Monday, June 10, 2019

रविवारची बायको

रविवारची आतुरतेनी वाट पाहण्याचे माझे दिवस  कधीच संपले।सोमवार ते शनिवार शाळा कॉलेज,अभ्यासाच्या चक्रातून एक दिवस मोकळा मिळण्याचा तो काळ होता।म्हणूनच रविवारची वाट अगदी आसुसून पाहिली जायची।विशेषतः सकाळी उशीरापर्यंत झोपायला मिळतं हा एक आणखी आकर्षणाचा भाग असायचा।
              नंतरच्या धावपळीच्या चक्रात सगळी समीकरणं बदलत गेली।आता सोमवार ते शनिबार नौकरी,घरची जवाबदारी अशा दुहेरी चक्रातून जाताना रविवार येतो कधी नि संपतो कधी याचा पत्ताच लागत नाही।त्यात घरातल्या कामांमध्ये अचानक रविवारीच " वाढता वाढता वाढे ,"अशी वाढ  होणे म्हणजे तर विधीलिखीतच जणू!विशेषतः बायकांच्या बाबतीत।
         रविवार येऊच नये असं म्हणून तर मला कधीकधी वाटायला लागलं।काय की घरी सगळ्यांना रविवारी उशीरापर्यंत झोपायचं असतं।पहिला चहा साखरझोपेच्या धुंदीत घेऊन दुसऱ्या चहाबरोबर वर्तमानपत्र चाखायला हवं असतं।अगदीच साधी अपेक्षा!नंतर उपमा,पोहे,कुस्करा,थालीपीठ असा ' बोगस 'नाश्ता सोडून नवं काहीतरी चमचमीत हवं असतं।ही आणखी एक छोटीशी अपेक्षा।मग खूप उशीरा ,खूप वेळ लावून मनसोक्त आंघोळ करायची असते।जेवणाचा बेत फक्कड असावाच लागतो ।चटण्या कोशिंबीरी पापड रायते वगैरे एक्सेसरीज सह मेन कोर्स असावा अशी अपेक्षा रविवारी नाही करणार का? कायतरीच काय? मग दुपारी साग्रसंगीत वामकुक्षी म्हणजे मस्टच। आता आलंबिलं घातलेल्या फक्कड चहाशिवाय ही वामकुक्षी उतरायची कशी नं?पण चहा काही फार लागत नाही।दीडकप प्रत्येकी जेमतेम,बस्स! 
         मग एखादा पिक्चर,मित्र मैत्रिणींची भेट,बागेचा फेरफटका,कधी खरेदी ,कधी पाणीपुरी वगैरे अगदीच  साधे साधे बेत।रात्री आपापल्या मोबाईल मध्ये आपापलं मनोरंजन।आणि अखेरीस दुःखानं  उसासे सोडत "संपला रविवार?च्यायला कमाल आहे।",अशा खेदयुक्त उद्गारांसह झोपेच्या कुशीत शिरणं।
          हा सगळा दिनक्रम अर्थात  XY क्रोमोझोम वाल्यांचा।  काही " हेवानीय " अपवाद सोडून इतर  XX  वाल्यांसाठी नॉट अप्लीकेबल।निदान पंचवीस ते पन्नास रेंजसाठी तर नव्हेच नव्हे।अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या XY  वाल्यांनी हे रविवार तंत्र सांभाळलंही आहे।मी ही त्यातलीच।एखाद्या XY ला आयता चहा भुरकत रविवारची पुरवणी चाखावीशी वाटत नाही का हा प्रश्नच मुळी आपल्या कुटुंब संस्थेच्या भक्कम पायाला सुरूंग लावेल की काय असं वाटणाऱ्या XY मधलीच मी पण एक!
     पण अलीकडे मात्र माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं ,काहीतरी हवंहवंसं,घडलय आणि त्यामुळे मध्यंतरी निर्माण झालेली रविवार नकोच ही भावना आताशा लोप  पावते आहे।झालंय काय की  आताशा दर रविवारी मंगलाबाईंचा प्रवेश माझ्या घरी होऊ लागला आहे।रविवारची कोणती कहाणी कशामुळे साठाउत्तरी सुफळ संपूर्ण झालीय माहीत नाही।पण मंगलाबाई नावाची लॉटरी मला लागलीय खरी।कोण या मंगलाबाई?तर  दर रविवारी कामाला येणाऱ्या बाई!आणि त्या काय करतात?अहो काय करत नाहीत ते विचारा !दर रविवारी त्या आठच्या ठोक्याला येतात ।माझ्यासकट सगळ्यांना मस्त वाफाळलेला आयता चहा हातात आणून देतात।सगळे रिकामे कप नेऊन नीट धुवून पालथे घालून ठेवतात।अन्यथा यापूर्वी सर्व सन्माननीय सदस्यांना पहिल्या चहाचा आपापला उष्टा कप सांभाळून ठेवावा लागायचा ।केवढी ही जवाबदारी!आणि तेही दुसऱ्या चहाची वेळ होईपर्यंत!तोवर वाळून जायचे सगळे कप।शिवाय का कोण जाणे,त्या वाळक्या कपातून दुसरा चहा पिताना "पहिल्या धारेचा" फील काही केल्या यायचा नाहीच।मंगलाबाई यायला लागल्या आणि हा प्रश्न चुटकीसरशी सुटलाच।मग माझ्या पण भाग्यात कोरा पेपर आणि आयता गरम चहा मिळण्याचा योग जमून आला।Dreams come true वगैरे म्हणतात ना,तसा फील आलेला मला! गंमत म्हणजे ,"नाश्त्याला काय करू?",असं विचारून त्या चक्क बहुविध ऑप्शन्स समोर ठेवतात।इडली डोसा पासून बटाटेवडा,कचोरीपर्यंत काहीही करून खाऊ घालण्याची त्यांची तयारी असते।तीच कथा दुपारच्या जेवणाची।अल्लादिनच्या राक्षसासारखंच काहीसं।फक्त त्या "हुकूम मेरे आका "असं म्हणत नाहीत।त्यात आताशा रविवारी मलाही पहिल्या पंक्तीचा मान मिळायला लागला आहे।तव्यावरचा आयता गरम फुलका थेट पानात पडूनही माहेरच्या आठवणीने न कळवळण्याचा चमत्कार घडायला लागला आहे।एक बहारदार गंमत म्हणजे" आज जेवणात कसली भाजी आहे ?रस्सा?की उसळ?रायतं ,कोशिंबीर,चटणी?साधा भात की पुलाव की दहीबुत्ती?",असं सरप्राईज माझ्यासाठीही असायला लागलं आहे,जे पूर्वी कधी शक्यच नव्हतं।पुन्हा "सोने पे सुहागा" म्हणजे मागच्या आवराआवरीतून सुटका!मग छानशी डुलकी आणि संध्याकाळी मस्तसा आयता चहा तयार।स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा।आणि अप्सरा मंगलाबाईंहून इंटरेस्टिंग नसाव्यात।
       मंगलाबाई संध्याकाळी सात वाजता परत जातात।त्यापूर्वी त्या रात्रीचा स्वयंपाक करून सोमवार सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करुन जातात।मध्ये मिळणाऱ्या मोकळ्या वेळात दाणे भाजून कूट करणे,पोहे भाजून चिवडा करणे,मटार सोलणे,डबे धुवून पुसून रॅकमध्ये लावणे,उशांचे अभ्रे पडदे धुणे बदलणे,पायपुसणी धुवून वाळवणे,अशी खंडीभर कामं त्या करुन टाकतात।झालंच तर रद्दी बांधणे,दळण आणणे,कपडयांच्या घडया वगैरे कामांचाही त्या फडशा पाडतात।वरुन हे सगळं सुहास्य वदनानी!चक्क गाणी गुणगुणत!!त्याहीपेक्षा भारी काम म्हणजे सासूबाईंच्या सॉफ्ट कॉपी मध्ये सेव्ह केलेला गत चाळीसपन्नास वर्षांच्या इतिहासाचा स्मृतींचा उजाळा त्या सहज झेलतात।एकीकडे श्रोत्याची भूमिका चोख बजावत दुसरीकडे तोवर गुडघ्यांना तेल लावतात ,कंबर पाठ चोळून देतात, केसांना मालीश करून देतात।धीस इज म्हणजे टू मच नव्हे का?(यासाठी खरं तर मी त्यांना स्पेशल अॅरिअर्स द्यायला हवेत।)
         एकूणच " रविवार येऊच नये " असा जो फिल  यायला लागला होता तो हळूहळू मावळला।मलाही रविवारची मनसोक्त चव चाखता येऊ लागली।कधी केसांना मेंदी लावून भलतीच उशीरा आंघोळ करण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं।दुपारच्या डुलकीनंतर एखादा कथा कविता संग्रह हातात घ्यायला मिळू लागला।
         असाच एकदा कविता महाजनांचा कवितासंग्रह वाचत होते।त्यात एका कवितेत कवयित्री म्हणते की ,"मलाही एक बायको हवी होती"। कवयित्रीची मागणी मला ताबडतोब कळली।ही प्रत्येकच वर्किग वूमनची मागणी असू शकते नं?शिवाय त्यातला " बायको "हा शब्द मोठा सूचक आहे।ती गरम चहाचा कप देईल पण सल्ला नाही।हसतमुखानी घरकामाचा ढीग उपसेल पण ना तक्रार करेल,ना मदतीची अपेक्षा। माझीच मागणी आपल्या कवितेतून महाजन मांडतायत या कल्पनेनी मला हसू आलं।आणि आई पुस्तक वाचताना हसतेय या गोष्टीची माझ्या कन्येला मोठी मौज वाटली।तिनेही माझ्याबरोबर ती कविता पुन्हा पुन्हा वाचली।आम्ही त्यातल्या बायको या कन्सेप्टविषयी काहीतरी बोलत होतो तेवढ्यात   माझं लक्षं खोलीच्या दाराकडे वेधत कन्या म्हणाली "तुला काहीतरी विचारतेय"। "कोण गं?"म्हणत मी वर पाहिलं तर दाराशी मंगलाबाई उभ्या।नि माझी कन्या माझ्या हातावर टाळी देत खिदळत म्हणाली " बायको गं तुझी "!मलाही दिलखुलास हसू आलं।
          एकदा " गरम चाय की प्याली हो।कोइ उसको पिलाने वाली हो",या गाण्याबद्दल मैत्रीण काहीसं बोलली आणि मला अचानक मंगलाबाई आठवल्या।तिला तो सगळा किस्सा सांगताच तिनी मोठया चतुराईनी प्रश्न केला " एका रविवारचे किती घेते गं ती?"काहीसं वेगळंच मनात येऊन दचकून मी विचारलं " कोण ?" मैत्रीण म्हणते " तीच गं तुझी बायको!" 
          मी तिच्या हसण्यात सामील झाले खरी,पण सावधही झाले।हिला का चौकश्या?
        मग "ते काही नक्की नाही।कामाप्रमाणे असतं",वगैरे बोलून मी प्रश्नाला बगल  दिलीं।पण हार मानेल ती मैत्रीण कसली?तिनी लगेच मंगलाबाईंचा फोन नं मागितला। 
      "  छे!तिच्याजवळ कुठला फोन असायला?"म्हणत मी तोही प्रश्न निकालात काढला।चिव्वट मैत्रिणीचा पुढचा प्रश्न  आलाच।  "घरी असेल नं कोणाजवळ्?"  
        "नातवाजवळ  असतो तिच्या ।पण अननोन नंबरचा कॉल घेत नाहीत ते कुणीच।"
          मी माझ्यापरीने फिल्डिंग लावली।पण दोन धोके मला स्पष्ट जाणवले।एक म्हणजे माझी रविवारची बायको मैत्रीण पळवते की काय?आणि दुसरं म्हणजे मला बायको मिळताच माझं रुपांतर नवऱ्यात होतंय की काय? तुम्हाला कायवाटतं?

No comments:

Post a Comment