पहाटे फिरायला निघाली नेहमीप्रमाणेच. रात्री केव्हातरी खूप पाऊस पडून गेला असावा. आभाळ अजूनही भरून आलेले दिसत होते आणि गार वारा सुटला होता. वाऱ्यामुळे ढग कसे भराभर पळत होते ते बघतांना गम्मत वाटत होती. ह्या सगळ्या सुंदर वातावरणाचे प्रतिबिंब साहजिकच मनातही उमटले अन कस अगदी आतून खूप प्रसन्न वाटलं! ही पहाटेची वेळ, ज्यावेळी रस्त्यावर अजून गजबज सुरु झालेली नसते ती माझ्या मोठी आवडीची! त्या शांत, प्रसन्न वेळी आपल्याच तंद्रीत फिरायला जायला मला फार आवडतं. ती वेळ असते आपलाच आपला स्वतःशी संवाद करण्याची. अश्यावेळी खरंच मनात खूप छान छान कल्पना येतात. आजकाल तर कुठलेही दृश्य दिसलेतरी डोक्यात ह्याचं पेंटिंग कसं दिसेल हेच आधी डोक्यात येतं. वयानुसार नादिष्टपणा वाढतो म्हणतात ना! ते अगदी खरं असावं बहुतेक. तर अशी स्वतःशीच संवाद करत जात होती तर रस्त्याच्या कडेला एक भला मोठा गाळलेल्या रेतीचा ढीग दिसला. कालच्या पावसाने ती रेती ओलीगच्चं होऊन मस्त काळीभोर झालेली होती. ती मऊमऊ, काळीभोर ओली रेती बघताच पटकन त्यात पाय खुपसून छानसा खोपा बनवण्याची एक उर्मी दाटून आली मनात अन मन भुर्रकन उडून बालपणात गेले.
तेव्हा अशा ओला रेतीत खोपा बनवणे म्हणजे कोण आवडीचा खेळ असायचा! एकाने पाय रोवून उभे राहायचे अन दुसऱ्याने त्यावर रेती थापत जायचे. भरपूर थापून झाले कि मग अलगद हळूहळू त्यातून पाय बाहेर काढायचा. तो पाय बाहेर काढणं सुद्धा मोठं स्किल असायचं बरंका ! हळुवार काढावा लागायचा. अजिबात धमुसळेपणा नाही चालायचा. शेवटी मग थोडासा फिनिशिंग टच द्यायचा की झाला सुरेखसा खोपा तय्यार! मग मोठ्या कौतुकाने दाखवायचा इतरांना. दुसऱ्या कुणाचा आपल्यापेक्षाही सुंदर झालेला दिसला कि क्षणभर हिरमुसल्यासारखं व्हायचं थोडंस पण लगेच दुसऱ्याच क्षणी नवा खोपा बनवण्यात गुंगून जायचं! हे तिथपर्यंत चालायचं जोपर्यंत घराघरातून दादा,ताई किंवा लहान भावंडांची “आई बोलावतेय ...” ही हाक कानावर नाही यायची! आई बोलवतेय किंवा बाबा आवाज देताहेत म्हटल्यावर बाकी निघावंच लागायचं. तेवढा आईबाबांचा धाक प्रत्येकाला असायचाच. जाताजाता आपणच एवढे मेहनतीने बनवलेले खोपे पायानी मोडून टाकायचे आणि उद्या अजून मोठ्ठा खोपा बनवायचं स्वप्न डोळ्यात घेऊन घरी परतायचं.
आता वाटतंय किती छान दिवस होते न ते ! निरागस , निष्पाप आणि निरपेक्ष सुद्धा! आजचा खोपा तिथल्यातिथे विसरून उद्या आणखी सुंदर खोपा बनवण्याचं स्वप्न बघायचं ! वाटलं आपण असे किती जुने खोपे कुरवाळण्यात आयुष्य वाया घालवतो! आपसूकच केशवसुतांच्या “तुतारी” ची आठवण झाली. “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून अथवा पुरून टाका...” मनात आलं केशवसुतांप्रमाणे मागचे खोपे मागेच मोडून उद्या बनवायच्या आणखी सुंदर खोप्याचा विचार करता आला असता सगळ्यांना तर आणखी काय हवे हो मग .? --
मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला
No comments:
Post a Comment