आला आषाढ! कोण बरं म्हणतंय, ‘आला आषाढ’? अरेच्या! ही तर मुक्तपणे हुंदडणारी गोड गोजिरी
मुलं! उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या, शाळेच्या नव्या वर्षाचे वेध लागलेले, नवीन पुस्तकं, दप्तर, डबा
–वॉटर बॅगची खरेदी, नवा गणवेश, नवे बूट... धम्माल नुसती! शाळा सुरु झाली की जुने मित्र खूप दिवसांनी
भेटणार, सुट्टीत काय काय केलं, कुठे गेले, याच्या गप्पा होणार, नवीन कोण वर्गात आलय त्यांची ओळख
होणार... ज्येष्ठातल्या वळवाच्या पावसात भिजायला रागावणारी आई आषाढातल्या पाहिल्या पावसात
मुलांबरोबर चिंब भिजणार ... असा हा आनंददायी आषाढ मुलांसाठी खास असणारच!
‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचींनी प्यावा वर्षा ऋतू तरी..’ कोण बरं
म्हणतंय मर्ढेकरांची ही कविता? ओहो! ही तर मुलांबरोबर चिंब भिजणारी आई! आता ती घरात पळतेय
आणि ओले कपडे बदलून गॅसवर कढई ठेवतेय. आहाहा! गरमागरम कांदा भज्यांचा खमंग वास घरभर
दरवळतोय. मुलं त्या वासाचा माग घेत घरात दाखल होताहेत. बाबांना सुद्धा त्या वासानंच घरी खेचून
आणलय की काय! गरमागरम भजी आणि वाफाळता चहा हातात घेत बाबा म्हणताहेत, ‘आला आषाढ!’
आता चातुर्मासाची चाहूल लागलेली आजी उठलीय कॅलेंडर बघायला. ‘सूनबाई, पुढल्या सोमवारी
एकादशी आहे हो.. आता चार महिने उसंत म्हणून मिळायची नाही, बघ! दिवस कसे भुर्रकन जातील...’
आजोबा हळूच सुनेकडे पाहून मिशीतल्या मिशीत मिश्कीलपणे हसताहेत. पाठीला डोळे असल्यासारखी आजी
लगेच वळून आजोबांना ठणकावतेय, अहो आषाढ नाही का आला? ह्यांना आपलं ह्या वयातही देवाधर्माचं
काही नाहीच..’ लगेच अपराधी भाव चेह-यावर आणत आजोबा मुलांना घेऊन व्हरांड्यात जाताहेत आणि
टाळ्या देऊन हसण्याच्या आवाजात भराभर कागदी होड्या बनवायला सुरुवात झालीय. मुलं होड्या
सोडायला पळालीत आणि आजोबा आपल्या बालपणाची आठवण येऊन जगजितसिंगची गझल गाताहेत,
‘...वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी...’
आणि हे काय? दूर रस्त्यावर हे कोण कटकट करतंय? ’अरे बापरे! आला आषाढ! आता धोधो पाऊस
येणार, लोकलचं वेळापत्रक कोलमडणार, अॉफिसला पोहोचायला उशीर होणार, फाईली साठणार नि बॉस
पिडणार. श्शी! वैताग नुसता...’ अरेच्या! हा तर मुंबईचा चाकरमान्या! तर दुसरीकडे हातगाडीवर गरमागरम
भाजलेली मक्याची कणसं विकणारा भैया आणि ती विकत घ्यायला जमलेला, पावसात चिंब भिजायला
उत्सुक असणारा, उत्साहाने सळसळणारा कॉलेजच्या तरुण तरुणींचा घोळका!
आणि हा कोण बरं उदासवाणा बसलाय? हवेत जाणवण्याइतका गारवा, भरून आलेलं आभाळ, धुंद
वातावरण; आणि हा का बुवा असा खिन्न? चला विचारूया. ‘काय रे बाबा काय झालय?’ ‘नोकरीसाठी
परगावी राहतोय. नुकतंच लग्न झालेलं. बायको गावाकडे नि हा इथे एकटा. त्यात हे असं जीवघेणं
वातावरण... दुसरं काय होणार?’
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी
होई पर्युत्सुक विकल तो कान्त एकान्तवासी
तन्निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रान्ता! सरस कविता कालिदासी विलासी...
अच्छा! तर हातात मेघदूत घेऊन बसलाय आमचा हीरो! डोळे भरून आल्यामुळे धूसर दिसणारी अक्षरं
वाचायचा प्रयत्न करतोय-
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सानुं/ वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... अरे पण जरा धीर धर! बघ बरं
कविकुलगुरू कालिदास पुढे काय म्हणतोय ते- कस्यात्यन्तं सुखमुपनतं दु:खमेकान्ततोवा/
नीचैर्गच्छत्युपरिचदशा चक्रनेमिक्रमेण|
चला जरा गावाकडे जाऊ. तिथंसुद्धा कुणीतरी आषाढाच स्वागत करतंय. अरे, हा तर ज्येष्ठ संपण्यापूर्वी
जमिनीची मशागत करून काळ्या मातीत तिफन फिरवायला सज्ज झालेला कृषीवल! थयथया नाचणारी वीज
अन ढोल वाजवणारा ढग बघून तो पेरणीच्या तयारीला लागलाय. आणि त्याच्या घरी त्याचे म्हातारे माळकरी
मायबाप आपलं गाठोडं बांधून तयार आहेत. ते म्हणताहेत, विठ्ठला, आला की रं आखाड! निघालो रं बाबा
तुझ्या दारी यायला. आता ही वारी आखरी बरका! बोला पुंडलीक वरदा हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम!
आणि दूर तिकडे पंढरपुरात कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला कुणीतरी म्हणतोय बुवा, “आला आषाढ!”
मुलं! उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या, शाळेच्या नव्या वर्षाचे वेध लागलेले, नवीन पुस्तकं, दप्तर, डबा
–वॉटर बॅगची खरेदी, नवा गणवेश, नवे बूट... धम्माल नुसती! शाळा सुरु झाली की जुने मित्र खूप दिवसांनी
भेटणार, सुट्टीत काय काय केलं, कुठे गेले, याच्या गप्पा होणार, नवीन कोण वर्गात आलय त्यांची ओळख
होणार... ज्येष्ठातल्या वळवाच्या पावसात भिजायला रागावणारी आई आषाढातल्या पाहिल्या पावसात
मुलांबरोबर चिंब भिजणार ... असा हा आनंददायी आषाढ मुलांसाठी खास असणारच!
‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचींनी प्यावा वर्षा ऋतू तरी..’ कोण बरं
म्हणतंय मर्ढेकरांची ही कविता? ओहो! ही तर मुलांबरोबर चिंब भिजणारी आई! आता ती घरात पळतेय
आणि ओले कपडे बदलून गॅसवर कढई ठेवतेय. आहाहा! गरमागरम कांदा भज्यांचा खमंग वास घरभर
दरवळतोय. मुलं त्या वासाचा माग घेत घरात दाखल होताहेत. बाबांना सुद्धा त्या वासानंच घरी खेचून
आणलय की काय! गरमागरम भजी आणि वाफाळता चहा हातात घेत बाबा म्हणताहेत, ‘आला आषाढ!’
आता चातुर्मासाची चाहूल लागलेली आजी उठलीय कॅलेंडर बघायला. ‘सूनबाई, पुढल्या सोमवारी
एकादशी आहे हो.. आता चार महिने उसंत म्हणून मिळायची नाही, बघ! दिवस कसे भुर्रकन जातील...’
आजोबा हळूच सुनेकडे पाहून मिशीतल्या मिशीत मिश्कीलपणे हसताहेत. पाठीला डोळे असल्यासारखी आजी
लगेच वळून आजोबांना ठणकावतेय, अहो आषाढ नाही का आला? ह्यांना आपलं ह्या वयातही देवाधर्माचं
काही नाहीच..’ लगेच अपराधी भाव चेह-यावर आणत आजोबा मुलांना घेऊन व्हरांड्यात जाताहेत आणि
टाळ्या देऊन हसण्याच्या आवाजात भराभर कागदी होड्या बनवायला सुरुवात झालीय. मुलं होड्या
सोडायला पळालीत आणि आजोबा आपल्या बालपणाची आठवण येऊन जगजितसिंगची गझल गाताहेत,
‘...वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी...’
आणि हे काय? दूर रस्त्यावर हे कोण कटकट करतंय? ’अरे बापरे! आला आषाढ! आता धोधो पाऊस
येणार, लोकलचं वेळापत्रक कोलमडणार, अॉफिसला पोहोचायला उशीर होणार, फाईली साठणार नि बॉस
पिडणार. श्शी! वैताग नुसता...’ अरेच्या! हा तर मुंबईचा चाकरमान्या! तर दुसरीकडे हातगाडीवर गरमागरम
भाजलेली मक्याची कणसं विकणारा भैया आणि ती विकत घ्यायला जमलेला, पावसात चिंब भिजायला
उत्सुक असणारा, उत्साहाने सळसळणारा कॉलेजच्या तरुण तरुणींचा घोळका!
आणि हा कोण बरं उदासवाणा बसलाय? हवेत जाणवण्याइतका गारवा, भरून आलेलं आभाळ, धुंद
वातावरण; आणि हा का बुवा असा खिन्न? चला विचारूया. ‘काय रे बाबा काय झालय?’ ‘नोकरीसाठी
परगावी राहतोय. नुकतंच लग्न झालेलं. बायको गावाकडे नि हा इथे एकटा. त्यात हे असं जीवघेणं
वातावरण... दुसरं काय होणार?’
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी
होई पर्युत्सुक विकल तो कान्त एकान्तवासी
तन्निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रान्ता! सरस कविता कालिदासी विलासी...
अच्छा! तर हातात मेघदूत घेऊन बसलाय आमचा हीरो! डोळे भरून आल्यामुळे धूसर दिसणारी अक्षरं
वाचायचा प्रयत्न करतोय-
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सानुं/ वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... अरे पण जरा धीर धर! बघ बरं
कविकुलगुरू कालिदास पुढे काय म्हणतोय ते- कस्यात्यन्तं सुखमुपनतं दु:खमेकान्ततोवा/
नीचैर्गच्छत्युपरिचदशा चक्रनेमिक्रमेण|
चला जरा गावाकडे जाऊ. तिथंसुद्धा कुणीतरी आषाढाच स्वागत करतंय. अरे, हा तर ज्येष्ठ संपण्यापूर्वी
जमिनीची मशागत करून काळ्या मातीत तिफन फिरवायला सज्ज झालेला कृषीवल! थयथया नाचणारी वीज
अन ढोल वाजवणारा ढग बघून तो पेरणीच्या तयारीला लागलाय. आणि त्याच्या घरी त्याचे म्हातारे माळकरी
मायबाप आपलं गाठोडं बांधून तयार आहेत. ते म्हणताहेत, विठ्ठला, आला की रं आखाड! निघालो रं बाबा
तुझ्या दारी यायला. आता ही वारी आखरी बरका! बोला पुंडलीक वरदा हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम!
आणि दूर तिकडे पंढरपुरात कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला कुणीतरी म्हणतोय बुवा, “आला आषाढ!”
No comments:
Post a Comment