Friday, February 15, 2019

भीती

लागोपाठ दुसर्‍यांदा दुबईला जाण्याचा योग आला. झाले असे की, आम्ही दोघे मागच्याच वर्षी माझा  50 वा वाढदिवस  दुबईत साजरा  करून  आलो होतो, पण निकीता  राहिली  होती  दुबईला  जायची! अक्षय  म्हणाला  दोघी  या म्हणजे पॅकिंग लाही मदत होईल  व निकीताचे दुबई  पहाणेही होईल. तर अशी माझी  दुबई  टूर  ठरली,  पण अचानक! कारण  निकीताचा passport expire  झाला होता, नविन  मिळालयाशिवाय flight booking करता येत नव्हते. सगळे  झटपट  झाले ,पण आता प्रश्न होता  माझ्या अकोला  मुंबई  रिझर्वेशनचा ! बघितले  तर सगळीकडे  waiting! 
फक्त first Ac मध्ये उपलब्ध होते,  काय  करावे? 
पण तत्काळची रिस्क घेऊ  शकत  नव्हतो,कारण flight बुक  झाले  होती.  म्हटलं,  चला  या निमित्ताने  फर्स्ट  एसी प्रवासाचा अनुभव! 
                    "Enjoy your journey & Dubai trip " असं  मुकुंद म्हणतअसतानाच गाडी  हलली,  आणि मी  माझी बॅग  घेऊन  आत  आले. माझ्या  केबिनमध्ये already एकजण  होते. माझा  अपर  berth होता, मी बॅग  ठेवून शांत  बसले. पण पुढे काय?  आम्ही  दोघेच  केबिनमध्ये, आपणहून बोलावे  की  नाही?  या विचारात  कुणीच  कुणाशी  बोललो  नाही. आपल्याला गाडी सुटल्यावर ,अशी  शांतता  कधी  माहितच नाही. विक्रेत्यांची  वर्दळ, 
प्रवाशांची बडबड, बरेचदा बर्थ adjustment साठी  विचारणा, गप्पा, इ. ची सवय! अगदी 2 AC,3AC
 मध्येही  हाच अनुभव!  मला चैन  पडेना, मी  उठले आणि  शेजारच्या  केबिनमध्ये  गेले, अंदाज  घ्यायला,  की आपण  तिथे  आपला  बर्थ exchange करु शकतो  का? पण तिथे  एक बर्‍यापैकी  वृद्ध  जोडपे  होते. ते  तिथून  हलण्याचा काही प्रश्नच  नव्हता .पुढे  गेले तर एका सिंगल  केबिनमध्ये अगदी  मजेत  निवांत  मद्यपान  करत 
असलेले  एक  गृहस्थ  दिसले, मी  मनातून  थोडी  घाबरलेच ! बरं अजून  TC  चा पत्ता नव्हता .पुन्हा  जागेवर  येऊन  बसले. 
                            तोपर्यंत  माझे  सहप्रवासी  यांनी  वाचन  सुरु  केले  होते, मग मला  खूप  बरे  वाटले, मीही  माझ्याजवळचे पुस्तक  काढून  वाचू लागले. कल्पना  करा, केबिनमध्ये  आम्ही  दोघेच,समोरासमोर बसून पुस्तके  वाचतोय,  गाडी धडधडत  पुढे  जात  होती. मला  सस्पेन्स सिनेमातील  एखादा  प्रसंगच  वाटत  होता. (सस्पेन्स  कारण  आता  पुढे  काय?  हे  माहित नव्हते. )
                            तेवढ्यात  TC आले, मी म्हटलं  की प्लीज  मला  लेडीज  असतील  त्या  केबिनमध्ये  शिफ्ट  करा. तर म्हणाले  की  नेक्स्ट स्टेशनला  तिथे  जे  येतील, त्यांच्याशी तुम्ही बोलून  ते  करून  घ्या. मी पुन्हा  शांत! पण  लवकरच  नेक्स्ट  स्टेशन  ला एक  वयस्कर   जोडपे, त्यांचा  मुलगा, आणि  त्याचा  मित्र  असे  चौघे  चढले . मला  किती  म्हणून  आनंद  झाला, काय  सांगू तुम्हाला?  एरवी  गर्दीला  कंटाळणारी  मी,  त्या  चौघांना  पाहून  आनंदले. मग ते सगळे आईवडलांना  पलीकडच्या  केबिनमध्ये  बसवून, माझ्या  केबिनमध्ये  येऊन  बसले. पण  बर्थ exchange  ला  काही  स्कोप  नव्हता.  कारण  आईवडिलांच्या तब्येती अशा  होत्या  की  त्यांना  एकेठिकाणी  झोपणे  जरुरी  होते.आणि विशेष म्हणजे  त्या  मुलाने  USA हून  रिझर्वेशन केले होते,पण 2 च बर्थ  मिळाले  होते,  त्याला मिळालेच नव्हते. TC ने त्याला  जळगावपर्यंत  आमच्या इथे  बसू शकता असे  सांगितले होते. त्याप्रमाणे आमच्याइथे  बसून जेवण, गप्पा मारल्या. मला  एकदम  रिलॅक्स  वाटत होते. माझा  वरचा  बर्थ  होता, मी  अगदी  प्रार्थना  करत होते की, त्या  मुलाला  खालचा  बर्थ  TC  ने  द्यावा. .........
                       मी  जागीच  होते, फक्त  बर्थवर  पडून  होते, मनात  नाना  वाईटसाईट  विचार  सुरू  होते, तेवढ्यात  जळगाव  आलं, आता  पुढे काय? तर  लगबगीने   अटेंडट  आणि आणखीन  एक  माणूस आला, त्याने  खाली  बेड  वगैरे  तयार केला. मला जरा शंका आली, म्हटलं, बेड  वगैरे  घालून  देतायत् म्हणजे  कुणी VIP  दिसतायत्!  पण विचारणार  कसे? माझे  कान बाहेरील  बोलणे  ऐकण्यात व्यस्त होते. तो  मुलगा  TC  ला विनंती  करीत  होता  की मला तो  खालचा  बर्थ द्या, नाहीतर माझ्या  आईवडिलांना  अडचण  होऊ शकते. पण  TC म्हणाले, की  बर्थ रिकामा  राहू दे,  पण  कुणाला  द्यायचा नाही, असे  सांगितलंय  साहेबांनी! बापरे! 
माझी  उरलीसुरली  आशाही  संपली. मला  अचानक  इतकी  भीती  वाटायला लागली  की  आता  या केबिनमध्ये  हे दोघे  आणि  आपण  फक्त! सर्वात  वाईट  म्हणजे  केबिनचे दार बंद  होणार! My God!

                       तेवढ्यात  मला  कसं  सुचलं  कुणास ठाऊक? मी अटेंडटला  विचारलं, जर  मला  तुम्हांला  बोलवायची  जरुर  पडली तर? त्यानी  माझ्या  डोक्याशी  असलेले  बेल चे बटण  दाखवले. मी  लगेच  त्याची  ट्रायल ही  घेतली. पण  तरीही  मनातली  भीती  वाढतच  गेली.  मी  स्वतःला  अक्षरशः  पांघरुणाने बंदिस्त  केलं, महटल काही करून  समजायला  नको  की इथे  कुणी  बाई  आहे.  मला  असं  झोपायची  सवय  नाही, तर  मला  गुदमरायला  लागलं , पण  तरी  भितीने  सगळ्या  जाणीवा जणू  गोठून गेल्या  होत्या. 
     शेवटी ते  साहेब  आले,  गाडी  सुटली, मला  उगाचच  टेन्शन  की  आता  हे  लाईट  वगैरे  लावतात  का? पण  काही  नाही, त्यांनी  शांतपणे  घरी  झोपायला  काढतात,  त्याप्रमाणे  शर्ट  काढून  तिथे  हुकला  अडकवून  ठेवला, बापरे  मी  आणखीनच  घाबरले. पण ते  लगेच  केबिनचे  दार बंद करून  झोपायला  गेले. 
     जसे केबिनचे दार बंद  झाले, तसा  माझ्या  मनातल्या  भितीने  उच्चांक गाठला.  मी  स्वतःला  सारखं  boost up करत होते की  अगदी  वयाच्या  विसाव्या  वर्षीपासून,  गेली  तीस वर्षे  मी  एकटीनेच  मुंबई  अकोला  प्रवास  केलाय,  छोटी  मुले  घेऊन. 1992 नंतरच्या  दंगलीनंतर  अकोल्यात   कर्फ्यू असताना!  वेगवेगळे  चांगले  वाईट अनुभव  घेतलेत.  एकदा तर मुंबई  अकोला  प्रवास  अनंतचतुर्दशी ला केला,  तेव्हा पूर्ण  bogie  त (तेव्हा  sleeper  ने  प्रवास  करायचे ) मी  व फक्तं  एक  कुटुंब,  तोही  थरारक अनुभव  होता,  तर  असं  सगळं  केलेली  मी, घाबरते?  माझ्या  मनात  एकच  यायचे  की  या  केबिनमध्ये  मी  व  दोन  पुरुष  आहेत बस्! काही  केल्या  झोप  लागेना असे  करता -करता  बाथरूमला  जावेसे  वाटू लागले,  देवा!  आता  खाली  उतरणे  आले,  आणि केबिनचे  lock कुठे  व कसे  आहे  माहित नाही!  आता  करू  तरी काय?  Natural  call ला काही इलाज  नव्हता. (बहुधा  भीतीपोटी  असेल ) हळूच  अजिबात  आवाज  होऊ  न देता  उतरले,  दाराचे  lock मात्र  लवकर  समजत नव्हते, थोडीशी  खटपट  केल्यावर  जमले, (आवाज  न करता  सगळे  केले ) तोपर्यंत  त्या  साहेबांना  झोप  लागली  होती  बहुदा! 

           बाहेर  जाऊन आले. त्या  अटेंडटचा चेहरा  पाहून  परत  आल्यावर, थोडं  बरं वाटल. वेळ  आली  तर बेल वाजवायची ,म्हणजे  तो येईल, असे  मनाला  समजावत  केव्हातरी  झोपी गेले. 
               हा  प्रसंग  आठवला  की, मला  नेहमी एकच  प्रश्न पडतो, "माणसाला  माणसाचीच इतकी  भीती  वाटावी? "

Thursday, February 14, 2019

चैत्रपालवी

"आसमान टेंसू हुआ धरती सब पुखराज।
मन सारा केसर हुआ तन सारा ऋतुराज।।"

        ह्या ओळी वाचल्या की सृष्टीचं चैतन्यमयी उर्जादायी रूप समोर येतं, उत्तरायण सुरु झालं की हळुहळु बदलत जाणारा निसर्ग बघण्यात पण एक मजा असते. एक जन्म सोडला तर बाकी मी तशी पक्की वैदर्भीय म्हणूनच कदाचित बोचऱ्या थंडीपेक्षा उन्हाळा जास्त प्रिय असावा...थंडीचा नंतर एक प्रकारचा कंटाळा यायला लागतो, एखाद हट्टी मुल जसं आपल्या घरी जायला तयार नसतं तसच ह्या थंडीचही वाटतं. सूर्यनारायणाचा मुक्काम वाढायला लागतो आणि मग निसर्ग पण नुतनीकरणाच्या तयारीला लागतो. पर्णसंभार मिरवत दिमाखात उभी असलेली झाडं अचानक उघडीबोडकी दिसायला लागतात, शिशिरातली पानगळ सुरु होते. वाळलेल्या पानांच्या राशींनी जमीन आच्छादुन जाते. थंड हवेबरोबर एक सूक्ष्मशी गरम हवेची झुळूक येते...जी खूप हवीहवीशी वाटते. उजाड भकास पर्णविहीन झाडांवर कोवळी पोपटी मखमल दिसायला लागते आणि ऋतुराज वसंताच्या आगमनाची चाहूल लागते, निसर्ग परत एकदा नटायला लागतो. मात्र ह्यावेळेस त्याच्या सजावटीचं काम गुलमोहोर आणि पळसाकडे असतं एरवी भडक , काहीसा तामसी भासणारा लाल रंग गुलमोहोर आणि पळस पहिला की नाविन्याचा तजेल्याचा आणि ऊर्जेचा वाटतो. हिरव्यागार बारीक पानांमधून डोकावणारा गुलमोहोर पाहून मन प्रसन्न होतं आणि पर्णविहीन खोडांवर गर्दकेशरी पळसफुलांचे झुबके बघणं तर निव्वळ अवर्णनिय. निसर्गाची कल्पक आणि अप्रतिम रंगसंगती म्हणजे गुलमोहोर आणि पळस! ह्या सगळ्यांच्या मागोमाग येणारा, रंगांची उधळण करणारा आपला सण रंगपंचमी म्हणजे जणू मूर्तिमंत चैतन्याचे दर्शन घडवणारा.
'पृथ्वी,मौसम,वनस्पती,भॊरे,तितली, धूप।
सब पर जादू कर गई ये फागुन कि धूप।।'

              हा सगळा काळ खरं तर परीक्षांच्या धमधुमीचा काळ पण मुलांप्रमाणे आपणही हे दिवस उमेदीने पार पाडतो कारण पुढे खुणावत असतो तो निवांतपणा.पूर्वीसारखी उन्हाळी कामं आता फार नसली तरी, अगदी मामाच्या गावाला जाणंही आताशा कमीजास्त होत असलं तरी कुलरच्या हवेचा गारवा, नातेवाईंकांचा जमघट, पत्त्यांचा डाव आणि  गारेगार आईस्क्रीम हे काही समीकरण अजूनही सुटत नाही. एक फक्त रात्री चांदण्यांच्या सोबतीनं झोपायची इच्छा काही आता पूर्ण होत नाही..आताच्या पिढीला त्यातली मजा कळणार नाही. 
               ह्या सगळ्यांच्या सोबतीनं आंबटगोड कैऱ्या,रसाळ कलिंगडं,उन्हाची तलखी घालवणाऱ्या काकड्या, जागोजागी दिसणारी उसाच्या रसाची गुऱ्हाळ,  'कधी येतो कधी येतो' म्हणून वाट पाहायला लावणाऱ्या फळांच्या राजाचं आगमन सगळेजण जणू कशाची तरी वर्दी देत असतात. उत्तरायणात निसर्ग स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो.जीर्ण विचार,समजुती,अमंगल घटना ह्या सगळ्याची होळी करून मानव सुद्धा निसर्गाच्या बरोबरीने सज्ज होतो नाविन्याच्या स्वागतासाठी अर्थात चैत्रपालवीसाठी !!

गोवा डायरी- भाग २

इतकं दमून झोपल्यावरही साडेपाचला टक्क जाग आली आणि डोळ्यापुढे समुद्र दिसायला लागला. तीन तारांकित रेसॉर्ट मधला व्हिला असला तरी तिघी, चौघींनी मिळून एक एक खोली शेअर केल्याने प्रसाधनगृहासाठी नंबर लावावे लागणार होते. एकदम होस्टेलचे दिवस आठवले पण तेव्हा साडेतीन मिनीटात आवरुन व्हायचे. त्यातल्या त्यात झटपट आवरुन बाहेर येते तर माझ्या गुणी मैत्रिणीने कॉफी मेकर वापरुन कॉफी तय्यार ठेवली होती. एरवी आपल्या ठराविक ’ब्रँड’ बद्दल आग्रही असणारी आणि पहिल्या धारेची (दुधाची हा) कॉफीच्च पिणारी भाग्यश्री पण मिटक्या मारत ती कॉफी पीत होती. तयार होऊन आम्ही मोती साबणाच्या जाहिरातीसासारखी ’उठा उठा सकाळ झाली, समुद्रावर जायची वेळ झाली’ करत सगळ्यांची दार ठोठावली. रात्री कंबरदुखीने हैराण असल्याने ’जमलं तर येईन बॉ’ म्हणणारी मीनल सर्वात पुढे. तिची सेवा करुन दमून झोपलेल्या मैत्रिणी बिचार्‍या नंबर लावून आतच. आरतीने तर झोपेतून ’मै कौन हूँ, कहा हूँ’ टाईप लुक दिला त्यामुळे अखेर पहिली टीम सिंक्यूरिम बीचच्या शोधात बाहेर पडली.

मस्त गार वारं होतं. रस्त्यात कुणीच नव्हतं म्हणजे कुत्रं सुद्धा नव्हतं असं मात्र नाही. समोरच्या ’स्पा’ जवळ अचानक काही कुत्री अंगावर आली आणि आम्हाला पळता भुई थोडी झाली. आमचे नवे बीचवेअर हे आता फाडतात की काय या कल्पनेने आमची सटारलीच होती. त्यातल्या त्यात शूर पल्लवीला तिच्या ’टोबो’ची सवय असल्याने ती विशिष्ट भाषेत त्यांना चुचकारू लागली. तिच्या मागे लपत चालेतो एकदाची कुत्री भुंकायची थांबली, रस्ता अजूनही रिकामाच. रात्री नाचून गाऊन पहाटे झोपणारं गोवा, हे सकाळी उशीरा उठणारं राज्य आहे हे दिसलंच. ’बस दो सौ मीटर’वर सांगितलेला बीच प्रत्यक्षात पाचसहाशे मीटर तरी लांब होता. वाटेत व्यवस्थित पाट्या असल्याने सहजपणे बीचवर पोचलो. उत्तर गोव्यातला हा बार्डॆझ भाग. डाव्या बाजूला टाटा कंपनीचा ’दर्या किनारी एक बंगलो’, मधे लाल मातीचा खडबडीत रस्ता आणि उजवीकडे खाली वळणं घेत पसरलेला जवळपास निर्मनुष्य, स्वच्छ, लखलखता सिंक्यूरिम बीच. एक गोवन कोळी तेवढा समुद्रात आत शिरुन मासे पकडत होता. पुरतं उगवलंही नव्हतं. पाठीमागे सिंक्यूरिम किल्ला दिसत होता.

Experience Seekers, Nirvana Seekers ,Party Animals साठी विशेष प्रसिद्ध, असं या बीचबद्दल वाचलं होतं. आम्ही फक्त यातल्या पहिल्या विभागात बसणारे. विदर्भात तीन, चार दिवसांनी पाणी आलं की ते भरण्यासाठी वेळेची, माणसांची सेटिंग करणारी आम्ही रूक्ष मंडळी. दुबईचे शेख मुंबईचा पाऊस पाहायला येतात तसं, इतक्या दिवसांनी हे एवढं, पार क्षितीजापर्यंत पसरलेलं फेसाळतं पाणी पाहून अक्षरश: हरखून जायला झालं.
’फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे’
हे नजरेत साठवेतो दुसरी टीम पण येऊन पोचली. मग मात्र मऊ रेती आणि लाटांबरोबर मस्ती सुरु झाली. किनार्‍यावरच्या बंद शॅक्ससमोर रिकाम्या खुर्च्या तशाच पडलेल्या होत्या. त्यावर बसून, पाण्य़ात पाय नाचवून, आदिवासी पद्धतीने कमरेत हात गुंफून, ट्रस्ट वॉक करताना (डोळे बंद करून मैत्रिण नेईल तिकडे समुद्रात चालत राहायचे) असे सुचतील तसे अनंत प्रकारचे फोटो काढून झाले. ’गोव्याला जातेय’ असं सांगून ऑफीसमधून रजा मिळणे शक्य दिसत नसल्याने शीतलने इमोशनल टच देत ’गावी जातेय’ असे सांगितले होते. त्यामुळे ती दर फोटोला गयावया करून ’ए हा फेसबुकला टाकू नका गं’ असं ओरडायची. शेवटी आम्ही काही फोटो ’हा फेसबुकसाठी :-) गं’ असे म्हणून तिलाच काढायला लावत होतो. नंतर ’टाक गं बिनधास्त, मात्रा चुकली ऑटोटाईपमुळे, असं सांग’ वगैरे सल्ले देऊन झाले.

आता आमचा मोर्चा बीचकडे तटस्थपणे बघत उभ्या असलेल्या सिंक्यूरिम किल्ल्याकडे वळला. या किल्ल्याच्या तटबंदीमुळे लाटांचा आवेग काहीसा रोखला जातो, कदाचित त्यामुळे पाण्यातल्या चित्तथरारक खेळांसाठी बीचचा हा भाग सुरक्षित मानला जात असावा. पाट्यांवर लिहिलेले खेळांचे दर जास्त वाटले. पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग करायचे का, यावर अगदीच माफक चर्चा झाली पण कोणी फारसा उत्साह दाखवला नाही. ’आधीच नवराबिवरा बरोबर नाही. उगाच अतिउत्साहात दोरी तुटून समुद्रात पडलो बिडलो तर काय घ्या, विकतचा ताप’ वगैरे विचार बहुतेकींच्या मनात तरळून गेले असावेत. त्यामुळे सगळ्य़ांनी एकमेकींकडे पाहत, हसत, नको, नको अशा माना हलवल्या. मुळात तेव्हा, इतक्या सकाळी सगळे खेळ बंदच होते. मला आमच्या अलिबाग ट्रीपची आठवण झाली. बनाना राईड म्हणजे केळ्याच्या आकाराच्या फुग्यावर एकमेकांना धरुन बसायचे आणि ते गदागदा हलवून आपल्याला पाण्य़ात पाडणार मग जीव खाऊन ओरडायचे. आम्ही एक मॅट राईड का काय केली होती, वॉटरस्कूटरच्या मागे एक चटई दोरीने बांधलेली, त्यावर पालथे पडून स्कूटरच्या दिशेने असलेला दांडा घट्ट धरायचा. मग ती स्कूटर ते रोरावत पाण्यावरुन फिरवणार आणि मागचे चटईस्वार त्यांच्यामागून फरफटत, भेलकांडत, बोंबा ठोकत बेफाम वेगाने लाटांवरून फिरणार. किनार्‍यावर सुखरूप आणून पटकल्यावर मात्र पाण्य़ाच्या सपकार्‍यांनी आणि भन्नाट वार्‍याने लालबुंद झालेल्या डोळ्यातलं पाणी पुसत सगळे चटईस्वार एकमेकांना ’ हॅहॅहॅ काय मज्जा आली ना’ असं अवसान आणून म्हणणार. बापरे, मला आठवणीनेच काटा आला. अर्थात तेव्हा खरंच मजा आली होती कारण वय लहान आणि सोबत मुलं होती.

एकूण आता किल्लादर्शनाचे वय झाले होते, तेव्हा आम्ही तिकडे निघालो. हा सिंक्यूरिम किल्ला डच आणि मराठ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून  बांधण्यात आला. १६१२ साली. १६ व्या आणि १७ व्या शतकात मात्र इथे डच जहाजं तळ ठोकत असत. आता तिथे एक देखणा गोल बुरुज, खिडक्यांच्या भिंती असलेला दुसरा बुरुज आणि त्याला जोडणारी दगडी वाट यापलिकडे फार काही नव्हतं. घंटेच्या आकाराची फुलं असलेली काहीशी वेगळीच झाडं बाजूने होती. बॉटनी प्रकरण दहावीनंतर सुटल्याने तसंही मला झाडाफुलांची नावं आणि त्यातून ते लॅटिन शब्द तर अजिबातच लक्षात राहत नाही. नजरेने काय तो आनंद घ्यायचा, उगाच डोक्याला भुंगा नको. गोल बुरुजावर निवांत बसलो असताना आरती उर्फ आमच्या अन्नपूर्णा मातेने अचानक थर्मास उघडला, इन्स्टंट चहाची पाकीटं काढली आणि आम्हाला फर्मास चहा बनवून दिला. सासूची मैत्रिण आली आणि सुनेने न सांगता त्या दोघींसाठी कॉफी करुन आणली की सासू ज्या विशेष कौतुकाने सुनेकडे पाहते तसे आम्ही आरतीकडे पाहत होतो. आता भुकेची जाणीव झाली आणि आम्ही लगबगीने रेसॉर्टकडे धावलो. झकास कॉंटिनेंटल नाश्त्याचा बुफे लावून तयारच होता. बहुतेक टेबल्सवर साधारण पन्नाशीची परदेशी पाहुणॆमंडळी खातपीत बसली होती. आपापलं आटोपून रेसॉर्टजवळच्या रस्त्यावर आम्ही चक्कर मारली. कपड्यांची आणि दागिन्यांची ’सस्ते मे मस्त’ अशी बरीच दुकानं तिथे होती. पाय दुखेतो तिथेच थोडीफार खरेदी करुन ’करी हाऊस’ म्हणून एका रेस्तरामध्ये जेवून परतलो. शाकाहारी, पंजाबी उत्तम जेवण मिळालं. एका थालीत दोन जणी सहज जेवू शकलो. रोटीचे दर दुप्पट असले तरी बाकी पदार्थांचे दर ठीक होते. तिथेही पुन्हा बहुसंख्य परदेशी मंडळी अन्न चिवडत बसली होती. कुणी गाणं ऐकत एकटं शांत बसलेलं, कुणी हुक्का पीत किंवा  ड्रींक घेत. आपण भारतीय लोक सहसा एकटे बसत नाही. आपल्याला भोवती सतत माणसं, आवाज असण्य़ाची सवय असते.

आता आमच्या दुचाकी येणार होत्या. त्यावरुन स्वैर भटकत गोवादर्शनाची मजा काही और असणार होती पण काहीतरी लोचा झाला आणि पाच ऐवजी दोनच दुचाकी आल्या. समोरच्या दुसर्‍या गाडीवाल्याकडे चौकशी करुन, ऐसा कैसा करत, बरीच फोनाफोनी करुन अखेर पाचही गाड्य़ा हातात आल्या. आपल्याला फिरायचं किती आणि अंतर किती याचा गुगलवर हिशेब करुन झाल्याने पेट्रॊल जुजबी, अगदी लागेल तेवढंच भरुन घेतलं. हेल्मेट तर अगदी लुटुपुटीच्या लढाईतलं वाटत होतं. ते अनिवार्य होतं म्हणे. आम्ही आधी गुगल करुन रेसॉर्टच्या डावीकडे वळायचं की उजवीकडे यावर वाद घातला, मग एकदा पक्कं झाल्यावर मात्र वार्‍यावर स्वार होऊन, वळणावळणाच्या झोकदार रस्त्यांवरून निघालो ते थेट (अग्वादा) अगुडा किल्ल्याकडे. हा किल्ला सुद्धा १६१२ च्या सुमारास बांधलेला. मांडवी नदीत प्रवेश करणार्‍या घुसखोरांना रोखण्य़ासाठी याचा वापर होई. या किल्ल्यावरच्या स्त्रोतावरुन जहाजांना पिण्य़ाच्या पाण्य़ाचा पुरवठा केला जात असे. पोर्तुगीज भाषेत अग्वा म्हणजे पाणी. दहा लक्ष लि. पाणी साठवण्य़ाच्या क्षमतेची टाकी इथे होती. किल्ल्याच्या वाटेवर सेंट लॉरेन्स चर्च आहे. चर्च आड आले म्हणजे किल्ल्यावर गोळीबार होणार नाही असा हेतू असायचा. मुस्लीम घुसखोर भारतात आगेकूच करताना सैन्याच्या पुढच्या फळीत गाईंना ठेवायचे काहीसे तसेच. हिंदू लोक गाईंवर शस्त्र चालवत नसत आणि त्यांचा हेतू साध्य होई. किल्लाचा वरचा भाग पाणीपुरवठ्य़ासाठी वापरात येई तर खालच्या भागात जहाजं पार्क करुन ठेवली जात. प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत किल्ला फिरुन झाल्यावर दीपगृह पाहिलं.
ते अगदी १९७६ पर्यंत दिवे मिचकावून जहाजांना मार्गदर्शन करत होतं. अरुंद ,गोलाकार जिन्याने त्याच्या उंच टोकावर पोचणं म्हणजे सर्कसच होती. त्यातून शिरता आल्याने आपण अजून बारीकच आहोत असा सगळ्यांना कॉन्फिडन्स आला. वरून मावळतीचा सूर्य अप्रतिम दिसत होता पण वेळ संपायच्या आत खाली उतरावं लागलं. मागच्या कड्यावरुन सूर्यास्त बघा असा सल्ला तिथल्या एका माणसाने देताच आम्ही कड्याकडे पळत सुटलो. सूर्य अस्तंगत होतच होता. पाय खाली सोडून दम खात शांत बसलो अगदी नि:शब्द होऊन, पण
’प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी’
ही स्थिती शब्दश: अनुभवत होतो.

आतापर्यंत सीता असलेल्या मुली एकदम गीता बनून तयार झाल्या. पब जो जाना था. बर्‍याच जणींनी उत्साहाने ते घरी कळवल्याने काहींच्या घरची मंडळी काळजीत पडली.”कानठळ्य़ा बसवणारे संगीत सुरू आहे, रंगीत दिव्यांच्या झगमगाटात डीजे उलटी टोपी घालून थिरकत ट्रॅक बदलतो आहे, लोक बेताल झिंगत आहेत, अंधार्‍या कोपर्‍यात रग्गेल ड्रग्ज डीलर्सची सौदेबाजी सुरू आहे, अर्धावृत्त गौरांगना सिगारेट फुंकत धुमाकूळ घालत आहेत आणि आपल्या भाबड्या बायका बाजूला भेदरुन उभ्या आहेत’ वगैरे दृश्य त्यांनी कपाळी हात मारत इमॅजिन केले असावे. प्रत्यक्षात आम्ही कॅंडोलिम बीचजवळच्या ऑन डिमांड पबमध्ये म्हणजे खरं तर फक्त आमच्यासाठी नि:शुल्क उघडून दिलेल्या ब्राऊन टाऊन हॉटेलच्या डान्सफ्लोरवर तासभर धमाल केली. मनसोक्त नाचलो. एरवी गाणी सुद्धा सात्विकच, ’जनी उकलिते वेणी तुळशीचे बनी’ टाईपची, गाणारी मंजिरी चक्क ’बॉलीवूड मसाला’ गाण्य़ांवर ठेका धरताना पाहून आम्ही चाट झालो. नाच अनेकदा विरेचक म्हणून काम करतो. भररस्त्यावर कोणत्याही लग्नाच्या वरातीत नाचणं वेगळं आणि खाजगी फ्लोरवर मैत्रिणींच्या संगतीत नाचणं वेगळं. इतकं दमलो तरीही खूप रिलॅक्स झालो. न पिताही नशा चढल्यासारखं तरंगत होतो. तिथलं जेवणंही रुचकर होतं. जेवताना अधूनमधून कर्कश वाटत असलं तरी लाईव्ह म्युझिकने अजूनच बहार आणली. गायकाचा आवाज खूपच खास होता. गोव्यातले बरेच संगीत शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, संध्याकाळी या स्वरुपाची कामं करतात. पर्यटन आणि मनोरंजन ही अर्थातच तिथली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे.

कॅंडोलिम बीच इथे येण्य़ाआधीच भटकून झाला होता. निरागस सिंक्यूरिमच्या तुलनेने हा बीच फारच झकपक वाटला. तिथली वाळू अशी अजब की त्यात पाय रुतत होते, पुढचं पाऊल टाकणं मुश्कील होत होतं. किनार्‍यावरच्या लखलखाटातल्या दुकानातले दर पाहून फक्त विंडो शॉपींग केलं. रात्रीचे किती वाजले ते कळू नये इतकं ’हॅपनींग’ वातावरण सर्वत्र होतं. तरीही सुरक्षित वाटत होतं. इव्ह टिजिंग अजिबात नाही. परतीच्या रस्त्यावर दुतर्फा गजबजलेली उपहारगृह, त्यातून ऐकू येणारं त-ह्त-हेचं लाईव्ह संगीत, दिव्यांचा चमचमाट, दारूचे पाट आणि परदेशी चेहर्‍यांची इतकी दाटी की जणू आपणच त्यांच्या देशात गेलो आहोत की काय. रात्रीची थंड झुळूक अनुभवत, ही सारी नेत्रदीपक, रंगीली दुनिया बघत दुचाकयांवर रेसॉर्टकडे परत जाताना जाणवलं की हे सगळं खूप चैतन्यमयी आहे, मस्त आहे पण बदल म्हणूनच ठीक आहे. नेवार्क विमानतळावरचा प्रचंड झगमगाट पाहून मला एकदम आपली भारनियमनामुळे काळोखात बुडालेली खेडी आठवली होती. तसं म्हटल्यावर माझे कलिग म्हणाले होते, ’कुणीतरी खर्च करतो म्हणूनच कुणीतरी कमवू शकतो. टेक इट इझी’. तेवढं अर्थशास्त्र पटलं असलं तरी.. गड्या आपुला गाव बरा. 

Wednesday, February 13, 2019

गोवा डायरी भाग १

अकोला स्टेशनवर साडेआठला सगळ्या जमलो तेव्हा एकत्र धमाल करण्य़ाच्या कल्पनेने आम्हा मैत्रिणींचे आणि बायका गावाला जात असल्याने मिळणार्‍या मोकळीकीच्या कल्पनेने आमच्या नवर्‍यांचे डोळे आनंदातिशयाने चमकत होते. आजारातून जेमतेम उठलेली सीमाताई सुद्धा तोवर उत्साहाने तिथे पोचली. गाडी रात्री ११ वाजता अकोल्याहून भुसावळला पोचली. गोव्याला विमानाने जायचे तर आधी रेल्वेने नागपूर किंवा मुंबईला जाणे, मधली अंतरे, तिथे अगोदर चेकइन वगैरे बघता फार तर एखादा दिवस वाचला असता, शिवाय नागपूरहून भाडं मुंबईच्या तिप्पट पडत होतं. त्यामुळे तो बेत रहित केला होता. आम्हा दहा जणींना आता भुसावळ रेल्वेस्टेशनवर महिला प्रतीक्षालयात तीन तास काढायचे होते, पण आरतीने निगुतीने आणलेलं वाफाळतं मसाला दूध पीत आणि dumb charades खेळत वेळ केव्हा गेला कळलंच नाही. झोपेने तारवटलेल्या डोळ्यांनी जांभया आवरत तिथे टेकलेल्या तीन-चार बायकांचीही आमचे हातवारे पाहत बसल्याने झकास करमणूक झाली. बाजूला एक आडदांड महिला पोलीस फोनवर कुजबूजत अखंड बोलत होती. तिने आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. बॅटरी संपत आली की ती चार्जिंग पॉइंटपाशी जाऊन बोले. ’अग बाई, चार्जिंग सुरू असताना बोलू नये’ असं तिला सांगावसं वाटलं पण केस अवघड होती. बोलणे संपून आता तिचे चॅटिंग सुरू झाले. तिचा आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. फोन हातातून काढला असता तर बहुतेक तिने जागीच प्राण सोडला असता.


तिचा नाद सोडून पत्ते विकत आणायला म्हणून मी आणि भाग्यश्री बाहेर पडलो. खाण्यापिण्याचे स्टॉल्स फक्त सुरू होते. वडा, दोसा, ऑमलेटचे संमिश्र वास येत होते. मग जाणवलं की रात्री १२ वाजता स्टेशनवर फिरणार्‍या आम्हा दोघींकडे लागलेल्या नजरा जरा विचित्र होत्या. नुकत्याच केलेल्या नाशिक प्रवासाची मला आठवण झाली. एकटीने परत येत होते आणि रात्री साडे १२ची गाडी. गाडी येत असल्याची सूचना ऐकून मी अपेक्षित प्लॅटफॉर्मवर अपेक्षित बोगीसमोरच्या एका पारावर येऊन बसले. तिथे फारसा उजेड नव्हता. अचानक लक्षात आलं, आजूबाजूला पन्नास एक मजूर कांबळं पांघरून कुठल्याशा गाडीची वाट पाहत उकिडवे बसलेत. क्षणभर माझा श्वासच अडकला. माझी गाडी येईपर्यंत ते १००एक डोळे आपल्यावरच रोखलेले आहेत याचा ताण न घेता बसणे म्हणजे परिक्षाच होती. त्या नजरा विचित्र होत्या हे खरं कारण त्यांच्यात बायका एकटीने फिरत नाहीत पण त्या वाईटच असतील असं का गृहीत धरावं, असा विचार करत अखेर मी शांत बसले होते. असो.

तर मंगला एक्सप्रेसची घोषणा झाली आणि सगळ्य़ा जणी लगबगीने उठल्या. बहुतेक जणी आपल्या कुटुंबासह गोव्याला एकदा तरी जाऊन आलेल्या, काही जणींचे देशभर, काहींचे परदेश प्रवास देखील झालेले पण फक्त मैत्रिणींसह स्वत: आखलेल्या या गोवा प्रवासासाठी सगळ्या प्रचंड उत्सुक होत्या. बायको बालवाडीत असल्यासारख्या नवर्‍यांच्या सूचना, मुलांच्या मागण्या, अमुक घेतलं का, आता तमुक कशाला घेतलं, वगैरे प्रतिक्रियांविरहीत अशी ही निवांत, मनमुक्त ट्रीप असणार होती. दुसरं म्हणजे आपल्या जबाबदारीवर प्रवास करण्य़ात, अकल्पित प्रसंगांना सामोरे जाण्य़ात एक वेगळीच गंमत असते. ’निरगाठी’ मध्ये गौरी देशपांडे लिहितात नं, ’मुलींनो सावध असा पण इतकेही जपू नका की अनुभव तुमच्या कुंपणांना घाबरुन पाठ फिरवून निघून जातील’.

प्रचंड थंडीमुळे प्रत्येकीने डोळे सोडून सगळं अंग कपडयात गुंडाळलेलं पण तरीही या हौशी गाठोड्यांनी ’निघतानाचा’ फोटो काढलाच. मंगलाताई वेळेवर आल्याने सुरुवात तर छान झाली. आपापल्या बर्थवर पथारी पसरुन सगळ्य़ा गुडूप झोपल्या. नाशिकला शीतल जॉईन झाली. तिला एकटीलाच वेगळ्य़ा बोगीचे तिकिट मिळाल्याने चिंता वाटत होती. त्यावर, इकडचा एखादा बुवा तिकडे पाठवायचा, त्यात काय, वगैरे आमचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलणे झाले होते. ’पण बुवा ऐकेल का’ या तिच्या प्रश्नावर ’इतक्या बायकांनी गोड हसल्यावरही ऐकणार नाही असा बुवा अजून जन्माला यायचा आहे’ वगैरे सांगून आम्ही तिला धीर दिला होता पण मुदलात पहाटे पाच वाजताच्या झोपाळू अवतारात एक तर हसता येत नाही आणि अगदी ऐश्वर्या हसली तरी साखरझोपेतून उठून कोण बुवा तिकडे जाणार हे लक्षात घेऊन ती बापडी तिकडेच झोपली. सकाळी ग्रुपवर चर्चा करुन मग सामानासह ’मोठया घरी’ आली. ९ ला पनवेलला अंजू जॉईन झाली आणि कोरम पूर्ण झाला. गरमागरम वडापाव घेऊन अश्विनीची नणंद तिथे हजर होती. तसंही झोपेतून उठल्यापासून आमचं चरणं सुरूच होतं. एसीच्या दुधाळ खिडकीतून बाहेरचा रम्य निसर्गबिसर्ग फार नीट दिसत नव्हता. दुपारी जेवताना मेथीचे जगातले बहुतेक प्रकार खाऊन झाले. सगळ्य़ा सुगरणींनी इतके प्रकार आणले होते की खाण्य़ापेक्षा, आपलं यातलं काही खायचं सुटलं तर नाही ना हे शोधण्यात जास्त वेळ जात होता. पत्ते नेहमीप्रमाणे रंगले. फार हुशारी वगैरे वापरुन जजमेंट खेळून झाल्यावर कळले की बरेच पत्ते खाली पडलेले होते. मी आणि पल्लवी ३०४ चे नियम चिकाटीने समजावून, दोघीदोघींची मानगूट पकडून दोन चार देवाचे डाव खेळलो पण मेथीच्या अतिसेवनामुळे जडावलेल्या मेंदूंना बदामसत्तीपलिकडे फार काही झेपेना. पत्ते, गप्पा, गाणी आणि वाम तसेच दक्षिणकुक्षीमध्ये हा दीर्घ प्रवास केव्हाच संपला आणि थिविम (किहिम नही रे मीनल थिविम, थिविम) स्टेशनला काफिला अखेर उतरला.


प्रशस्त पार्किंगमध्ये पिकअपसाठी आलेल्या गाडीवाल्याशी थोडा वेळ लपाछपी खेळून झाल्यावर एकदाची आमची-त्याची ओळख पटली आणि आम्ही हुश्श करून कँडोलिममधल्या आमच्या सँटारिटा रेसॉर्टकडे वेगाने निघालो. आपापल्या घरी सुखरूप पोचल्याचं कळवून होताच बाहेरच्या गोव्याकडे लक्ष गेलं. स्वच्छ रस्ते, टुमदार घरं, अधूनमधून दिसणारी चर्चेस, देवळांच्या आवारातल्या दीपमाळा, माडाची डौलदार झाडं, नीटनेटक्या अंगणांतली सुंदर फुलझाडं, दिवाळी असावी तशी अनेक घरांवरची, उपहारगृहांची नेत्रदीपक रोषणाई आणि वातावरणात भरून राहिलेली उत्फुल्लता. कोकण आणि गोव्यातला हा महत्वाचा फरक. दोन्ही ठिकाणी निसर्गसौंदर्यांची लयलूट सारखीच पण कोकणातली संध्याकाळ मला कायम उदास वाटत आलेली आहे. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसतशी तिथल्या वातावरणात एक खिन्नता दाटून येऊ लागते. याउलट गोव्याची मदिर संध्याकाळ प्रचंड उर्जा घेऊन नाचतच येते. गाडी रेसॉर्टच्या जवळ आली तसतशी दुतर्फा गजबजलेली दुकानं दिसू लागली. दोन्ही बाजूंच्या रेस्टॉरंट्समध्ये निवांत बसलेली परदेशी मंडळी हुक्क्याचा, (अ)पेयांचा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होती. संगीत मोठयाने वाजत होतं. गाडी रेसॉर्टमध्ये शिरली. आम्हाला खाली एक आणि वर दोन खोल्या असा व्हिला मिळाला. त्या रेसॉर्टमधली व्हिलाजची रचना, पार्किंगमध्ये फुललेला डेरेदार चाफा, पोहोण्याचा निळाशार तलाव बघताना पहली नजरमें दिल गार्डन गार्डन हो गया. या सगळ्यामुळे आमच्या बुकीने म्हटलं होतं तशी सगळ्य़ांना एकदम ’गोवावाली फिलिंग’ आली होती.





Monday, February 11, 2019

अवर्णनीय मॅच

राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा 8 नोव्हेंबर 2017   

नागपूर ला राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन स्पर्धा झाल्या होत्या. त्यात सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू ची अप्रतिम, अवर्णनीय  मॅच बघायला मिळाली. दोघीही तोडीसतोड आहे. चायना च्या वर्चस्वाला  पहिल्यांदाच धक्का देणारी सायना आणि तीच धरोहर पुढे चालवणारी सिंधू! उत्तम खेळ बघायला मिळणे एक आनंदाची बाब असते.
नागपूर ला या स्पर्धा बघायला जायची आमची जबरदस्त इच्छा होती. दोन दिवस तिथेच राहण्याची माझी आणि अवंती ची तयारी होती. पण ते जमलं नाही. मग एक दिवस जायचे ठरवले.

स्पर्धेच्या ठिकाणी आम्ही वेळेत पोहचलो. पटापट लंच आटोपून आमच्या जागेवर स्थानापन्न झालो. एवढे मोठ्ठे एअरकंडिश्नड बॅडमिंटन कोर्ट मी तरी पहिल्यांदा बघितले. 8,10 कोर्ट मावतील एवढे मोठे ते सहजच होते. तसेही बॅडमिंटन कोर्ट ची उंची जास्त असल्याने ते मोठेच असतात. पण हे जास्त मोठे वाटले. एअरकंडिशनचे मोठमोठी पाईप लाईन त्या ठिकाणी होती. हाॅल पूर्ण खचाखच भरलेला होता.  पार्किंग मध्येच गर्दीचा अंदाज आला होता. पण ओळखीमुळे बसायला जागा चांगली मिळाली.
लाईट्स आणि ग्राऊंड तर फारच उत्तम होतं. शॉर्ट सर्किट मोठ्ठे मोठ्ठे टि. व्ही होते. प्रतिकात्मक मोठ्ठ शटल एका उंच जागी लावले होते. त्यावर सुरेख लायटिंग केली होती. इतकं छान दिसत होतं ते शटल की मॅचेस् संपल्यावर तिथे उभं राहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. एकूणच सगळं वातावरण उत्साहवर्धक आणि जोशपूर्ण होतं. स्टार खेळाडूंना खेळतांना प्रत्यक्ष बघायला मिळणार हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येकाची लगबग सुरू होती आयोजक, अधिकारी, इतर कर्मचारी, प्रेक्षक सगळे आपापल्यात व्यस्त होते.

ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर अनिवार्य होती त्यामुळे सगळे खेळाडू आवर्जून आलेले होते. सायना नेहवाल, पी. व्ही सिंधू, के. श्रीकांत, एच एस प्रणॉय, कश्यप, शेट्टी,अश्विनी पोनप्पा वगैरे सगळे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला ह्या स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक होते.
अवंती ला हा इव्हेंट केवळ हौसेखातर दाखवायचा नव्हता तर हे सगळे खेळाडू या अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी किती मेहनत घेतात आणि किती आवडणार्‍या गोष्टींचा त्याग करतात हे सप्रमाण दाखवायचे होते. अंगात कसब असून चालत नाही त्या खेळाप्रती निष्ठा आणि प्रचंड मेहनत तुमचं जीवन कसं बदलतं हे तिनी समजून घ्यावे असं वाटलं.

कोर्ट आणि त्यावरील वातावरण सगळे अनुभवत असतांनाच आमच्या थोडेसे पुढे एका खुर्ची कडे आमची नजर गेली आम्ही बघतच राहिलो. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून सायना ची आई होती. अतिशय साधी. कुठलाही बडेजाव नाही कि मुलीचा स्टार खेळाडू असल्याचा तोरा नाही. अवंतीने मला आधी दाखवली बर सायना नेहवाल ची आई आहे पण मला वाटलं ही स्वतः चा थाट करेल तर अगदी आपल्यातली वाटावी इतका त्यांच्या वावर सहज होता. नंतर आम्ही छान फोटो काढले त्यांच्या सोबत. आप सायना की मम्मी हो न? त्या छान हसल्या आणि हो म्हणाल्या. अवंती कडे बोट दाखवून मी म्हटले ये हमारी सायना है। 
Men's singles, men'doubles, mix doubles अशा सगळ्या एंट्री होत्या पण सगळे वाट बघत होते सायना आणि सिंधू च्या मॅचची. इतका मोठा सोहळा आणि राजकारणी मंडळी नाही असे तर कदापिही शक्य नव्हते, आणि ते ही तिथलेच मुख्यमंत्री असताना.  मुख्यमंत्री  त्यांच्या लवाजम्यासह वेळेत पोहचले. आता किती वेळ घेतात? या भितीने म्हणा किंवा कंटाळा येणार म्हणून पोटात गोळा आला. कारण सायना /सिंधू ची मॅच बघण्याची उत्सुकता. पण आमच्या सुदैवाने मुख्यमंत्री महोदयांनी लोकांचा कल ओळखून कार्यक्रम वेळेत आटोपला. आणि स्वतः देखील उत्सुकतेने मॅच बघत होते.

दोघी कोर्ट वर आपापल्या किट घेऊन आल्या. दोघींच्या फॅन्सने जोरदार स्वागत केले. टॉस करून मॅच ला सुरुवात झाली. विश्वास बसत नव्हता कि आम्ही खरचं मॅच बघतो आहोत. दोघींची सर्व्हिस, रिटर्न्स, स्मॅश, प्लेसिंग सगळंच अफलातून आहे. काय कंट्रोल आहे मनगटावर! एक जोरदार फटका मारते कि दुसरी अलगद नेट जवळ शेटल ठेवते. एक फुल टॉस मारते तर दुसरी क्रॉसकोर्ट स्मॅश मारते.  स्पॉन्सर्स ने प्रेक्षकांना क्लॅपिंग बलून स्टीक स्पॉन्सर्स  वाटल्या होत्या. जिला पॉइंट मिळेल तिचे फॅन्स जोरजोरात त्या स्टिक वाजवून दोघींना चिअरींग करीत होते. बॅडमिंटन हा जरी शारीरिक खेळ असला तरी तो  डोक लावून खेळावा लागतो. प्रतिस्पर्धी च्या हातात शेटल जाऊ न देता खेळावे लागते. बघतांना असं वाटतं की किती सोपा गेम आहे पण जेव्हा खेळून बघतो तेव्हा लक्षात येतं की दमवणारा गेम आहे. शारीरिक क्षमतांबरोबरच मानसिक क्षमतांचा कस लागतो. डोकं थंड ठेवून कसे खेळायचे याचे सुध्दा प्रशिक्षण या स्टार खेळाडूंना दिलेले असते. हा मानसिक खंबीरपणा रोजच्या जीवनात पण खूप कामी पडते. 

चुरशीच्या सामन्यात सायना जिंकली. अनुभव आणि नशीब दोन्ही तिच्या सोबत होते. मॅच संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ  सुरू होईपर्यंत जो काही थोडा वेळ लागतो त्या वेळात सायना नेहवाल सुरक्षा रक्षकांच्या कड्यात खुर्चीवर बसली होती. कोणीही फॅन्स तिच्या जवळपास जाऊन फोटो किंवा आॅटोग्राफ घेऊ शकत नव्हते. सिंधू पण अशीच सुरक्षा रक्षकांच्या कड्यात खुर्चीवर बसली होती. या उलट के. श्रीकांत मस्त सगळ्या प्रेक्षकांमध्ये मिसळत होता. छान फोटो काढून घेत होता. मस्त एन्जॉय करत होता. या खेळाडूंचे प्रशिक्षक, नॅशनल कोच आंतरराष्ट्रीय ख्याति चे पी. गोपीचंद हे पण प्रेक्षकांमध्ये छान मिसळत होते. फोटो काढू देत होते.
बक्षीस समारंभ पटकन झाला पण आणि दोघी तिथून हॉटेल वर गेल्यासुध्दा! पण आम्ही मात्र त्या वातावरणात बरेच रेंगाळलो. ते भारलेपण नंतरही आमच्यात बरेच दिवस राहिले. सायना, सिंधू ची मॅच आम्ही याची देही याची डोळा बघितली हे आमच्या बॅडमिंटन च्या गृपमध्ये नंतर बरेचदा चर्चेत असायचं.

Wednesday, February 6, 2019

गो गोवा ...

तनु दिवाळीत अकोल्याला येणार नाही हे कळल
मग लक्ष्मीपूजनाची तिला सुट्टी म्हणुन त्यादिवशी सांगली अन पुढे गोआ ,असा प्लान आखला .लगेच रिझर्वेशन  केलेत .सांगली वास्को कन्फर्म नव्हत ते कन्फर्म झाल.रात्रि 9.30 ची ट्रैन होती ,4 तास लेट झाली ,इतक्या रात्रि रिक्शा मिळणार कसा ,कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस !
शेवटी अस ठरवल ,दुसऱ्या दिवशी संगीता ताई पुणयाहुन गोआ ला जाणार होती ,रस्ता तोच होता फ़क्त कोल्हापुर पर्यन्त जाव लागणार होत ,ते तनु नी सोडून दिल अस सगळा द्राविडिप्राणायाम करून एकदाचे गोव्याला पोचलो.
इंदाच घर टेकड़ीवर ,सभोवती दाट झाड़ी ,घराच्या बाजूला सुगंध पसरवणारा चाफ़ा अन त्यालागत निळेशार पाणी असलेला स्विमिंग पूल ! आहाहा ! पाहुनच दिल खुश झाला.

आम्ही सगळे ,आई बाबा, तिघि बहिणी, जावई ,बच्चा पार्टी खुप दिवसांनी एकत्र जमलो होतो अपवाद फ़क्त तनु अन साकेत चा! पुढचे चार दिवस गप्पा आणि भटकंति मधे  कसे गेले कळल नाही.
गर्दीचे प्रसिद्ध बीच सोडून अनवट ,बीचेस ला जायच अस आम्ही ठरवल होत.
बम्बोलीन ,अंजुना ,बतालबेट्टीम ,सिरिदाओ ,सगळे बीचेस तर सुंदरच होते पण बीच कड़े जाणारे रस्ते  सुद्धा प्रेक्षणीय होते .अरुंद,नागमोड़ी वळणाचे रस्ते आणि दुतर्फ़ा पाम ,नारळची झाड़ ! सिरिदाओ बीच तर आम्हाला अचानक दिसला अन तीथला नयनरम्य सूर्यास्त बघता आला.
प्रसिद्ध असलेल्या पैकी फ़क्त बागा बीच ला गेलो ,तिथे सकाळी 6 ला पण गर्दी होती अन  कचरा पण खुप होता .सिरिदाओ बीच वर शंख शिम्पले खुप होते ,अंजुना बीच खडकाळ होता ,बम्बोलीन शांत ,गंभीर ,तर बतालबेट्टीम ,ओहोटी असल्यामुळे की काय ओढग्रस्त माणसा सारखा वाटला. कुठे पांढरी शुभ्र बारीक वाळू तर कुठे सोनेरी वाळू ,एकच समुद्र पण प्रत्येक किनारा वेगळा ! एकाच माणसाची आपण परिस्थिति नुसार वेगवेगळी रूप बघतो तस काहीस हे वाटल.
एक मात्र प्रकर्षाने जाणवल आपल्या इथल्या बीचेस पेक्षा परदेशतले बीचेस कैकपटीनी स्वच्छ आहेत.अर्थात त्यानी समुद्राच्या विशाल सौंदर्यात काही फरक पडत नाही.किनारयापालिकडला तो अथांग जलसमुदाय आपल्याच मस्तीत असतो.ओहोटी मुले आलेला कचरा भरतीच्या वेळी किनारयावर टाकून स्वतः निर्मळ राहणाऱ्या समुद्राच मला कायमच आकर्षण वाटत आल आहे.

बीच इतकच प्रसिद्ध आहे गोव्याच नाईट लाइफ अन कैसिनो.यावेळी नाईट क्लब ला जायच च अस ठरऊनआलो होतो.रात्रि 10 ला तयार होऊन निघलो ।कबाना क्लब ला गेलो तो बंद पडला अस कळल ,मग LKP क्लब ला गेलो ,तिथे फ़क्त 18 ते 30 वयापर्यन्त एंट्री होती ,श्रिया ,वेद वगळता आम्ही सगळे 40 + होतो.LKP क्लब नी पहिल्यांदाच आमचा वय झाल्याची जाणीव करून दिली.पण आम्ही हार जाणार नव्हतो.आमचा मोर्चा टीटोस क्लब कड़े वळला ,अरुन्द गल्लीत असलेला हा क्लब अतिशय फेमस आहे. तिथे गेलो तर बाहेरपर्यंत गाड्यांची इतकी रांग होती ,की तिथे पोचायला सकाळ उजाडली असती.शेवटी 10- 12 km.भटकून रात्रि 12 ला  लौटके बद्दू घर को आये !

दिवाळीच्या सुटयांमुळे गोव्याला खूपच गर्दी होती ,कुठेही गेल तरी ट्रैफिक जाम ठरलेलाच  ,स्थानिक लोकांचे काय हाल होत असतील देव जाणे.
गोव्यात टूरिस्ट ची गर्दी होण्याच अजुन एक कारण म्हणजे तिथे सहज आणि स्वस्त मिळणारी दारू !
पाण्यासारखी दारू मिळते म्हंटल तरी चालेल.जागोजागी वाइन शॉप्स आहेत ,एका शॉप मधे तर मालक बाई होत्या ,त्या सहजतेने गिऱहाइकाला हवा तो ब्रांड काढून देत होत्या.
गोआ आहे मात्र निःसंशय सुंदर .सगळे रस्ते ,अगदी आतल्या भागातल्या रसत्यंनवर ही खड्डे नव्हते .दुतर्फ़ा दाट झाड़ी अन त्यातून डोकावणारी कौलारू घर.आपल्या इकडली गांव कशी एकमेकांपासून फटकुन असतात ,तस इथे नाही ,इथली गांव एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नांदतात.गांव अस संपतच नाही. याच मुख्य कारण म्हणजे मांडवी अन झुआरी या विशाल पात्र असलेल्या नदया आणि अरबी समुद्र !
पाण्याचा विस्तार खुप असल्याने गावाचा विस्तार व्हायला जागाच नाही  ,त्यामुळे इथली गांव एकमेकात गुम्फ्लेली आहेत.गावचा जो भाग  टेकड़ीवर आहे, जस इंदाच घर पोर्वोरिम मधे टेकड़ीवर ,तर तो भाग आल्टो पोर्वोरिम ,अन टेकडीखालच गांव बतिम पोर्वोरिम.याच पोर्वोरिम मधे चार्ल्स शोभराज ला जिथे पकड़ल ते .हॉटेल o' coquerio  आहे.तिथे अजुन एक गंमत दिसली ,शेवटी आलेल्या 'म' च उच्चार तीथले लोक करत नाहीत ,पोर्वोरिम ला परी म्हणायचे ,दाबोलिम तिथला एयरपोर्ट त्याला दबोली म्हणतात.

आम्ही गोव्याला गेलो ते दीवाळीत पण तिथे फ़क्त नरकचतुर्थी ला मुख्य दिवाळी असते.नरकासुराचे पुतले बनउन रात्र भर मिरवणूक काढतात अन सकाळी त्याच दहन करतात.बाकी दिवशी फटाके नाहीत रोषणाई नाही ,खरेदीची लगबग नाही ,एकदम शांत होत सगळीकडे.
4 दिवस खुप भटकलो ,जीवाच गोआ केल पण मन भरल नाही.नाईट क्लब रहिलाच आहे त्यामुळे परत गोव्याला येणार अस इंदा ला सांगून गोव्याचा निरोप घेतला

टाळी,एक उत्स्फूर्त दाद

मराठीत टाळी,हिंदीत ताली आणी इंग्रजीत clap . अवघा दोन अक्षरी शब्द. पण हया दोन अक्षरी शब्दात  एक अनोखी जादू आहे.एखाद्याला प्रसन्न करणयाची,एखाद्याला प्रेरणा देणयाची,एखाद्याकडून दाद मागणयाची.टाळी हया छोटयाशा शब्दात त्याचं स्वतःच असं एक संगीतआहे.एक लय आहे.टाळया कुठे,कुठे आणी किती प्रकारे वाजवलया जातात,हे बघणे देखील मोठे गंमतीशीर आहे बरं का.
 'दे टाळी'! खूप जणांना टाळी मागायची सवय असते.आपलया म्हणणयाला दुजोरा मिळवणयासाठी अशी टाळी मागितली जाते. आणी टाळी देणाराही तितकाच उस्ताही असेल तर मग दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद विचारायलाच नको.  
 
   ."अमुक अमुक साठी एकदा जोरदार  टाळया झालया पाहिजेत"  किवा " तालियाँ बजती रेहेनी चाहिए!" अशा प्रकारच्या टाळया हया प्रेक्षक वर्गाकडून दाद मागणयासाठी,कलाकारांचा उस्ताह वाढवणयासाठी मागितलया जातात. रसिक वर्गही तितकाच दर्दी असेल तर मग टाळयांच्या कडकडाटात प्रेक्षाग्रुह दणाणून जातं. टाळयांचा वर्षाव हा कलाकारांना आनंद सागरात चिंब भिजवणयासाठी असतो जणू.
      आपण सर्वसाधारणपणे कोणत्याही सांसंस्कृतिक कार्यक्रमाला जातो,,तेव्हा त्यातील एखाद्या उत्स्फूर्त कलेसाठी नकळतपणे टाळया वाजवलया जातात.मग ते एखाद्या गायक/गायिकेनं गायलेलं गीत असो,एखाद्या नर्तक/नर्तकीनं सादर केलेला नृत्याचा मनमोहक अविष्कार असो,चित्रपट,नाटकातील,अभिनेत्याचा सर्वोक्रुष्ट्र अभिनय असो वा दर्जेदार संवाद असोत----हया सगळयासाठी  उत्स्फूर्तपणे टाळया वाजवलया तात.थोडक्यात  काय तर 'टाळी' हा मनापासून आवडलेलया  गोष्ठीसाठी  दाद देणयाचा एक        प्रकार आहे.
     एखाद्या  जातिवंत कलाकारासाठी तर टाळी हे एक वरदानही आहे आणी शाप देखील. टाळी ही कलाकाराच्या उत्तम कामासाठी(कलेसाठी) श्रोते,      ,प्रेक्षक हयांच्याकडून मिळालेली पसंतीची पोच पावती असते.,जी त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरत असते.त्याचा उत्साह  द्विगुणित करते. त्याचं मनोबल वाढवते.हया द्रुष्ठीने वरदान,आणी शाप अशा अर्थाने, की एकदा का प्रसिद्धीचं  गारुड मनावर चढलं की त्याचीही नशा व्हायला लागते. कलाकार त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही.टाळी ची 'झिंग' नसानसात भिनायला लागली की तो त्याच्या आहारी जातो.तो अर्थात,त्याच अपेक्षेने  त्याची कला सादर करण्याचा प्रयत्न करतो. 
कालांतराने श्रोते,प्रेक्षक हया वर्गाची अभिरुची बदललया मुळे म्हणा किवा कलेच्या अविष्कारात कमतरता भासलयामुळे म्हणा,अपेक्षा पूर्ण न झालयास तो नैराशये कडे झुकू लागतो. 

     असो. तर टाळी हया प्रकाराकडे आपण फक्त सकारात्मक द्रुष्टीनेच पाहू या.
टाळी हे एक प्रकारचं वाद्य आहे.हातांचा सहभाग असलेलं एक अनुपम वाद्य. 'टाळी एका हाताने कधी वाजत नाही,' असेही बऱ्याचदा बोलले जाते.अर्थात,ते उपरोधानेच अधिकत:बोलले जाते.चूक काय एकाचीच असेल?अशा अर्थाने.नकारात्मक भाव वगळला तर एक सुंदर अर्थ हया वाक्यामागे दडला आहे.कसा तो पहा. टाळी एका हाताने कधी वाजत नसते,पण ती जेव्हा दोनही हातांनी वाजते,तेव्हा 'नमस्काराची' गतिशील मुद्रा समजली जाते.

पंडित रवि शंकरजी, कुमार गंधर्व,भिमसेन जोशी,किशोरी आमोणकर सारखी असामान्य कलाकार मंडळी,ह्यांच्याप्रति हे तंतोतंत लागू होईल. दोन्ही हातानी तबला वाजवणारे झाकीर हुसेनजी,दैवी आवाजाची देणगी लाभलेली  गान सरस्वती लता दीदी,दर्जेदार काव्य निर्मिती करणारे गुलजार जी-----ही यादी खूप मोठी होईल.अशा व्यक्तिमत्व असलेल्यां न साठी जेव्हा टाळ्या वाजवलया जातात,तेव्हा त्या टाळी चा अर्थ,आपण त्यांच्या कलेपुढे नतमस्तक झालेलो असतो,हाच आहे. 

      टाळी चा एक सर्वसंमत आणि सर्वानाच ज्ञात असलेला प्रकार म्हणजे 'आरतीच्या 'प्रसंगी वाजवली जाणारी टाळी. ह्यात आरतीच्या लयी नुसार टाळी ची देखील लय बदलते बरं का.प्रत्येकाची आरतीसाठी वाजवली जाणारी टाळी, अर्थात पद्धत वेगळी असू शकते.ह्या सगळ्या प्रकारातून अगदी भिन्न असा एक प्रकार म्हणजे मनोमन वाजवली जाणारी टाळी. प्रत्यक्षात टाळी वाजवली जात नसली तरी मनापासून दाद दिली जाते काही ठिकाणी.आपण एखाद्या चित्र-संग्रहालयात जातो,आर्ट गॅलरी ला भेट देतो,तेव्हा एखादी अप्रतिम मूर्तिकला,शिल्पकला किंवा चित्रकला पाहून "वाह"! अशी आपल्याही नकळत मनोमन दाद दिलीच जाते. एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते जर खूप आवडले,मनाला भिडले तर आपण उद्गारतो,"सुरेख,मस्त"! "काय कमाल लिहिलंय"!"व्वा!" ही एक प्रकारे  अप्रत्यक्षरीत्या वाजवलेली टाळी च नाही का? आपण निसर्गाच्या सानिध्यात असलो तर जाणवेल कीं झाडांची पाने देखील टाळ्या वाजवीत असतात. जेव्हा एक पान दुसऱ्या पानाला भिडते, तेव्हा,"पत्ते बजा रहे थें ताली---"अशी  काव्यपंक्ती तयार होते.

      टाळी मौन स्वरूपात वाजवली जावी,असाही आग्रह असतो  काही ठिकाणी.रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये कोणत्याही कार्यक्रमा च्या मध्ये किंवा शेवटी टाळ्या वाजवलया जात नाहीत.त्या ऐवजी "साधु-साधु" असे म्हटले जाते.समशेर बहादूरसिंग च्या कविता ऐकताना एखादी रचना,एखादी ओळ कितीही आवडली तरी कुणीही टाळी वाजवत नाहीत. काही कलाकृती अशाच असतात,ज्या ठिकाणी "मौन" हीच खरी दाद असते. ऐकणारा,पाहणारा जर तल्लीन होऊन आत्मभान विसरत असेल तर टाळी ची गरजच भासत नाही . असो. 
        तर टाळी हा आनंद,आवड व्यक्त करण्याचा एक उत्स्फूर्त प्रकार आहे,हे तर सिद्ध झालं च आहे,पण तो एक योगा प्रकारही आहे .जोरजोराने टाळ्या वाजवल्याने व्यक्ती आनंदी होऊ शकते,असे म्हणतात . दोन्ही हातांचे एकमेकांवर घर्षण होतं, तेव्हा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,जी माणसाच्या मनोवृत्तीत बदल घडवू शकते. 

       लहान मूल जेव्हा चालायला शिकतं, पहिलं  पाऊल टाकतं, पहिला शब्द उच्चारत,तेव्हा घरातील मंडळी आनंदाने टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहित करतात. एखाद्या तिसऱ्या व्यक्ती साठी (जी आपली कुणीही नाही) टाळी वाजवणं म्हणजे मनाचा मोठेपणा. तेव्हा,चांगल्या गोष्टींसाठी,जिथे जिथे आवश्यक आहे,तिथे तिथे टाळी वाजवायला विसरू नका. मनापासून दाद द्यायला कधी कचरू नका.

Tuesday, February 5, 2019

रोपण





"दिवस आता मोठा होतोय, नाही का?" असं कालच कुणीतरी म्हणालं. हो आहे खरं तसंच काहीसं... ऋतु बदलतोय. हळूच कड फेरल्यासारखा दिवसागणिक थोडाथोडा बदल होतोय. कडाकडा वाजणारी थंडी चोरपावलांनी बाहेर जातेय. संधीप्रकाशाची अलीकडची वेळ थोडी पलीकडे गेली आहे, असं वाटतंय. बदल आपल्याला जाणवतोय.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. ते एक निसर्गचक्र आहे. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा नि पुन्हा उन्हाळा! क्रमानुसार बदलत राहतातच. या निसर्ग बदला मागची शास्त्रीय कारणं काहीही असोत पण साहित्यिकांनी मात्र निसर्ग बदलाच्या या वास्तवात आपल्या कल्पनांचे रंग भरलेले दिसतात.  
कधी प्रेमाच्या अनावर ओढीनं धो धो कोसळणारा मेघ त्यांना दिसतो. तर कधी जलद भरून निघालेल्या अनिलगणांची कल्पना त्यांना भारून टाकते. शतकानुशतकाला उरून पुरेल असे पृथ्वीचे प्रेमगीत ते उतरवतात. धरतीवर पसरलेली हिरवीकंच शाल त्यांच्या नजरेला दिसते तसंच आईची माया धरतीच्या रूपात लेखणीतून प्रकटते. प्रत्येकाची आपली अशी कल्पना शक्ती! मराठी असो अथवा इतर कोणतीही भाषा प्रत्येकीत असे प्रतिभेचे पंख ल्यायलेले शब्दपक्षी भरारी मारताना दिसतात. कधी ते आधुनिक असतात तर कधी त्याला पारंपारिक लोककथांची जोड असते. निसर्गातील घटितांवर मानवी भावनांचे रोपण केलेले त्यात दिसते. जसं समुद्राच्या किना-याकडे झेपावणा-या लाटा विशिष्ट प्रकारचा आवाज निर्माण करतात. ज्याला 'गाज' म्हटलं जातं. लाटा किना-यांवर आदळणं नि निर्माण होणारा आवाज...ही निसर्गक्रिया! पण झुलू दंतकथा सांगते की, "ओंजळीत सूर्य घेऊन हेलकावे खाणारी शापभ्रष्ट चंद्रदेवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. या चंद्रदेवतेचं गाणं म्हणजे सागराचा निनाद! समुद्राची गाज!मानवी भावनांचं व्याकुळ रूप या निसर्गक्रियेला दिलेलं दिसतंय.
अशा अनेक कथा विविध भाषासंस्कृतीत पानोपानी सापडतात.
 वास्तवाला भावनांची किनार लाभलेल्या या लोककथा! नदीप्रमाणं प्रवाही! सृष्टी जीवनाची मूल्ये जपणा-या!  लोककथांचा स्वभाव एवढा लाघवी व लवचिक असतो की त्या विविध देशात, निरनिराळ्या प्रदेशात तिथले स्थानिकरूप धारण करून रूळतात. ओठांवर विसावतात नि मनामनात स्थान मिळवतात.
दिवस आता मोठा होतोय, नाही का?' हे कुणीतरी म्हणालं आणि लक्षात आलं की आता उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागतेय. त्या पाठोपाठ लगेच आठवली दुर्गा भागवतांच्या पुस्तकात वाचलेली ग्रीक लोककथा. त्याकथेनं निसर्ग चक्र सांगितलं आहे पण त्यासाठी कारण मात्र, शास्त्रीय नव्हे तर मानवी भावनांचं शोधलं आहे. ती कथा साधारण अशी आहे, "पूर्वी पृथ्वी बाराही महिने हिरवीगार अनेक रंगांनी नटलेली होती. या भूदेवतेची, डिमीटरची आणि देवांचा राजा झ्यूस (ज्युपीटर) यांची तरूण सुंदर मुलगी पर्सेफोन (काही ठिकाणी तिचा उल्लेख 'प्रासरपिना' असाही आहे). एक दिवस पाताळाचा राजा प्लुटोच्या ती नजरेस पडते. त्या सौंदर्यवतीचं तो अपहरण करतो. डिमीटर चिडते. सारी सृष्टी नापिक ओसाड करते. हे संकट टाळण्यासाठी झ्यूस प्लुटोला राजकन्येला सोडून देण्याची आज्ञा करतो. पण दरम्यानच्या काळात लग्नसंबंध निश्चित करणारे डाळिबाचे दाणे ती खाते. आता काय करावे? नवरा की आई? पेच निर्माण होतो. मग असा तोडगा निघतो की पर्सेफोनने आठ महिने आई जवळ आणि चार महिने नव-याजवळ रहावे. त्यामुळे ती जेव्हा आईजवळ असते त्याकाळात पृथ्वी आनंदानं डोलत असते आणि जेव्हा ती नव-याजवळ असते तेव्हाच्या चार महिन्याच्या काळात व्यथीत भूदेवता मलूल दिसते."
उन्हाळा-हिवाळा-पावसाळा या ऋतूची वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याला आईमुलीतील भावबंधाचा कथाभाग यात जोडण्यात आला आहे. ही ग्रीक लोककथा आहे पण आपल्या भारतीय कथा सुद्धा अशाच निसर्ग घटितांवर मानवी भावनांचं रोपण करणा-या आहेत.   "सूर्यदेवाच्या प्रतारणेमुळे देहत्याग केलेली प्रणयिनी आणि तिच्या राखेतून उगवलेले रोपटे...जे रात्री फुलते. सुगंधाची बरसात करते पण सूर्य उगवला की मोतीपोवळ्याचे सुगंधी पुष्परूप धरणीवर अश्रू सोडीत राहते. प्रेमाची सुकुमारता, शुभ्रवर्ण शुचिता आणि प्रणयाच्या रक्तवर्ण व्यथेची आरक्तता असणारी ही नाजूक फुलं असतात. पण केवळ पहाटेच्या, सकाळच्या वेळेतच. सबंध दिवस ते झाड रूक्ष नि कळाहीन होऊन उदासवाणं उभं असतं. ते झाड म्हणजे पारिजात!"  चढत्या दिवसा बरोबर मलूल होणारी पारिजातकाची फुलं लक्षात घेऊन कोणीतरी रचलेली ही कथा...वर्षानुवर्षे लोकांच्या ओठावर रूळलेली...थोडेफार संदर्भ बदललेत तरी मूळ आशय तोच ठेवून या लोककथा वाहात असतात. देशप्रदेशाच्या सिमांची बंधनं नसतात. भाषा भिन्नत्वाची अडचण नसते. एकीकडची कथा दुसरीकडे चटकन सामावते. कारण त्यात निसर्ग लोकभावनेचं रूप घेऊन येतो म्हणून परका न वाटता आपला वाटत असतो.
निसर्गचक्रावरून सुरू झालेलं विचारचक्र सुसाट धावत सुटलंय. पण भान ठेवत ते कुठेतरी थांबवायला हवं. तेव्हा, जाताजाता एक गोंड उखाणा सांगते आणि थांबते..."दो बहिना उनका जुड गया हेत, दो बहिनों के पेट मे लडका एक"
उत्तरासाठी माहित असावी लागते आकाश आणि समुद्र यांची शिंपली...नि त्या शिंपलीतला मोती...!

ऑंटी मत कहो ना

आजच्या काळात अनेक गोष्टी नवीन घडताहेत. जुन्या पद्धती बाद होत चालल्यात. आधुनिक, अत्याधुनिक
आणि अती अत्याधुनिक होत चाललेल्या माणसांना साध्या साध्या गोष्टी मात्र कळेनाशा झाल्यात.
परवा मुलाच्या शाळेत मिटींगला गेले. पार्किंग लहान, त्यामुळे गाड्या जागा मिळेल तशा ठेवलेल्या. मी
गाडीजवळ पोहचले, तसे एक पालक मला म्हणतात, “आंटी, आप गाडी निकाल रहे हो क्या?” तो जवळपास
पन्नाशीच्या घरातला पुरुष होता. त्याने ‘आंटी’ म्हणावं, म्हणजे मी चाळीशीत सत्तरीची दिसतेय की काय, अशी
शंका माझ्या मनाला कुरतडू लागली. मला चैन पडेना. आंटी शब्द माझ्या डोक्यात, कानात, मनात घोळत
राहिला, अगदी त्या tv वरच्या जाहिरातीसारखा! बरं, माझे केसबिस काही पिकलेले दिसत नव्हते, मिटींगच्या
आधी मेंदिबिंदी लावून काळे केलेले होते. तरी आंटी! शेवटी धैर्य करून एका मैत्रिणीजवळ मन मोकळं केलं, तर
तिलाही असे अनुभव आलेले. ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरली असता तिथल्या एका हाउसकीपिंग
वाल्याने तिला ‘आंटी’ म्हटलं होतं. तोही तिच्यापेक्षा काही फार लहान नव्हता. तीही अशीच वैतागली होती.
तिसरी एक मैत्रीण किराणा दुकानात गेली असता तिथल्या पस्तिशीच्या नोकराने तिला आंटी म्हटलं तर चौथ्या
मैत्रिणीला एका हॉस्पिटलच्या wardboy ने. पाचव्या मैत्रिणीला एका बस कंडक्टरने आंटी म्हटलं, तर तिने
त्याला उतरताना ‘बेटा, मेरे 5 रुपये बाकी है”, म्हणून छोटासा सूड घेतला. कंडक्टर तिच्यापेक्षा मोठा दिसत
होता, तरी. एका मैत्रिणीला एक भाजीवाला नेहमी आंटी म्हणायचा. शेवटी तिने त्याला आजोबा म्हणायला
सुरुवात केली.

काय चाललंय हे? विवाहित बाई दिसली की तिला ‘आंटी’ म्हणायचं, हा जणू अलिखित नियम होत चाललाय.
स्त्रियांना वय विचारू नये, हा जसा शिष्टाचाराचा नियम आहे, तसा यासंदर्भात काही नियम करता येईल का?
अब्रूनुकसानीचा किंवा मानसिक छळाचा दावा दाखल करता येईल का? किमान एखादी जनहित याचिका तरी,
जनतेच्या आत्मसन्मानार्थ ? एका वकील मैत्रिणीला विचारलं तर केस उभीच राहू शकत नाही असं तिचं मत
पडलं. त्यामुळे तो बेत रहित करावा लागला.
मी जरा जास्तच चौकसपणे या विषयाचा मागोवा घ्यायला लागले, तेव्हा कळलं की पुरुषांनाही असं बरोबरीच्या
व्यक्तींनी काका वगैरे म्हटलेलं आवडत नाही. एका लहान मुलांच्या गाण्यांच्या रिअॅलिटी शो मध्ये पस्तिशीची
होस्टेस कम अँकर सहभागी मुलांच्या वडिलांना सतत ‘काका’ म्हणते तेही (त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही)
खटकतंच ना?
मध्यंतरी वाचलेल्या एका आत्मचरित्रात त्या लेखकानेही आपल्याला ‘काका’ म्हटल्याचा कसा राग आला, याचं
वर्णन केल्याचं आठवलं. लेखक त्यावेळी चाळीशीत होता तर काका म्हणणारा तरुण नवविवाहित. मग लेखकाने
आपल्या मुलाला (वय वर्षे १०/१२) ‘त्या’ तरुणाशी बोलायला पाठवलं आणि आवर्जून ‘काका’ हे संबोधन
वापरायला लावलं. गंमत म्हणजे ‘काका’ हे संबोधन ऐकताच तोही चिडला!

यावर नुसता विचार करून चालणार नाही, कृती करायला हवी हे मनात ठरवून विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली.
‘तुम्ही ‘आंटी’ कुणाला म्हणता?’ या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं. तरुण पिढी याबाबत
पुरती गोंधळलेली होती. ‘म्हणजे अशा जराश्या ओल्डर लेडीज असतात ना, त्यांना.’ हे एकाचं उत्तर. (आता ‘अशा
जराश्या ओल्डर’ म्हणजे काय यांवर ‘अशा नसतात का थोड्याफार ओल्डर’ यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मिळू
शकलं नाही.) दुसरा उत्तरला, ‘मॅरीड लेडीज म्हणजे ‘आंटी’!’ (त्याच्या वर्गमैत्रिणीचं तीन महिन्यांनी टी वाय ची
परीक्षा झाल्यावर लग्न होतं. ती हे ऐकून चित्कारली, ‘अय्या, सच्या, तू तीन महिन्यांनी मलापण ‘आंटी’
म्हणणार?’) तिसऱ्याने सरळसरळ शरणागती पत्करत मलाच विचारलं, ‘खरंच म्याडम, कुणाला म्हणायचं हो
‘आंटी’?’ यावर मी ‘अरे, तुमच्या मित्राच्या आईला किंवा तुमच्या आईच्या वयाच्या कुठल्याही बाईला ‘आंटी’
म्हणता येईल.’ असं उत्तर देताच पुढला प्रश्न आला, ‘बाकीच्यांना काय म्हणायचं?’ मग मी वयानुसार, वैवाहिक
स्थितीनुसार, त्या स्त्रीशी असलेल्या आपल्या नात्यानुसार, ज्या ठिकाणी (कॉलेज/देऊळ/घर इ.) ती भेटली त्या
जागेनुसार ‘बेटा’, ‘ताई’, ‘वहिनी’, ‘काकी/आत्या/आंटी’, ‘आजी’ ही संबोधने कशी वापरावीत यावर एक छोटंसं
बौद्धिक घेतलं. (विदर्भात ‘मावशी’ नि कोल्हापुरात ‘मामी’ ही संबोधनेदेखील आदरार्थी वापरतात हेही आवर्जून
सांगितलं.) आणि अगदीच समोरच्या सुकांत चंद्राननेचं वय समजतच नसेल, तर ‘मॅडम’ हे संबोधन आहेच, हेही
जोडलं. ह्याच चालीवर पुरुषांनाही ‘दादा, भाऊ, काका, मामा, आजोबा’ यापैकी कुठलं संबोधन केव्हा निवडावं
आणि प्रसंगी ‘सर’ हे ‘एव्हरग्रीन’ संबोधन कसं खुबीने वापरावं, हेही सांगितलं. पुलंच्या ‘ती फुलराणी’ मधली
खेडवळ मंजुळा ‘हा’ प्रश्न कसा कौशल्याने सोडवते, “(पुरुष) पिकल्याला आसला की ‘रामभाव’ नि तरना आसला
की ‘वसंतराव’! ” हे ऐकून मुलांनाही मजा वाटली.
कृतकृत्य झाल्याच्या आनंदात मी वर्गाबाहेर पडले. कॉरिडॉर मधून चालत असताना मागून आवाज आला, ‘आंटी,
एफ वायचा क्लास कुठला? मी नवीन जॉईन झालेय ना, त्यामुळे माहिती नाही मला.’

Monday, February 4, 2019

मानवतेची सूक्ते गाणारा प्रतिभावंत

२७ फेब्रुवारी. मराठी राजभाषा दिन. त्याहीपेक्षा तो ’किरणांचा पसारा उघडून काळोखावर तेजाची लेणी
खोदित बसलेल्या एका देवदूताचा’ जन्मदिन. ह्या देवदूताला पंख लाभले होते प्रतिभेचे. मराठी साहित्याच्या
असीम आकाशात तो यथेच्छ विहरला. दु:खी, कष्टी, निराश मनांवर आपल्या काव्याची हळुवार फुंकर घालून
त्यांना आशेचे किरण दाखवत राहिला. भरकटलेल्या मनांना ध्येयाची आठवण करून देत राहिला. दीन
दुबळ्यांच्या व्यथांना वाचा फोडत राहिला. अन्यायाविरुद्ध बंड करण्याची स्फूर्ती देत राहिला. कधी कोणा
प्रतिभावंताचं मुक्त मनाने कौतुक केलं तर कधी उन्मत्त दांभिकाना त्यांची जागा दाखवली. स्वत:ला नास्तिक
म्हणवून घेत मानवातल्या देवत्वाची दखल घेता झाला. आणि म्हणूनच या पृथ्वीपल्याड जाऊन आकाशातला
तारा बनला... होय, मराठी वाचक- रसिकांना प्रात:स्मरणीय असणार्‍या, मराठी कवितेवर अर्धशतकाहून
अधिक काळ अधिराज्य गाजवणार्‍या कुसुमाग्रजांबद्दलच मी बोलतेय.

आधुनिक मराठी काव्याचा आरंभ केशवसुत युगापासून झाला असं आपण मानतो. त्यात केशवसुत,
टिळक, गोविंदाग्रज, बालकवी, यांच्या पाठोपाठ तांबे, यशवंत आणि रविकिरण मंडळ लोकप्रिय असताना एका
नव्या तेजस्वी तार्‍याचा उदय झाला. ऐतिहासिक दृष्ट्या तो काळ गुलामगिरीचा. देशात इंग्रजांचं राज्य.
स्वातंत्र्यसंग्रामाचं स्थंडिल सतत धगधगतं. प्रत्येक जण अपापल्या परीने त्यात आहुती देत होता. कुणी
क्रांतीचे मंत्र म्हणत तर कुणी शांतीची सूक्ते. एखादे खाडिलकर नाटकांच्या माध्यमातून तर एखादे टिळक
किंवा शि. म. परांजपे पत्रकारितेतून जनजागृती करीत होते. अशा भारलेल्या वातावरणात मराठी
काव्यक्षितिजावर विशाखा नक्षत्राचा उदय झाला तो क्रांतीचा जयजयकार करीतच. स्वातंत्र्याच्या या होमात
कुसुमाग्रजांची ही समिधा विलक्षण लोकप्रिय झाली. त्यापूर्वी प्रकाशित झालेल्या जीवनलहरीपेक्षाही विशाखाने
जास्त लोकप्रियता मिळवली. आणि त्यानंतरही किनारा, समिधा, मराठी माती, हिमरेषा, वादळवेल रसयात्रा,
छंदोमयी, मुक्तायन, स्वगत हे त्यांचे संग्रह गाजले.
मात्र देशप्रेम हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा एकमेव विषय नव्हता. ही कविता मानवतेची कविता होती. मानवाच्या
आयुष्यात असंख्य भावभावनांना स्थान असतं. प्रेम, क्रोध, आशा, निराशा, अन्याय, शोषण, संघर्ष, हे मानवाच्या जीवनाचे
विविध पैलू. या सर्वांनाच स्पर्श करत एका नव्या, ताज्या दमाच्या कवीची वाटचाल सुरू झाली.
कुसुमाग्रजांच्या कवितेत सामाजिक विषमता हा महत्त्वाचा विषय होता. बळी, लिलाव, पाचोळा, सहानुभूती, माळाचे
मनोगत, म्हातारा म्हणतोय,पर्वणी, घृणास्पद, याच मातीतून अशा कवितांमधून तो व्यक्त होतो. मात्र केवळ या विषमतेला
वाचा फोडून कवी गप्प बसत नाही. तर संघर्ष, क्रांती करण्याची प्रेरणा देतो. अहिनकुल, आव्हान, आगगाडी व जमीन अशा
कविता त्यादृष्टीने महत्त्वाच्या.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कवीचं जागरूक मन चुकीच्या प्रथा-परंपरांवर आसूड ओढत राहिलं. उणीव, अखेर कमाई,
गाभारा, विशेषणे, प्रार्थना, ज्योतीराव या कवितांमधून ते दिसून येतं.
दुर्दम्य आशावाद हे कुसुमाग्रजांचं आणखी एक वैशिष्ट्य. ’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा’ हे ब्रीद
मानणाराच अफाट सागरालाही किनारा आहे म्हणून ’पामर’ म्हणू शकतो.

निसर्गाचे कवी ही कुसुमाग्रजांची ओळख कधीच नव्हती. तरी त्यांच्या कवितेत निसर्गाचा मुक्त संचार आढळतो.
त्यात ‘हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा’ श्रावण येतो, तसा मेघांच्या पळसाचा अस्तावर दिसणारा जाळही. डोळे
नसलेल्या काळोखातून चंद्रकिरणांचे रुपेरी वर्ख येतात अन केवड्यात रुतून बसतात. वर्षाऋतूचं आगमन होताच माती
‘पुलकित गंधित होते’ आणि तृणाची बीजे गर्भामधून नवा हुंकार देतात. कधी एखादा निशिगंध काळोखात दरवळत राहतो
तर कधी ‘गगनपथाचा स्वैर मुशाफिर’ असलेला वारा रांगडे गीत गातो.
प्रेम हा कवितेचा एक चिरंतन विषय आहे. मग कुसुमाग्रजांच्या कवितेतून तो कसा सुटेल? मात्र कुसुमाग्रजांच्या
कवितेतील प्रेम आंधळ किंवा अपरिपक्व नाही. या प्रेमात त्याग आहे, समर्पण आहे, उदात्तता आहे. म्हणूनच हे प्रेम मातीमध्ये
उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचू शकतं. मानवी जीवनाच्या पलीकडे जाऊन थेट सूर्यावर प्रेम करणार्‍या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गाऊ
शकतं. दुर्बळांचा क्षुद्र शृंगार झुगारून देऊन आपल्या उदात्त प्रियकराची दूरता साहू शकतं. मात्र प्रेमात आकंठ बुडाल्यावरही या
कवितेतील प्रेमीजन वास्तवतेचं भान विसरत नाहीत. त्यामुळेच क्षितिजाच्या पलीकडे दिवसाचे दूत दिसू लागताच प्रियकर
प्रेयसीला विनंती करतो, “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात”. हेच प्रेम पुढे प्रौढपणी अधिक परिपक्व होतं, तेव्हा ’ती’
’चांदण्याचे हात असलेली भावुक प्रणयिनी’ न राहता बनते एक किनारा. ‘भरकटलेल्या गलबताचा एकमेव निवारा’.
आयुष्याच्या प्रवासात तिने लाटांचं उसळलेलं तांडव मुकाट्याने सोसलेलं असतं तसे ओहोटीच्या वेळी वाळूचे कणन कण
प्राणपणाने जपलेले असतात. वादळवार्‍यात गलबताचं रक्षण करण्यासाठी ‘आपलं किनारेपण टिकवणे’ हा एकमेव ध्यास
तिच्या आयुष्याचे उद्दिष्ट बनून बसतो. मात्र प्रेमाला प्रत्येकच वेळी पूर्णता लाभत नाही. कृष्णावर प्रेम करणार्‍या गोपीच्या
रूपात कालिंदीच्या वृक्षाखाली भूतकाळचे धागे जुळवत, प्रीतीचं पूजन करत एक कृष्ण निराशा बसलेली दिसते. तिच्या
गालावर ओघळलेला सनातन अश्रू आपल्या काळजाचा ठाव घेतो. कुसुमाग्रजांच्या कवितेत भेटणारं प्रेम केवळ स्त्रीपुरुषाच्या
प्रेमापुरतं मर्यादित राहत नाही. ते एक वृत्ती म्हणून सर्व प्राणिमात्राला, चराचराला, भावभावनांना व्यापून राहतं. ते
काळाच्याही पल्याड जाऊन आपलं अस्तित्व टिकवून ठेवतं. म्हणूनच कवीच्या दृष्टीकोनातून ’प्रेम आहे माणसाच्या/ संस्कृतीचा
सारांश/ त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष/ आणि भविष्य कालातील/ त्याच्या अभ्युदयाची आशा/ एकमेव!
स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या या कवीच्या कवितांमध्ये देवही डोकावून जातोच. ‘देवाच्या दारी’ उभा राहूनही
कवीच्या मनात प्रश्न असतो, ‘आहेस की नाही/ मुळात तू’. मग ‘माझ्या जीवनाचा मीच शिलेदार’ हा साक्षात्कार झाल्यावर
‘आहेस की नाही/ आता नसे चिंता’ अशी परिस्थिती होते. सगुण साकार देवाची भक्ती, त्याच्या मूर्तीची पूजा कवीला मान्य
नाही. कवी सतत मानवात दडलेलं देवत्व शोधत असतो. त्यामुळेच बाबा आमटे यांच्यासारख्या महामानवात त्याला ईश्वरी
तत्त्व आढळतं. कवीचं ईश्वरवंदन अवकाशाकडे चालतं. ‘जेथे अस्तित्व संपले/ राहे केवळ अभाव’ अशा शून्याकडे धाव घेतं.
आणि ईश्वराकडे एकच मागणं मागतं, ‘आदित्य या तिमिरात व्हा, ऋग्वेद या हृदयात व्हा, सुजनत्व द्या, द्या आर्यता,
अनुदारता दुरिता हरा..’
...आणि ईश्वराने या नास्तिकाची मागणी पुरी केली. निराशेच्या तिमिराने झाकोळून गेलेल्या जीवांना याच्या काव्य
किरणांनी नवसंजीवनी दिली. याचं काव्य ऋग्वेदाप्रमाणेच उदात्त आणि शाश्वत ठरलं अन रसिकांच्या हृदयात ठसलं. याच्या
सुजनत्वाने अन उदारतेने अनेकांचं दुरित हरलं...
रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या प्रतिभावंताला राजमान्यताही मिळाली. साहित्य अकादमी,
ज्ञानपीठ यांसह असंख्य पुरस्कारांना कुसुमाग्रजांनी सन्मानित केलं. होय, ‘कुसुमाग्रजांना दिलं जाणं’ हा त्या पुरस्कारांचा
सन्मान होता. आपल्यासारखे वाचक, आस्वादक त्या प्रतिभेला वंदन करून एवढंच म्हणू शकतात,

“कोठून कुठे आलास खगा, केलेस मनोहर कूजन रे
ती रुमझुमता तव नादफुले हे पुलकित झाले निर्जन

रोल मॉडेल

रोल मॉडेल !आदर्श व्यक्ती- कोण असू शकतो ?तर कुणीही! स्त्री ,पुरुष, व्यावसायिक, कलाकार ,गुणी ,दुर्गुणी
कुणीही !तुम्हाला प्रश्न पडेल कि सदगुणी ठीक पण दुर्गुणही ?तर हो दुर्गुणही !हर्षद मेहता ,छोटा शकील ,तेलगी या व्यक्ती काय सन्मानाने नाव घेण्यासारख्या आहेत काय ?पण तरीही त्यांच्या मागे जाणारे काय कमी आहेत? कित्येकांचे ते रोल मॉडेल असतील ."छोटा राजन जैसा अपने को भी दुबई मे सेटल होने का है"म्हणणारे असतीलच की .

महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक ,इंदिरा गांधी ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांना आदर्श मानणारे तर देशात आणि परदेशातही असंख्य लोक आहेत. बाबा आमटे ,अण्णा हजारे अशा व्यक्ती शेकडो लोकांच्या आदर्श आहेत. प्रत्येक व्यक्तिगणिक तिचा रोल मॉडेल आणि तो तसा असण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात .
कुणी शरद पवारांच्या राजकीय कौशल्यावर फिदा असतात ,कुणी माधुरी दीक्षितच्या हास्यावर जीव ओवाळतात ,कुणाला लता मंगेशकरांचा दैवी आवाज आपले सर्वस्व वाटतो ,तर कुणाला अमिताभचा धीरगंभीर आवाज विसरता येत नाही .कुणाला डॉक्टर बंग दांपत्यसारखे आदिवासी भागात राहून खऱ्या अर्थाने लोक सेवा करण्याची इच्छा असते ,कुणी बी जी शिर्केसारखा यशस्वी व्यावसायिक बनण्याची जिद्द बाळगतो ,कोणाला श्वेता जुमानी चे अंकशास्त्राचे गणित समजून घेण्यात रस वाटतो, कुणाला संजय कपूर च्या खानाखजाना ची लज्जत विसरता येत नाही ,तर कुणाला मिलिंद गुणाजीची भटकंती भावते .कोणावर पीसी सरकारच्या हातसफाई ची जादू किती चढेल सांगता येत नाही .

एखाद्या लहान मुलीला आपल्या आईसारखेच केस हवे असतात, एखाद्या लहान मुलाला बाबांसारखे चालायचे असते .कुणाला आपल्या लाडक्या टीचर सारखेच बसायचे ,बोलायचे असते. तर कुणाला आपल्या मित्रा सारखेच खाण्यापिण्याचे पदार्थ आवडत असतात .एखादा रोल मॉडेल असणे ही केवळ लहानग्यांची  ,तरुणांचीच वेडी हौस असते असे म्हणणे  चुकीचे ठरेल त्याशिवायच का एखादा एम एफ हुसेन 'माधुरी फिदा हुसेन' म्हणविला जातो !

हा रोल मॉडेल जर क्षणिक आकर्षण न ठरता आयुष्यभराचा पथदर्शक म्हणून हवा असेल तर मात्र त्यात अनेक पथ्ये पाळावी लागतात. केवळ मुन्नाभाई सारखे मामू ...म्हणून ओरडत फिरताना तो इतरांच्या मदतीला धावून जातो हेही लक्षात ठेवावे .केवळ ऐश्वर्या सारखे विश्वसुंदरी होण्याची स्वप्ने बघण्यापेक्षा २४तास ती किती त्यासाठी प्रयत्न करत असेल हे विसरून कसे चालेल ?अंबानी, टाटा, बिर्ला सारखी अब्जावधी  कमावण्याची  ईर्ष्या असताना किती मेहनत, ज्ञान ,चौकसपणा हवा हे विसरू नये. येशू ,राम  अल्लाह  सारखे  देवत्व  मिळवायला  कीती समर्पण हवे हे लक्षात घ्यावे ..

एखाद्या सर्वांग सुंदर व्यक्तिमत्त्वाला आदर्श मानताना सर्व परीने त्यासारखे होता आले तरच तो रोल मॉडेल सार्थकी लागला असे म्हणता येईल.

Sunday, February 3, 2019

आधी लगीन.....

मुलगी शिकली, पुण्यात नोकरी करून झाली, मुंबई मध्ये स्वतःचे ऑफिस घेऊन CS ची प्रॅक्टिस सुरू झाली तसे आम्ही घरचे सगळे तिला लग्न करण्यासाठी आग्रह करू लागलो .पण मॅडम ताकास तूर लागू देईनात . पण हळू हळू आपण आत्ता फक्त विवाह मंडळात नाव नोंदवू , लग्न जमायला वेळ लागतो ,सहज एक वर्ष जाईल ,वगैरे वगैरे आमच्या सबबीवर तिने मनाची तयारी केली. आणि एकदाचे नाव नोंदवले .
    पहिल्याच दिवशी पहिलेच स्थळ आम्हा सगळ्यांना खूप आवडले आणि योगायोगाने ते स्थळ म्हणजे  आमच्या नातेवाईकांच्या मित्राचा मुलगाच आहे असे कळल्याने पटापट हालचाली सुरू झाल्या . मुलाकडच्यांनी मुंबईला भेटायला बोलावलंय असा निरोप आल्याबरोबर आम्ही सासूबाई आजारी असतांना , त्यांची जबाबदारी नणंदेवर सोपवून तात्काळ तिकीट काढून जायचे ठरवले .

      घाईतच तयारी केली आणि  ट्रेन 1.30 तास लेट असल्याचे कळले . सगळी तयारी झालेली होती पण स्टेशन वर जाऊन बसण्यापेक्षा नवऱ्याने मित्रांसोबत रोजच्या कट्ट्यावर गप्पा मारणे पसंत केले .मग मी पण विचार केला असा रापलेला चेहरा घेऊन जावई बघायला जाण्यापेक्षा जरा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन उजळून घ्यावा . मनातला विचार प्रत्यक्षात आला आणि उजळण्याच्या प्रक्रियेला जेमतेम  सुरुवात झाली आणि नवऱ्याचा कॉल आला "तुझ्या मेकअप आधीच ट्रेन ने मेकअप केलाय चल लवकर !" झाले ...चेहरा उजळण्याआधीच माझ्या मनसूब्यावर  कापसाच्या बोळा फिरला . धावतच घरी गेले तर सासूबाईंच्या तब्येतीची चौकशी करायला  दोन मैत्रिणी आल्या होत्या त्यांनीच आम्हाला सामाना सकट घाईने स्टेशनला सोडले . तर ट्रेन प्लॅटफॉर्म वर उभी दिसली . मैत्रिणींनी निःश्वास सोडला आणि त्या लगेच माघारी फिरल्या , मात्र ....
     ट्रेन जवळ पोचल्यावर कळले की आमची नियोजित ट्रेन 10 मिनिटे आधीच निघून गेलेली होती आणि ही ट्रेन पुण्याला जाणारी होती असे TC ने सांगितले पण आमचे उतरलेले चेहरे बघून म्हणा किंवा आमची कीव येऊन म्हणा किंवा दैव बलवत्तर होते म्हणून त्या TC ने आम्हाला सुचवले की या ट्रेन ने तुम्ही भुसावळ ला चला ,तिथे कदाचित आमची चुकलेली ट्रेन आम्हाला मिळेल .. आमचा नाईलाज असल्याने  आम्ही मान्य केले आणि त्या ट्रेन मध्ये चढलो. TC ने त्याची नियोजित जागा आम्हाला बसायला दिली . मी तर थोडावेळ थरथर कापत होते . पण दस्तुरखुद्द TC च मदतीला आल्यामुळे आम्ही भुसावळ पर्यंतचा प्रवास बिनधास्त विना तिकीट केला. 

        भुसावळ जसजसे जवळ येऊ लागले तसे इंटरनेट मुळे आम्हाला कळून चुकले की आमची ट्रेन आधीच भुसावळवरून निघाली होती . आता दुसरा देवदूत आमच्या मदतीला धावला..  RPF चा एक जवान आमच्या जीवाची घालमेल बघून विचारू लागला नेमके काय घडले ? सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्याने भुसावळ ला त्या वेळी येणाऱ्या ट्रेन ची माहिती घेतली. त्यानुसार 1 नंबर प्लॅटफॉर्मवर  रत्नागिरी एक्सप्रेस आलेली आहे आणि ती नियोजित वेळेपेक्षा आठ तास लेट असल्याने त्यामध्ये भरपूर सीट्स उपलब्ध आहेत असेही सांगितले. पण तीन नंबर प्लॅटफॉर्म वर आमची ट्रेन  थांबल्यावर आम्हाला धडकी भरली की आता एक नंबर प्लॅटफॉर्म वर पोचण्यासाठी दादरा चढून उतरे पर्यंत ही पण ट्रेन चुकते की काय ? आम्ही विचारात असताना आमची मनःस्थिती त्या जवानाच्या लक्षात आली . त्याने आम्ही ट्रेन मधून उतरल्याबरोबर आम्हाला तीन आणि एक नंबर प्लॅटफॉर्म ला जोडणारा छोटासा बोगदा(रास्ता) दाखवला  ,जो आम्ही उतरलो तिथेच समोर होता  . या रस्त्यामुळे आम्ही अक्षरशः 1 मिनिटात आम्हाला हव्या असलेल्या ट्रेन  पर्यंत पोचलो . RPF च्या सूचनेनुसार जी बोगी समोर येईल त्यामध्ये आम्ही जेमतेम चढलो आणि ट्रेन सुरू झाली. अख्या बोगीत आम्ही दोघे सोडून केवळ एक व्यक्ती होती .  मला उगाच पुन्हा भीती वाटू लागली ,आपण चुकीच्या ट्रेन मध्ये चढलो की काय? पण समोर असलेल्या एकमेव प्रवाश्याकडून  खात्री केल्यावर जीव भांड्यात पडला . ...

        इथून पुढे नवीन आव्हान होते कारण आमच्याजवळ दुसऱ्या ट्रेन चे तिकीट होते म्हणजे कायद्याने आम्ही विना तिकीट प्रवास करत  होतो . मला त्या एकमेव अनोळखी प्रवाश्या समोर बसवून नवरा पुन्हा TC च्या शोधात गेला . माझ्याकडे साशंक मनाने रात्रीच्या बारा वाजता गुपचूप बसून पुढे काय होतय याची वाट बघण्याशिवाय काहीच उपाय नव्हता. जवळपास अर्धा तासाने नवरा हात हलवत परत आला . TC ने सांगितले त्या बोगीतील 72 पैकी 71 सीट्स रिकाम्या असल्या तरी नाशिक आल्याशिवाय मी तुम्हाला स्लीपर बर्थ देऊ शकत नाही .. आता 3 वाजेपर्यंत असलेल्या बर्थ वर आम्ही  जेमतेम आडवे होतो न होतो तो कुठल्याश्या स्टेशन वरून एक मोठे कुटुंब चढले. नेमके त्यांचे आरक्षण  आम्ही बसलेल्या सीट्स वर होते . त्यांनी आम्हाला  सामाना सकट तिथून हलवले . मग आम्ही नाशिक येई पर्यंत डोळ्यात ( झोप असतांना )प्राण आणून TC ची वाट बघत बसलो. ...
        अखेर एकदाचे नाशिक आले . यथावकाश TC आला . आम्हाला हक्काचे बर्थ मिळाले.आम्ही आडवे झालो तेव्हा चार वाजले होते. 
       वास्तविक पाहता आम्हाला दादर ला उतरायचे होते  पण आता ही ट्रेन आम्हाला कुरल्याला नेणार होती . मात्र कुर्ला तर कुर्ला ,मुंबईला तर पोहोचू  अशी मनाची समजूत घातली . सहा वाजता कुर्ला आले. बरीच घासाघीस करून टॅक्सी ठरवली . अंधेरी पूर्व ,विजय नगर असा दोनदा पत्ता सांगितला .  एक तास प्रवास केला तरी अंधेरीच्या ओळखीच्या खुणा येईनात . पुन्हा टॅक्सी वाल्याला पत्ता घोकला तर  म्हणाला मेट्रोचे काम चालू असल्याने रस्ता बदलला , आणि आता आलेच आहे विजय नगर पुढच्या गल्लीत ! आम्ही दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले . चांगल्या हमरस्त्यावर असणारे विजय नगर गल्लीत कसे गेले ? तरी गप्प बसलो . तेवढ्यात टॅक्सी वाला म्हणाला "उतरा आता आले विजय नगर '" आम्ही बाहेर बघतो तो एकही ओळखीची खूण पटेना . मग एका वाटसरू ला विचारले तेव्हा तो म्हणाला "ये नेरळ का विजय नगर है,तुमको कौनसे विजय नगर जाना है " आता मात्र आमच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला . "लेकीच्या लग्नासाठी काहीही ".. असे म्हणत टॅक्सी वाल्याला शिव्या मोजत पुन्हा अंधेरी पूर्व च्या विजय नगर ला कूच केले . पुन्हा अर्धा तास प्रवास केला आणि पोचलो एकदाचे हव्या त्या विजय नगर ला .... हुश्श ... 
      या सर्व यातयातीमध्ये एकच समाधान ...लेकीचं लग्न जमलं .

Saturday, February 2, 2019

जायते अस्मात लीयन्ते अस्मिन्

"जायते अस्मात लीयन्ते अस्मिन्" म्हणजे 'यातूनच निर्माण होते आणि यातच विलीन होते, असे काय? तर ते आहे पाणी! आपल्या आयुष्यात पाणी जर नसेल तर?  कधी विचार केला आहे? पाण्याशिवाय जीवन, ही कल्पनाच आपण करू शकत नाही कारण पाणी म्हणजेच जीवन आहे. हे पाणी पृथ्वीवर आलं कसं? ते इथे नांदलं कसं? यापैकी एकही प्रश्न आपल्या मनात एकदा तरी निर्माण झाला आहे? कदाचित हो किंवा कदाचित नाही! पण पाणी आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे नक्की! जीवसृष्टीचा तो जन्मदाता आहे. सूर्यमालेत आणि संपूर्ण विश्वात प्रवास करणा-या शेपटीवाल्या धूमकेतूंनी हे पाणी आणलं, असं मानलं जातं. पृथ्वीवर पाणी आलं पण त्याचं नक्की वय कुणालाच सांगता येत नाही. पृथ्वीवरचं त्याचं स्थान आणि रूप बदलत राहिलं पण त्याला बाहेर पडणं शक्य नसल्यामुळे ते निर्माण झाल्यापासून आजपर्यंत आहे तितकंच आहे. काय दचकलात? पण हे खरं आहे. हो. खरंच! मी माझ्या मनचं सांगत नाही हो...!ही माहिती लिखित स्वरूपात आहे. केवळ हीच नव्हे तर अशी आश्चर्यचकित करणारी आणखी बरीच माहिती, अभिजित घोरपडे यांच्या 'पाणी ते पाणी' या पुस्तकात आपल्याला मिळते. हे पुस्तक वाचतो तेंव्हा आपण पाण्यापासून पाण्यापर्य॔तचा म्हणजेच जीवनापासून जीवनापर्य॔तचा लयबद्ध प्रवासच करतो. हा प्रवास मला इतका आवडला आहे की मी तो तिस-यांदा केला आहे. अर्थात तिनदा तेच पुस्तक काही काही दिवसाच्या अंतराने वाचलं आहे. प्रत्येकवेळी मला या पुस्तकानं नवं ज्ञानच दिलं आहे. अगदी सामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने पाण्याचं शास्त्र यात उलगडलं आहे. एकंदर सात विभाग आणि 46 प्रकरणांचं, 200 पानाचं हे पुस्तक हातात धरताना 'चुळूकभर पाणी' असतं आणि वाचून संपतं तेव्हा शोध असतो,'पाण्याच्या पर्यायांचा'!

 या मधल्या संपूर्ण प्रवासात पाणी आणि पाणीच विविध त-हेनं आपल्या सोबत असतं. ते औषध असतं, बहुरूपी होतं, ते शस्त्र असतं किंवा मनोरंजनाचं साधन असतं. पाण्याचा शोध असो की प्रवाह असो अथवा जल व्यवस्था असो की जलवाहतूक पाण्याच्या थेंबाचा इतिहास, वर्तमान आणि त्याचं भविष्य सोप्या भाषेत लेखकानं मांडलेलं आहे. पाणी जीवसृष्टीचा जन्मदाता आहे  पण त्यानं ही जीवसृष्टी टिकविण्याची जबाबदारीही स्वतःकडेच घेतली आहे. ती कशी? ते उलगडून सांगतं हे पुस्तक!
मानवाप्रमाणेच प्राणी, पक्षी यांच्याही जीवनात पाण्याचं महत्त्व आहे. तसंच ते आवश्यक आहे, वनस्पतींना! आपण मोठाले वृक्ष बघतो. त्यावर, खोडांवर वर्तुळं दिसतात. ती कशाची असतात? ती वर्तुळं झाडाचं वय तर सांगतातच पण त्याचबरोबर त्या-त्या वर्षी झाडाला पुरेसं पाणी मिळालं की नाही, याचीही साक्ष देतात. उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते कारण झाडांची पानं सर्वात जास्त पाणी उडवून लावतात म्हणून पाणी राखण्यासाठी झाडं पानांचाच त्याग करतात. आहे नं शिकण्यासारखं? निसर्ग आम्हाला वस्तूचं मोल शिकवत असतो, म्हणतात ते खरंच आहे. निवडुंगाच्या झाडाचंच बघा नं? पाण्याचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निवडुंग पानाचं रूपांतर काट्यामध्ये करतं आणि म्हणून जवळपास वर्षभर पुरेल एवढं पाणी निवडुंगाच्या खोडामध्ये असतं.
पाण्याचा एक गुणधर्म म्हणजे ते चिकट असतं. नाही विश्र्वास बसत नं? तर लगेच हात धुऊन या किंवा एखादं भांडं विसळून या आणि बघा. दिसलं? हं...पाणी हाताला, भांड्यांना चिकटलेलं दिसलं नं. या त्याच्या चिकटपणाच्या गुणधर्मांमुळे ते पेशींना चिकटतं आणि त्यामुळे पोषक घटक मिळतात. पाणी औषधाचं काम पण करतं, बरं का! एक साधा नि आपल्याला आवडणारा उपचार हे पाणी करत असतं. ते म्हणजे, वजन कमी किंवा जास्त करणे. कसं? तर जेवणाच्या प्रारंभी पाणी प्यायल्यास कृश होतो. जर जेवणाच्या मध्ये पाणी प्यायलो तर सडपातळ होतो. आणि जेवणाच्या शेवटी पाणी प्यायले तर स्थूल होतो. आहे नं गंमत!  डोकेदुखीसाठी रामबाण उपाय म्हणजे पुरेसं पाणी पिणं!


 पाणी हत्यार म्हणून कसं वापरलं गेलं त्याच्या शहाजीराजे, शिवाजीराजेंच्या काळातल्या ऐतिहासिक नोंदी आणि त्याच तंत्राचा भारतीय लष्करानं 1965 च्या युद्धात केलेला वापर, याबद्दलची माहिती वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. 
पृथ्वीवर 71% पाणी आहे पण वापरण्या योग्य फार थोडं आहे. लेखक उदाहरण देताना सांगतात की 1000 बादल्या पाणी आहे पण वापरण्यास उपयुक्त ठरेल असं पाणी किती? तर फक्त दोन पेले! ही निसर्गाची विषमता अधोरेखित करत लेखक आपल्याला पाण्याच्या अनोख्या विश्र्वात घेऊन जातात. त्यातून हत्ती, मधमाशी, पक्षी, माकडं यांच्या पाणी शोधण्याच्या पद्धती, वराह-मिहिरच्या,'बृहत् संहिते'तील  जांभूळ, उंबर, अर्जुन, पळस, वड, पिंपळ वगैरे झाडांवरून पाण्याचा शोध घेण्याच्या पद्धती कळतात.
या पुस्तकात दिलेलं जलव्यवस्थेचं उदाहरण आजही उपयोगी ठरेल असंच आहे. पांजरा नदीच्या खो-यातील फड पद्धतीने पाण्याचं समान वाटप कसं केलं जातं, ते आपल्याला कळतं. तसंच विहिरी खणणं आणि त्याद्वारे भूजलाचा वापर करणं जगाला भारतानेच शिकविलं, ही माहिती वाचताना अभिमान वाटतो. आजही देशात सुस्थितीत असणा-या ऐतिहासिक विहिरी, बारवा, बाव, आड, पुष्करणी आहेत त्याबद्दल सांगत पाणपोईचा (नावाचा) इतिहास विशद करत पुढच्या टप्प्यावर हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं. आता इतकी माहिती सांगितल्यावर पुढे काय नवे असणार?  असा आपण विचारच करत असतो तोवर 'पानी तेरे कितने नाम?' तर आपल्यासमोर येतात जवळपास 175 नावं! कोणती आहेत ही नावं? तर,


पोषण करतं म्हणून 'जीवन', जीवसृष्टीचा जन्मदाता म्हणून 'भुवनम्', शुद्ध करतं म्हणून 'शुध', औषध आहे म्हणून 'भेषजम्', तृप्त करतं म्हणून 'तृप्तिः', पृथ्वीवर मुक्कामी असतं म्हणून 'कुश', देशोदेशी विहार करतं त्यामुळे 'ऋत', पाणी स्वतः वहात जातं म्हणून 'वाणीः', खळखळाट करत जातं म्हणून 'सलिलम्', आवाज करतं म्हणून 'बृबूक', अशी अनेकविध वैशिष्ट्य सांगणारी पाण्याची नावं या पुस्तकातून आपल्याला कळतात.
केवळ नावंच नव्हे तर प्राणीमात्रांच्या पाणी पिण्याच्या त-हा आणि त्या तशा का आहेत याची शास्त्रीय कारणं सुद्धा यात सांगितली आहेत. आता हेच बघा, पक्षी चोच बुडवून पाणी तोंडात घेतात नि मग मान वर करून घशाखाली घालतात. कारण त्यांना गुरूत्वाकर्षणाविरूद्ध पाणी आत ढकलता येत नाही. शाकाहारी पक्षी पाणी शोषून घेऊ शकतात तर हिंस्त्र प्राणी लपलप करून जिभेनं पाणी पितात. असं हे पाणीविश्व आपल्यासमोर मांडताना साहित्यातलं पाणी आणि पूर्व - पश्चिम दोन्हीकडचा पाणी वापर नि पाण्याकडे पाहण्याचा फरक देखिल लेखकानं मांडला आहे. ऋग्वेदात ते आहे. मेघदूतात तर त्याचा प्रवास उत्तम वर्णन केला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमध्ये पाण्याचं दर्शन घडतं. तसंच ते एकनाथ, चोखामेळा, रामदास आदी संतांच्या रचनांमध्ये ते आहे. बहिणाबाईची बोली कविता असो की पाडगावकर, बोरकर, महानोरांची कविता असो पाणी त्यात आहेच. कवितेत ते जसं आहे तसं म्हणींमध्ये साचून राहिलं आहे. मराठी गाण्यात असो की हिंदी चित्रपट गीतांमध्ये पाणी कसं जनमानसात खोलवर रूजलं नि सामावलं आहे, ते यात उदाहरणासह आलं आहे.


पाण्याचा रंग नि ढंग सांगणारं हे पुस्तक आगळंवेगळं म्हणावं असंच आहे. आणखी बराच मोठा आणि महत्वपूर्ण खजिना यात आहे. पण सगळंच इथे सांगितलं तर पुस्तक वाचण्याची गंमत काय उरणार? 2012 साली 'पाणी ते पाणी' पुस्तक वाचकांसमोर आले. कोणत्याही प्रस्तावनेशिवाय किंवा कुठल्याही शिफारसीशिवाय लेखक, अभिजित  घोरपडेंनी  हे पुस्तक वाचकाच्या हातात दिले आहे. नवी नि उपयुक्त माहिती यातून वाचकांना मिळते.
नेहमी कोणतंही पुस्तक हातात घेऊन वाचताना एकच भावना मनात असते, अक्षरांशी मैत्री! कारण या अक्षरमैत्रीनेच विचारांशी नातं जुळतं आणि हे नातं जुळतं तेव्हाच जगणं सुंदर होतं! या सौंदर्याच्या शोधात नवनवी पुस्तकं हातात येतात. काही वाचताना झरकन् निसटून जातात. काही रेंगाळतात तर काही मात्र मनात घर करतात. असंच मनात स्थान मिळविणारं हे पुस्तक 'संस्कृतीचा पट आपल्यासमोर मांडतंच पण निसर्गाचं गाणंही शिकवितं'. ते ऐकत, वाचत आपण पुढे जायचंय.

माझी प्रभात वारी!...

थंडी संपता संपता मनाशी पक्क ठरवलं की ,उद्यापासुन प्रभात वारीला जायचं.........कारणच तस होतं वय पन्नाशीत येऊन पोहचलेलं ,शरीराने  घेतलेलं गोलाकार वळण आणि डॉ.कडे वार्या करण्यापेक्षा ही प्रभातवारी म्हणजे बिनपैशाचे औषधच!.......हे समजत होतच पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ,तसच काहीस!.. हेपण ,समजुन घ्या ...जरा ....तुम्ही जाणते आहातच.......!तर हो आता सकाळी फिरायला जायचे म्हणजे तयारी नको कां सगळी अगदी पद्धतशीर !म्हणून पहिले गाठले बुटांचे दुकान चांगले, पायाला त्रास न देणारे ज्याला आपण comfortable म्हणतो असे बुट घेतले,त्यानंतर मोर्चा वळवला तयार कपड्यांच्या दुकानाकडे.मला ते आपलं सलवारसुटवर पायी चालणं मान्य नव्हतं ,साडीचा तर प्रश्नच नव्हता  त्यामुळे छानशी trackpantघेतली आणि हुश्श होऊन घरी आले. .......अहोंना   सांगितलं  उद्यापासुन आपण फिरायला जातोय याल नां तुम्ही तर नेहमीप्रमाणे म्हणतात कसे ,तू ऊठणार आहेस कां सकाळी!...मनात म्हंटलं जसे काही हेच सकाळी ऊठून घरकाम आवरतात असो पण मी हो म्हंटल आणि ठणकावून  सांगितलं पण की,उद्यापासुन आपण नियमीत pkvला जायचं तेव्हा ठीक ६वाजेपर्यंत तयार  रहा......
.!
           घड्याळ्याच्या गजराने खाडबडून जाग आली आणि भराभर तयारीला लागले .आज भलताच उत्साह संचारला होता शिवाय सुरुवात काहीही अडथळा न येता व्हावी ही मनोमन इच्छा होती त्यामुळे सगळं टापटीप आटोपून रेडी........!
        कुठच्याही कामाची सुरुवात करताना सुरवातीला जी धडधड मनात असते तशी माझ्याही मनात होती.सतत छोट्या छोट्या कामाला सुद्धा दुचाकी बाळगणारे आपण आपल्याकडून 2/3km.तरी चालणं होईल कां अशी शंका मनात येत होती.म्हंटल सुरुवात करतोय नां मग उगा मनात सुद्धा खोट आणायची नाही  आणि आजचा हा सुवर्ण दिवस  मनाला तजेला देणारा असाच होता......चला स्वारी जय्यत रिनीशी वारीला निघाली .pkvच्या अर्ध गोलाकार मोठ्या कमानदार प्रवेशदारातून प्रवेश करताच शुभशकून घडल्याप्रमाणे प्रत्यक्ष पक्षीराज मयुराने दर्शन देऊन जणू आमचे स्वागतच केले. ही यजमानमंडळी एक,दोन नाही तर नजर पडेल तिकडे स्वागताला हजर होती .कुणी झाडाच्या फांदीच्या टोकावरबसुन आकाशाशीसंवाद करत आहेत तरकुणी आपला भरगच्च पिसारा सांभाळूनही मी उडू शकतो हे दाखवतो आहे तर कुणी छतावर आपल्या सोबती मित्र मोराबरोबार गप्पा करण्यत मशगुल आहेत तर काही मयुर आपला भरगच्च पिसारा घेरदार परकरासारखे फुलवुन नक्षीकाम दाखवतोआहेआणि बहारदार नृत्य सादर करुन मनोरंजन करत आहेत . बरं कां...ह्यात कुठेही  अतिशयोक्ती नाही बरं............हे सगळ इतक विलोभनिय की,त्या "दैहने देखच्या "

पोझिशनमध्ये चालताना भान हरपून किती चालतोय किंवा दम लागतोय कां ह्याकडे लक्षच जात नाही आणि अकोल्यातल्या उन्हाळी झळांना मागे टाकून थंड वार्याच्या झुळकांनी तल्खली शांत करणारी राई....अहाहा...!असं वाटले  की इथे  आपण कितीही फिरु शकतो न दमता शुद्ध हवेचा आस्वाद घेत ह्याने तर मला वेगळीच उर्जा मिळाली आणि त्या दिवसापासून ठरलं की काहीही झालं तरी प्रभातवारी चुकवायची नाही !!! बिनपैशाचे औषध!मस्त ना.....!