Friday, June 14, 2019

अर्धा पेला रिकामा


असंच गप्पा मारत बसलो होतो मुलांशी. सकारात्मक आणि  नकारात्मक दृष्टीकोनावर  चर्चा सुरु झाली. कुणीतरी नेहमीचं अर्धा पेला भरलेला की अर्धा पेला रिकामा हे उदाहरण दिलं. मनात विचार आला, सकारात्मक आणि नकारात्मक हा विषय थोडा बाजूला ठेवला, तर या पेल्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहता येईल. आपण जन्माला येतो तेव्हा रिकामाच पेला घेऊन येतो. हळूहळू वेगवेगळ्या अनुभवांनी आयुष्याचा पेला भरू लागतो. कुणाचा पेला लवकर भरतो तर कुणाचा उशिरा , मात्र भरतो हे नक्की. हा भरत जाणारा पेला प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगवेगळा परिणाम करताना दिसतो. कुणी भरत जाणाऱ्या पेल्यासोबत परिपक्व होत जातो, तर कुणी अधिकच उथळ होतो.
पण मुळात पेला भरायचा अट्टाहास का? जेवढा पेला भरलेला तेवढी नवीन काही घेण्याची क्षमता कमी होत जाणार. ज्याचा पेला भरलेला, तो अधिक काही घेण्याच्या परिस्थितीतही नसतो नि मनस्थितीतही. आपला पेला कसा भरलेला आहे यातच समाधान मानलं, तर अर्धा पेला रिकामादेखील आहे, याकडे दुर्लक्ष होणार. आणि त्या पेल्यात येऊ पाहणारं नवीन ज्ञान, नवे अनुभव, नव्या आकांक्षा हे सर्व पेल्यापासून दूरच राहणार. अर्ध्या पेल्यावर समाधान मानलं, तर माणूस जे काही थोडंफार आयुष्यात केलेलं असेल, त्यातच गुंतून राहील. मग आणखी काही करण्याची इच्छा होणार नाही आणि प्रगतीला खीळ बसेल.
याउलट अर्धा पेला रिकामा असल्याची जाणीव मनात जागी असली, तर नवीन ज्ञान, अनुभव, आकांक्षा यांचं पेल्यात स्वागत होईल. पेला अर्धा भरायचा आहे, ही भावना पुढे पुढे जात राहण्याची प्रेरणा देत राहील. पेला अर्धा रिकामा आहे, ही जाणीव गर्वाला दूर ठेवेल आणि विद्या विनयाने शोभून दिसेल.
अर्धा पेला नकळत भरला गेला, आता अर्धाच भरायचाय हे लक्षात आलं, की त्यात काय भरता येईल, याचा विचार चोखंदळपणे सुरु होईल. चांगलं, सकस, सुयोग्य असं काहीतरी भरायला हवं, हे कळेल. अर्धा पेला वाट्टेल ते गोळा करून भरला, हे जाणवेल आणि त्यातलं वाईट, हिणकस, अयोग्य असं सर्व काढून टाकता येईल, नाहीतर किमान ‘असलं काही’ यापुढे त्यात भरलं जाऊ नये, याची काळजी घेतली जाईल. नवीन काही त्यात भरताना ही निवड आपसूक केली जाईल. अर्धा रिकामा पेला नवीन नाती, नवे ऋणानुबंध सामावून घ्यायला  उत्सुक असेल.
म्हणून मला तरी माझा पेला अर्धा  रिकामा ठेवायला आवडेल. आणि तुम्हाला?

Thursday, June 13, 2019

अडथळ्यांची शर्यत

प्रवासाला  जाताना  "happy journey " का म्हणतात , हे  खरया  अर्थाने  समजले, जेव्हा  आमच्या  सिक्कीम दार्जिलिंग ट्रिपची  सुरुवात, "Amravati -Mumbai exp. Is cancelled."असा मेसेज आला  तेंव्हा! आता  ऐनवेळी  काय करायचे? मुंबईला  पोचल्यावर  लगेच  दुसऱ्या दिवशी  आमचे  flight booking  होते. 
लगेच  एजंट  गाठला, त्याने  विदर्भचे रिझर्वेशन  देतो, असे आश्वासन दिले.माझी तणतण  सुरू  असतानाच पुन्हा  संध्याकाळी रेल्वेचा  मेसेज. ..ट्रेन  आपल्या  वेळेवर  धावणार आहे. मेसेज  खराच आहे  ना? याची खात्री करून घेतली.ठरल्याप्रमाणे मुंबईला  पोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी  11.30 ची फ्लाइट  होती.

 मुलुंडहून  निघायचे  म्हणून  लवकरच निघालो . एअरपोर्टवर self check in झाले, मी jet airways च्या काउंटरवर पुढील  प्रोसेससाठी गेले. तर तिथे  बसलेल्या  मुलीने  अगदी  थंडपणे  सांगितले, "mam,your flight is cancelled!" मला  ती  काय  म्हणाली  ते ऐकू  तर  आलं पण त्याचा  अर्थ समजायला वेळ  लागला.मी विचारलं,"what about return flight?"ती मक्खपणे उत्तरली,"both flights are cancelled! " म्हटलं, आमची  हाॅटेल, कार इ. बुकींगज झालेली  आहेत. आता  आम्ही  काय करायचं?  यावर  तिने  काहीही  रिअ‍ॅक्शन  दिली  नाही. असे  आमच्यासारखे बरेचजण  हे सगळं  आधी  त्यांना  म्हणून  गेले  असणार! 
      मी  म्हटलं  की हे तुम्ही  आम्हाला  कळवायला  नको? तर म्हणाली, 15-20 दिवसांपूर्वी च हे  झालंय, तुमचा  काही  contact no. नव्हता. म्हटलं, अच्छा, मग टिकीटस् कसे मेल केलेत? हे  सगळं  ऐकण्यात  तिला  अजिबात  इंटरेस्ट  नव्हता. "You will get your money back."असे म्हणत आवश्यक  कागदपत्रे  दिली.
My God! आमच्यापुढे  केवढे  मोठे  प्रश्नचिन्ह होते. लगेच  ज्या  एजंट  कडून  पुढचे  बुकिंग  होते, त्याला  फोन केला. तो म्हणाला, मी already सगळी   पेमेंटस केलेली  आहेत, तुम्हाला  एक  रूपयाही परत  मिळणार  नाही.
            आपली  flight  2-2.5  तासात  बागडोगरा एअरपोर्टला पोचणार, ट्रिप  सुरू. ...या  मूडमध्ये असलेले  आम्ही. ...
कल्पना करा, काय अवस्था  झाली  असेल  आमची? अक्षरशः  भांबावून  गेलो. काय करायचे  आता? 

मग शांतपणे  वेगवेगळ्या options  चा विचार  सुरु झाला. लगेच  दुसरे कुठचे flight  नव्हते, मध्यरात्री  पुण्याहून  होते  एक  .....तेही  चालेल  असा  विचार केला. सारखे  त्या  एजंटला  फोन  सुरु  होते. एकदा  मनात आलं की,हे सगळे  कॅन्सल  करून  मे महिन्यात  यावे. मग  त्या  एजंटशी तसे  बोलणे  सुरु  केले. हे सगळे T2 वर बसून  सुरु  होते. 2 तास ,नुसती  फोनाफोनी. ...विचार -विचार. ...
             शेवटी  असे  ठरले की, उद्याचे  flight पाहू.निकीता online ट्राय  करत होती. ती मैत्रिणीच्या साखरपुड्यात  होती. ती  म्हणाली, आता  तुम्ही  घरी जाऊ  शकता. ....होऊन  जाईल  काम....एजंट  पण म्हणाला  की  मी जमेल  तसे अॅडजस्ट करून  तुम्हाला जास्तीत जास्त  पाॅइंटस् दाखवितो. आम्ही  मग टॅक्सी  करून मुलुंडला निघालो. तर परत  निकीताचा  फोन. ..साइट  ओपन  होत नाहीये. ..तुम्हीच  करा T1 ला जाऊन  बुकिंग!T1 to T2 बरच  अंतर आहे. तीच  टॅक्सी T1 कडे वळवली. सामान  घेऊन  सारखे  इथून  तिथे  सुरु  होते. दुसऱ्या दिवशीचे व परतीचे  INDIGO चे बुकींग  केले. आमच्या  आधीच्या airfare च्या  दीडपट  तिकीट  पडले. पण गरजवंताला. .......
ट्रिपचा एक दिवस वाया  गेला. 
दुसर्‍या दिवशी सकाळी बागडोगराला पोचलो. ✈

 एअरपोर्टहून साधारण  11.30 ला निघालो. जास्तीत जास्त  4 तासात  पोहचू, ड्रायव्हर  म्हणाला. पण  जसे  आम्ही  गंगटोकच्या दिशेने  जाऊ  लागलो, तर " न भूतो न भविष्यती " असा  traffic jam!
अत्यंत  अरुंद रस्ते, दोन्ही  बाजूंनी लागलेली  गाड्यांची  रांग, शेवटी  patience  संपून झालेली हाणामारी, सर्व काही शांतपणे  बसून बघणे, एवढेच  आमच्या  हातात  होते. आम्हाला  तरी  हाॅटेलला  जायचे  होते. पण ज्यांना  एअरपोर्ट गाठायचे  होते, त्यांची तर  flight मिस झाली  असणार. आम्ही 7 तासांनी हाॅटेलला  पोचलो.म्हणजे तो दिवसही संपत आला. 
           सकाळी  लवकर उठून  गंगटोकहून निघालो  बाबा  मंदिर ,लेक पहायला. ...उंच उंच  पर्वतराजी, खुळावणारा,नादमयी  निसर्ग, दाट धुकं, हे सर्व  पहाताना  मन अलगद तरंगू  लागलं.  
    गंगटोकचे साइट सिइंग पण मस्त  एन्जॉय  केलं. सगळीकडे  इलेक्शनचा  माहोल  होता. गंगटोकला  आम्ही  तिथून  निघालो  त्याच्या  दुसर्‍या दिवशी,  तर दार्जीलिंगला  बर्‍याच दिवसांनी  इलेक्शन  होतं. आम्ही  म्हटलं, वा!काय  लक  आहे  आपलं? पण  जसे  दार्जिलिंग  जवळ  येऊ लागले, तसा ड्रायव्हरने बाँब  टाकला. 
साब,मोमता बॅनर्जी की कल रॅली  है  दार्जिलिंग में. .तो  सुबह 8 बजेसे सब साइट  सिइंग वाले  रस्ते बंद! अरे, दीदींना उद्याचाच दिवस  मिळाला  का? आता  problems ची इतकी  सवय झाली होती  की  काही tension etc. आलं  नाही. बरं  आम्ही  परतीचे flight   बुकींग केल्याने (अव्वाच्या सव्वा  किंमतीत) मुक्काम  वाढवू  ही शकत नव्हतो. 
     पुन्हा एकदा  available options चा विचार  झाला. मग  काय, पहाटे  3.30 उठून  टायगर  हिलच्या  सूर्योदयापासून  सुरूवात केली, आणि  नेहमीचे पाॅइंटस्  न दाखविता, दार्जिलिंगचा  unexplored part  ड्रायव्हरने आम्हाला दाखविला. (Again  with extra charges)कारण तिथे  ड्राईव्ह  करणे हे  येरागबाळ्याचे  काम  नव्हते. पण तो इतका  सुंदर  अनुभव होता की  मोमता  दीदींना  आम्ही थॅंक्स  म्हटले! 
      तरी  मैत्रिणींनो,  जो काही quality time आम्ही  तिथे  spend केला, त्यात  हे  सगळे  अडथळे  पार  विसरुन  गेलो. 
असाही   एखादा टूर!  नाही  का?

Wednesday, June 12, 2019

कहाणी अक्षराची

अक्षरा १-२-३ नोव्हें २०१८
ऐका अक्षरा तुमची कहाणी. आटपाट ऐवजी यात अकोला नगर आहे. ज्यात आहेत पीकेव्हीचे मळे, महानचे तळे, राजेश्वराची देवळे रावळे. त्यात काही सख्या सुखाने नांदत होत्या पण काहीतरी मिसिंग होतं. एके दिवशी काय झालं? २००७ मध्ये ग्रुप स्टडी एक्स्चेंजच्या प्रकल्पासाठी मोहिनीची निवड झाली आणि त्याच्या तयारीसाठी नासिकला फेर्‍या सुरू झाल्या. तिथली सखी डॉ. श्रेया तिला तिच्या मैत्रिणींना भेटायला घेऊन गेली. एका कॉफी शॉप मध्ये ठरलेल्या वेळेला त्या ६,७ जणी आल्या. काहींनी आपल्या जवळची पुस्तकं एकमेकींना दिली. त्यावर उलट-सुलट चर्चा झाली. कॉफी पिऊन सगळ्या प्रसन्न मनाने आपापल्या कामाला निघून गेल्या. तिने विचारले, बायांनो हा कसला वसा वसता? श्रेया म्हणाली, "आनंदाचा आणि प्रगतीचा". या व्रताला काय करावं? "दिवस- वेळ ठरवून भेटावं. पालकत्व आणि व्यक्तिमत्व विकासावरच्या नवनवीन पुस्तकांबद्दल बोलावं." नेहमीच्या टिपिकल बीसीपेक्षा हे व्रत फार म्हणजे फारच इंटरेस्टींग वाटलं. मग तिने काय केलं? अकोल्यातल्या तिच्या पुस्तकप्रेमी मैत्रिणींना याबाबत सांगितलं आणि विषयाचं बंधन न ठेवता आपणही वाचनवसा घेऊया अशी इच्छा व्यक्त केली.

स्वातीचे पुस्तक प्रकाशन
पल्लवी, शुभांगी, मीनल, अश्विनी, अंजली, भाग्यश्री, अनघा, अनुजा आणि अर्चना तिच्या कॉम्प्युटर क्लासला वेळ ठरवून चर्चेला जमल्या. एकमताने ठरलं- उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण हे व्रत कसं करावं. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी करावं. एकेकीच्या घरी भेटावं. त्या महिन्यात वाचलेल्या पुस्तकांवर(च) बोलावं. पुस्तकखरेदीसाठी प्रत्येकी काही रक्कम जमा करून ड्रॉ काढून एकीला द्यावे. ती पुस्तकं मनोभावे वाचावी मग इतरांना वाचायला द्यावी. चहा कॉफी शिवाय काही करू नये. अशा रितीने ऑगस्ट २००७ साली बुकक्लबचा वसा घेतला. त्यात स्वाती, मंजिरी, वर्षा, अपर्णा आणि मंजूताई सहभागी झाल्या. शुभांगीच्या एनजीओ ऑफीसची जागा या उपक्रमासाठी तिने तेव्हा आणि पुढेही बरीच वर्ष उपलब्ध करून दिली. सगळ्य़ांकडे इतका पुस्तकसंग्रह झाला की खरेदीचं बंधन शिथिल करावे लागले. सुरूवातीला मातृभूमी मध्ये एक पान लेखनासाठी मिळाले. त्यात चौघींचे सदर सुरू झाले. एव्हाना आरती, सुनीता, मनीषा, मेधाताई पण अक्षराचा भाग झाल्या. नावीन्यासाठी एकच लेखक, एकच साहित्यप्रकार, एकच विषय, बाहेरील वक्ता अशा वेगवेगळ्य़ा थीम घेऊन दरवर्षीचे राउंड्स होत गेले. व्रताची फळे दिसू लागली.
स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसह जागतिक पुस्तक दिन
नुसतं ऐकणार्‍या बोलू लागल्या, बोलणार्‍या लिहू लागल्या. या वर्षी तर अक्षराचा स्वत:चा ब्लॉग सुरू झाला. दरम्यान माणिकताई, स्वाती, सीमाताई यांची एक एक पुस्तकं प्रसिद्ध झाली. सीमाताई आणि मोहिनी विदर्भ, अखिल भारतीय, विश्व मराठी साहित्य संमेलनापर्यंत वक्ता म्हणून पोचू शकल्या ते याच व्रताच्या कृपेने आणि सख्यांच्या भक्कम प्रोत्साहनामुळे.


’मन’ १९ फेब्रुवारी २०१२
व्रताच्या सुरूवातीला काय झाले? गटाचे बारसे झाले. ’स्वयंसिद्धा’ नाव ठरले. अर्थ छान आहे पण ते ऐकताच रूक्ष स्त्रीमुक्तीवादी गट उगीचच डोळ्यासमोर येतो आणि त्यात पुस्तकाचा संदर्भ नाही अशी चर्चा झाली. कीस पाडून अखेर ’अक्षरा - वाचनसंस्कार’ हे नाव बहुमताने निश्चित करण्य़ात आले. पुढे काय झाले? आपण वाचनसंस्काराचे उपक्रम घेऊया, त्यासाठी फंड हवा, म्हणून एखादा कार्यक्रम आयोजित करूया असे ठरले. पण आधीच्या खर्चाचे काय, त्यासाठी सगळ्या जणींनी ठराविक रक्कम एकत्र जमा केली. शीतल, भक्ती, प्रतिभाताई, अर्चना, सुवर्णा, माणिकताई या दरम्यान अक्षराचा भाग झाल्या. नागपूरच्या एका चमूचा ’मन’ हा गाणी आणि मनोविश्लेषणाचा कार्यक्रम घ्यावा असा प्रस्ताव वर्षाने मांडला. तिची बेबी अक्षरा उर्फ श्रावणी सगळ्य़ा मिटींगला उपस्थित असे. (वैजूचा इथपर्यंत सहभाग होता. आधी अनुजा आणि नंतर वैजू या कार्यक्रमानंतर फार दिवस राहिल्या नाहीत.) कार्यक्रम यशस्वी झाला. फेब्रुवारी २०१२ मधल्या ’मन’ कार्यक्रमानंतर जानेवारी २०१३ मध्ये मनीषा म्हणाली, ’वाटेवरती काचा गं’ हा बाललैंगिक शोषणाबाबत जागृती करणारा मीना नाईक यांचा कार्यक्रम घेऊया’.
वाटेवरती काचा गं -९ फेब्रु २०१३
अशा कार्यक्रमांच्या आर्थिक व्यवहारांसाठी अक्षराचे बँक खाते आवश्यक होते. संस्था रजिस्टर केली की निवडणुका, पदनियुक्ती मग इर्षा, गटबाजी याची लागण नकोच म्हणून यापासून अक्षरा लांब होती आणि राहील. खात्यासाठी मात्र ३ सह्या आवश्यक होत्या. आता काय करावे, प्रश्न पडला. बँकेत याबाबत चौकशीसाठी गेलेल्या मेधाताई, पल्लवी आणि मनीषाने अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार अशा सह्या तिथल्या तिथे करून मोकळे व्हावे असा सुट्सुटीत पर्याय यावर निघाला. मेधाताई आणि पल्लवी आजही चोख हिशेब पाहत आहेत.दोन्ही कार्यक्रमांना अक्षरांच्या मेहनतीमुळे उत्तम प्रतिसाद लाभला. परंतु ’मन’ या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असणारे समुपदेशक डॉक्टर येऊ शकणार नाहीत असे कार्यक्रम अगदी तोंडावर आल्यावर कळले. ’काचा’ कार्यक्रमात अपेक्षित असलेला मुख्य पपेट शो मीनाताईंनी सादर केला नाही. या अनुभवांमुळे स्वत: पाहिलेला कार्यक्रम असल्याशिवाय आणि समन्वयाची संपूर्ण जबाबदारी कुणीतरी घेतल्याशिवाय व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे नाही असे सर्वानुमते ठरले. इकडे वाचनव्रतात खंड पडला नाही.

प्रकाशपूजक कुसुमाग्रज - २७ फेब्रुवारी २०१४
पुढे काय झाले? अक्षरांनीच मिळून एखादा कार्यक्रम सादर करावा असे ठरले. वर्षभराने म्हणजे २०१४ च्या मराठी दिनी, कुसुमाग्रजांवर. या सुमारास श्रुती आणि सीमाताई अक्षरा सदस्य  झाल्या .सक्रीय सहभाग असूनही काही अडचणीमुळे सीमाताईला प्रत्यक्ष कार्यक्रमाला येता आले नाही. गद्य निवेदन, कविता सादरीकरण, समूहनृत्य, नाटकातले प्रवेश आणि गाजलेली गाणी असे या कार्यक्रमाचे आगळे स्वरूप प्रेक्षकांना आवडले. प्रत्येकीतल्या गुणांना यात वाव तर मिळालाच पण फक्त महिलांनी अशा पद्धतीने सादर केलेला हा अकोल्यातला अनोखा कार्यक्रम ठरला. पुढे स्वाती म्हणाली, "पुण्याच्या प्रमोदिनी वडके कवळे आणि नीलिमा बोरवणकर या प्रसिद्ध लेखिकांची कथालेखन कार्यशाळा आयोजित करूया." अक्षरांच्या साथीने कार्यशाळा उत्तम झाली. कथालेखनाचे विविध पैलू उलगडले गेले.

खुली कथालेखन कार्यशाळा 

आपण एवढे वाचतो आणि मुले! सख्यांना वाईट वाटले. मुलांसाठी अक्षरा किड्स सुरू करावे असे ठरले. २०१३ ते २०१६ असा तीन वर्ष हा उपक्रम चालला. दहावी ओलांडली की मुलांची गळती सुरू होई. ’यारे बाबांनो’ करत मुलांना खाऊ, क्वीझमध्ये बक्षिसे वगैरे आमिषे दिली परंतु या पिढीच्या मुलांना वाचायला लावणे महाकठीण. अखेर एका पावसाळ्य़ात किड्स बीसीच्या दिवशी प्रचंड पाऊस पडला. त्यात तो उपक्रम वाहून गेला. मग अक्षरांनी काय केले?  विदर्भ साहित्य संघ, एलआरटी महाविद्यालय, ब्राह्मणसभा, साने गुरुजी वाचनालय इ. संस्थांच्या जोडीने
अक्षरा आयोजित पुस्तक प्रकाशन
लहान मोठे कार्यक्रम आयोजित केले.
शालेय विद्यार्थ्यांसह पुस्तक दिन
कार्यक्रमांच्या काही मिटींग तर चक्क ऑनलाईन घेतल्या. कार्यक्रम म्हटला की हॉल बुकिंग, प्रायोजक शोधणे, शासन परवानग्या, छपाई, बॅकस्टेज, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या जबाबदार्‍या सगळ्य़ा भानगडी. इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रत्येकीच्या कल्पना वेगळ्य़ा. त्याने काय होई? चर्चा, मतांतरेच नव्हे तर घनघोर छप्परतोड वादंग देखील होत. अगदी आता घटस्फोट होतो की काय अशी वेळ येई :-) पण सरस्वतीकृपेने पुन्हा दिलजमाई होई. कुणी सखी वाद झाला म्हणून समूह सोडून गेली नाही. (श्रुती, अंजू, मनीषा, शीतल या केवळ अकोल्यातून बदली झाल्यामुळे व्हर्च्युअल सदस्य झाल्या. ग्रुपवर होणार्‍या विविध विषयांवरील चर्चेत या व्हर्चुअल सदस्य सहभागी राहू लागल्या. श्रुतीचा तर त्यात अभ्यासपूर्ण सहभाग.)

व्याख्यान- ययातिकन्या माधवी
अशा या व्रतामुळे काय झाले? वाचनानंद तर मिळालाच पण वाचनवेडाच्या धाग्यांचे मैत्रीच्या गोफात रूपांतर होत गेले. अनेकींच्या सख्यांना अक्षरात सहभागी व्हायचे होते पण एका घरी एका वेळी किती जणी एकत्र येऊ शकणार हा विचार करून अक्षराच्या शाखा काढाव्या हा पर्याय ठरला. त्यानुसार आपापल्या इच्छुक मैत्रिणींना घेऊन सप्टेंबर २०१६ ला सुरू झालेली अक्षरा २ स्वतंत्रपणे फार छान वाटचाल करू लागली. नंतर सुरू झालेल्या अक्षरा ३ चीही घडी बसू लागली. प्रत्येक गटात अंदाजे २५ अशा ७०-७५ अक्षरा. सीमाताईच्या कल्पनेला दुजोरा देत भाग्यश्रीच्या हॉटेलमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये तिन्ही अक्षरांचे एकत्रीकरण  झाले. तिथे काय झाले? च्याऊम्याऊ बरोबरच परस्पर परिचय झाला. तिन्ही गट मिळून येत्या काळात अधिक जोमदारपणे नवे उपक्रम करू असा विश्वास निर्माण झाला.

लेखिका विनया जंगलेंसह
या व्रताने काय शिकवले? समाजऋण फेडण्याच्या अल्प प्रयत्नात अक्षरा आपापल्या परीने कायम सहभागी झाल्या. सुरूवातीला मंजूताईच्या अंध मुलांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांना आर्थिक मदतीबरोबरच अभ्यासक्रमांची आणि अवांतर पुस्तकं अक्षराने रेकॉर्ड करून दिली. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण क्षितीज नागपूरचे संस्थापक स्वत: येऊन देऊन गेले. ’पुस्तकार’ या वझेंच्या प्रकल्पात अक्षरांच्या गटांनी निवडक शाळांमधून वाचनविषयक उपक्रम राबवले. एकवीरा संस्थेला साहाय्य किंवा बालिकाश्रमातील मुलींना सॅनिटरी पॅड्स पुरवणे असे उपक्रम पण अक्षराने केले.
लेखिका माधुरी शानभाग भेट १ नोव्हे २०१५
गेल्या वर्षी झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनात अक्षराने आपले योगदान दिले.

माधुरी शानभाग, उत्तम कांबळे, विनया जंगले, सुलभा ब्रह्मनाळकर यांसारख्या लेखकांची भेट कक्षा रुंदावणारी ठरली. २००९ मध्ये अक्षरांनी
मा.स्व.साधनाताईंसह- आनंदवन - २६ जाने २००९
’आनंदवन’ आणि ’हेमलकसा’ येथे भेट दिली. ’आलो येथे रिकामा ..बहरून जात आहे’ हा संदेश देणारा हा अनुभव संस्मरणीय ठरला. मीनलच्या नियोजनातील पुढाकारासह एकदिवसीय कितीतरी सहली झाल्या. काटेपूर्णा, नरनाळा, मुक्तागिरी, वारी, वान. एकत्र नियोजन करून बासर आणि नुकतीच गोवा अशा मोठ्य़ा सहली देखील झाल्या. पुस्तकवाचनापलिकडे जाऊन निसर्ग आणि माणूस वाचायलाही तितकीच मजा येते हे या सहलींमधून अक्षरांनी अनुभवलं.

अक्षराच्या वाचनसंस्काराच्या व्रताची दखल महाराष्ट्र टाईम्सनेही घेतली. तिडके सरांनी अक्षरावर लिहिलेला लेख त्यात प्रसिद्ध झाला. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-dr-shrikant-tidke-column/articleshow/57818576.cms?utm_source=tw&utm_medium=Twitter&utm_campaign=web
हे व्रत काही मोठे नाही. अजून खूप काही करता येईल. करायला हवे आहे. आपले नाव व्हावे, कौतुक व्हावे असं काहीही भव्यदिव्य अक्षराने केलेलं नाही. परंतु कोणताही लोभी हेतू मनात न ठेवता काही मैत्रिणी केवळ आणि केवळ वाचनप्रेमापोटी एकत्र येतात, और कारवाँ बनता गया म्हणत चुकत-शिकत एकमेकींच्या मदतीने पुढे जात राहतात आणि चक्क एक तप उलटले तरी एकत्र नांदतात हे जरा नवलाचेच. याचे श्रेय अर्थात प्रत्येक अक्षरा सदस्याचे.
अशी ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ. पण संपूर्ण मात्र नाही. कारण हे व्रत थांबवावयाचे नाही. अक्षरांनी जसा वाचनसंस्काराचा वसा न टाकता अक्षरा २ आणि ३ ला दिला तसा त्यांनी तो ४, ५, ६... ला देत राहावा. सरस्वतीकृपेने अक्षरांचा मनस्वास्थ्य, वाचनानंद मिळवण्याचा आणि निर्भेळ मैत्रीचा मनोदय पुरा झाला तसा तुमचा आमचा आणि पुढील शाखांचा होवो.

गोव्यातली धमाल

काटेपूर्णा अभयारण्य
नरनाळा किल्ल्यावर

वारी येथील सहभोजन

वाचत सुटले त्याची गोष्ट !!

 (निरंजन घाटे सरांची क्षमा मागून )
आता तुम्ही म्हणाल वाचनाची काय गोष्ट सांगायची, घाटे सरांचं पुस्तक वाचेपर्यंत मलाही असंच वाटत होतं म्हणून मी कित्येक दिवस ते बाजूला करत होते शेवटी एक दिवस 'बघू तरी काय लिहिलंय' ह्या अविर्भावात वाचायला घेतलं आणि चकित झाले, काय काय आणि किती किती वाचलय ह्या माणसाने !...आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे काय , कधी आणि कुठे वाचलय हे त्यांच्या लक्षात आहे. मला माहितीय की माझ्या वाचनप्रिय मैत्रिणींनी हे पुस्तक आधीच हातावेगळ केलं असेल पण कोणाचं राहिलं असेल तर अवश्य वाचा.
         आता ह्या सगळ्यात 'हिचं काय ब्वा ? 'असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर सांगायचं तात्पर्य हे की ह्या पुस्तकापासून मी एकदम भारावले बिरावले आणि ठरवलं आपणही आपला वाचनप्रवास लिहायचा मग तो वाचणार कोण ?...तर त्यासाठी तुम्ही आहातच की !! 
माझा वाचनप्रवास सुरु झाला तो 'चांदोबा' आणि 'लोकमत कॉमिक्स' पासून. एका मैत्रिणीकडे लोकमत  पेपरबरोबर हे मासिक येत असे आणि आमचे त्यासाठी नंबर लागत असत. चांदोबा कधीकाळी गावाला वगरे गेलो तर स्टेशनवर किंवा स्टँडवर बाबांकडून हट्टाने मी घेत असे. पूर्वी लहान मुलांसाठी लायब्ररी किंवा पुस्तकं विकत घेऊन वाचणे हे प्रकार फारसे नसत त्यामुळे मला तर जिथे पुस्तक दिसे तिथे मी उडी मारत असे, ह्याच कारणाने माझ्या नागपूरच्या मावशीकडे जायला मला फार आवडायचे माझी मावसबहीण वाचनवेडी असल्याने त्यांच्याकडे त्याकाळी सुप्रसिद्ध असलेल्या 'किशोर' ह्या मासिकाचे अंक एका कपाटात नीट लावून ठेवलेले असत तिथे गेले की बाजूच्या पलंगावर मी माझी बैठक जमवत असे आणि माझी मस्त वाचनसमाधी लागत असे. बाबांची नोकरी बदलीची असल्याने दर दोन वर्षांनी आमचा मुक्काम हलत असे नवीन गावात ओळख होऊन त्यात वाचनप्रिय मैत्रिणी शोधणे म्हणजे जरा अवघड होई. पुलगावला असतांना जवळच्या एका गावात असलेली घरपोच लायब्ररी आम्ही लावली होती. निवडक पुस्तकं घेऊन तो माणूस आमच्याकडे येत असे तिथे बऱ्यापैकी ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला मिळाल्या,मोठ्यांसाठी असलेल्या त्या पुस्तकांमधे मला वाचता येतील अशी पुस्तके म्हणजे ऐतिहासिकच असायची . आमच्याकडे घरी 'इंडिया टुडे ' हे मासिक येत ते मी वाचत असे,  माझे इंग्लिश पुस्तक वाचन मात्र  मर्यादितच राहीले. नागपूरच्या एका ट्रिप मध्ये मामाकडे गेले होते तिथे माझ्या बरोबरीचं कोणीच नव्हतं त्यामुळे कंटाळले होते तेव्हा जायच्या आदल्या दिवशी मामीनी कोणाकडून तरी 'राऊ' कादंबरी आणली दुसऱ्या दिवशी निघायचं असल्याने अक्खी कादंबरी मी एका दिवसात संपवली होती हे अर्थातच मामीच्या कृपेने झालं कारण खाण्यापिण्याची सोय बसल्या ठिकाणी होत होती.  पुढे अमरावतीला आल्यानंतर कॉलेज मध्ये असतांना आईच्या लायब्ररीतून मला सुमती क्षेत्रमाडे ह्यांच्या कादंबऱ्या मिळाल्या त्यांची लेखनशैली मला आवडायची. काय वाच किंवा काय वाचू नको हे सांगणारं कुणी नसल्याने किंवा गावं बदलत असल्याने चांगल्या लायब्ररीची माहिती होत नसे त्यामुळे माझे वाचन यथातथाच होते .  लग्नानंतर मात्र एकाच गावात राहिल्याने  वाचनप्रिय मैत्रिणींचा गृप जमला, आता बऱ्यापैकी म्हणजे विविध विषयांवरचे वाचन होते किंवा त्यांच्याकडून ऐकायला मिळते शिवाय फेसबुक वरच्या पुस्तकप्रेमी संघामुळेही बरेच काही वाचल्या ऐकल्या जाते. पुस्तके विकत घेऊन त्याचा संग्रह करण्याची मला कायम इच्छा होती ती सुद्धा काही अंशी पूर्ण होतेय. मी विकत घेतलेलं पाहिलं पुस्तक होतं वीणा गवाणकरांचं 'एक होता कार्व्हर ' . अफाट जिद्द आणि मेहनत ह्यांच्या जोरावर माणूस कुठे पोहचू शकतो ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. माझ्याकडे ट्युशनला येणाऱ्या मुलांना मी नेहमी ह्या पुस्तकाबद्दल सांगते , वाचायला देते . शालेय अभ्यासक्रमात ह्या पुस्तकातला एक भाग मागच्या वर्षांपासून समाविष्ट केलाय हे पाहिल्यावर खरंच खूप आनंद झाला. मुलांना हे असं काहीतरी प्रेरणादायक वाचायला मिळालं पाहिजे. क्षुल्लक कारणांसाठी आत्महत्येसारखं जे टोकाचं पाऊल मुलं उचलतात किंवा  घरदार सोडून पळून जातात त्यात निश्चितच घट होईल असा विश्वास हे चरित्र निर्माण करतं. 
         तर असा हा माझा छोटासा वाचनप्रवास. कधीतरी एखादी अपरिचित व्यक्ती भेटली आणि जुजबी ओळख झाल्यावर ती वाचनवेडी निघाली तर ह्या प्रवासामुळे पुढल्या गप्पा जास्त रंगतात असा माझा अनुभव आहे. 
तुमचा वाचनप्रवास तर माझ्या प्रवासापेक्षाही विलक्षण असणार ह्याची मला खात्री आहे. 
           एका हातात आवडतं पुस्तक आणि दुसऱ्या हातात चहाचा कप बाहेर रिमझिम पडणारा पाऊस  बस और क्या चाहिये !! असं माझं एक स्वप्न आहे.. तुमचं पण असंच आहे ना !!

Tuesday, June 11, 2019

चिवडा

मध्यंतरी माझ्या मैत्रिणीने खास ती राहते तिथला प्रसिद्ध चिवडा खाऊ म्हणून आम्ही भेटल्यावर आणून दिला .चमचमीत ,चविष्ट, चिवड्याचा पहिला घास घेतल्यावरच अगदी ब्रम्हानंदी टाळी  लागली! किती आवडतो आपल्याला हा पदार्थ नाही ?चिवड्यासाठी कधीच ना नसते.
   प्रत्येक घासागणिक चिवड्याचे निरनिराळे संदर्भ डोळ्यापुढे येऊ लागले .भावासाठी लहानपणापासून एक चिवड्याचा डबा आईला घरात तयार ठेवावा लागायचा .संध्याकाळी भूक लागल्यावर तो डबा उघडायचा. मुख्य म्हणजे सुरुवात एकाने केली की आपोआप घरातला प्रत्येकजण त्यावर ताव मारणार हे ठरलेले .विशेषतः काजू किसमिस असलेला चिवडा असेल तर त्या मधूर चवीने भावाचा चेहरा जास्त फुलायचा. दुसर्‍या भावाची दुसरी तर्हा!  याला आवडायचा किंचित चामट,  लसूण घातलेला चिवडा. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या त्याच्या मित्रांकडे त्याने असा चिवडा खाऊन लगेच घरी आईला तसा चिवडा करायला लावला होता. तो लहानपणी अशा चिवड्याला "गरिबांचा चिवडा" म्हणत असे.
 चिवडा हा बहुदा असा एकच पदार्थ असावा की तो बारा महिने खाल्ला जाऊ शकतो आणि तरीही दिवाळीसारख्या सणांच्या फराळात त्याचे स्थान अढळ असते. चकली, शंकरपाळे, अनारसे इत्यादी पदार्थांबरोबर चिवड्यामुळे दिवाळीच्या फराळाला पूर्णता येते .
 अशा या सर्वव्यापी चिवड्याचे प्रकार किती !पातळ पोह्यांचा ,कांदा घालून तिखट किंवा गोड, लसूण घातलेला ,भरपूर मिरची आणि कढीपत्ता घातलेला ,कधी शेंगदाणे ,कधी काजू, कधी बेदाणे खोबऱ्याचे काप घातलेला, कधी डाळव ,कधी बडीशेप, कधी तीळ धने घातलेला .कधी पोहे तळून ,कधी परतून, तर कधी कच्चे पोहे त्यात सगळी कच्चा कांदा वगैरे सामुग्री घातलेला . 
पोह्या शिवाय चिवडा ही कल्पना काहींना योग्य वाटत नाही .पण साळीच्या लाह्या ,मुरमुरे ,ज्वारीच्या लाह्या, गव्हाच्या लाह्या, इत्यादी परतून त्यात वरील पैकी साहित्य घातले की तोसुद्धा काहींच्या मते चिवडा! कच्चा चिवडा हा प्रत्येक उन्हाळ्यातल्या दुपारच्या खाण्यासाठी केला गेल्याशिवाय उन्हाळा संपतच नाही. पातळ पोहे, तेल, तिखट मीठ, शेंगदाणे, कांदा कोथिंबीर ,याबरोबर ताज्या कैरीचे लोणचे छान एकत्र करून थोडा वेळ झाकून ठेवायचे. त्याच्या चमचमीत वासाने तोंडाला पाणी सुटले असायचे .लगेच सगळ्यांनी पत्ते खेळता खेळता तो कच्चा चिवडा खायला घ्यायचा. तेव्हा खरे उन्हाळा साजरा झाल्यासारखा वाटायचं .
चिवडा हे संबोधन काही ठिकाणी  पोळीच्या पदार्थाला सुद्धा वापरले जाते .शिळ्या पोळ्या उरल्या की त्याचे थोडे बारीक तुकडे करायचे. ते तळून घेऊन तळलेले शेंगदाणे ,तिखट मीठ, बरोबर लोणचे घातलेला हा पोळीचा चिवडा पण बर्‍याच जणांच्या आवडीचा आहे. 
 तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या कॉलेजमध्ये आमच्या एक नातेवाईक शिकत होत्या तिथे मी कामानिमित्त जाऊन आल्याचे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारहोता- तिथे तो सायकलवर लाकडी डब्यात चिवडा विकायला येणारा माणूस येतो का ग अजून?  प्रवासाला जाताना वाटेत खायला चिवड्याचा पुडा अजूनही बरेच जण आवर्जून घेतात. घरातली मुले शिक्षणासाठी बाहेरगावी राहणार असतील तर टिकाऊ, मधल्या वेळच्या खाण्यासाठी योग्य पदार्थ म्हणून चिवड्याचा नंबर ठरलेलाच असतो.
अशा या चिवड्याचे मूळ कुठे असावे असा एक प्रश्न उगाचच मनात आला .शोधल्यावर कुठेतरी हा मूळ बिहार प्रांतातला पदार्थ असल्याचे कळले. अरे ! पिढ्यानपिढ्या आपल्या मराठी घरांमधून केल्या जाणाऱ्या चिवड्याचा जन्म बिहार मध्ये कसा झाला असेल असे वाटले. पण उगाच प्रांतवाद मनात न येऊ देता प्लेटमध्ये थोडा अजून चिवडा घेऊन चिवडानंद घेत राहिले.

Monday, June 10, 2019

मौन

मौनसाधना करणे खरेतर सगळ्यांना आवश्यक आहे. कठीण असले तरी अशक्य नाही. कधी कधी अगदी शांत बसावेसे वाटते. आपला आपल्याशी पण संवाद नको वाटतो. जैन मुनी प्रमाणसागर महाराजांनी मौन चा अर्थ छान सांगितला आहे.  मौनाचा महिमा अपार आहे. मौन धारण केले की भांडण संपुष्टात येते. अध्यात्मिक दृष्टीने बघितले तर मौन धारण करण्यामुळे आपल्या प्रवृत्ती संयत राहतात. बोलण्यात आपली उर्जा वाया जाते. थोडावेळ असे कोणाचेही न राहता आपल्या आत्मचिंतनात राहणे म्हणजे मौन. शरीर आणि आत्मा वेगळे आहेत याचा अनुभव एकदा प्रत्येकाने घेऊन पाहणे म्हणजे मौन. मौन म्हणजे मनात विचार पण येऊ द्यायचा नाही.मौन आतून आले पाहिजे. मौन म्हणजे  नुसते बोलणे बंद करणे नाही. बरेच लोक इशार्यात बोलतात, लिहून देतात हे मौन नाही तर हा अतिचार आहे. मौन एकदम होणार नाही. त्यासाठी थोडासा वेळ मौन धारण करुन हळूहळू वेळ वाढवत न्यायची. अभ्यास जितका जास्त तितका फायदा अधिक होईल.

डॉ राजेंद्र बर्वे यांच्या हॅव अ नाईस डे या पुस्तकात त्यांनी मौना बद्दल अगदी बरोबर सांगितले आहे. ते म्हणतात, मौन म्हणजे वाचाळपणातला फोलपणा ओळखणे. संवादातील अधुरेपणा आणि गप्प राहण्यातला बोलकेपणा जाणणे म्हणजे मौन. अंतर्मुख होणे म्हणजे मौन. आपल्या विचारांकडे तटस्थपणे पाहणं. नकोशा विचारांना हाकलूनही द्यायचे नाही आणि चांगल्या विचारांची वाटही पाहायची नाही... खरचं आपण खूपदा व्यर्थ बोलतो. वाद घालून आपला आणि दुसर्‍यांचा वेळ, उर्जा वाया घालवतो. शिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. मनं दुरावतात तो तोटा आणखी असतोच. इतका त्रास सहन करण्यापेक्षा मौन धारण करणे केव्हाही उत्तम आहे. शब्दांच्या मर्यादा कळतात तसेच नेमक्या संवादतलं सामर्थ्य पण कळतं.

आपली मुलं लहान असताना आपण त्यांनी केलेल्या चुकीच्या हट्ट ला, चुकीच्या कृती ला न बोलून आपली नाराजी व्यक्त करतो. आपलं न बोलणं मुलांना बरोबर कळतं आणि अनाठायी गोष्टी ते करत नाही. हे मुलं लहान असेपर्यंत ठिक आहे पण मोठे झाल्यावर त्यांना जे करायचे तेच ते करतात. अशावेळी बोलून न बोलून काही फरक पडत नाही मग मौन धारण करायचं. त्यांच्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम त्यांना भोगू द्यावे. यासाठी मौनाचा सराव वाढवायचा.
नवीन पिढीला आधीच्या पिढीचे विचार बर्‍याचदा पटत नाही आणि त्यांचे बोलणे पण आवडत नाही अशावेळी मौनसाधना आपल्या कामी येते. निरर्थक वाद टळतात आणि नाते खराब होत नाही. म्हणून मौनम् सर्वाथ साधनम् असे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर आहे.

रविवारची बायको

रविवारची आतुरतेनी वाट पाहण्याचे माझे दिवस  कधीच संपले।सोमवार ते शनिवार शाळा कॉलेज,अभ्यासाच्या चक्रातून एक दिवस मोकळा मिळण्याचा तो काळ होता।म्हणूनच रविवारची वाट अगदी आसुसून पाहिली जायची।विशेषतः सकाळी उशीरापर्यंत झोपायला मिळतं हा एक आणखी आकर्षणाचा भाग असायचा।
              नंतरच्या धावपळीच्या चक्रात सगळी समीकरणं बदलत गेली।आता सोमवार ते शनिबार नौकरी,घरची जवाबदारी अशा दुहेरी चक्रातून जाताना रविवार येतो कधी नि संपतो कधी याचा पत्ताच लागत नाही।त्यात घरातल्या कामांमध्ये अचानक रविवारीच " वाढता वाढता वाढे ,"अशी वाढ  होणे म्हणजे तर विधीलिखीतच जणू!विशेषतः बायकांच्या बाबतीत।
         रविवार येऊच नये असं म्हणून तर मला कधीकधी वाटायला लागलं।काय की घरी सगळ्यांना रविवारी उशीरापर्यंत झोपायचं असतं।पहिला चहा साखरझोपेच्या धुंदीत घेऊन दुसऱ्या चहाबरोबर वर्तमानपत्र चाखायला हवं असतं।अगदीच साधी अपेक्षा!नंतर उपमा,पोहे,कुस्करा,थालीपीठ असा ' बोगस 'नाश्ता सोडून नवं काहीतरी चमचमीत हवं असतं।ही आणखी एक छोटीशी अपेक्षा।मग खूप उशीरा ,खूप वेळ लावून मनसोक्त आंघोळ करायची असते।जेवणाचा बेत फक्कड असावाच लागतो ।चटण्या कोशिंबीरी पापड रायते वगैरे एक्सेसरीज सह मेन कोर्स असावा अशी अपेक्षा रविवारी नाही करणार का? कायतरीच काय? मग दुपारी साग्रसंगीत वामकुक्षी म्हणजे मस्टच। आता आलंबिलं घातलेल्या फक्कड चहाशिवाय ही वामकुक्षी उतरायची कशी नं?पण चहा काही फार लागत नाही।दीडकप प्रत्येकी जेमतेम,बस्स! 
         मग एखादा पिक्चर,मित्र मैत्रिणींची भेट,बागेचा फेरफटका,कधी खरेदी ,कधी पाणीपुरी वगैरे अगदीच  साधे साधे बेत।रात्री आपापल्या मोबाईल मध्ये आपापलं मनोरंजन।आणि अखेरीस दुःखानं  उसासे सोडत "संपला रविवार?च्यायला कमाल आहे।",अशा खेदयुक्त उद्गारांसह झोपेच्या कुशीत शिरणं।
          हा सगळा दिनक्रम अर्थात  XY क्रोमोझोम वाल्यांचा।  काही " हेवानीय " अपवाद सोडून इतर  XX  वाल्यांसाठी नॉट अप्लीकेबल।निदान पंचवीस ते पन्नास रेंजसाठी तर नव्हेच नव्हे।अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या XY  वाल्यांनी हे रविवार तंत्र सांभाळलंही आहे।मी ही त्यातलीच।एखाद्या XY ला आयता चहा भुरकत रविवारची पुरवणी चाखावीशी वाटत नाही का हा प्रश्नच मुळी आपल्या कुटुंब संस्थेच्या भक्कम पायाला सुरूंग लावेल की काय असं वाटणाऱ्या XY मधलीच मी पण एक!
     पण अलीकडे मात्र माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं ,काहीतरी हवंहवंसं,घडलय आणि त्यामुळे मध्यंतरी निर्माण झालेली रविवार नकोच ही भावना आताशा लोप  पावते आहे।झालंय काय की  आताशा दर रविवारी मंगलाबाईंचा प्रवेश माझ्या घरी होऊ लागला आहे।रविवारची कोणती कहाणी कशामुळे साठाउत्तरी सुफळ संपूर्ण झालीय माहीत नाही।पण मंगलाबाई नावाची लॉटरी मला लागलीय खरी।कोण या मंगलाबाई?तर  दर रविवारी कामाला येणाऱ्या बाई!आणि त्या काय करतात?अहो काय करत नाहीत ते विचारा !दर रविवारी त्या आठच्या ठोक्याला येतात ।माझ्यासकट सगळ्यांना मस्त वाफाळलेला आयता चहा हातात आणून देतात।सगळे रिकामे कप नेऊन नीट धुवून पालथे घालून ठेवतात।अन्यथा यापूर्वी सर्व सन्माननीय सदस्यांना पहिल्या चहाचा आपापला उष्टा कप सांभाळून ठेवावा लागायचा ।केवढी ही जवाबदारी!आणि तेही दुसऱ्या चहाची वेळ होईपर्यंत!तोवर वाळून जायचे सगळे कप।शिवाय का कोण जाणे,त्या वाळक्या कपातून दुसरा चहा पिताना "पहिल्या धारेचा" फील काही केल्या यायचा नाहीच।मंगलाबाई यायला लागल्या आणि हा प्रश्न चुटकीसरशी सुटलाच।मग माझ्या पण भाग्यात कोरा पेपर आणि आयता गरम चहा मिळण्याचा योग जमून आला।Dreams come true वगैरे म्हणतात ना,तसा फील आलेला मला! गंमत म्हणजे ,"नाश्त्याला काय करू?",असं विचारून त्या चक्क बहुविध ऑप्शन्स समोर ठेवतात।इडली डोसा पासून बटाटेवडा,कचोरीपर्यंत काहीही करून खाऊ घालण्याची त्यांची तयारी असते।तीच कथा दुपारच्या जेवणाची।अल्लादिनच्या राक्षसासारखंच काहीसं।फक्त त्या "हुकूम मेरे आका "असं म्हणत नाहीत।त्यात आताशा रविवारी मलाही पहिल्या पंक्तीचा मान मिळायला लागला आहे।तव्यावरचा आयता गरम फुलका थेट पानात पडूनही माहेरच्या आठवणीने न कळवळण्याचा चमत्कार घडायला लागला आहे।एक बहारदार गंमत म्हणजे" आज जेवणात कसली भाजी आहे ?रस्सा?की उसळ?रायतं ,कोशिंबीर,चटणी?साधा भात की पुलाव की दहीबुत्ती?",असं सरप्राईज माझ्यासाठीही असायला लागलं आहे,जे पूर्वी कधी शक्यच नव्हतं।पुन्हा "सोने पे सुहागा" म्हणजे मागच्या आवराआवरीतून सुटका!मग छानशी डुलकी आणि संध्याकाळी मस्तसा आयता चहा तयार।स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा।आणि अप्सरा मंगलाबाईंहून इंटरेस्टिंग नसाव्यात।
       मंगलाबाई संध्याकाळी सात वाजता परत जातात।त्यापूर्वी त्या रात्रीचा स्वयंपाक करून सोमवार सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करुन जातात।मध्ये मिळणाऱ्या मोकळ्या वेळात दाणे भाजून कूट करणे,पोहे भाजून चिवडा करणे,मटार सोलणे,डबे धुवून पुसून रॅकमध्ये लावणे,उशांचे अभ्रे पडदे धुणे बदलणे,पायपुसणी धुवून वाळवणे,अशी खंडीभर कामं त्या करुन टाकतात।झालंच तर रद्दी बांधणे,दळण आणणे,कपडयांच्या घडया वगैरे कामांचाही त्या फडशा पाडतात।वरुन हे सगळं सुहास्य वदनानी!चक्क गाणी गुणगुणत!!त्याहीपेक्षा भारी काम म्हणजे सासूबाईंच्या सॉफ्ट कॉपी मध्ये सेव्ह केलेला गत चाळीसपन्नास वर्षांच्या इतिहासाचा स्मृतींचा उजाळा त्या सहज झेलतात।एकीकडे श्रोत्याची भूमिका चोख बजावत दुसरीकडे तोवर गुडघ्यांना तेल लावतात ,कंबर पाठ चोळून देतात, केसांना मालीश करून देतात।धीस इज म्हणजे टू मच नव्हे का?(यासाठी खरं तर मी त्यांना स्पेशल अॅरिअर्स द्यायला हवेत।)
         एकूणच " रविवार येऊच नये " असा जो फिल  यायला लागला होता तो हळूहळू मावळला।मलाही रविवारची मनसोक्त चव चाखता येऊ लागली।कधी केसांना मेंदी लावून भलतीच उशीरा आंघोळ करण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं।दुपारच्या डुलकीनंतर एखादा कथा कविता संग्रह हातात घ्यायला मिळू लागला।
         असाच एकदा कविता महाजनांचा कवितासंग्रह वाचत होते।त्यात एका कवितेत कवयित्री म्हणते की ,"मलाही एक बायको हवी होती"। कवयित्रीची मागणी मला ताबडतोब कळली।ही प्रत्येकच वर्किग वूमनची मागणी असू शकते नं?शिवाय त्यातला " बायको "हा शब्द मोठा सूचक आहे।ती गरम चहाचा कप देईल पण सल्ला नाही।हसतमुखानी घरकामाचा ढीग उपसेल पण ना तक्रार करेल,ना मदतीची अपेक्षा। माझीच मागणी आपल्या कवितेतून महाजन मांडतायत या कल्पनेनी मला हसू आलं।आणि आई पुस्तक वाचताना हसतेय या गोष्टीची माझ्या कन्येला मोठी मौज वाटली।तिनेही माझ्याबरोबर ती कविता पुन्हा पुन्हा वाचली।आम्ही त्यातल्या बायको या कन्सेप्टविषयी काहीतरी बोलत होतो तेवढ्यात   माझं लक्षं खोलीच्या दाराकडे वेधत कन्या म्हणाली "तुला काहीतरी विचारतेय"। "कोण गं?"म्हणत मी वर पाहिलं तर दाराशी मंगलाबाई उभ्या।नि माझी कन्या माझ्या हातावर टाळी देत खिदळत म्हणाली " बायको गं तुझी "!मलाही दिलखुलास हसू आलं।
          एकदा " गरम चाय की प्याली हो।कोइ उसको पिलाने वाली हो",या गाण्याबद्दल मैत्रीण काहीसं बोलली आणि मला अचानक मंगलाबाई आठवल्या।तिला तो सगळा किस्सा सांगताच तिनी मोठया चतुराईनी प्रश्न केला " एका रविवारचे किती घेते गं ती?"काहीसं वेगळंच मनात येऊन दचकून मी विचारलं " कोण ?" मैत्रीण म्हणते " तीच गं तुझी बायको!" 
          मी तिच्या हसण्यात सामील झाले खरी,पण सावधही झाले।हिला का चौकश्या?
        मग "ते काही नक्की नाही।कामाप्रमाणे असतं",वगैरे बोलून मी प्रश्नाला बगल  दिलीं।पण हार मानेल ती मैत्रीण कसली?तिनी लगेच मंगलाबाईंचा फोन नं मागितला। 
      "  छे!तिच्याजवळ कुठला फोन असायला?"म्हणत मी तोही प्रश्न निकालात काढला।चिव्वट मैत्रिणीचा पुढचा प्रश्न  आलाच।  "घरी असेल नं कोणाजवळ्?"  
        "नातवाजवळ  असतो तिच्या ।पण अननोन नंबरचा कॉल घेत नाहीत ते कुणीच।"
          मी माझ्यापरीने फिल्डिंग लावली।पण दोन धोके मला स्पष्ट जाणवले।एक म्हणजे माझी रविवारची बायको मैत्रीण पळवते की काय?आणि दुसरं म्हणजे मला बायको मिळताच माझं रुपांतर नवऱ्यात होतंय की काय? तुम्हाला कायवाटतं?

शिमला


यावर्षी सूर्याने एप्रिल मधेच डोळे वटारले.44 डिग्री खुप झालं न!आत्ताच कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन याव असा विचार केला.नाहीतरी मे मधे कुठे जायला जमणार नव्हतच.
करनाल चंडीगढ़ ला काम होत,लगे हाथ शिमला  जायच ठरवल.
स्वितझरलैंड अन कश्मीर ला जाऊन आल्यावर शिमला जाण्यात  काहीच मतलब नाही अस बरेच जणानी सूचवल पण सध्या तरी आमच्या आवाक्यात तेवढच होत.
1 दिवस करनाल च काम केल.दुसऱ्या दिवशी 9 पर्यन्त चंडीगढ़ ला पोचायच होत कारण शिमला ला जाणार चॉपर 10 ला होत।ट्रैफिक जाम असला तर 3 तास लागतील म्हणून सकाळी 6 ला निघालो।पण रस्ता इतका क्लियर होता कि 7.30 लांच पोचलो। 
उगाच चॉपर च बुकिंग केल याच टैक्सी नी पुढे गेलो असतो तर 10 पर्यन्त शिमल्याला पोचलो पण असतो।अस दोघानीही बोलून दाखवल."मिले सूर मेरा तुम्हारा" होण्याचं मुख्य कारण म्हणजे चॉपर बद्दल असलेली भीति हे होत!
चॉपर चा पहिलाच प्रवास म्हणून उत्सुकता,होती आणि चॉपर चे  वारंवार होणाऱ्या ऍक्सीडेंट बद्दल वाचून भीति ही वाटत होती।हिमाचल प्रदेश टूरिझम नी सुरु केलेल हे चॉपर पवनहंस कंपनीच आहे।सुरुवातीला बरेच वेळा टुरिस्ट अभावी रद्द व्हायच पण आता मात्र एक जरी टूरिस्ट असला तरी चॉपर जात.
सामनाबरोबर आमच ही वजन विचारल।सामान 10 kg.प्रत्येकी घेता येणार होत.बोर्डिंग पास घेऊन टॅक्सी नी दूर उभ्या असलेल्या चॉपर कड़े गेलो।
चॉपर 11 सीटर होत ,त्यामानाने जागा खूपच कमी वाटली .पण जाणारे आम्ही चारच होतो त्यामुळे ऐसपैस बसता आल। थोड्या वेळात पायलट आलेत,त्यात एक मॅडम होत्या.बापरे! या चालवणार चॉपर!पण दूसऱ्याच क्षणी ,भीतीपोटी का होईना असा विचार आपल्या मनात आला याची  खुप लाज वाटली.
काही बटन्स खाटकुट करुन त्यानी चॉपर सुरु केल.वरचा पंखा जोरजोरात फिरायला लागला।त्याचा आवाज इतका जास्त होता कि हेडसेट(तिथे ठेवलेच होते) लावण्याशिवाय पर्याय उरला नाही।10- 15 मि.चॉपर जागेवरच उभ होत. त्याच्या आवाजाचा अन डिझल च्या वासाचा त्रास व्हायला लागला।,एक विमान लँड झाल ,एक चॉपर गेल,मग आमच्या चॉपर नी उडडान  केल।
खालचा नजारा अगदी स्पष्ट दिसत होता।चंदीगढ़ प्लॅनड सिटी असल्याने स्केल नी आखल्यासारखी दिसत होती। दोनच मि.सीमेंट च जंगल संपून निसर्गाच राज्य सुरु झाल। नजर पोचेल तिथपर्यंत गर्द हिरव्या झाडीनी आच्छादलेले डोंगर ,त्यामधुन जाणारी नागमोडी वाट,आणि मधे मधे दिसणारी ,लाल हिरवे छत असलेली एकट दुकट घर! इतक सुंदर दिसत होत सगळ की डीझल च्या वासानी आणि पंख्याच्या आवजानी होणार त्रास विसरून गेले।
अक्षरशः 11 मि.शिमल्याला पोचलो (तसा 3-4 तासाचा प्रवास आहे)। पण चॉपर चा प्रवास एकंदरीत सुखकारक वाटला नाही. ऑटो मधे बसून अकोल्याच्या  रस्त्यावर फिरतांना कस वाटेल  तसं वाटत होतं।
शिमला च एयरपोर्ट म्हणजे  टूमदार घरच आहे। बाहेर आलो।आमच रॅडिसन ब्लू होटल तिथुन 20 km.होत।आमच्याबरोबर  चॉपर मधे असलेले एक जण बाहेर कोणाची तरी वाट बघत थांबले तर अजुन एक मुलगा होता तो कधी निघुन गेला कळलच नाही।टॅक्सी नि होटल कड़े निघालो।
हिमाचल प्रदेशाच 'देवभूमी' हे नाव सार्थ ठरवणार तो प्रवास होता। अंतर 20 km.होत तरी प्रत्यक्षात पाऊण तास लागला।रस्ता पूर्ण डोंगरातून होता, देवदार वृक्षांच दाट जंगल सगळीकडे  होत,मधून मधून छोटे धबधबे डोकावत होते।लाल हिरव्या रंगाचे छत असलेल्या बिल्डिंगस त्यात उठून दिसत होत्या। उत्सुकतेपोटी ड्रायव्हर ला विचारलं तेंव्हा त्यांनी सांगितलं,इथल्या महानगरपालिकेने आदेश देऊन सगळे ऑफिसेस अन घरांचे छत लाल किंवा हिरवे रंगवायला सांगितले आहेत। ज्यामुळे  एकसंधता येईल,वरून जर बघितलं तर हिरवे झाड आणि बर्फाच्चदित डोंगर याच्या पार्श्वभूमीवर लाल हिरवी घर ,हे दृश्य टुरिस्ट ना आनंद देईल।हा हेतू निश्चितच सफल झाला अस म्हणावं लागेल।
ड्रायव्हर ला दुसऱ्या दिवशी च्या टॅक्सी बुकिंग बद्दल विचारल ,तो म्हणाला मी गावातुन येईन तर जास्त पैसे लागतील ,तुम्ही हॉटेल जवळन टैक्सी घ्या स्वस्त पडेल।तिथे काय काय बघण्यासारखं आहे हे पण त्यांनी व्यवस्थित सांगितलं.युनियन लीडर चा नं.पण दिला। तिथे टैक्सी यूनियन खुप स्ट्रांग आहे,व्यवस्थित नंबर लागलेले असतात।टूरिस्ट प्लेस असूनही कुठेही लूटपाट वाटली नाही।
होटल ला पोचलो ,लॉबी मधेच आमच्या बरोबर चॉपर मधे असलेला मुलगा दिसला(चेक इन ला वेळ होता)  अरेरे! हा पण इथेच येणार कळल असत तर टॅक्सी शेयर केली असती।मला,फक्त मलाच खुप हळहळ वाटली (middle class mentality u know!)
हॉटेल एकदम छान होत,रूम मधे जायला 2 लिफ्ट अन 2 जिने उतरून जाव लागल।इथे सगळीकडे असच आहे ,डोंगरातून एकच रस्ता जातो ,त्याच्या वर  बिल्डिंग्स अन उतारावर पण बिल्डिंग्स !त्यामुळे पायऱ्या चढन उतरण हे तिथल्या लोकांच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे।
होटल छानच होत ,रूम मधल्या भल्या मोठ्या काचेतुन दिसणार दृश्य खिळऊन ठेवणार होत।
जेवण ,थोडा आराम करुन मॉल रोड ला निघालो। तिथे जायला पण दोनं लिफ्ट बदलून जाव लागत ।
मॉल रोड हे तीथल मध्यवर्ती  गजबजलेल ठिकाण। मॉल रोड, रिज रोड च्या 1 लेवल खाली त्याला समांतर
आहे। स्कॅडल पॉईंट ला दोन्ही रस्ते मिळतात।
हे बघून ,दोन मैत्रीणी,एक बंधाऱ्यावरुंन चालतेय अन दूसरी तिचा हात धरुन खाली रस्त्यावरुंन चालतेय,  वरून चालणारी मैत्रीण मधेच उडी मारून खाली उतरते,अस दृश्य डोळयांसमोर आलं।
अम्बुलन्स व्यतिरिक्त कोणतेही वाहन मॉल रोड वर येऊ शकत नाही।त्यामुळे लोक तिथे आरामात फिरत असतात। तिथे अनेक शॉप्स रेस्टॉरेंट्स ,कॅफ़े आहेत ।हेच मेन मार्केट असल्याने टूरिस्ट बरोबरच स्थानिक लोकांनी पण हा गजबजलेला असतो।  ठिकठिकाणी बसायला बेंचेस आहेत ।नुसत तिथे बसलो तरी छान वेळ जाईल इतक ते ठिकाण हैपनिंग आहे।
सुभाष च गुडघा थोड़ा दुखायला लागल्याने आम्ही बराच वेळ बसलो होतो।टूरिस्ट आणि स्थानिक लोक यांच नकळत निरीक्षण केलं,दोघांमधला फरक  लगेच कळत होता।  थंडी असूनही उघड़े वाघडे कपड़े घालून  टूरिस्ट हिंडत होते।गोऱ्यापान,सरळ नाक ,साधा सलवार सूट ,स्वेटर ,घातलेल्या तीथल्या बायकांच पहाड़ी सौंदर्य चटकन नजरेत भरत होत।हिमाचली लोक म्हणजे 'mountain version of punjabi 'अस कुठंतरी वाचल्याचं आठवलं।
परत चालायला लागलो ,स्कॅडल पॉइंटला जिथे रिज आणि मॉल रोड मिळतात तिथे पोचलो। 
एक भारतीय महाराजा अन ,ब्रिटिश ऑफीसर ची मुलगी तिथुन पळून गेले ,म्हणून त्याच नाव स्कॅडल
पॉइंट!फक्त त्या स्पॉट ला नाव ते दिलय बघण्यासारखं काही नाही तिथे।
रिज रोड फिरून पायऱ्यांनी खाली उतरू अस ठरवलं।(मॉल रोड च्या सुरुवातीला लिफ्ट आहे तर रिज च्या सुरुवातीला पायऱ्या आहेत)
रिज वर मॉल रोड च्या मानानी कमी गर्दी असते।म्युनसिपल कॉर्पोरेशन ,फायर ब्रिगेड ,पोस्ट ऑफिस असे मुख्यत या रोड वर आहेत।तसेच 1857 मधलं एक चर्च आणि खूप जुनी लायब्ररी पण आहे।थोडं पुढे गेल्यावर एका उंच स्तंभावर मोठ्ठा भारतीय ध्वज फडकताना दिसतो।तिथेच एका इमारतीच्या गॅलरी मधे पोलीस बँड वाजत होत।
एका मोठ्या डोंगरावर हनुमानाची भली थोरली मूर्ती उठून दिसत होती ,ती एवढी मोठी आहे की सिमल्या मधे  कुठूनही ती नजरेस पडते। विचारल्यावर कळलं ते जाखु टेम्पल आहे ।हनुमान संजीवनी बुटी घेऊन जाताना इथे थांबला होता। कुफ्रि जिथे बर्फ बघायला मिळाला असता अन जाखु टेम्पल ला आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो।
मॉल रोड आणि रिज च वातावरण  एन्जॉय करत आम्ही आरामात फिरत होतो ।पण सुभाष चा गुडघा आता खूपच दुखायला लागला ,त्याला पाऊल ही पुढे टाकवेना। तिथेच एक मेडिकल स्टोअर मधून गोळ्या आणि मलम घेतलं।लिफ्ट नी जायला बरंच चालावं लागलं असत ,कारण आम्ही पायऱ्यांच्या जवळ पोचलो होतो ।कसंबसं पायऱ्या उतरून खाली आलो।टॅक्सी नी हॉटेल ला पोचलो।तिथे विनंती करून पाहिले रूम बदलून घेतली ,कारण आमच्या रूम ला जायला दोन जिने उतरावे लागणार होते।आता 2 लेवल ला रूम शिफ्ट केली .तिथे फक्त  लिफ्ट नि जाता येत होता।
रूम मध्ये आल्यावर ,पुढे काय करायचं याच विचारचक्र सुरू झालं।
दुखणं वाढलं होतं, अचानक कशामुळे  झालं कळायला मार्ग नव्हता।अजून एक दिवस सिमला आणि दोन दिवस चंदीगड असा आमचा टूर होता।पण आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता। दुसऱ्या दिवशी 11 च्या चॉपर च बुकिंग मिळत का बघितलं ,11 सीटस दाखवत होतें पण 'बुकिंग बंद 'असं येत होता। ते मिळाल्याशिवाय पुढचे बुकिंग करता येत नव्हत। अचानक सुभाष ला हुडहुडी भरली ,रूम पूर्ण बंद ,फॅन, ac काहीच सुरू नव्हतं ,दोन दुलया टाकल्या तरी हुडहुडी थांबली नाही। एका परिचितांकडे या हुडहुडी मुळे घडलेला अनर्थ आठवला आणि अजूनच टेन्शन आलं।थोड्या वेळात थंडी वाजण बंद झालं पण सुभाष ला प्रचंड थकवा आला.मी आता झोपतो उद्या सकाळी बघू काय करायचं ते ,अस म्हणून तो 7 लाच गाढ झोपून गेला ।मला मात्र बराच वेळ झोप आली नाही।रात्री ताप चढला तर काय करायचं,अजून काही त्रास झाला तर!असे अनेक विचार मनात येत होते,।मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणतात ते अगदी खरंय ।अशा विचारांच्या आवर्तात काधितरी झोप लागली।
सकाळी  दोघांनाही लवकरच जाग आली।गुडघा  दुखत होताच।परत चॉपर च बुकीग बघितलं। बुकिंग होत नव्हतं,11 सीट रिकाम्या असूनही! ।HP टूरिझम च्या साईट वर 1 फोन न.दिला होता ,तो लावला पण कोणीच उचलला नाही।
शेवटी टॅक्सी नि जावं असं ठरवल।,3 साडे तीन तास लागले असते।काउंटर वर टॅक्सी साठी फोन केला।तर कळलं 10 शिवाय टॅक्सी मिळणार नाही।शाळेच्या मुलांना सोडून  टॅक्सिवाले स्टँड वर जमतात, आणि मग न.प्रमाणे बुकिंग होत। 10 ला निघालो तर चंदीगड ला 1 ला पोचू तिथून दिल्ली फ्लाईट 2 च होत,त्याआधी 1 तास रिपोर्टिंग !त्यामुळे फ्लाइट मिळणं कठीण होतं। मग ठरवलं चंदीगड ला तर पोचू ,तिथे मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी दिल्ली ला निघू।
  तेवढयात ज्या नं. वर फोन केला होता,त्यावरून फोन आला। तुम्ही एअरपोर्ट वर या ,चोप्पेर च बुकिंग मिळून जाइल! तो फोन आल्यावर पुढचं चित्र स्पष्ट झालं। 2 ची चंदीगड -दिल्ली ,तिथून 5 ची दिल्ली -नागपूर फ्लाईट बुक केली।अकोल्याला फोन करून गाडी नागपूरला पाठवायला सांगितली।
हॉटेल च्या सगळ्या टॅक्सी बुक होत्या ।शेवटी रस्त्यावर उभं राहून टॅक्सी मिळते का बघायचं ठरवलं ।शेवटी एक टॅक्सी मिळाली।सकाळी शाळेची वेळ असल्याने व रस्ता एकाच असल्याने ट्रॅफिक जॅम लागला। 1 तास एअरपोर्ट ला पोचयलाच लागला।तिकिट नाही ,त्यामुळे आत जाऊ देतील का हा पण प्रश्न होताच।पण ज्यांनी आम्हाला फोन केला ते बाहेरच उभे होते.लगेच तिकीट घेतलं ,आत गेलो। चॉपर यायला बराच वेळ होता म्हणून त्यांच्याशी बोलत बसलो।त्यांनी सांगितलं की बुकिंग पोर्टल 24 तास आधीच बंद होत खरं तर बुकिंग फारस नसत म्हणून आम्ही विनंती केली आहे की 1 तास आधी पर्यंत बुकिंग सुरू ठेवा त्यामुळे टुरिस्ट वाढतील।
सिमला एअरपोर्ट वर स्टाफ 15 -20 जणांचा आहे ,पण तिथे एकही फ्लाइट येत नाही व जात नाही।चंदीगड हुन  येणार चॉपर हीच काय ती तिथली रौनक!त्यात ही टुरिस्ट असतातच अस नाही। चॉपर आलं त्यातून 6 जणं उतरले। चंदीगड ला जाणारे तर आम्ही दोघेच होता।तुझ्यासाठी चार्टर प्लेन बुक केलय अस म्हणायची संधी सुभाष नि सोडली नाही। कुफ्रि,आणि जाखु टेम्पल बघायचं राहील ही रुखरुख मनात ठेवून सिमला सोडलं।पायलट कालचेच होते।त्या मॅडम ओळखीचं हसल्या ,लगेच का परतताय विचारपूस केली।चंदीगडला पोचलो ।तिथून दिल्ली ,मग नागपूर ।सकाळी 8 ला निघालेले रात्री 1 ला अकोल्याला पोचलो।
लगेच दुसऱ्या दिवशी MRI केला। लिगमेंट टीयर
होता।1 महिना आराम सांगितला।
सगळं झाल्यावर ,शांतपणे बसल्यावर विचार केला, इतकं पॅनिक होण्यासारख सिरीयस काही नव्हतं।पण बाहेर कुठे असलो की हेल्पलेस वाटत आणि उगाचच टेन्शन येत हे मात्र खरं।अकोल्याला पोचल्यावर एकदम रिलॅक्स झालो। 'आपली माती आपली माणसं' यांचं हेच वैशिष्ट असेल नाही !
असो आधी अधुरी सिमला ट्रीप मात्र कायमची स्मरणात राहील।

Sunday, June 9, 2019

बीस साल बाद

व्हाट्सए आणि फेस बुक मुळे जी  गेट टूगेदर ची लाट आली त्यावर स्वार होवून ,आम्ही पण गेट टुगेदर ठरवलं।आम्ही 8 वी ते 10 वी इंग्लिश मीडियम मध्ये 10,12 जणीच होतो ,त्यातल्या 10 जणी तर तिन्ही वर्ष होतो,बाकी येऊन जाऊन होत्या।कमी जणी असल्याने  छान एकी आणि जवळीक  होती आमच्यात.शाळा संपल्यावर,Non whats ap era मधे ही आम्हीं बऱ्याच जणी संपर्कात होतो.काहींच्या भेटी पण व्हायच्या तर काहींना अनेक वर्षांपासून भेटलो नसलो तरी कोण कुठे आहे इतपत माहिती होती।
गेट टूगेदर मुळे सगळ्याच 20,22 वर्षांनी एकत्र भेटलो।
गप्पांना अंत नव्हता.आपण कशी मस्ती करायचो ,कशी लोकांची टर उडवायचो याची उजळणी सुरू होती।बोलता बोलता ज्योती म्हणाली "आपल्यात किती एकी होती नाही!आपण वैशु ला सुद्धा पुरून उरलो,तिला एकट पाडलं"। एकमेकींना टाळी देऊन आम्ही जोरात हसलो ,वैशु पण त्यात सामील झाली।
गेट टूगेदर पार पडल .निरोप घेताना, किती मज्जा आली, खुप छान वाटलं,आता नेहमी भेटत जाऊ वगैरे म्हणून झालं होतं।तरी सगळ्या आपापल्या घरी पोचल्यावर रिवाजाप्रमाणे त्याच आशयाच्या पोस्ट व्हाट्सअप वर सुरू झाल्या।वैशु ची पोस्ट थोडी वेगळी वाटली म्हणून वाचली अन खाडकन डोळे उघडले।
"आपण खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे छान वाटलं,तुम्ही सगळ्या खूप चांगल्या आहात पण यापुढे कधीच कोणाला एकट पाडू नका अन त्याचा अभिमान तर अजिबात बाळगू नका। एकट पडल्यावर काय वाटत ते मी सहन केल आहे".
हे वाचलं आणि नकळत मन मागे गेलं।
बुलढण्याला एडेड शाळेत मी 8 वीत असताना गेले, अजून दोघी तिघी मुली नवीन आल्या।पण सगळ्यांची लवकरच गट्टी जमली।त्याच वर्षी पण बरीच उशिरा वैशु आमच्या वर्गात आली। आम्ही सगळ्या लहान चणींच्या तर ती धिप्पाड अन आडदांड होती।
तिचे वडील दारू सुरू करण्याच्या (हा आमचा शब्द! ) म्हणजे  दारूच परमिट देणाऱ्या ऑफिस मध्ये काम करायचे.त्याकाळी दारू ला आजच्या सारखी प्रतिष्ठा नव्हती। दारू पिणारा अतिशय वाईटच असतो अस समजण्याचे ते दिवस!  सूची चे वडील दारू च परमिट देतात म्हणचे ते जणू दारू चा प्रसार करतात,म्हणजे ते वाईट अस आमचं ठाम मत। त्यात वैशु चा स्वभाव डोमिनेटिंग होता।चुगल्या करण ,भांडण लावणं शिव्या देण, हा तिचा हातखंडा! हे आमच्या लक्षात आल्याबरोबर आम्ही सावध झालो,तिला डावलण सुरू केल। डबा खाताना, खेळतांना ती यायची आमच्यात पण आम्ही फारस बोलायचो नाही। तिनी वह्या मागितल्या तर जीवावर आल्यासारखं द्यायचो ,कारण नाही दिल्या तर ती  वाईकरबाई (आमच्या क्लास टीचर) ना सांगेल ही भीती!
एकदा ऑफ पिरियड मध्ये  साखळी खेळताना ,तिच्यावर डाव आला,आम्ही ठरवून तिच्यावरचा डाव जाऊ दिला नाही ,ती रडकुंडीला आली .पोट दुखतंय म्हणाली। तिची तेंव्हा mc सुरू होती (हे आम्हाला तिनी नंतर सांगीतल) आम्हा कोणालाच हा प्रकार माहीत नव्हता,त्यामुळे ती खोट बोलतेय अस वाटलं। तीनी डाव दिला नाही।आम्ही सगळ्यांनी नंतर तिला खूप चिडवलं. त्यानंतर पूर्णच बहिष्कार टाकला तिच्यावर!
तिनी हे सगळं आईला सांगितलं असावं, एक दिवस ,वाईकर बाईं शिकवत असताना तिची आई सरळ वर्गात शिरली ,बाईंकडे तक्रार न करता आम्हाला जोरजोरात रागवायला लागली।बाईना हे काय सुरू आहे कळेना। त्यांनी कसबस तिच्या आई ला शांत केलं ,अन काय झालं ते विचारलं।तिच्या आई नी मग आमच्या तक्रारींचा पाढाच वाचला। त्यांची समजूत घालुन त्यांना घरी पाठवलं अन मग मात्र आमची अशी खरडपट्टी काढली की बास रे बास !आम्ही पण आमची बाजू मांडली ।त्यांनी दोघांनाही समजावलं अन यापुढे अस झालं तर शिक्षा करेन म्हणाल्या। बाई म्हणजे आमचं दैवत ! त्यांनी सांगीतल्यावर ऎकावच लागलं। नंतर  हळूहळू वैशुला आमच्यात सामावून घेतलं।
तिच्या घरी पण जायला लागलो।गावापासून थोडं दूर  आजूबाजुला फारशी वस्ती नसलेल्या ठिकाणी टिनाच्या दोन खोल्या म्हणजे तीच घर! घरी टॉयलेट पण नाही (पुढे काही दिवसांनी ते बांधलं)हा आमच्यासाठी फार मोठा धक्का होता।
वडील खूप दारू प्यायचे ,मारहाण,शिवीगाळ तर रोजचीच.
आमच्या सारख्या मध्यवर्गीय सरळमार्गी लोकांना हे सगळं नवीनच होत।असेही वडील असतात?
या अशा वातावरणामुळेच तिचा स्वभाव असा बनला असेल  नाही का? पण हे कळण्याची तेंव्हा अक्कल नव्हती। तिचा स्वभाव असा असण्यामागे  काही कारण असू शकतात अस समजण्याची परिपक्वता तेंव्हा नव्हती। त्यामुळेच सगळं रामायण घडल।
नंतर मात्र आमची छान मैत्री झाली। 10 वी ला असताना ,वडील घरी दारू पिऊन धिंगाणा घालतात,अभ्यास होत नाही, म्हणून ती बरेच वेळा  माझ्याघरी यायची ।अगदी बोर्ड च्या फायनल परिक्षेला सुद्धा!
नंतर आमची  बुलढण्याहून बदली झाली ,बाकी सगळ्यांच्या ही वाटा बदलल्या।
तिनी पुढे BAMS केल ,लग्नानंतर ती मुंबई ला असते एवढं कळलं होतं।
10-12 वर्षांपूर्वी तनु च्या मॅचेस साठी ठाण्याला गेले तेंव्हा तिचा फोन.नं. मिळवून फोन केला ।ती वाशी ला राहायला होती।मला ठाण्याला घ्यायला आली,तिच्या फ्लॅट वर घेऊन गेली। bams झाल्यावर तीच लग्न तीनच ठरवलं(पेपर मध्ये जाहिरात देऊन) ,नवरा पण BAMS डॉक्टर।2 मुलं आहेत। मुलुंड ला क्लिनिक सुरू केलं तिथे छोट्या प्रमाणात आयुर्वेदिक औषध पण बनवतात।
क्लिनिक बघून आम्ही परत ठाण्याला आलो ,वाईकर बाई ठाण्याला होत्या ,त्यांना भेटायला गेलो ,मग तिनी मला बहिणीकडे सोडलं।
"तुमच्यामुळे मला कुटुंब म्हणजे काय ,घर काय असत ते कळलं ,तुम्हा सगळ्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर ,तुझ्यासाठी खर तर साडीच घेणार होते पण वेळ नाही मिळाला" अस म्हणून क्रिस्टल च महागडं शो पीस गिफ्ट केलं।
बापरे !इतका विचार करते ही ,किती काय काय साचलय हिच्या मनात!
घरा सारख घर आणि कुटुंब आमचं त्यात वेगळं काय! पण ज्याला हे सगळं मिळत नाही त्यालाच त्याच महत्व कळत, नाही!
नंतर भेट झाली नाही तरी व्हाट्सअप मुळे संपर्क होताच।
तिनी संस्कृत मध्ये Ph.D केलं,
आकाशवाणी वर व्याख्यान ,पेपर मध्ये लेख ,जवळपास होणाऱ्या सगळ्या स्पर्धा,(योगा क्वीन,भारुड गीत ,सुगम संगीत ,मॅरेथॉन ,सौंदर्यवती स्पर्धा) यात तिचा असणारा सक्रिय सहभाग ही तिची प्रगती बघून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला।
त्यानंतर आम्ही डायरेक्ट 4 वर्षा पूर्वी गेट टूगेदर
ला भेटलो। जिथे हा किस्सा घडला।
30 वर्षांपूर्वीच्या उपेक्षेची बोच तिच्या मनात अजूनही आहे हे कळल्यावर,आपण एका चांगल्या मुलीला नकळत का होईना त्रास दिला ही बोच आमच्याही मनात राहील, कायमचीच!

Saturday, June 8, 2019

बरसो रे , मेघा!

वैशाखवणवा पेटल्यानंतर जिवाची लाहीलाही करुन सोडणारा हा काळ फार असह्य होतो .त्यात भरीसभर म्हणजे वाहणारे उष्णवारे कानपटीला लागले की,आजारी पडलोच म्हणून समजा.........! अचानक निळ्या आकाशाने काळे वस्त्र परिधान केल्याचा भास होत होता.  नाही म्हणायला दोन तीन दिवसापासुन वातावरणातील बदलामुळे सुखकर वाटणारे हवेचे थंड स्वर मंद लयीत गात येवुन भिडावेत आणि हळुवार मोरपिसी स्पर्श करावा तसा आणि तितकाच आल्हाददायक गारवा हवाहवासा वाटणारा होता. मृगाची चाहूल आणि पावसाची आळवणी बालपणीच्या 'ये,रे. पावसा !तुला देतो पैसा अगदी याच गाण्याने झाल्याशिवाय राहात नाही. हळूच एखादी सर बरसुनही जाते पण हे तृषार्त मन तेवढ्यावरच थोडी शमणार आहे!.." बरसो रे मेघा ,मेघा  "   असं पुन्हा पुन्हा म्हणून मैत्रिणींना घोळक्यातून जसे बोलावुन बोलावुन नाचायला भाग पाडतो ना! अगदी तस्सेच पावसालाही बरसायला भाग पाडावे आणि शब्दाचा मान ठेवून त्यानेही निमंत्रण स्विकारावे असच काहीस  मनात असतं!.....
  
" त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं!" अशी काहीशी अवस्था होते  सावळ्या ढगांकडे बघून!....... तुमच्या मनातही सावळा म्हणजे विठूरायाच आलाय हो ना!......
काय? नातं असेल बरं ह्या सावळ्याच आणि त्या सावळ्याचं! .....सावळे मेघ!......सावळा हरी! ........अहो एकच.!  सावळा हरीच मेघाच्या रुपाने बरसत असतो. म्हणूनच तर नाही कां हरीला भेटण्यासाठी मेघही सोबतिला असतो.
        पावसाची रुप तर हरतर्हेची.!.. थबकत ....थबकत!एक एक पाऊल टाकणार्या पावसाला कौतुकाने पाहताना जणू बालकानेच हळू हळू पाँव पाँव करत येतो आहे असे वाटते. त्याचा येण्याचा सांगावा .त्याच्या गंधातून हळूहळू पसरु लागतो. पानांचे, पक्ष्यांचे संगीत कानात रुंजी घालू लागतात. 
       " घन आभाळीचा तडकावा
        मातीस मिळवा शिडकावा
         झाडावरती पुन्हा नव्याने 
          रंग हिरवा फडकावा  " 
ह्या काव्यपंक्तींचा प्रत्यय यावा हीच मनात आस असते.
मनातला पाऊस !......अगदी हळुवार एक एक थेंब अंगावर घेत सचैल न्हाऊ घालणारा !....अल्लड मुलीगत या श्रावणसरी नाचत बागडत मनात येईल तस्सेच वागणार्या. हलकेच फुरगटून बसणार्या तर उगाचच खिदळत गाणी गाणार्या पण माहेरवासिनींना मात्र माहेरची ओढ लावणारा!

." झोका,ssss.मंद झुले sssश्रावण आलाsगं!  "
असे म्हणतच आयुष्यात नवतीचे रंग भरणार्या या नवसुवासिनींना श्रावणातील इंद्रधनुष्य जणू त्याचीच ओळख करुन देत असतो. 
 श्रावणातील ऊन सावलीचा खेळ मात्र आयुष्याचे खरे गमक देऊन जातो. अवखळ वाहणारे ओहोळ, गीत गात वळणे घेत मुरकत चालणारी अल्लड नदी अचानक रौद्ररुप धारण करते, तेव्हा मात्र पावसाची मनधरणी कराविशी वाटते त्याचा तो तांडवी थयथयाट ऊर दडपून टाकणारा असतो.         
                 ।।  नको बरसु असा जीवघेणा
                     घरे काळजाची उद्धवस्तु नको!
                      नको पाऊले टाकू रावणापरी
                     सीताईचे आर्त  तू ऐक सत्वरी।।
मेघालय"   मेघांच आलय म्हणजे घर अथवा मंदीर जिथे पाऊस सर्वप्रथम हजेरी लावतो आणि भरपूर बरसतोही .पिकांसाठीमात्र त्याचं अति बरसण नकोसं, म्हणूनच प्रार्थनापूर्वक आळवणी तेथिल खासी समाजातील मुला-मुलींच्या नृत्योत्सवाच्या विशेष सोहळ्यातून संपन्न होते. निसर्गदेवता !हे भारतीय संस्कृतिच वैशिष्ट्यच.! म्हणूनच तीनही र्रुतुंचे मनमुराद दर्शन देणार्या या निसर्गाला शतशः वंदन!

मैत्र


घटना क्षुल्लक होती. पण...चैतन्य भडकलाच. नागरिकशास्त्राचे साधे नियम न पाळणा-यांवर चिडला नि बोलता बोलता सुजयला म्हणाला, "कोणी यांना स्वातंत्र्य दिलं? कसं रहावं, कोणते सामाजिक संकेत पाळावेत, हे सुद्धा माहित नसणा-या आपल्या या समाजाला खरंतर गुलामगिरीतच ठेवायला हवं होतं. मग कळलं असतं".
"छे, छे! असं कसं? स्वातंत्र्य तर हवंच होतं. या मूठभर लोकांसाठी का आपण आपलं स्वातंत्र्य गमवायचं होतं?..." सुजय म्हणाला.
झालं! तो अप्रिय प्रसंग तर बाजूलाच राहिला पण दोघा मित्रांमध्ये वादावादी सुरू झाली. वेळीच थांबली म्हणून बरं! नाही तर...!
या दोघा मित्रांची ही वादावादी ऐकताना, बघताना विचारांची दिशा कधी भूतकाळाकडे वळली ते कळलंच नाही. खरंच! आधी संपूर्ण स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा? हा वाद जुनाच आहे. 1880 नंतर त्याला तोंड फुटलं तरी पण त्याही आधीपासून कदाचित तो वाद मनामनामध्ये असावा. काळाच्या प्रवाहात इतकं काही घडत असताना...स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतक्या वर्षानंतरही तोच वाद दोन मित्रांमध्ये झडत असताना, आठवण झाली ती इतिहासातील अशाच प्रसिद्ध वादाची! आणि त्यावरूनच आठवले ते दोन व्यक्तींचे मित्रत्व! समान वैचारिक धाग्यांनी बांधलेले मित्र! आणि त्याच प्रखर वैचारिक जाणिवांमुळे एकमेकांपासून दुरावलेले मैत्र! 
     असं म्हणतात की, प्रत्येकाचं आयुष्य घडविणारी देशकाल परिस्थिती अगदी वेगवेगळी असते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व घडविणारी मातीही वेगळी असते. एक माणूस दुस-या सारखा घडत नाही, तरीपण दोन व्यक्तींमध्ये मित्रत्व जुळतं ते काही समानतेमुळे! आणि ते दुरावतं विचारभिन्नतेमुळे!
इतिहासानं असंच एक मैत्र अनुभवलं. दोघं मित्र! दोघांचीही देश-काल-परिस्थिती वेगळी! पण ध्येय एक! यामुळे दोघं एकत्र आले. स्वप्न पाहिल्याशिवाय वाट सापडत नाही, या जाणीवेनं त्यांनी स्वप्न पाहिली. ही स्वप्नं समाजामध्ये पेरावी लागतात, पुढच्या पिढ्यांसाठी अशी काही स्वप्नं वारसा म्हणून द्यावी लागतात. ती त्यांनी दिली. पण ही स्वप्नं पेरत असताना दोघांमध्ये वैचारिक संघर्षाची नकळत ठिणगी पडली आणि बघता बघता त्याचा वणवा पेटला. तो थांबला मृत्यूनंतरच!
 
   टिळक आणि आगरकर...इतिहासावर आपली कालमुद्रा उमटविणारे दोन महान व्यक्तिमत्व! एक प्रचंड कणखर तर दुसरा तितकाच हळवा! एक विलक्षण मानी तर दुसरा तर्कशुद्ध आकलन आणि विवेचनावर भर देणारा! दोघांच्याही मनोवृत्ती तशा भिन्न पण प्रेरणा मात्र एकच! राष्ट्रोद्धार! लोकोद्धार!
     'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या वचनावर गाढ विश्वास असणारे बाळ गंगाधर टिळक आणि निरर्थक क्रिया कर्मांवर विश्वास नसणारे गोपाळ गणेश आगरकर, हे ते दोन व्यक्तिमत्व! दोघं महाविद्यालयीन जीवनात एकत्र आलेत. 1879 दरम्यानच्या निखळ मैत्रीच्या आठवणी दोघांच्याही चरित्रात आहेत. आगरकर एम. ए. करिता आणि टिळक एल. एल. बी. करिता अभ्यास करण्यासाठी काॅलेजात होते. तेंव्हा विविध विषयांवर चर्चा नि क्वचित प्रसंगी वाद घडत असत, ही आठवण स्वतः आगरकरांनी लिहून ठेवली आहे. त्यांचा हा सहवास आणि हितवाद 1880 मध्ये शाळा स्थापनेच्या रूपानं फळास आला.
'शिक्षण संपत आले, पुढे काय?' या गहन प्रश्नाचा काथ्याकुट टिळकांनी इतर सवंगड्यांसोबत पुष्कळदा केला परंतू या शुष्क काथ्याकुटाला लोकहिताच्या निश्चित ध्येयाचे रूप आगरकरांनी दिले, असे टिळकांचे चरित्रकार सांगतात. 'जे कार्य मनापासून पत्करले त्याची अंतिमसिद्धीपर्य॔त पाठ सोडायची नाही' हा टिळकांचा बाणा होता. तर दुस-याचा एखादा कठोर शब्दही जिव्हारी लागणारे आगरकर अतिशय भावनावश होते. साहजिकच भिन्न भूमिकांमुळे दोघांच्यात मनोमिलना पाठोपाठ मनोमालिन्य येणे क्रमप्राप्त होते. ते तसे झाले. या वादात परस्परांवर जिव्हारी लागण्यासारखे शाब्दिक हल्ले चढवतानाही टिळकांनी एक पथ्य काटेकोर पाळलं. आपण स्थापन केलेल्या संस्थेचं ज्यामुळे अहित होईल असा वागवा मजकूर त्यांनी स्वतः लिहिला नाही. तसाच तो 'केसरी'त अन्य कोणी लिहिणार नाही, याचीही खबरदारी त्यांनी घेतली, हे आपल्याला विसरता येणार नाही. आज मात्र काय दिसतं? आपसातलं वैर चव्हाट्यावर आणलं जातंच पण त्यास पातळी सोडून शाब्दिक युद्धाचं स्वरूप येतं.
असं म्हणतात की, जो समाज केवळ आपल्या महापुरूषांचं नाममहात्म्य जपत राहतो आणि त्यांच्या विचारांना मात्र विस्मृतीत टाकतो, तो समाज इतिहासाचं केवळ ओझं वाहत असतो. आम्ही नेमकं हेच करतो आहोत. महापुरूषांचे विचार बासनात गुंडाळून ठेवलेत नि प्रतिमा, पुतळ्यांचं अवडंबर माजवत नाममहात्म्यात अडकलो आहोत.
     टिळक आणि आगरकर दोघंही जाज्वल्य देशाभिमानी होते. दोघांचेही वैचारिक मतभेद होते. 'राजकीय सुधारणा प्रथम की सामाजिक सुधारणा प्रथम' या वादानं दुरावलेल्या या मैत्रीला अंतःस्थ ओलाव्याची हळवी किनार होती. डोंगरीच्या तुरूंगात एकशे एक दिवस दोघांनी शिक्षा एकत्र भोगली होती. पण बंधमुक्त झाल्यावर स्वभाव भिन्नतेला मतभिन्नतेची जोड मिळाली. 'होळकर देणगी प्रकरण, संमती वयाबद्दलचे वादळ तसंच ग्रामण्य प्रकरण' या निमित्तानं दोघंही एकमेकांवर कडवट भाषेत तुटून पडत होते. मतभिन्नता होती. भुमिका दोघांचीही परिवर्तनाचा पुरस्कार करणारी होती. खरं तर परिवर्तनाच्या दिशा आणि वेग यांचे भान येण्यासाठी काही काळ जावा लागतो. पण तो जाणून न घेतल्यामुळे एक सुंदर वैचारिक मैत्री तुटली. विचारांचे वेगळेपण मैत्रीत आडकाठी निर्माण करते झाले. तरी मृत्यूनंतर मात्र ते राहिले नाही. मित्राच्या मृत्यूनंतर टिळक हळवे झाले होते. मृत्यूलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगताना अस्वस्थ झाले होते, अशी आठवण टिळकांच्या चरित्रात आहे. 'मैत्र' हे असेच असावे. कितीही मतभेद असलेत तरी अंतर्मनातील आपलेपणा कधीतरी व्यक्त होतच असतो. 'आगरकरांच्या स्मारकासाठी निधी जमविण्यासाठी आयोजित सभेत टिळकांनी 30 रूपये देणगी दिल्याचं वृत्त, 26 ऑगस्ट 1897 च्या 'सुधारक' मध्ये छापून आलं होतं, असं इतिहास आपल्याला सांगतो तेव्हा मैत्रीची ही बाजू जाणून आपणही नकळत हेलावून जातो.
टिळक नि आगरकर! दोघं मित्र! मित्र दुरावले पण त्या दुराव्यातील ओढ मात्र संपली नव्हती, हे काळाने सिद्ध केले. काळ! तो आपल्या गतीनं चालतो आहे. मागे पाऊलखुणा उमटवत जातो आहे. 
चैतन्य- सुजयच्या वर्तमानातील वादानं भूतकाळात नेलं नि जाणवलं की, माणसं जुळतात ती प्रेमानं आणि सहवासानं! त्यातूनच कार्य उभं राहतं. जीवाला जीव देणारी माणसं तयार होतात. समाजाच्या भल्याचं काही करायचं असेल तर अशा माणसांचं पाठबळ लागतं. मैत्र असावं लागतं. मैत्र टिकावं लागतं.
- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(17 जून...! गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हा लेख)