 |
अक्षरा १-२-३ नोव्हें २०१८ |
ऐका अक्षरा तुमची कहाणी. आटपाट ऐवजी यात अकोला नगर आहे. ज्यात आहेत पीकेव्हीचे मळे, महानचे तळे, राजेश्वराची देवळे रावळे. त्यात काही सख्या सुखाने नांदत होत्या पण काहीतरी मिसिंग होतं. एके दिवशी काय झालं? २००७ मध्ये ग्रुप स्टडी एक्स्चेंजच्या प्रकल्पासाठी मोहिनीची निवड झाली आणि त्याच्या तयारीसाठी नासिकला फेर्या सुरू झाल्या. तिथली सखी डॉ. श्रेया तिला तिच्या मैत्रिणींना भेटायला घेऊन गेली. एका कॉफी शॉप मध्ये ठरलेल्या वेळेला त्या ६,७ जणी आल्या. काहींनी आपल्या जवळची पुस्तकं एकमेकींना दिली. त्यावर उलट-सुलट चर्चा झाली. कॉफी पिऊन सगळ्या प्रसन्न मनाने आपापल्या कामाला निघून गेल्या. तिने विचारले, बायांनो हा कसला वसा वसता? श्रेया म्हणाली, "आनंदाचा आणि प्रगतीचा". या व्रताला काय करावं? "दिवस- वेळ ठरवून भेटावं. पालकत्व आणि व्यक्तिमत्व विकासावरच्या नवनवीन पुस्तकांबद्दल बोलावं." नेहमीच्या टिपिकल बीसीपेक्षा हे व्रत फार म्हणजे फारच इंटरेस्टींग वाटलं. मग तिने काय केलं? अकोल्यातल्या तिच्या पुस्तकप्रेमी मैत्रिणींना याबाबत सांगितलं आणि विषयाचं बंधन न ठेवता आपणही वाचनवसा घेऊया अशी इच्छा व्यक्त केली.
 |
स्वातीचे पुस्तक प्रकाशन |
पल्लवी, शुभांगी, मीनल, अश्विनी, अंजली, भाग्यश्री, अनघा, अनुजा आणि अर्चना तिच्या कॉम्प्युटर क्लासला वेळ ठरवून चर्चेला जमल्या. एकमताने ठरलं- उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण हे व्रत कसं करावं. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी करावं. एकेकीच्या घरी भेटावं. त्या महिन्यात वाचलेल्या पुस्तकांवर(च) बोलावं. पुस्तकखरेदीसाठी प्रत्येकी काही रक्कम जमा करून ड्रॉ काढून एकीला द्यावे. ती पुस्तकं मनोभावे वाचावी मग इतरांना वाचायला द्यावी. चहा कॉफी शिवाय काही करू नये. अशा रितीने ऑगस्ट २००७ साली बुकक्लबचा वसा घेतला. त्यात स्वाती, मंजिरी, वर्षा, अपर्णा आणि मंजूताई सहभागी झाल्या. शुभांगीच्या एनजीओ ऑफीसची जागा या उपक्रमासाठी तिने तेव्हा आणि पुढेही बरीच वर्ष उपलब्ध करून दिली. सगळ्य़ांकडे इतका पुस्तकसंग्रह झाला की खरेदीचं बंधन शिथिल करावे लागले. सुरूवातीला मातृभूमी मध्ये एक पान लेखनासाठी मिळाले. त्यात चौघींचे सदर सुरू झाले. एव्हाना आरती, सुनीता, मनीषा, मेधाताई पण अक्षराचा भाग झाल्या. नावीन्यासाठी एकच लेखक, एकच साहित्यप्रकार, एकच विषय, बाहेरील वक्ता अशा वेगवेगळ्य़ा थीम घेऊन दरवर्षीचे राउंड्स होत गेले. व्रताची फळे दिसू लागली.
 |
स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसह जागतिक पुस्तक दिन |
नुसतं ऐकणार्या बोलू लागल्या, बोलणार्या लिहू लागल्या. या वर्षी तर अक्षराचा स्वत:चा ब्लॉग सुरू झाला. दरम्यान माणिकताई, स्वाती, सीमाताई यांची एक एक पुस्तकं प्रसिद्ध झाली. सीमाताई आणि मोहिनी विदर्भ, अखिल भारतीय, विश्व मराठी साहित्य संमेलनापर्यंत वक्ता म्हणून पोचू शकल्या ते याच व्रताच्या कृपेने आणि सख्यांच्या भक्कम प्रोत्साहनामुळे.
 |
|
व्रताच्या सुरूवातीला काय झाले? गटाचे बारसे झाले. ’स्वयंसिद्धा’ नाव ठरले. अर्थ छान आहे पण ते ऐकताच रूक्ष स्त्रीमुक्तीवादी गट उगीचच डोळ्यासमोर येतो आणि त्यात पुस्तकाचा संदर्भ नाही अशी चर्चा झाली. कीस पाडून अखेर ’अक्षरा - वाचनसंस्कार’ हे नाव बहुमताने निश्चित करण्य़ात आले. पुढे काय झाले? आपण वाचनसंस्काराचे उपक्रम घेऊया, त्यासाठी फंड हवा, म्हणून एखादा कार्यक्रम आयोजित करूया असे ठरले. पण आधीच्या खर्चाचे काय, त्यासाठी सगळ्या जणींनी ठराविक रक्कम एकत्र जमा केली. शीतल, भक्ती, प्रतिभाताई, अर्चना, सुवर्णा, माणिकताई या दरम्यान अक्षराचा भाग झाल्या. नागपूरच्या एका चमूचा ’मन’ हा गाणी आणि मनोविश्लेषणाचा कार्यक्रम घ्यावा असा प्रस्ताव वर्षाने मांडला. तिची बेबी अक्षरा उर्फ श्रावणी सगळ्य़ा मिटींगला उपस्थित असे. (वैजूचा इथपर्यंत सहभाग होता. आधी अनुजा आणि नंतर वैजू या कार्यक्रमानंतर फार दिवस राहिल्या नाहीत.) कार्यक्रम यशस्वी झाला. फेब्रुवारी २०१२ मधल्या ’मन’ कार्यक्रमानंतर जानेवारी २०१३ मध्ये मनीषा म्हणाली, ’वाटेवरती काचा गं’ हा बाललैंगिक शोषणाबाबत जागृती करणारा मीना नाईक यांचा कार्यक्रम घेऊया’.
 |
वाटेवरती काचा गं -९ फेब्रु २०१३ |
अशा कार्यक्रमांच्या आर्थिक व्यवहारांसाठी अक्षराचे बँक खाते आवश्यक होते. संस्था रजिस्टर केली की निवडणुका, पदनियुक्ती मग इर्षा, गटबाजी याची लागण नकोच म्हणून यापासून अक्षरा लांब होती आणि राहील. खात्यासाठी मात्र ३ सह्या आवश्यक होत्या. आता काय करावे, प्रश्न पडला. बँकेत याबाबत चौकशीसाठी गेलेल्या मेधाताई, पल्लवी आणि मनीषाने अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार अशा सह्या तिथल्या तिथे करून मोकळे व्हावे असा सुट्सुटीत पर्याय यावर निघाला. मेधाताई आणि पल्लवी आजही चोख हिशेब पाहत आहेत.दोन्ही कार्यक्रमांना अक्षरांच्या मेहनतीमुळे उत्तम प्रतिसाद लाभला. परंतु ’मन’ या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असणारे समुपदेशक डॉक्टर येऊ शकणार नाहीत असे कार्यक्रम अगदी तोंडावर आल्यावर कळले. ’काचा’ कार्यक्रमात अपेक्षित असलेला मुख्य पपेट शो मीनाताईंनी सादर केला नाही. या अनुभवांमुळे स्वत: पाहिलेला कार्यक्रम असल्याशिवाय आणि समन्वयाची संपूर्ण जबाबदारी कुणीतरी घेतल्याशिवाय व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे नाही असे सर्वानुमते ठरले. इकडे वाचनव्रतात खंड पडला नाही.
 |
प्रकाशपूजक कुसुमाग्रज - २७ फेब्रुवारी २०१४ |
पुढे काय झाले? अक्षरांनीच मिळून एखादा कार्यक्रम सादर करावा असे ठरले. वर्षभराने म्हणजे २०१४ च्या मराठी दिनी, कुसुमाग्रजांवर. या सुमारास श्रुती आणि सीमाताई अक्षरा सदस्य झाल्या .सक्रीय सहभाग असूनही काही अडचणीमुळे सीमाताईला प्रत्यक्ष कार्यक्रमाला येता आले नाही. गद्य निवेदन, कविता सादरीकरण, समूहनृत्य, नाटकातले प्रवेश आणि गाजलेली गाणी असे या कार्यक्रमाचे आगळे स्वरूप प्रेक्षकांना आवडले. प्रत्येकीतल्या गुणांना यात वाव तर मिळालाच पण फक्त महिलांनी अशा पद्धतीने सादर केलेला हा अकोल्यातला अनोखा कार्यक्रम ठरला. पुढे स्वाती म्हणाली, "पुण्याच्या प्रमोदिनी वडके कवळे आणि नीलिमा बोरवणकर या प्रसिद्ध लेखिकांची कथालेखन कार्यशाळा आयोजित करूया." अक्षरांच्या साथीने कार्यशाळा उत्तम झाली. कथालेखनाचे विविध पैलू उलगडले गेले.
 |
खुली कथालेखन कार्यशाळा |
आपण एवढे वाचतो आणि मुले! सख्यांना वाईट वाटले. मुलांसाठी अक्षरा किड्स सुरू करावे असे ठरले. २०१३ ते २०१६ असा तीन वर्ष हा उपक्रम चालला. दहावी ओलांडली की मुलांची गळती सुरू होई. ’यारे बाबांनो’ करत मुलांना खाऊ, क्वीझमध्ये बक्षिसे वगैरे आमिषे दिली परंतु या पिढीच्या मुलांना वाचायला लावणे महाकठीण. अखेर एका पावसाळ्य़ात किड्स बीसीच्या दिवशी प्रचंड पाऊस पडला. त्यात तो उपक्रम वाहून गेला. मग अक्षरांनी काय केले? विदर्भ साहित्य संघ, एलआरटी महाविद्यालय, ब्राह्मणसभा, साने गुरुजी वाचनालय इ. संस्थांच्या जोडीने
 |
अक्षरा आयोजित पुस्तक प्रकाशन |
लहान मोठे कार्यक्रम आयोजित केले.
 |
शालेय विद्यार्थ्यांसह पुस्तक दिन |
कार्यक्रमांच्या काही मिटींग तर चक्क ऑनलाईन घेतल्या. कार्यक्रम म्हटला की हॉल बुकिंग, प्रायोजक शोधणे, शासन परवानग्या, छपाई, बॅकस्टेज, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या जबाबदार्या सगळ्य़ा भानगडी. इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रत्येकीच्या कल्पना वेगळ्य़ा. त्याने काय होई? चर्चा, मतांतरेच नव्हे तर घनघोर छप्परतोड वादंग देखील होत. अगदी आता घटस्फोट होतो की काय अशी वेळ येई :-) पण सरस्वतीकृपेने पुन्हा दिलजमाई होई. कुणी सखी वाद झाला म्हणून समूह सोडून गेली नाही. (श्रुती, अंजू, मनीषा, शीतल या केवळ अकोल्यातून बदली झाल्यामुळे व्हर्च्युअल सदस्य झाल्या. ग्रुपवर होणार्या विविध विषयांवरील चर्चेत या व्हर्चुअल सदस्य सहभागी राहू लागल्या. श्रुतीचा तर त्यात अभ्यासपूर्ण सहभाग.)
 |
व्याख्यान- ययातिकन्या माधवी |
अशा या व्रतामुळे काय झाले? वाचनानंद तर मिळालाच पण वाचनवेडाच्या धाग्यांचे मैत्रीच्या गोफात रूपांतर होत गेले. अनेकींच्या सख्यांना अक्षरात सहभागी व्हायचे होते पण एका घरी एका वेळी किती जणी एकत्र येऊ शकणार हा विचार करून अक्षराच्या शाखा काढाव्या हा पर्याय ठरला. त्यानुसार आपापल्या इच्छुक मैत्रिणींना घेऊन सप्टेंबर २०१६ ला सुरू झालेली अक्षरा २ स्वतंत्रपणे फार छान वाटचाल करू लागली. नंतर सुरू झालेल्या अक्षरा ३ चीही घडी बसू लागली. प्रत्येक गटात अंदाजे २५ अशा ७०-७५ अक्षरा. सीमाताईच्या कल्पनेला दुजोरा देत भाग्यश्रीच्या हॉटेलमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये तिन्ही अक्षरांचे एकत्रीकरण झाले. तिथे काय झाले? च्याऊम्याऊ बरोबरच परस्पर परिचय झाला. तिन्ही गट मिळून येत्या काळात अधिक जोमदारपणे नवे उपक्रम करू असा विश्वास निर्माण झाला.
 |
लेखिका विनया जंगलेंसह |
या व्रताने काय शिकवले? समाजऋण फेडण्याच्या अल्प प्रयत्नात अक्षरा आपापल्या परीने कायम सहभागी झाल्या. सुरूवातीला मंजूताईच्या अंध मुलांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांना आर्थिक मदतीबरोबरच अभ्यासक्रमांची आणि अवांतर पुस्तकं अक्षराने रेकॉर्ड करून दिली. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण क्षितीज नागपूरचे संस्थापक स्वत: येऊन देऊन गेले. ’पुस्तकार’ या वझेंच्या प्रकल्पात अक्षरांच्या गटांनी निवडक शाळांमधून वाचनविषयक उपक्रम राबवले. एकवीरा संस्थेला साहाय्य किंवा बालिकाश्रमातील मुलींना सॅनिटरी पॅड्स पुरवणे असे उपक्रम पण अक्षराने केले.
 |
लेखिका माधुरी शानभाग भेट १ नोव्हे २०१५ |
गेल्या वर्षी झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनात अक्षराने आपले योगदान दिले.
माधुरी शानभाग, उत्तम कांबळे, विनया जंगले, सुलभा ब्रह्मनाळकर यांसारख्या लेखकांची भेट कक्षा रुंदावणारी ठरली. २००९ मध्ये अक्षरांनी
 |
मा.स्व.साधनाताईंसह- आनंदवन - २६ जाने २००९ |
’आनंदवन’ आणि ’हेमलकसा’ येथे भेट दिली. ’आलो येथे रिकामा ..बहरून जात आहे’ हा संदेश देणारा हा अनुभव संस्मरणीय ठरला. मीनलच्या नियोजनातील पुढाकारासह एकदिवसीय कितीतरी सहली झाल्या. काटेपूर्णा, नरनाळा, मुक्तागिरी, वारी, वान. एकत्र नियोजन करून बासर आणि नुकतीच गोवा अशा मोठ्य़ा सहली देखील झाल्या. पुस्तकवाचनापलिकडे जाऊन निसर्ग आणि माणूस वाचायलाही तितकीच मजा येते हे या सहलींमधून अक्षरांनी अनुभवलं.
अक्षराच्या वाचनसंस्काराच्या व्रताची दखल महाराष्ट्र टाईम्सनेही घेतली. तिडके सरांनी अक्षरावर लिहिलेला लेख त्यात प्रसिद्ध झाला. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-dr-shrikant-tidke-column/articleshow/57818576.cms?utm_source=tw&utm_medium=Twitter&utm_campaign=web
हे व्रत काही मोठे नाही. अजून खूप काही करता येईल. करायला हवे आहे. आपले नाव व्हावे, कौतुक व्हावे असं काहीही भव्यदिव्य अक्षराने केलेलं नाही. परंतु कोणताही लोभी हेतू मनात न ठेवता काही मैत्रिणी केवळ आणि केवळ वाचनप्रेमापोटी एकत्र येतात, और कारवाँ बनता गया म्हणत चुकत-शिकत एकमेकींच्या मदतीने पुढे जात राहतात आणि चक्क एक तप उलटले तरी एकत्र नांदतात हे जरा नवलाचेच. याचे श्रेय अर्थात प्रत्येक अक्षरा सदस्याचे.
अशी ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ. पण संपूर्ण मात्र नाही. कारण हे व्रत थांबवावयाचे नाही. अक्षरांनी जसा वाचनसंस्काराचा वसा न टाकता अक्षरा २ आणि ३ ला दिला तसा त्यांनी तो ४, ५, ६... ला देत राहावा. सरस्वतीकृपेने अक्षरांचा मनस्वास्थ्य, वाचनानंद मिळवण्याचा आणि निर्भेळ मैत्रीचा मनोदय पुरा झाला तसा तुमचा आमचा आणि पुढील शाखांचा होवो.
 |
| गोव्यातली धमाल |
 |
| काटेपूर्णा अभयारण्य |
 |
नरनाळा किल्ल्यावर |
 |
वारी येथील सहभोजन |
No comments:
Post a Comment