्यसनांचे एक क्षेत्र सोडून दिले तर नाही का चालणार?

त्या प्रसंगा नंतर लगेच आनंदी गोपाळ हा सिनेमा पाहिला. त्याकाळात समाजात किती विषमता होती. स्त्रियांवर खरचं किती अन्याय केला जात होता. गोपाळरावांच्या संवादातून तो विषाद जाणवतो. पुरूषांइतकीच घरातील अंग मेहनती ची काम स्त्रियांना पण करावी लागली. पुरूषांइतकीच किंबहुना काकणभर सरस बुध्दीमत्ता लाभूनही घराचा उंबरठा ओलांयचा नाही मग शिक्षण वगैरे तर विचारच नाही. किती कुचंबणा झाली असेल स्त्रियांची! तिची वेषभूषा, केशभूषा, आचार विचार, खानपान सर्व पुरूषांच्या मर्जी नुसार. हे असे अनेक दशके सुरू होते. माणूस म्हणून जगण्याचा स्वतः चे अस्तित्व मान्य करुन जगण्याचा अधिकार तिला नव्हताच. अशा विपरीत परिस्थितीत पण मुलींच्या शिक्षणासाठी, स्वतंत्र अस्तित्वासाठी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा लढा सगळ्यांना माहीत आहे.  डॉ. आनंदी जोशी आणि गोपाळराव यांनी स्वकीय आणि परकियांचा किती त्रास सहन केला  हेही सर्वश्रुतच आहे. किती टोकाची परिस्थिती अनुभवली स्त्रियांनी. त्याकाळात अतिशय बंधनात जखडलेली आणि आत्ताची मुक्त काहीअंशी स्वैराचारी झालेली व्यसनी स्त्री! कालचक्र किती वेगाने फिरले अगदी होत्याचे नव्हते झाले. त्याकाळातलं उट्ट काढायचं म्हणून का 'ही' अशी उन्मुक्त बेभान वागत असेल? इथे मला मार्क्सवचन खरे वाटायला लागले ते असे - इतिहास ची पुनरावृत्ती होते : आधी शोकांतिका म्हणून, पुन्हा प्रहसन म्हणून! स्त्रियांना हे अगदी बरोबर लागू होतं. पूर्वी च्या समाजात तिची शोकांतिका होती आणि आत्ताचे तिचे वागणे हास्यास्पद आहे. अशोभनीय आहे. सिनेमात शेवटी दाखवलेल्या कर्तुत्ववान भारतीय स्त्रियांचे जे फोटो बघितले त्याने मनाला उभारी आली. गर्वाने मान ताठ झाली, उर अभिमानाने भरून आला. माझ्या मनातलं मळभ दूर झालं आणि आशांचे अनेक किरणे मला दिसू लागले. उडदामाजी काळे गोरे असतातच की. आपण चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्या परीघातल्या मुलींना चांगले संस्कार देवून सुदृढ, निरोगी, परीपक्व बनवायचे प्रयत्न करत राहायचे.   

No comments:

Post a Comment