Saturday, May 4, 2019

सहचर

नियमितपणे दळण दळणाऱ्या मालिका बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जर महानगरीय कथा असेल तर संयुक्त कुटुंब असो किंवा विभक्त कुटुंब असो 'विवाहबाह्य संबंध ' असल्याशिवाय मालिकेला धार येत नाही. नवीनच सुरु झालेल्या एका मालिकेत तर हा मामला खुल्लमखुल्ला सुरु आहे नायिकेच्या नवऱ्याला हे माहित आहे आणि तो उदात्त भावनेने तिला ह्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे मालिकेचा TRP कमी होईपर्यंत अर्थातच हे प्रयत्न सुरु राहतील.  "चित्रपट किंवा मालिका समाजमनाचा आरसा असतात" अशी एक पळवाट ह्या निर्मात्यांकडून आपण कायम ऐकत असतो काही अंशी ते खरेही आहे  पण प्रत्येकच उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये असे संबंध असतात का किंवा असतील का ? असा प्रश्न पडतो...वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर असलेली काही यशस्वी जोडपी किंवा मोठ्या पदावर काम करणारा नवरा किंवा बायको आणि घर सांभाळणारी बायको किंवा कधीकधी अगदी नवरा सुद्धा सुखाचा संसार करत असतात पण तरीही कधीमधी आपणही आपल्या आजूबाजूला असलं काही घडतंय का असं उगीचच शोधत राहतो काही आढळलच तर मिठमसाला लाऊन ती बातमी खमंग करतो. उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन ,लठ्ठ पगाराची नोकरी मिळवलेली आजकालची तरुण पिढी छान नियोजन करून स्वतःच करिअर घडवते , त्यांच्या एकमेकांशी बोलण्याचालण्यात छान मोकळेपणा असतो एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे चांगले मित्र असतात. आजकालचे कामाचे तास, तिथला ताण, स्पर्धा  ह्या सगळ्याची त्यांना जाणीव असते आणि तरीही अशी मुलंमुली जेव्हा जोडपी बनून समोर येतात तेव्हा त्यांच्यातला समंजसपणा  कुठे हरवतो ?..

.स्वतःच्या उच्चशिक्षित सहचरापेक्षा अजून 'एखाद्याच्या' किंवा 'एखादीच्या' आधाराची गरज त्यांना का वाटत असेल ? की असं काही असल्याशिवाय स्टेटस पूर्ण होत नाही , त्याशिवाय तुमच्या कर्तबगारीवर तुमचे सहकारी किंवा वरिष्ठ विश्वास ठेवत नाहीत ?                  पूर्वीच्या काळी जेव्हा बहुतेक करून नवऱ्याचं आणि बायकोचं कार्यक्षेत्र हे पूर्णपणे वेगळं होतं तेव्हा अशा घटना घडल्या असत्या तर नवल वाटले नसते कारण त्या जोडप्यांमध्ये 'बौद्धिक भूक'  भागवू शकेल असा संवाद निर्माणच होत नसेल , पण तरीही कुठल्या तरी एक तत्वावर ते संसार टिकले त्यात गोडी होती असे नाही , पण मग आत्ताचे चर्चेच्या अनेक फेऱ्या करून जुळवलेले ,जुळलेले , तोडून पुन्हा मांडलेले असे संसार तरी कुठे सुरळीतपणे सुरु आहेत ?  आर्थिक , सामाजिक, बौद्धिक दृष्ट्या सम पातळीवर वावरणारी कित्येक जोडपी घटस्फोटाच्या निर्णयावर येतात तेव्हा वाईट वाटतं. मला वाटतं शेवटी commitment पेक्षा adjustment महत्वाची. प्रेमापायी कधीमधी संशय येणं, मत्सर वाटणं हा मनुष्यस्वभाव आहे  पण एकदा समोरच्याला स्वीकारले , थोडंबहुत सोडण्याची तयारी असली की commitment निर्माण होतेच त्याला वेळ द्यावा लागतो हे मात्र नक्की आणि ही तयारी दोन्हीबाजूने हवी.

         मालिकांमध्ये दाखवतात तसे 'मोठ्यांचा दबाव' , 'लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात' असलं काही मानणारी पिढी आता संपली. आजची पिढी विचार करणारी आहे, सुशिक्षित आहे स्पष्टपणे बोलणारी आहे. एकमेकांना असलेले ताणतणाव , गरजा,  स्वातंत्र्य , हक्क , अधिकार सगळं  उत्तमपणे समजून घेणारी आहे . फक्त गरज आहे की दोन माणसं एकत्र येऊन सहवासाने प्रेम , सुसंवाद निर्माण करु शकतात, दोन कुटुंब जोडू शकतात नवीन पिढी घडवू शकतात ह्या गृहितकावर ठाम विश्वास ठेवण्याची .

No comments:

Post a Comment