Thursday, June 6, 2019

I am not ok

हलकी कोई नजर छुपाये,
तो देखे दुबारा
हलकासा कोई डगमगाये,तो
थामे दुबारा
जरासा भी कुछ सही ना लगे,
तो पुछे दुबारा"
 लिव्ह,लव्ह,लाफ फौंडेशनच्या अवेअरनेस कॅम्पेनमधील ह्या लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी. मनाचा ठाव घेणाऱ्या आणि घ्यायला लावणाऱ्या.
      नुकताच "दीपोत्सव" दिवाळी अंकातील दिपीका पदुकोण हिचा"पुछे दुबारा" हा लेख वाचण्यात आला.  एकतर सिने अभिनेत्री,त्यातही आजची बॉलिवूड ची टॉप ची नायिका-- सर्वसामान्य पणे ह्या वर्गाकडे पहाण्याचा समाजाचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो, म्हणजे ठरलेला असतो  म्हणूया हवं तर. सिनेमात काम करणाऱ्या ह्या सौंदर्यवती म्हणजे निव्वळ शो-पीस, अदाकारी,नखरेल पणा ने लोकांच्या मनावर भुरळ घालणे इतकेच ह्यांचे जग. ;पण त्यांच्याही जीवनात काही कॉम्प्लिकेशन्स ,काही सुटू न शकणाऱ्या समस्या असू शकतात ह्या चा विचार सहसा आपल्या मनाला शिवत देखील नाही. दिपीका चा हा लेख वाचेपर्यंत माझाही समज काहीसा असाच होता. म्हणजे ती असं काही संवेदनशील लिहू शकत असेल, इतका खोलवर विचार करत असेल  असे वाटले नव्हते. असो. तिचा लेख वाचत असताना सारखं जाणवत होतं की हे एखाद्या जातिवंत लेखकाचं लिखाण आहे आणि जाणवत होती तिची आत्म परीक्षण करण्याची वृत्ती, स्वतःच्या मनाशी संवाद साधत कठीण अवस्थेतून मार्ग काढण्याची  तयारी.
    भरभरून मिळणारे यश, कडव्या संघर्षाचा होत असलेला अंत आणि त्या अनुषंगाने येणारा आत्म विश्वास. असं अगदी सगळं छान सुरळीत चालू असताना अचानक आयुष्यात येणारी, न उमगणारी अस्वस्थता, अस्थिरता---- एका कठीण काळी  आपल्या मनाच्या होणाऱ्या तगमग, अस्थिरता,  निराशा ह्या भावनांच्या कल्लोळाच वर्णन तिने अतिशय हळुवारपणे मांडलंय. नव्या नव्या आव्हानाशी लढणाऱ्या शरीरासोबतच, काहीतरी  बिनसलेल्या,शरीरामागे फरफटणार्या मनाची केविलवाणी धडपड ,तिच्या संवेदनशील मनाची घुसमट आणि त्यातून बाहेर  पडता येण्यासाठी चाललेली धडपड--- आपल्यालाही  अंतर्मुख करून जाते. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, " लोकांशी संवाद साधताना,वागताना,बोलताना सतत मनाची कोंडी होत असे. सगळं नीट चालू असताना अचानक आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं. कामाच्या, स्नेहाच्या माणसांबरोबर च्या सवयीच्या संवादात मधेच अडथळे यायला लागले. कुणीतरी आपल्याशी काहीतरी बोलत असावं आणि बटन बंद करून दिवा विझवल्यासारखं अंधारच वाट्याला यावा, तसं आतून विझल्याचे हे क्षण तेही अचानक रित्या, माझ्या  मुळी च सवयीचे नव्हते.सुरुवातीला गडबडले. नंतर सावरून घ्यायला शिकले. तो तुटला क्षण पट्कन उचलून घेऊन मागचा संवाद पुढे चालू असल्याचं दाखवणं,हा तर माझ्या व्यवसायचाच भाग होता!!
एकाच वेळी समांतर आयुष्य जगायचं. साकार करत असलेल्या व्यक्तीशी स्वतःच्या व्यक्तिरेखेशी सरमिसळ होऊ द्यायची नाही.त्यात शूटिंग च्या तारखा,शेड्युल सगळंच सांभाळायचं. हे सगळं करत असताना तारेवरची कसरत व्ह्यायची." अन ह्या सगळ्यातून दिपीकाला बाहेर काढलं ते तिच्या आईने. ती सांगते,"तसे माझ्या अवती  भवती माझी जिवलग माणसे होती.एखाद्या चुकार क्षणी माझ्या डोळ्यात उभं राहिलेलं पाणी त्यांच्या नजरेतून सुटलं नाही.अशा वेळी आपण आपल्या प्रेमाच्या माणसाला घट्ट मिठी मारतो. स्पर्शून सगळं सांगतो आणि दिलासा मिळतो,"होईल सगळं ठीक.काळजी करू  नकोस. This too shall pass."मलाही असा दिलासा मिळाला.पण त्याने गुंता सुटला नाही.तो सोडवला,माझ्या आईने.माझ्या   घुसमटत असलेल्या मनाचं दार पहिल्यांदा उघडलं ते माझ्या आईने." 
आठवडाभर दिपीका सोबत राहायला आलेले तिचे मा आणि पापा  जेव्हा जायला निघाले( ते 2014 साल होतं) तेव्हा अचानक न राहवून दिपीकाला रडू कोसळले. रडू अगदी अनावर झालं. हे नेहमीचे अश्रू नव्हेत हे मा ने जाणलं. धरणाची भिंत फुटावी तसा, इतक्या दिवसांचा कोंडलेला थकवा,घुसमट सगळं बाहेर पडत होतं
 मा ने जवळ घेऊन चौकशी केली. कारणं विचारली.हे नेहमी पेक्ष्या खूप काहीतरी वेगळं आहे हे तिला जाणवलं.शेवटी मा ने जाणं रद्द केलं, तिच्या पाशीच थांबायचा  निर्णय घेतला आणि तिथून सुरू झाला गुंता सुटण्याचा प्रवास . ही नुसती  दमणूक नाही, तात्पुरती उदासीनता नाही किवा काही कारणाने आला
आलेला झाकोळ ही  नाही हे खुद्द दिपीकाही समजून होती. आईने वैद्यकीय सल्ला  घयायचा ठरवलं. बंगरुळ मधील  तयांचया फॅमिली friend  dr. Ana ने दिपीकाच्या मनातील गाठीं ना हात लावण्यास  
हलके हलके मदत केली. Daignosis करण्यात आले," clinicle डिप्रेशन" . दिपीकाने ट्रीटमेंट सुरू केली.  हा गुंता सुटण्याचा प्रवास सोपाही नव्हता आणि   थोडा थोडका ही नव्हता; पण  हळूहळू ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यात ती यशस्वी झाली. आणि ह्या तिच्या संपूर्ण खडतर प्रवासाचं फलित काय तर " लिव्ह,लव्ह, लाफ  फौंडेशन "ची  सुरुवात. 
    'आपण ठीक नसू शकतो, आपल्याला भीती वाटू शकते, अकारण रडू येऊ शकते, निराधार दिशाहीन वाटू शकतं,हे मान्य 
करण्याने पुढची लढाई सोपी होते.
शूटिंग,सीन्स ची चर्चा,स्क्रिप्ट, डायलॉग, अवॉर्ड शोज---हे सगळं जिथल्या तिथे सुरू आहे. तरी असं काहीतरी होत आहे,जे माझ्या परिचयाचं नाही. डोकं दुखतं, पोट ठीक नाहीये ह्या गोष्टी वर उपाय असतात; पण इथे रोगही कळत नव्हता आणि औषध उपचारही माहीत नव्हते.त्यात मी एकटी कामाचा ताण, विश्रांतीचा अभाव, खाण्या पिण्याची आबाळ, हे सर्व समजण्यासारखे होते; पण  
कुणाशी बोलता बोलता अचानक  मधेच तुटू पाहणारा संवाद, उगाचच डोळे भरून येणं, सगळ्या जगापासूनच लांब लांब  पळून जावेसे वाटणे अशी काहीशी विचित्रं तळमळ चाललेली असे. दिपीका म्हणते, आपण शक्यतो,होता होईतोवर अशा विचित्र भावनांकडे दुर्लक्ष करतो. वर येऊ बघणाऱ्या  तगमगिला अजून आत,अंधारात लोटत रहातो. पण मनाच्या
 आत दडपलेल्या गोष्टींचं गाठोडं  हळूहळू फुटू लागतं. माझंही तसच काहीसं झालं आणि मनाच्या आत हे जे काही विचित्रं सुरू आहे ते बाहेर दिसू नये म्हणून मी धडपडू लागले. हळूहळू माझ्याही नकळत ही "झाकपाक" वाढत गेली.
 अशा  मनाच्या अत्यंत नाजूक आणि कठीण परिस्थितीत दिपीकाने तो प्रचंड ताण कसा सहन केला ह्याविषयी ती सांगते, "रोज वेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या लोकंबरोबर वेगळ्याच प्रकारचे(दर वेळी) काम करताना  ही घालमेल विसरून काम करावे लागत असे.
" I am not ok" हे स्वतःशी अशावेळी मान्य करता यायला हवं.स्वतःशीच लढत झगडत राहण्यापेक्ष्या आपलं काहीतरी बिघडलं आहे,हे स्वीकारून मदत मागण्याइतका मोकळेपणा स्वतः मध्ये असायला हवा.कधीतरी ताण येणं हे स्वाभाविक. दुःखी, हताश वाटणं हेही  नैसर्गिक;पण हा ताण, हा हताश पणा दीर्घकाळ रेंगाळत राहणं, असह्य होणं, साध्या कामांसाठी आपली सगळी मानसिक ऊर्जा पणाला लावून झगडावं लागणं ही धोक्याची घंटा 
समजावी आणि मोकळेपणी मदत मागावी,घयावी. बोलावं, स्वतःशी, जिवलग व्यक्तींशी आणि तज्ज्ञांशी सुद्धा.शरीराइतकीच आपल्या मनाची लय देखील ओळखता यायला हवी.
   मानसिक आरोग्याविषयी आपल्या समाजात  नसलेलं भान निर्माण करण्याचा प्रयत्न, मानसिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या व्यक्तीबद्दल इतरांमध्ये पुरेशी जाण विकसीत करणं आणी योग्य समुपदेशन आणि औषधोपचार ह्यांनी या अस्थिरतेवर मात करता येऊ शकते, असा दिलासा सर्वदूर पोचवणे ही "लिव्ह,लव्ह,लाफ फौंडेशन ची मुख्य उद्दिष्टे
 आयुष्यात ह्या 3 गोष्टींखेरीज काहीही महत्वाचं नाही असे दिपीकाचे प्रांजळ मत, म्हणूनच ----"लिव्ह,लव्ह,अँड लाफ,".
    " कशी/कसा आहेस तू? ह्या साध्या प्रश्नाला 'मी मस्त' असं उत्तर देताना कुणाची नजर हललेली दिसली ---------
तर तिथे थांबू नका.पुन्हा विचारा. "
माणसाने  माणसाच्या मनाच्या जवळ जाण्याचा किती साधा,सोपा आणि उत्तम उपाय  सांगितला आहे दिपीकाने! ,आपण नेहमीच अशा तर्हेची विधानं ऐकतो,"मी तुला चांगलाच ओळखून आहे". पण खरंच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला तरी नीट ओळखून असतो का? त्यासाठी चेहऱ्यावरची रेषा न रेषा वाचावी लागते, वागण्या बोलण्यातील बदलते हावभाव टिपण्याची क्षमता असावी लागते.  ह्या लेखाचा उद्देश इतकाच की आपल्याच जवळची एखादी व्यक्ती निराशेच्या, डिप्रेशन च्या वाटेवर जाते आहे अशी शंका जरी आली तरी ती  ताबडतोब नोटीस करा आणि त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा,अगदी मनापासून. अशा व्यक्तीनेही स्वतःमधील बारीक सारीक बदल ओळखून त्यावर मार्ग शोधण्याचा मोकळेपणा ने प्रयत्न करावा.   

खरं तर सध्याचं वातावरण एकंदरीतच कमालीच्या बाहेर अस्थिर झालेलं आहे.आर्थिक, राजकीय, सामाजिक---ह्या सर्वच क्षेत्रातील अस्थिरतेचा परिणाम ओघाने माणसाच्या मनावरही होतच असतो. जिकडे तिकडे अपघात, अत्याचार,जीवघेणे हल्ले, विश्वासघात ह्याच्या वाढत्या प्रमाणामुळे म्हणा, माणसाची सहनशीलता, संयम,सद्सद्विवेक बुद्धी ,कमी होताना दिसते आहे.मनाच्या स्थिरतेसाठी प्राणायाम, योग साधना, अध्यात्म ह्या बरोबरच मनाचा मनाशी संवाद तितकाच गरजेचा झाला आहे. मन:शक्तीचे प्रयोग वाचण्यापेक्षा एकमेकांची मने वाचता आली तर बरेच प्रश्न सुटू शकतील.    
   छु ना सको "आसमान"---
----तो ---ना सही----
  लोगोंके "दिल" को छुने का आनंद भी ------
आसमान छुने से कम नहीं----!! 

No comments:

Post a Comment