पुलंनी दारावर विकायला येणाऱ्या विक्रेत्यांचे इतके मस्त वर्णन केले आहे. दारावर येणाऱ्या विक्रेत्यांचे विशिष्ट आवाज, शब्दोच्चार आणि मालाची विक्री करणाऱ्यासाठी त्यांनी त्यांच्या पध्दतीने जुळवलेली यमकं असलं अफलातून वर्णन की वाचून हसता हसता पुरेवाट होते. अकोल्याच्या गल्लीत येणारे हे विक्रेते मला आठवू लागले,तिथे घरं बैठे फारतर एक, दोन मजली. त्यामुळे त्यांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू यायचे. मोठ्या शहरात, टोलेजंग इमारतींच्या गर्दीत हे सर्व हरवले आहे.
खरंतर रोज अगदी घराशी ताजी ताजी भाजी, फळ घेऊन खाण्याला उत्तम चव असते. हे मी बरेच वर्ष अनुभवल आहे. मग आपली पाककला थोडी डावी असली तरी 'धकून" जातं.
तर असे हे भाजीवाले, फळवाले त्यांचाशी अनेक वर्षांचा ऋणानुबंध जुळला होता. भाजीवाला जवळपास १९-२० वर्ष मला इमानाने भाजी देत होता. आणि फळवाला २४-२५ वर्ष फळ देत होता. इतके वर्षाचा ऋणानुबंध विसरणे तर शक्यच नाही.
भाजीवाला त्याच्या भसाड्या आवाजात" हां जी भाजीवाला" अशी सुरुवात करून हातगाडीवर असलेल्या नसलेल्या सगळ्या भाज्यांची नावे क्रमवार घ्यायचा ते पण लांब लांब वाक्य म्हणून. आलं, लसूण, हरीमिर्ची, सांबार पासून तर भरताचे वांगे, बरबटीच्या शेंगा... पालक, मेथी, चवळी पासून तर कोहळ्यापर्यंत... कोथिंबीरीला विदर्भात सांबार का म्हणतात काय माहित?सांबार म्हटलं की मला हसू यायचं.
सुरुवातीला मी खाली उतरून भाजी घ्यायची नंतर नंतर तसं न करता दोरीला पिशवी बांधली होती त्यात पैसे सोडायचे आणि गजानन भाऊंनी दिलेली भाजी वर ओढायची. फिरून फिरून पाय दुखायचे माझे इतकं मोठं घर. इतक्या खालीवर चकरा व्हायच्या की जितकं जमेल तितकं मी टाळतच असे. भाजी पहायची आवडली नाही तर लगेच बदलवून घ्यायची
असा थाट होता. आजूबाजूचे शेजारी मला हसत पण असतील मी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले. पावसाळ्यात खास करुन भाजीबाजारात जाऊन भाजी घेण्याचं दिव्य करणे केवळ अशक्य होते. अशावेळी ही घरपोच सेवा फारच सुखावह वाटायची. . नाही म्हणायला हिवाळ्यात मी बाजारात जाऊनच भाजी आणायचे बरं!
असाच एक फळवाला देखिल अतिशय आस्थेने, आपुलकीने फळं द्यायचा. फळवाल्याकडून जाऊबाई चिक्कू घ्यायच्या दिड वर्षाच्या पुतणीसाठी. तेव्हा तो फळवाला टोपलीत फक्त चिक्कू विकायचा. अवीट गोडीचे ते चिक्कू अजूनही आठवतात. शाक के चिक्कू है दिदी ले लो। असं म्हणायचा. मला समजेना शाक के चिकू काय भानगड आहे? मग खोलात जाऊन विचारल्यावर कळलं शाख पर पके हुए है। झाडाच्या फांदीवर पिकलेले चिक्कू चवीला अतिशय उत्तम, गोड असतात हे तेव्हा मला कळलं. असा हा फळवाला तेव्हा (1990) पासून तर आज अकोला सोडेपर्यंत (2018) मोठा प्रवास... आता थांबला आहे.
नंतर त्या फळवाल्याने बरेच फळं विकायला सुरुवात केली होती. टोपली जाऊन हातगाडी घेतली. तरीही फळं द्यायला सवयीने वर यायचा. मी त्याला वर येऊ नको म्हटलं तरी यायचाच. मग मी आथीच त्याला म्हणायचे रूको मैं आ रही हूँ नीचे. मला वाटायचं रस्त्याने जाणारे येणारे उनाड पोर, गाई त्याचा माल खराब न करें. म्हणून त्याला रोज सांगून सांगून थांबवल होत. सिझनचे प्रत्येक फळ संत्री, मोसंबी, सफरचंद, चिकू, द्राक्षे, जांभळ, आंबे बब्बूघोशा (पिअर) घेऊन यायचा. टरबूज, पपई, केळी, अननस हे फारसं आणलं नाही.त्यातल्या त्यात टरबूज, खरबूज, पपई कधीतरी आणायचा. माझ्यासाठी उत्तम फळं तो वेगळे काढून ठेवायचा. ये लो दीदी तुम्हारे लिए बचाके रखे थे. असं म्हणून मोठ्या प्रेमाने देत असे. माझ्या शंकेखोर मनात यायचं हा आपल्याकडून भाव तर जास्त घेत नसेल न? मग बाजारात गेली की मी क्रॉसचेक करायचे. पण भाव जास्त घेत नव्हता. मी त्याच्याशी भाव करायला लागले की म्हणायचा - दे दो नं दीदी जो तुम्हारे मन में है। मैं आपसे मुनाफा नहीं कमाता। जो देना है वो दे दो बस खुश। वजनकाटा पण कायम जास्तच असायचा. वजनाच्या वर एक, दोन फळं जास्तच असायचे. जास्त देवू नको म्हटलं तरी ऐकायचाच नाही. दुपारी १.३०-२ च्या सुमारास यायचा. त्या आधी अर्धा तास त्याचा आवाज इतर गल्ल्यां मधून येत राहायचा इतका मोठा, खडा आवाज होता. 'मिठो मिठो' हे खास त्याचे शब्द. खाली गेलं की जे फळ असेल ते आख्ख खायला लावायचा प्रेमाने. अगदी डाळिंब सुध्दा अलगदपणे सोलून द्यायचा. डाळिंब सोलण्याची अद्भूत सोपी कला मी त्याच्याकडूनच शिकली आहे. हाताला एक थेंबही रस लागू न देता, दाण्याला बोटही न लागू देता ते डाळिंब सोलून द्यायचा. दुपारी जेवण झालेले असायचे आणि या फळवाल्याचा आग्रह खाओ न दिदी मी म्हणायचे नहीं मैं सोफ खा के आयी हूँ तर म्हणायचा तो क्या हुआ उपर जा के फिरसे खा लेना सोफ.
हा फळवाला स्वतः होता अशिक्षित पण त्याच्या तिनही मुलांना त्याने चांगले शिकवले. B. Ed. करून शिक्षकाच्या नोकरीला शाळेत लावले. मुलगी पण शिक्षिका आहे. त्याचं मला अप्रूप वाटलं.
घराजवळ आला की जोरजोरात "मिठो मिठो" ओरडायचा. कितना चिल्लाते हो जरा कम आवाज करो। कि लगेच वरमायचा. कधी मी घरी नसायचे बाकी गल्लीत फिरताना चुकून भेटला तर पुन्हा फळं द्यायला यायचा. फळं नको असले तरी बाहेर जाऊन सांगावे लागायचे, भैय्या आज नहीं चाहिये. मगच जायचा.
आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे की समजा आज मला फळं दिली आणि दुसर्या दिवशी त्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटी ची फळं आली तर हा स्वतःच म्हणायचा दिदी वो कल के फल दे दो मुझे उसके बदलें में ये लो। बहुत मिठे है ये। आणि चक्क बदलवून द्यायचा. कोण करतं एवढं मला सांगा? आजकाल हे निर्व्याज प्रेम, ग्राहकाप्रती आदरभाव कुठे पहायला मिळतं? इतक्या वर्षांच्या सहवासातून हे आपोआप येतं असावं नाही का! तुषार पुण्याहून आला की म्हणायचा मुन्ना आया है दिदी अच्छे फल खिलाओ मुन्ना को वहाँ पुना में कहाँ खाने को मिलता होगा उसको? त्याचे एक एक वाक्य आठवले की आश्चर्य वाटतं इतकं प्रेम कोणी कसं करु शकतं?
अकोल्याच्या उन्हात भर दुपारी आला की मी त्याला पाणी द्यायचे थंडगार पाणी पिऊन म्हणायचा दीदी पानी के लिए तो कोई पूछता भी नहीं हमको। मग कधी काही प्रसंग, मुलांचे वाढदिवस असले की मिठाई, केक खायला द्यायची तो आवडीने खायचा.
माझ्या दादांशी पण त्याची मैत्री होती. बाबूजी बाबूजी करून त्यांच्याशी पण गप्पा मारायचा. बाबूजी कब आ रहे है? बहुत दिन हुए आये नहीं। आमचे सर्व नातेवाईक पण त्याला ओळखायचे. असं सगळं असतांना हा फळवाला अचानक येईनासा झाला. काय झाले असेल? आम्ही रोज वाट पहात होतो. आजारी तर नसेल? नाही नाही ते विचार मनात येऊन गेले. बरं त्याचा अतापता तर सोडाच मला त्याचं नाव देखिल माहीत नव्हतं. अजूनही माहीत नाही. कोणाला विचारावे? त्याच्या बरोबर बर्याच वेळा एक शहाळी विकणारा त्याला ओळखणारा, तोपण येतं नव्हता. चार, पाच महिन्यांनी एक दिवस त्याच्या भावाबरोबर पुन्हा फळं विकायला आला. आम्हाला मनापासून आनंद झाला. कहाॅं थे भैया इतने दिन? तर म्हणाला बरं नव्हतं. फळं विकता विकता त्याला पॅरालिसीस चा अटॅक आला होता. ज्यांना तो फळं देत होता त्यांनी लगेच त्याला डॉक्टर कडे नेलं. लगेच उपचार मिळाल्याने लवकर बरा झाला. एकदम थकलेला दिसतच होता. चेहरा अजूनही थोडा वाकडा होता. पण काही दिवसात पूर्ववत झाला. मुलांनी किराणा मालाचे दुकान टाकून दिलं पण तिथे तो काही रमला नाही. सब गिर्हाईक मेरी राह देख रहे होंगे इसलिए मै आया। वो दुकान में कुछ मन ही नहीं लगता। तुम लोगों से मिलूंगा तो ही अच्छा रहूंगा और जल्द ठीक हो जाऊँगा। तर असा हा नाव माहीत नसलेला फळवाला भैय्या! त्याचा आणि आमचा ऋणानुबंध आता संपलाय परंतु आठवणीतला त्याचा ऋणानुबंध मात्र कधीही संपणार नाही.
आणखी एक नारळपाणी विकणारा मुस्लिम भैय्या. "नारिsssयल पानी वाला " असा आवाज द्यायचा. भर दुपारी यायचा मग त्याचं ते नारिsssयल पानीवाला म्हणून झालं की आम्ही घरात म्हणत असू इतक्या दुपारी कशाला आला?
अगदी गोड, भरपूर पाणी, खोबरं असलेले चांगले शहाळे तो द्यायचा. फळवाल्या भैय्या सोबत यायचा बरेच वेळा. फळवाल्याला "मामू" म्हणायचा हा नारळवाला. कारमेल शाळेसमोर पण उभा रहायचा. सुरुवातीला त्याच्याशी फारशी ओळख नव्हती तेव्हा मी त्याला १००, २०० रुपयाची मामूली मदत केली होती. म्हटलं दिले तर दिले नाहीतर गेले. फारसं काही बिघडणार नव्हतं. पण त्याने ते खूप लक्षात ठेवून परत केले, मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं त्याचं. तेवढ्या पैशांचे शहाळे त्याने मला देऊ केले. घरी नारळाचे झाड होते त्याचे शहाळे सोलून द्यायचा खुषीने. स्वतः हून विचारायचा इस बार नारियल छिलना नहीं क्या? लाओ न! मी त्याला सोलून द्यायचे पैसे देत होते कारण इतर नारळवाले अजिबात तयार नसायचे सोलून द्यायला. कसे बसे सोलून दिले तर काहीच्या काही पैसे मागायचे. जुन्या शहरातून यायचा हा. इतके प्रेमळ लोकं मला भेटले देवाचे आभार मानलेच पाहिजे.
असाच एक पेरूवाला. पेssssरू असं बसक्या आवाजात तो म्हणायचा. सिझनप्रमाणे बरेच वेगवेगळे फळं विकायचा तो पण मी फक्त पेरू घ्यायची त्याच्या कडून. इतके गोड पेरु की त्याची चव आजही पक्की स्मरणात आहे. अवीट गोडीचे ते पेरू खाल्यानंतर खात्री पटली हिंदीत पेरु ला अमरुद का म्हणतात याची. अगदी ताजे डायरेक्ट फ्राॅम बगीचा! जेवणं आटोपल्यावर थंडीच्या दिवसात अंगणात उन्हात बसून हा अवीट गोडीचा पेरु खात आम्ही कुटुंबीय गप्पा मारत बसायचो.
आता नंतर नंतर अजून एक पपई, टरबूज, केळी विकणारा फळवाला. तो पण वर येऊन बेल वाजवून पपई, टरबूज द्यायचा. अवंतीसाठी रोज दोन केळी द्यायचा. ये बिटिया के लिए. आणि त्याचे पैसे ही घ्यायचा नाही. पण मी असे घेणे शक्य नव्हते. मी द्यायचीच त्याला पैसे. मला पेपरमध्ये वाचलेली बातमी आठवली. मुंबई ला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन केळांची किंमत चक्क 442 रुपये लावली! प्रेमाखातर रोज दोन केळी देणारा फळवाला कुठे आणि व्यावसायिकतेचा बाजार मांडणारे हे पंचतारांकित हॉटेल कुठे! ग्राहकांच्या तक्रारी वरून हॉटेल मालकाला दंड झाला ते बरच झालं. समाजमाध्यमांवर बरीच खिल्ली उडवली गेली यावर.
दिदी मिठा नहीं निकला तो पैसे वापस. असे तो फळवाला म्हणायचा. असे सर्वच विक्रेते म्हणतात. पण ज्या आपुलकीने तो थेट वर फळं द्यायला यायचा ते महत्वाचे. हे विक्रेते सगळ्यांशी असेच वागतात का? कि त्यांचे ठराविक ग्राहक असतील त्यांच्याशीच असे चांगले वागत असतील? अर्थात माल विकायचा म्हणजे जिभेवर साखर तर ठेवावीच लागते. आणि धंद्याचा हा मूलमंत्र ते जपत असतील का? कुठल्याही स्पेशल शिक्षणा शिवाय! नक्कीच जपतात.
*अंजली*
No comments:
Post a Comment