Sunday, April 14, 2019

देहदान

................आणि त्या दिवशी फारच भांबावुन गेले ,इतके अचानक घडले की, आता काय  करायच? म्हणून प्रश्न होता,डोक्यातले कोलाहल शांत केले जरा स्तब्ध राहून शांत विचार केला आणि सकाळी सकाळी ७वाजता डॉ.मैत्रिणीला फोन केला.मनात संकोच होता.अशा अवेळी याआधी एकतर मी तिला कधीच फोन केला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची नि तिच्या लेकीची सकाळी शाळेत जाण्याची गडबड असेल हे माहिती होतं .तरीपण मनात ठरवल आणि फोन केलाच ....बोलताच येईना!......रडूमिश्रीत बोलणं तिला कळतही नव्हतं पण तिला बहुदा संदर्भ लक्षात आला! ......अर्चना पहिले शांत हो ! असे म्हणत तिने त्या तेवढ्या घाईच्या वेळात मला आवश्य त्या सुचना, फोन नं दिले आणि परत अडचण आल्यास फोनवर बोलू शकतेस म्हणाली .तिच्याशी बोलून खरच हायस वाटलं .गरजेला पटकन जेव्हा मदत मिळते ना त्यात प्रत्यक्षपरमेश्वरच वास करतो असं वाटत मला नेहमीच ! ......दीर्घ  श्वास  घेतला अश्रुंना आत ढकललं नी पटापट फोनाफोनी सुरु केली कारण वेळ कमी  होता. बाबांनी आधीच देहदानाची तयारी करुन ठेवली होती.पण आता पुढे काय आणि कस कस करायच याची घरी वास्तपुस्त सुरु होती.   

बाबांना मध्यरात्री अचानकच अस्वस्थता जाणवु लागली.आम्ही उभयता त्यांना दवाखान्यात    नेण्यासाठी कपडे चढवत असतानाच एकाएकी पायातले बळ गेले वाचा गेली,नजर गेली. साक्षात यमराज पुढ्यात पण हृदयाचे  ठोके चालू होते   .त्यांना श्वास घेतांना श्रम झाले असतील म्हणून झोपले असावेत असे आम्ही समजलो आणि ते झोपेतच पहाटे गेले.............!               मृत्युंतर तीनतासाच्या आत देह सरकारी इस्पितळात न्यावा लागणार होता. आणि त्यानंतर पुढे आणखी तीन तास ते शवागरात ठेवणार होते .सगळी फोनाफोनी होत नाही तोच गावातले ओळखीचे,आजुबाजुचे  जमले नि ठीक नऊच्या ठोक्याला देह त्यांच्या स्वाधिन केला.आंघोळ नाही,हारतुरे नाही इतकच काय त्यांच्याजवळ बसायलासुद्धा मला वेळ झाला नाही. आणि ते रडणही आल्या आतच राहील. ..............!

देहदान!........म्हंटल्यावर तसाही सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच होता.कारण जिवंतपणी कितीही ठरवल तरी ते तडीस जाण तस कठीणच! .........पण त्यांचा निर्धारच असल्याने मीपण निश्चयापासुन ढळले नाही. .........!पण परत पुन्हा प्रश्नावली! आता पुढे कसं करायच म्हणजे दिवसवार  वगैरे......आल्या गेल्यांची मते घेताली,ब्राह्मण,भटजी तसेच जुने जाणते आपआपली मते ठासुन सांगत होती.सगळ्यांच नीट ऐकुनही घेतलं आपण काय करायच या विचारात आम्ही दोघेही पडलो .कुठलाही धाडसी निर्णय अंगवळणी पडायला पचायला वेळच लागतो तसेच आमच्याही मनाची द्विधामनस्थिती होती.कारण आजपर्यंत माहेरी आणि सासरी सगळच  पारंपारिक पद्धतीचे जरासे कर्मठच वातावरण त्यामुळे निर्णय घेताना होणारी घालमेल. नातेवाईकांची चाललेली कुजबुज या सगळ्यातून निर्णयाप्रत पोहचलो नि सगळ्याच गोष्टिंना फाटा दिला.हा देह मरणानंतरही उपयोगी पडावा म्हणूनच देहदान "! त्याची पुन्हा पुन्हा आसक्ती कशाला!..........हाच त्यांचा भाव होता.पण अजुनही मनात येतं मृत्यु किती अकस्मात येतो नि सजीवचे निर्जीव देह पाहुन जीवनाच अंतिम सत्य सांगून जातं!...

No comments:

Post a Comment