असंच गप्पा मारत बसलो होतो मुलांशी. सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोनावर चर्चा सुरु झाली. कुणीतरी नेहमीचं अर्धा पेला
भरलेला की अर्धा पेला रिकामा हे उदाहरण दिलं. मनात विचार आला, सकारात्मक आणि
नकारात्मक हा विषय थोडा बाजूला ठेवला, तर या पेल्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने
पाहता येईल. आपण जन्माला येतो तेव्हा रिकामाच पेला घेऊन येतो. हळूहळू वेगवेगळ्या
अनुभवांनी आयुष्याचा पेला भरू लागतो. कुणाचा पेला लवकर भरतो तर कुणाचा उशिरा ,
मात्र भरतो हे नक्की. हा भरत जाणारा पेला प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगवेगळा परिणाम
करताना दिसतो. कुणी भरत जाणाऱ्या पेल्यासोबत परिपक्व होत जातो, तर कुणी अधिकच उथळ
होतो.
पण मुळात पेला भरायचा अट्टाहास का? जेवढा पेला भरलेला तेवढी नवीन काही
घेण्याची क्षमता कमी होत जाणार. ज्याचा पेला भरलेला, तो अधिक काही घेण्याच्या परिस्थितीतही
नसतो नि मनस्थितीतही. आपला पेला कसा भरलेला आहे यातच समाधान मानलं, तर अर्धा पेला
रिकामादेखील आहे, याकडे दुर्लक्ष होणार. आणि त्या पेल्यात येऊ पाहणारं नवीन ज्ञान,
नवे अनुभव, नव्या आकांक्षा हे सर्व पेल्यापासून दूरच राहणार. अर्ध्या पेल्यावर
समाधान मानलं, तर माणूस जे काही थोडंफार आयुष्यात केलेलं असेल, त्यातच गुंतून
राहील. मग आणखी काही करण्याची इच्छा होणार नाही आणि प्रगतीला खीळ बसेल.
याउलट अर्धा पेला रिकामा असल्याची जाणीव मनात जागी असली, तर नवीन ज्ञान, अनुभव,
आकांक्षा यांचं पेल्यात स्वागत होईल. पेला अर्धा भरायचा आहे, ही भावना पुढे पुढे
जात राहण्याची प्रेरणा देत राहील. पेला अर्धा रिकामा आहे, ही जाणीव गर्वाला दूर
ठेवेल आणि विद्या विनयाने शोभून दिसेल.
अर्धा पेला नकळत भरला गेला, आता अर्धाच भरायचाय हे लक्षात आलं, की त्यात काय
भरता येईल, याचा विचार चोखंदळपणे सुरु होईल. चांगलं, सकस, सुयोग्य असं काहीतरी
भरायला हवं, हे कळेल. अर्धा पेला वाट्टेल ते गोळा करून भरला, हे जाणवेल आणि
त्यातलं वाईट, हिणकस, अयोग्य असं सर्व काढून टाकता येईल, नाहीतर किमान ‘असलं काही’
यापुढे त्यात भरलं जाऊ नये, याची काळजी घेतली जाईल. नवीन काही त्यात भरताना ही
निवड आपसूक केली जाईल. अर्धा रिकामा पेला नवीन नाती, नवे ऋणानुबंध सामावून
घ्यायला उत्सुक असेल.
म्हणून मला तरी माझा पेला अर्धा रिकामा
ठेवायला आवडेल. आणि तुम्हाला?
No comments:
Post a Comment