Thursday, August 15, 2019

सोन्याची नाव

( 7 ऑगस्ट, गुरूदेव रवींद्रनाथ ठाकूरांचा स्मृतिदिन, त्यानिमीत्ताने हा लेख)


एक होतं पाखरू. गाणी गायचं पण शास्त्रांचा अभ्यास नाही करायचं. उड्या मारायचं पण नियम कशाला म्हणतात ते त्याला नाही कळायचं. राजाला वाटलं,'असं पाखरू काय कामाचं? उलट यांच्यामुळे फळबागेचं, बाजाराचं नुकसान होतंय.' राजाने मंत्र्यांना बोलावलं. "पाखराला चांगलं शिक्षण द्या." 
शिकविण्याची जबाबदारी राजाच्या मेव्हण्याने घेतली. समिती बसली. खूप विचार केला नि निष्कर्ष काढण्यात आला की, पाखराच्या काड्याकुड्याच्या घरट्यात विद्या मावत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी पिंजरा बनवायचा. कारागिर कामाला लागले. त्यांनी आपले सारे कसब पणाला लावून सुंदर पिंजरा बनवला. लेखनिकांनी त्यात ठेवायला भरपूर पोथ्या लिहिल्या. आता पिंज-यात सगळीकडे विद्याच् विद्या होती. पिंजरा रोज स्वच्छ लखलखीत करायला विशेष नोकर नेमले होते. कारागिर, लेखनिक, नोकर सगळ्यांना घसघशीत मोबदला दिल्या गेला. सगळे खुश!
"पाखरू कसे आहे?", राजाने मेहुण्याला विचारले.
"महाराज, कारागिर-लेखनिक, नोकरचाकर सगळ्यांना विचारा...तेच सांगतील की पाखरू कसे आहे", मेहुणा उत्तरला.
प्रत्येकाला भरपूर मोबदला मिळालेला होताच. त्यांनी एकमुखाने सांगितले की," पाखरू उत्तम आहे. प्रगती करतंय."
प्रत्यक्षात पाखराच्या पिंज-यात सगळीकडे पोथ्याच पोथ्या होत्या. पाखराचं स्वातंत्र्य पिंज-यात बंद होतं. गाण्याच्या ऐवजी ते तडफडत होतं. गज तोडण्याच्या प्रयत्नात रक्तबंबाळ होत होतं. एक दिवस पाखरू मरून गेलं. कोणाला कळलंच नाही.
      ही आहे दृष्टान्त कथा,"पोपटाची  गोष्ट!" बदलत्या शिक्षणपद्धतीवर परखड भाष्य करणा-या या कथेचे लेखक आहेत, रवींद्रनाथ ठाकूर!
'बंधमुक्ती, आनंद आणि सौंदर्यबोध', या गोष्टींचे बीज लहानपणापासून मुलामुलींच्या मनात रूजावे म्हणून प्रचलित शिक्षणपद्धती बदलण्याचा प्रयत्न करणारे रवींद्रनाथ! 
त्यातूनच साकारले त्यांचे बालसाहित्य! 

पाडे पेरू हरीहर
मधुराय बांधे घर

होडी हाके पातुपाल
धान्य आणे जयलाल

धरे सुकाणू दीनानाथ
अविनाश रांधे भात

हे त्यांचे सहजपाठ! शाळेच्या भिंती आणि अभ्यासाचं ताठरपण, पुस्तकाशी बांधलेलं ज्ञान आणि औपचारिक यांत्रिकता यापलीकडेे असलेलं काही तरी...मातीशी मिळून आकाशाची निळाई शोधणारी प्रेरणा त्यांनी शांतीनिकेतनच्या स्वरूपात साकारली. हीच त्यांच्या बालसाहित्य निर्मितीची प्रेरणा होती. चैतन्याशी असलेला हा त्यांचा अंतःसंवाद हा बालपणापासून पाझरत आला होता. 1831 साली कोलकत्ता येथे जन्माला आलेले रवींद्रनाथ पंधरा भावंडात सगळ्यात धाकटे होते. वडील महर्षी देवेन्द्रनाथांच्या  उत्तम बंगाली, इंग्रजी, फारसी, संस्कृतचे संस्कार कळतनकळत रवींद्रनाथांवर पडलेत. तशीच अध्यात्मचिंतनाची ओढही वारसा म्हणून मिळाली. आजीच्या गोष्टी ऐकतच त्यांचं लहानपण सरलं. जत्रानाटकांच्या खेळातून लोकपरंपरेचा धागा पक्का झाला. जोडासांको या खानदानी वाड्यातील 'विद्वज्जनसमागम' सभेने ज्ञानचर्चेचा खजिना खुला झाला. त्यांच्या आसपासच्या वातावरणात एकप्रकारची गुढरम्यता होती. ती गुढरम्य उदासी घेऊन रवींद्रनाथ आयुष्यभर लिहित राहिले. त्या अफाट नि अथांग लिखाणातील महत्वाचा भाग आहे, त्यांच्या बालसाहित्याचा!
'ज्या भाषेमध्ये उत्तम बालसाहित्य  असेल ती भाषा परक्या भाषेच्या आक्रमणानी सहजासहजी मरत नाही', असे वीणा आलासे म्हणतात. ते इथे पटते. बांगला भाषेत रवींद्रनाथांनी भरपूर बालसाहित्य लिहिले. भाषेची बंधने ओलांडून ते जगभर पोहोचले आणि विविध वयाच्या बालकांनी आवडीने वाचलेत. त्यांचे 'सहजपाठ' मुलांची निरागसता व्यक्त करणारे तर 'शिशू' भवतालाशी सुंदर तल्लीनता साधणारे आहे. त्यांचे 'रवींद्रचिंतन' माणसातील उत्सवप्रियता जपणारे आहे. आपली संस्कृती आणि अभिरूची साकारणारे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून, रवींद्रनाथ शांतीनिकेतन पाठशाळेत आगळे प्रयोग करत असत. शांतीनिकेतनमध्ये मुलांवर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार करण्यासाठी दर श्रावणात एक उत्सव साजरा केल्या जायचा. वटवृक्षाच्या रोपांची पालखी सजायची. ती पालखी चार विद्यार्थी खांद्यावर उचलायचे. पुढे पूजेचं साहित्य घेऊन पाच विद्यार्थीनी चालायच्या. पालखीच्या मागे केशरी साड्या नेसून विद्यार्थीनी तर केशरी कुडते परिधान करून विद्यार्थी सुस्वरबद्ध गाणी म्हणत चालायची. साग्रसंगीत पूजा होऊन वृक्षाचे रोपण व्हायचे नि वृक्षआरतीने सांगता व्हायची. यामागे रवींद्रनाथांचा उद्देश असा होता की, स्वतः नत्र शोषून माणसांसाठी प्राणवायू उत्सर्जित करणारे हे आधुनिक परोपकारी 'देव' मुलांना माहिती व्हावेत. या श्रावण-आरती प्रमाणेच 'पौष-मेळा' आणि होळीउत्सव मुलांमध्ये निसर्ग भान निर्माण करणारे असत. ही शांतीनिकेतनची परंपरा होती. 

जगते आनंदयज्ञे आभार निमंत्रण 
धन्य हल धन्य हल मानव जीवन
नयन आमार रूपेर पुरे 
साथ मिटाये बेडाय घुरे
श्रवण आमार गभीर सुरे
हयेछे मृगन 
धन्य हल धन्य हल मानव जीवन 

विश्र्वाच्या या आनंदयज्ञी धन्य जाहले मानव जीवन, स्वर नादांनी मग्न जाहले भाग्यवान श्रवण....या मानव्य भावनेचे रोपण आपल्या साहित्याद्वारे, अखिल मानवजातीवर ज्यांनी केले, त्या रवींद्रनाथांचे पंचावन्न कवितासंग्रह आणि दोन हजारपेक्षा जास्त गाणी नि तितक्याच कविताही प्रसिद्ध आहेत. आयुष्यभर जे जे उत्तम वाटलं ते ते करणारे रवींद्रनाथ,"आमि कवी आमि शुधू एक्सप्रेशन देई" असे म्हणत असत.
पु. ल. देशपांडे यांच्या सारखे सिध्दहस्त लेखक, रवींद्र साहित्य अभ्यासता यावे म्हणून, केवळ यासाठीच बंगाली शिकले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरूणा ढेरे, यादेखील रवींद्र साहित्याच्या ओढीनेच बंगाली साहित्याकडे वळल्यात. 
प्रतिभेचे मूर्तीमंत इंद्रधनुष्य म्हणजे रवींद्रनाथांचे साहित्य! पिढ्यानुपिढ्या ते वाचले जात आहे. शब्द-रूप-रस-रंग-गंधाचे हे साहित्य वाचकांना मंत्रमुग्ध करत आहे. 1831 ते 1941 या  समृद्ध जीवनपटाने रवींद्र चित्र, रवींद्र संगीत, रवींद्र नाटक, रवींद्र काव्य, रवींद्र गीतं, रवींद्र कादंबरी, रवींद्र ललितबंध असे विविध पारंबी-बहर मनुष्य जीवनास सुखकर केले आहे. आजही ते कालातीत भाषावैभव लेऊन दिमाखात झळकत आहे. केवळ बांगला किंवा नुसतेच भारतीय नव्हे तर जागतिक वाड्•मयाच्या अवकाशात त्याचा स्पंदन झंकार निनादत आहे.

     त्यांच्या गितांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. दोन देशाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य त्यांच्या दोन काव्यांना लाभले. 
"काळजाने कवी आणि वृत्तीने आई असणा-या रवींद्रनाथांचे बालसाहित्य वात्सल्यरसाचा परमोत्कर्ष गाठतं", असे लेखक प्रवीण दवणे म्हणतात, ते उगीच नाही.अनाथांचे भावबंध उकलून दाखविणारी त्यांची 'बलाई' कथा असो की ग्रामीण भागातील निसर्ग वात्सल्य आणि शहरातील यांत्रिक कृत्रिमतेचा वेध घेणारी,'सुटी'! 'कथा ओ काहिनी'तील ऐतिहासिक वीरत्वाच्या गोष्टी छंदोबद्ध तर गौतम बुद्धाच्या जीवनकथा आनंदबद्ध करणा-या आहेत. या कथा, कविता जशा बालविश्वाचा भाग आहेत तशीच लहानांपासून तर थोरांपर्यंत  शतकापासून मनामनात तरल भावानुबंधाचे उत्कट रेखाटन करणारी आहे,'काबुलीवाला'!
मिनीमध्ये स्वतःच्या मुलीचे भावविश्व पाहणारा काबुलीवाला, त्याच्या मनाची व्याकुळता समजून घेणारे मिनीचे वडील! आणि बच्ची चिमुकली मिनी ते नववधू मिनीचे आंतरभाव! सगळं कसं माणूसपणाचा एक एक पापुद्रा अलगद उलगडवत मनामनात पाझरणारं! रवींद्रनाथांचे सगळंच साहित्य असंख्य गंध-रंगाचं लेणं ल्यायलेलं आहे. काळ बदलला. संदर्भ बदलले. तरीही परिपूर्ण वाटणा-या या कथा आहेत. खरं पाहता बालसाहित्य निर्माण करणे, ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. "बच्चों का साहित्य लिखने के लिये आपको सचमुच घुटनो के बल चलना पडता है, दसबार गिरना पडता है, तब कही एक कविता बन पाती है। जिसमें आप खेल सके और बच्चो को खिला सके। वो उछलती कुदती रबड़ की गेंद है, आसानी से हाथ नही आती और कहानियाँ मनघडंत नही होती। बहुत रियाज चाहिए।", असं गुलजार म्हणतात. तेच तत्व आपल्याला रवींद्र साहित्यात जाणवतं. मनोविस्ताराचा आणि अध्यात्मबोधाचा स्तर सांभाळत वैश्विक सौंदर्याचा रचनाबंध निर्माण करतांना मुलांचे भावविश्व अचूक उभे करणारे, आनंदाचा बोध देणारे साहित्य रवींद्रनाथांनी कलात्मकतेनी लिहिले आहे. त्यांची ही 'सोन्याची नाव' पिढ्या दर पिढ्यांना तारून नेण्यास सक्षम आहे. गरज आहे ती फक्त सर्वांना त्यात सामावून घेऊन संस्कृतीच्या काठाने फिरवून आणण्याची!

- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(फोटो सौजन्य : गुगल)

No comments:

Post a Comment