स्थळ - कॉलेज
वर्ग - १२ वा
विषय - मानव विकास
पाठ - बुध्यांक काढणे
उदा. राजुचे शारीरिक वय 15 आणि मानसिक वय 12 तर त्याचा बुध्यांक किती ?
सूत्र
बुध्यांक =मानसिक वय/शारीरिक वय × 100
= 12/15×100
मी "चला मुलींनो आधी 15 ने 100 ला भागा "
एक मुलगी "बापरे मॅडम 15 ने 100 ला कसे भागणार"
मला वाटले पूर्णांकात उत्तर येतंय म्हणून हिला जमत नाहीये ,म्हणून मी 100 भागीले 15 असा भागाकार फळ्यावर मांडून मुलींना 15 चा पाढा म्हणायला सांगितला तर सगळ्या मुली कोरस मध्ये " 15 चा पाढा येत नाही मॅडम "
"बरं मग आपण 15 च्या ऐवजी शारीरिक वय 10 घेऊन वरील गणित सोडवू " इति मी.
" हे अगदी सोपं आहे" (मी - मनातल्या मनात) 100 ला आता 15 ऐवजी 10 ने भागायचे होते . "मुलींनो आता 10 ने 100 ला भागा"
सगळ्या जणी एकमेकांकडे बघू लागल्या.
मी पुन्हा विचारले "किती दाहे 100"
पुन्हा blank चेहऱ्याने सगळ्या माझ्याकडे बघू लागल्या .
"बरं जाऊ द्या ,तुम्ही रेष ट्रिप खेळल्या का कधी?"
" हो मॅडम " कोरस मध्ये उत्तर आलं .
"बरं मग त्यात 10,20,30... असं म्हणत होत्या का "
"हो मॅडम"
"किती पर्यंत"
" 100 पर्यंत"
" अग मग हाच तर 10 चा पाढा आहे "
मुली आश्चर्याने "हो का?"
मी आनंदून "बरं मग आता सांगा बघू 100 ला 10 ने भागल्यावर किती उत्तर येईल"
मुली उत्साहाने "100"
मला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं.
मी नव्याने 10 चा किंवा कोणताही पाढा कसा बेरीज करून तयार होतो हे पायरी पायरीने शिकवण्याचा प्रयत्न केला . मग पुन्हा मूळ गणितावर येऊन "आता सांगा 100 ला 10 ने भागले तर किती उत्तर येईल?"
"90"
आता माझा patience संपत आला ,तरी विचारले "90 उत्तर कसे आले?"
" मॅडम ,तुम्ही नाही का सांगितले 100 मधून 10 वजा करायचे "
आता मला माझी चूक कळली की या मुलींना 10 ने 100 ला भागता का येत नाही ते. तुम्ही म्हणाल की यात माझी चूक काय ? तर माझी चूक ही की मी 12 वीच्या मुलींना टक्केवारीचे गणित येत असावे ,पूर्णांकाचा भागाकार येत असावा आणि तेही नाही तर किमान 2,5,10,15 चे पाढे तरी येतंच असावे ! असे गृहीत धरले !
भलें ! या छोट्या छोट्या 12 वि च्या विद्यार्थिनींकडून किती या अवास्तव अपेक्षा? आता तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य जनतेला यात अवास्तव काहीच वाटणार नाही ,कारण वीस पर्यंतचे पाढा किमान चौथी पर्यंत सगळ्यांनी पाठ केलेले असतात असंच आपल्याला माहीत आहे. पण विश्वास ठेवा मी गेल्या 22 वर्षात टक्केवारीचं हे गणित शिकवायला घेतलं की दरवर्षी मला दगडावर डोकं आपटून जीव द्यावासा वाटतो.तरी यांना कसे येत नाही बघतेच असं म्हणून मी नव्या दमाने त्यांना पूर्ण patience ने शिकवण्याचा अट्टाहास करते. मात्र दिवसेंदिवस विद्यार्थिनींना पाढे पाठ असलेली संख्या खाली खाली येतेय .एवढी की आज 15 च्या पाढ्याने 8 वाजता सुरू झालेला वर्ग 10 वाजता बेच्या पाढ्यावर येऊन थांबला . आणि मी थकून हरून, उद्या बेचा पाढा पाठ असल्याशिवाय मी शिकवणार नाही याने सांगता केली . बरं शिक्षणाची करुण कहाणी इथेच नाही थांबत .विद्यार्थ्यांचं सोडा पण एक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गेली 21 वर्ष वर्षातून दोन वेळा निकाल लावतांना सहकाऱ्यांच्या मदतीने percentage काढून घेतात . सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा या प्राध्यापिकेने "2 विद्यार्थिनींपैकी एक पास एक नापास झाली तर कागदावर percentage काढून द्या "असे जेव्हा म्हटले तेव्हा एक सहकारी म्हणाले " मॅडम आमची चेष्टा करता का ? तुमचा 50% result आहे म्हणून " त्यावर त्या भडकल्या आणि म्हणाल्या " मला कागदावर काढून दाखवा 50%कसे येतात?" सांगा आता !
No comments:
Post a Comment