Wednesday, April 10, 2019

गेट टू गेदर

"हॅलो! नमस्कार .कशा  आहात?"दर दोन दिवसानी बोलणे होत  असले तरी,हा,नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न विचारलाच जातो. "मी मजेत. इन  फॅक्ट आज मी फार खुश आहे. परवा आमचं शालेय मैत्रिणींचे गेट टू गेदेर ठरलंय. तुम्हाला माहिती आहे माणिकताई,तब्बलब48 वर्षा नंतर आम्ही वर्ग मैत्रिणी भेटणार आहोत----" राधाच्या सासूबाईंच्या  आवाजातून त्यांची एक्साईटमेंट अक्षरशः उतू जात होती.  गेल्या काही वर्षात हे गेट टू गेदेर चं फॅड फारच वाढलंय नाही? शालेय जीवनातील, कॉलेज जीवनातील  मित्र मैत्रिणींचे ,एकाच ठिकाणी काम करअसलेल्या सह कऱ्यांचे,नातेवाईकांचे get-to- gether----थोडक्यात,हा प्रकार म्हणजे आपल्या परिचीत लोकांसोबत,आप्त मंडळी सोबत एन्जॉय करण्याचा,जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा एक सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही.

      मी जेव्हा केव्हाही ऐकते," आमच्या  दहावी च्या batch चं, आमच्या बारावीच्या batch चं ,आमच्या relatives चं get-to-gether  नुकतंच पार पडलं किंवा आम्ही   प्लॅन करतोय. खूप धमाल आली वा येणार आहे--" तेव्हा तेव्हा मनाला खूप खंत वाटत रहाते की  आपल्या दहावी किंवा बारावीच्या बॅच मेट्स नी कुणीच कसं   अरेंज केलं नाही आजपर्यंत हे गेट टू गेदेर? कुणालाच कसा पुढाकार घ्यावासा वाटला नाही? मी स्वतः फेस बुक वर आठवत असलेल्या मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. "अस्मिता" style पण  वापरून पाहिली, शोधा म्हणजे सापडेल म्हणत,पण छे: व्यर्थ. लग्ना नंतरची त्यांची आडनावं तरी माहीत  असायला हवीत ना? सम्पर्क च नाही ना काही. आणि त्या वेळी मोबाईल पण नव्हते पट्कन नंबर सेव्ह करायला.त्यामुळे एखादं दुसरा अपवाद वगळता काहीही हाती लागलं नाही. ( काहींच्या नावापुढे वेगवेगळी आडनावं जोडून पाहण्याचा वेडेपणा पण करून झाला.) 
     पण  विचारा अंती स्वतःलाच जाणवलं,समजा झालंच गेट टू गेदेर,(आताही)  तरी आपण त्यापैकी किती जणांना/जणींना ओळखू शकू?  किती जणींना भेटून आपल्याला मनापासून  आनंद होईल?  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा कॉलेज ला  असताना आपली जिवलग म्हणावी  अशी एक तरी मैत्रीण होती का?(मित्र? तोही जिवलग? नो चान्स😄) जिला इतकया वर्षानंतर पाहून,भेटून आपल्याला अगदी उचंबळून येईल? उत्तर अर्थातच नकारार्थी मिळालं. 

    तशा लहानपणी गल्लीत भरपूर मैत्रिणी होत्या,पण त्या फक्त भातुकली आणि लपंडाव खेळण्यापूरता. त्या काळात नि त्या वयात 'जीव लावणं' हा प्रकार मला तरी जमला नसावा(t. V. वर जीव रंगला,जीव झला एडा पिसा नव्हते दाखवत. एकुलती एक रामायण,तीही शेजारी जाऊन बघावी लागे)  शाळेतही सगळ्यांशी तसे सबंध चांगले होते,तरीही जवळची म्हणावी,मनातलं हितगुज सांगावं अशी एकही नव्हती.किवा मी कुणाला जवळची वाटली नसावी. असो. तसं म्हणायला  कॉलेज मध्ये आम्ही चार जणी सोबत जायचो. सम उंचीच्या,सम  राहणीमान असलेल्या नि 'काकूबाई छाप'  --- अशा  आम्ही 'चार चौघी' . पैकी,दोघींनी सेकंड इयर पासून सायकलवर जाणे पसन्त केले. (मला सायकल पण येत नव्हती 😌)  साडी गुंडाळून,अंगभर पदर लपेटून तेव्हा त्या कशा सायकल स्वारी करत होत्या,देवच जाणे. उरलो  आम्ही दोघी. , मी आणि कुसुम. शुभांगी न मंगल सायकलने. कुसुम कुलकर्णी सोबत  काही वर्ष संपर्क राहिला,तिच्या लग्ना नंतरही. नन्तर तीही विस्मरणात गेली.मंगल चंद्रा त्रे चे लग्नांनन्तर कुठल्याशा आजाराने  निधन झाल्याचे समजले. अर्थात,फार वाईट वाटले. खूप साधी, सरळ मुलगी होती. रहाता राहिली,शुभांगी . ही शुभांगी तशी खूप हुशार,पण फारच लहरी,मूडी. सतत 2 वर्ष  आम्ही एक बेंच शेयर केला.  भटकयला सोबत जायचो. एकमेकींच्या घरी जाणं येणं होतं. सुट्टीत खेळायला,जत्रेत मज्जा करायला----- पण कधी कशाने बिनसे ल --- तू कशी गं जुळवून घेतेस तिच्या बरोबर  असं बाकीच्या मुली नेहमी म्हणायच्या.
निकालाच्या वेळी मला तिच्यापेक्षा 2 मार्क्स जरी जास्त मिळाले किंवा टीचर ने माझं कौतुक केलं  तर ही बया अक्षरशः तोंड फिरवून(फुगवून) बसणार. दिवसभर बोलणारच नाही माझ्याशी. मी मात्रं  तिला जास्त मार्क्स मिळाले की तोंड भरून कौतुक करणार. कॉलेज ला येताना एखादेवेळी सैलसर वेणी घातली(एरवी दोन वेण्या,त्याही घट्ट)  ,जरा बऱ्यापैकी साडी नेसली(नि हो,  आम्ही तरी साड्या च नेसायचो) ,तर ह्या मॅडम हुप्प करून फुगून च बसणार.🤔मग 2 दिवस तरी माझ्याशी कट्टी. आता हिच्याशी गट्टी फु करायची तर गबाळ अवतारात,झाम्बरलेल्या केसांनी कॉलेज ला यावे कि काय असंही मनात येऊन जायचं. नंतर मी LIC त लागले तिथेही ह्या mrs. शुभांगी बनून काही काळ छळत राहिल्या. 

    LIC त नोकरी लागेपर्यंत मी इतकी  लाजाळू न अबोल होते की मोठया बहिणीचं लग्न झालं तेव्हा जिजूंशी बोलायलाही संकोच वाटायचा. थोडाफार भिडस्त न कुणाच्याही वाटेला न जाण्याचा स्वभाव होता म्हणजे त्यावेळी तरी मी एक गुणी मुलगी होते😛😄. कॉलेज च्या निवडणुकांच्या वेळी तर मुलं मतं मागायला येताना दिसली रे दिसली की मी  आमच्या घराच्या धाब्यावर लपून बसत असे. आम्ही ज्या गल्लीत रहायचो,तिथले वातावरण,अमळनेर सारखे तालुक्यचे गाव,मोठया भावाचा आदरयुक्त दरारा, ह्या सगळ्याचा एकंदरीत परिणाम  असणार. असो. 
           पण ह्या सगळ्या विचारांसोबत अचानक असाही विचार मनात चमकून गेला,अरेच्चा,खंत कसली नि कशाला करायची? आता ह्या घडीला आपण मैत्रिणींच्या बाबतीत किती श्रीमंत आहोत. मंत्रिणींचा केवढा तरी मोठ्ठा गोतावळा आहे आपल्यापाशी,त्या देखील सगळ्या अगदी गोड न छान. त्यातील काही जिवलग देखील झाल्या आहेतच.  " देव  आपल्याला नातेवाईक देतो,पण मित्र निवडण्याची मुभा आहे ही देवाची कृपा"  असे ऑस्कर वाईल्ड चे एक मिश्किल पण सत्य वचन आहे. वयाच्या चाळीशी नंतर मिळालेला मैत्री चा अमूल्य ठेवा काळजीपूर्वक जपून ठेवायला हवा.  एका प्रसिद्ध मराठी वाहिनीवरील एका मालिकेत एक  छान वाक्य ऐका यला मिळतं नेहमी,'मित्र मैत्रिणी ह्या आपल्या एक्सटेंडेड फमिली असतात."  अगदी खरं आहे. सुखदुःखात सहभागी होणाऱ्या,मनातलं सांगायला हक्काची जागा देणाऱ्या,कुठल्याही लाभाची,परत फेडीची अपेक्षा न ठेवता,निर्व्याज प्रेम करणाऱ्या मैत्रिणी लाभणे,ही सगळ्यात मोठी श्रीमंती. आणि गेट टू गेदर चं काय एवढं वाईट वाटून घ्यायचं?  जेव्हा पाहिजे तेव्हा आपण  आपल्या मैत्रिणींना भेटू शकत असू तर मग त्या फॉर्मल गेट टू गेदर ची वेगळी गरजच काय? भेटल्यावर मनापासून  आनंद घेत असू तर वेगळया प्लॅंनिंग ची गरजच काय?   जे मिळालं नाही त्याची खंत करत बसण्यापेक्षा जे वाट्याला आलंय त्याचं मोल जाणून तेच जपणं योग्य नाही का?  ज्यांचा काही संपर्कच नाही,ज्यांच्या विषयी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ,एखादी हळुवार भावना जाणवत नाही,त्यांच्या भेटीची आशा, तीही एखाद्या फॉर्मल गेट टू गेदर च्या रूपाने ,करण्यापेक्षा,ज्या आपल्या जवळ  आहेत,,ज्यांच्या सहवासात आपल्याला खराखुरा आनंद मिळतो,त्या मैत्रिणी जेव्हा जेव्हा भेटतात,तेच खरे गेट टू गेदर,नाही का?
       कसं  आहे ना, शेवटी,आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याच मनात दडलेली असतात.  मनाची ग्वाही सगळ्यात महत्त्वाची.
परवाच वाचलेल्या ओळी  आठवताहेत,
   "प्रत्यक्ष सहवासाशिवाय देखील मी  आहे ना, हे ठाम पणे जाणवून देणारी भावना म्हणजे मैत्र" . ,

No comments:

Post a Comment