Tuesday, February 5, 2019

रोपण





"दिवस आता मोठा होतोय, नाही का?" असं कालच कुणीतरी म्हणालं. हो आहे खरं तसंच काहीसं... ऋतु बदलतोय. हळूच कड फेरल्यासारखा दिवसागणिक थोडाथोडा बदल होतोय. कडाकडा वाजणारी थंडी चोरपावलांनी बाहेर जातेय. संधीप्रकाशाची अलीकडची वेळ थोडी पलीकडे गेली आहे, असं वाटतंय. बदल आपल्याला जाणवतोय.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. ते एक निसर्गचक्र आहे. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा नि पुन्हा उन्हाळा! क्रमानुसार बदलत राहतातच. या निसर्ग बदला मागची शास्त्रीय कारणं काहीही असोत पण साहित्यिकांनी मात्र निसर्ग बदलाच्या या वास्तवात आपल्या कल्पनांचे रंग भरलेले दिसतात.  
कधी प्रेमाच्या अनावर ओढीनं धो धो कोसळणारा मेघ त्यांना दिसतो. तर कधी जलद भरून निघालेल्या अनिलगणांची कल्पना त्यांना भारून टाकते. शतकानुशतकाला उरून पुरेल असे पृथ्वीचे प्रेमगीत ते उतरवतात. धरतीवर पसरलेली हिरवीकंच शाल त्यांच्या नजरेला दिसते तसंच आईची माया धरतीच्या रूपात लेखणीतून प्रकटते. प्रत्येकाची आपली अशी कल्पना शक्ती! मराठी असो अथवा इतर कोणतीही भाषा प्रत्येकीत असे प्रतिभेचे पंख ल्यायलेले शब्दपक्षी भरारी मारताना दिसतात. कधी ते आधुनिक असतात तर कधी त्याला पारंपारिक लोककथांची जोड असते. निसर्गातील घटितांवर मानवी भावनांचे रोपण केलेले त्यात दिसते. जसं समुद्राच्या किना-याकडे झेपावणा-या लाटा विशिष्ट प्रकारचा आवाज निर्माण करतात. ज्याला 'गाज' म्हटलं जातं. लाटा किना-यांवर आदळणं नि निर्माण होणारा आवाज...ही निसर्गक्रिया! पण झुलू दंतकथा सांगते की, "ओंजळीत सूर्य घेऊन हेलकावे खाणारी शापभ्रष्ट चंद्रदेवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. या चंद्रदेवतेचं गाणं म्हणजे सागराचा निनाद! समुद्राची गाज!मानवी भावनांचं व्याकुळ रूप या निसर्गक्रियेला दिलेलं दिसतंय.
अशा अनेक कथा विविध भाषासंस्कृतीत पानोपानी सापडतात.
 वास्तवाला भावनांची किनार लाभलेल्या या लोककथा! नदीप्रमाणं प्रवाही! सृष्टी जीवनाची मूल्ये जपणा-या!  लोककथांचा स्वभाव एवढा लाघवी व लवचिक असतो की त्या विविध देशात, निरनिराळ्या प्रदेशात तिथले स्थानिकरूप धारण करून रूळतात. ओठांवर विसावतात नि मनामनात स्थान मिळवतात.
दिवस आता मोठा होतोय, नाही का?' हे कुणीतरी म्हणालं आणि लक्षात आलं की आता उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागतेय. त्या पाठोपाठ लगेच आठवली दुर्गा भागवतांच्या पुस्तकात वाचलेली ग्रीक लोककथा. त्याकथेनं निसर्ग चक्र सांगितलं आहे पण त्यासाठी कारण मात्र, शास्त्रीय नव्हे तर मानवी भावनांचं शोधलं आहे. ती कथा साधारण अशी आहे, "पूर्वी पृथ्वी बाराही महिने हिरवीगार अनेक रंगांनी नटलेली होती. या भूदेवतेची, डिमीटरची आणि देवांचा राजा झ्यूस (ज्युपीटर) यांची तरूण सुंदर मुलगी पर्सेफोन (काही ठिकाणी तिचा उल्लेख 'प्रासरपिना' असाही आहे). एक दिवस पाताळाचा राजा प्लुटोच्या ती नजरेस पडते. त्या सौंदर्यवतीचं तो अपहरण करतो. डिमीटर चिडते. सारी सृष्टी नापिक ओसाड करते. हे संकट टाळण्यासाठी झ्यूस प्लुटोला राजकन्येला सोडून देण्याची आज्ञा करतो. पण दरम्यानच्या काळात लग्नसंबंध निश्चित करणारे डाळिबाचे दाणे ती खाते. आता काय करावे? नवरा की आई? पेच निर्माण होतो. मग असा तोडगा निघतो की पर्सेफोनने आठ महिने आई जवळ आणि चार महिने नव-याजवळ रहावे. त्यामुळे ती जेव्हा आईजवळ असते त्याकाळात पृथ्वी आनंदानं डोलत असते आणि जेव्हा ती नव-याजवळ असते तेव्हाच्या चार महिन्याच्या काळात व्यथीत भूदेवता मलूल दिसते."
उन्हाळा-हिवाळा-पावसाळा या ऋतूची वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याला आईमुलीतील भावबंधाचा कथाभाग यात जोडण्यात आला आहे. ही ग्रीक लोककथा आहे पण आपल्या भारतीय कथा सुद्धा अशाच निसर्ग घटितांवर मानवी भावनांचं रोपण करणा-या आहेत.   "सूर्यदेवाच्या प्रतारणेमुळे देहत्याग केलेली प्रणयिनी आणि तिच्या राखेतून उगवलेले रोपटे...जे रात्री फुलते. सुगंधाची बरसात करते पण सूर्य उगवला की मोतीपोवळ्याचे सुगंधी पुष्परूप धरणीवर अश्रू सोडीत राहते. प्रेमाची सुकुमारता, शुभ्रवर्ण शुचिता आणि प्रणयाच्या रक्तवर्ण व्यथेची आरक्तता असणारी ही नाजूक फुलं असतात. पण केवळ पहाटेच्या, सकाळच्या वेळेतच. सबंध दिवस ते झाड रूक्ष नि कळाहीन होऊन उदासवाणं उभं असतं. ते झाड म्हणजे पारिजात!"  चढत्या दिवसा बरोबर मलूल होणारी पारिजातकाची फुलं लक्षात घेऊन कोणीतरी रचलेली ही कथा...वर्षानुवर्षे लोकांच्या ओठावर रूळलेली...थोडेफार संदर्भ बदललेत तरी मूळ आशय तोच ठेवून या लोककथा वाहात असतात. देशप्रदेशाच्या सिमांची बंधनं नसतात. भाषा भिन्नत्वाची अडचण नसते. एकीकडची कथा दुसरीकडे चटकन सामावते. कारण त्यात निसर्ग लोकभावनेचं रूप घेऊन येतो म्हणून परका न वाटता आपला वाटत असतो.
निसर्गचक्रावरून सुरू झालेलं विचारचक्र सुसाट धावत सुटलंय. पण भान ठेवत ते कुठेतरी थांबवायला हवं. तेव्हा, जाताजाता एक गोंड उखाणा सांगते आणि थांबते..."दो बहिना उनका जुड गया हेत, दो बहिनों के पेट मे लडका एक"
उत्तरासाठी माहित असावी लागते आकाश आणि समुद्र यांची शिंपली...नि त्या शिंपलीतला मोती...!

No comments:

Post a Comment