देवानं माणसाला*
*फेसबुकवरून*
*फ्रेण्डरिक्वेस्ट पाठविली*
*उत्तर आलं नाही*
*देवानं माणसाला*
*व्हाॅटस् अॅपवरून*
*मेसेज पाठविला*
*उत्तर आलं नाही*
*देवानं माणसाला*
*लॅपटॉपवरून*
*मेल पाठविला*
*उत्तर आलं नाही*
*माणसाच्या अस्तित्वाबद्दल*
*अस्वस्थ झालेल्या देवाने*
*मग शेवटी शोधलं माणसाला*
*गुगलवर जाऊन*
*तर*
*काॅम्प्युटरची रंगबेरंगी स्क्रीन*
*काळवंडत गेली हळूहळू*
*अन् देवाचा काॅम्प्युटर खाडकन बंद पडला*
*मेकॅनिक म्हणाला,*
*"देवा, काॅम्प्युटरमध्ये व्हायरस आलाय"*
*देव म्हणाला,*
*"अरे पण, मी माणसाच्या शोधात गेलो होतो*
*मग हा व्हायरस कुठून आला?"*
प्रशांत असनारे यांची 'व्हायरस' कविता वाचताना जाणीव झाली ती, त्या कवितेतील भाषेची! किंबहुना त्या भाषेमुळे माझे लक्ष या कवितेकडे गेले. 'भाषा-प्रतिमा-प्रतिकं' यांची नोंद आधी घेतल्या गेली आणि मग त्याचा आशय मनापर्यंत पोहचला. पाठोपाठ विचार आला की,"अर्धे अधिक इंग्रजी शब्द असणारी ही कविता 'मराठी कविता' आहे, असं म्हणता येईल का? केवळ हीच कविता नव्हे तर हल्ली सर्वच साहित्य प्रकारांमध्ये भाषेची अशी सरमिसळ झालेली दिसते. पूर्वीचे सगळे संकेत, निकष बदलले आहेत, असे चित्र दिसते. कधी पासून? नक्की वर्ष सांगता येत नाही पण सुरूवात संगणकाच्या शोधापासून झाली असावी. तसंच इंटरनेटचा वापर जसा वाढला तसा सर्वच क्षेत्रात बदल होत गेला, असेही म्हणता येईल.
साधारणतः पंचवीस वर्षापूर्वीचे चित्र वेगळे होते. मात्र आता वृत्तपत्र, रेडिओ, टि.व्ही., टेलीफोन यासर्व साधनांनी जग जोडले गेले आहे. इंटरनेट, वायफाय या मोबाईल क्रांतीनंतर माहितीचा प्रचंड साठा एका क्लिक सरशी उपलब्ध होऊ लागला. स्मार्टफोनने 'ग्लोबलायझेशनचं मिक्सर' जोरात फिरू लागलं. याचा परिणाम सर्व क्षेत्रात दिसतोय. साधनांची उपलब्धता वाढली. प्राधान्यक्रम बदलले. वागण्याची रीत बदलली. मानसिकता बदलली आणि नकळत विचार दिशा सुद्धा बदलू लागली. जुनी संस्कृती नव्या वेष्टनात बांधल्या जाऊ लागली. जे संस्कृतीचे तेच साहित्याचेही झाले. साहित्य प्रकार तेच आहेत पण अभिव्यक्तीची माध्यमे मात्र बदलली आहेत. म्हणून भाषासुध्दा आधुनिक झाली आहे.
साहित्य म्हणजे समाजमनाचा आरसा! जे समाजात घडते तेच साहित्यात प्रतिबिंबित होते आणि जे साहित्यात उमटते तेच समाजात अंगिकारले जाते. 'साहित्य म्हणजे अनुभवांचे संचित!' साहित्यिकाच्या अनुभवांचे संकलन हा साहित्याचा गाभा!....अशी पूर्वी समजूत होती.परंतु आता मात्र अनुभूतीपेक्षाही अभिव्यक्तीला महत्त्व दिल्या जाते. संशोधनापेक्षाही संकलनावर जास्त भर दिसतो. या 'नेट सेव्ही' होण्याचा प्रभाव व्यक्त होण्यावरही झालेला दिसतो.
गेल्या पंचवीस वर्षात, प्रादेशिक स्तरांवरही बरेच बदल स्विकारल्या गेले आहेत. पंचवीस वर्ष! म्हणजे जवळजवळ दोन तप! नेहमीप्रमाणे सुधारणेचे वारे प्रदेशांमध्ये यायला वेळ लागला पण एकदा आल्यावर अंगी भिनायला फारसा उशीर लागला नाही. आधी बदल झाला तो वृत्तपत्रांच्या जिल्हावार पुरवण्यांचा!या जिल्हा आवृत्तींमुळे गावोगावच्या लेखकांना, 'स्तंभलेखनाचे एक नवे दालन' उपलब्ध झाले. विशिष्ट शब्दमर्यादेत प्रसिद्ध होणा-या या लिखाणामुळे नवलेखकांना प्रोत्साहन मिळाले. परिणामी या पंचवीस वर्षात ललितलेख-कथा-कविता अमाप लिहिल्या गेली. काही दर्जेदार होती तर काही अगदीच सुमार! हे लेखन मासिके, नियतकालीके, अनियतकालिकातूनही छापल्या जाऊ लागले. या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाला पदरमोड करून ग्रंथ स्वरूपातही प्रकाशित करण्यात आले. काही पुरस्कार विजेते ठरलेत. काहींना वाचकप्रियता लाभली. अशाप्रकारे लेखकांची अभिव्यक्ती होत राहिली. ललित लेखक लिहिते राहिले. पण नाटक आणि कादंबरी या प्रकारांमध्ये, तुरळक अपवाद वगळता फार काही भरीव कामगिरी झालेली दिसत नाही. याचे एक कारण हेही असावे की, *'शब्दसंकोच'* हेच आजच्या काळाचं वैशिष्ट्य ठरत आहे. याला कारण समाज माध्यमांचा वाढता वापर! व्हाॅटस्अॅप, फेसबुक, व्टिटर, ई-बुक्स, ब्लॉगज् द्वारे तरूणाई व्यक्त होताना दिसते. या तरूणाईने भाषेच्या शुद्धतेपेक्षा वाचकांपर्यंत स्वतःचा मुद्दा पोचवणे अधिक महत्वाचे मानले आहे. या सगळ्यातून, या माध्यमांद्वारे स्वतःची अशी एक लिखित बोलभाषा तयार व्हायला लागली आहे. विश्लेषणापेक्षा सांकेतिकतेवर भर दिल्या जातो आहे. शब्दांच्या पलीकडील चिन्हांची भाषा तरूणपिढी वापरतेय. पूर्वीचा लिखाणाचा बाज बदललाय. लिखाण अधिक टोकदार सुद्धा झालं आहे. नेमकेपणानं व्यक्त होणं गरजेचं झालंय. वर्णनवैशिष्ट्याच्या पसा-यात न अडकता सरळ विषयाला हात घालण्याची, प्रहार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. याचे एक कारण हेही आहे की, आज वेळ कोणाच जवळ नाही. ना वाचकांजवळ, ना लेखकांजवळ!
असे जरी असले तरी अभिव्यक्ती थांबली नाही की कमी देखिल झाली नाही. उलट त्याला कल्पनेचे नवनवे धुमारे फुटू लागले आहेत.
एक तर 'मला काय वाटते?' हे सांगण्यासाठी स्वतःचे असे साधे सरळ नि सोपे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे...सोशल मिडीया! समाज माध्यम! त्यावर सामाजिक, सांस्कृतिक असंख्य विषय हाताळता येताहेत. आणि दुसरे म्हणजे आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय संस्कृतीचे बिंब-प्रतिबिंब प्रादेशिक लेखकांच्याही साहित्यात उमटू लागले आणि प्रदेशातील संस्काराचे, देशीपणाचे दाखले इतर भाषाभगिनीद्वारे जगभर पोहोचू लागले. भाषेचे भेद मिटले. माहिती मिळवायला, मिळालेली माहिती आपल्या पद्धतीने मांडायला तसंच नव्या शैलीतील ही मांडणी वाचायला उत्सुक असणारा वर्ग आता कोणताच भेद मानत नाही. साहित्याचे जागतिकीकरण कदाचित हेच असावे. मातीशी मातीची नाळ जोडून होणारे रोपण हेच असावे. शैलीचं नाविन्य घेऊन जे लिखाण झालं ते वाचकांना, अभ्यासकांना भावलं. पण जो या शैलीच्या गुंताळ्यात अडकला तो एखाद दुस-या कलाकृतीवरच थांबला. एक मात्र खरं की जो वेगळेपणासह सकस अनुभूती देतो तोच वाचकांच्या पसंतीस उतरतो. कारण मला काय वाचायचे आहे? ते मला कोण देऊ शकेल? हे शोधणारा, लाईक करणारा, फाॅलो करणारा वाचक आता निर्माण झाला आहे. ही *'टारगेट रीडरशीप'* लक्षात घेऊन जो लेखन प्रवास करेल तोच टिकेल. म्हणूनच उपमा, प्रतिमा आणि रूपकांची योजना करताना आधुनिक संदर्भांना संस्कृतीचा धागा ज्याला जोडता येतो तो लेखक...दखलपात्र लेखक होतो. ज्याच्या हातातून तो निसटला त्याचा प्रभाव थांबला, हे नक्की!
या दोन तपाच्या काळात आणखी जाणवलेली विशेषता म्हणजे, हल्लीच्या साहित्यात समाजाची संकरित रचना जाणवते. समाज स्थित्यंतरांचे दर्शन साहित्य प्रकारांमध्येही उमटते. हे नवे प्रवाह आहेत...जे अनवट मार्ग शोधताना समोरची वाट मोकळी करत चालले आहेत. या प्रवासात पुढलं वळण कोणतं असेल हे मात्र काळच ठरवणार आहे. सध्या दिसताहेत केवळ प्रवाह...वळणं आपल्याला शोधायची आहेत.
No comments:
Post a Comment