Monday, April 15, 2019

बदलाला सामोरे जा

ॲरिस्टॉटलने म्हटलेआहे- शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याची फळे गोड असतात. आजच्या शिक्षण पद्धती बद्दल बर्‍याच जणांचे मत आहे की ही मुळे अधिकच कडू होत आहेत आणि गोड फळे चाखायला मिळतील की नाही शंका आहे.

 अशी सर्वसामान्य धारणा होण्याची कारणेही तशीच आहेत. लवकरच दहावी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. या परीक्षांचे स्वरूप पूर्वीपेक्षा बरेच बदललेले सध्या दिसते आहे. मेरीट चे नियम, ग्रेड प्रणाली, शाळेचे इन्टरनल मार्क्स, क्रीडा व कला क्षेत्रातील नैपुण्याचे मार्क्स, बेस्ट ऑफ फाईव्ह नियम, इत्यादी निरनिराळे नियम दरवर्षी थोड्याफार प्रमाणात दहावी-बारावीच्या परीक्षांचे  गुणपत्रिकेचे स्वरूप बदलताहेत .नुकतेच दहावीच्या मुलांची कल चाचणी आणि केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असे मोठे बदल शिक्षण विभागाद्वारे अमलात आणले आहेत.

 एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षांमधील गुण हे जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न समजणारे विद्यार्थी पालक आणि दुसरीकडे अगदी काही अर्थ नाही या परीक्षांना व त्यातील गुणांना असेही म्हणणारे विद्यार्थी पालक अशा दोन्ही टोकाच्या भूमिका घेणारे लोक आपल्याला दिसतात. परंतु जेव्हा खरोखर स्वतःला या अभ्यास, परीक्षा ,निकाल प्राप्ती, पुढील प्रवेश प्रक्रियेच्या दिव्यातून जावे लागते तेव्हा भ्रमाचा भोपळा फुटतो .काय निर्णय घ्यावा समजेनासे होते .

मानवाला जन्मताच सभोवताली होणारे बदल आत्मसात करण्यासाठी निसर्गाने संरक्षण संरचना (डिफेन्स मेकॅनिझम) दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जडणघडणीच्या पद्धतीमुळे या संरक्षण  संरचनेची क्षमता आत्मसात करता येते. त्यामुळे होणारा बदल स्वीकारणे सोपे जाते. शैक्षणिक क्षेत्रातील बदल स्वीकारायला प्रथम स्वतः पाल्य आणि पालकांनी पुढील गोष्टीघ्याव्यात-

 १)वास्तववादी होणे आवश्यक आहे- शैक्षणिक क्षेत्रात बदल हे काळानुरूप घडणारच आहेत ते रोखायला जाण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करा.
 २) ठराविक साचेबद्ध आणि संरक्षित क्षेत्रातून बाहेर पडा .कक्षा विस्तारा .शिक्षकाची मुलगी शिक्षक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा सुताराचा मुलगा सुतारच झाला पाहिजे असा विचार कितपत योग्य आहे.
 ३) शैक्षणिक प्रक्रियेबद्दल उदासीन न राहता कुतूहल बाळगा .दहावी बारावी मध्ये मुले गेल्यावर त्यांच्या पुढील वाटचालीचा विचार ठरवण्यापेक्षा लहानपणापासून मुलांचे कुतूहल जागृत राहणे आवश्यक आहे .स्वतः पालकांनीही अधिक सकारात्मकतेने आजूबाजूचे शैक्षणिक क्षेत्र, घटना बघणे आवश्यक आहे .
४)धैर्याने नवीन बदल स्वीकारा. या प्रक्रियेत जुन्या धारणांना -सवयींना फाटा द्यावा लागू शकतो. रोजच्या ठराविक संरक्षित साचेबद्ध आयुष्यातून मोठ्या जगात आपल्याला वावरायचे आहे तेव्हा धीराने ज्ञानाच्या कक्षा रुंदावून या बदलाला सामोरे जा.
 ५)काय करायचे एवढे करुन? इथेच अशाच पूर्वापार पद्धतीने शिक्षण घेत पोटापाण्याची सोय झाली तर बरे. कशाला हवी नसती उठाठेव असा आत्मघातकी विचार बाजूला सारून नवीन गोष्टी स्वीकारणे श्रेयस्कर.
 म्हणतात ना तीच एक व्यक्ती त्याच एका नदीच्या पाण्यात परत कधीच पाय ठेवू शकत  नसते. कुठलाही बदल हाताळण्याची गुरुकिल्ली स्वतः तयार करा .शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे अशा पद्धतीने सूज्ञपणे हाताळल्यास कुठलाही संभ्रम न राहता पार पाडता येऊ शकतात.

No comments:

Post a Comment