Wednesday, May 15, 2019

बापरे बापू

’लास्ट स्टेज.. लास्ट एकदम’
आम्ही घाबरुन- ’कुणाची?’
’आपले नाना ओ.. गंगाजल गंगाजल.. तुळशी.. घाला म्हटलं’
आम्ही -’कोणाला?’
’नानाच्या भावाला हो.. मुंबई मुंबई.. काय गर्दी ..जेमतेम भेट.. अ‍ॅ बापरे’
आम्ही अर्थ लावून घेतला. कोणतेतरी नाना शेवटचे श्वास घेत असून त्यांचा भाऊ मुंबईहून गाडीला भयंकर गर्दी असूनही कसाबसा पोचला आणि त्याची आणि नानांची भेट होताच नानांनी श्वास सोडला.
आम्ही असे अर्थ लावून घेत घेत या इसमाशी म्हणजे बापूंशी गेली अनेक वर्ष संवाद साधत आहोत. बापू घराजवळच राहतात. ते स्वत:वर फिदा असलेल्या जमातीतले आहेत. आयटीआय मध्ये शिक्षक होते, केव्हाच निवृत्त झाले आहेत. ’ड्रिल ड्रिल, कोपर्‍यात ए.. अस्सं, वायर वायर, अ‍ॅ बापरे’ असं करत त्यांनी कसं काय शिकवलं असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं असेल हे एक आम्हाला कोडंच आहे.
एकदा ते ओरडतच घरात आले.  ’हत्ती हत्ती ...पोसा.. पांढरा'
आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत..'मुलांना काय.. नुसती चक्कर.. इंजिन.. इंजिन बंद. अ‍ॅ बापरे त्यापेक्षा भाड्याने.. भाड्याने मस्त..’
याचा अर्थ ’मुलगा कार घ्या म्हणतो आहे, त्याचे काय जाते, काम नसले तर कारचे इंजिन खराब होते म्हणून उगाच फिरवावी लागते. म्हणजे हे पांढरा हत्ती पोसणे आहे. त्यापेक्षा लागेल तेव्हा मस्तपैकी भाडयाने गाडी घेऊन फिरावे’ हुश्श.

बापू आता समाजसेवा करतात, म्हणजे असं त्यांना वाटतं. पत्नी निवृत्त शिक्षिका. साध्या, नीटनेटक्या. चारही मुलींची लग्नं आणि मुलाचा प्रेमविवाह झालेला. इकडे ही जोडी टुकीने राहते आहे.
बापू डाय करत नाहीत. ’वय वय ..तसंच मस्त.. डाय अ‍ॅलर्जी.. नस्ता ताप..अ‍ॅ बापरे’
त्यांच्या अंगावर भरघोस शुभ्र केस आहेत. कानातूनही डॊकावत असतात, तोंडात अधूनमधून तंबाखूचा बार असतो. सावळा चेहरा, खुरटी पांढरी दाढी, मध्यम बांधा. अंगावर पांढरट किंवा पिवळा बुशकोट, तपकिरी किंवा काळी पँट. तब्येत टकाटक कारण ’रोज फिरायला.. लांब.. फ्रेश फ्रेश दिवस.. तुम्ही दिसला नाही.. उशीर उशीर.. अ‍ॅ बापरे’

फिरणं झालं की चहा घेत त्यांचं पेपरवाचन असतं. ते फक्त स्थानिक राजकारणाच्या बातम्या वाचतात. तो त्यांचा ऑक्सीजन आहे. काहीच बातमी नसेल तर ते अस्वस्थ होतात की आता एवढया मोठया दिवसाचं करायचं काय. त्यांचा स्थानिक लाडका दलबदलू नेता ज्या पार्टीत, ती त्यांची पार्टी त्यामुळे त्यांचा ह.मु बदलत असतो. त्यांना स्वत:चे मत नाही, विचार नाही. बिनबुडाच्या गडूसारखे कधी ते घड्य़ाळाकडून, कधी इंजिनाकडून ,कधी धनुष्याकडून तर कधी पंजाकडून बोलतात. त्या नेत्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, फळवाटप वगैरे करणारी जी मंडळी असते त्यात हे आघाडीवर असतात.
’पेशंट पेशंट, केळी.. सगळ्य़ांना केळी, सपरचंद काय महाग .. रुपया पडला म्हणे ..अ‍ॅ बापरे’
वास्तविक रुपया पडला म्हणजे नेमकं काय झालं हे पोटापुरती पुरेशी पेन्शन मिळवणार्‍या बापूंच्या गावी नसते. लोक म्हणतात ते आपणही म्हणायचे.
सामूहिक विवाह टाईप कार्यक्रम तर त्यांचा फेवरेट. त्याच्या आयोजन मिटींगला ते जातात. सोहळ्य़ाहून आल्यावर अशीच अगम्य वर्णनं करतात. त्यातून कुणीतरी भांडी, मंगळसूत्र आणि सफारी सूट मिळतो म्हणून कसं डबल लग्नाला उभे राहिले, यांनी त्यांना कसं शिताफीने पकडलं, मंत्री कसे लेट आले, प्रत्यक्ष जोड्या किती- दाखवल्या किती, वगैरे बहुमोल माहिती तुकड्यातुकड्यातून कळते.
’समाजसेवा.. या माध्यमातून.. आपलं काय. राहिले ४ ,६ वर्ष ...भजना पेक्षा कार्य कार्य.. काय? ..अ‍ॅ बापरे’
’बेटी बचाओ’ टाईप कार्यक्रम असेल तर ते भाषण वगैरे पण देतात. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी या तिघींची नावे घेऊन झाली की
’आज या समाजात.. मुलं फारेन.. आयटी का फायटी.. अग्नीला पोचतो का..मग जवाई मुल्गाच दुसरा.. कुस्ती...पोलीस.. रनिंगमध्ये मेडल पोरीलाच. ती आपली ही जिंकली नं..कप कप.. शिकवा खूप.. अ‍ॅ बापरे’
त्यांना मेडलवाल्या पोरी, स्पर्धेचं नाव, क्रीडाप्रकार वगैरे लक्षात असणं अशक्यच. इंग्लीशशी तर ३६ चा आकडा. स्वत:च्या पोरींना मात्र यांनी जेमतेम बारावी आटोपून उजवलेलं. मुलींना साध्या शाळेत आणि मुलाला खास कॉन्व्हेंटला शिकवलेलं. वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलासाठी डिंकाचे लाडू करणारं यांच घर. तरी पोरी सुस्थळी नांदत पुढे शिकल्या आणि बापूंची छाती फुगायला कारण झाल्या.
तर अशा सगळ्या इव्हेंटचे फोटो काढून घेऊन ते छापून आणणे, मग तो पेपर काखोटीला मारुन चार घरी तो फोटो दाखवणे आणि कृतकृत्य होणे हा त्यांचा एक छंद आहे. कुणी कौतुक केले की
’ख्या ख्या.. उगीच आपलं हो.. समाजाच्या माध्यमातून.. प्रेम प्रेम  ..लोकांच प्रेम इतकं...अ‍ॅ बापरे’.

आता इतके भरीव कार्य करणार्‍याच्या वाढदिवसाला चार लोक ’हारार्पण’ करायला येणारच. त्यादिवशी बापू गुळगुळीत दाढी करुन, करकरीत कुर्ता घालून लोडाला टेकून बसतात. एखाद दुसरा गडी बुके घेऊन येतोच कारण चहानास्ता भरपूर उपलब्ध असतो. बुके घेतानाचा फोटॊ महत्वाचा.
’घ्या खा खा.. निमित्त निमित्तमात्र.. हॅ हॅ..बुके कशाला कशाला.. मिठाई पण.. अ‍ॅ बापरे’
मुलामुलींनी त्यांची सत्तरी जोरदार केली. भरपूर पाहुणॆ, हॉल, रोषणाई. जेवणाआधी भाषणं. त्यांचा जन्म ऑगस्टमधला म्हणून एका मित्राने त्यांना थेट क्रांतीसूर्य हे महान बिरुदच बहाल करुन टाकलं. मोठा केक त्यावर ७० मेणबत्त्या आणि मोठी सुरी. बर्थडे सॉंग वाजू लागले. बापू नाचू लागले. नातवंड ओरडली ’केक केक’. बापूंनी करवतीसारखी सुरी दोन्ही हातात धरुन केक कापायला सुरुवात केली. ५,७ मेणबत्त्या फुंकेतो बिचार्‍यांना धाप लागली. मग बाकी काम इतरांनी केले. बापूंनी भाषण केले. एरवी ते काय बोलतात हे बहुतेकांना कळत नाही त्यात भरुन आलेले डोळे आणि मन, धाप लागल्याने वेगाने घेतलेला श्वास यामुळे ते काय बोलतायत ते अजिबातच कळेना. ’जीवनाची उणीव की जाणीव.. जीवन.. बास बास.. इतिकर्तता.. शंभर वर्ष.. नको नको..अ‍ॅ बापरे’ इतकच कळलं. 

कोणत्यातरी सरकारी योजनेच्या अंतर्गत घराशेजारच्या खोलीत २ शिवणयंत्रे ठेवून त्यांनी २ गरजू बायकांना कामाला लावले. पुढे त्या बायका कंटाळून सोडून गेल्या तरी त्या रिकाम्या खोलीत सगळया शासकीय जयंत्या मयंत्या साजरा झाल्याच्या बातम्या बापू बिनदिक्कत छापायला पाठवून देत. त्यात कोणी भाषणात काय म्हटले याचे अजब वर्णन असे. नातलग बायकांची नावे ते अमकीने प्रस्तावना केली, तमकीने आभार मानले म्हणत छापत त्यामुळे पेपरात नाव आल्याच्या आनंदापोटी कुणी आक्षेपही घेत नसे. या बातम्यांच्या बळावर त्यांनी एक दोन पुरस्कारदेखील पदरात पाडून घेतले.

इतके सगळे करुनही समाजात आपल्याला हवे तसे स्थान अद्याप मिळाले नाही. मोठॆ मंत्री संत्री आले की आपल्याला शेवटच्या रांगेत बसावे लागते याची बापूंना रुखरुख असावी. शेतकर्‍यांसाठी काही तरी केल्याशिवाय हे घडणार नाही या भावनेतून ते एखाद्या मधल्या फळीतल्या स्वघोषित नेत्याला पकडून ते लगतच्या खेड्यात जाऊन शेळीपालनावर अगम्य भाषेत भाषणे देऊ लागले. मग त्यांनी एक लेख लिहिला आणि तो कसा लिहिलाय हे पाहा म्हणाले. त्यात शेळीपालनाचे फायदे १) शेती व्यत्रिक्त भरपूर कमाई २) पैसा खेळतो ३) मुलीचे लग्न ४) दारात गाडी
असे लिहिले होते. नशीब लेखात ’अ‍ॅ बापरे’ नसते. शेळीपालनामुळे मुलीचे लग्न कसे जमेल असे विचारायचे नाही. बापूंचे लॉजिकच खतरनाक. तो लेख अर्थात सर्व पेपरनी नाकारला. बापू खट्टू झाले पण तोवर त्यांना ’बोंडअळी’वर भाषण देणारा एक जण भेटला. तो विषय अधिक चर्चेत असल्याने बापू त्याला चिकटले. ते आता त्या ’प्रकल्पा’त व्यस्त आहेत. ते ही जमले नाही तर कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतातच. सहकारी बँकेच्या पॅनेल पासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुका त्यांना जीव रमवायला चालतात. मग ’कार्यकर्ता.. प्रचार.. वेळ.. वेळ कुठे.. अ‍ॅ बापरे’

आयुष्यात धड कोणतीच क्रिया न केल्याने क्रियापदं त्यांच्यावर रुसली असावीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ती गायब असतात. असे असले तरी बापू मनाने सरळ आहेत. आयुष्यात कुणी दिशा न दिल्याने वेळ घालवायची साधनं शोधतायत. लोकेषणेत मन रमवतायत. एके काळी मुलींवर अन्याय केला असला तरी सुनेला मात्र लेकीसारखे वागवतात. कुणाचे भले केले नाही तरी कुणाचे कधी वाईट करत नाही. म्हणून त्यांच्या ’गाळलेल्या जागा’ भरत का होईना बापूंशी संबंध आणि संवाद टिकवून ठेवासा वाटतो.

No comments:

Post a Comment