Sunday, August 11, 2019

घालमेल

"काकू, मुंबईहून  अकोल्याला  यायला  किती वेळ लागतो?त्या पेक्षा  कमी  वेळात तुम्ही  मुंबईहून Frankfurt ला पोचता!इतकं काही, तुम्हाला  वाटतं  तितकं  लांब  नाहीये  Germany!"--इति नचिकेत--(जावईबुवा)
            मला खूप  मजा  वाटली, असेच  काहीसे,  माझ्या  नवर्‍याने,माझ्या  आईला  समजावले होते. "इतकं  काही  लांब  नाहीये  अकोला,रात्री  मुंबईहून निघालात, की सक्काळी अकोला!"
"History repeats" म्हणतात, ते  उगाच  नाही. 
मी एकदम फ्लॅशबॅक मोडमध्ये गेले. 
माझी  आजी: कर्नाटकातील विजापूरची! (आता  ते  बर्‍यापैकी  मोठे  शहर  झालेय) लग्न झालं,  तेव्हा ती  फक्‍त  12  वर्षांची  होती.तिथून दूरवर  असलेल्या,  महाराष्ट्रातल्या भुसावळ  या  गावी  आली,तेसुद्धा  कायमची! त्या काळात फोनचा  प्रश्नच  नव्हता. डाकसेवाही आतासारखी  जलद  नव्हती. काय झालं  असेल माझ्या  पणजीचं? (अव्वा म्हणायचो आम्ही  तिला! )तिलाही  आता 
 मला  वाटतंय, तसच  वाटलं  असणार!वेगळाच प्रदेश,भाषेची अडचण, अगदी  कोवळं  वय, काय  घालमेल  झाली  असेल  तिच्या  जिवाची,पोरीला सोडून  जाताना!
मध्यंतरी जेव्हा मोहिनीच्या आईची भेट झाली, जुन्या आठवणी निघाल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुझ्या पणजीने मोहिनीच्या आजोबांना (गोविंद काका) सांगितलं होतं की,आता तुम्हीच तिचे खरे नातेवाईक आहात, लक्ष ठेवा. कारण ते विजापूरला राहून आले होते व त्यांना कानडी भाषाही येत होती. त्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत त्यांनी वडील भावाच्या नात्याने संबंध जपले होते. (तो काळ खरंच वेगळा होता, असे म्हणावे लागेल, नाही का?)

माझी आई: तिचेही अगदी विसाव्या वर्षी लग्न झाले आणि ती भुसावळहून मुंबई नगरीत आली. पुन्हा बदल! भुसावळला मोठ्या जागेची सवय, मुंबईत तेव्हा लहान लहान घरं असायची, मुंबईचे धावपळीचे आयुष्य, adjustment  आलीच,  मुंबई  कल्चरला रुळायला तिलाही वेळ लागला असणारच! पण तिथे आमचे काही  जवळचे नातेवाईक होते, तर त्यामानाने ती लवकर मुंबईकर झाली.
मी:  माझं तर काही विचारूच नका, जन्मापासून मुंबईत राहिलेली मी, अचानक लग्न करून (विसाव्या वर्षी) अकोल्या सारख्या छोट्या शहरात आले.. मला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी विचारलय की,तू मुंबई सोडून, अकोल्यात यायला कशी तयार झालीस? इसका जवाब,मुझेही  अबतक नही  मिला........ वो कौनसी जबरदस्त डोर थी, जो  मुझे बम्बईसे अकोला तक खी़ंच लाई????
            मुंबईचं प्रचंड फास्ट लाइफ, कॉस्मोपॉलिटन कल्चर ची सवय, इथे अकोल्यात सगळंच निवांत, शांत........, मोठ्या प्रमाणात साजरे होणारे सणवार, सोवळं -ओवळं, वैदर्भीय भाषा हे मला खूप नवीन होतं. 35 वर्षांपूर्वीचं अकोला, प्रत्येक गोष्टीत प्रचंड तफावत होती. तिथे सहज केव्हाही हॉटेलिंगची सवय, (आवड नव्हे) तर इथे होटेलच  नव्हतं! (केवढा मोठा प्रॉब्लेम नं?)
करून घेतली सगळ्या गोष्टींची सवय!

 ‌         पण आता माझी मुलगी आपली चूल-बोळकी घेऊन परदेशात संसार मांडायला निघालीय म्हटल्यावर, वेगवेगळ्या विचारांनी गर्दी केलीय मनात! कसं करेल? स्वयंपाकाची इतकी सवय नाही, सांगायला कोणी नाही, तिथे अगदी वेगळी भाषा, पूर्णपणे वेगळी संस्कृती, आपल्या देशापासून, आपल्या माणसांपासून दूर, कसं वाटेल तिला?
        तरी आता मोबाईल, व्हाट्सअप, स्काईप, ई-मेल इत्यादी सुविधा असल्याने कम्युनिकेशन सोपे झाले आहे. फेसबूक ,युट्युब वर सर्व रेसिपीज मिळतात. मुलीही आधीपेक्षा वयाने मोठ्या असतात. तरीही अशावेळी होणारी एका आईच्या मनाची घालमेल मला नाही वाटत, पिढ्यान पिढ्या कमी होईल! कारण एका मातीत लावलेलं रोपटं, दुसऱ्या मातीत रुजणं इतकं सहज-सोपं नाही. हां, जर बेसिकच बदल झाला, म्हणजे लग्नानंतर मुलीने मुलाच्या घरी राहायला जायचे, ही प्रथा बदलली तर.......?

No comments:

Post a Comment