Friday, March 15, 2019

उड़ता पंजाब .......कैनडा की और

गेल्या 30 वर्षांपासून औषध विक्री आणि मॅन्युफॅक्चरींग व्यवसायात आहोत. पंजाब हरयाणा मधे बऱ्याच फैक्ट्री असल्याने कर्नाल, चंडीगड़ ,लुधियाना ,इथुन औषध बनवून घेतो. इतक्या वर्षांपासून डीलिंग असल्याने सगळ्यांशी व्यवसायाव्यतिरिक्त कौटुम्बिक संबंध तयार झाले आहेत. त्यामुळे तिथे अधुन मधून जाण होत.
पंजाब, हरयाणा अतिशय संमृद्ध प्रदेश आहेत. निसर्गानी काळी माती ,आणि पाण्याच भरभरून दान ,दिल्यामुळे  सगळीकडे हिरवा गालीचा पसरलेला असतो. कुठेही गेलो तरी  हिरवा रंग आपली साथ सोडत नाही.गहु, ऊस ,तांदूळ ही तिथली महत्वाची पिक. स्टील ,ऑटोमोबाइल ,हैंडलूम ,मशीनरी ,मेडिसिन्स ह्याच्या फैक्टरीज आहेत.यामुळे दोन्ही राज्य अतिशय श्रीमंत ! 

आम्ही ज्यां तीन फॅक्टरीज मधून औषध बनऊन घेतो , त्या सगळ्यांचा, 60-70 लाखाच्या वर टर्नओवर आणि व्यवस्थित जम बसलेला बिझनेस आहे. 
त्या  तिघांचीही  मुल ,कॅनडा ला जायची तयारी करतायत ,अस यावेळेस गेलो तेंव्हा कळल.
साधारणतः दुसरा देश किंवा राज्यात  जाण्याच महत्वाच कारण, उच्च शिक्षण घेण्यासाठी ,किंवा  रोजगार मिळवण्यासाठी, हे असत।( जसे बिहारी मुम्बई ला येतात ,आपल्याकडली मुल अमेरिकेला जातात).
पण पंजाब हरयाणा मधे रोजगाराचा प्रश्न नाही. बर ह्या तिघांपैकी कोणीही उच्च शिक्षणसाठी कॅनडा ला जात नव्हतं ,तर काही तरी छोटा मोठा व्यवसाय सुरु करायचा किंवा एखादी नोकरी करायची (स्वतः ची इथे फैक्ट्री असून!) आणि तिथे सेटल व्हायच. एवढाच उद्देश!

पंजाब मधून दरवर्षी अंदाजे 10- 20 k तरुण कॅनडा ला जातात ,घरटी एक तरी मुलगा तिथे आहे, अस कळल्यावर त्यामागच कारण जाणुन घेण्याची उत्सुकता वाढली.
ईशाभाभी शी बोलताना सहज विषय काढला .
अरे क्या बताए भाभी आपको अस म्हणुन त्या सुरु झाल्या.. ...त्यांच्या बोलण्याचा सारांश असा होता...

ह्या  दोन्ही ठिकाणची समृद्धी म्हणजे कॉन्वेक्स लेंस मधून बघितल्यासारखी आहे. बड़ेजाव जेवढा दिसतो ,प्रत्यक्षात तो तेवढा नाहीये.सतत दुसरयापेक्षा वरचढ़ राहण्याची जीवघेणी स्पर्धा इथे आहे .त्या नादात ओढुन ताणुन आणलेल हे सोंग आहे.मुठभर लोक गर्भश्रीमंत आहेत .बाकी पैसेवाले असले तरी ,"आमदनी अठन्नी खर्चा रुपैया "ह्या प्रकारात मोडतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात  तरुण मुलांची पाउल  कनाडा कड़े वळतायत याच मुख्य  कारण म्हणजे इथे असलेली असुरक्षितता, ड्रग्स चा विळखा,खोटा बड़ेजाव,आणि वाढती गुन्हेगारी!
घराबाहेर पडल तर घरचे सुरक्षित राहतील की नाहि ही चिंता! बर, असुरक्षित वाटत म्हणुन घरी चौकीदार ठेवला तर तोच घरात कोण  कधी येत जात याची माहिती देईल ,अशी परिस्थिति आहे.
कायदे कानून नावाची गोष्टच नाही.  छोट्या छोट्या कारणासाठी पिस्तौल काढणारे लोक इथे आहेत!

एकानी मर्सिडीज घेतली तर शेजारचा लगेच मर्सिडीज आणि फॉर्चुनर घेणार. बॉडी गार्ड बरोबर घेऊन हिंडण हे पण तिथे स्टेटस सिंबॉल आहे. या सगळ्या दिखाऊ पणामुळे खर्च भरपूर असतो ,ज्याची ऐपत नाही तो कर्ज काढून का होईना सगळ करतोच !
लग्नात ही कोणी किती खर्च केला याचीच जास्त चर्चा असते।लग्नामधे पैसा अक्षरशः पाण्यासारखा खर्च करतात, दारुचा तर महापुर असतो.
आजकाल आपल्याकडे पण 3-3 दिवस चालणारे लग्न समारंभ असतात.पण सुभाष  10-12 वर्षांपूर्वी लुधियाना ला लग्नाला गेला होता ,तिथल्या 5 दिवस चाललेल्या , लग्नाच्या गोष्टी ,आमच्यासाठी सुरम्य सुरस कथांहुन कमी नव्हत्या!मागच्या वर्षी आम्ही  चंडीगढ़ ला एका मेहन्दी ला गेलो होतो (लग्न थायलंड ला होत), आपल्या इथले 3-4 लग्न होतील एवढा खर्च फ़क्त मेहँदी ला केला होता। 

इथला सगळ्यात मोठा प्रश्न ड्रग्स चा आहे.ड्रग्स नी  दोन्ही राज्य अक्षरशः पोखरल्या गेले आहेत.ड्रग्स घेणाऱ्यांच्या संख्येत  दिवसेंदिवस वाढ होते आहे.  आई वडील सतत दड़पणाखाली असतात ,की आपल मुलगा पण ड्रग्स च्या आहारी जातो की काय! ड्रग्स मुळे मरणाऱ्या तरुणांची संख्या खुप आहे. ड्रग्स अगदी सहज मिळतात ,शाळेत असताना पासून ड्रग्स च्या आहारी जाणारी मुल आहेत. 
सरकारी दवाखान्यात  ड्रग्स सोडण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे ,इतकी गर्दी असते.
ड्रग्स घेणाऱ्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद बसावा म्हणुन, तिथे  एक क्षीण उपाय करून बघितला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरींज द्यायची नाही असा कायदा केला. पण त्यामुळे ड्रग्स घेणारे तर कमी झाले नाहीतच उलट  एकच सिरिंज वापरल्याने ,एड्स चा धोका वाढला.शेवटी तो कायदा मागे घेतला.

म्हणुन तिथले लोक  आपल्या मुलांना या  दिखाव्याच्या असुरक्षित,ड्रग्स नि बरबाद केलेल्या दुनियेत ठेऊ इच्छित नाहीत. कॅनडा ला नोकरी किंवा व्यवसाय करण त्यामानानी सोप आहे.सिटीजनशिप पण लवकर मिळते.साहजिकच तरुणांचा ओघ तिकडे वळतोय.

अशा सुजलाम सुफलांम राज्याच भविष्य असणारे तरुण जर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले तर त्या राज्यांच भविष्य काय असेल हा प्रश्नच आहे!

Thursday, March 14, 2019

भाषा महत्त्वाची की भावना?

गोष्ट आहे १९९० ची. म्हणजे आजपासून जवळजवळ तीस वर्षांपूर्वीची! आई, बाबा नि मी दक्षिण भारत सहलीला गेलो होतो. त्याकाळी यात्रा कंपनीच्या बसेस थेट तिरुमलापर्यंत जात नसत. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तिरुपती गावात बस ठेवून आमचा ग्रुप आंध्रप्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसने तिरुमला येथे जाण्यासाठी निघाला. रिझर्वेशन वगैरे प्रकार नव्हता. पकडेल त्याची सीट! माझ्या आईने चपळाईने बसमध्ये चढून आम्हा तिघांसाठी एक आणि आमच्या सोबतच्या जोगळेकर आजी आजोबांसाठी एक अशा दोन सीट्स पकडल्या. आमच्या सीटवर ती स्वतः बसली आणि जोगळेकरांच्या सीटवर एक बॅग ठेवली. ते येण्यापूर्वीच एक दक्षिण भारतीय गृहस्थ आपल्या दोन मुलांना घेऊन त्या सीटवर बसला. आईची बॅग त्याने खाली ठेवून दिली. बस तशी पूर्ण भरलेली नव्हती; मात्र लवकरच भरेल असं वाटत होतं.  आईने त्याला ‘ती सीट आम्ही पकडली आहे’ हे हिंदी आणि इंग्रजीत सांगितलं; पण तो काही कानावर घ्यायला तयार नव्हता.
      थोड्याच वेळात बाबा जोगळेकर आजी आजोबांना घेऊन बसमध्ये चढले. आईने त्यांना सर्व सांगितलं. बाबांनीही त्या माणसाशी बोलायचा प्रयत्न केला. अचानक तो आपल्या मातृभाषेतून भांडायला लागला. आम्हाला अर्थातच काही कळेना. तोवर आमच्या ग्रुपमधले इतर लोकही बसमध्ये चढले होते. बाबांनी पाच मिनिटे त्याचं बोलणं ऐकून घेतलं; नि अचानक बाबा सुरु झाले, “अन्न्वाकुदडे बाकीडगणे, पिट्टचिन्न शाकुडबिगा रेंडी तम्म हेन्डकागाले पाकिटलग्गे चातीकुरु धाकबांदगीळ...” बाबाच्या मुखातून दक्षिण एक्स्प्रेस सुपरफास्ट निघालेली. दक्षिणेतल्या त्या भाषेत बाबा अस्खलित बोलत होते, आणि आमच्या ग्रुपमधले इतर लोक टकामका बघत होते. त्यांचे डोळे विस्फारले होते नि उघडी तोंडे बंद करण्याचे भानही त्यांना उरले नव्हते. त्या माणसाने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, तरी बाबांचा नायगारा अखंड कोसळत होता. ते अधूनमधून आईकडे, जोगळेकर दाम्पत्याकडे, आमच्या संपूर्ण ग्रुपकडे , सीटकडे, त्याने खाली टाकलेल्या बॅगेकडे आणि बाजूलाच लागलेल्या तीरुमलाच्या दुसऱ्या बसकडे बघत हातवारेही करत होते. शब्द, आवाजाचे चढ-उतार, देहबोली या सर्वांचा प्रभावी वापर करत बाबा त्या माणसाशी भांडत होते. एखाद्या दक्षिणी चित्रपटातील अॅँग्री यंग मॅनच्या अविर्भावात ते बोलत होते. तब्बल वीस मिनिटे बाबांच्या जिव्हेवर सरस्वती तांडव करत होती. तो गप्प झाला. शेवटी मुलांसह आमच्या बसमधून उतरला नि बाजूच्या बसमध्ये चढला.

      आमच्या ग्रुपमधील लोकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला. जोगळेकर कृतज्ञतेने त्या रिकाम्या झालेल्या सीटवर जाऊन बसले. बाबांना इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी, संस्कृत आणि उर्दू ह्या भाषा येतात, हे सर्वांना माहीत होतं. मात्र दक्षिणी भाषाही बाबा एवढ्या अस्खलितपणे बोलू शकतात, हा आश्चर्याचा धक्काच होता. एकाने विचारलं, “सर, ही भाषा कुठली? तामिळ, तेलुगु की कन्नड?” बाबांनी दुसरा धक्का दिला, “मी एवढा वेळ बोलत होतो, ती कुठलीही भाषा नव्हती. एवढेच काय, मी जे आत्ता बोललो, ते तसंच्या तसं पुन्हा बोलूही शकणार नाही. ते सर्व निरर्थक शब्द होते.”
“म्हणजे?” समोरचा गपगार.
बाबा म्हणाले, “तो कुठली भाषा बोलत होता हे आपल्याला कळालं का? आपल्याला सगळ्या दक्षिणी भाषा सारख्याच वाटतात. पण त्या फार वेगवेगळ्या आहेत. तामिळ भाषिक माणसाला तेलुगु समजत नाही, आणि तेलुगु भाषिकाला मल्ल्याळी उमजत नाही. तेही आपापली भाषा सोडून इतर  दक्षिणी भाषांबाबत आपल्याइतकेच अनभिज्ञ असतात.”
“पण त्याला तुमची भाषा कळली, असं आम्हाला वाटलं होतं. तो उतरून दुसऱ्या बसमध्ये चढला, नाही का?” इति सौ. जोशी.
 “वहिनी, खरं सांगू का, भांडणात भाषेपेक्षा जोश नि मुद्द्यांपेक्षा आवेश कधीकधी जास्त महत्त्वाचा ठरतो. मी बोलतोय ती कुठलीतरी भाषा आहे, हे माझ्या आवाजातल्या चढ- उतारांवरून त्याला वाटलं. शिवाय मी हातवारे करून माझ्या म्हणण्याचा मथितार्थ त्याच्यापर्यंत पोहचवला होताच.” बाबांनी मुद्दा आणखी स्पष्ट केला 
      आता मात्र सर्वांनाच हसू आवरेना. एव्हाना बस सुरु झाली होती. प्रवासभर एकच विषय होता. बाबांचं अखंड कौतुक सुरु होतं. कुणी बाबांसारखं बोलून पहायचा प्रयत्न करत होतं आणि त्याची बोबडी वळताना बघून इतर सर्व धोधो हसत होते. बस तिरुमलाला पोहचली तरी हा विषय सुरूच होता. आणि बाबा काहीच न झाल्यासारखे जोगळेकर आजोबांची जड बॅग उचलून मंदिराच्या दिशेने चालायलाही लागले होते... 

गूढ भाषा लोपडू खंडू

किस्त्रीम च्या यंदाच्या दिवाळी अंकात पान १९वर "गूढ भाषा लोपडू खंडू" या नावाचा कॅ आनंद बोडस ,मुंबई ,यांचा लेख आहे।बेळगांव परिसराजवळच्या घनदाट दुर्गम जंगलातल्या,जेमतेम ७०-८० लोकसंख्या असलेल्या मानवी समूहाची खंडू ही भाषा आहे।या भाषेत तामिळ तेलगू मराठीची सरमिसळ असावी असं वरकरणी वाटायचं पण तसं नसून ती स्वतंत्र स्वयंभू भाषाच आहे।तिच्या गुप्ततेबाबत हा समूह प्रचंड आग्रही आणि committed आहे।एका भाषातज्ज्ञाने त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करुन, त्यांच्या नकळत,काही गाणी संवाद ध्वनिमुद्रित करुन अभ्यास सुरु केला।आणि आश्चर्यकारकपणे त्याचा गूढ  मृत्यु झाला।विशेष म्हणजे सगळी ध्वनि मुद्रणंही नाहिशी झाली।

हे लिहिणारे बोडस सर विज्ञानप्रेमी,चिकित्सक,अभ्यासू;नऊ वेगवेगळ्या ग्रंथांचे लेखक; आणि Indian Airforce  मधले निवृत्त वैमानिक आहेत,हे आवर्जून लक्षात घ्यायलाच हवं।त्यांना रेल्वे प्रवासात या समूहातल्या एका स्त्रीकडून योगायोगानी काही गुणगुणणं ऐकता आलं।ते जमेल तसं  त्यांनी लिपीबध्द केलं।अर्थात् त्या स्त्री ची ,चेन्नादिवडी तिचं नाव;तिची परवानगी घेऊनच।"एकाही शब्दाचा अर्थ विचारणार  नाही आणि मी आहे तोवर कुठेही याची वाच्यता करणार नाही"असं वचन त्या स्त्रीने आधी घेतलं होतं,हे ही महत्वाचं।गाडीतून उतरताना चेन्नादिवडीने आचार्य अत्रैंच्या भेटीची आठवण सांगून " he was a great man" असं इंग्रजीत म्हणून बोडसांची विकेट घेतली।

               मी लेख वाचून बोडसांना फोन केला।त्यांनी ही विस्तृत पणे याबद्दल माहिती दिली।"मग दिवाळी अंकात कशी काय दिली चेन्नादिवडीची कविता?"असं मी विचारलंच।तर ते म्हणाले,की "Chennadiwadi is no more now."मला खात्रीलायक बातमी मिळाल्यावरच मी लिहिलं,कारण मी वचनबध्द होतो।"किती काळ वचन पाळलं ?"असं विचारल्यावर म्हणाले ,,"२२वर्ष"!!!!!!!
               Fb ला हे शेअर करु का म्हटलं तर म्हणाले" कविता सोडून " !!!
          " का?" विचारलं तर म्हणाले "विषाची परीक्षा पाहू नये"।
              आणखीनही काही आश्चर्यकारक उल्लेख लेखात आहेत।ते आणि कविता तुम्ही अंकातच वाचा मित्रांनो।कारण मी बोडसांशी committed आहे।..

आमची पिल्लू

आमच्या नवीन घराचं बांधकाम पूर्ण झालं आणि धनत्रयोदशीला आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश केला. सामानाचे शिफ्टींग, मग सगळं सामान लावणे ही गडबड चालू असतानाच, आधी कबूल केल्याप्रमाणे, अगदी भाऊबीजेच्या दिवशीच, भाऊबीज म्हणून कुत्र्याची दोन गोड पिल्ले आमच्या घरात प्रवेशती झाली. बहीण भावाची जोडी! अरे, मी तर एकाचीच परवानगी दिली होती तुम्हाला! लवकरात लवकर या दोघांपैकी एक जण गेला पाहिजे, मी कडाडले. मुळात मला प्राण्यांची अजिबात आवड नाही, थोडीशी भीतीही वाटते. पण मुले व बाबा एका टीम मध्ये होते, त्यामुळे माझा नाइलाज झाला.
ती दोन्ही नवजात पिल्ले अतिशय गोड होती. त्यांच्यासाठी एका खोक्यात कापूस, मऊ साडी घेऊन घर तयार केले गेले. पहिल्या दिवशी त्यांना दूध ही पिता येत नव्हते. पण दोघंही आनंदाने त्यांना दूध पाजणे, बाळाला खांद्यावर घेऊन थोपटून झोपवतो, तसे झोपवणे इत्यादी लाड करीत होती. हे सगळे पाहून मी मनातून घाबरले, की आता ही दोघेही कायमची इथेच राहणार! मग लगेच मुलांना खडसावले, लवकरात लवकर ठरवा की, कुणाला ठेवायचे ते! दोघांपैकी एकच राहू शकतो आपल्याकडे! त्यांनी विचारले, मग दुसऱ्याचे काय? योगायोगाने मुकुंदच्या मित्राला एक कुत्रा हवा होता, तो एकाला न्यायला तयार झाला. हुश्श!

आता सर्वात मोठा प्रश्न की कुणाला ठेवायचे? मग रोज दोघांचे अगदी minute observation सुरू झाले. कोण आळशीपणा करतो? कोण भराभर पायऱ्या चढू पाहतो? कोण जास्त अॅक्टिव्ह आहे? अशा बऱ्याच चाचण्या घेतल्यावर"तो"आणि"ती" मधील"ती"ला घरी ठेवायचे ठरले. (टेस्ट मध्ये तो"फारच dull" ठरला.)
"त्या"ची पाठवणी करणे, खूपच जड गेले. एवढासा जीव, आधीच दोन घरी राहून झालं होतं, आता तिसऱ्या घरी चालला होता. मुलांनी खूप प्रयत्न करून पाहिला की राहू दे ना दोघांना! बहिण भाऊ छान एकत्र राहतील, पण प्रॅक्टिकली ते शक्य नव्हते.
मग,"ती"चे नाव काय ठेवायचे? तर निकिताने तिचे नाव"सूफी"ठेवले. पण आम्ही कोणीच तिला त्या नावाने कधी हाक मारली नाही. लाडाने"पिल्लू च"म्हणायचो. तिची बाळाप्रमाणे इंजेक्शन्स, औषधे, कार्ड तयार झाले. ती अगदी छोटी असेपर्यंत तिला बांधून ठेवायचे नाही, असे ठरले. मग तिची रवानगी गच्चीत झाली.

एक दिवस रात्री अचानक खूप भुंकायला लागली, पाणी देऊन पाहिलं, खायला देऊन पाहिलं, पण ती बेचैन होती. अस्वस्थपणे बंद दारावर तिच्या अल्प शक्तीनुसार धडका देत होती, वेगळीच ओरडत होती. आम्हाला कळेना, तिला काय होतंय? उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवू असे ठरले. आणि आम्ही झोपायला गेलो सगळे! आणि अगदी काही वेळातच अकोल्याला भूकंपाचा हलका धक्का बसला. म्हणजे मला तरी पलंग कुणीतरी गदागदा हलवतय असे वाटले, म्हणजे एवढी त्याची तीव्रता होती. मग कळलं की पिल्लू रात्री का अस्वस्थ होती? प्राण्यांना भूकंपाची जाणीव आधीच होते, म्हणतात.
पुरेशी मोठी झाल्यावर तिला अंगणात ठेवू लागलो. खास सांगायचे म्हणजे ,मी तिला अगदी पहिल्या दिवसापासून घरात यायचे नाही, असे सारखे सांगायचे. इतकं गुणी बाळ होतं पिल्लू, की एक-दोनदा व्हरांड्यात येऊन, हाॅलच्या दारातून आत डोकावून पाहिलं, पण आत कधी पाऊल टाकलं नाही. (माझं बोलणं इतकं सिरिअसली घेऊन तसं वागणारी ही एकमेवच!)

पिल्लू ची खाण्याची आवड म्हणजे गोड खूप आवडायचं, हलवा, खीर, ‌ ice cream आवडीने खायची. बकरीप्रमाणे टोमॅटोही प्रिय होते. उन्हाळ्यात निकिता तिला पन्ह, सरबतही द्यायची. दुधाशिवाय पोळी कधी खाल्ली नाही!पिल्लू फार म्हणजे फारच प्रेमळ होती. लहान मुलांवर विशेष प्रेम! माझ्याकडे येणाऱ्या ट्युशनच्या मुलांवरही ही जीव लावायची, खेळायची. मी गमतीने नेहमी म्हणायचे, बरं झालं, बाहेरच्यांना हिच्या प्रेमळपणाचा पत्ता लागत नाही, नाहीतर गेटशी बांधून काय उपयोग! येणाऱ्यांना मात्र उगाचच धाक वाटायचा.
डॉक्टरांना घरी बोलावून, अगदी रीतसर तिचे फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन केले होते आम्ही. त्यावेळीही मनाला खूप वेदना झाल्या होत्या आमच्या,  तिला झालेला त्रास पाहून! पण नाइलाजहोता.

अशीच एक दोन वर्षे गेल्यावर पिल्लू अचानक गुबगुबीत दिसायला लागली. सगळेजण म्हणायचे की ही वेगळीच दिसते. पण मला काही तशी शंका आली नाही, कारण एक तर अनुभव नव्हता व ऑपरेशन झालंय, म्हणून मी निर्धास्त राहिले आणि आणि गाफीलही!
एक दिवस सकाळी मी माझ्या शाळेच्या गडबडीत! (मी तेव्हा भारत विद्यालयात शिक्षिका होते.) तर पिल्लूचं जमीन खणणे सुरू होतं. आई, बघ जरा तिला! अक्षय म्हणाला. (तो सुट्टीत घरी आला होता) मला इतकी घाई होती की मी म्हटलं,"तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना बोलवा, ते काय म्हणतात ते! मग पाहू मी आल्यावर."
त्याप्रमाणे डॉक्टर आले, पिल्लूला तपासलं, आणि म्हणाले की याला" pseudo pregnancy" म्हणतात. काही प्रेग्नेंट वगैरे नाहीये ती! भास होतोय तिला आणि औषध देऊन निघून गेले. आता डॉक्टरांनी सांगितल्यावर काय म्हणणार? पण इथे पिल्लू ने दुपारभर माती खणून खोल खड्डा केला व मी जेव्हा परत आले, तर अक्षय बाहेरच होता तिच्याजवळ, मला समजले की लवकरच ही  बाळंत होणार, त्याप्रमाणे बाळंत होऊन तिला एक गोड पिल्लू झाले. डॉक्टरांनी निदान केल्यावर, दोन तीन तासातच! कपाळालाच हात लावायची वेळ!
मग तिला व तिच्या पिल्लाला औषधे, दूध, शिरा इत्यादी झाले. डॉक्टरांना बोलावले तर म्हणतात, चमत्कारच आहे!(म्हटलं, तुम्ही डॉक्टर झालात हाही!) पण पुढे दुर्दैवाने ते पिल्लू जेमतेम एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी काही हालचाल करेना, म्हणून पुन्हा डॉक्टरांना बोलावले, तर तो एवढासा जीव, या जगातून निघून गेला होता. आम्हाला तर खूप  वाईट वाटलेच, पण आता आमच्या पिल्लूचे काय याची काळजी वाटू लागली.
मी म्हटलं, राहू दे त्याला तिच्याजवळ, ती गोंजारत बसली होती त्याला! पण मुकुंद म्हणाले की जितका  जास्त वेळ ते तिच्याजवळ राहील तितका तिला जास्त त्रास होईल. जे घडले ते शेवटी स्विकारावे लागेलच, जितके लवकर स्विकाराल, तितका त्रास कमी! त्या जीवाचे शेवटचे संस्कार (सर्व एखाद्या छोट्या बाळा सारखेच) करण्याची तयारी केली आणि त्या पिल्लाला तिच्या जवळून चटकन उचलून घेतले आणि गाडीत घालून नेले. त्या क्षणापासून गाडी परत येईपर्यंत ती सारखी आत माझ्या दिशेला बघून ओरडत होती, जणू विचारत होती, की कुठे नेलय माझ्या बाळाला? माझी बाहेर जाण्याची हिम्मतच नव्हती, काही वेळाने तिच्या ओरडण्याचे, आक्रोशात रूपांतर झाले. एका आईने आपल्या बाळासाठी केलेला तो आक्रोश मी आयुष्यात विसरणार नाही.

कुत्र्यांचे वय दहा पंधरा वर्षे असते, दहा वर्षाची झाल्यानंतर, पिल्लू च्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. कधी पोटच बिघडायचे, कधी जेवायची नाही. पण एकदा सकाळी उठल्यावर पाहिले, तर पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात होती ती! मला कळेना काय प्रकार आहे ते! डॉक्टरांना बोलावल्यावर, ते म्हणाले, औषध देतो मग पाहू! पुढे तो कॅन्सर डिटेक्ट झाला. इंजेक्शनचा कोर्स करू, त्याने बरे वाटू शकते असे त्यांचे म्हणणे पडले. आम्हाला वाटले, आता काही खरे नाही. पण तिला ते उपचार लागू पडले आणि ती बरी झाली. या सगळ्या आजारपणात, घरातल्या व्यक्तीची सेवा करतानाही घाण, शी बाई वगैरे करतात. पण आमच्या पिल्लूचे भाग्य की तिची सर्व सेवा मनापासून मुकुंदनी केली.
शेवटी वार्धक्याने दोन दिवस आजारी पडून पिल्लू आम्हाला कायमची सोडून गेली. ज्या दिवशी ती गेली, तेव्हाची तिच्या  जिवाची शेवटची घालमेल पाहणे, मला अगदी असह्य झाले होते. मी कधी तिला आंजारले, गोंजारले नव्हते.पण त्या क्षणी मला वाटले की , माझे अबोल प्रेम तिला समजले होते ना?


Wednesday, March 13, 2019

शब्देविण संवादू

मी -नमस्कार ताई
  ती- नमस्ते मॅडम जी ।मै जरा जल्दी मे हूँ ।फिर मिलती हूँ आपसे।
   मी -ठीक आहे, भेटू .
 ती घाईने अंग चोरत ,हात पाय घट्ट आवळल्या सारखे करत ,नजर भिरभिर करत, चेहऱ्यावर कसनुसं हसू आणत "सटकली"
 माझ्या लक्षात आले की हीने आपल्याशी संवाद टाळला .पण कारण लक्षात येईना. कॉलनीत चार घरे पलीकडे नवीन राहायला आलेल्या कुटुंबातील ही स्त्री सुरुवातीच्या दोन भेटींमध्ये चांगली बोलली.  माहितीची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर मात्र माझ्या समोर आली की घाईगडबडीने हिला कुठे निघून जायचे असते समजेना !पुढे महिन्याभराने तिच्याशी चांगली मैत्री झालेल्या माझ्या शेजारणीकडून कळले हिच्या वागण्याचे खरे कारण .मी चेहरा बघूनच माणूस ओळखते ,मनातले विचार समजतात मला कारण मानसशास्त्राचा अभ्यास झाला आहे माझा! आणि तिचा स्वभाव चांगलाच तापट ,काहीसा आक्रमक. मग मी तिची खरी ओळख चेहरा बघूनच पटवली कि चार लोकांना सांगेन आणि नवीन ठिकाणी राहायला आल्यावर कोणाशीही चांगले संबंध राखता येणार नाही या घालमेलीत तिने माझ्यासमोर येणेच टाळायला सुरुवात केली होती .
खरे कारण कळल्यावर मला हसू फुटले .संध्याकाळी तिच्या घरी गेले .तिला विश्वासात घेतले. फक्त चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या एकंदर स्वभावाचा अंदाज येत असला तरी तो कोणालाही सरावाने जमू शकेल .मानसशास्त्रातला हा एक छोटासा भाग आहे .चेहऱ्यावरील हावभावांवरून व्यक्ती समजू शकतो पण त्याला बर्‍याच इतर गोष्टींची शास्त्रीय जोड देऊन देहबोली समजून अशाब्दिक संवादाची प्रक्रिया पूर्ण होत असते .त्या माझ्या होऊ घातलेल्या मैत्रिणीच्या शंका दूर होत आहेत असे वाटू लागले. मग तिला नैसर्गिक अवलोकनाची शास्त्रीय पद्धत पण समजावून सांगितली. जसे एखादी लहान मुलगी खूप संकोची ,घाबरट आहे असे पालकांना सांगितल्यावर त्या मुलीचे तिच्या नैसर्गिक वातावरणात जसे घरी ,शाळेत ,बागेत खेळताना निरीक्षण करून तिच्याशी प्रत्यक्ष न बोलताही तिच्या वर्तनाचा आणि विचार ,भावनांचा अभ्यास करता येतो त्यावरून काढलेल्या निष्कर्षांवरून आवश्यकतेप्रमाणे तिचे समुपदेशन करता येते .ही निरीक्षणाची पद्धत किंवा चेहऱ्यावरील हावभाव देहबोलीचा अभ्यास हे आम्ही चिकित्सा पद्धत म्हणून वापरतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबद्दल त्यातून काही निष्कर्ष काढून गैरसमज पसरवण्यासाठी नाही करत !एवढे सगळे समजावून सांगितल्यावर आज ती माझी चांगली मैत्रीण आहे हे वेगळे सांगायला नकोच .
आता ती चांगली रुळली होती. एकदा मला म्हणाली- आज मी मैत्रीण म्हणून नाही तर क्लायंट म्हणून काही विचारायला आले आहे. नवीन ओळखी होताना मला नेहमी धास्ती वाटते. समोरच्यांना माझ्या तापट स्वभावा बद्दल समजले तर ?मी त्यामुळे अस्वस्थ असते .मैत्री करणे कठीण होते. संकोच असतो त्यामुळे माझा मलाच राग येतो .मग पुन्हा चिडचिड वाढत जाते ,काय करावे सांग ना .

तिला सुचवले मग प्रयत्नपूर्वक, सरावाने आत्मसात करण्याची काही तंत्रे .अशाब्दिक संवादाची काही लक्षणे इतरांची बघावी शिकावी त्यातून आपण कशी तयारी करायची याचे आपोआप प्रशिक्षण मिळते. इतर माणसांना "वाचताना" आपल्याला  इतरांकडून कसे योग्य पद्धतीने "वाचल्या"जाईल हे शिकता येते.

 संवाद हा तीन प्रकारे होऊ शकतो -शाब्दिक, अशाब्दिक आणि लिखित स्वरूपात .भाषा शिकण्यापुर्वीच अशाब्दिक संवाद सुरू होतो .अशाब्दिक संवाद आणि वर्तनाचा सर्वप्रथम शास्त्रीय अभ्यास १८७२सालि चार्ल्स डार्विन च्या "द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन इन मॅन अंड अनीमल्स "च्या प्रकाशनाने झाला. चेहऱ्यावरील भाव ,हातवारे ,देहबोली ,डोळ्यातील भाव ,आवाजातील चढ-उतार ,हात मिळवताना जाणवणारा दाब ,केशभूषा ,इतर व्यक्तींपासून ठेवलेले अंतर इत्यादी सर्वच गोष्टी अशाब्दिक संवादासाठी आवश्यक असतात .याचा अभ्यास पुढील पद्धतींनी करता येतो

1 )अशाब्दिक संकेतांकडे लक्ष देणे .समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांचा संपर्क, हावभाव ,पवित्रा ,हालचाली इत्यादी अभ्यासून स्वतःची अशाब्दिक संवादाची क्षमता आपण वाढवू शकतो .उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांचा संपर्क पुरेसा नसेल तर त्याचे बोलणे परिणामकारक होत नाही हे लक्षात आल्यावर आपण स्वतः त्याबाबतीत सराव करू शकतो 
2 )असंगत  वर्तनाची लक्षणे -अशाब्दिक संकेत हे शाब्दिक संवादाच्या सुसंगत नसतील तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते .उदा, विशेषतः मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर आई-वडिलांना तिच्याबद्दल काळजी वाटते. ते पहिल्यांदा तिला भेटल्यावर विचारतात कसे आहे सगळे? तर तिने सगळे छान आहे हे बोलून दाखवले पण चेहर्‍यावर प्रसन्न भाव नसतील तर आई-वडिलांना लागलीच ते खटकते 
3) शब्द उच्चारतांना, बोलताना आवाज कसा आहे हे महत्त्वाचे अशाब्दिक लक्षण तपासावे लागते आवाजावरून संवाद उत्साही होतो आहे, रोचक होतो आहे ,वादाकडे जातो आहे किंवा कसे हा अंदाज बांधता येतो. आपल्याला समोरच्याशी मैत्री करायची तर संवाद साधतांना आवाजातूनही सकारात्मकता जाणवुन देण्याची खबरदारी बाळगावी लागते
 4 )डोळ्यांचा संपर्क आवश्यक तेवढा ठेवणे यातूनही महत्त्वाचे संकेत मिळतात .डोळ्यात सतत डोळे घालून बघणे समोरच्याला जाचक वाटू शकते .अजिबात न बघता बोलणे संकोचाचे ,आत्मविश्वासाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते .सामान्यतः चार ते पाच सेकंद डोळ्यांचा संपर्क ठेवणे नैसर्गिक स्वाभाविक संवादाला आवश्यक असते 
5 )अशाब्दिक संवादाबद्दल प्रश्न विचारणे 
आपण समजलेला अर्थ योग्य आहे का हे तपासण्यासाठी अशाब्दिक संवादातील लक्षणांनुसार समोरच्याला थेट विचारयेतो- तुझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहेका---?  म्हणजे गैरसमज न होता सुसंवाद घडतो
 6 )संवाद अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी काही संकेत वापरता येतात 
माझ्या संपर्कातील एका पदवीधर मुलीने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली .हायस्कूलच्या मुलांना शिकवण्याचे काम तिच्यावर सोपवल्या गेले .वर्गात गेल्यावर काही द्वाड मुलांमुळे हिला विषयात पारंगत असूनही शिकवणे जड जात होते .तिने माझ्याशी सल्लामसलत केल्यावर तिला सांगितले -तू तुझे महत्व अशाब्दिक संकेताने पटवून दे .मी सक्षम आहे .मला स्वतःबद्दल खात्री आहे हे समोरच्यांना समजायला वर्गात एका जागी आत्मविश्वासाने उभी रहा .खांदे समोर न झुकवता उभे राहून दोन्ही पायांवर समान भार देऊन ठाम आवाजात बोलायला सुरुवात कर. हळूहळू तिला या अशाब्दिक संकेतांचा परिणाम दिसायला लागला 
7 )बाह्य परिस्थितीचा विचार करून समयोचित संकेत वापरल्यास इतरांशी नाते दृढ होते 
कामाच्या ठिकाणी ज्येष्ठतेचा विचार करून औपचारिकता देहबोलीतून दर्शवत संवाद ठेवावा विरंगुळ्याच्या वेळी, सहलीच्या ठिकाणी वातावरण हलकेफुलके ठेवण्यासाठी योग्य शाब्दिक संकेत जसे मैत्रीपूर्ण स्पर्श ,टाळी देणे, चेहऱ्यावर उत्साही भाव, उच्च स्वरात शब्दोच्चार इत्यादीचा सहज वापर करावा
 8 )संकेतांचा चुकीचा अर्थ लावण्या पासून सावध राहणे आवश्यक आहे
 जसे समोरच्या व्यक्तीशी हात मिळवताना दृढपणे हात मिळवणे योग्य आत्मविश्वासाचे लक्षण आहे याउलट थरथरत्या हाताने ही क्रिया करणे स्वतःबद्दलच्या शंकेचे लक्षण असू शकते पण त्याच बरोबर एखाद्या शारीरिक व्याधी जसे संधिवातामुळे पण असे घडू शकते हे लक्षात घ्यावे 

अशाप्रकारे विविध अशाब्दिक संकेतांचा अभ्यास सराव करून संवाद यशस्वी होऊ शकतो. नातेसंबंध दृढ व्हायला, आपली प्रतिमा उच्च करायला, आपले व्यक्तिमत्व उत्तम करायला, हे आवश्यक आहे .कारण संवादांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शब्दात बोलून नं दाखवलेले ऐकण्याचा !

Tuesday, March 12, 2019

गोवा डायरी - भाग ३

आज सकाळी कुणालाच ’उठा उठा, समुद्रावर जायची वेळ झाली’ म्हणावं लागलं नाही. पटापट तयार होऊन सगळ्य़ा चाफ्याखाली जमल्या. आजची सकाळ फक्त आणि फक्त समुद्रावर मनसोक्त घालवायचं ठरलं होतं. कँडोलिम बीचचा कालचा नखरा आठवून आणि ओलेत्याने परत यायला जरा लांब पडेल म्हणून त्यावर काट मारुन आमच्या दुचाक्या पुन्हा एकदा साध्या, निरागस सिंक्यूरिम बीचच्या दिशेने निघाल्या. समोरच्या ’स्पा’ जवळ आज कुत्रं सुद्धा नव्हतं पण लगतच्या सिंक्यू-पब जवळ एक विचित्र दृश्य दिसलं. तीनचार भारतीय चेहरेपट्टीची, आधुनिक टीचभर कपड्यातली तरूण पोरंपोरी पबच्या बाहेरच्या भिंतीला टेकून कशीतरी बसली होती. एक पाठमोरी मुलगी त्यांना सटासट फटके देत होती. तिची भाषा कळत नव्हती. गाडीचा वेग मंदावून त्यांच्याकडे नजर टाकली. आपसातली मस्ती म्हणावी की हाणामारी याचा काहीही अंदाज त्यांच्या धुंद चेहर्‍यावरुन येत नव्हता. बीचवर पोचलो तरी बराच वेळ ते दृश्य नजरेसमोरुन जाईना. आजही अजिबात गर्दी नव्हती. दोनचार परदेशी मंडळी काठाकाठाने जॉगिंग करत होती तेवढीच. काल पाण्यात फक्त पाय बुडवले होते कारण किल्ल्यावर पण फिरायचं होतं. आज सगळ्य़ांनी समुद्रस्नानाचा मस्त आनंद घेतला. भाग्यश्री तर समुद्रात मासोळीसारखी अक्षरश: गडबडा लोळत होती. अर्थात फार आत शिरायचं नाही याचं भान सगळ्यांना होतं. एकमेकांवर पाणी उडवून झालं, नावेसारखं बसून हाताने पाण्यात वल्हवून झालं.
अगदी समुद्रात ध्यानस्थ बसून पाहिलं, काही चॅलेंजिंग ग्रुप पोझेसमध्ये फोटॊ काढले. लहान मुलांसारखं पाण्य़ात खेळताना रमून गेलेल्या आम्हा सर्वांना आज काय वार आहे, किती वाजले आहेत या सगळ्य़ाचा असा काही विसर पडला होता की 
’पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी’ 
म्हणजे नेमकं काय, याचा अनुभव आला. 
’काश यहाँ कोई चाय हाथ मे लाकर दे’ असं वाटायला आणि अगदी तथास्तु म्हटल्यागत तिथे एक चहावाला येऊन बसायला एकच गाठ पडली. मग आमचे समुद्रात निवांत मांडी घालून चहापान आटोपले. जब मिल बैठे कुछ यार.. चाय, हम और समुंदर. खरंच, आनंदाला बॅगपायपर वगैरे लागतो ही अंधश्रद्धा आहे. ’टू व्हीलर्स अमुक वाजता परत केल्या नाहीत तर पूर्ण दिवसाचं भाडं द्यावं लागेल’ आमच्या कॅशियर मैत्रिणीने काल तंबी दिली होती ते आठवून नाईलाजाने पाण्याची ओली मिठी सोडवत उठलो. स्टोल गुंडाळून वाळूभरल्या स्थितीत हू हू करत वेगाने रेसॉर्ट्ला पोचलो. पार्किंगमध्ये हर्ले डेव्हिडसन सारख्या बाईक्सचा जथ्था दिसला. अ‍ॅव्हेंजर्स सिनेमातल्यासारखे कपडे घालून, डोक्याला काळा रूमाल फिट बांधून बाइकिंग टूर साठी आलेला कुणी ग्रुप होता. त्या स्टाईलीश बाईक्सपाशी फोटो काढायचा मोह कुणाला आवरेना. गरमागरम नाश्ता करून सगळ्य़ांनी आराम केला. पत्ते खेळायला या म्हणून ग्रुपवर निरोप टाकला तशी सगळ्य़ा एकत्र आल्या पण फोटो डाऊनलोड करणं, ते हळूच मोठे करुन बघणं आणि आपण ज्यात नसू किंवा आपला ज्यातला फोटो चांगला आला नसेल तो आठ्या पाडून चटकन उडवून फोन मेमरी रिकामी करणं आणि खूsssप छान आला असेल तर(च) नवर्‍याला पाठवणं या महत्वाच्या कार्यबाहुल्यामुळे पत्ते राहिले बाजूला. जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी फोटो काढल्याने प्रचंड संख्येने फोटो डाऊनलोड करावे लागत होते. त्यातूनही काही जणींची मेमरी इतकी खतरनाक की ’अगं मी ते चाफ्याचं फूल लावून, उजवीकडे ४५ डिग्री मान कलती करून नै का खडकावर बसले होते, तो २१३५ वा फोटो कुणी काढला, आला नाहीय्ये अजून मला’ वगैरे काटेकोरपणे सुरू होतं.

पनीरचा वीट आल्याने हलकंफुलकं जेवण घेतलं. जरा लांबचा पल्ला असल्याने दुचाकी ऐवजी ’सोहम’ नावाची सतरा सीटर चारचाकी ठरल्याप्रमाणे येऊन उभी राहिली. चालक रोबोसारखा होता. चलो म्हटलं की निघाला. फक्त ’हा, ना’ एवढच बोलायचा. आता टूर निघाली ’दिल चाहता है’ फेम चॅपोरा किल्ला बघायला. या सिनेमाने मैत्री आणि गोवा यांचं असं काही नातं जोडलंय की आपल्या खास मित्रांसह एकदा तरी गोव्याला जावं (आणि जिंदगी न मिलेगी दोबारामुळे स्पेनला सुद्धा) असं तमाम प्रेक्षकांचं स्वप्न असावं. या किल्ल्यावर जायला पायर्‍यांची सोय असली तरी बर्‍यापैकी चढून जावं लागतं. दगडी दरवाजातून आत गेल्यावर मात्र बुटकी, पडीक तटबंदी सोडून आत काहीहीहीही नाहीये हे लक्षात येतं पण काही असलं तरी तिथल्या भिंतीवर बसून अमीर, अक्षय खन्ना आणि सैफसारखा सूर्यास्त पाहताना पाठीमागून फोटो घेण्याचं कर्मकांड केल्याबिगर हा किल्ला सोडायचा नसतोय. भाग्यश्रीची बहीण इंद्राणी आता आमच्या सोबतीला, खरं तर दिमतीला होती. त्यामुळे सगळ्य़ा ग्रुपचे हवे तसे फोटो घेता आले. इंद्राणी गोव्यात तशी नुकतीच राहायला आलेली असूनही गोयंकरच असावी अशा सफाईने वावरत होती. पहिलीच भेट, पण तिच्या जिंदादिल स्वभावामुळे आमचे गोत्र चटकन जुळले.
किल्ल्यावर पोचताच इतकं चढून लागलेली धाप मात्र लगेच थांबली त्याचं कारण श्वास रोखला जावा इतकं सुरेख विहंगम दृश्य दिसतं. खाली डाव्या बाजूला पसरलेला रमणीय गोवा, समोर ’क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी’ अशी त-हा आणि खाली उजवीकडे फेसाळता, देखणा वॅगॅटोर बीच. पूर्वी गोव्याची उत्तर सीमा मानला जाणारा हा किल्ला १७१७ मध्ये बांधण्य़ात आला असला तरी त्याआधीही इथे काही वास्तू असल्याच्या खुणा सापडलेल्या आहेत. १५१० मध्ये गोव्यात शिरलेल्या पोर्तुगीजांनी या बार्डॆझ विभागावर सर्वप्रथम ताबा मिळवला. त्यांच्याशी लढण्यासाठी अकबर बादशहाने मराठ्यांशी १६८३ मध्ये युती केली तेव्हा त्याचा तळ इथेच होता. १७३९ मध्ये हा किल्ला अखेर मराठ्यांनी जिंकला. इथे भारतीय पर्यटकांची चिकार गर्दी होती. बरेच महाविद्यालयीन ग्रुप्स आपसात किलबिलत होते. आपल्या हॉट पँट्स किंवा स्कर्टपेक्षा हातातल्या लालपांढर्‍या चुड्याची लांबी जास्त असलेल्या स्टार प्लस नववधूंचे, ’तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे’ मूड मधल्या नवर्‍यांबरोबर नाना पोझेस देत ’पोस्टवेड’ फोटोसेशन्स सुरू होते. सायंप्रकाश पडू लागला तसतसे सगळे आवाज विरत जाऊन नजरा केशरी सूर्यावर स्थिरावल्या. सूर्यास्त होताच गडाची दारं बंद होण्याआधी नाईलाजाने निघावे लागले. आता खालच्या वॅगॅटोर बीचवर जायचे होते. उतरताना ’बापरे, आपण बरच चढलो’ याची जाणीव झाली. चहा घेऊन खाली आलो तर दोघी जणी वॉशरुमच्या शोधार्थ गायब होत्या. तिथे पर्यटन विभागाने एवढी सोय करायलाच हवी आहे. राईटटूपी नुसार जवळच्या हॉटेलवाल्याने वॉशरुम वापरु द्यायला हवी होती पण त्याने त्याबदल्यात ९९ रू. चे स्प्राईट घ्यायला लावले होते असे त्या दोघी गाडीमध्ये आल्यावर कळले. ते स्प्राईट कोणी पीईना कारण मग पुन्हा वॉशरुमची गरज पडणार आणि पुन्हा स्प्राईट घ्यावे लागणार मग पुन्हा ते पिऊन... असो. 

बीचवर जायला शॉर्ट्कट म्हणून इंद्राणीने एक पार्किंग जवळचा रस्ता सुचवला. लज्जतदार कणसं, स्पेशल गोवन मॅगीचा आस्वाद घेऊन तिकडे निघालो. आधीच प्रकाश जेमतेम त्यातच एकदम अंधारा पट्टा लागला. स्प्राईट,९९ रु. आणि वॉशरुमचे चक्र भेदण्य़ासाठी ती योग्य जागा होती. पण लवकरच आमच्या लक्षात आले की इथून लवकरात लवकर जायला हवे. लांबून ऐकू येणारं रॉक पार्श्वसंगीत त्या गूढतेत भर घालत होतं. आसपास मारिजुआना विक्रेत्यांचा अड्डा तर नसेल नं किंवा गर्दुल्ल्या टोळ्या तर बसलेल्या नसतील नं किंवा लायन आणि मोना डार्लिंगटाईप लोक त्यांच्या रॉबर्ट्ने स्मगल केलेलं सोनं घ्यायला इथे तर आलेले नसतील वगैरे थ्रीलिंग विचार मनात येईतो एकदाचा बीच लागला आणि एकदम हुश्श मग अहाहा.. झालं. डाव्या बाजूला उंचावर लखलखती बीच हॉटेल्स होती. नाजूक लकाकणार्‍या दिव्यांनी लगडलेल्या शॅक्स अगदी किनार्‍यावरच होत्या. त्यापैकी एका शॅकमध्ये सुरेल लाईव्ह सतारवादन सुरू होतं. ते ऐकत खिळून उभे राहिलो मग तिथेच जेवणाची ऑर्डर देऊन किनार्‍याने अनवाणी चालत गेलो. उंचावरच्या हॉटेल्समधून लाटांवर रंगीत दिव्यांचे झोत अधूनमधून सोडले जात होते. त्यामुळे काळ्याशार अंधारात एकामागोमाग येणार्‍या लाटा कधी लालिमा तर कधी निळाई लेवून उसळत होत्या. पायाला होणारा रेतीचा मुलायम आणि पाण्य़ाचा गारेगार स्पर्श अनुभवावा, आजूबाजूचे तकाकणारे खडक पाहावे की लाटांचे रंग. समुद्राचं हे रूप पण विलोभनीय होतं. शॅक्ससमोरच्या वाळूत मांडलेल्या खुर्च्यांवर जेवायला बसलो. मध्ये मंद दिवे ठेवलेले. बाजूच्या परदेशी हुक्केवाल्याला ’जरा लांब बसता का’ म्हणून विनंती केली तर त्याने कमरेत वाकून ते मान्य केलं आणि दूर गेला. जेवण खास नव्ह्तं, भाजी ओळखूच येत नव्हती, रोट्या वेळेवर सर्व्ह होत नव्हत्या. बहुतेक आमच्यासारख्या कोरड्या, शाकाहारी गि-हाईकात त्यांना फार रस नसावा. शॅकच्या आत विशीबाविशी
च्या पाचसहा पोरींचं गोलाकार बसून पिणं आणि दम मारो दम सुरू होतं. मध्येच काऊंटरवरचा एक तज्ज्ञ येऊन त्यांना कश मारायचं प्रात्यक्षिक देऊन जात होता. त्या मुली कमावत्या, आधुनिक, पेज थ्री संस्कृतीतल्या दिसत होत्या. एकमेकींच्या खांद्यावर माना टाकून हसत, बरळत होत्या. गोव्याला अनेक जण यासाठीच येत असतात. त्यांना पाहून पोटात तुटलं पण त्या मुली हे स्वेच्छेने, एंजॉयमेंट म्हणून करत होत्या तेव्हा परिणामांची जबाबदारी घ्यायला समर्थ असाव्यात असं मनाला समजावून लक्ष जेवणाकडे वळवलं. ठोकर खातील, शिकतील, सुधारतील. बाजूला तरुण मुलांचा एक ग्रुप खातपीत होता. त्यांनाही या मुली दिसत होत्या पण कुणीही त्यांच्यावर काही कॉमेंट केली नाही किंवा त्यांच्या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या विश्वात मश्गुल असलेली ती मुलं बिल देऊन निघून गेली. मला त्याही परिस्थितीत त्या मुलांचं वागणं फार आश्वासक वाटलं.

जेवून निघालो थेट अ‍ॅर्पोरा नाईट मार्केटला. हे फक्त शनिवारी रात्री सुरू असल्याची माहिती नेटवर मिळाली होती. आपल्याकडे हस्तकलांची, हातमागाची प्रदर्शनं भरतात त्याचंच हे जरा भव्य स्वरूप होतं. डाव्या बाजूला इटालियन, रशियन आणि गोवन मांसाहारी पदार्थांची दुकानं होती. तिकडे संगीत आणि लाईव्ह गायन पण सुरू होतं. उजवीकडे बाजार. दुकानांच्या आडव्या उभ्या रांगांमधून सगळ्य़ा भुलभुलैयासारख्या फिरत होत्या. परदेशी, त्यातही रशियन पर्यटकांची चिक्कार गर्दी होती. एकूण सगळा हिप्पी माहौल होता. विक्रेते बिहारी आणि गुजराथी वाटत होते तर काही विक्रेते युरोपियन देखील होते. आवश्यक तेवढी रशियन स्थानिक विक्रेत्यांनी शिकून घेतलीय. एका जोडप्यातल्या पुरुषाच्या मागे धावत आणि हातातले झुमके त्याच्या गर्लफ्रेंडच्या कानाजवळ धरत एक  विक्रेती त्याला रशियन भाषेत ’बघ, तिला किती शोभून दिसतायत’ वगैरे गळ घालत होती, म्हणजे असावी. शेवटी तो गळाला लागलाच. कटवर्कच्या चादरी, पर्सेस याचे भाव काही ठिकाणी प्रचंड महाग तर नकली दागिने, शोभेच्या वस्तू, कपडे अगदी स्वस्त. काही कपडे इतके अनाकलनीय होते की ते कसे घालायचे हे ही कळत नव्हतं. आरती सराईतपणे वस्तू हेरून घासाघीस करुन हव्या त्या भावात घेत सुटली होती. रात्री ९ ला सुरू झालेला हा बाजार पहाटेपर्यंत सुरू असतो पण आता निघायला हवं होतं. दोघींना पकडून गेटजवळ आणलं आणि ’तुम्ही इथेच थांबा, बाकीच्यांना शोधून आणेतो’ म्हणून त्यांना कष्टाने पकडून आणावं तर पहिल्या दोघी पुन्हा ’अय्या, नवर्‍याला किंवा मुलांना काहीतरी घ्यायचं राहिलंच..’ म्हणून पुन्हा कुठल्यातरी गल्लीत गायब होत होत्या. एकदाची सगळ्य़ांची मोट बांधून रेसॉर्टकडे निघालो. उद्या सकाळी कुणीही कुणाला अज्जिबात उठवायचं नाही असं ठरलं होतं.

Monday, March 11, 2019

होळीची ग धून...

आला बहर पळसा
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून
होळी... फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा उत्सव! एक लोकोत्सव! अग्नी पूजेशी संबंधित उत्सव! हा आहे कृषीजीवनाचा यज्ञविधी!
अग्नीदेवास मी वानी
यज्ञाचा तो पुरोहित
होता रत्नविराजित
अग्नी जुन्या ऋषींनी
अन् वानावा नवख्यांनिही।।
अग्नी गाता कवी सत्य कृती
कीर्तीमनोहर देवां घेऊन देव ये
अग्ने आम्ही तुला रोज मनोभावे
दिशीनिशी वंदने नमन करु।।
आपल्या भारतीय संस्कृतीत जवळजवळ प्रत्येक सण-सोहळे हे आरोग्य, समृद्धी, संतती, संरक्षण आणि संकट निवारणासाठी, देवतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्माण झाले आहेत. सर्वांचा संबंध हा ऋतुपरिवर्तन आणि कृषीजीवनाशी निगडीत आहे. होळी हा सण देखील नवीन धान्याच्या यज्ञसमर्पणाचा विधी मानला गेला आहे. अग्नीला समर्पित करताना म्हटल्या जाणा-या काही ऋचांची माहिती येथे देत आहे...
झळाळे, राखतो यज्ञ,
न्यायाची ज्योत जागवी
वाढता आमच्या घरी अग्ने
बाप जसा बाळां,
छान भेटी आम्हास दे
सोबती सुखदायी हो।।
प्राचीनकाळी शिशिराच्या शेवटी शेतामध्ये पीक तयार झाल्यावर 'सस्येष्टी' नावाचा एक कृषीयज्ञ केल्या जात असे. आपल्या शेतातील धान्याचा काही भाग अग्नीला अर्पण करण्याचा तो विधी होता. त्याचेच आजचे स्वरूप होळी असावे, असे अभ्यासक मानतात. फाल्गुन पौर्णिमेला वैश्यदेव पर्वाच्या पवित्र अग्नीमध्ये भाजल्या जाणा-या अन्नाला 'होलक' म्हणतात, त्याचाच अपभ्रंश 'होलिकोत्सव' झाला असावा, असे डाॅ. द. ता. भोसले यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर स्वीडन, जपान, जर्मनी, चीन अशा अनेक कृषीप्रधान देशांमध्ये याप्रकारचा विधी साजरा केल्या जातो. इटलीमध्ये 'फ्लोरा' या अन्नदेवतेला आवाहन करण्यासाठी अग्नी पेटविण्याची प्रथा आहे.
काळोखी वाटेने पुन्हा येतो
देवां माणसांना घरदार देतो
सोन्याच्या रथात त्रिलोकां पहात
सवितासूर्यदेव आम्हांपाशी येतो
जगातल्या सर्व देशातील आदिम टोळ्यांनी जशी अग्नीपूजा केली आहे तशीच सूर्यदेवाचीही आराधना केलेली आहे. अग्नीच्या सान्निध्यात राहिलो तर हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण होते, ऊब मिळते, प्रकाश मिळतो, तिच ऊब, तोच प्रकाश सूर्यदेवामुळेही मिळते. या कृतज्ञतेतून हा भाव व्यक्त होतो.
आठी उजळल्या दिशा धरणीच्या
तिन्ही लोक आणि समुद्र सातही
सोनियांच्या डोळां सूर्यदेव आला
यजमानांना थोर रत्नराशी देई।।
अग्निवर भाजलेल्या अन्नाला रूची असते आणि ते पचनास हलके असते,  म्हणून अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झाला,"होलिकोत्सव"! सूर्यानं कुंभ राशीत प्रवेश करण्याचा काळ हा बीजारोपणाचा काळ मानल्या जातो. फाल्गुन महिन्यात सूर्य आणि पृथ्वीच्या मिलनातून धनधान्य समृद्धी व्हावी, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश! सुफलीकरण आणि प्रजनन यासाठी साजरा होणारा उत्सव!
यासाठी स्वच्छ जागेवर यक्षदेवतेचे प्रतीक म्हणून 'एरंडाचा सोट' उभा करून सुकलेले लाकूड - पालापाचोळा अग्नीला अर्ग्नीला अर्पण करण्याची प्रथा होती. पूर्वी त्यात शेणगोळ्याचे विविध आकार करून माळ अर्पण केल्या जायची. हा 'होलाष्टकोपनिषद्' विधी कशासाठी?  तर जमिनीच्या उत्पादन क्षमतेला मारक असणा-या अनिष्ट शक्तींना दूर सारणासाठी! त्यातूनच सुरू झाल्या,"होळीच्या बोंबा"!
संक्रांतीचे घेते सुगडं
आली पुनवेची दुघड
पुनवच्या आल्या ओंब्या
शिमगा लय देई झोंब्या
शिमग्याचा गुलाल
आला पडावा दलाल...
अग्नीची पूजा झाल्यावर मातीचा, भूमीचा जो उत्सव साजरा होतो त्याचे सुंदर वर्णन लोकगीतांमध्ये आहे. या भागात वेदांतील प्रकाशपूजक ऋचांचे मराठीकरण जाणलेत. 

आला बहर पळसा
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून...
लोकभाषेत ज्याला शिमगा म्हणतात, तो रंगाचा उत्सव! मदनोत्सव! रंगोत्सव! होळी  पाठोपाठ येणारा सण! बहिणाबाईची म्हणते,
"किती रंगविशी रंग,
रंग भरले डोळ्यात,
माझ्यासाठी शिरीरंग,
रंग खेळे आभाळात!"
रंग म्हटला की चटकन् नजरेसमोर उभा राहतो तो केशरी रंगाने बहरलेला पळसवृक्ष! ज्याच्या फुलांना 'अगीनफुलं' म्हणण्याचा मोह व्हावा, असा हा वृक्ष! त्याच्या सावलीत भगवान बुद्धांचा जन्म झाला, असे मानले जाते. ज्याला लोकजीवनात 'संतवृक्षा'ची उपमा दिली जाते तो पळसवृक्ष...
वाटे वरचा परस, शेंडीले कोवळा
लेकी देऊन सोयरा, पिताजी माझा
वाटेवरचा परस, शेंडीले पिकला
लेकी देऊन चुकला पिताजी माझा
वाटेवरचा परस, वाटुल्या पानांचा
सखा निष्ठूर मनाचा, बंधूजी माझा
ढाक, पलास, चलचा, कांकराई, किनक पलाशी, ब्रम्हवृक्ष...अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या या पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती केली जाते.  याची सखी म्हणून जिचा उल्लेख साहित्यात येतो ती आहे, 'काटेसावर'! पूडिया आदिवासी नवीन गाव किंवा वस्ती उभारताना मध्यभागी हा वृक्ष लावतात नि मग आजुबाजूला वस्ती वाढवत नेतात.
गाव जळे
सावर रडे
परस म्हनते
का सावरी रडे?
माझा आहे आता आट
का गेला सावरी तुझा काट?
माझी वाक 'अवसते'
माझा खांदाही अवसते
फुलही अवसते
पानही अवसते
आन् काडीही अवसते
या लोकगीतातील वर्णनाप्रमाणे पळसाचा प्रत्येक भाग हा औषधी उपयोगाचा आहे. अगदी लचक भरण्या पासून तर पदर जाण्यापर्य॔त अनेक आजारांवर उपयोगी असणारा हा वृक्ष आहे.
शिमगा दे लांबा झोंबा
या शिमग्याची गाठी
अखोजी आली पाठी
सणावारांना गुंफणारी ही लोकगीतं आठवलीत ती होळीच्या निमित्ताने...! लोकगीतातील होळी आणि पळसाचे उल्लेख  आठवलेत आणि जाणवलं की, भूमीच्या सुफलीकरणासाठी सुरू झालेल्या या कृषी उत्सवाचे आज आपण काय केले? मुळात पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा हा विधी...! या विधीला आज जे संहारकरूप प्राप्त झाले आहे त्यावर सर्वांना गंभीरतेनं विचार करायला हवा, असे वाटत नाही का?

Sunday, March 10, 2019

पुरानी जिन्स और गिटार

परवा सगळे जेवायला आले होते. जेवणं आटोपल्यावर ठरल्याप्रमाणे फोटो बघणे हा कार्यक्रम सुरू केला. अकोल्याला अनेक वर्षे सांभाळून ठेवलेले फोटो आता प्रत्येकाने घेवून जावे असं ठरलच होतं. मग पॅकिंग उघडून बसले सगळे. जुने फोटो बघणे म्हणजे खरंच खूप गंमत येते.
ए बघ मी छान होते, ए बघ माझे केस किती लांब होते, ए बघ मी किती बारीक होते, आपले जुने घर असे होते, हं याठिकाणी अशी बाग होती, आपण कसे खेळायचो मस्ती करयचो असेच वाक्य बोलले जात होते. अगदी ब्लॅक अँड व्हाईट फोटो पासून तर आत्ताच्या enjoying old memories, feeling nostalgic च्या मोबाईल च्या सेल्फी पर्यंतचा भला मोठा प्रवास आम्ही मस्त मजेत केला. फोटो म्हणजे खरंच आपलचं हूल देत गेलेलं वय असतं नाही का? फोटोच्या प्रकारात होत जाणारे बदल अनुभवणारे आपण 45 ते 55,60 च्या पिढी चे लोकं खरचं लकी म्हटले पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट मधलं कोवळ बालपण, रंगीत फोटोतील टवटवीत तरूणपण आपल्या पिढीने बघितले हे खरेच.
मला आठवलं माझ्या आजोबांच्या एकाहत्तरीचे फोटो. आत्ता सारखे प्रत्येक क्षणांचे फोटो काढायचा तो जमाना नव्हताच. गृप फोटो 2,4 आणि आजीआजोबांचा एक स्पेशल फोटो कि झालं, कार्यक्रम  साजरा झाला. तर सांगायचा मुद्दा हा की स्टॅण्डवर कॅमेरा ठेवलेला होता. त्यावर एक काळा चौकोनी मोठा रुमाल टाकला होता. त्या रुमालाच्या आत फोटोग्राफर शिरला काहीतरी जादू केली आणि म्हणाला काढला फोटो. कधी देणार तर महिना तरी लागेल म्हणाला. तेव्हा जर कोणी सांगितले असते कि काही वर्षांत असा फोन येईल कि तुम्ही इकडे फोटो काढला कि लगेच दुसर्‍या क्षणी बघू शकाल तर नक्कीच त्याला वेड्यात काढले असते.
आजच्या कॉम्प्युटर क्रांतीची कमाल झाली. जुन्या खराब होणार्‍या फोटोंची सॉफ्टकॉपी बनवून कॉम्प्युटर वर, हार्ड डिस्क वर, क्लाऊडवर आता ते फोटो चिरकाल टिकणार आहे.अगदी आपल्या बालपणीच्या मैत्री सारखेच.                                    मित्रमंडळींच्या गृपमधील प्रत्येकजण आठवायला लागले. भावंडांचे मित्रमंडळ पण अगदी स्पष्ट आठवायला लागले. मग हि कुठे असते? हा काय करतो वगैरे. जुन्या गल्ल्या, चौक सगळे आठवू लागलो आख्ख बालपण एखाद्या चल चित्रपटा सारखा डोळ्यासमोरुन जाऊ लागला अगदी डायलॉग सहित सगळं.           
नातेवाईकांचे फोटो बघताना आत्या /काका/मामांचे पण मित्रमंडळी आठवले. आठवणींच्या बाबतीत भावजींची कमाल होती त्यांना खूप बारीक सारीक तपशील आठवत होता. सगळे भूतकाळात छान रमले. गप्पांना अंत नव्हता. जुन्या आठवणींनी हसूही येत होते आणि बराच मोठा काळ लोटला अशी संमिश्र भावना पण होती.

 एकीकडे लगेच आपापल्या गृपवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकून ओळखा कोण? असे कोडे घालून गृपवर पण गप्पा सुरू झाल्या. ब्लॅक अँड व्हाईट फोटो मधील आजी आजोबा, काका, मामा, मावश्या, आत्या इतर नातेवाईक, शाळेचे मित्रमैत्रिणी असे फोटो बघता बघता रंगीत फोटोंचा अल्बम कधी सुरू झाले समजलं देखिल नाही. मग कॉलेजच्या दिवसांचे फोटो सुरू झाले. केसांचे लांब कल्ले, मोठ्या बेलबॉटम पॅंट, शिडशिडीत शरीरयष्टी असे आता हसू आणणारे पण त्यावेळेस च्या फॅशन नुसार असलेले फोटो बघून गंमत वाटत होती. फुग्याच्या बाह्या, स्लॅक्स (पावला खालून त्याची एक पट्टी असायची) , मॅक्सी, लांब पायघोळ स्कर्ट त्यावर कमरेइतके टॉप, कानावर केसांच्या बटा आणि मागे सैल किंवा घट्ट वेणी किंवा अंबाडा. अशी मुलींची आणि  आई, काकू, मामींची केशभूषा आणि वेषभूषा होती.  थोडेफार बदल होऊन जुनी फॅशन आता परतून पुन्हा आली आहे. फक्त केसांची फॅशन आली नाही.

मग एकेकाच्या लग्नाचे फोटो बघत होतो. चेहर्‍यातला कोवळेपणा प्रकर्षाने जाणवत होता. घनदाट केस आणि निमूळता, निरागस कोवळा चेहरा असं रूप प्रत्येकाचच दिसत होतं. नणंद म्हणाली या वयातल्या सगळ्या नवरी किती गोड, सोज्वळ दिसतात. आजच्या पेक्षा अगदी कमी मेकअप असलेला नॅचरल चेहरा खरचं खूप टवटवीत दिसत होता. एकतर आजच्या पेक्षा लग्न पण लवकर व्हायचे त्यामुळे नवरा नवरी छोटे आणि तजेलदार. ते फोटो बघतांना जाणवतं आपल्यात खरच खूप बदल झाला आहे. वयातला बदल ठळकपणे लक्षात आला. डोक्यावरचे केस कमी आणि चेहरा पसरट होत जरड झालेला, अधूनमधून डोकावणारे पांढरे केस त्यात भर घालत आहेत. आयुष्यातील चढउतार, बदलत जाणारी परिस्थिती, बदलत जाणारा काळ आपल्याला त्याच्या बरोबर मोठ करत करत एक दिवस आपल्या पुरता कायमचा थांबणार आहे या वास्तवाची जाणिव हे फोटो करून देत होते. पण मी लगेच दुसर्‍या अल्बम कडे वळले. डोहाळजेवण, बारसे, वाढदिवस, शाळा, कॉलेजातली आमची मुले असा फोटोचा धबधबा संपता संपत नव्हता.

फोटोंची ही कहाणी तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरची सारखी आहे. तर मंडळी फोटोंचा हा अलबम किंवा आठवणींची ही फोटोफ्रेम प्रत्येकानेच आपल्या मनात जपून ठेवली असणार हो न! तुम्हीही तुमच्या घरी अशी फोटोंची मैफिल जमवा आणि या गमतीची पुनरावृत्ती अनुभवून बघा. एक हिंदी गाणे या निमित्ताने आठवले पुरानी जिन्स और गिटार मोहल्ले कि वो छत और मेरे यार। बस यादे यादे यादे रह जाती हैं कुछ छोटी छोटी बाते रह जाती है। 

सुखद आठवणी!

शाळेचे दिवस ! अहाहा........शाळेचे ते फुलपाखरासारखे भिरभिरणारे दिवस  म्हणजे, आपल्या संपूर्ण  आयुष्यातील फारच रंगबिरंगी दिवस असं मी म्हणेन. शाळेचे शिक्षक! ......आवडणारे न आवडणारे, शाळेतले विषय ! ........आवडणारे  न आवडणारे. शाळेतल्या मैत्रिणी !.....आवडणार्या न आवडणार्या .......अशी ही यादी बरीच विस्मयकारक आहे. न आवडणार्या गोष्टींविषयी त्यामागची त्यावेळेसची काही बालीश कारणंही आहेत .जसे की, आमचे चित्रकलेचे वानखेडेसर न आवडणार्यांपैकी अग्रस्थानावरचे !कारण असं की, आमचं अगम्य चित्ररेखाटन ...... आणि ते बघून त्यांनी केलेली गरम कानशीलं......हो त्याकाळी आम्ही मारपण खायचो शिक्षकांच्या हातचा! आता जरा नवल वाटणं सहाजिक आहे.पण असो....तर आम्ही त्यांना मारकुटेसर  म्हणूनच आमच्या गोटात त्यांच्याबद्दल बोलताना संबोधायचो. इतिहास आणि भूगोलाशी जगनमान्य हाडवैर आणि गणिताशी नं जमलेल आमच गणित!.......आता उरल्या भाषा तर इंग्रजीशी असलेला छत्तीसचा आकडा आजतागायत आहे.आणि मराठीभाषेची शुद्धाशुद्धतेच्या गोंधळात अजुनही जीव भांबावतो आहे. संस्कृतचे पाठांतर आणि व्याकरण जीव घ्यायला टपलेलेच जणू  ! ........तर एकदंर असे सगळ्या विषयांशी सख्य असुनही  ,शाळेची ओढ कधीच कमी नव्हती . शाळेची वेळ सकाळी ६.५०ची.सकाळी ६.५०ला प्रार्थनेला हजर राहण्यासाठी ६.४५पर्यंत शाळेत हजर राहण्यासाठी कसोशिने चाललेली धडपड.  ह्या वक्तशीरपणाची शिकवण कळत-नकळतपणे तिथेच रुजली  .......हो!हो.! ....मनातली शंका एकदम बरोबर आहे. अगदी हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने उशीर जरी झाला तरी धावत वेळेच गणित कसं जुळवायच हे   ठरलेल असे .

     तर असो !..........आता इतके वर्षे उलटून गेली   तरी देखील शाळा म्हंटलं की परत लहान झाल्यासारख वाटतं .ते रुसवे फुगवे ,ती भांडणे, ते कट्टी- दो  करणे. मधल्या सुटीतले आवळे बोरं चिंचांची देवाणघेवाण .वर्गातच पिरेडच्यामध्ये चोरुन खाल्लेले  डबे .बेंचवर  उभ करुन झालेली शिक्षा  शुक्रवारच वर्गातील      सरस्वतीपुजन!............. सगळं एकदम चलचित्रासारखं सरसर धावत गेलं .वाटलं आत्ता धावत जाऊन पहिला बेंच पकडावा आणि नेहमीसाठी जागा शितुन ठेवावी आणि हजरबाई म्हणून आरोळी ठोकावी. पण आता ते कठीणच!    

           पण,एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे शाळेत नुकतच reunion पार पडल्याने बर्याच जणांच्या गाठीभेटी झाल्या. वर्गातीलच नव्हे तर अख्ख्या शाळेतील ओळखीचे चेहरे चाचपडत शोधत सुटलो. जुन्या धागादोर्यांनी आठवणींचे पट परत शिवू लागलो. आता कुणाबद्दल वाईट किंवा उणे बोलावेसे वाटतच नव्हते. तर प्रत्येकाबद्दल आपुलकी नि जिव्हाळाच ओसंडून वहात होता. जणू हे क्षण एका कुपीत बंद करुन संग्रही ठेवावे असेच काहीसे मनात होते. त्या बंद कुपीतून एक सुंगधी अत्तर दरवळू लागले ते म्हणजे आम्ही तयार केलेला शाळेचा wattsapp group !
आज! आता जवळ जवळ ३५एक वर्षांपूरवीचा मित्रमैत्रिणींचा गोतावळा एकत्र येऊन तयार झालेला  आमचा "मैत्रेय गृप!". म्हणजे शाळेच्या आठवणींचा जिवंत वाहता झरा........!

Saturday, March 9, 2019

स्वीकार खुलवी कळी समाधानाची

लहान मूल जेव्हा चालणं सुरू करण्याच्या धडपडीत पहिल्यांदा सलग ४ पावलं टाकतं तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचे निखळ आनंदी भाव इतरांनाही किती आनंद देऊन जातात!  मी आधाराशिवाय चाललो हा विजय साजरा करणारं त्या बाळाचं हास्य त्याच्या यशाची पावती असते. त्यावेळी बाळाने तो क्षण पुरेपूर जगलेला असतो आणि म्हणून त्याचं समाधान इतर कुठल्याच गोष्टींवर अवलंबून नसतं. हेच मूल मोठं झाल्यावर आपल्या नोकरी /व्यवसायाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकतं तेव्हा तसच निरागस समाधान अनुभवता येणं म्हणजे खरं यशस्वी होणं होय. पण असं प्रत्येक वेळी घडत नसतं. दुसरी नोकरी मिळाली नाही म्हणून ही स्वीकारली, इच्छा नव्हती पण घरचे म्हणाले म्हणून या व्यवसायात उतरलो, अमुक-शिकल्यावरच उद्योग -धंदा सुरु करायचा होता पण---- हा पण, किंतु, परंतू नं येऊ देता किती जण बाळाच्या निष्पाप समाधानाने पुढे येतील त्या गोष्टी स्वीकारतात? या वाढत्या असमाधानाचे मुख्य कारण तुलना हे होय. स्वतः केलेली, घरीदारी सर्वांकडून होणारी तुलना बरेचदा मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडते. मग त्या निर्णयाला आनंदाची किनार कशी असणार? 
तुलना जेव्हा मूल्यांकनासाठी होते तेव्हा ती समोरच्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल खरी माहिती, खरा अंदाज देऊ शकते. प्रत्येक गोष्टीचे उणे-अधिक परिणाम समजून सर्व बाजूंनी त्याबद्दल निर्विकारपणे माहिती घेऊन केलेले परीक्षण अर्थात मूल्यांकन करणे यामुळे प्रेरणा मिळते.उदा एखाद्या साहित्यक्रुतीचे  मूल्यांकन करून त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचे साहित्य निर्माण करणे.
सामान्यपणे तुलना मात्र केवळ दोन बाजूंनी केली जाते. अहंकारापोटी केलेली सकारात्मक तुलना ईर्ष्या निर्माण करु शकते तर स्वतःला कमी लेखून केलेली नकारात्मक तुलना नैराश्य आणू शकते. उदा एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला बघून मी पण एवढी संपत्ती, ऐश्वर्य कमावणारच असा विचार ईर्ष्या, द्वेष निर्माण करू शकतो. आणि, ती दिसायला एवढी देखणी आहे की मी तिच्यापुढे काहीच नाही, माझ्याशी कोणी मैत्री करणार नाही असा उदास भाव नकारात्मक तुलना निर्माण करू शकतो. 

इतरांसारखे प्रशस्त घर हवे, आपली मुले त्यांच्या मुलांसारखी गुणी असायला हवीत ,त्याला किती कमी जबाबदाऱ्या आहेत म्हणून तो माझ्या पेक्षा सुखी आहे, तिला तिच्या सासरच्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवू दिलं माझं मेलं नशीबच खराब, तो काय कुठला राजा लागून गेला का- मी पण त्याच्यासारख्या शाही समारंभ करू शकतो, इ, इ.या प्रत्येक तुलनात्मक विचार केलेल्या गोष्टींमधून जे मानसिक भाव निर्माण होतात ते माणसाला संतुलित कार्य करण्यात अडथळा आणू शकतात. तुलना सहन नं झाल्याने द्वेषापोटी समोरच्याला मागे खेचणे, समोरच्याशी बरोबरी करण्याच्या अट्टाहासाने अनैतिक काम करणे, तुलना सहन नं झाल्याने आत्मविश्वास गमावणे या सर्वांचे मूळ फक्त अयोग्य तुलना करण्यातच आहे. आणि मग कितीतरी सुखाचे, आनंदाचे क्षण नकळत निसटत जातात पण त्या व्यक्तीला त्याचे भान नसते. 
     "अपना हर हासिल कम ही लागे है
      क्योंकि उसे हम दूसरों से आंके है"

मध्यंतरी गाजलेल्या हिंदी चित्रपटातील एक वाक्य प्रेक्षकांची दाद मिळवून गेलं होतं. " गोल्ड तो गोल्ड होता है, छोरा लावे या छोरी" उद्देश ठरलेला होता, त्याचा मार्ग अभ्यासलेला होता, त्यासाठी आवश्यक समर्पणाची तयारी होती म्हणूनच या चित्रपटातील नायक कुठल्याही तुलनेला नं घाबरता यशस्वी होऊ शकलेला आपण बघितला आहे. त्याने ठरवलेल्या सध्याचे मूल्यांकन केले, सकारात्मक किंवा नकारात्मक तुलना नाही केली. 
आपण सर्व समाजात राहतो. त्यामुळे चार गोष्टींची ,चार व्यक्तींशी तुलना होणे स्वाभाविकच आहे. प्रत्येक जण स्वतःला एवढा निग्रही बनवू शकेलच असे नाही .पण प्रयत्न मात्र नक्की करता येईल. वास्तव स्विकारणे, उद्देश ठरवणे, त्याचा योग्य मार्ग अभ्यासणे, सातत्याने क्रुती करणे यातून आपण जेव्हा एक पाऊल पुढे सरकतो तेव्हा तोच निरागस आनंद मिळवत असतो. प्रत्येक पावलावर मिळालेले हेच निर्भेळ समाधान पुढची वाटचाल करण्यास प्रेरणा देत राहते. पहिली पायरी अर्थात वास्तव -जे जसे आहे तसे स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. म्हणतात ना -
    आयुष्याला निरनिराळ्या ठिकाणी तोलून पाहिलं
     कधी प्राणी कधी पक्षी कधी हवा म्हणून पाहिलं 
      दरवेळी काही ना काही कमीच वाटलं
      मग आयुष्याला "आयुष्य "म्हटलं 
      तेव्हा कुठे खरं समाधान मिळालं 

वसंताचे गाणे

रंगांच्या जशा निरनिराळ्या छटा असतात अगदी तशाच मनाच्याही असतात .मन कधी उदास तर कधी आनंदी. कधी कोषात गुरफटलेल तर कधी स्वच्छंदी!..........अगदी फुलपाखरासारखं...... सतत भिरभिरणारं .......फळाफुलांचा  आस्वाद घेणारं! ...मनाची ही अवस्था प्रत्येकचवेळी सारखी असते अस नाही तर ती र्रूतुबदलावर अवलंबून असते ,असेही बरेचदा आपलच आपल्याला जाणवतं ....पावसाळी ढगांची दाटी मनावर मळभ आणतात तर श्रावणसरी नर्तन करणार्या नर्तकीसारखे आनंद देतात.     तसाच हा वसंत !.... आनंदाची बरसात करणारा.  बहारा..बहारा!....असं गुणगुणत   येणारा ! म्हणूनच तर सृष्टीच हे डोलकर " रुप पहाता पहाता आपणही आपसुकच डोलू लागतो. 
          पं.कुमारजींनी  ह्याच    रुतुचक्रावर  आधारित गीतवर्षा,गीतहेमंत,गीतवसंत अशी          रागनिर्मितीच केली  आहे. शास्त्रीय संगीतात खास "वसंतबहार "नावाचा रागही प्रसिद्ध आहे तसेच त्याच नावाच्या सिनेमात पं.भीमसेन जोशी आणि मन्नाडेंच्या आवाजातील ,"केतकी,गुलाब जुही चंपक बन फुले "ह्या ओळी ऐकता क्षणी ,वनातील बहरलेलं रुप जसच्या तस डोळ्यासमोर उभं राहतं.....!

    वसंताच आणाखी एक रुप म्हणजे "प्रेमाचा महिना".......! वसंत म्हणजे प्रेमाचे गाणे,वसंत म्हणजे पानाफुलांचे तराने "हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे" म्हणत दिलेली प्रेमाची कबुली तर कुठे  अबोल प्रीतीने मनातच म्हंटलेली गाणी.ती मांडताना
  कवी सुरेशभट सांगून जातात...
।।मनातल्या मनाता मी,तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो।।
अशी ही प्रेमाची मुक तान छेडताना मनातल्या प्रेमाला आलेली भरती प्रियकराला अस्वस्थ करुन सोडते.
   पलाशपुष्पाचा  केशरी रंग वसंतागमनाची ललकारी देणारा! ...खुद्द कृष्णगोपींच्या रासलीलांनी रंगलेला. रंग ना डारो श्यामजी" असे लाडीक नकार देणार्या गोपिकांना खरे तर कृष्णाचा हा खट्याळपणाच जास्त हवहवासा वाटतो. गोपगोपिकांचा हा निरामय प्रेमालाप आपसातील प्रेमभाव टिकवण्याचे तंत्र शिकवून जातो. 
    रुतुराज वसंत,फलराज आम्र आणि गानसम्राज्ञीकोकीळा  यांच काय बरं नातं असावं ?हे तिघेही  मानाचे मानकरी. वसंताच्या आगमनाने आंबा बहरतो. आंब्याच्या बहरण्याने कोकीळेला गानस्फुर्ती होते व तिच्या पंचम स्वराने आसमंत निनादून जातो. 
"कोयलिया बोले आंबुवाके डारपर
रुतु बसंत की देत संदेसवा"
ह्या ओळी आगदी सार्थ ठरवते.
पण खरेपणाची साक्षदेणार्या  कवी द.भा. धामणस्करांच्या या ओळी जास्तच मनाला भिडतात.
.    वसंत येतो तेव्हा फुले फुलतात ,हे पुस्तकात वाचलेले।
     फुले फुलतात तेव्हा वसंत येतो ,हे स्वतः पाहिलेले।।

Friday, March 8, 2019

पाश्चिमात्य स्त्रीवाद


स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीवाद असे शब्द म्हटले, की बऱ्याच लोकांच्या मनात भारतीय स्त्री आणि पाश्चिमात्य स्त्री यांची तुलना सुरु होते. ‘इकडे’ तिचे समाजातील स्थान कायम पुरुषाच्या तुलनेत दुय्यम आहे तर ‘तिकडे’ पुरुषाच्या बरोबरीचे आहे. भारतीय स्त्रीला कायद्याने, समाजाने बरेच अधिकार दिलेत, फक्त तिला ते वापरू द्यायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार तिच्या घरातल्या पुरुषाकडे आहे. पाश्चिमात्य स्त्री मात्र आपल्या अधिकारांची स्वतः मालकीण आहे. भारतीय स्त्री राजकारणात सक्रीय आहे मात्र बरेचदा तिचा ‘बोलविता धनी’ वेगळाच असतो. पाश्चिमात्य स्त्रीचे तसे नाही. भारतीय उद्योगपतींच्या बायकांची ओळख ‘अंबानी /  जिंदाल / बिर्ला यांची (वेळ आणि पैसा भरपूर असल्यामुळे समाजकार्य करणारी) बायको अशी असते, तर तिथे स्त्रिया स्वतः मोठमोठ्या उद्योगांच्या मालकिणी आहेत. मूल जन्माला घालणे हे भारतीय स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे, तर मूल जन्माला घालावे की नाही या निर्णयासकट सर्व अधिकार पाश्चिमात्य स्त्रीकडे राखीव आहेत. वरवर दिसणार्या या दृश्यामुळे ‘पाश्चिमात्य स्त्री ही मुक्त आहे’ आणि ‘तिकडे काय आमच्यासारखी स्थिती नाही बायकांची’ अशी आपली विचारसरणी होते. मात्र पाश्चात्त्य स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास बघितला तर आजची स्थिती मिळवण्यासाठी पाश्चात्य स्त्रीलाही किती संघर्ष करावा लागला याची कल्पना येते.
इतिहास
पाश्चिमात्य स्त्रीवादाची मुळे शोधायची तर इसवीसनपूर्व तीनशे वर्षे मागे जायला हवे. त्या काळात  Aristotleनेसुद्धा स्त्रियांचा दर्जा पुरुषाच्या तुलनेत कमी मानला होता. धर्माने स्त्रीला आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बल आणि स्खलनशील म्हणून घोषित केलं होतं. पाश्चिमात्य देशांतही पुरुषसत्ताक पद्धत होती; आणि त्या जीवनशैलीने स्त्री पुरुषांचे स्वभाव गृहीत धरून त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील भूमिकांची एकतर्फी वाटणी करूनही टाकली होती. तत्कालीन पाश्चिमात्य विचारवंतांच्या ‍‌मते पुरुष हे शक्तिशाली आणि विवेकाने विचार करणारे असतात. त्यामुळे त्यांनी  समाजाला आणि कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या वतीने निर्णय घ्यावेत. स्त्रिया मात्र दुर्बल आणि भावनाप्रधान असल्यामुळे त्यांनी जरा नमते घ्यावे आणि मुलांची देखभाल करणे वगैरेंसारखी कामे करावीत.
पंधराव्या शतकात क्रिस्तीन डी पिझान; सोळाव्या शतकात हेन्रिक कोर्नेलीअस अग्रिपा  आणि मोदेस्ता डि पोझो डि फोर्झी आणि सतराव्या शतकात मारी ल जास डि गुर्ने, फ्रान्झ्वा पुलेन डि ल बार आणि अॅब्रॅडस्ट्रीट यांनी स्त्रीहक्कविषयक लिखाण केलं, मात्र त्यांना प्रतिसाद तर मिळाला नाहीच, उलट त्यांच्यापैकी काहींवर पाखंडीपणाचे आरोप झाले. टीका तर सर्वांवरच झाली आणि त्यांच्याशी बऱ्याच लोकांनी संबंध तोडून टाकले. अजून शंभर वर्षानंतर मात्र पाश्चिमात्य स्त्रीवादाची सुरुवात समजलं जाणारं ‘अ व्हीन्डीकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन’ हे पुस्तक 1792 मध्ये मेरी वुलस्टोनक्राफ्ट हिने प्रकाशित केलं आणि स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम चा उदय झाला.  त्याकाळात अर्थातच एका मर्यादित व्याप्तीमध्येच स्त्रीहक्कांची चर्चा झाली. स्त्रीवादी लेखक किंवा लेखिकांचे लक्ष हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांकडेच जास्त प्रमाणात केंद्रित झाले होते. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांच्यावर नवऱ्याचा मालकी हक्क आहे, असे समजलं जाई. मात्र जास्त मोठ्या  प्रमाणात लढा उभारला गेला तो मतदानाच्या हक्कासाठी. सफ्रेज चळवळ त्यातूनच उदयाला आली. अर्थात एकोणीसाव्या शतकातही व्होल्तेरीन डि क्लेअर आणि मार्गारेट सेंगर यांसारख्या स्त्रिया आर्थिक, सामाजिक, लैंगिक आणि प्रजननाविषयक हक्कांसाठी लढत होत्याच, मात्र त्यांना तेवढे गांभीर्याने घेतले गेले नाही. एकूण लढा उभा राहिला तो मतदानाच्या हक्कांसाठी.
१९व्या शतकाची वैशिष्ट्ये
या शतकात स्त्रियांच्या हक्कांसाठीची चळवळ जोर धरत होती. ब्रिटनमध्ये व्हिक्टोरिया राणी ही स्त्री शासक होती. आणि ब्रिटनच्या इतिहासाने विशेष दाखल घेण्याइतकी कुशल शासक आणि प्रशासक होती. मात्र तिला हे स्त्रियांचे हक्क वगैरे फालतूपणा वाटत असे. स्त्रियांच्या चळवळीचा उल्लेख तिने आपल्या पत्रांमधून वेडेपणा, मूर्खपणा एवढेच नव्हे तर अगदी ‘पाप’ म्हणूनही केला आहे. याच काळात मार्गारेट फुलर हिने आपल्या पत्रकारितेतून आणि सुझान अॅन्थनि हिने लोकांना प्रत्यक्ष भेटून अमेरिकेत   स्त्रीहक्कांचा लढा सुरु ठेवलेला दिसतो. युरोपात  फ्रान्सेस कॉब ही आयरिश लेखिका त्यात आघाडीवर होती. १८४० मध्ये लंडन येथे गुलामगिरीच्या विरोधात एक जागतिक बैठक झाली. या बैठकीत ओळख आणि मैत्री झालेल्या ल्युक्रीशिया मॉट आणि एलिझाबेथ कॅडी स्टँटन यांनी १९ जुलै १८४८ रोजी  अमेरिकेत सिनेका फॉल्स येथे मार्था राईट, मेरी अॅन मॅकक्लिन्टॉक आणि जेन हंट यांच्या सहकार्याने एका जागतिक बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला २०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. ‘सिनेका फॉल्स कन्व्हेन्शन’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. यात स्त्रियांची  सामाजिक, नागरी आणि आणि धार्मिक स्थिती तसेच त्यांचे हक्क यांविषयी चर्चा झाली. ‘जगन्निर्मात्याने स्त्री-पुरुष दोहोंना समानतेने निर्माण केलं आहे’, हे तत्त्व मान्य केलं गेलं आणि स्त्री-पुरुष समानतेची मागणी अधिकृतरीत्या अस्तित्वात आली. दुसऱ्या दिवशी पुरुषांनाही या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी मिळाली आणि गुलामगिरी प्रथेचा कट्टर विरोधक असलेल्या आफ्रिकन अमेरिकन फ्रेडरिक डग्लससह तब्बल ४० पुरुष कन्व्हेन्शन मध्ये सहभागी झाले! एकूण १२ ठराव पास करण्यात आले, त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे ‘स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा’. या बैठकीची मोठ्या प्रमाणात टर उडवली गेली. अनेकांनी आपला पाठिंबा काढून घेतला. मात्र यानंतर अमेरिकन सफ्रेज चळवळ उदयास आली.
ब्रिटनमध्ये १९१८ मध्ये ३० वर्षांच्या वर वय असलेल्या आणि स्वतःच्या मालकीचे घर असलेल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हा हक्क २१ वर्षांवरील सर्वच स्त्रियांना देण्यात आला. अमेरिकेत हा हक्क १९२० मध्ये दिला गेला.
फर्स्ट वेव्ह
१९व्या शतकापर्यंत स्त्रियांना बाहेर काम करण्याची अधिकृत परवानगी नव्हती. टेनिसन सारख्या कविनेही आपल्या एका कवितेत “मॅऩ फॉर द फिल्ड अॅऩ्ड वूमन फॉर द हार्थ” असे शब्द वापरले आहेत. मात्र याकाळात झालेल्या या चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांनी नोकरी किंवा तत्सम काम करण्याचा हक्क मिळवला. हेसुद्धा अगदी सहजासहजी घडलं नाही. औद्योगिक क्रांती स्थिरावल्यावर युरोपात, विशेषत: ब्रिटनमध्ये, अनेक कारखाने निघाले. या कारखान्यांमध्ये कामगारांची गरज होती. तेव्हा पुरुषांनी आपली शेती विकून कामगार म्हणून नोकऱ्या मिळवल्या. त्यानंतर स्त्रियांनीही हळूहळू कापडगिरण्यांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. विसाव्या शतकात झालेल्या जागतिक युद्धात जेव्हा शस्त्रास्त्रांची गरज मोठ्या प्रमाणात  निर्माण झाली, तेव्हा शस्त्र कारखान्यांमध्ये स्त्री कामगार कामाला लागल्या. महायुद्धात असंख्य लोक मरण पावले आणि मनुष्यबळाचा प्रश्न प्रत्येकच विभागात निर्माण झाला. नाईलाज म्हणून स्त्रियांना नोकऱ्या दिल्या गेल्या आणि त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. १९१६मध्ये पहिली स्त्री पोलीस ब्रिटनमध्ये नेमली गेली. १९१७ मध्ये स्त्रियांची नौसेना आणि वायुसेना अधिकृतरीत्या अस्तित्वात आली. १९१९ मध्ये लिंगाधारित अपात्रता निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला आणि १९२२ मध्ये पहिली स्त्री सॉलीसिटर आणि पहिली चार्टर्ड सर्व्हेअर ब्रिटनमध्ये बनली. मात्र ब्रिटीश आर्मीत स्त्रियांची स्वतंत्र शाखा अस्तित्वात येण्यासाठी १९३८ साल यावं लागलं.
या सर्व घडामोडींचा आणखी एक परिणाम असा  झाला की पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन निवळू लागला, बदलू लागला आणि स्त्रीसुद्धा आपल्या बरोबरीने कर्तृत्ववान असू शकते यावर त्यांचा थोड्याफार प्रमाणात का असेना, विश्वास बसू लागला.   
१९व्या शतकाचा शेवट आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा स्त्रीवादाच्या संदर्भात फर्स्ट वेव्ह म्हणून ओळखला जातो.
स्त्रीवादी साहित्य आणि समीक्षा (सेकंड वेव्ह):
१९२९मध्ये व्हर्जिनिया वुल्फ ने ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ ह्या दीर्घ निबंधाच्या माध्यमातून स्त्रीवादी साहित्यिक दृष्टीकोन मांडला. एखाद्या स्त्रीला प्रतिभेची देणगी असली आणि शिक्षणाच्या हक्कापासून तिला वंचित ठेवलं गेलं तर तिची प्रतिभा फुलणार नाही, उलट कोमेजून जाईल, असं तिनं या लिखाणात म्हटलं. त्यासाठी तिने शेक्सपिअरची बहीण ज्युडिथ हे काल्पनिक पात्र निर्माण केलं आणि “तीही प्रतिभासंपन्न होती, मात्र शिक्षण आणि संधी यांच्या अभावामुळे तिची प्रतिभा लोकांसमोर आलीच नाही”, असा युक्तिवाद केला. ही स्त्रीवादी समीक्षेची नांदी ठरली. पुढे १९४९ मध्ये सिमॉन डी बूव्हॉ या फ्रेंच लेखिकेने ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्रीवादाच्या इतिहासाचा आढावा घेतला. त्याचबरोबर स्त्रीवादाची मूलतत्त्वे एकत्रितपणे मांडण्याच कामही केलं. ही लेखिका एक्झीस्टनशिअलिस्ट असल्याने तिच्या मते अस्तित्व आधी येते आणि मग त्याचे सारभूत तत्त्व. त्यामुळे तिच्या मते “स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर जन्माला आल्यानंतर ती स्त्री बनते. (किंवा तिला स्त्री म्हणून जाणीवपूर्वक घडवलं जातं)” ह्या लिखाणापासून स्त्रीवादाच्या सेकंड वेव्ह ची सुरुवात झाली असं मानतात.
नंतर सिल्व्हिया प्लाथ, बेट्टी फ्रिडन,  शुलामिथ फायरस्टोन, जर्मेन ग्रीअर, ग्लोरिया स्टायनम, आन्जेला डेव्हीस, मार्गारेट अटवूड यांसह अनेक लेखिकांनी स्त्रीवादी साहित्याची निर्मिती केली.
ब्लॅक फेमिनिझम (थर्ड वेव्ह)
स्त्रीवादाची थर्ड वेव्ह सुरु झाली ती १९८०च्या दशकात ग्लोरिया अन्झाल्डूआ, बेल हूक्स, चेला सॅन्डोव्हाल, चेरी मोरागा, ऑड्रे लॉर्ड ह्या कृष्णवर्णीय स्त्रीवादी  नेत्यांच्या माध्यमातून. त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याच्या मागणीसोबतच  वांशिक भेदभावाविरुद्ध ही आवाज उठवला. आणि वांशिक भेदभाव हा स्त्रीस्वातन्त्र्याला कसा मारक आहे याचा आपल्या भाषणातून प्रचार केला.
पाश्चिमात्य स्त्रीवादाचे प्रकार
उदारमतवादी स्त्रीवाद, कट्टर (रॅडिकल) स्त्रीवाद, व्यक्तिवादी स्त्रीवाद, कृष्णवर्णीय स्त्रीवाद असे अनेक उपप्रकार  पाश्चिमात्य स्त्रीवादात आहेत. कट्टर स्त्रीवादी पुरुषांचे अस्तित्वही सहन करू नये या मतापर्यंत टोकाला जातात आणि विवाहित स्त्रिया या दगाबाज आहेत अशी मते व्यक्त करतात. तर उदारमतवादींचा शांततापूर्ण सहअस्तित्वावर  विश्वास आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाहीत आणि स्त्री-पुरुष सारखेच कर्तृत्ववान आहेत यावर त्यांचा विश्वास आहे. संधीसाठी स्त्रिया  पुरुषांवर मुळीच अवलंबून नाहीत. त्या आपल्या संधी स्वतः निर्माण करू शकतात, असे उदारमतवादी मानतात. भारतीय स्त्रीवादाची प्रेरणाही यातूनच आली आहे.
एकूण काय, स्त्रीवाद म्हणजे स्त्रीत्वाचा संपूर्ण त्याग करून पुरुषीपणा करणे नाही, किंवा पुरुषांचे अस्तित्व सहन न होऊन त्यांना शत्रू मानणेसुद्धा नाही. आपले स्त्रीत्व हे आपले वैशिष्ट्य आहे हे समजून आपल्या हक्काची जाणीव ठेवणे, विकृत मानसिकतेविरुद्ध आवाज उठवणे, समानतेची मागणी करणे आणि त्याप्रमाणे वर्तन करणे हा खरा स्त्रीवाद!

Thursday, March 7, 2019

आठवणींचं साठवण

फडके सरांचा फोन म्हणजे उत्साहाची नवी लाट।माहितीचा नवा साठा।हास्याचं नवं कारंजं।ही विशेषणं खरी ठरवतच ते नेहमीप्रमाणे अघळपघळ बोलले नि  म्हणाले "ये भेटायला ।मग मी पुण्याला जातोय।रविवारी"
        "परत केव्हा येताय सर ?त्यानंतर येईन भेटायला",मी सहज म्हणाले तसे सर भरल्या आवाजात म्हणाले " आता ते नाही ठाऊक पोरी।रविवारी जातोय दोघंही एवढ़ंच ठाऊक।"
         हा धक्काच होता ।सर अकोला सोडून जातायत की काय? माझ्या मनातला प्रश्न कळल्यासारखं सर म्हणाले"अगं ऐंशी वर्ष पूर्ण झाली आता ।पोरं तिकडे पुण्यात, आम्ही दोघं म्हातारे इथे ।काही दुखलं खुपलं की धावत यावं लागतं मुलांना।ते नाही म्हणतात गं आता एकटं रहायला"।
        मी फोन ठेवला आणि सरळ कपडे बदलून निघाले।बोटावर मोजण्यासारखी श्रद्धास्थानं उरलीयत आजकाल।त्यात एक म्हणजे फडके सर।जुन्या पिढीतले शिक्षक।ते अकोला सोडून जाणार असतील तर त्याआधी एकदा भेटायलाच हवं।चार शहाणपणाच्या गोष्टी चार मार्गदर्शक गोष्टी हव्या असतील तर जायलाच हवं, म्हणत मी गाडीची किल्ली हातात घेतली।आणि अचानक वाटलं की रिकाम्या हाती कसं जाऊ? एखादी वस्तू तरी न्यायला हवी ,ज्यामुळे त्यांना माझी आठवण राहील।आता काय द्यावं सरांना?चार दोन वस्तूंची नावं आठवली आणि त्याच वेगानं रदद् ही झाली।तेवढयात लक्षं गेलं' रावणायन' नावाच्या पुस्तकाकडे।पंधरा दिवसापूर्वी मीच माझ्यासाठी घेतलेलं आणि अजून वाचायला सुरुवातही न केलेलं।विचार केला सरांना आवडेल हे।
                  गेले।सरांशी भरपूर बोलणं झालं । निघताना मी त्यांच्या हातात पुस्तक ठेवत म्हणाले,"माझी आठवण म्हणून हे आणलंय तुमच्यासाठी।"
            "बरं झालं।पुस्तक आणलंस ।नाहीतर तुझी आठवणच आली नसती मला अजिबात",असं म्हणत सर डोक़्यावर टपली मारत गडगडाटी हसले।"अकोल्याचा हालहवाल कळवत जा गं।विशेषतः पावसाचा ",असं म्हणत त्यांनी निरोप दिला।
             मी घरी आले । सरांच्या अनेक आठवणी मनात गर्दी करुन होत्या ।ते अर्थशास्राचे प्राध्यापक नि नामांकित महाविद्यालयाचे विभागप्रमुख होते।पण त्याबरोबरच ते उत्तम वाचक आणि  प्रभावी वक्ता होते ।साहित्य,नाटय,काव्यापासून रामायण महाभारतापर्यंत कुठल्याही विषयाचं वावडं त्यांना नव्हतं ।मराठी इतकंच इंग्रजीवर प्रभुत्व होतं।ऐकणाऱ्याला खिळवून ठेवण्याची ताकद होती।नाटकात कामं सुद्धा केलेली त्यांनी।गोरापान रंग ,धारदार नाक,आरपार वेध घेणारे घारे डोळे ही त्यांच्या लोकप्रियतेमागची खरी दौलत।अजूनही रोज सात वर्तमानपत्रं घेऊन ती बारकाईनी पूर्ण वाचणारा,ऐंशीच्या घरातला मी पाहिलेला हा एकमेव माणूस।निवृत्ती नंतर तक्रारीचे पाढ़े न वाचता, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना निःशुल्क मार्गदर्शन करणारे सर म्हणजे कुठलेसे साधक किंवा ऋषीच वाटायचे।एकदा "माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा"म्हणून मी महाविद्यालयात बोलावलेलं त्यांना।तर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची यादी नि स्वतः तयार केलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेच्या शंभर कॉपी घेऊनच आले ते।"नुसतं बोलून काय उपयोग?डेमो नको द्यायला?",असं म्हणत सोडवून घेतले पेपर मुलांकडून ।दोन तास सलग उभं राहून बोलले,तेही माईक शिवाय।

           सरांच्या  अशा आठवणी काढतच आठ दिवस गेले नि परत सरांचा फोन आला।खुशालीचं बोलणं घाईनी संपवत सर म्हणाले"रावणायन संपलं बरं वाचून।मस्तच आहे ।मला माहीत नसलेल्या खूप गोष्टी होत्या त्यात । तू वाचलंस की नाही?"
     "  नाही"म्हणताना माझाच आवाज शरमेनी अगदी खाली आला।
      " अगं,वाच वाच।तुला गंमत सांगतो ,मला पुस्तकाच्या लेखिका इंद्रायणी सावकारांचा फोन नंबर मिळाला त्यात।मी  फोनही केला त्यांना।विचारलं त्यांना ,की वाल्मिकी रामायणात - तुलसी रामायणात  नसलेल्या कितीतरी गोष्टी तुमच्या पुस्तकात आहेत।त्या कुठे वाचायला मिळाल्या? तर स्वाती, त्यांनी इतके संदर्भ दिले! अर्धा तास बोलत होत्या त्या।अनेक पुस्तकं, अनेक अभ्यासकांचे निष्कर्ष,सगळं भरभरून सांगितलं त्यांनी।ऐंशीच्या पुढे आहेत त्या बाई ,पण थकवा म्हणून नाही आवाजात ।विचारत होत्या की मला कुठे मिळालं पुस्तक त्यांचं म्हणून ,तर सांगितलं मी की माझ्या चिमुकल्या मैत्रिणीनी भेट दिलंय म्हणून।तू ही वाच हं परत मिळवून ते।"
          सरांनी आणखी काही बोलून फोन ठेवला।पण माझी मलाच लाज वाटायला लागली,की पुस्तक आणून पंधरा दिवस झाले,मी ते उघडलंही नाही।सर ते बारकाईनी वाचून फोन नंबर घेऊन आपल्या शंकांबाबत लेखिकेशी बोलून मोकळेही झाले।त्यांचा या वयातला हा उत्साह, ही अभ्यासू वृत्ती,हे कुतूहल नि मला सगळं कळवण्याचा आनंद ,यातलं अंशमात्र तरी घेता येईल  का मला त्यांच्याकडून?ते नेहमीच मला छोटीशी मैत्रीण म्हणतात।पण ती योग्यता आहे का माझी?माझी आठवण म्हणून मी पुस्तक दिलं खरं त्यांना ,पण त्या पुस्तकानी सरांच्या आठवणींचं साठवण केलं माझ्या मनात।कायमचंच।
           पुन्हा सरांचा फोन येण्याआधी
" रावणायन"शोधून वाचणे आहे।आहे का कोणाकडे????

Monday, March 4, 2019

अनपेक्षित

11फेब्रु. 2019!  हा दिवस आणि ह्या दिवसाची संध्याकाळ माझ्यासाठी जीवघेणी ठरली.अचानक, ध्यानी मनी नसताना तो अपघात झाला.  गेल्या वेळी  मी हळदी कुंकू आणि बरंच काही ह्यावर लेख लिहिला होता. पण हळदी कुंकूची सांगता अशा तऱ्हेने होईल हे स्वप्नात देखील वाटले नव्हते. असो.  हळदी कुंकू चे निमित्त मात्र झाले. बरं गाडी मी स्वतः चालवत नव्हते ,गाडी माझी स्वतःची नव्हती की चालवणारी व्यक्ती माझी कुणी आपली होती. तरीही,किंबहुना,म्हणूनच झाला असावा. ध्यानी मनी नसताना होतो,त्यालाच "अपघात" म्हणतो ना आपण? जाणून बुजून केलेला तो "गुन्हा" असतो.
आता अपघात कसा झाला,कुणाच्या चुकीमुळे झाला? जर असं केलं असतं तर,जर तसं  नसतं  केलं तर;--- हे सगळे प्रश्न आणि शंका नंतर निव्वळ निरर्थक ठरतात. स्वतःच्या समाधानासाठी आणि चर्चे पुरताच उरतात.

खरं सांगू,एरवी छोट्या छोटया गोष्टीनीही विनाकारण(न पटणाऱ्या अर्थात) चिडचिड करणारी मी, ह्या प्रसंगी इतकी शांत कशी राहू शकले,इतक्या संयमाने त्या वेदना कशा सहन केल्या त्याचं स्वतःलाच नवल वाटतंय. इतका जबरदस्त मार बसला,माझ्या एकुलत्या एका भाची च्या लग्नाला मी हजर राहू शकले नाही,ह्या कुठल्याच गोष्टीचा मी  मनस्ताप करून घेतला नाही. 
 कुणावर राग  नाही,देवाला वा दैवाला दोष देणं  नाही किंवा कुणावर खापर  फोडणं  नाही---- हे असं होणारच असावं, उलट जीवावरच हातावर निभावले ह्या निष्कर्षाप्रत येऊन माझी   धावती विचारधारा थांबत असे,अजूनही.
 थोडक्यात स्वभावा च्या विरुद्ध हा अपघात अगदी सहजतेनं स्वीकारला ,ह्याचे नवऱ्याने देखील कौतुकच केले.

     पण ह्या अपघाताने बऱ्याच गोष्टींची जाणीव करून दिली ,हे मात्रं नक्की. एरवी  मोठमोठं त त्वज्ञान झाडणारे आपण,स्वतःवर वेळ आली की कशी अवस्था होते,,ते कळलं.आपला एक हात काही काळापुरता निकामी झालाय ह्या भावनेने किती असहाय वाटलं  मला? आता किमान 2 ते 3 महिने पूर्णपणे परावलंबी असावे लागणार हा अपराधी भावही मनात दाटून आला. पण मग ज्यांचे दोन्ही हात,दोन्ही पाय,कधी शरीराचा अत्यंत  महत्वाचा अवयव जेव्हा जन्मतः च अपंग असतो वा अपघाताने होतो,ती माणसं कसं आयुष्य जगत असतील? कुठल्या  मनो बळाच्या जोरावर,कोणत्या आंतरिक प्रेरणेने जीवनाचे पुढील मार्ग शोधून काढत असतील?
त्यावर यशवीपणे मात देखील करत असतील?
 आपल्याला किमान खात्री तरी असते की आपला तात्पुरता निकामी अवयव कालांतराने ठीक होणारच आहे; पण  कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या व्यक्ती स्वतःला ह्यातून  कशा बाहेर काढत असतील?
Hats off to all them, the gr8 पेर्सनॅलिटीज. आज मी 5/6 वर्षांपासून लिखाण करतेय. माझ्या शेकडो लेखातून  मी सकारात्मकतेची शिकवण  देत आले आहे;  पण प्रत्यक्षात,स्वतःवर वेळ  आली की कळते हे वाटतं तेवढं सोपं नसतं, हे ह्या अपघाताच्या निमित्ताने   लक्षात आलं. कधी कधी तर वाटतं, ज्यांना आयुष्यात कधीच त्याग,समर्पण ह्या गोष्टींना सामोरे जावे लागले नसेल,तेच ह्या शब्दांचे बुडबुडे प्रभावी पणे   फेकत  असावेत.  
भरल्या पोटी तत्वज्ञान सांगणे केव्हाही सोपेच असते.असो.
दुसरं म्हणजे ह्या अपघाताने शरीरावर जरी "आघात"  केला असला तरी मनावर मात्रं हळुवार फुंकर घातल्या गेली,माझ्या जिवलगांकडून. कुणाकुणाची नावं घेऊ? 
सर्वात प्रथम आमचे धाकटे चिरंजीव. माझा समीर. साधारण 7.30 च्या जवळपास अपघात झाला होता. माझ्या नवऱ्याने म्हणे 8.30 वाजता त्याला फोन केला. त्यावेळी तो गोरेगाव ला होता. तिथून खारघर ला रूम वर जाऊन बॅग घेऊन,सरळ C S T  गाठलं आणि 12 च्या ट्रेन ने अक्षरशः  जनरल डब्व्यात बसून सकाळी थेट हॉस्पिटल मध्ये. मला बघून त्याच्या डोळ्यात जे भाव दिसले,ते मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तब्बल 15 दिवस हा वेडा मुलगा सतत माझ्या अवती भवती होता. जातीनं लक्ष देऊन जेवायला वाढणं,प्रसंगी जेऊ घालणं,वेळेवर औषधं देणं, आणि घर आणि हॉस्पिटलच्या चकरा, तेही न कंटाळता,न वैतागता. 
मला अपघात झाला ही बातमी मेधा कडून प्रचिकडे,प्राची कडून दीप्ती कडे,अशी वाऱ्याच्या वेगाने पसरली. 
रात्री दीप्ती आली आणि अक्षरशः एक शब्दही न बोलता,न विचारता  फक्त डोक्यावरून हात फिरवत राहिली,कितीतरी वेळ.
त्या स्पर्शात काय नव्हतं? मनीषा घरून ब्लॅंकेट घेऊन आली आणि कुडकुडणाऱ्या देहाला तिच्या प्रेमाच्या उबेचं पांघरून मिळालं. 
जाताना जेव्हा जवळ येऊन गालाची पप्पी घेऊन गेली,तेव्हा आपण परत लहान मूल असल्याचा भास झाला
" माणिक ताई, अजिबात बोलू नकोस काही. आराम कर." मोहिनीच्या नजरेतील आश्वासक भाव धीर देऊन गेले. 
मंजुषा,प्राची,विद्या,मेधा ह्या वात्रट😘😘 मैत्रिणींच्या फनी गप्पा हॉस्पिटल च्या रुक्ष वातावरणात  चेहऱ्यावर हास्य फुलवून गेल्या. प्राचीची तळमळ आणि तगमग तिच्या प्रत्येक हालचाली तून जाणवत होती. जखम मला झाली होती पण वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. 
Operation च्या दिवशी शेफाली मध्ये पूर्णपणे अडकलेली असूनही  स्वतः डबा घेऊन हजर असलेली सुनीता,सकाळी 6.30 वाजता walking हून येताना निव्वळ  चाहूल घेण्यासाठी 3 मजले चढून येणारी दीप्ती,घरी गेल्यावर तुझी वाचनालयाची पुस्तके बदलण्याची जबाबदारी माझी ग,म्हणून स्वतःला माझ्यासाठी "डिलिव्हरी गर्ल" म्हणवून घेणारी प्रतिभा,घरी भेटायला येताना माझा सोमवारचा उपवास लक्षात ठेवून खारीक,बदामाची खीर करून आणणारी मेधा,हॉस्पिटल मध्येही नाश्ता जेवणासाठी जबाबदारी घेणाऱ्या माझ्या गोड मैत्रिणी---- 
नावं तरी कुणाकुणाची घेऊ? ज्या काही अपरिहार्य कारणामुळे  भेटायला येऊ शकल्या नाहीत त्यांच्या,प्रत्यक्ष भेटून ,फोन वर चौकशी करून  आपुलकी दर्शवणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याची  जाणीव झाली,जी फार सुंदर होती. 
काही लागलं तर हक्कानं सांग म्हणणारे,आणि काहीच न सांगताही हक्कानं करणारे भेटले. 
Discharge मिळाल्यानंतर पटेल भाभी नी तब्बल 8 दिवस दोन्ही वेळचा टिफिन पाठवला. तर कधी रुबी भाबिनी गरम गरम नाश्ता. माझी राधा  तत्काळ तिकीट करून 3 दिवस येऊन गेली. जमेल तशी माझी सेवा करून गेली. 
खरं तर "सेवा" हा शब्द फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी असतो.आपल्या माणसांची जवळीक,भावनिक आधार हे सगळ्यात महत्त्वाचं.

समीर झाल्यानंतर म्हणजे तब्बल 27 वर्षा नंतर हॉस्पिटल,injections, सलाईन ,औषधं, ह्या सगळ्याला सामोर जायची वेळ आली. एकीकडे वेदना,बांधलेल्या हाताचं व बंधन तर दुसरीकडे सक्तीचा आराम आणि लाड,कौतुक  करून घेण्याची छान संधी---  पण माणसाला नेमके काय हवे असते तेच कळत नाही. आता ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडायचे आहे. आणि ते मी पडणारच,अर्थात. ह्या कठीण दिवसात जे आपलेपणा चं टॉनिक मिळालं आहे,ते  आता आयुष्यभर पुरणार आहे. त्यात सगळ्यात मोठी साथ आहे ती माझ्या जोडीदाराची. ज्याचं जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. कारण लग्न झाल्यापासून जी व्यक्ती खऱ्या अर्थाने माझ्या  प्रत्येक सुख दुःखात सहभागी झालेली आहे,तिचा उल्लेख करून तिचं माझ्या आयुष्यातील स्थान कमी करू इच्छित नाही. खऱ्या अर्थानं सहजीवनाचा उपभोग,आनंद घेतला आहे. असो. 
    एकंदरीत हा अपघात म्हणचे माझ्या साठी ऊन-पावसाचा खेळ ठरला,असे म्हणायला हरकत नसावी.