Thursday, August 8, 2019

बातमी

बातमी काढणं ह्याचा अर्थ माहिती मिळवणं असाही होतो. आणि  जेव्हा "बातम्या" शब्द वापरला जातो, तो जरा विस्तृत स्वरूपात येतो. "बातमी"--मग ती कुठलीही, कोणतीही असू शकते. घरातली, शेजार पाजारची, गावातली,देशातील----बातम्या ऐकणं हा काहींचा छंद असतो. म्हणजे काही लोक (हे बहुदा बरंच रिकामंपण असलेले) दिवसभर त्याच त्याच बातम्या ऐकत, पहात रहातात. घरगुती बातम्यांना आपण घरातील परिस्थिती जाणून घेणं म्हणूया. शेजार पाजारची बातमी काढणं, ऐकायला आवडणं हा गॉसिपिंग चा भाग झाला.आणि विस्तृत स्वरूपात म्हणजे आपल्याच शहरात, देशात काय चाललंय? कुठे काय घडतंय?  ह्या विषयी बातम्या पाहणं म्हणजे थोडीफार उत्सुकता, काही प्रमाणात राष्ट्रप्रेम, किंवा सजग, सुजाण नागरिक असल्याची जाणीव असणं.  बातम्या देण्याची माध्यमे म्हणजे आपण स्वतः, t. v. वरील न्युज चॅनल्स, वर्तमानपत्रं, रेडिओ, आणि इंटरनेट वरील विविध sources. 
     खरोखर किती लोकांना देशातील (परदेशातील बातम्यांमध्ये इंटरेस्ट असणारे फार क्वचित असतील) घडामोडी विषयी जाणून घेण्यात मनापासून इंटरेस्ट असतो? आणि बातम्या पाहिल्यावर वा ऐकल्यावर वा वाचल्यावर  नेमकी प्रतिक्रिया काय असते? ती किती वेळपर्यंत टिकून राहते? त्याचा कुणाच्या आयुष्यावर, वागणुकीवर किती आणि कसा परिणाम होतो? होतो तरी का?  हे सगळे प्रश्न जेव्हा मनात घर करू लागले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपण बातम्या अशाच पाहतो, वाचतो, ऐकतो ज्याला "न्युज व्हॅल्यू" आहे. सनसनाटी बातम्या आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागत नाही.  आपल्यालाही फार खोलात जाण्याची गरज वाटत नाही. आपण सविस्तर पेक्षा "थोडक्यात" वर जास्त भर देणारा वर्ग. म्हणूनच विस्तृत बातम्या, संपादकीय यापेक्षा बातम्या 20-20, सुपरफास्ट बातम्या, एका मिनिटात 50/ 100 बातम्या, टॉप टेन --- असं सगळं पहायला आवडतं. (अपवाद असतातच)  आयुष्य हे "कसोटी" पेक्ष्या "वन डे आयपीएल" म्हणून अधिक रुचकर झालंय, असं कुणीतरी म्हटल्याचे आठवले. 
      हा विषय घेण्यामागच कारण म्हणजे नुकतंच वाचण्यात आलं की "निर्भया" प्रकरणावर आधारित "दिल्ली क्राईम" म्हणून नेटफ्लिक्स ने एक वेब सिरीज तयार केलीये. निर्भया प्रकरणात काय घडले, कुणाला काय शिक्षा झाली, जनता कशी पेटून उठली, याबद्दल सविस्तर माहिती बहुतेकांना आहेच.;पण या घटनेचा तपास कशा रितीने केला गेला, कुणाला ह्याचं खरं श्रेय जातं ह्या बाबतीत मात्र आपण अनभिज्ञ असतो. 
  16 डिसेंम्बर ला ही घटना घडली.पांढऱ्या रंगाची खाजगी बस, तिचे ढोबळ वर्णन नी आरोपीच्या संभाषणातून ऐकलेली त्यांची नावे या व्यतिरिक्त हातात काहीच नसताना एवढ्या मोठ्या दिल्ली शहरात , एवढ्या प्रचंड लोकसंख्येत ते सहा आरोपी शोधणं किती जिकिरीचं असेल? तरीही पोलीस यंत्रणेने घटनेच्या केवळ 2 दिवसात चार आरोपींना जेरबंद केलं  आणि पुढचया दोन दिवसात उर्वरित  दोन आरोपीतील  एकाला दिल्लीतून आणि एकाला बिहारमधून अटक केली. केवळ अटक करून चालणार नव्हतं
 सर्वांचे आरोप निश्चित व्हावेत, कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे गोळा करण्याचे कामही पोलिसानी केले.

देशातील जनतेच्या मनातली ,त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,ही इच्छा न्यायाधीशांच्या  निकालातून स्पष्ट झाली, त्याचे सर्वात मोठे  श्रेय जाते, पोलिसांच्या अथक परिश्रमाला. परंतु आजवर आपल्याला तयांचया मेहनती बद्दल तर सोडाच, त्या तपास कार्याच्या प्रमुखबद्दल सुद्धा माहिती नाहीये.  साऊथ दिल्लीच्या डी सी पी छाया शर्मा ह्यांच्या स्पेशल टास्क फोर्स द्वारे ही सर्व शोध  मोहीम पूर्ण झाली. त्या नेतृत्वाला, त्या टीम च्या दिवासरात्री च्या मेहनतीला सलाम म्हणूनच नेटफ्लिक्स ने ही वेब सिरीज सुरू केली आहे, जिचे नाव आहे "दिल्ली क्राईम". 
       ह्या घटनेची आठवण येण्यामागचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले "ऊंनाव " प्रकरण.कितीही कठोर कायदे केले, कितीही कठोर शिक्षा सुनावली गेली तरी स्त्रियांवरील अत्याचार कमी का होत नाहीत,असा प्रश्न प्रत्येक सज्जन, पापभिरू माणसाच्या मनात कायमच निर्माण होत आलाय. ह्या प्रकरणाच्या खोलात न शिरता इतकेच म्हणावेसे वाटते, की बलात्कार असो, अत्याचार असो, खून, दरोडा,वा कायदे भंगाची घटना असो, अशा प्रत्येक गुन्ह्यामागे असते ती त्या व्यक्तीची मानसिकता. जशी मानसिकता असेल तसे कृत्य घडते. सर्वसाधारणपणे क्रिमिनल केसेस मध्ये आपण एकतर पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा ह्यावर सर्व सोपवून मोकळे होतो किंवा त्यांना दोष देऊन मोकळे होतो; पण प्रत्यक्ष केस solve करत घडताना त्यांनाही बऱ्याच अडचणीतून जावे लागते हे आपल्या लक्षात च येत नाही
 इतकेच काय, प्रत्यक्ष गुन्हा घडत असतानाही एकीकडे गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा धाकच राहिला नाही म्हणत आपणही गुन्हेगारांच्या धाकाने सोयीस्कर रित्या आपले अंग काढून घेतो. जिवाच्या भीतीने साक्ष द्यायला घाबरतो.  एक जागरूक नागरिक म्हणून आपण इतके तर नक्कीच करू शकतो, की एखादी घटना (वाईट) घडत असताना पळून जाणे, video शूटिंग करत बसणे, फोटोज काढणे यापेकशा गरज असेल ती मदत करणे आणि योग्य तो निर्णय घेणे.  एरवी आपण " मी" मधून कधीही बाहेर येऊ शकत नाही. मी असा मी तसा, मला हे चालत नाही, मला ते आवडत नाही---- पण हाच "मी" जर आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून विचारात घेतला, जसे , मी रस्त्यावर कचरा करणार नाही, मी पर्यावरण संतुलन ठेवण्यामागे मोलाची भूमिका निभावेंन, मी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळीन, मी समोर होत असलेला अन्याय सहन करणार नाही----- तर बरेच सकारात्मक बदल घडू शकतील.   
     समाजात रहायचे तर समाज भान विसरून चालत नाही. प्रत्येक वेळी सरकारला, पोलीस यंत्रणेला, न्याय व्यवस्थेला दोष देऊन उपयोगाचे नाही. प्रत्येकाने स्वतापासूनच सुरुवात करावी, चांगल्या कामाची. म्हणजे आपोआप समाजाची सुधारणा होईल. असंतुष्ट आणि निष्क्रिय जनता तक्रार करत रहाते; पण ज्यांना काही चांगले बदल घडवून आणायची इच्छा आहे ते त्या दृष्टीने पावलं उचलतात.  जगात साधन संपन्न आणि साधन हीन अशी दोन प्रकारची समुदायातील व्यक्ती वावरत असतात. प्रत्येक वर्गाला कधी ना कधी कशाची तरी कमतरता जीवनात भासतेच. ही कमतरता काहींना सृजनशील बनवते तर काहींना गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळवते.  रशियन लेखक " फह्योदोर दोसतोयवस्की" ह्यांच्या क्राईम अँड पनिशमेन्ट आणि आयन रँड ह्यांच्या 1939 मधील "द फौंटेन हेड" ह्या कादंबरया मधेही हा विचार मांडण्यात आला आहे.
एका चित्रपट समीक्षकाने म्हटलंय की कायदा हा दोन प्रकारचा बनवला गेला पाहिजे. सामान्य लोकांसाठी एक आणि सृजनशील लोकांसाठी दुसरा. समस्या ही आहे की समाज अत्यंत सृजनशील असल्याचे काही ठिकाणी पहायला मिळते. अगदी विषम परिस्थितीतही जीवन जगण्याची आशा, मार्ग शोधले जातात. मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हर ला लवकर गाडी चालव असे वारंवार सांगितले गेले तेव्हा तो काय म्हणाला असेल? घाई सगळेच करत असतात; पण कोणी कुठे पोचलेले पाहिले नाही कधी . सॉक्रेटिस,  aristotle पेक्षाही मोठी गोष्ट हा टॅक्सी ड्रायव्हर सांगून गेला.  हा फक्त एक किस्सा झाला; पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, माणूस कुठे रहातो, कोणत्या परिस्थितीत रहातो याही पेक्ष्या तो कसा रहातो, अर्थात, त्याची जीवन जगताना ची मानसिकता कशी आहे, तो सकारात्मक, नकारात्मक गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणे महत्वाचे. 
         आपल्या भोवताली जे काही घडतं, ते आपल्या समोर बातमी च्या स्वरूपात येतच असतं. नुकतीच घडलेली ताजी पण अत्यंत वाईट घटना आणि बातमी म्हणजे,  सुषमा स्वराज यांच्या दुःखद निधनाची बातमी. बातमी ऐकून सगळे हळहळले. त्यावर कित्येकांनी लिखाण केलं, सोशल मिडिया वर खप साऱ्या पोस्ट्स आल्या------पण आल्या आणि 8 दिवसाचया आत विरल्याही. जो तो आपापल्या कामाला लागलाही. आयुष्य कुणासाठी थ।बत नसते, हे जरी खरं असलं तरी अशा चांगल्या व्यक्तींना फक्त श्रद्धांजली वाहून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या तील गुण अंगिकरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा आदर्श ठेवून वागण्याचा प्रयत्न केला तर ते स्वागतार्ह ठरेल. "मी आण्णा" म्हणून डोक्यावर टोपी मिरवल्याने कुणी आण्णा होत नाही, आणि "गांधीगिरी' केल्याने इच्छित साध्य होतेच असेही नाही. असो. 
    शेवटी इतकेच की बातमी चांगली असेल, सकारात्मक असेल तर त्यापासून काही शिकता यायला हवं आणि नकारात्मक असेल तर त्यापासूनही धडा घेता यायला हवा. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, मग ती कोणतीही असो आपल्याला काहींना काही शिकवून जातच असते. 🙏
        माणिक नेरकर.

No comments:

Post a Comment