७ सप्टेंबर १९९८, वेळ- सकाळी ८.३०, मुंबईच्या सहारा विमानतळावरून गल्फ एअर च्या विमानाने आम्हा तिघांना घेऊन आकाशात झेप घेतली नी साधारण तीन तासानंतर बहरीन च्या धावपट्टीवर अलगद उतरवले. त्यावेळी तेथे सकाळचे ९ वाजले होते . बहरीन हा ६२५ sq.km क्षेत्रफळ असलेला आखाती प्रदेशातला छोटासा देश आहे. त्यावेळी तिथली लोकसंख्या ५ लाख होती. त्यापैकी ३ लाख बहरिनी तर २ लाख परकीय होते.त्यावेळी तेथे राजवट होती. शेेेख इसा बिन सलमान अल खलिफा हा तेथील राजा होता.
माझा हा पहिलाच परदेश प्रवास नी छोट्या सलिल चा तर परदेश आणि विमानप्रवास दोन्ही पहिलेच. उत्सुकतेपोटी त्याने विचारलेले असंख्य प्रश्न आणि आमची त्यावरची उत्तरे ह्यामुळे बाजूच्यांचीही छान करमणूक होत होती. 'हे विमान मधेच बंद पडले तर ?' ह्या त्याच्या चिंतेने विचारलेल्या प्रश्नावर बाजूच्या व्यक्तीने टाकलेला कटाक्ष अजूनही चांगला लक्षात आहे . विमानातून बाहेर पडण्यापूर्वी सलिलने पायलटला भेटण्याचा हट्टही पूर्ण करून घेतला.
विमानतळावर उतरल्याबरोबरच तिथल्या सुबत्तेची कल्पना येऊ लागली. तिथला झगमगाट, सजावट आणि स्वच्छता यासर्वांपुढे आपले विमानतळ फारच साधे व बिचारे वाटू लागले .
बाहेर पडल्यावर पहिले सामना करावा लागला तो तिथल्या हवामानाशी. इतकी प्रचंड आर्द्रता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती.
'मर्सिडीझ ' ला टॅक्सी स्वरूपात बघून खूप आश्चर्य वाटले. पण 'चल पल्लू कर ले मजा' म्हणत आम्ही टॅक्सी ने 'अल मुहर्रक 'कडे निघालो. हे एक छोटेसे आयलंड आहे असे म्हणता येईल.चारपदरी रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या गाड्या आणि तरीही हॉर्नचा एकदाही आवाज नाही हे दुसरे आश्चर्य ! आखाती प्रदेश असुन रस्त्यावर dividers मध्ये असलेली रंगीबेरंगी फुलझाडे बघुन खूप ताजेतवाने वाटले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली व खजुरांनी लगडलेली झाडे बघतांना खूप मजा वाटली. साधारण अर्ध्या तासात आम्ही आमच्या बिल्डिंगपाशी येऊन पोहोचलो. सेन्सर असलेले ग्लास door बिल्डिंगच्या entrance ला असलेले बघून खूप भारी वाटले.
तिसऱ्या मजल्यावर असलेला दोन बेडरूम, हॉल किचन चा नवा कोरा फ्लॅट व किचन ला लागुन असलेल्या गॅलरी तुन दिसणारा निळेशार पाणी असलेला शांत समुद्र बघुन खूप फ्रेश वाटले. अमितने काही जुजबी वस्तुंची खरेदी आधीच करून ठेवली होती.त्यामुळे आता स्वतः ला हवे तसे घर लावण्याचा कार्यक्रमच बाकी होता.
आल्याआल्या मला काम नको म्हणुन त्यादिवशी च्या लंच व dinner चे आमंत्रण माझ्या तिथल्या नव्या मैत्रिणीने प्राचीने आधीच देऊन ठेवले होते.त्यामुळे पहिला दिवस आराम करण्यात आणि सामानाची हवी तशी मांडणी करण्यातच गेला.
संध्याकाळी बिल्डिंगच्या अगदी समोर असलेल्या Babasons सुपर मार्केट ला जाऊन grocery घेऊन आलो.सुपर मार्केट ही संकल्पना त्यावेळी आपल्याकडे सुद्धा प्रचलीत नव्हती.टूथब्रश पासून तर धान्या पर्यंत,दह्यादुधापासून तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पर्यंत सर्व गोष्टी तिथे उपलब्ध होत्या.एकेक वस्तु घेऊन ट्रॉली त जमा करण्याची सलिल ला तर खुप गंमत वाटत होती.
तर अशी तिथली माझ्या नवीन संसाराची सुरवात होती.
तिथे सूर्योदय सकाळी ५ वाजता नी सुर्यास्त संध्याकाळी ५ वाजता होतो.पण सकाळी ४ वाजताच जाग आली ती एका मशीन च्या आवाजाने. खिडकीतुन बाहेर बघितले तर मशीन च्या मागच्या बाजूची क्रेन रस्त्यावरील कचराकुंडीत ला कचरा garbage bag मध्ये टाकण्याचे काम आणि मशीन चा समोरचा भाग चक्क रस्ता स्वच्छ करीत होता.मला आपल्या येथील कचराकुंडी सोडुन तिच्या आजूबाजूला टाकलेल्या कचऱ्याचे कित्येक दिवस न उचललेले ढीग आठवले.
अमितला कॉलेजची गाडी सकाळी ६.१० ला घ्यायला यायची व दुपारी २.१० ला drop करायची. पुर्ण वर्षभरात त्या गाडीची वेळ एकदाही चुकली नाही आणि अमितने देखील ती एकदाही स्वतः कडून चुकू दिली नाही.याबद्दल वर्षाच्या शेवटी त्याचे certificate देऊन विशेष कौतुक करण्यात आले होते.
रोज सकाळी गॅलरीत बसुन शांत समुद्र बघत,खजुराची साखर घालुन केलेला चहा पिणे आणि समोरच्या सुपर मार्केट मध्ये येणाऱ्या सामानाची ने आण करणाऱ्या गाड्या न्याहाळणे हा माझा दिनक्रम च होऊन बसला. सकाळी ७ वाजता सुपरमार्केट,पोस्ट ऑफिसेस, बॅंका सर्वांचे कामकाज सुरू होते.पोस्टमन च्या येण्याची वेळ सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यानची होती. ISD calls प्रचंड महाग होते,त्यामुळे महिन्यातून एकदाच आम्ही घरी फोन करीत असू.बाकी गोष्टी सविस्तर पत्रातूनच कळवल्या जात.रोज सकाळी ८ वाजता दूध व दुधाचे पदार्थ, भाज्या,फळे घेऊन गाडी येत असे आणि आतला expiry झालेला माल नियमित बाहेर आणून ठेवला जात असे.
तिथे वापरण्याच्या पाण्याची काहीच कमतरता नव्हती.पण पाणी इतके खारे की चुळ भरणे पण नको वाटायचे.हळूहळू सवय झाली.पिण्याचे गोड पाणी आम्ही विकत घेत असू. तिथे गोड पाण्याच्या कॅन्स असलेल्या गाड्या सगळीकडे फिरत.मी २० लिटर ची कॅन दाराबाहेर ठेवायची आणि त्यावरच १०० फिल ठेवायची. कॅन वाला बिल्डिंग मध्ये येऊन दाराबाहेर ठेवलेली कॅन व पैसे घेऊन जायचा आणि भरून आणून ठेवायचा.जर कधी can वाला आला नाही तरी कॅन व पैसे दोन्ही तसेच सुरक्षित रहात, हा प्रकार अनेकदा अनुभवता आला.
मुंबई,पुणे,कोल्हापूर व बंगलोर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या कुटुंबीयांशी आमची चांगली गट्टी जमली.मुलंही साधारण एकाच वयाची होती त्यामुळे सलिलचे मित्रमंडळ सुद्धा मोठे होते.
सुट्टीच्या दिवशी सर्व कुटुंबीय बरेचदा एकत्र फिरायला जात असू.बहरीन दर्शन,मार्केट ला जाणे, महिन्यातून एकदातरी get-together ह्यामध्ये तेथील दिवस भराभर जात होते.
बहरीन मध्ये कुठेही फिरताना मुंबईत फिरत असल्याचा भास व्हायचा.मनामा हा तेथील मुख्य भाग होता.तेथे अनेक कपड्यांची,electronics वस्तूंची मोठमोठी दुकाने होती.मनामाला गेल्यावर आम्ही ' jufri' मध्ये अवश्य जात असू. शेंगदाणा तेल, ऑस्ट्रेलियन आटा व उसाची साखर ह्या वस्तू फक्त तेथेच मिळत. लुलू मार्केट, सना, अल अली आणि सिफ मॉल अशा अनेक ठिकाणी सुट्टीच्या दिवशी हिंडायला जाणे हा आमचा विरंगुळा होता.
आखाती प्रदेशातील पहिली तेल विहीर( oil well) Bahrain येथे आहे.
'Tree of life ' बघितल्यावर तर सुरवातीला विश्र्वासच बसत नाही. आजूबाजूला कितीतरी किलोमीटर अंतरावर फक्त आणि फक्त वाळूच नजरेस पडते आणि अशा ठिकाणी ४०० वर्षांपूर्वीचे एकमेव हिरवेगार झाड दिसते.ज्याच्या फांद्या सर्व दिशेने पसरलेल्या दिसतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते झाड अजूनही उभे आहे म्हणूनच त्याला Tree of life किंवा अरेबिक भाषेत शजरत- अल् - हयात म्हणतात.
बहरीन मध्ये अनेक ठिकाणी असलेली विविध आकाराची pearl monuments बघण्यासारखी होती. बहरीनला पूर्वी मोत्याचा व्यवसाय होता असे समजले. तिथला काळा मोती जगप्रसिद्ध होता. मोती हा शिंपल्यात असलेल्या अवस्थेतच असतो, एकदा कुठला घ्यायचा हे नक्की केले की ते आपल्यासमोर आपल्याला शिंपल्या तून काढून देतात. डोळे दिपणे हे काय असते ह्याचा अनुभव तेथील गोल्ड सुक (सोन्याचे मार्केट) बघितल्यावर आला.त्या मार्केट मध्ये फक्त सोन्याच्या दागिन्यांची दुकाने होती.
तिथे फिरण्यासाठी आम्ही कधी टॅक्सी तर कधी बस चा उपयोग करीत असू.तिथे बस मध्ये कंडक्टर नसायचाच. बसमध्ये चढल्यावर ड्रायव्हरला ५० fils द्यायचे आणि शुक्रान म्हणून आपल्या जागेवर बसायचे.तिथे नियम काटेकोरपणे पाळले जायचे. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागेवर ती रिकामी असली तरी कुणी पुरुष बसत नसे. बसमध्ये फक्त ९ लोक उभ्याने प्रवास करू शकतील हा नियम होता.
बहरीन ची हद्द जिथे संपते आणि सौदी अरेबिया जिथे सुरू होतं त्याठिकाणी एक glass tower आहे. असेच टॉवर दुसऱ्या बाजूला सौदी मध्येही आहे. रोज संध्याकाळी तेथे lights लागतात. तो एक टुरिस्ट स्पॉट आहे. तेथे जाण्यासाठी असणारा रस्ता हा २५ km समुद्रातून बांधला आहे त्याला cause way म्हणतात. आम्ही व माझी मैत्रीण वर्षा आणि तिची फॅमिली असे सगळे गाडीने तेथे गेलो होतो. संध्याकाळचे ५ वाजत आले होते.प्रचंड धुकं असल्यामुळे गाडीचे head lights सुरू केले होते. गाडी पार्क करतांना ते सुरूच राहिल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. Glass च्या capsule lift ने आम्ही वर गेलो. सगळं बहरीन आणि सौदी दिव्यांमुळे चमकत होते. मुंबईत सुद्धा उदयास न आलेल्या मॅकडोनाल्ड च्या बर्गर व फ्रेंच फ्राईज ची चव आम्ही तेथे चाखली. वरती बराच वेळ घालवून खाली उतरलो.हळूहळू सगळे लोकं आपापल्या गाडीत बसून रवाना होत होती. Head lights सुरू राहिल्यामुळे गाडीची बॅटरी down झाली होती. ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर सुरू झाली पण २,३ km गेल्यावर पुन्हा बंद पडली. सुसाट वेगाने गाड्या भरधाव जात होत्या. चारपदरी रस्त्यांवरून गाडी एका बाजूला नेऊन उभी करणे हे सुद्धा जिकरीचेच काम होते. पण ते कसेबसे पार पडले. आता प्रश्न होता इथून घरी जायचे कसे? डिसेंबर महिना,त्यामुळे कडाक्याची थंडी आणि भयंकर गार वारं. बहरीन ला दोन्ही ऋतु अगदी टोकाचे असतात. प्रचंड थंडी आणि प्रचंड गर्मी व humidity. उन्हाळ्यात तर ५२° तापमान पोहोचत. तर, अनेक गाड्यांना लिफ्ट साठी हात दाखवून झाला, पण कुणीच थांबेना. थंडी व वाऱ्यामुळे काही सुचत नव्हतं. डोळ्यातून पाणी येत होतं.मुलं लहान होती त्यामुळे जास्तच काळजी वाटत होती. अखेर एक pick up गाडी आमच्याजवळ थांबली. तो केरळी माणूस होता. त्याला आमची अडचण समजली. पण तिथे नियम खूप कडकपणे पाळले जातात. Pick up मध्ये मागच्या बाजूला माणसांना बसवलेले जर पोलिसांनी बघितले असते तर त्याचे लायसन्स जप्त झाले असते. तरी त्या देव माणसाने एका अटीवर आम्हाला गाडीत बसवून घेतले की वस्ती लागण्यापूर्वी मी तुम्हाला उतरवेल,पण तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल.थोडा वेळ लागेल,पण नक्की मिळेल. त्यावेळी त्याची ती अट मान्य करण्याशिवाय आमच्याजवळ काही पर्याय नव्हता. त्याच्या केबिन मध्ये तो,मी, वर्षा,तिची दोन मुले व सलिल कसेबसे बसलो व अमित आणि सुरेंद्र प्रचंड गारठयात मागच्या उघड्या लॉरी त कुडकुडत बसले.अखेर त्याने आम्हाला एका ठिकाणी उतरवले. आम्ही त्याचे मनापासून आभार मानले व मोबदला देण्यासाठी अमितने खिश्यात हात घातला त्यावर हात जोडून त्याने नकार दिला व आम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्याने आमचा निरोप घेतला. प्रचंड थंडीमुळे हे दोघेही कुडकुडत होते. नशिबाने लगेच टॅक्सी मिळाली. गाडीत heater लावल्यावर जरा वेळाने बरं वाटू लागलं. आजही तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.
खरं तर बहरीन ला जातांना आपल्याला अरेबिक भाषा शिकत येईल असे वाटले होते. पण माझा तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्कच आला नाही. अमितला मात्र ही संधी मिळाली. अमितचे सहकारी जॉर्डन,अमेरिका, भारत फिलिपिन्स अशा विविध ठिकाणाहून आले होते. जॉर्डन चा सहकारी व वर्गातील मुलं यांच्यामुळे अमितला अरेबिक भाषा समजू लागली होती व संवाद साधणे सुद्धा जमायला लागले.वर्गातील मुलांचे मात्र वर्ग सुरू असताना बर्गर खाणे, पेप्सी पिणे,एकमेकांच्या गळ्यात हात घालुन बसणे असे प्रकार पचवणे खूपच कठीण गेले.कारण आपली ह्या बाबतची शिकवण खूप वेगळी असते. ह्याबाबत त्यांना समज दिली परंतु त्यांना आपलं गुरु शिष्य नातं समजणं कठीण होतं. ते अमितला उस्ताद किंवा मिस्टर अमित असे संबोधत.
आमच्या फ्लॅटचा किंबहुना पुर्ण बिल्डिंग चा मालक मि. गुलम महम्मद खूपच सभ्य व्यक्ती होता.खूप अदबीने बोलायचा. कित्येक दिवस तो अमितला हमीद व सलिल ला सलीम समजायचा. माझ्याबद्दल मात्र त्याला प्रश्नचिन्ह व कुतूहल होते गळ्यात मंगळसुत्र व कपाळावर टिकली लावणारी ही ' हमीद ' सोबत कशी? एकदा मात्र त्याने त्याच्या शंकेचे निरसन करूनच घेतले आणि त्यानंतर आम्ही तिघे बराच वेळ पोट धरून हसत बसलो
ह्या एक वर्षाच्या कालावधीत आणखी काही मराठी कुटुंबांना भेटलो.त्यांच्याकडे येणे जाणे सुद्धा झाले.
समोरच्या Babasons मध्ये आम्ही अगणित वेळा गेलो असू. इथला एक अनुभव खुप भावनिक आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तिथला सेक्युरिटी गार्ड मोहम्मद सलिल चा चाहता बनला होता. आम्ही गेलो की तो सलिल ला उचलुन कडेवर घेऊन सगळीकडे फिरत असे. तो बहरिनी होता. अरेबिक शिवाय कुठलीच भाषा त्याला येत नव्हती.पण त्या दोघांमध्ये कधीच भाषेचा अडसर आला नाही. तो स्वखर्चाने सलिल ला खाऊ देत असे. आम्ही त्याला असे करण्यापासून खूपदा अडवले पण त्याने कधी ऐकले नाही. सलिल बोलका असल्यामुळे इतर मल्याळी कर्मचारी सुद्धा त्याच्याशी खूप गप्पा मारीत. मोहम्मद ची सलिल शी जवळीक खुप वेगळी होती.आम्ही जर एक दोन दिवसात तिकडे फिरकलो नाही तर तो आमच्या शेजारी मित्रांबरोबर निरोप पाठवित असे. एक दिवस तो खुप emotional झाला होता आणि त्याने अमित जवळ सलिल ला घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. आम्ही स्तब्धच झालो पण भानावर येऊन त्याला जड अंतःकरणाने नकार दिला. त्याच्या डोळ्यांतले पाणी बघुन हृदयात कालवाकालव झाली पण परकीय ठिकाणी कुठलीच रिस्क घेण्यास आम्ही तयार नव्हतो. ' सलिल मध्ये मला माझा मुलगा दिसतो ' असे त्याच्याकडून ऐकल्यावर मन खुप हळवे झाले. सलिल ची व स्वतः च्या बायकोची भेट करून देण्याची त्याची इच्छा होती पण आमचाही नाईलाज होता.
असे विविध अनुभव घेण्यात, सर्वांनी एकत्र येऊन सर्व सण साजरे करण्यात, हिंडण्या फिरण्यात वर्ष कसे संपत आले कळलेही नाही आणि आमचा भारतात परत येण्याचा दिवस ठरला.
आम्ही परत जाणार हे ऐकल्यावर Babasons मधल्या सलिल च्या मित्रांनी तर त्याच्यावर प्रेमाच्या भेटवस्तू चा वर्षाव केला. ' तू अपने मुलुख जायेगा? ' ' फिर कब आयेगा?' असे त्याला विचारत त्याच्यासोबत फोटोसेशन केले. मोहम्मद ने पण सलिल ला अश्रू भरल्या डोळ्यांनी जवळ घेतले व आशिर्वाद देऊन बाय केले.
११ मे ला सलिल चा ५ वा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला आणि १४ मे ला रात्री ११ च्या flight ने मी व सलिल मुंबईला येण्यासाठी गल्फ एअर च्या विमानात बसलो. सलिल अगदी सराईता सारखा स्वतः च्या सीटवर सीटबेल्ट लाऊन तयार होता.
बहरीन सोडतांना वाईट नक्कीच वाटत होतं, पण अनेक सुंदर आठवणींचा, अनुभवांचा खजिना मी सोबत घेऊन निघाले होते. त्या आठवणींमध्ये प्रवास केंव्हा संपला आणि विमान केंव्हा मुंबईच्या धावपट्टीवर उतरले कळले सुद्धा नाही.
- पल्लवी
- पल्लवी
No comments:
Post a Comment