Thursday, February 14, 2019

चैत्रपालवी

"आसमान टेंसू हुआ धरती सब पुखराज।
मन सारा केसर हुआ तन सारा ऋतुराज।।"

        ह्या ओळी वाचल्या की सृष्टीचं चैतन्यमयी उर्जादायी रूप समोर येतं, उत्तरायण सुरु झालं की हळुहळु बदलत जाणारा निसर्ग बघण्यात पण एक मजा असते. एक जन्म सोडला तर बाकी मी तशी पक्की वैदर्भीय म्हणूनच कदाचित बोचऱ्या थंडीपेक्षा उन्हाळा जास्त प्रिय असावा...थंडीचा नंतर एक प्रकारचा कंटाळा यायला लागतो, एखाद हट्टी मुल जसं आपल्या घरी जायला तयार नसतं तसच ह्या थंडीचही वाटतं. सूर्यनारायणाचा मुक्काम वाढायला लागतो आणि मग निसर्ग पण नुतनीकरणाच्या तयारीला लागतो. पर्णसंभार मिरवत दिमाखात उभी असलेली झाडं अचानक उघडीबोडकी दिसायला लागतात, शिशिरातली पानगळ सुरु होते. वाळलेल्या पानांच्या राशींनी जमीन आच्छादुन जाते. थंड हवेबरोबर एक सूक्ष्मशी गरम हवेची झुळूक येते...जी खूप हवीहवीशी वाटते. उजाड भकास पर्णविहीन झाडांवर कोवळी पोपटी मखमल दिसायला लागते आणि ऋतुराज वसंताच्या आगमनाची चाहूल लागते, निसर्ग परत एकदा नटायला लागतो. मात्र ह्यावेळेस त्याच्या सजावटीचं काम गुलमोहोर आणि पळसाकडे असतं एरवी भडक , काहीसा तामसी भासणारा लाल रंग गुलमोहोर आणि पळस पहिला की नाविन्याचा तजेल्याचा आणि ऊर्जेचा वाटतो. हिरव्यागार बारीक पानांमधून डोकावणारा गुलमोहोर पाहून मन प्रसन्न होतं आणि पर्णविहीन खोडांवर गर्दकेशरी पळसफुलांचे झुबके बघणं तर निव्वळ अवर्णनिय. निसर्गाची कल्पक आणि अप्रतिम रंगसंगती म्हणजे गुलमोहोर आणि पळस! ह्या सगळ्यांच्या मागोमाग येणारा, रंगांची उधळण करणारा आपला सण रंगपंचमी म्हणजे जणू मूर्तिमंत चैतन्याचे दर्शन घडवणारा.
'पृथ्वी,मौसम,वनस्पती,भॊरे,तितली, धूप।
सब पर जादू कर गई ये फागुन कि धूप।।'

              हा सगळा काळ खरं तर परीक्षांच्या धमधुमीचा काळ पण मुलांप्रमाणे आपणही हे दिवस उमेदीने पार पाडतो कारण पुढे खुणावत असतो तो निवांतपणा.पूर्वीसारखी उन्हाळी कामं आता फार नसली तरी, अगदी मामाच्या गावाला जाणंही आताशा कमीजास्त होत असलं तरी कुलरच्या हवेचा गारवा, नातेवाईंकांचा जमघट, पत्त्यांचा डाव आणि  गारेगार आईस्क्रीम हे काही समीकरण अजूनही सुटत नाही. एक फक्त रात्री चांदण्यांच्या सोबतीनं झोपायची इच्छा काही आता पूर्ण होत नाही..आताच्या पिढीला त्यातली मजा कळणार नाही. 
               ह्या सगळ्यांच्या सोबतीनं आंबटगोड कैऱ्या,रसाळ कलिंगडं,उन्हाची तलखी घालवणाऱ्या काकड्या, जागोजागी दिसणारी उसाच्या रसाची गुऱ्हाळ,  'कधी येतो कधी येतो' म्हणून वाट पाहायला लावणाऱ्या फळांच्या राजाचं आगमन सगळेजण जणू कशाची तरी वर्दी देत असतात. उत्तरायणात निसर्ग स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो.जीर्ण विचार,समजुती,अमंगल घटना ह्या सगळ्याची होळी करून मानव सुद्धा निसर्गाच्या बरोबरीने सज्ज होतो नाविन्याच्या स्वागतासाठी अर्थात चैत्रपालवीसाठी !!

No comments:

Post a Comment