कुठल्या बाबांबद्दल सांगतेय ही आता? असं मनात आलं नं? मैत्रिणींनो,हे बाबा वेगळेच आहेत.
गंगटोकला पोचल्यावर दुसर्याच दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही बाबा मंदिरासाठी निघालो. भारत -चीन बाॅर्डर नथुला पासजवळ हे मंदिर आहे.
14450 ft . उंचीवरच्या मंदिरापर्यंत पोचतानाचा प्रवास कसा वर्णू? आधी खूप excitement, निसर्गाची अगम्य रुपे डोळ्यात साठवत, आश्चर्याने अनेकदा आ वासत,ढगांमधून जाताना सुखावत, मन तृप्त- तृप्त होत होते.पण जसजसे वर जाऊ लागलो, तशी भीती ही भावनाच फक्त राहिली. मध्ये एका हाॅटेलमध्ये भाड्याने गरम कपडे घेऊन अंगावर चढवले व पुढे कूच केली. सोबत पाॅपकाॅर्न आणि च्यूइंगगमची पाकिटे ठेवणे must!
(High altitude मुळे मला त्रास झाला, तेव्हा त्याचे महत्व कळले. )
जाताना वाटेत Tsongmo lake लागतो. लेक म्हटलं, की बोटिंग आठवतं ना? पण इथे गोठलेला लेक, त्यात मधेमधे पाण्याचे डिझाईन, सर्व बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर असे दृष्य! तिथे याक-राइड,रोप -वे पण आहे. पण आम्ही त्याच्या मोहात न पडता आधी बाबा मंदिर पहायचे ठरवले.
तिथे पोहोचलो, तर snow fall सुरू झाला होता. अशा गोष्टींचे
वर्णन करु नये, अनुभवच घ्यावा! अहाहा! काय आणि किती सांगू तुम्हाला?
बरं, आता मंदिराविषयी .............
बाबा हरभजनसिंग --पंजाब रेजिमेंटचे भारतीय जवान. (30 ऑगस्ट 1946--4 ऑक्टोबरऑ1968)
सैन्याचे सामान घोड्यावर बसून नेताना, नदी पार करीत असताना, ते वाहून गेले. 2 दिवस शोध घेतला, पण प्रेत काही सापडले नाही. एका सहकारी सैनिकाच्या स्वप्नात येऊन बाबांनी ती जागा सांगितली. मग पुढील सोपस्कार झाले.
त्यांच्या मृत्यूनंतर तेथील सैनिकांना वेगवेगळे अनुभव येऊ लागले आणि त्यांचा आत्मा आपल्या जवानांचे रक्षण करतो ही भावना दृढ होऊ लागली. म्हणून मग त्यांचे स्मारक (मंदिर ) बांधायचे ठरले. एका खोलीत त्यांचा पुतळा आहे, तर दुसऱ्या खोलीत त्यांच्या वस्तू, फोटो, भारतीय सैन्याचा युनिफॉर्म, शूज इतर सामान.
तिथे असा विश्वास आहे की जो भारतीय सैनिक स्वच्छ कारभार, शिस्त पाळत नाही, त्याला बाबांकडून प्रसाद मिळतो. तसेच खराब हवामानामुळे जेव्हाजेव्हा भारतीय जवानांवर आपत्ती ओढवते,तेव्हातेव्हा बाबा त्यांची मदत करतात, मार्ग दाखवितात.
विशेष सांगायचे म्हणजे, भारत सरकारही त्यांचा पूर्ण पगार नेमाने त्यांच्या घरी पाठवते, त्यांच्या rank प्रमाणे त्यांना प्रमोशनही दिले जाते. दरवर्षी 1-2 महिने सुट्टी म्हणून ते घरी जातात. (म्हणजे त्यांच्या वस्तू सन्मानाने घरी पाठविल्या जातात ) तेव्हा सिक्कीम नथुला पास एरियात high alert जाहीर होतो. (बाबा नसतात ना सुरक्षेसाठी)
असे म्हणतात की चीनी सैनिकांकडून काही आक्षेपार्ह हालचाल झाली, तर बाबा ती खबर आधीच भारतीय सेनेला देतात. आपण विश्वास ठेवा अगर ठेऊ नका, पण खुद्द चीनी सैनिक यावर विश्वास ठेवतात कारण चीनी सैनिकांची कोणतीही हालचाल जर भारतीय जवानांना पसंत पडली नाही, तर बाबा आधीच चीनींना त्याची कल्पना देतात, म्हणजे आपसात बातचीत होऊन त्या समस्येवर तोडगा निघेल. आणि म्हणूनच भारत -चीन मध्ये होणाऱ्या प्रत्येक flag मिटींग मध्ये हरभजनसिंगांच्या नावाने एक रिकामी खुर्ची ठेवली जाते म्हणजे ते मिटींग अटेंड करु शकतील!
फक्त पुढेपुढे लोकांनी त्याला अंधश्रद्धेकडे न्यायला सुरुवात केली, भारतीय सेनेला ते मंजूर नसते कधीच! म्हणून मग त्यांच्या वस्तू घरी पाठविणे आता बंद झालेय,तरी तिथले पाणी 21 दिवस बाटलीत भरुन, मांसाहार वर्ज्य केला मग ते पाणी प्राशन केले तर सगळे रोग बरे होतात इ. मानणारे लोक आहेतच. असो.
एक सांगायचं राहिलं, तिथे इतके अरुंद रस्ते आहेत की जीव मुठीत धरून बसणे चा अर्थ कळतो. पण खूप उंचीवर गेल्यावर छान रुंद रस्ते दिसले, तेव्हा Driver ने सांगितले, मोदीजी आनेके बाद अपने जवानोंके लिए ये रास्ते बनाए गए! सिक्कीम व दार्जिलिंग मध्ये मोदींविषयी खूप आदर दिसून आला.असो.
तिथून निघताना मंदिराजवळ एक भारतीय सैनिक उभा होता. लोकं सेल्फीसाठी त्याला विनवत होते. पण त्याने सक्त मना केलं.मी त्याच्या जवळ गेले आणि म्हटले, "आतापर्यंत फक्त पेपर मध्ये वाचत होतो, टीव्हीवर पहात होतो की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही राहता,सदैव देशाचाच विचार करता. पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर भारतीय सेनेबददलचा आदर खूप वाढला. "A big salute to Indian army "बोलना आपके टीम को!"
तो शांतपणे म्हणाला, "thanks! आपकी रक्षा करना हमारा फर्ज है!"
No comments:
Post a Comment