Thursday, February 14, 2019

गोवा डायरी- भाग २

इतकं दमून झोपल्यावरही साडेपाचला टक्क जाग आली आणि डोळ्यापुढे समुद्र दिसायला लागला. तीन तारांकित रेसॉर्ट मधला व्हिला असला तरी तिघी, चौघींनी मिळून एक एक खोली शेअर केल्याने प्रसाधनगृहासाठी नंबर लावावे लागणार होते. एकदम होस्टेलचे दिवस आठवले पण तेव्हा साडेतीन मिनीटात आवरुन व्हायचे. त्यातल्या त्यात झटपट आवरुन बाहेर येते तर माझ्या गुणी मैत्रिणीने कॉफी मेकर वापरुन कॉफी तय्यार ठेवली होती. एरवी आपल्या ठराविक ’ब्रँड’ बद्दल आग्रही असणारी आणि पहिल्या धारेची (दुधाची हा) कॉफीच्च पिणारी भाग्यश्री पण मिटक्या मारत ती कॉफी पीत होती. तयार होऊन आम्ही मोती साबणाच्या जाहिरातीसासारखी ’उठा उठा सकाळ झाली, समुद्रावर जायची वेळ झाली’ करत सगळ्यांची दार ठोठावली. रात्री कंबरदुखीने हैराण असल्याने ’जमलं तर येईन बॉ’ म्हणणारी मीनल सर्वात पुढे. तिची सेवा करुन दमून झोपलेल्या मैत्रिणी बिचार्‍या नंबर लावून आतच. आरतीने तर झोपेतून ’मै कौन हूँ, कहा हूँ’ टाईप लुक दिला त्यामुळे अखेर पहिली टीम सिंक्यूरिम बीचच्या शोधात बाहेर पडली.

मस्त गार वारं होतं. रस्त्यात कुणीच नव्हतं म्हणजे कुत्रं सुद्धा नव्हतं असं मात्र नाही. समोरच्या ’स्पा’ जवळ अचानक काही कुत्री अंगावर आली आणि आम्हाला पळता भुई थोडी झाली. आमचे नवे बीचवेअर हे आता फाडतात की काय या कल्पनेने आमची सटारलीच होती. त्यातल्या त्यात शूर पल्लवीला तिच्या ’टोबो’ची सवय असल्याने ती विशिष्ट भाषेत त्यांना चुचकारू लागली. तिच्या मागे लपत चालेतो एकदाची कुत्री भुंकायची थांबली, रस्ता अजूनही रिकामाच. रात्री नाचून गाऊन पहाटे झोपणारं गोवा, हे सकाळी उशीरा उठणारं राज्य आहे हे दिसलंच. ’बस दो सौ मीटर’वर सांगितलेला बीच प्रत्यक्षात पाचसहाशे मीटर तरी लांब होता. वाटेत व्यवस्थित पाट्या असल्याने सहजपणे बीचवर पोचलो. उत्तर गोव्यातला हा बार्डॆझ भाग. डाव्या बाजूला टाटा कंपनीचा ’दर्या किनारी एक बंगलो’, मधे लाल मातीचा खडबडीत रस्ता आणि उजवीकडे खाली वळणं घेत पसरलेला जवळपास निर्मनुष्य, स्वच्छ, लखलखता सिंक्यूरिम बीच. एक गोवन कोळी तेवढा समुद्रात आत शिरुन मासे पकडत होता. पुरतं उगवलंही नव्हतं. पाठीमागे सिंक्यूरिम किल्ला दिसत होता.

Experience Seekers, Nirvana Seekers ,Party Animals साठी विशेष प्रसिद्ध, असं या बीचबद्दल वाचलं होतं. आम्ही फक्त यातल्या पहिल्या विभागात बसणारे. विदर्भात तीन, चार दिवसांनी पाणी आलं की ते भरण्यासाठी वेळेची, माणसांची सेटिंग करणारी आम्ही रूक्ष मंडळी. दुबईचे शेख मुंबईचा पाऊस पाहायला येतात तसं, इतक्या दिवसांनी हे एवढं, पार क्षितीजापर्यंत पसरलेलं फेसाळतं पाणी पाहून अक्षरश: हरखून जायला झालं.
’फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे’
हे नजरेत साठवेतो दुसरी टीम पण येऊन पोचली. मग मात्र मऊ रेती आणि लाटांबरोबर मस्ती सुरु झाली. किनार्‍यावरच्या बंद शॅक्ससमोर रिकाम्या खुर्च्या तशाच पडलेल्या होत्या. त्यावर बसून, पाण्य़ात पाय नाचवून, आदिवासी पद्धतीने कमरेत हात गुंफून, ट्रस्ट वॉक करताना (डोळे बंद करून मैत्रिण नेईल तिकडे समुद्रात चालत राहायचे) असे सुचतील तसे अनंत प्रकारचे फोटो काढून झाले. ’गोव्याला जातेय’ असं सांगून ऑफीसमधून रजा मिळणे शक्य दिसत नसल्याने शीतलने इमोशनल टच देत ’गावी जातेय’ असे सांगितले होते. त्यामुळे ती दर फोटोला गयावया करून ’ए हा फेसबुकला टाकू नका गं’ असं ओरडायची. शेवटी आम्ही काही फोटो ’हा फेसबुकसाठी :-) गं’ असे म्हणून तिलाच काढायला लावत होतो. नंतर ’टाक गं बिनधास्त, मात्रा चुकली ऑटोटाईपमुळे, असं सांग’ वगैरे सल्ले देऊन झाले.

आता आमचा मोर्चा बीचकडे तटस्थपणे बघत उभ्या असलेल्या सिंक्यूरिम किल्ल्याकडे वळला. या किल्ल्याच्या तटबंदीमुळे लाटांचा आवेग काहीसा रोखला जातो, कदाचित त्यामुळे पाण्यातल्या चित्तथरारक खेळांसाठी बीचचा हा भाग सुरक्षित मानला जात असावा. पाट्यांवर लिहिलेले खेळांचे दर जास्त वाटले. पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग करायचे का, यावर अगदीच माफक चर्चा झाली पण कोणी फारसा उत्साह दाखवला नाही. ’आधीच नवराबिवरा बरोबर नाही. उगाच अतिउत्साहात दोरी तुटून समुद्रात पडलो बिडलो तर काय घ्या, विकतचा ताप’ वगैरे विचार बहुतेकींच्या मनात तरळून गेले असावेत. त्यामुळे सगळ्य़ांनी एकमेकींकडे पाहत, हसत, नको, नको अशा माना हलवल्या. मुळात तेव्हा, इतक्या सकाळी सगळे खेळ बंदच होते. मला आमच्या अलिबाग ट्रीपची आठवण झाली. बनाना राईड म्हणजे केळ्याच्या आकाराच्या फुग्यावर एकमेकांना धरुन बसायचे आणि ते गदागदा हलवून आपल्याला पाण्य़ात पाडणार मग जीव खाऊन ओरडायचे. आम्ही एक मॅट राईड का काय केली होती, वॉटरस्कूटरच्या मागे एक चटई दोरीने बांधलेली, त्यावर पालथे पडून स्कूटरच्या दिशेने असलेला दांडा घट्ट धरायचा. मग ती स्कूटर ते रोरावत पाण्यावरुन फिरवणार आणि मागचे चटईस्वार त्यांच्यामागून फरफटत, भेलकांडत, बोंबा ठोकत बेफाम वेगाने लाटांवरून फिरणार. किनार्‍यावर सुखरूप आणून पटकल्यावर मात्र पाण्य़ाच्या सपकार्‍यांनी आणि भन्नाट वार्‍याने लालबुंद झालेल्या डोळ्यातलं पाणी पुसत सगळे चटईस्वार एकमेकांना ’ हॅहॅहॅ काय मज्जा आली ना’ असं अवसान आणून म्हणणार. बापरे, मला आठवणीनेच काटा आला. अर्थात तेव्हा खरंच मजा आली होती कारण वय लहान आणि सोबत मुलं होती.

एकूण आता किल्लादर्शनाचे वय झाले होते, तेव्हा आम्ही तिकडे निघालो. हा सिंक्यूरिम किल्ला डच आणि मराठ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून  बांधण्यात आला. १६१२ साली. १६ व्या आणि १७ व्या शतकात मात्र इथे डच जहाजं तळ ठोकत असत. आता तिथे एक देखणा गोल बुरुज, खिडक्यांच्या भिंती असलेला दुसरा बुरुज आणि त्याला जोडणारी दगडी वाट यापलिकडे फार काही नव्हतं. घंटेच्या आकाराची फुलं असलेली काहीशी वेगळीच झाडं बाजूने होती. बॉटनी प्रकरण दहावीनंतर सुटल्याने तसंही मला झाडाफुलांची नावं आणि त्यातून ते लॅटिन शब्द तर अजिबातच लक्षात राहत नाही. नजरेने काय तो आनंद घ्यायचा, उगाच डोक्याला भुंगा नको. गोल बुरुजावर निवांत बसलो असताना आरती उर्फ आमच्या अन्नपूर्णा मातेने अचानक थर्मास उघडला, इन्स्टंट चहाची पाकीटं काढली आणि आम्हाला फर्मास चहा बनवून दिला. सासूची मैत्रिण आली आणि सुनेने न सांगता त्या दोघींसाठी कॉफी करुन आणली की सासू ज्या विशेष कौतुकाने सुनेकडे पाहते तसे आम्ही आरतीकडे पाहत होतो. आता भुकेची जाणीव झाली आणि आम्ही लगबगीने रेसॉर्टकडे धावलो. झकास कॉंटिनेंटल नाश्त्याचा बुफे लावून तयारच होता. बहुतेक टेबल्सवर साधारण पन्नाशीची परदेशी पाहुणॆमंडळी खातपीत बसली होती. आपापलं आटोपून रेसॉर्टजवळच्या रस्त्यावर आम्ही चक्कर मारली. कपड्यांची आणि दागिन्यांची ’सस्ते मे मस्त’ अशी बरीच दुकानं तिथे होती. पाय दुखेतो तिथेच थोडीफार खरेदी करुन ’करी हाऊस’ म्हणून एका रेस्तरामध्ये जेवून परतलो. शाकाहारी, पंजाबी उत्तम जेवण मिळालं. एका थालीत दोन जणी सहज जेवू शकलो. रोटीचे दर दुप्पट असले तरी बाकी पदार्थांचे दर ठीक होते. तिथेही पुन्हा बहुसंख्य परदेशी मंडळी अन्न चिवडत बसली होती. कुणी गाणं ऐकत एकटं शांत बसलेलं, कुणी हुक्का पीत किंवा  ड्रींक घेत. आपण भारतीय लोक सहसा एकटे बसत नाही. आपल्याला भोवती सतत माणसं, आवाज असण्य़ाची सवय असते.

आता आमच्या दुचाकी येणार होत्या. त्यावरुन स्वैर भटकत गोवादर्शनाची मजा काही और असणार होती पण काहीतरी लोचा झाला आणि पाच ऐवजी दोनच दुचाकी आल्या. समोरच्या दुसर्‍या गाडीवाल्याकडे चौकशी करुन, ऐसा कैसा करत, बरीच फोनाफोनी करुन अखेर पाचही गाड्य़ा हातात आल्या. आपल्याला फिरायचं किती आणि अंतर किती याचा गुगलवर हिशेब करुन झाल्याने पेट्रॊल जुजबी, अगदी लागेल तेवढंच भरुन घेतलं. हेल्मेट तर अगदी लुटुपुटीच्या लढाईतलं वाटत होतं. ते अनिवार्य होतं म्हणे. आम्ही आधी गुगल करुन रेसॉर्टच्या डावीकडे वळायचं की उजवीकडे यावर वाद घातला, मग एकदा पक्कं झाल्यावर मात्र वार्‍यावर स्वार होऊन, वळणावळणाच्या झोकदार रस्त्यांवरून निघालो ते थेट (अग्वादा) अगुडा किल्ल्याकडे. हा किल्ला सुद्धा १६१२ च्या सुमारास बांधलेला. मांडवी नदीत प्रवेश करणार्‍या घुसखोरांना रोखण्य़ासाठी याचा वापर होई. या किल्ल्यावरच्या स्त्रोतावरुन जहाजांना पिण्य़ाच्या पाण्य़ाचा पुरवठा केला जात असे. पोर्तुगीज भाषेत अग्वा म्हणजे पाणी. दहा लक्ष लि. पाणी साठवण्य़ाच्या क्षमतेची टाकी इथे होती. किल्ल्याच्या वाटेवर सेंट लॉरेन्स चर्च आहे. चर्च आड आले म्हणजे किल्ल्यावर गोळीबार होणार नाही असा हेतू असायचा. मुस्लीम घुसखोर भारतात आगेकूच करताना सैन्याच्या पुढच्या फळीत गाईंना ठेवायचे काहीसे तसेच. हिंदू लोक गाईंवर शस्त्र चालवत नसत आणि त्यांचा हेतू साध्य होई. किल्लाचा वरचा भाग पाणीपुरवठ्य़ासाठी वापरात येई तर खालच्या भागात जहाजं पार्क करुन ठेवली जात. प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत किल्ला फिरुन झाल्यावर दीपगृह पाहिलं.
ते अगदी १९७६ पर्यंत दिवे मिचकावून जहाजांना मार्गदर्शन करत होतं. अरुंद ,गोलाकार जिन्याने त्याच्या उंच टोकावर पोचणं म्हणजे सर्कसच होती. त्यातून शिरता आल्याने आपण अजून बारीकच आहोत असा सगळ्यांना कॉन्फिडन्स आला. वरून मावळतीचा सूर्य अप्रतिम दिसत होता पण वेळ संपायच्या आत खाली उतरावं लागलं. मागच्या कड्यावरुन सूर्यास्त बघा असा सल्ला तिथल्या एका माणसाने देताच आम्ही कड्याकडे पळत सुटलो. सूर्य अस्तंगत होतच होता. पाय खाली सोडून दम खात शांत बसलो अगदी नि:शब्द होऊन, पण
’प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी’
ही स्थिती शब्दश: अनुभवत होतो.

आतापर्यंत सीता असलेल्या मुली एकदम गीता बनून तयार झाल्या. पब जो जाना था. बर्‍याच जणींनी उत्साहाने ते घरी कळवल्याने काहींच्या घरची मंडळी काळजीत पडली.”कानठळ्य़ा बसवणारे संगीत सुरू आहे, रंगीत दिव्यांच्या झगमगाटात डीजे उलटी टोपी घालून थिरकत ट्रॅक बदलतो आहे, लोक बेताल झिंगत आहेत, अंधार्‍या कोपर्‍यात रग्गेल ड्रग्ज डीलर्सची सौदेबाजी सुरू आहे, अर्धावृत्त गौरांगना सिगारेट फुंकत धुमाकूळ घालत आहेत आणि आपल्या भाबड्या बायका बाजूला भेदरुन उभ्या आहेत’ वगैरे दृश्य त्यांनी कपाळी हात मारत इमॅजिन केले असावे. प्रत्यक्षात आम्ही कॅंडोलिम बीचजवळच्या ऑन डिमांड पबमध्ये म्हणजे खरं तर फक्त आमच्यासाठी नि:शुल्क उघडून दिलेल्या ब्राऊन टाऊन हॉटेलच्या डान्सफ्लोरवर तासभर धमाल केली. मनसोक्त नाचलो. एरवी गाणी सुद्धा सात्विकच, ’जनी उकलिते वेणी तुळशीचे बनी’ टाईपची, गाणारी मंजिरी चक्क ’बॉलीवूड मसाला’ गाण्य़ांवर ठेका धरताना पाहून आम्ही चाट झालो. नाच अनेकदा विरेचक म्हणून काम करतो. भररस्त्यावर कोणत्याही लग्नाच्या वरातीत नाचणं वेगळं आणि खाजगी फ्लोरवर मैत्रिणींच्या संगतीत नाचणं वेगळं. इतकं दमलो तरीही खूप रिलॅक्स झालो. न पिताही नशा चढल्यासारखं तरंगत होतो. तिथलं जेवणंही रुचकर होतं. जेवताना अधूनमधून कर्कश वाटत असलं तरी लाईव्ह म्युझिकने अजूनच बहार आणली. गायकाचा आवाज खूपच खास होता. गोव्यातले बरेच संगीत शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, संध्याकाळी या स्वरुपाची कामं करतात. पर्यटन आणि मनोरंजन ही अर्थातच तिथली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे.

कॅंडोलिम बीच इथे येण्य़ाआधीच भटकून झाला होता. निरागस सिंक्यूरिमच्या तुलनेने हा बीच फारच झकपक वाटला. तिथली वाळू अशी अजब की त्यात पाय रुतत होते, पुढचं पाऊल टाकणं मुश्कील होत होतं. किनार्‍यावरच्या लखलखाटातल्या दुकानातले दर पाहून फक्त विंडो शॉपींग केलं. रात्रीचे किती वाजले ते कळू नये इतकं ’हॅपनींग’ वातावरण सर्वत्र होतं. तरीही सुरक्षित वाटत होतं. इव्ह टिजिंग अजिबात नाही. परतीच्या रस्त्यावर दुतर्फा गजबजलेली उपहारगृह, त्यातून ऐकू येणारं त-ह्त-हेचं लाईव्ह संगीत, दिव्यांचा चमचमाट, दारूचे पाट आणि परदेशी चेहर्‍यांची इतकी दाटी की जणू आपणच त्यांच्या देशात गेलो आहोत की काय. रात्रीची थंड झुळूक अनुभवत, ही सारी नेत्रदीपक, रंगीली दुनिया बघत दुचाकयांवर रेसॉर्टकडे परत जाताना जाणवलं की हे सगळं खूप चैतन्यमयी आहे, मस्त आहे पण बदल म्हणूनच ठीक आहे. नेवार्क विमानतळावरचा प्रचंड झगमगाट पाहून मला एकदम आपली भारनियमनामुळे काळोखात बुडालेली खेडी आठवली होती. तसं म्हटल्यावर माझे कलिग म्हणाले होते, ’कुणीतरी खर्च करतो म्हणूनच कुणीतरी कमवू शकतो. टेक इट इझी’. तेवढं अर्थशास्त्र पटलं असलं तरी.. गड्या आपुला गाव बरा. 

No comments:

Post a Comment