वैशाखवणवा पेटल्यानंतर जिवाची लाहीलाही करुन सोडणारा हा काळ फार असह्य होतो .त्यात भरीसभर म्हणजे वाहणारे उष्णवारे कानपटीला लागले की,आजारी पडलोच म्हणून समजा.........! अचानक निळ्या आकाशाने काळे वस्त्र परिधान केल्याचा भास होत होता. नाही म्हणायला दोन तीन दिवसापासुन वातावरणातील बदलामुळे सुखकर वाटणारे हवेचे थंड स्वर मंद लयीत गात येवुन भिडावेत आणि हळुवार मोरपिसी स्पर्श करावा तसा आणि तितकाच आल्हाददायक गारवा हवाहवासा वाटणारा होता. मृगाची चाहूल आणि पावसाची आळवणी बालपणीच्या 'ये,रे. पावसा !तुला देतो पैसा अगदी याच गाण्याने झाल्याशिवाय राहात नाही. हळूच एखादी सर बरसुनही जाते पण हे तृषार्त मन तेवढ्यावरच थोडी शमणार आहे!.." बरसो रे मेघा ,मेघा " असं पुन्हा पुन्हा म्हणून मैत्रिणींना घोळक्यातून जसे बोलावुन बोलावुन नाचायला भाग पाडतो ना! अगदी तस्सेच पावसालाही बरसायला भाग पाडावे आणि शब्दाचा मान ठेवून त्यानेही निमंत्रण स्विकारावे असच काहीस मनात असतं!.....
" त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं!" अशी काहीशी अवस्था होते सावळ्या ढगांकडे बघून!....... तुमच्या मनातही सावळा म्हणजे विठूरायाच आलाय हो ना!......
काय? नातं असेल बरं ह्या सावळ्याच आणि त्या सावळ्याचं! .....सावळे मेघ!......सावळा हरी! ........अहो एकच.! सावळा हरीच मेघाच्या रुपाने बरसत असतो. म्हणूनच तर नाही कां हरीला भेटण्यासाठी मेघही सोबतिला असतो.
पावसाची रुप तर हरतर्हेची.!.. थबकत ....थबकत!एक एक पाऊल टाकणार्या पावसाला कौतुकाने पाहताना जणू बालकानेच हळू हळू पाँव पाँव करत येतो आहे असे वाटते. त्याचा येण्याचा सांगावा .त्याच्या गंधातून हळूहळू पसरु लागतो. पानांचे, पक्ष्यांचे संगीत कानात रुंजी घालू लागतात.
" घन आभाळीचा तडकावा
मातीस मिळवा शिडकावा
झाडावरती पुन्हा नव्याने
रंग हिरवा फडकावा "
ह्या काव्यपंक्तींचा प्रत्यय यावा हीच मनात आस असते.
मनातला पाऊस !......अगदी हळुवार एक एक थेंब अंगावर घेत सचैल न्हाऊ घालणारा !....अल्लड मुलीगत या श्रावणसरी नाचत बागडत मनात येईल तस्सेच वागणार्या. हलकेच फुरगटून बसणार्या तर उगाचच खिदळत गाणी गाणार्या पण माहेरवासिनींना मात्र माहेरची ओढ लावणारा!
." झोका,ssss.मंद झुले sssश्रावण आलाsगं! "
असे म्हणतच आयुष्यात नवतीचे रंग भरणार्या या नवसुवासिनींना श्रावणातील इंद्रधनुष्य जणू त्याचीच ओळख करुन देत असतो.
श्रावणातील ऊन सावलीचा खेळ मात्र आयुष्याचे खरे गमक देऊन जातो. अवखळ वाहणारे ओहोळ, गीत गात वळणे घेत मुरकत चालणारी अल्लड नदी अचानक रौद्ररुप धारण करते, तेव्हा मात्र पावसाची मनधरणी कराविशी वाटते त्याचा तो तांडवी थयथयाट ऊर दडपून टाकणारा असतो.
।। नको बरसु असा जीवघेणा
घरे काळजाची उद्धवस्तु नको!
नको पाऊले टाकू रावणापरी
सीताईचे आर्त तू ऐक सत्वरी।।
मेघालय" मेघांच आलय म्हणजे घर अथवा मंदीर जिथे पाऊस सर्वप्रथम हजेरी लावतो आणि भरपूर बरसतोही .पिकांसाठीमात्र त्याचं अति बरसण नकोसं, म्हणूनच प्रार्थनापूर्वक आळवणी तेथिल खासी समाजातील मुला-मुलींच्या नृत्योत्सवाच्या विशेष सोहळ्यातून संपन्न होते. निसर्गदेवता !हे भारतीय संस्कृतिच वैशिष्ट्यच.! म्हणूनच तीनही र्रुतुंचे मनमुराद दर्शन देणार्या या निसर्गाला शतशः वंदन!
No comments:
Post a Comment