Friday, April 12, 2019

मधुशाला: ध्येयाचा ध्यास

हिंदी साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय १० कवितांची यादी करायला घेतली तर मला वाटतं,
मधुशालाचा क्रमांक बराच वरचा असेल. १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या हरिवंशराय बच्चन यांच्या ह्या
कवितेने असंख्य रसिक वाचकांना अक्षरश: वेड लावलंय. उमर खैयाम ने पर्शियन भाषेत लावलेलं हे बीज
बच्चनजी (एडवर्ड फित्झगेराल्डच्या इंग्रजी मातीच्या आधाराने) भारतात घेऊन आले आणि हिंदी भाषेच्या
मातीत हे रोपटं छान बहरलं.
मधु म्हणजे मदिरा आणि मधुशाला म्हणजे मदिरालय. ही कविता प्रसिद्ध झाली त्यावेळी अनेक
तथाकथित ‘सोवळ्या’ वाचकांनी आणि साहित्यिकांनी बच्चनजींवर टीका केली. मदिरेसारख्या वाईट द्रव्यावर
कविता करणं कसं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी चढाओढ सुरु झाली. आणि गंमत म्हणजे अशा
वातावरणात या कवितेचं जाहीरपणे समर्थन केलं ते गांधीजींनी! ही कविता म्हणजे दारू आणि दारुड्यांच
कौतुक नसून ती केवळ प्रतीके आहेत. ही कविता अर्थाचे कितीतरी पदर ल्यालेली एक उच्च दर्जाची
साहित्यकृती आहे, हे गांधीजींनी ठासून सांगितल्यावर ह्या कवितेला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यानंतर ही
कविता रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली. १९३६ आणि १९३७ मध्ये अनुक्रमे मधुबाला आणि मधुकलश
ही हरिवंशरायजींची काव्ये प्रसिद्ध झाली, मात्र त्यांना मधुशालाइतकी लोकप्रियता लाभली नाही.
एकशे एकोणचाळीस कडव्यांची (मूळ १३५ आणि परिशिष्ट म्हणून ४) ही कविता मानवी जीवनाचे
आणि जीवनाच्या विविध पैलूंचे वर्णन करते, जीवनात सतत अग्रेसर होण्यासाठी मार्गदर्शन करते आणि
जीवनातल्या संगती/विसंगतींवर भाष्य करते.
या कवितेची सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय परंपरेनुसार काव्याच्या सुरुवातीला असते तसे
मंगलाचरण मधुशालेतही आहे. मृदू भावनांच्या द्राक्षापासून मदिरा तयार करून कवी देवाला नैवेद्य अर्पण
करतो; आणि मग जगाला ‘प्रसाद’ द्यायला सिद्ध होतो.
या कवितेतील मुख्य प्रतीके म्हणजे मधु/ मदिरा/ हाला (मद्य), साकी (मद्याचे वितरण करणारी
व्यक्ती), प्यास (तृष्णा), प्याला (चषक) आणि मधुशाला (मदिरालय)! या प्रतीकांचे हवे तेवढे अन्वय
लावण्याचा अधिकार वाचकाला आहे. मधु/मदिरा हे जीवनाच्या ध्येयाचे प्रतीक मानले तर ‘प्यास/तृष्णा’ हे
ध्येयाच्या ध्यासाचे प्रतीक ठरेल. प्याला, साकी ही ध्येयसिद्धीच्या मार्गात पुढे नेणारी साधने आणि
मधुशाला हे त्या मार्गावरचे अंतिम स्थान. मनुष्य आयुष्यात एखादे ध्येय मनाशी ठरवतो आणि त्या दिशेने
मार्गक्रमण करू लागतो. मार्ग ठाऊक नसतो. अनेक लोक अनेक सल्ले देतात. कोणता मार्ग निवडावा, ते
कळेनासे होते. अशा वेळी कवी नि:संदिग्धपणे सांगतो, ‘राह पकड तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला’.
एखादं ध्येय निश्चित केलं तरी ते प्राप्त करणं सोपं नसतं. त्या दिशेने निरंतर मार्गक्रमण करणं
महत्त्वाचं असतं. हा प्रवास कधी कधी इतका मोठा वाटायला लागतो की संयम संपायला येतो. मार्गावर
भेटणारा प्रत्येकजण ‘आणखी दूर’ एवढंच सांगत असतो. कितीही दूरवर नजर टाकली, तरी आपलं ध्येय

दृष्टिपथात येतच नाही. पुढे जाण्याचं धैर्य नसतं आणि पाठी वळायचं नसतं. अशा वेळी आपलं ध्येय
मन:चक्षूंसमोर आणलं, सतत त्याचं स्मरण केलं, तिथपर्यंत पोहोचलोय अशी कल्पना करत राहिलं की ते
दूर वाटेनासं होतं आणि त्याचा सतत ध्यास घेतला की आपण केव्हा येऊन पोहचलो ते कळतही नाही.
‘मुख से तू अविरत कहता जा मधु, मदिरा, मादक हाला,
हाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला,
ध्यान किए जा मन में सुमधुर सुखकर, सुंदर साकी का,
और बढ़ा चल, पथिक, न तुझको दूर लगेगी मधुशाला।’
बरेचदा एखादी गोष्ट हातात आली असं वाटत असतानाच काहीतरी बिनसतं. एखादा प्रयोग
यशस्वी होणार असं वाटेस्तोवर तो फसतो. अशा वेळी न डगमगता चिकाटी ठेवून प्रयत्न सोडायचा नाही,
हे कवी ठासून सांगतो. ‘पथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला|’
बरं, या ध्येयवेड्या लोकांचं ध्येय साधंसुधं नसतं. एकच तारा समोर असला की पायतळी अंगार असणारच!
त्यामुळे ध्येय प्राप्त करायचं तर वैयक्तिक सुखाची राखरांगोळी करायची तयारी हवी. म्हणून कवी आधीच
इशारा देतो, ‘जलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला |’ घरादारावर निखारा ठेवून भावांसह काळ्या
पाण्याची शिक्षा भोगायचं धैर्य येतं ते यातूनच. सण आणि उत्सव म्हणजे आनंदाचे क्षण. वर्षातून एकदा ते
येणार आणि आनंद देणार. मात्र या ध्येयवेड्या लोकांना त्याचं ध्येय हे एकमेव आनंदाचं निधान! आणि
सतत कार्यरत असताना हा आनंद सतत मिळत राहणार. कवी म्हणतो, ‘दिन को होली, रात दिवाली, रोज़
मनाती मधुशाला।’
एखाद्याने एखादा ध्यास घेतला, की त्याला सर्वदूर त्याचाच भास होतो. जळी, स्थळी, काष्ठी,
पाषाणी तेच दिसतं. कवीला याची कल्पना आहे. त्यामुळे
‘किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देती हाला
किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देता प्याला,
किसी ओर मैं देखूं, मुझको दिखलाई देता साकी
किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।’
कवीला निसर्गातही मधु, प्याला, साकी आणि मधुशाला यांचच दर्शन होतं. झाड म्हणजे साकी,
मोहोर म्हणजे प्याला आणि त्यातून दरवळणारा मादक सुगंध म्हणजे हाला, अर्थात, मदिरा! रोज
उगवणारी प्रभात म्हणजे मधुशाला, संध्याकाळ मधुशाला आणि अंधारी रात्रही मधुशाला! मधुबन मधुशाला,

उपवन मधुशाला आणि तपोवनही मधुशाला! श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर, वीणेचा झंकार, चित्रकाराचं चित्र
मधुशाला!
एकदा ध्येयाच्या दिशेने निघाल्यावर मार्गात इतर ध्येयवेडेही भेटतातच. एकाच ध्येयाने झपाटलेल्या
या लोकांमध्ये कसलाही भेदभाव उरत नाही. आपल्या सोबत असलेला आपल्यासारखा ध्येयवादी हिंदू आहे
की मुस्लिम हे डोक्यातही येत नाही. मंदिर आणि मशिदीत जाताना हा भेदभाव मनात बाळगणारा मनुष्य
ध्येयाच्या मार्गावर धर्म विसरतो, त्यामुळेच अब्दुल कलाम आणि अरुणाचलम खांद्याला खांदा लावून एकत्र
काम करू शकतात. कवी हे सुंदर शब्दात मांडतो, ‘बैर बढ़ाते मंदिर मस्जिद, मेल कराती मधुशाला|’
धर्मभेदाप्रमाणे आर्थिक, सामाजिक भेदही एकाच ध्येयासाठी धडपडणार्यांना अमान्य असतात. त्यामुळेच,
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती एखाद्या सामान्य मावळ्याला हृदयाशी धरू शकतो.
‘रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला|’
एखाद्या वेळी एखादा संशोधक, चिंतक एखादी नवीन संकल्पना मांडतो. ही संकल्पना, हा सिद्धांत
मांडण्यापूर्वी त्याने जीवाचं रान करून संशोधन, चिंतन, मनन केलेलं असतं. मात्र जग त्या सिद्धांताला
मान्यच करत नाही. अशा परिस्थितीत कवी निःसंदिग्धपणे सांगतो,
‘आज करे परहेज़ जगत, पर, कल पीनी होगी हाला,
आज करे इन्कार जगत, पर, कल पीना होगा प्याला...’
डार्विन आणि कोपर्निकसचे सिद्धान्त अमान्य करणारे काळाच्या पडद्याआड गेलेत, आज आपण
ते सिद्धान्त स्वीकारले आहेत.
ज्ञानप्राप्तीसाठी झपाटलेला एखादा ज्ञानार्थी कितीही ज्ञान मिळालं तरी समाधानी नसतो. अवघं
आयुष्य वेचून कळतं ते हेच की अजूनपर्यंत आपल्याला काहीही कळालेलं नाही. आणि मग खरं ज्ञान
मिळवण्याची ओढ लागते.
‘शान्त सकी हो अब तक, साकी, पीकर किस उर की ज्वाला,
‘और, और’ की रटन लगाता जाता हर पीनेवाला...’
आणि तरीही ध्येय गवसतंच, असं नाही. असे निराश लोकही जगात कमी नाहीत. त्यांचीही मनस्थिती
कवी अचूक पकडतो,
‘हाथों में आने-आने में, हाय, फिसल जाता प्याला,
अधरों पर आने-आने में हाय, ढुलक जाती हाला,

दुनियावालो, आकर मेरी किस्मत की ख़ूबी देखो,
रह-रह जाती है बस मुझको मिलते-मिलते मधुशाला।’
काही लोक असे निराश होतात, तर काही चिकाटीने कार्यरत राहतात. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते
आपल्या कामात मग्न असतात. ते म्हणतात,
‘मेरे अधरों पर हो अंतिम वस्तु न तुलसीदल प्याला
मेरी जिव्हा पर हो अंतिम वस्तु न गंगाजल हाला,
मेरे शव के पीछे चलने वालों याद इसे रखना
राम नाम है सत्य न कहना, कहना सच्ची मधुशाला।’
एवढचं नाही, तर आपल्या मृत्यूनंतरही आपले कार्य पुढे सुरु राहावे अशी त्यांची इच्छा असते.
एखादा रामकृष्ण भांडारकर प्राच्यविद्या संशोधनासाठी आपलं आयुष्य वेचतो आणि त्याच्या मृत्युनंतरही
इतर संशोधकांसाठी हक्काची मार्गदर्शक यंत्रणा कार्यरत राहते. त्याच्या कार्याला ही खरी आदरांजली
असते.
‘प्राण प्रिये यदि श्राद्ध करो तुम मेरा तो ऐसे करना
पीने वालों को बुलवा कऱ खुलवा देना मधुशाला।’
तर अशी ही मधुशाला. ध्येयाच्या मार्गावर चालत राहण्याचा संदेश देणारी. ध्येयाचा ध्यास कसा
घ्यावा, ते शिकवणारी. ध्येयपथावर अडथळे कसे येतात आणि ते आले तरीही न डगमगता आपली
वाटचाल सुरु कशी ठेवायची त्यावर प्रकाश टाकणारी. ध्येय कोणतेही असू शकेल, एखादा नवीन शोध
लावण्याचं ध्येय, एखादा अज्ञात प्रदेश शोधून काढण्याचं ध्येय, आपल्या मातृभूला परकियांच्या जोखडातून
मुक्त करण्याचं ध्येय, आपल्या देशाचा आणि देशवासियांचा विकास करण्याचं ध्येय, जुन्यापुराण्या
अन्यायकारक परंपरा झुगारून देऊन समाजसुधारणा करण्याचं ध्येय, पददलित-शोषित-पीडितांना मुख्य
प्रवाहात आणण्याचं ध्येय, अध्यात्माच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करण्याचं ध्येय... त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून
आपलं तन, मन, धन त्यासाठी अर्पण करण्याची प्रेरणा देणारी ही मधुशाला. ही कविता नाही, तर जीवनाचं
तत्त्वज्ञान आहे. ही कविता अशीच अनेक पिढ्यांना ध्येयवेडाचे धडे देत राहो आणि ध्येयवेड्यांना
तिच्याकडून प्रेरणा मिळत राहो...
बनें रहें ये पीने वाले, बनी रहे यह मधुशाला।

No comments:

Post a Comment