Tuesday, August 13, 2019

श्रावण आणि जेवण

माझी एक मैत्रिण हॉंगकॉंगला राहते. ती श्रावणातल्या शुक्रवारी तिथल्या तिच्या कोणत्याही एका मैत्रिणीला जेवायला बोलावते. मग ती मैत्रिण चिनी, जपानी, अमेरिकन किंवा भारतीय असल्यास कोणत्याही जातीधर्माची, विवाहित- अविवाहित कुणीही असते. हल्लीच्या इतक्या धबडग्यात माणसं- विशेषत: बायका एकमेकांकडे वेळ काढून जातात ही या व्रतवैकल्याची सर्वात मह्त्वाची बाजू. मलाही श्रावण महिना आला की जेवण किंवा एकूणच खाणं हे कर्मर्कांडं फार इंटरेस्टींग वाटायला लागतं. सोमवारच्या साबुदाणा खिचडीपासून शुक्रवारच्या पुरणापर्यंत कितीतरी प्रकारचे पदार्थ हटकून केले जातात. या दिवसातल्या पदार्थांना एक वेगळीच रूची, रूप, गंध लाभलेला असतो. त्यातून कुणी काही ना काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त जेवायला बोलावलं तर आयतं मिळत असल्याने ’सोने पे सुहागा’.

लहानपणी कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्‍या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्‍यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्‍या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्‍या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी पण खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची त्यामुळे स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्‍या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही जोशी आजींसारखा लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
आईच्या एक मावशी पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ सत्त्यात्तर पूर्ण, किती?’ मी- सत्त्यात्तर. ’वाटत नाही की नाही!’ मी- अज्जिबात नाही. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी शंभर वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.

लग्नानंतर सवाष्ण म्हणून, मेहूण म्हणून जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून बँकेची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. मीही वर्किंग असल्याने मी म्हटलंही, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवारवर ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभर वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्‍या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक त्या फारच सुरेख करत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या तक्रारी बारीक कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्‍याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई (पण मत मात्र मोदकांना देई). पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्‍या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्‍याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत, बरं ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झाले आहे.
अर्थात कर्मकांडाचा बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्‍या, मायेने वाढणार्‍या सुगरणींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत (म्हणूनच तर जग सुरू आहे) म्हणून त्या लिहिल्या नाहीत. तुम्ही त्यात आहातच याबाबत दुमत नाही पण खात्री करून घ्यायला मला एकदा तरी यावं लागेल ना! मग कधी बोलावताय? :-)

- मोहिनी

No comments:

Post a Comment