Sunday, February 3, 2019

आधी लगीन.....

मुलगी शिकली, पुण्यात नोकरी करून झाली, मुंबई मध्ये स्वतःचे ऑफिस घेऊन CS ची प्रॅक्टिस सुरू झाली तसे आम्ही घरचे सगळे तिला लग्न करण्यासाठी आग्रह करू लागलो .पण मॅडम ताकास तूर लागू देईनात . पण हळू हळू आपण आत्ता फक्त विवाह मंडळात नाव नोंदवू , लग्न जमायला वेळ लागतो ,सहज एक वर्ष जाईल ,वगैरे वगैरे आमच्या सबबीवर तिने मनाची तयारी केली. आणि एकदाचे नाव नोंदवले .
    पहिल्याच दिवशी पहिलेच स्थळ आम्हा सगळ्यांना खूप आवडले आणि योगायोगाने ते स्थळ म्हणजे  आमच्या नातेवाईकांच्या मित्राचा मुलगाच आहे असे कळल्याने पटापट हालचाली सुरू झाल्या . मुलाकडच्यांनी मुंबईला भेटायला बोलावलंय असा निरोप आल्याबरोबर आम्ही सासूबाई आजारी असतांना , त्यांची जबाबदारी नणंदेवर सोपवून तात्काळ तिकीट काढून जायचे ठरवले .

      घाईतच तयारी केली आणि  ट्रेन 1.30 तास लेट असल्याचे कळले . सगळी तयारी झालेली होती पण स्टेशन वर जाऊन बसण्यापेक्षा नवऱ्याने मित्रांसोबत रोजच्या कट्ट्यावर गप्पा मारणे पसंत केले .मग मी पण विचार केला असा रापलेला चेहरा घेऊन जावई बघायला जाण्यापेक्षा जरा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन उजळून घ्यावा . मनातला विचार प्रत्यक्षात आला आणि उजळण्याच्या प्रक्रियेला जेमतेम  सुरुवात झाली आणि नवऱ्याचा कॉल आला "तुझ्या मेकअप आधीच ट्रेन ने मेकअप केलाय चल लवकर !" झाले ...चेहरा उजळण्याआधीच माझ्या मनसूब्यावर  कापसाच्या बोळा फिरला . धावतच घरी गेले तर सासूबाईंच्या तब्येतीची चौकशी करायला  दोन मैत्रिणी आल्या होत्या त्यांनीच आम्हाला सामाना सकट घाईने स्टेशनला सोडले . तर ट्रेन प्लॅटफॉर्म वर उभी दिसली . मैत्रिणींनी निःश्वास सोडला आणि त्या लगेच माघारी फिरल्या , मात्र ....
     ट्रेन जवळ पोचल्यावर कळले की आमची नियोजित ट्रेन 10 मिनिटे आधीच निघून गेलेली होती आणि ही ट्रेन पुण्याला जाणारी होती असे TC ने सांगितले पण आमचे उतरलेले चेहरे बघून म्हणा किंवा आमची कीव येऊन म्हणा किंवा दैव बलवत्तर होते म्हणून त्या TC ने आम्हाला सुचवले की या ट्रेन ने तुम्ही भुसावळ ला चला ,तिथे कदाचित आमची चुकलेली ट्रेन आम्हाला मिळेल .. आमचा नाईलाज असल्याने  आम्ही मान्य केले आणि त्या ट्रेन मध्ये चढलो. TC ने त्याची नियोजित जागा आम्हाला बसायला दिली . मी तर थोडावेळ थरथर कापत होते . पण दस्तुरखुद्द TC च मदतीला आल्यामुळे आम्ही भुसावळ पर्यंतचा प्रवास बिनधास्त विना तिकीट केला. 

        भुसावळ जसजसे जवळ येऊ लागले तसे इंटरनेट मुळे आम्हाला कळून चुकले की आमची ट्रेन आधीच भुसावळवरून निघाली होती . आता दुसरा देवदूत आमच्या मदतीला धावला..  RPF चा एक जवान आमच्या जीवाची घालमेल बघून विचारू लागला नेमके काय घडले ? सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्याने भुसावळ ला त्या वेळी येणाऱ्या ट्रेन ची माहिती घेतली. त्यानुसार 1 नंबर प्लॅटफॉर्मवर  रत्नागिरी एक्सप्रेस आलेली आहे आणि ती नियोजित वेळेपेक्षा आठ तास लेट असल्याने त्यामध्ये भरपूर सीट्स उपलब्ध आहेत असेही सांगितले. पण तीन नंबर प्लॅटफॉर्म वर आमची ट्रेन  थांबल्यावर आम्हाला धडकी भरली की आता एक नंबर प्लॅटफॉर्म वर पोचण्यासाठी दादरा चढून उतरे पर्यंत ही पण ट्रेन चुकते की काय ? आम्ही विचारात असताना आमची मनःस्थिती त्या जवानाच्या लक्षात आली . त्याने आम्ही ट्रेन मधून उतरल्याबरोबर आम्हाला तीन आणि एक नंबर प्लॅटफॉर्म ला जोडणारा छोटासा बोगदा(रास्ता) दाखवला  ,जो आम्ही उतरलो तिथेच समोर होता  . या रस्त्यामुळे आम्ही अक्षरशः 1 मिनिटात आम्हाला हव्या असलेल्या ट्रेन  पर्यंत पोचलो . RPF च्या सूचनेनुसार जी बोगी समोर येईल त्यामध्ये आम्ही जेमतेम चढलो आणि ट्रेन सुरू झाली. अख्या बोगीत आम्ही दोघे सोडून केवळ एक व्यक्ती होती .  मला उगाच पुन्हा भीती वाटू लागली ,आपण चुकीच्या ट्रेन मध्ये चढलो की काय? पण समोर असलेल्या एकमेव प्रवाश्याकडून  खात्री केल्यावर जीव भांड्यात पडला . ...

        इथून पुढे नवीन आव्हान होते कारण आमच्याजवळ दुसऱ्या ट्रेन चे तिकीट होते म्हणजे कायद्याने आम्ही विना तिकीट प्रवास करत  होतो . मला त्या एकमेव अनोळखी प्रवाश्या समोर बसवून नवरा पुन्हा TC च्या शोधात गेला . माझ्याकडे साशंक मनाने रात्रीच्या बारा वाजता गुपचूप बसून पुढे काय होतय याची वाट बघण्याशिवाय काहीच उपाय नव्हता. जवळपास अर्धा तासाने नवरा हात हलवत परत आला . TC ने सांगितले त्या बोगीतील 72 पैकी 71 सीट्स रिकाम्या असल्या तरी नाशिक आल्याशिवाय मी तुम्हाला स्लीपर बर्थ देऊ शकत नाही .. आता 3 वाजेपर्यंत असलेल्या बर्थ वर आम्ही  जेमतेम आडवे होतो न होतो तो कुठल्याश्या स्टेशन वरून एक मोठे कुटुंब चढले. नेमके त्यांचे आरक्षण  आम्ही बसलेल्या सीट्स वर होते . त्यांनी आम्हाला  सामाना सकट तिथून हलवले . मग आम्ही नाशिक येई पर्यंत डोळ्यात ( झोप असतांना )प्राण आणून TC ची वाट बघत बसलो. ...
        अखेर एकदाचे नाशिक आले . यथावकाश TC आला . आम्हाला हक्काचे बर्थ मिळाले.आम्ही आडवे झालो तेव्हा चार वाजले होते. 
       वास्तविक पाहता आम्हाला दादर ला उतरायचे होते  पण आता ही ट्रेन आम्हाला कुरल्याला नेणार होती . मात्र कुर्ला तर कुर्ला ,मुंबईला तर पोहोचू  अशी मनाची समजूत घातली . सहा वाजता कुर्ला आले. बरीच घासाघीस करून टॅक्सी ठरवली . अंधेरी पूर्व ,विजय नगर असा दोनदा पत्ता सांगितला .  एक तास प्रवास केला तरी अंधेरीच्या ओळखीच्या खुणा येईनात . पुन्हा टॅक्सी वाल्याला पत्ता घोकला तर  म्हणाला मेट्रोचे काम चालू असल्याने रस्ता बदलला , आणि आता आलेच आहे विजय नगर पुढच्या गल्लीत ! आम्ही दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले . चांगल्या हमरस्त्यावर असणारे विजय नगर गल्लीत कसे गेले ? तरी गप्प बसलो . तेवढ्यात टॅक्सी वाला म्हणाला "उतरा आता आले विजय नगर '" आम्ही बाहेर बघतो तो एकही ओळखीची खूण पटेना . मग एका वाटसरू ला विचारले तेव्हा तो म्हणाला "ये नेरळ का विजय नगर है,तुमको कौनसे विजय नगर जाना है " आता मात्र आमच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला . "लेकीच्या लग्नासाठी काहीही ".. असे म्हणत टॅक्सी वाल्याला शिव्या मोजत पुन्हा अंधेरी पूर्व च्या विजय नगर ला कूच केले . पुन्हा अर्धा तास प्रवास केला आणि पोचलो एकदाचे हव्या त्या विजय नगर ला .... हुश्श ... 
      या सर्व यातयातीमध्ये एकच समाधान ...लेकीचं लग्न जमलं .

No comments:

Post a Comment