तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय..बायकांच्या जरा जास्तच...विज्ञान म्हणतं बायकांच्या मेंदूतलं भाषाकेंद्र हे पुरुषांपेक्षा जास्त विकसित असतं, त्या प्रचंड भावनाशील असतात, त्यांचा शब्दसंग्रह अफाट असतो वगैरे वगैरे...'बायका तर जिथे जातील तिथे गप्पा मारत बसतील' असे टोमणे ऐकायची नाहीतरी आपल्याला सवय आहेच, अर्थात आपण ते फारसं मनावर घेत नाही आणि आता तर हा स्त्री पुरुषांमधला फरक विज्ञानानीच सिद्ध केलाय, so don't worry, keep talking.
आत्ता मागच्या आठवड्यात मी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेले होते , सगळ्या वेगवेगळ्या ग्रुपमधल्या होत्या त्यामुळे एकत्र जमून चालणार नव्हतं, माझी तर त्यादिवशी त्रिस्थळी यात्रा झाली. 17,18 वर्षांनी आम्ही एकमेकींना भेटत होतो , (आता मध्ये इतकी गॅप कशी ? ,असं विचाराल तर ह्या गप्पा वेगळ्या track वर जातील तेव्हा ते पुन्हा कधीतरी
मैत्रिणींच्या गप्पा ह्या अर्थातच प्रत्येकीसाठी खास असतात, त्यांना अंत नसतो, त्यात विषयांचं बंधन नसतं. एका विषयावरून गप्पांचा मोर्चा अचानक दुसऱ्या विषयाकडे वळतो किंबहुना ते वळवण्याचं बायकांचं कसब खास असतं ह्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे त्या कुठेही पटकन connect होऊ शकतात , एक ग्रुप उठून गेला की लगेच दुसऱ्या गृप ला जॉईन होतात. निघण्याची वेळ आली की मात्र ,' अगं ते तर तुला संगायचंच राहिलं, शी बाई , काई बोलणंच नाही झालं आपलं ' असं म्हटल्याशिवाय ती भेट पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नाही . जेवणाच्या ताटावरच्या, वाळलेले हात तसेच धरून मारलेल्या गप्पा किंवा फाटकाशी उभं राहून ' निघते निघते ' म्हणत लांबलेल्या गप्पा ह्या कायमच अपूर्ण असतात. माझ्या सासुबाई आणि त्यांच्या दोघी बहिणी सुद्धा फार गप्पीष्ट. उन्हाळ्यात त्या माहेरपणाला म्हणून एकत्र जमायच्या , सकाळी उठून स्वैपाकपाणी आटपायच्या अर्थात हा पूर्णवेळ गप्पा अखंड चालू असायच्याच पण स्वयंपाकघरातलं काम आटोपलं की हुश्श करत पदराला घाम पुसत 'ऐ चल बाई आपण आता जरा गप्पा मारुया' असं म्हणत बाहेर यायच्या आणि मग तिथे त्यांच्या गप्पांचा फड जमायचा.
बोलण्याच्या ह्या शक्तीमुळे बायका कुठेही लवकर मिक्स होतात, ह्याचं उदाहरण म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर माझे आईवडील दुसऱ्या शहरात स्थायिक झाले तिथे गेल्यावर आई पटकन तिथे रुळली, तिचं माहिलामंडळ सुरु झालं, बाबांना मात्र जरा वेळ लागला. बोकण्याच्या ह्या शक्तीमुळेच कदाचित आपलीकडे शिक्षिका जास्त दिसतात.
गप्पा हे खरंतर बायकांसाठी एक टॉनिक आहे. त्यांचे छोटेमोठे प्रॉब्लेम्स त्यामुळे दूर व्हायला मदत होते . प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके त्यांच्या एका लेखात म्हणतात की 'कधीकधी अनोळखी माणसाशी सुद्धा आपण गप्पा मारतो नव्हे त्या जास्त रंगतात' त्यामुळे 'गप्पा मारो और सेहत बनाओ ' असे काहीतरी नवे घोषवाक्य असायला हवे. पहा , पुस्तक वाचत होते त्या कथेत गप्पा आल्या आणि माझी गाडी कुठे वळली , चला... पुष्कळ झाल्या ना ब्लॉग गप्पा !!.....भेटू या लौकरच....प्रत्यक्ष गप्पा मारायला .
|
No comments:
Post a Comment