Wednesday, December 15, 2021

Happiness is well organized!

 


Happiness is well organized... ! चक्रावलात नं?  तुम्ही म्हणाल आनंद हा असा संघटित करून किंवा आयोजित करून मिळण्याची गोष्ट आहे का? हो  अहो आहे तर! आश्चर्य वाटलं नं? 

शाळा, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना संघटित करून आपण असे अनुभव बर्‍याचदा घेतो. रियुनियन असे हल्लीचे नाव. किंवा एखादा कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करून आनंदाचा असा अनुभव आपण सगळेच घेत असतो. 
 पण रोजच्या जगण्यातला तोच तोचपणा , कंटाळा घालवायचा असेल ना तर असा well organized आनंद शोधता येतो, सापडतो, कळतो आणि खरोखरच आपण प्रफुल्लित होऊ शकतो. फक्त तशी नजर, तशी मनाची तयारी मात्र हवी हं! 

मला  असा अनुभव नुकताच आला. साध्याश्या उदाहरणादाखल सांगते, स्वयंपाकघरात सर्वात महत्वाचा आणि अगदी काॅमन असा प्रकार म्हणजे आपल्या सर्वांचा मसाल्याचा डबा! तो स्वच्छ धुवून त्यात आपले नेहमीचेच स्वयंपाकाला लागणारे जिन्नस भरले की काय आनंद होतो तो तुम्ही कधी अनुभवला आहे का? 'रोजचा' स्वयंपाक करायला काही दिवस नवा हुरूप देऊन जातो. इतकी वर्ष झालीत मसाल्याचा डबा भरते आहे पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला तो बहिणीच्या पोस्टमुळे. बहिणीने गृपवर असा मसाल्याच्या डब्याचा फोटो टाकला , कॅप्शन लिहले happiness is well organized... ,आणि सगळ्या बहिणींना आपआपल्या मसाल्याच्या डब्याचा फोटो टाका असा आग्रह करू लागली. मग काय त्यातल्या ज्यांना शक्य झाले त्यांनी टाकले फोटो. खरेतर त्यात काय एवढे विशेष  असणार नेहमीचेच जिरे, मोहरी, हळद, तिखट...पण नाही ,प्रत्येकीची डबा भरायची पध्दत वेगळी. मधला डबा  वेगवेगळया जिन्नसांचा होता. आपआपल्या चवीनुसार. एकीच्या डब्यात खडे मसाले होते. तेजपान, दालचिनी, इलायची, मिरे, लवंग...असे काही तर एकीच्या मधल्या डब्यात सुक्या लाल मिरच्या, एकीच्या मधल्या डब्यात हिंगाची छोटी डबी, मेथी दाणा असे काही. खरे तर याच सगळ्या जिन्नसांपासून सगळयाजणी पदार्थ बनवतात पण प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी. असे कसे घडत असेल? हाताची चव त्या पदार्थात खरच उतरते की काय? यामागचे कारण  नीटसे कळत नाही एवढे मात्र नक्की. अगदी आपल्या प्रत्येकीच्या बोटांच्या ठशासारखीच प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी. Happiness is the "secret sauce" that can help us be and do our best. 

फ्रिज ही अशीच एक वस्तू. प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असली की शोधाशोध न करता हवी ती वस्तू, पदार्थ चटकन सापडते. पूर्वी फ्रिज नव्हते पण आजीचे दूधाचे,दह्याचे, तुपाचे जाळी असलेले कपाटच वेगळे असायचे. आईच्या पिढीपासून फ्रिज आले तिने ते well organized केले. कुठल्याही विद्यापीठातून डिग्री न घेता  आजी, आईने हे organization स्वतःच्या अनुभवातून शिकत शिकत आपल्या पिढीपर्यंत विनासायास पोहचवले. ओघानेच त्यातला आनंदही आपल्याला मिळत गेला. इथून पुढे काय होईल सांगता येत नाही. मूळात या well organized मध्ये आनंद असतो हे जरी समजले तरी खूप.

असाच अनुभव आला शू रॅकचा. फ्लॅटच्या बाहेर अनेक चपला, बुटांचे जोड ठेवलेले होते. अनेक दिवस. भलेही ते ओळीने मांडून असत  तरी पण पसरलेलेच. तिथली जागा झाडणे, पुसणे म्हणजे ते सर्व आत ठेवा पुसून झाले की पुन्हा व्यवस्थित मांडून ठेवा. किती वैताग. त्यात कोणी वेडेवाकडे काढून टाकणार. चप्पल बुटांचे पण हल्ली किती प्रकार...माॅर्निंग वाॅकचा वेगळा बूट, बाहेर जायच्या वेगळ्या चपला, सँडल,घरातल्या वेगळया. अबब काय हे प्रकार खेटरांचे. ते आवरता आवरता नाकीनऊ येतात. पण असे ते अचानक एक दिवस साध्याश्या शू रॅक मध्ये विराजमान झाले आणि एकदम फ्रेश वाटायला लागले. प्रत्येकाचे एक एक सेक्शन झाले आणि प्रसंगानुरूप घालण्याचे चप्पल जोडे सुखाने रॅकमधे नांदू लागले. खालची जागा सहज स्वच्छ करता येते. Well organized मधला आनंद सहजी मिळू लागला. गोष्ट छोटीशीच असते पण त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा आणि कायमस्वरूपी असतो. इतक्या दिवसात इतकी छोटीशी गोष्ट लक्षात कशी काय आली नाही याचेच आश्चर्य वाटत राहते. विनाकारण त्रास, गैरसोय सहन करत होतो असे त्या शू रॅककडे पाहून वाटत होते. 

अशा सर्वच जागा असतात ज्या नीट आवरून ठेवल्या की कसे फ्रेश वाटते. पेपर, मुलांचे पसरलेले वह्या पुस्तक, कपडे...अरे देवा यादी न संपणारी आहे...हे सर्व करायला दिवाळी किंवा सणवार कशाला हवे ?हा आनंद, हा freshness नेहमीच अनुभवता येईल.
आनंदाचे प्रकार अनेक आहेत. निसर्ग निर्मित, मानवनिर्मित,  प्रासंगिक,  चिरकाल टिकणारे, काही क्षणभर मिळणारे...असे अनेक. तो क्षण आपल्याला पकडता आला की जमले...स्वतःला आनंदी, प्रवाही ठेवण्यासाठी गाणे/संगीत, बागकाम, लिखाण, वाचन,एखादा खेळ ,व्यायाम असे काहीतरी. जी क्रिया आपण अगदी मनापासून करतो त्यातून आपल्याला आनंदाचा अनुभव येतोच येतो. तसाच आनंद हा नीटनेटके काम करण्यातून पण मिळू शकतो. मनात कृतज्ञता आणि समाधान असले की छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपल्याला सापडतो. So stay happy, healthy and enjoy your life . 

अंजली

Monday, December 13, 2021

पुन्हा विद्यार्थी होताना!..

 हे काय नवीनच!.....असं कदाचित वाटेल तुम्हाला पण एखादी गोष्ट मनात बराच वेळ घोळत असते पण ती साकार व्हायला योग्य वेळ यावी लागते .....!आणि माझ्या बाबातीत नेमकं तेच झालं. .

       Lockdown काळ सुरवातीला जरी बरा वाटला तरी हळू हळू बोअर व्हायला सुरुवात झाली होती .मनात प्रचंड भीती असल्याने बाहेरही कामापुरतच जाणं व्हायचं .  एकदाचा पहिला Lockdown  संपला आणि जरा वातावरण सुरळीत व्हायला सुरुवात झाली .अशातच एके दिवशी मी व स्वाती सहज गप्पा मारत असताना ओघातच M.A. करायच आहे गं अस बोलले अन् बस्!.... स्वाती म्हणजे काय, ती तर उत्साहाचा झराच आहे . म्हणते कशी चल उद्या ये माझ्या collegeला तिथून S.A.ला जाऊ व ॲडमिशन घेऊन टाकू .....!....मी तर बघतच राहीली .मनात विचार आला अगं मुली जानेवारी महिना सुरु आहे. मार्चमध्ये परीक्षाआहे आता इतक्या वेळेवर कशी ॲडमिशन होणार मुख्य म्हणजे  इतक्या कमी वेळात अभ्यास कसा होणार....! पण हे सगळं स्वगत मनात ठेवूनच शहाण्यासारख मी तिच्या सुचनांच पालन केलं आणि ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी माझी ॲडमिशन अगदी तिच्याच मदतीने झाली सुद्धा !.....एकदम झटपट!.... त्यानंतर लगेच चिवचिवबाजारातून हातोहात पुस्तकेपण घेऊन दिली  

हसु नका पण आज तिच्यासोबत अगदी लहान झाल्यासारखं वाटत होतं. तीस बत्तीस वर्षानंतर पुन्हा एकदा अप्रुप वाटत होत ....पण मनातुन दडपणही आलं होतं. मनात सारख्या प्रश्नांच्या फेरी झडत होत्या .आपल्याला विषय समजेल कां? ........पहिलेसारखी आपल्याला स्मरणशक्ती साथ देईल कां? ......आणि मुख्य म्हणजे तीन तासाचा पेपर आपण लिहू शकू कां?....असे सगळे भयगंड मनात असतानाच पुन्हा स्वाती जणू काही मनकवडी असल्यासारखी .अर्चना काही काळजी करु नको आपण जी अभ्यासक्रमाला पुस्तके दिली आहेत ती मस्त मिळून वाचू व चर्चा करु .तुझ्या निमित्ताने मलाही माझ्या अभ्यासाचा सराव होईल .ठरल तर मग done ! ....असं म्हणून मी आपली घरी आणलेल्या दिनेशचंद्रांच्या गाइड वाचायला सुरुवात केली. अरे देवा !....वाचत तर होती............. पण काही विषयांची ती पुस्तकी भाषा त्यातील शास्त्रीय  विधानं ओssकी ठोssss कळत नव्हती. पुन्हा स्वातीची भेट घेण- बोलण हे सुरु झालं पण त्यातुन नवीनच गोष्ट घडली ती म्हणजे pkvत जाणे मस्त फेरफटका मारणे आणि एखाद्या निवांत ठिकाणी बसुन मी जे वाचलेल असेल त्यावर बोलणे,विषय समजवुन घेणे व चर्चा करणे. झाला अभ्यासाचा श्रीगणेशा झाला .मी व स्वाती तिच्या सोयीनुसार pkvची रपेट ठारवु लागलो . कधी pkv तर कधी तीचेच college अशा भेटीगाठी वाढल्या .अर्थात अभ्यासाठीच .पण कामं कधीच सरळ होत नसतात हे लक्षात आलं आणि मार्चची परिक्षा कधी एप्रिल ,कधी मे ,तरकधी जुन अशी लांबण लावत एकदाची जुनच्या टप्प्यात येऊन थडकली मधल्या काळात परीक्षालांबणीमुळे अभ्यास थंडावला होता तारीख कळताच पुन्हा पोटात गोळा आला आणि परत कंबर कसली  ही सगळी कोरोनाचीच कृपा होती .ह्या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणातुन जाताना परत विद्यार्थी म्हणून मनात आले की ,आपलं ठीक आहे आपलं शिक्षण हे काही करिअरसाठी नाही तर केवळ हौसेसाठी आहे पण जी मुल भविष्य घाडविण्यासाठी या परीक्षांना बसली आहेत त्यांचा जीव किती टांगणीला असेल! ......त्यात नवीनच प्रकरण म्हणजे आमच्या online वर्गाला सुरुवात झाली. हा मला परत एक नवा अनुभव मिळणार होता ह्या माझ्या नव्या विद्यार्थीदशेतला........! मनात खुप स्वप्न रंगवण सुरु होते .आपल्याला प्रत्यक्ष प्रा.कडून विषय कळेल आपण किती वर्षांनी हा आनंद घेऊ छान विषयानुरुप माहितीचा खजिना आपल्या झोळीत पडेल. पण कसच काय नि कसच काय जणू फुगवलेल्या फुग्याची पिन टोचून हवा निघावी तस माझं नेमकं झालं. 
वाङमय पारंगतच्या प्राध्यापिका ,आपण मराठी वाडमयाचे विद्यार्थी आहात अस जेव्हा म्हणू लागल्या तेव्हा अख्खी पृथ्वी गरगर फिरु लागली.हे धरणीमाते पोटात घे गं आई ! ............असं झालं

असो ,  आता online वर्ग आणि त्यातल्या गमतीजमती म्हणजे फक्तच उपस्थिती दाखवून मस्त झोप काढणे किंवा म्युटवर राहून घरातील कामे करणे इ.............!अशातर्हेच्या अभ्यासाला काय ती गती असणार ,पण माझा माझा अभ्यास  मी सुरुच ठेवला आणि नाही हो करता करता एकदाची परीक्षेची तारीख जवळ येऊन ठेपली. परीक्षा म्हंटल की  पोटात गोळा येणारच त्यातुन ही online म्हणजे perfect वेळेला enterहोण वेळेच गणित सांभाळून बरोबर वेळ संपताच पेपर सबमिट करणं त्याचा पुन्हा screeshot काढणं ह्या  सगळ्या  गोष्टी स्वातीच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या .हे सगळे द्राविडीप्राणायाम  करुन सुद्धा नेमकी माशी शिंकलीच .!......एक दिवस दुपारी चार वाजता अचानक फोन खणखणला आणि तुम्ही दोन तासात असायनमेंट सबमिट करा !.............झालं दरदरुन घाम फुटलेली मी उद्या अकरापर्यंत  दिले तर चालेलकां? म्हणून विचारले तर हिरवी झेंडी मिळाली .हुssssश्श करत पाच पानाचे असायनमेंट  लिहायला बसले  एकाबैठकीत पूर्ण केले व दुसर्या दिवशी अगदी सांगितल्या वेळेत दिले. पण तत्पूर्वी सरांना मी पेपर सबमिटचा screeshotही दाखवला पण ते मला एखाद्या शाळेतल्या विद्यार्थीनी सारखे खडसावत होते. मनात म्हंटल गप्प बसा आता ........उखळात मुंडक घातल आहे नं मग ते ठेचणारच!  अन् गपगुमान घरी आले अन् निदान नापासचा रिझल्ट लागणार नाही या खुशीत दुपारची मस्त झोप काढली .आता विद्यार्थी म्हंटले की झोपेच समीकरण ठरलेलच!......... हो की नाही............!.!!

Monday, November 15, 2021

बालपण दे गा देवा

 


एका शाळेच्या बालक दिनाच्या कार्यक्रमातील ही घटना मला बरंच काही शिकवून गेली. सतत गप्पा मारणाऱ्या आणि आपल्या बांगडीशी ती हातातून बाहेर काढून खेळणाऱ्या एका मुलीला शिक्षिकेने शांत बसायला सांगितल्यावरही तिने आपला चाळा सुरूच ठेवला. मग  शिक्षिकेने तिच्या हातातील बांगडी काढून स्वतःजवळ ठेवली. कार्यक्रम संपल्यावर त्या मुलीने माफी मागून बांगडी परत मागितली आणि आज बालक दिन आहे तर आज तुम्ही मला शिक्षा न करता क्षमा करायला हवे असे सांगितले. त्यावर शिक्षिकेने दिलेले उत्तर मार्मिक होते .त्या मुलीला उद्देशून म्हणाल्या- बालक दिनाच्या निमित्ताने क्षमा करावी. मात्र याच निमित्ताने का होईना तुम्ही बालकां सारखे राहायला हवे ना? केवळ आजच नाही तर सर्वच दिवस बालकाची निरागसता असते का तुमच्यात? तुम्ही असे निरागस रहाल तर शंभर वेळा तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला माफ करण्यात येईल.

   खरंच निरागसता लहान मुलांमध्ये किती बघायला  मिळते हा प्रश्नच आहे. कार्बाईडच्या वापराने वेळेआधी पिकवलेल्या फळां प्रमाणे आजची बालके घाईने मोठी केली जात आहेत .शारीरिक वाढीचे टप्पे वेगाने गाठण्याचे प्रमाण असे आहे की बसती झालेली बालके रांगण्याची पायरी चुकवून सरळ उभी राहायला लागलेली आहेत. मग मानसिक वाढीचे टप्पे ही वेग -अतिवेग धरू लागले आहेत. वयानुसार भाव- विभाव दाखवणारी बालके, लहान मुले शोधावी लागतात. बहुतेक मुलांना माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी शिकवण कळत-नकळत मिळते आहे. आपली मूठ झाकून दुसऱ्याच्या ओंजळीतले हिसकावून घेणे हे करता येणारी मुलं आजच्या जगात "फिट" आहे म्हणून त्याची पाठ थोपटली जाते.
   सदगुणांना धाब्यावर बसवून षड्रिपुना  आपले दोस्त बनवले जात आहे. दया-क्षमा-शांती ही केवळ स्त्रियांची नावे म्हणूनच माहिती आहेत का असा प्रश्न पडतो .मत्सर मात्र ठासून भरलेला दिसतोय .त्याच्याकडे तेवढे माझ्याकडे एवढेच ?असा असमाधानी सूर कायमच मुलांमध्ये दिसतो. कितीही मिळाले तरी इतरांकडे पाहून त्यावर विरजण पडते आहे .त्यातून मद, उन्मत्त पिढी तयार होते आहे .मला मिळायला हवे, इतरांशी काय करायचे ?सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ बघितला .इमारतीमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माणसे भरल्याने ती थांबते. अस्वस्थपणे ती सुरू होण्याची , वर चढण्याची वाट बघत प्रत्येकच व्यक्ती इतरांकडे अपेक्षेने बघते .मात्र स्वतः भार कमी करण्याचा विचार त्यातील कुणालाच येत नाही .अखेर एक कुबडयांच्या आधारे उभी असलेली मुलगी तिथून बाहेर पडते आणि लिफ्ट सुरू होताना बघते. निरागसता न जोपासलेली लहान पिढी  मोठी झाल्यावर अशी उन्मत्त, भावशून्य झाली तर त्यात काय नवल?
  लोभ हव्यास वाढवायला समजुतीचे बीज न पेरले जाणेच कारणीभूत असते ना? " ब्लॅक होल" नावाचा एक लघुपट मध्यंतरी बघितला. एका कागदाच्या मध्यभागी जादुई काळा गोल असतो त्यातून पलीकडच्या वस्तू पर्यंत आरपार पोहोचता येते हे जेव्हा एका व्यक्तीला कळते तेव्हा तो आधी बंद फ्रीजमधले खाद्यपदार्थ हात आरपार घालून काढतो आणि खातो मग त्याच्या वापराने तिजोरीतील धन काढण्याचा मोह त्याला आवरता येत नाही आणखीन आत हात घालून सर्व धन बाहेर काढता काढता तो कधी आत डोकावतो आणि आतच गडप होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. 
  आपल्या प्रत्येकातील खरा बालक जेव्हा सक्रिय राहील तेव्हाच संपूर्ण मानवजातीचे हित साधले जाईल. यानिमित्ताने ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांच्या एकमेकांशी घडलेल्या संवादा वरील ओळी आठवल्या

    अरे अरे ज्ञाना झालासी पावन 
     तुझे तुज ध्यान कळो आले 

 अध्यात्मिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी स्वतःला स्वतःची ओळख झाल्यावर पावित्र्य येते हे सांगणाऱ्या आहेत .आत्मा आणि परमात्मा यांच्यातील एकरूपता दर्शवणाऱ्या आहेत. अशीच एकरूपता बालक दिनाच्या निमित्ताने आपल्यातील प्रत्येकाने स्वतःतील बालकाशी साधली तर जगणे खऱ्या अर्थाने सुंदर होईल .

     दीपकी दीपक मावळल्या ज्योती
      घरभरी वाती शून्य झाल्या 

  ज्ञानाच्या प्रकाशाने जसे जगातील सर्व गोष्टी उजळून निघतात आणि आपल्या न संपणार्‍या इच्छा नाहीशा होतात तशाच बालसुलभ भावाविशेषांनी आपल्यातील कोमलता जागृत ठेवून षड्रिपूंचे दमन करणे गरजेचे आहे.

    वृत्तीची निवृत्ती अपणांसकट
    अवघेचि वैकुंठ चतुर्भूज

 बालकांच्या शोधक नजरेने चांगल्या गुणांचा मार्ग जोपासत संपूर्ण विश्वामध्ये दैवी गुणांची ज्योत अखंड जागवत ठेवूया.
 बालक दिनाच्या शुभेच्छा!!!

Sunday, November 14, 2021

अक्षरांच्या वाटा

 


'टाॅलस्टाॅयला वाटायचं की, 'यास्नाया पोल्यानाच्या गर्द हिरवाईत, द-याखो-यात कुठेतरी दूर एक हिरवी फांदी असते, धरतीच्या पोटात पुरून ठेवलेली अन् त्या फांदीला रसरशीत अक्षरांचे घोस लागलेले असतात...', किती सुंदर कल्पना आहे नं? अक्षरांचे घोस! झाडाझाडांवर लटकलेले! संपर्कात येणा-या प्रत्येकाला ज्ञानरसपान करवणारे!...

 अक्षरांचे असे पीक घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे पण "घेता आले तर...", ही कविकल्पना आहे. वास्तवापेक्षा वेगळी असली तरी मनाला सुखावणारी! 
सुखावते यासाठी की, लहानपणी  जे वाक्य ऐकलेलं असतं..., "सुंदर जगण्याचा मार्ग अक्षरांच्या वाटेवरून जातो"..., त्याच्याशी ही कल्पना नातं निर्माण करणारी वाटते. अक्षरांचा असा सुसंगत मेळ शब्दाची निर्मिती करतो. या शब्दाला शब्द जोडून साहित्य निर्माण होतं नि मनाला मन जोडून जीवनगाणं आकाराला येतं.

एक इवलासा शब्द
त्याच्या मुठीत असेल
एखाद्या कवितेचा प्रहर अविनाशी
म्हणून त्याच्या गालांपाशी, डोळ्यांपाशी
माझे काळीज ठेवते मी, 
किती वेडी आहे ना मी!
 असं अरूणाताई ढेरे यांनी लिहिलंय. शब्द हे असे वेड लावणारे असतात. भावनांना व्यक्त करणारे असतात. ते विलक्षण बोलके असतात आणि समाजाच्या सांस्कृतिक स्थित्यंतराचे दर्शन घडविणारे माध्यम असतात. आयुष्य सुखकर करणारे हे 'शब्द मळे' रसिकांसाठी जे फुलवितात, ते असतात साहित्यिक! आपल्या प्रतिभेनं शब्दसृष्टी उभी करणारे हे प्रतिभावंत! ते निर्माण करतात नवनव्या साहित्य वाटा! 
पण... त्यांच्याबद्दल आपल्याला कितपत माहिती असते? त्यांचं लिखाण आपण कितीसं वाचलेलं असतं? हा प्रश्न आपण कधी आपला आपल्यालाच विचारून पहा... उत्तर नकारार्थी येईल. कधीकधी साहित्य वाचनापेक्षा त्या साहित्यिकाबद्दलची ऐकीव माहितीच बरं वाईट मत तयार करत असते. आम्ही वाचनाबद्दल किती गंभीर असतो? मराठी आमची मातृभाषा आहे...त्यातील लेखकांची आम्ही किमान नावं तरी ऐकलेली असतात पण इतर भाषांमधील लेखकांची फार तुटपुंजी माहिती आम्हाला असते. त्याविषयी त्या त्या भाषेच्या प्राध्यापकांना देखिल कधीकधी काहीच सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे. 

 आता हेच बघाना...आम्हाला विसाव्या शतकातील 'मिलोराद पावीच' हा पूर्व युरोपीय कादंबरीकार, ज्याने कुठूनही- कुठेही - कशाही वाचता येतील अशा कादंब-या लिहिल्या, तो माहित नसतो. शब्दकोड्याचा आकृतीबंध स्विकारून त्यानं कादंबरीची रचना केली होती. त्या रचना नि तो लेखक आपल्यासाठी अज्ञात असतो. 
आम्ही कधी 'पेस्सोआ' या पोर्तुगीज लेखकाबद्दल, ज्यानं पन्नासहून अधिक टोपणनावाने लिखाण केलेलं आहे, त्याच्याबद्दल ऐकलेलं नसतं. स्वतःच्या लेखनाबद्दल अतिशय तटस्थ असणाऱ्या या लेखकाच्या लेखनाचा मराठीत एकही अनुवाद नाही पण हिंदीत मात्र, 'एक बेचैन का रोजनामचा' उपलब्ध आहे. ही माहिती नीतीन रिंढेंचं पुस्तक वाचलं की आपल्याला कळते, तोवर ही नावंही आपल्यासाठी अनोळखी असतात.  'हायकूचा संत' जपानचा महाकवी बाशोबद्दल आम्हाला दिवाळी अंकातून तरी कळतं. परदेशी लेखकच काय भारतीय लेखकांचे साहित्य सुद्धा आपल्याला क्वचित वाचायला मिळतं.   
उदाहरणं द्यायची तर.... 'जगणं आणि लिहिणं हे समानार्थी शब्द आहेत. लेखक हा स्वप्न दाखवणारा आणि जगण्यावर प्रेम करणारा असतो', या तत्वानं लिखाण करणारी उडिया लेखक प्रतिभा राय यांच्या साहित्यापासूनही आपण अनभिज्ञ असतो. 

'लेखन हा एक शोध असतो. लेखकासाठी लेखन हा एक नवे प्रदेश धुंडाळण्याचा प्रयत्न असतो', हा दृष्टिकोन जपत लेखन करणा-या कन्नड लेखिका, वैदेही यांचे लेखनही आपण क्वचित वाचले असते.
अशी कितीतरी नावं आणि साहित्य आपल्यापासून दूर आहे. आमच्या वाचनाला मर्यादा आहेत, हे खरं आहे शिवाय महत्वाची अडचण आहे, भाषेची! आणि त्यासाठी गरज आहे, प्रभावी अनुवादाची!

    नीतीन रिंढे म्हणतात तसं, गेल्या चाळीस वर्षातले जगातले मोठे लेखक मराठीत माहित नाहीत तर त्यांचे अनुवाद होणं दूरच राहिलं आहे. हिंदी त्याबाबतीत मराठीच्या पुढे आहे. तिथे जगातले बहुतेक मोठे लेखक-कवी वाचायला मिळतात. मराठीतही ती यायला हवीत.
म्हणून असं वाटतं की, टाॅलस्टाॅयच्या कल्पनेतील 'अक्षरांचे घोस' जगातल्या अनेक भाषारूपी फांद्यांवर लटकलेलेे आहेत. फक्त गरज आहे ती त्यापर्य॔त पोहोचण्याची...! नि त्या वाटा धुंडाळण्याची! 

-सीमा शेटे (रोठे), अकोला.

Friday, October 15, 2021

ते आणि आपण

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. अजून थोडं बाकी आहेच. मन घट्ट करून ठेवा. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके अकोल्याला येऊन शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.  

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं. 

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत याचे पहिल्यांदा बरे वाटले. 

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. आपलं ८ वं लग्न आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर (चुभू देणेघेणे) आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-D  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महवाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला आपल्या देशाचं कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही.

आज इतकंच.  ☺

Thursday, October 14, 2021

उपेक्षितांच्या जगात

 2 ऑक्टोबर--- नुकतीच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री  ह्यांची जयंती साजरी झाली. सरकार मान्य सुट्टी जाहीर असल्याने  " ती कुणी, कोणत्या प्रकारे साजरी केली, हा अर्थातच चर्चेचा भाग आहे. दोघेही नेते आपल्या आपल्या परीने तितकेच महान; पण गांधीजींचा जितक्या मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत लेव्हल वर उदो उदो झाला,अजूनही होतो आहे--(माफी मागते, उदो उदो हा शब्दप्रयोग वापरल्याबद्दल--पण दुर्दैवाने ते खरंय.) तेवढ्याच प्रमाणात शास्त्रीजींना मात्र "उपेक्षित" ठेवलं गेलंय किंवा ते उपेक्षित राहिलेत ,कायमच,असे म्हणता येईल.वर्तमानपत्रातही गांधीजींविषयी रकानेच्या रकाने भरून भरभरून लिहिलं जातं; पण त्याच पेपरमध्ये शास्त्रीजींसाठी मात्र एखादे पान देखील उपलब्ध नसावे? नाही म्हणायला सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या कार्याविषयी, घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांविषयी, त्यांच्या देशाविषयीच्या  श्रद्धा आणि निष्ठेविषयी, सरळ, साध्या, निगर्वी आणि निरिच्छ स्वभावधर्माविषयी एक विशिष्ट पोस्ट फिरत असते, तीही वर्षातून एकदा----हेही नसे थोडके. अत्यंत सालस, कायम जमिनीवर पाय असणाऱ्या ह्या व्यक्तीमध्ये देशाचा पंतप्रधान झाल्यावरही  तसुमात्र देखील फरक पडला नाही. व्यक्तिगत सुख-दुःखाचा, "पोझिशन" चा किंचितही विचार न करता ज्याने फक्त देश बांधव आणि देशाप्रतीच विचार केला त्याचे कर्तृत्व, त्याची महानता मात्र दुर्लक्षितच राहिली.

शास्त्रीजींना जयंतीच्या शुभेच्छा देखील विभागूनच मिळाल्या, तिथेही वाटेकरी----पूर्णपणे त्यांचं असं नाहीच काही. इतकंच काय, नेहरुजींवर "खास त्यांच्यासाठी" गाणं लिहिलं गेलं---
-" करती है फरीयाद ये धरती, कई हजारो साल
तब् जाके पैदा होता है एक जवाहर लाल---"
 गांधीजींवरही खास त्यांच्यासाठी गाणं लिहिलं गेलंय---
" दे दी हमे आजादी, बिना खड्ग,बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल---" 
वास्तविक पहाता, हातात शस्त्र न घेता स्वातंत्र्य मिळालं, निव्वळ अहिंसेचा मार्ग पत्करून----हे कोण, कोणत्या आधारावर ठासून म्हणू शकेल? स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं जीवन सर्वस्व वाहून दिलं, भारतमातेच्या चरणी---त्यांचं काय?एका व्यक्तीच्या बलिदानामागे संपूर्ण कुटुंब होरपळून निघाले, त्याचं काय? आणि इतकं करूनही खरा रक्तपात तर स्वातंत्र्यानंतरच झाला. खऱ्या अर्थाने शस्त्रे वापरली गेली, अगणित अत्याचार झालेत, माणूसपणाची विटंबना झाली, त्या सगळ्याचा हिशोब कशात मांडायचा? असो. तर गाणं देखील शास्त्रीजींना विभागूनच मिळालं, हे देखील दुर्दैवच नाही का?----

" एक का नारा अमन एक का जय जवान, जय किसान ---धरतीपर दो फुल खिले, जिनसे मेहेका हिंदुस्तान----"😊 2 ऑक्टोबर चा दिवस आला की आपल्याला  गांधीजीच प्रकर्षाने आठवतात, अर्थात गांधीजींना फक्त त्या दिवसापूर्ती आठवायची गरज नाही, हे देखील तितकेच खरे म्हणा. ते कायमच लोकांच्या स्मरणात आणि मनात अधिराज्य करत असतात. हे भाग्य शास्त्रीजींच्या वाट्याला आले नाही ह्याचे वाईट वाटते. खरे तर "ताशकंद करार" आणि भारत-पाक (1965) युद्धाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका ह्या दोन्ही घटना अत्यंत महत्वाच्या असल्या तरी-----त्या गोष्टींची हवी तशी दखल कुणाला घ्यावी वाटली नाही. ज्यांचं थोरपण प्रकाशात येत नाही, प्रशंसनीय असूनही----ते "उपेक्षितांच्या यादीत" मोडले जातात.; पण मला वाटतं, त्यांच्या उपेक्षित असण्यातच त्यांची महानता दडलेली असावी का?

 रामायणात "उर्मिला", महाभारतात " महामंत्री विदुर, कर्णपत्नी वृषाली", शिवाजी महाराजांच्या इतर पत्नी जशा पुतळाबाई, सकवार,सगुणा बाई-- ही सगळी व्यक्तिमत्वे उपेक्षितच म्हणायला हवीत.--- सई बाई महाराजांची प्रथम,लाडकी पत्नी म्हणून, दुर्दैवी समजल्या गेलेल्या शंभूराजांची आई म्हणून तर सोयराबाई कट-कारस्थानी म्हणून लक्षात राहिल्या.  बाकी सगळ्या उपेक्षितच.तसेच स्वातंत्र्य प्राप्तीच्या यज्ञात प्राणार्पण करणाऱ्या महान व्यक्तींच्या पत्नी----- अशी उपेक्षितांची यादी बरीच वाढेल, साहित्य क्षेत्रात, सामाजिक कार्यक्षेत्रात , कला क्षेत्रात आणि अजून बऱ्याच  क्षेत्रात----

ह्या सर्वांविषयी मनात आदरभाव असूनही ,"उपेक्षित" ह्या संज्ञेच्या  संदर्भात मला दुसरी आणि ठळक बाजू मांडायचा मोह आवरता येत नाहीये, हेही तितकेच खरे----ती बाजू अशी---
ही जी कुणी महान मंडळी उपेक्षित म्हणून राहिली असे आपल्यासारख्याना वाटत असते, त्यामागे ती स्वतःच कारणीभूत असतात असे वाटते. कारण ही सर्व मंडळी ज्या काळात जगली,वागली तो काळ वेगळा होता आणि तो काळ लोटूनही आता दीर्घ काळ लोटला आहे.जगात इतकं साधं,सरळ, प्रामाणिक राहून चालतं का? निदान आजच्या ह्या आधुनिक युगात? झपाट्याने विकसीत होऊ पहाणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात? दिवसागणिक बदलत जाणाऱ्या जीवनशैलीला अनुसरून होत रहाणाऱ्या बदलत्या काळात?
 कॉर्पोरेट क्षेत्रात तर तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करत रहावं लागतं. तुमच्याजवळ बुद्धिमत्ता नुसती असून चालत नाही,तर ती दाखवावी लागते, वेळप्रसंगी तिचं प्रदर्शनही करावं लागतं. तुमच्या "आतले गुण" जे कधीही "बाहेरच्या जगाला कसे दिसत नाहीत"  म्हणून तुम्ही रडगाणं गाऊ शकत नाही. कुणाला इतका वेळ ही नाही आणि गरज तर मुळीच नाही, तुमच्यातले सुप्त गुण ओढून बाहेर काढायला. नसलेल्या गुणांची बढाई मारावी लागते, असलेले दोष जाणीवपूर्वक लपवावे लागतात. स्पर्धेच्या युगात टिकून रहायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं.जाणीव करून दिल्याशिवाय जाणीव होत नाही,हे मान्य करावेच लागेल तुमच्यातील आत्मविश्वास, चिकाटी, संयम  आणि पुढे जाण्याची धडपड ह्याच गोष्टी तुम्हाला स्पर्धेत टिकून  रहाण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात, हे ठरवतात. आणि आजची तरुण पिढी ह्या बाबतीत पूर्णपणे जागरूक आहे असे वाटते. आजच्या तरुणाईला, अर्थात, ज्यांच्या नजरेसमोर एक विशिष्ट ध्येय आहे आणि ते गाठण्याची जिद्द आहे त्यांना "स्वतःला सिद्ध कसे करायचे" हे सांगावे लागत नाही. नवी पिढी विलक्षण वेगाने सगळे जगणे कवेत घेते आहे. नव्या धारणा आणि धोरणांशी नियोजनपूर्वक समायोजन करत आहे. कोणतीही पिढी ही मागच्या पिढ्यांच्या खांद्यावरच उभी असते. मात्र आजची पिढी हा केवळ त्या पिढ्यांचा परिपाक नव्हे. मागच्या पिढीच्या कैकपट पुढे आजची पिढी आहे.आजच्या तरुणाईला  कोणताही "वाद" नकोय,वा कोणत्याही "आदर्शवादाशी" बांधिलकी नकोय.त्यांना कोणाच्यातरी चष्म्याने जग पहायचे नाही,मग तो चष्मा मार्क्स चा असो, वा हेडगेवारांचा. त्यांना खरे म्हणजे चष्म्यानेच जग पहायचे नाही. त्यांना त्यांच्या लख्ख, स्वच्छ डोळ्यांनीच हे जग बघायचे आहे. त्यांना या जगावर स्वार व्हायचे आहे, जग जिंकायचे आहे.  ह्या पिढीला अतिसंवेदनशील असूनही खरे तर चालणार नाहीये. एकवेळ "प्रॅक्टिकल" असणं मान्य; पण फार भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणे हे त्यांच्या आयुष्याच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने घातक ठरणारे असते. 
"सानेगुरुजी" त्या काळातले आदर्श असले तरी त्यांचा हळवा, संवेदनशील स्वभाव,अति वैचारिक क्षमता हेच त्यांच्या आयुष्यात अडथळे ठरले. अशी हळव्या मनाची माणसं त्यांच्याही नकळत "आत्महत्येसारख्या" अत्यंत चुकीच्या निर्णयापर्यंत कधी येऊन पोचलेले असतात, त्यांना देखील कळत नाही. आणि शेवटी कुणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही; पण आपण स्वतः कसे वागावे हे तर आपणच ठरवू शकतो. आजच्या काळात तर "तू फक्त" लढ" म्हणणारे शिक्षक हवेत आणि त्याच जिद्द आणि चिकाटीने ध्येय उराशी बाळगून लढणारे विध्यार्थी हवेत. नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर आज "मोदीजी" सारखे नेतृत्व हवे. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ह्या गुणांसोबतच 
आजूबाजूच्या (विशेषतः शेजारच्या) देशांना "हलवून, हादरवून" सोडेल अशी करणी,
शांत दिसत असले वरकरणी
तरी खऱ्या अर्थाने धोरणी--राजकारणी, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज तरी अशाच "नेत्यांची" जास्त गरज आहे देशाला. जे "योग्य दिशेने योग्य ती पावले टाकतील आणि इतरांना त्याची उघड उघड जाणीवही करून देतील".

आपण "शास्त्रीजींपासून" सुरुवात केली त्यामुळे शेवटही त्याच मुद्द्याला धरून करावा लागेल. शास्त्रीजींसारखी जी मोजकीच; पण खरोखर महान व्यक्तिमत्वे। आहेत, त्यांना स्वतःला आपण उपेक्षित ठरल्याचे कधी जाणवले ही नसेल. कारण त्यांनी जे काही कार्य केले ते कुठल्याही अपेक्षेविना, निःस्वार्थ भावाने आणि स्वेच्छेने केलेलं असणार; आपल्यासारखी सामान्य मंडळी त्यावर उलट सुलट चर्चा करत रहाते, इतकंच.
 पण म्हणूनच मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या युगात फार प्रामाणिक, सरळ, साधं असून चालत नाही. अती चांगुलपणा म्हणजे बावळटपणा समजला जातो. व्यक्त न होऊ शकण्याला मुखजड आणि खरे असले तरी स्पष्ट बोलू न शकण्याला भित्रेपणा किंवा कमकुवतपणा समजला जातो. "पाणी फक्त निर्मळ अन खरे हवे" हे तत्व काही खऱ्याखुऱ्या आयुष्यात कामी येत नाही. अर्थात, ह्याचा अर्थ चुकीने वा अन्यायाने वागावे असा मुळीच नाही. पण किमान जशास तसे आणि योग्य व न्याय्य बाजू कायम ठेवत बदलत्या परिस्थिती नुसार स्वतःमध्ये बदल करायला शिकणे इतके तरी हवेच. 

 पण शेवटी प्रत्येक व्यक्तीचा स्वभावधर्म वेगळा असतोच आणि ती व्यक्ती ज्या वातावरणात "घडलेली" असेल,ज्या आंतरिक संस्कारात विकसित झालेली असेल त्यानुसारच तिचे वागणे ठरते.🙏 
फक्त आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, ते बाहेर यायला हवेत, नव्हे आपणच ते जगासमोर आणायला हवेत आणि "उपेक्षितांच्या" यादीत आपले नाव जोडले जाऊ नये, किंबहुना कुणाच्याही वाट्याला उपेक्षित जगणे येऊ नये ,(उपेक्षित हा शिक्का कुणाच्याही नावासमोर लावला जाऊ नये)हीच प्रामाणिक इच्छा.🙏

माणिक

Wednesday, October 13, 2021

इतना गहराईमें सोचो मत......

 त्याचं असं झालं की, आम्ही इथे पुण्यात डायनिंग सेट पहायला दुकानात गेलो होतो, तिथे एक मार्बलचा सेट आवडला. ते नवीन प्रकारचं मार्बल होतं, तर माझ्या मनात आलं की,ह्यावर हळदीचे, तेलाचे डाग पडले तर कसे जातील? आणि ते किती खराब दिसेल! मी त्या दुकानदाराला म्हटलं की, भगवान के मंदिर मे जो मार्बल लगा है, उसपे हल्दी कुमकुम के दाग जल्दी निकलते नही है( तो मुस्लिम होता) पुणेरी असल्यामुळे, त्याला मी काय म्हणते, ते थोडं तरी समजलं असावं. तेव्हा तो म्हणाला, अरे,हमने इतनी गेहराईमें कभी सोचा ही नहीं, आपभी मत सोचिए! मुझ पर भरोसा रखके ले जाइये!

            मला त्याचं ते वाक्य खूपच आवडलं! खरंच उगाच किती छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. मी अगदी  फ्लॅशबॅकमध्ये गेले. लहानपणी शाळेत असताना मित्र-मैत्रिणी वहयांच्या मागच्या-पुढच्या बाजूला त्यांचे क्रिएटिव वर्क करायचे. मी मात्र वहयांच्या दोन्ही बाजू अगदी स्वच्छ व कोऱ्या ठेवायचे. बोअर पिरियड चालू असताना, वह्यांच्या मागे मेसेजेस लिहून वही फॉरवर्ड व्हायची. पण तसे करतानाही मी विचारपूर्वकच करायचे.दर वर्षी वर्ष संपल्यावर ,पुस्तके विकताना दुकानदार खुश होऊन थोडे जास्तच पैसे द्यायचा मला !कारण ती पुस्तकं अगदी कोरी वाटावी इतकी छान असायची. कॉलेजमध्ये सुद्धा पॉकेट मनी मिळत नसला तरी बॅग मध्ये थोडेफार पैसे नक्की असायचे. पण कधी उशीर होतोय म्हणून, कंटाळा आला म्हणून ऑटो रिक्षा केली नाही. कॉलेजला, स्टेशन पर्यंत चालतच जायचे. खूप थंडीत सकाळी पावणेसातला कॉलेज सुरु व्हायचे तर मस्त चहा प्यावासा वाटायचा. पण तोही कटिंग प्यायचा.स्टेशनसमोरच फेमस उडपी हॉटेल होते. पण कधी आत जाऊन एखादी डिश खाल्ली नाही.हॉटेलमध्ये जायचं ते कुटुंबाबरोबरच !शॉपिंग साठी बांद्राचं एल्को मार्केट प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही मैत्रिणी ठरवून एकत्र शॉपिंग ला जायचो. तेव्हाही दिलेले पैसे पूर्ण खर्च न करता,परत आणलेले! नेहमी असंच विचार करत राहायचं....
.कुठलीही वस्तू घेताना खरच ती उपयुक्त आहे का? त्याची किंमत, आपलं बजेट ,आता घेणे खरच गरजेचे आहे का की नंतर घेतलं तरी चालेल आणि मग घरात आहे त्या वस्तूचं काय करायचं असं सगळं मनात येतं नेहमीच!

मुलं लहान असताना शाळेचे मिडीयम बाबतचा निर्णय, मुलांना वाचनाची गोडी लागावी त्यांनी शैक्षणिक, खेळ, वक्तृत्व सगळ्यात प्रगती तर करावी, पण त्यांना कुठेही आपल्यावर हे लादलं जातय असं तर वाटत नाही ना ?असं काही काही मनात यायचं. घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींबाबतही तेच !नेहमी त्यांचे वय, त्यांचा स्वभाव ,आवडी-निवडी, त्यांनी वर्षानुवर्ष जपलेली मूल्ये, देवाधर्माबाबतचे यमनियम व्यवस्थितपणे पाळले जात आहेत ना याची चिंता!

          घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल तरी घराची स्वच्छता इतर गोष्टींबाबतचा  काटेकोरपणा जपण्यासाठी तडफड! कामवाल्या बाईकडून ,स्वयंपाकीण बाई कडून काही जास्तीची कामे करून घेताना फक्त पैशाचा असं नव्हे, तर मग आपण आळशी होऊन जाऊ  आपली सवय तुटेल कामाची !असे काही काही (गहन विचार ).आजही संध्याकाळी साधं हॉटेलमध्ये जायचं असेल तर, सकाळचा स्वयंपाक नेमका व्हायला हवा ,तो उरायला नको याचा विचार!
      
 प्रवासाला निघण्यापूर्वी बॅग भरताना ट्रॅव्हल लाईट हे नेहमीच मनात असतं .आपल्याला किंवा कुणालाही उचलायला बॅग जड होऊ नये (अगदी हमालालाही )असं वाटतं.ट्रेन मध्ये कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस , जेवणाचा डबा, आणि आधार कार्ड वगैरे इतर आवश्यक बाबी सगळ्याचच खूप प्लॅनिंग असतं.

बरं, जेव्हा आजूबाजूला आपण बघतो ,अनुभवतो ,की लोक किती बेफिकिरीने वागतात.खुशाल पाणी वाया घालवतात! आपल्याकडून जर असं झालं चुकून, किंवा आपण जर पाणी वाया गेलेलं जरी पाहिलं,तरी लगेच आपल्याला पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे ,हे कसं समजवायचं या मंडळींना म्हणून कासावीस व्हायला होतं. सार्वजनिक ठिकाणी गाडीतून किंवा बसमधून कुठलेही wrapper, बाटल्या लोक सहज फेकताना पाहिलं की वाटतं, अरे आपण तर चॉकलेटचा साधा कागदही पर्समध्ये ठेवून घरी आणतो!

 सध्या सोशल मीडियामुळे फारच अलर्ट राहावं लागतं.चुकून एखाद्याच्या पोस्टला रिप्लाय केलं गेलं नाही किंवा विश केलं गेलं नाही तर समज गैरसमज तर होणार नाही ना याची काळजी! मस्त मनात येईल ते बोलणाऱ्या ,मनात येईल तसं बेधुंद आयुष्य जगणाऱ्या ,बेफिकीर ,बेदरकार व्यक्ती पाहिल्या की असं वाटतं ,असं मनमुराद जगण्यात एक वेगळाच आनंद असेल !आपल्याला केव्हा जमेल असं?

           साधं या महिन्यात एम सिरीज असताना,ब्लॉग लिहिणं मला जमणार नाही असं सांगणंही तर जमलं नाही ना मला!
        उसके लिये भी गहराई में सोचती रही.

Wednesday, September 15, 2021

judgemental

 लॉकडाऊनच्या वेळेस लोकांना झूम कॉल, डुओ कॉल, व्हॉटस् अप कॉल ची सवय चांगलीच अंगवळणी पडली होती. प्रत्यक्षात भेटायला जमत नव्हते तर असे वर्चुअली भेटणे, दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.  

 एका गृपवर मैत्रिणीचा मेसेज आला आमची आठवण येत नाही का? त्याला दुसरीने लगेच जोड दिली, ती विसरली आपल्याला आणि एक रडका इमोजी टाकला. लगेच पहिलीने पण होकार भरत रडका इमोजी टाकला. मला कळे ना हे असे मेसेज यांनी का केले. मग मी पण एक गोंधळलेला, विचारात पडलेला इमोजी टाकला आणि प्रश्नचिन्ह टाकले. तर लगेच पहिलीने सांगितले तू व्हिडिओ कॉल कधी करतच नाही.
हाय रे माझ्या कर्मा!  असे बोलून व्हिडिओ कॉल ची गमंतच घालवून टाकली.  वाचून मला खूप वाईट वाटले.  इतक्या दिवसाची मैत्री अशी अचानक कशी संपेल. आपण फारच लवकर जज्जमेंटल होतो इतरांच्या बाबतीत. 
उशीर झाला असेल फोन करायला मान्य आहे पण करोना मुळे घरातील सर्व कामे वाढली होती त्यामुळे उशीर झाला. शिवाय राखी पौर्णिमा होती तर नातेवाईकांना, भावांना फोन करणे आवश्यक होते त्यात लेट झाला. पण तोपर्यंत मैत्रिणी निर्णय देऊन मोकळ्या झाल्या होत्या.भलेही हे अनावधानाने, नकळत घडले असेल  पण असेच काही जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा  त्यातली बोच जाणवते. 
आणि हो  हे सर्व निर्णय बहुतांश निगेटिव्ह असतात.  कोण, केव्हा, कसा आणि का वागला हे ठरवणारे आपण कोण आहोत? त्या त्या विशिष्ट  परिस्थितीत आणि मानसिकतेप्रमाणे, स्वभावाप्रमाणे ती व्यक्ती व्यक्त होत असते. आपण निर्णय घेऊन  का मोकळे होतो?
त्यातला एखादा असा माणूस निघतो तो मस्त हलकासा मेसेज टाकून गृपचे वातावरण बिघडू नये याची काळजी घेतो.  "हम तुम्हे भूल जाए ये हो नहीं सकता ....
और तुम लोग हमे भूल जाओ ये हम होने नहीं देंगे ..." दुसरा लगेच त्याला साथ देवून "सही पकडे हो" म्हणत वातावरण अजून हलकंफुलकं करतो. किती बरं वाटतं. खर तर कॉल कोणी केला यापेक्षाही गप्पा, हसणे, थट्टा मस्करी होणे हे मुख्य होते आहे ना हे पहावे. आता कायम टेंशन राहील आपली टर्न आली का फोन करायची चला बाई एकदाचा करून टाकू नाहीतर पुन्हा कोणी नाराज होईल. या सारख्या क्षुल्लक गोष्टी मैत्रीत आल्या तर ती निखळ मैत्री राहील का? दुसर्‍या काही पध्दतीने सांगितले तर मन पण दुखावणार नाही आणि जो मेसेज त्या व्यक्तिपर्यंत पोहोचवायचा आहे तो पण पोहचवता येईल. किंवा आपण पुढाकार घेऊन फोन करायचा. खरं तर अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांच्याशी महिनोंमहिने फोनवर देखील बोलणे होत नाही तरीपण मैत्री आहेच की. मैत्री अशी संपणारी गोष्टच नाही मुळी. केव्हाही फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून तोच आनंद, प्रेम, आपुलकी अनुभवायला मिळते तीच खरी मैत्री! पण कधी कधी जवळच्या लोकांकडून त्यांच्या नकळत आपण दुखावले जातो. असेच आपल्याकडूनही घडू शकते. अशा परिस्थितीत जज्जमेंटल न होता काही गोष्टी सोडून देणे, दुर्लक्ष करणेच योग्य असते, हे कळते पण वळत नाही. 

श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लीश नावाचा सिनेमा आठवला  त्यातला तिला नेमका एका शब्दाचा अर्थ समजत नाही तो शब्द असतो judgemental या एका शब्दात त्या सिनेमाचे सार सामावले आहे. मानवी स्वभावाचे छोटे छोटे उत्कट प्रसंग  मनाला सहजपणे भिडतात खरचं आपण दुसर्‍या व्यक्तीबद्दल किती पटकन निर्णय घेऊन मोकळे होतो कुठलीही शहानिशा करण्याची गरज पण वाटत नाही आपल्याला. मानवी स्वभावच आहे हा. अगदी शंभरात एखाद दुसरा इतके कमी लोक असे जज्जमेंटल होत नाही. किंवा झाले तरी पॉझिटिव्ह जज्जमेंटल होतात.    व्हाॅटअप्सच्या आणि एकूणच सोशल नेटवर्किंग च्या प्रादुर्भावमुळे आपण अजून जास्त जज्जमेन्टल होत चाललो,  पटकन व्यक्त होण्याची सोय आता झाली आहे त्यामुळे निर्णय घेऊन मोकळे  होतो. ज्याच्या बद्दल असे निर्णय आपण घेतो त्याला काय वाटेल किंवा त्याला वाईट वाटेल हा विचारच नाही केला जात. आणि हे जेव्हा जवळच्या म्हणवणाऱ्यांकडून अनुभवायला मिळते त्यावेळी खरचं खूप यातना होतात मनाला. दुसऱ्यांच्या भावना, अडचणी समजून घ्यायला खूप मोठं मन लागतं आणि भरपूर वेळ असावा लागतो. जो आजच्या सुपरफास्ट काळात फारच कमी जणांकडे आहे. (शिवाय प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे कौटुंबिक, इतर काही कामं, प्रश्न असतात.) 'जज्जमेंटल ' असणं हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकात तो आहेच फक्त आता व्यक्त व्हायला, मत प्रदर्शित करायला सोशलमिडीयाचे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे एवढेच. आपल्या एखाद्या कृतीचा किंवा वागण्याचा कोण काय अर्थ काढेल आणि निर्णय देऊन टाकेल काही सांगवत नाही. म्हणून सावध राहून मत व्यक्त करावे हाच उपाय आहे.

व्हॉट्सअॅपवर आलेली एक कविता या संदर्भात आवडली ती शेअर करावीशी वाटली. कवी कोण माहीत नाही.                 

" चल नां नातं रिचार्ज करु 

आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर 
पुन्हा एकदा टॉक टाईम भरु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...

मनामध्ये काही अडलं असेल तर
त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...

माणूस  म्हंटंल तर चुकणारच ना
चुका तेव्हढ्या बाजुला सारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...

व्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम
पटलं तेवढं ठेवुन बाकी इग्नोर मारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...          

सुसंवादाची सेल्फी आठवत
रिलेशनमध्ये अंडरस्टॅन्डींग भरु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु......!

अंजली 

Sunday, August 15, 2021

अ‍ॅबनॉर्मल ते न्यू नॉर्मल व्हाया नॉर्मल

 परवा अचानक माझा मुलगा विचित्र वागायला लागला. काही कारण नसताना चिडचीड, संताप वगैरे सुरु झाला. मग काहीतरी खाणं झालं आणि तो अचानक नॉर्मल झाला. तेव्हा त्याला भूक लागली होती हे लक्षात आलं. मग विषय निघाला TV वर सतत येणाऱ्या जाहिरातीचा. गेल्या काही वर्षांत ही जाहिरात नेहमी पाहायला मिळतेय. एखादी व्यक्ती सर्वांशी भांडायला उठते, अगदी मारायच्या तयारीत येते. आणि अचानक कुणाच्या तरी लक्षात येतं, तिला भूक लागलीय. मग एक चॉकलेट खाऊन ती लगेच नॉर्मल होते.

मुलाला आणि मला एकाच वेळी ती जाहिरात आठवली. मुलगा म्हणाला, “हं, म्हणजे हे असं होणं नॉर्मल आहे. त्याशिवाय का त्यांनी अशी जाहिरात बनवली असती?” मी चमकले. TV वर दिसतं ते नॉर्मल, ते प्रातिनिधिक, तेच खरं हे असं किती लोकांना वाटत असेल? मग मला दुसऱ्या एका चॉकलेटची जाहिरात आठवली. त्यात मोठ्या वयाच्या मुली सगळं तोंड भरवून चॉकलेट खातात. ते बघायलाही किळसवाणं वाटतं. पण हीच खरी खाण्याची पद्धत, हे अचूक प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न यातून केला जातो. असं खाल्लं तरच तुम्ही ते ‘एन्जॉय’ केलं, नाही तर आपलं उगीचच ‘गिळलं’. काय साधलं जातं यातून? कुठे जातोय आपण ? कुठल्याही सभ्यपणा , सुसंस्कृतपणाशिवाय आदिमानव जसा वागत किंवा खात असेल, तसं आपण वागणं अपेक्षित आहे? मग आठवलं की, आजकाल तेच जगणं खरं, नैसर्गिक आणि प्रामाणिक म्हणायची फ़ॅशन आली आहे. आणि आपण जे संयमित, सभ्य पद्धतीने जगतो, ते कृत्रिम, खोटं, आणि अँबनॉर्मल ठरवलं जातंय. म्हणजे जे आपण इतकी वर्ष अँबनॉर्मल समजत आलो, ते आता न्यू नॉर्मल असणार आहे आणि आपलं वागणं अँबनॉर्मल!

मग TV वरची एकेक गोष्ट आठवत राहिली. जवळजवळ सगळ्याच मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध दिसतात. अगदी अवंतिका, आभाळमाया पासून ते आता थेट एकीच्या नवऱ्याची दुसरी, तिसरी बायको घरात येऊन बसेपर्यंत. मग हा विषय मांडण्यातला फरकही जाणवत गेला. अवंतिका मध्ये हे असं वागणं चूक आहे हे तिचं ठाम मत होतं आणि तिच्या नवऱ्यालाही पुढे ते पटलं, तरी त्याची शिक्षा त्याला मिळालीच. आभाळमाया मध्ये नवर्याचं असं वागणं दुर्लक्षून नायिकेने त्याला नाही, तरी त्याच्या मुलीला स्वीकारलं. मात्र ह्या लोकांचं हे असं वागणं नॉर्मल नाही, हा विचार कुठेतरी मनात यायचाच (सीरियलवाल्यांच्याही). पुढे हे चित्र सरसकट दिसू लागलं आणि आता तर घरात गुणी बायको असताना नवरा राजरोस लफडी करताना दिसतो. ही लफडी साऱ्या कुटुंबासमोर सुरु असतात. सर्वांना ठाऊक असतात. आणि सर्वांनी ती स्वीकारलेली दिसतात. हाही प्रवास कुठल्या दिशेने जातोय?

भूक, मग ती पोटाची असो कि शरीराची, अशा असंयमित, असंस्कृत, खरंतर बीभत्स पद्धतीनेच भागवली जावी, हेच आता नॉर्मल असणार. आदिमानवाला तरी कुठे कुटुंब वगैरे संकल्पना ठाऊक होत्या?आदिमानव कपडे तरी कुठे घालत होता? म्हणजे आता कमी होत चाललेली कपड्यांची लांबी, कपडे न घालण्याची दिसू लागलेली इच्छा, हेही नैसर्गिक, न्यू नॉर्मल असणार आहे. आदिमानव खऱ्या अर्थाने ‘स्वतंत्र ‘ होता. त्यासाठी काही गोष्टींची किंमत त्याला मोजावी लागत असेलही, पण ते त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अगदीच नगण्य असणार. तुम्ही ओल्ड नॉर्मल संकल्पनांना चिकटून बसणारे जुनाट, प्रतिगामी असाल तर तुम्हाला हे अँबनॉर्मल वाटू शकेल, पण हेच न्यू नॉर्मल आहे.

मग मधली हजारो वर्षं मानवाने जी सभ्यता, संस्कृती निर्माण केली, जोपासली, जपली, ते काय होतं? म्हणजे एवढी वर्षं प्रयत्नपूर्वक जो बदल मानवाच्या वागण्यात, व्यवहारात होत गेला, किंवा मानव जाणीवपूर्वक करत गेला, ते सर्व विनाकारण, व्यर्थ होतं? दोन तास खपून एखादं काम केलं आणि ते निरुपयोगी होतं असं कळलं तरी आपल्या जीवावर येतं. मग ही हजारो वर्षे मानव सुसंस्कृत बनण्यासाठी जे काही करत होता, ते निरुपयोगी ठरवताना जग इतकं नॉर्मल असू शकतं? कुठेतरी काहीतरी घोळ होतोय. माझ्याच डोक्यात काहीतरी केमिकल लोच्या झालाय. 

न्यू नॉर्मल जगात हा लोच्या दूर करण्यासाठी उपाय आहे का?

Saturday, August 14, 2021

टाळी ती वाजावी


 "टाळी वाजवावी

गुढी  उभारावी

वाट ही चालावी

पंढरीची ..."

चोखोबांचा अभंग कानावर पडला आणि त्यातल्या 'टाळी' शब्दावरच माझा जीव अडकला. 
दोन हातांचा क्षणाचा संगम नाद निर्माण करतो, त्यालाच आपण 'टाळी' म्हणतो. टाळी! ती एक किंवा दोन प्रहरांची असते. पण कधी कधी कुणाला उत्साहित करण्यासाठी अथवा शाबासकी देण्यासाठी, टाळ्यांचा 'कडकडाट' सुद्धा केल्या जातो. या टाळी वाजविण्याची गंमत असते बघा, टाळीच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीच्या स्वभावाची कल्पना करता येते. विश्वास बसत नाही? मग आत्ता या क्षणापासून निरीक्षण करायला सुरुवात करा. तुम्हाला वेगवेगळे स्वभाव कळतील. काही अगदी दिलखुलास असतात तर काही तोंडदेखले असतात. काही वरकरणी आनंद पण अंत:करणात असूया घेऊन वावरणारे असतात... हे सगळे प्रकार त्यांच्या टाळी वाजविण्याच्या पद्धती वर्णन लक्षात येतात.

          पुण्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एक सुभाषित लिहिलेलं आहे,...
 'आषाढ घना सम मिळो दाद रसिकांची अन्  उधळण व्हावी अविरत उन्मेषांची'... सुधीर मोघे यांचं हे सुभाषित! प्रतिभेचे उन्मेष साकारणाऱ्या प्रत्येक कलावंताला ही दाद हवी असते. त्याच्या ठायी जबरदस्त टाळ्यांची भूक असते. आणि म्हणूनच आम्ही निवेदक, कार्यक्रमात वारंवार टाळ्यांची दाद मागत असतो...! सादाला प्रतिसादाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? अहो, रंगमंचाची ही दुनियाच न्यारी आहे. इथे स्पॉटलाईटचा झोत अंगावर घेत  वावरणाऱ्या व्यक्तीचं ते सादरीकरणच नव्हे तर तो त्याचा परकाया प्रवेश असतो. रंगमंचावरचा तो क्षण त्या कलाकाराचा असूनही त्याचा नसतो. एक आगळा 'कला- उत्कंठते'नं भारलेला असा 'तो क्षण' असतो. समोरच्या रसिकांपासून चार बोटं उंच असण्याचा... तो क्षण! पण तरी मायबाप प्रेक्षकांच्या समोर नतमस्तक होण्याचा...त्यांच्या प्रतिसादाच्या टाळीची प्रतिक्षा करणारा तो क्षण असतो. नाटक असो अथवा संगीत, नृत्य, चित्र, काव्य... कला कोणतीही असो... काही जागा या टाळीच्या अपेक्षितच असतात. त्या ठिकाणी मन आपसूक प्रतिसादाची अपेक्षा करत असतं. कान टाळीचा आवाज ऐकायला अधीर झालेले असतात पण प्रेक्षागृहातनं टाळीचा निनाद गुंजत नाही, कलावंत खट्टू होतो पण निराश होत नाही. कोलमडत नाही. तसाच हसतमुखानं कार्यक्रम पुढे सुरू ठेवतो. कार्यक्रम झाल्यावर जेव्हा केव्हा रसिकांची भेट होते, तेव्हा ते म्हणतात,"तुमचा त्यादिवशीचा अमुक-अमुक कार्यक्रम खूप छान झाला, फार आवडला." 
आवडला? तर भल्या माणसा त्यादिवशी टाळी का वाजविली नाहीस? असा प्रश्न मनात उभा राहतो. एका टाळीला जोड दुसरीची, दुसरीला तिसरीची... अशी जोड मिळत जाते आणि टाळ्यांचा कडकडाट होतो, जो कलाकाराच्या मनात नवा हुरूप, नवा जोश प्रदान करतो.


टाळीचीही एक संस्कृती असते. काही गावं, काही रसिक हे त्या संस्कृतीचे पाईक असतात. तर काही मात्र कोरडे ठणठणीत! कार्यक्रमाचा प्रारंभ-मध्य दाद देण्याचे असतात, याचा जणू त्यांना गंधच नसतो. कर्तव्य म्हणून शेवटी कशीबशी टाळी वाजविली जाते. शेवटी कलावंताला आवाहन करून ती टाळी मागून घ्यावी लागते. यशवंत देव म्हणतात,...
"दाद द्या आणि शुद्ध व्हा. 
सोडीतो का सूर आम्ही?
 सोडीत व्हा वाहवा तुम्ही" 
ही वाहवाची भूक चांगल्यासाठीच असते. पण कधी कधी टाळी वाईट हेतूनेही दिली जाते. जसे, कोणाचा कार्यक्रम पाडायचा असेल तरीसुद्धा टाळीचा वापर केल्या जातो. ती टाळी कलावंताची एकाग्रता भंग करणारी, लय चुकविणारी असते. त्या टाळीची जोड एका लयीत नसते. हा असा प्रतिसाद कलाकाराला अपेक्षित नसतो. दाद हवी पण ती योग्य ठिकाणी हवी असते. त्यात कंजुषी नको. 

    कलावंत प्रसिद्ध असो की नवागत त्याच्या प्रकटीकरणाला दाद देणारी टाळी वाजायला हवी. पण...
पण... गेल्या दोन वर्षापासून या टाळीची भूक अधुरीच राहीली आहे. कारण? रंगमंच सुने झाले आहेत. प्रेक्षागृह रिकामे आहेत आणि कलावंत बंदिस्त खोलीत छोट्याशा पडद्यावर स्वतःची कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरचा रसिक संख्येने कळतो पण त्याच्या देहबोलीची जाणीव होत नाही. ऑनलाईन कार्यक्रम होत आहेत. मात्र ती तात्पुरती व्यवस्था आहे ज्यामुळे सादरीकरणाला वाट मिळते आहे पण त्यात जिवंतपणा वाटत नाही, कारण त्या क्षणाला सजीव करणारा टाळीचा आवाज कानावर येत नाही.
 फिरून तो पूर्वीचा माहोल अनुभवायला मिळावा टाळ्यांचा कडकडाट व्हावा, अशीच अपेक्षा प्रत्येक कलावंताच्या मनात आहे. आणि आशा आहे तिथे मार्ग नक्कीच असणार. टाळी नक्की घुमणार. या विश्वासाने इथेच थांबते. प्रत्यक्ष दाद नाही पण लेखाला प्रतिसाद म्हणून तुमची ईमोजीची टाळी नक्की उमटेल, ही अपेक्षा मात्र ठेवते... नमस्कार!

- सीमा शेटे-रोठे, अकोला.

Friday, August 13, 2021

घ्या पेढा !

 तो धावतच आला. मी जाता-जाता वळून पाहिले तो माझ्याशी बोलायलाच आला होता. जवळपास दीड वर्षानंतर बघितलं पण आठवला, चेहरा विसरणं शक्यच नव्हतं. 

नुकत्याच पौगंडावस्थेत जाणार्‍या त्याला पहिल्यांदा त्याचा मामा माझ्याकडे घेऊन आला होता. गप्प गप्प राहतो, फारसा कोणामध्ये मिसळत नाही, कधी आनंदी वाटत नाही, इ, इ,  कोण? तर हा 12-13 वर्षांचा मुलगा! खोड्या, दंगामस्ती, हट्ट करणारी नुकतीच येऊ लागलेली अंगातली रग जिरवताना कधी रागवणारी या वयातली मुलं!  पण "हा" वेगळा होता. 

लहानपणापासून आईवडिलांची भांडणं आणि विकोपाला जाणारे वाद बघतच मोठा झालेला. दुर्दैव इतकं की तो 10 वर्षांचा असताना आई कसल्याशा आजाराने वारली. मायेची सावली कायमची गेली. वडील याच्याशी बरे वागत पण नवीन आईबरोबर त्याला ठेवायचे नाही म्हणून मामा त्याच्या घरी घेऊन आलेला. तिथे वर्षभरात तो त्याचे खाणेपिणे, अभ्यास, शाळा इतपत करत होता. पण एकटा-एकटा राहतो हे नं बघवल्याने मामा माझ्याकडे घेऊन आला. काही उपाय सांगा -त्यांचे निःशब्द करणारे शब्द अजून तसेच आठवतात. 

काही दिवस तो माझ्याकडे नियमित आला. नंतर एकटाही यायला तयार झाला. आमचे बोलणे, अॅक्टिव्हीटीज त्याला आवडायच्या. घरी आला की उजळलेला चेहरा बघून मामाच्या जीवात जीव यायचा. पुढे वर्षभरात त्याचे काही चांगले मित्रही झाले. काही स्पर्धांमध्ये, शालेय उपक्रमांमध्ये भाग घेऊन त्याने चांगली प्रगती साधली. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्याकडे त्याचे अधूनमधून येणेही बंद झाले. स्वतःहून फोन वगैरे नव्हते केले त्यांनी कधी. माझ्याही स्मृतीच्या पडद्याआड गेली अनेक केसेस प्रमाणे ही पण केस. 
परवा मात्र दहावीच्या निकालानंतर तो भेटला. क्षणाचाही विलंब नं करता त्याच्या बोलण्याचा धबधबा वाहू लागला. सुरुवातीला आॅनलाईन अभ्यासाचा कंटाळा यायचा, दुसरीच टॅब उघडून इतर गोष्टींकडेच लक्ष द्यायचो इथपासून सगळं त्याने सांगायला सुरुवात केली. हळुहळू सरावलो. प्रयत्न सुरू केले पूर्वीसारखाच अभ्यास करण्याचे.प्रयेक गोष्टीची पीडीएफ, व्हिडीओ बघणं, वाचणं पुढे पुढे कंटाळवाणं वाटू लागलं. स्वतःहून पूर्वीसारख्या नोट्स काढायच्या तर ढोरमेहनत करतोय का अशी शंका येऊन ते अर्धवट रहायचं. आॅनलाईन परीक्षा खूप  घेतल्या शाळेनी पण उत्तर आलं नाही की पटकन कॉपी करण्याचा मोह व्हायचा. कळायचं चुकतय पण वळायचं नाही.... सगळं सगळं बोलत होता तो. 

           सुरुवातीला कधीही झोपा, कुठलेही कपडे घाला, आंघोळीचं, जेवणाचं काही गणितच नव्हतं.घराबाहेर पडायचं नाही आणि सतत त्याच चार भिंतीत चार लोकांनाच बघणं नंतर नंतर नकोसं वाटू लागलं. सोबतीला भरीस भर बाहेरच्या जीवघेण्या बातम्या सतत आदळत असायच्या. कोरोनामुळे, लाॅकडाऊन, मृत्यू, अत्यवस्थ, इतके " शे",इतके "हजार" याशिवाय काही ऐकूच येत नव्हतं. मित्रांचीही तीच गत. स्वतःहून फोनवर बोलणे, आॅनलाईन अॅक्टिव्हीटीज करणे, यामुळे तात्पुरतं बरं वाटायचं. लेकिन वो बात नहीं थी!

आज शाळा संपली हा विचार केला की छाती धडधडते. नवीन आयुष्याला सुरुवात करताना पाय कापतात. पळून जावंसं वाटतं कुठेतरी लांब. पण माझ्यामुळे आधीच सगळे चिंतेत असायचे. कशाला त्यांचा त्रास वाढवायचा म्हणून शूरपणाचा, सगळं नॉर्मल असल्याचा मास्क घालून फिरतो. पण हे किती काळ चालणार? 
आरोग्याचा धोका, सामान्यांचे हाल, सगळंच उदासवाणं. त्यातही मूठभर स्वार्थी माणसं आपल्या पोळीवर तूप कसं पडेल या फिकीरीत. खूप त्रास होतो विचार केला की. कधी एखादी चांगली गोष्ट घडली, काही आशादायक घडल्याचे कळले की मात्र पुन्हा उभारी वाटते. 

आज हे सगळं सगळं बोलून बरं वाटतंय. हा घ्या पेढा! दहावी पास झाल्याचा नाही बरं हा! तो निकाल तर सगळ्यांनीच आमची ईश्वरचिट्ठी निघाली म्हणून घोषित केलाय आधीच ! त्याचही काही वाटत नाही. यापुढे मात्र आल्या प्रसंगाला हसत सामोरा जाईन, मार्ग काढत राहीन. स्वतः अडणार नाही, कोणी अडलेला दिसला तर मदतीचा हात देईन. हा निश्चय पक्का केल्याचा पेढा घ्या! 

वर्षा

Sunday, August 8, 2021

चारणकथा

 चातुर्मास आला नि त्यातही श्रावण आला की " आटपाट नगर होतं " किंवा " ऐका गणेशा तुमची कहाणी " अशा कथा कहाण्यांची आठवण हमखास येतेच.प्रत्येक कहाणी काहीतरी समजावून शिकवून जाणारी असते .या कहाण्यांचा विचार करताना , मध्यंतरी काही कारणामुळे राजस्थानी लोकसाहित्याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या त्या आठवल्या. त्यात एक जोगदेव यांची गोष्ट मला आवडली. ती सांगते.

         आपण जसं वारकरी हा  शब्द वापरतो तसं राजस्थानात चारण हा शब्द रूढ आहे.चारण म्हणजे परमेश्वरावर अटळ श्रध्दा असलेला आणि माणूसकी जपणारा संप्रदाय. अशाच चारण झालेल्या  जोगदेवांची ही एक गोष्ट.
         या जोगदेवांकडे राजस्थानातला एक प्रांत सांभाळायला होता .त्यामुळे एक प्रकारे त्यांचीच सत्ता तिथे होती.  अतिशय प्रेमाने आपल्या जनतेला ते सांभाळत होते आणि परमेश्वर भक्तीत लीन होते .चारण असल्यामुळे त्या धर्माचे पालनही ते  पुरेपूर करत होते. 
मात्र असं असूनही सर्व लोककथांमध्ये त्यांचे उल्लेख  'बाघी 'म्हणून आले आहेत .याचं कारण असं की त्यांचा इलाका आपल्या राज्याला जोडायचा घाट भावनगरच्या राजाने घातला होता . आणि जोगदेव यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे ते राजाचे आणि राज्याचे शत्रू ठरले .म्हणून ते बाघी .बाघी म्हणजे बंडखोर. पण बंडखोर असले तरी ते मातृभूमिकरता,राजकीय समीकरणांकरिता. एरवी त्यांनी आपला चारणधर्म मात्र कधी सोडला नाही .
       एकदा ते प्रवासात असताना एका गावात एका परिचिताच्या घराजवळ पोहोचले .परिचिताने त्यांना पाहिले आणि लगेच जवळ येऊन "भोजन के लिये चलिए "असा आग्रह केला .मात्र जोगदेव म्हणाले की "अभी समय नही है । फिर कभी आऊंगा। ".
      तो परिचित म्हणाला की ,"  मै भी तो चारण हूँ। और मेरे दर तक आकर अगर कोई भूखा प्यासा लोटे ये तो चारणधर्म के विरूध्द है । यह तो हो ही  नही सकता। "  मग जोगदेवांना प्रश्न पडला की काय करावे? त्यांनी सांगितले की त्यांना बाघी घोषित करून त्यांना पकडण्यासाठी भावनगरचा राजा स्वतः त्यांच्या मागावर इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांना राजाच्या  हाती सापडायचे नाही. त्यामुळे त्वरा करून  तिथून निघून जाणेच योग्य आहे .
    मात्र हा परिचित असं म्हणाला की ," आप घर पधारिए, स्नान करिये, भोजन करिये और थोडा विश्राम करिये ।तब तक मै खुद आगे चल कर राजा से बात करके आता हूँ।" आणि तो खरच गेला. राजाला भेटला .इकडे येण्याचं कारण विचारलं.
            राजाने जोगदेव यांचे नाव सांगितलं तर तो म्हणाला, "जोगदेव ? ते तर माझ्या घरी आहेत! त्यांचे तर भोजनही अजून व्हायचे आहे!" 
           राजा म्हणाला ," ते बाघी आहेत , राजद्रोही आहेत . तुम्ही जर त्यांना मदत केली तर तुम्ही देखील  राजद्रोही ठराल. तेव्हा त्यांना माझ्या हवाली करा. "      
                      तो परिचित  म्हणाला,"  शक्य नाही ! त्यांना मी माझ्या घरात आश्रय दिला आहे .मी त्यांचा घात करणार नाही."
        राजा म्हणाला ," मग तुमचं काय म्हणणं आहे?"  
      तर चारण म्हणाला ,"की आपणही लांबवर प्रवास करून आले आहात .घरी चला. स्नान करा.माझ्या घरी जोगदेवां बरोबर आपणही भोजन करा. नंतर ते निघून जातील. ते माझ्या घरून निघून गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते करा किंवा  हवं तर त्यांना पकडा.मात्रं माझ्या घरी ते असेपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असेल .मी माझ्या चारणधर्माचे पालन करीन. मग आपण मला राजद्रोही ठरवून शिक्षा केलीत तरी चालेल "
             राजाला फार आश्चर्य वाटलं. त्याने असं वागण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणाला,"  हम चारण है राजाजी । और यही हमारा धर्म है।स्वागत तो मै जोगदेवजी की तरह  आपका भी करूंगा ।  परंतु उनकी रक्षा भी करूंगा ।आप राजा हो । आप अपना कर्म निभाइए और मुझे अपना धर्म निभाने दीजिए  ।" 
     त्याची एकनिष्ठा ,त्याचा प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा बघून भावनगरचा राजा जोगदेवांना न पकडता माघारी परत फिरला आणि निघून गेला. 
       काही काळानंतर याच राजाची राणी  कुठल्यातरी परकीय आक्रमणाच्या  संकटामुळे घरून राजकुमारासह पलायन करून  आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला  परगावी निघाली होती .वाटेत जोगदेवांच्या प्रांतातून तिला जावं लागलं .जोगदेव यांच्या भागातील काही लोकांनी तिला अडवून लुटण्याचं ठरवलं .जोगदेवांना हे कळलं .त्यांनी लोकांना थांबवण्याचा , समजावण्याचा प्रयत्न केला . लुटारू  म्हणाले , "तुम्ही चारण आहात ! तुम्ही तुमच्या मानवता धर्माचे पालन करा .आम्ही चारण नाही.  लुटेरे आहोत!आम्हाला आमच्या धर्माचे पालन करू द्या .  तुम्हाला लुटायचे नसेल तर नका लुटू .पण आम्हाला थांबवू नका . शिवाय ही तर तुमच्या शत्रूची बायको आहे. आम्ही तिला तसं सोडणार नाही."
     हे लोक ऐकत नाहीत असं बघून जोगदेव स्वतः घोड्यावर स्वार होऊन तलवार घेऊन निघाले. त्यांनी राणीला रस्त्यात गाठले आणि स्वतःचा घोडा राणीच्या पालखीबरोबर  ठेवत राणीला तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचवून दिलं .राणीच्या पालखीतला छोटा  राजकुमार रस्त्यात प्रवासाला कंटाळून जोगदेवांना आवाज देऊन म्हणाला, " मामा मुझे आपके घोडेपर बैठना है !" तर जोगदेव यांनी त्याला आपल्या घोड्यावर घेतले .शत्रूच्या मुलाला घोड्यावरुन सुरक्षित ठिकाणापर्यंत पोचवणे आणि राणीने सुद्धा हा शत्रू आहे हे माहीत असून त्याच्या घोड्यावर आपल्या मुलाला बसू देणे यातच चारण समुदायाची परंप्रा वृत्ती- प्रवृत्ती , संस्कृती सामावलेली आहे,असं ही लोककथा सांगते .
             अशा अनेक लोककथा आपल्या भिन्न भिन्न प्रांतातल्या भिन्न भिन्न संस्कृती परंपरा आणि मानसिकता यावर प्रकाश टाकत असतात.  यांचा अभ्यास हा खरोखरच आपल्याला समृद्ध करणारा त्याचबरोबर आपले मनोरंजन करणारा भाग असतो.




Wednesday, July 14, 2021

अमेरिका डायरी - जनजीवनातून फेरफटका 2

 


Mohini -Giving presentation

एका क्लबमधलं प्रेझेंटेशन आटोपून लगेच चेस्टर या गावात सुमारे १०० एकरात वसलेल्या देखण्या वाईडनर विद्यापीठाला भेट द्यायला गेलो होतो. ४० हून अधिक पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे पर्याय तिथे होते. भव्य प्रशस्त इमारत, हिरवंगार लॉन याचं आता विशेष वाटेनासं झालं होतं.
Widner University

इकडच्या कॉलेजेसच्या हिरवळींवर दिसणारं अजब दृश्य म्हणजे आपापले लॅपटॉप समोर उघडून काही विद्यार्थी अगदी नौकासन पोझमध्ये लोळत अभ्यास किंवा वाचन किंवा जे काय ते करत असतात. कुणी एकटे, कुणी ग्रुपने. इथे खात पीत बिनधास्त पहुडलेल्या विद्यर्थिनी बघून मला आजूबाजूच्या मुलांकडे दुर्लक्ष करत हनुवटी गळ्याला चिकटवून खालमानेने चालणार्‍या माझ्या काही कॉलेजमधल्या मैत्रिणी आठवून हसू यायचे. या विद्यापीठातली दालनं, विभाग, वाचनालयं बघायला बरच चालावं लागू नये म्हणून आवारात मिनी बसेस सतत फिरत असायच्या. 



Watching Saturn- Golden moment 
या गावात मॉल, कॅसिनो, एक स्टेडियम वगैरे पाहिलं पण आवर्जून लक्षात राहिलं ते हे विद्यापीठ. ते ही एका विशेष घटनेसाठी. इथल्या खगोलशास्त्राच्या प्राध्यापकांनी आम्हाला रात्री विद्यापीठाच्या गच्चीवरील त्यांच्या महाकाय टेलीस्कोपमधून अवकाशाचा नजारा बघायचे आमंत्रण दिले होते. आम्ही जेवण उरकून पटापट तयार होऊन पोचलो तर त्यानी सगळे सज्ज करुन ठेवले होते. गच्चीवरून सभोवताली लुकलुकणारे चेस्टर गावातले दिवे बघणं हा सुंदर अनुभव होताच पण तिथून आकाश केवळ अद्भुत दिसत होते. प्राध्यापकांनी आम्हाला त्या टेलीस्कोपच्या क्षमतेबद्दल सांगितले. त्याला डोळा लावला आणि मी जवळपास अत्यानंदाने ओरडायचीच बाकी होते कारण केवळ पुस्तकात, चित्रात पाहिलेला, प्रत्यक्षात १.३४ अब्ज किमी अंतरावर असलेला ’शनी’ म्हणजेच सॅटर्न अगदी जवळ, हाताच्या अंतरावर दिसत होता. त्याच्याभोवतीची रुपेरी कडी अगदी चमचमत होती. मुलांची त्या क्षणाला वेड्यासारखी आठवण आली. त्यांना त्या वयात शनीबिनी काही कळलं नसतं पण हे त्यांनी बघायलाच हवं होतं असं वाटलं. आम्ही सगळेच त्या अनुभवाने इतके भारावून गेलो होतो की नंतर सगळे मूक झाले. अनंत अवकाशातल्या अनेक आकाशगंगांपैकी एकीच्या अनेक सौरमालांपैकी एका सौरमालेचा भाग असलेला तो महाकाय पण आता अगदी चेंडूएवढा दिसणारा ’शनी’. त्या सौरमालेतल्या एका य:कश्चित ग्रहावरच्या अब्जावधी माणसांपैकी एक आपण. कदाचित आपले इतके नगण्य असणे जाणवल्याने कुणीच कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

At state capitol with a senator

पुढची विशेष भेट होती हॅरिसबर्गमधल्या स्टेट कॅपिटल इमारतीला म्हणजेच विधानभवनाला. (पेनसिल्व्हेनिया राज्याची जनरल असेंब्ली) विधिमंडळात Senate चे ५० आणि House of Representatives चे २०३ असे एकूण २५३ सदस्य असतात. फेडरल पद्धतीमुळे तिथली राज्ये स्वायत्त असल्यासारखे काम करु शकतात. राज्याचा गव्हर्नर हा सर्वेसर्वा. आपल्याइतके केंद्राचे नियंत्रण त्यावर नसते. त्यातून पेन्सिल्व्हेनिया राज्य म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यचळवळीचा केंद्रबिंदू होते त्यामुळे त्याला विशेष मानाचे स्थान आहे. तर विधीमंडळाचे दैनंदिन कामकाज गॅलरीत बसून पाहण्याची आम्हाला संधी मिळाली. आत प्रवेश करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आमची कडक तपासणी झाली (म्हणजे कमरेच्या पट्ट्यापासून सगळे स्कॅनिंग ट्रे मध्ये टाकून) त्यामुळे आपला ट्रे बाहेर येईतो आमचे सर दोन्ही हातांनी पँट घट्ट पकडून उभे राहत. गॅलरीतून आम्ही त्यांचे कामकाज पाहिले. अगदी सौजन्यसप्ताह असावा तसे नम्रपणे त्यांचे बोलणे सुरु होते. शिरा ताणून आरडाओरडा नसेल, बेंच बडवणं नसेल आज या ठिकाणी तर याला काय अर्थ आहे का अध्यक्षमहोदय! अगदीच कोमट राजकारणी!
Senator's bench in the Main hall 

यांना एकदा आपल्या विधानसभेतली धमाल आणि रस्त्यावरची गॉगलधारी पोस्टरबाजी दाखवली की कळेल राजकारण किती खमंग प्रकार असतो. अर्थात तिकडचे राजकारणीही एकमेकांच्या उरावर बसतात पण सॉफिस्टिकेटेड पद्धतीने. असो. कामाचा तास संपल्यावर या भेटीसाठी आमंत्रित करणारे सिनेटर आमचे उत्सुक चेहरे पाहून आम्हाला गॅलरीतून मुख्य हॉलमध्ये घेऊन आले. काही जणांशी परिचय करुन दिला. तिथली

नेत्रदीपक झुंबरं, दिव्यांची आकर्षक रचना, सिव्हिल वॉरची प्रचंड तैलचित्रं विधानभवनाच्या रुबाबात भर घालत होती. आता हे सगळे लाईव्ह सेशन जॉईन करुन किंवा आभासी सहलीच्या माध्यमातून घरबसल्याही सहज बघता येते. http://www.pacapitol.com/keystone-classroom/legislature.cfm


’अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या गाण्यावर आपल्या पिढीतल्या बहुतेक प्रत्येकाने आलटून पालटून एक हात कमरेवर आणि दुसर्‍या हाताच्या कुयर्‍या डॊलवत नाच केलेला असतो. हा बंगला चक्क प्रत्यक्ष पाहायला मिळाला तो हर्शेज चॉकलेटच्या भल्यामोठ्या फॅक्टरीमध्ये. स्वागतकक्षात चॉकलेटचे असंख्य प्रकार. आत गेल्यावर एका छोट्या गाडीत बसून आम्हाला त्या चॉकलेटनगरीची झलक दाखवण्यात आली. चिमुकला धबधबा, त्याजवळून वाहणारी नदी, काठावरची फुलं सगळं काही चॉकलेटचं. अध्येमध्ये चॉकलेटची कार्टून्स. अगदी मायानगरीत विहार केल्याचा अनुभव होता तो. या सगळ्यामधून गाडी हळूच पास होई तेव्हा ते मधाळ रंगाचं वाहतं चॉकलेट ओंजळीत उचलून घ्यावसं वाटे. सफर संपली. दर फार नसल्याने इथून आम्ही मुलांसाठी, नातलगांना भेट देण्यासाठी भरपूर चॉकलेट्सची खरेदी केली.


तिकडून दौरा होता सफरचंदाच्या बागेत. अगदी जमिनीला टेकायला आलेले लालचुटूक रसरशीत सफरचंदांचे घोस मी याआधी कधीच पाहिले नव्हते. तिथे बसून ज्युस घेतला. बाजूला एक सुंदर तळं आणि काठावर मासेमारी करत सुटटी घालवणारे हौशी. मागे इटुकलं फार्महाऊस. स्वप्नातलं घर. दुसर्‍या
with network admin of Newmann college

दिवशी न्यूमन कॉलेजचे कॉम्प्युटर नेटवर्क बघण्याची आणि शिकण्याची मला संधी मिळाली. व्यावसायिक ठिकाणी एकट्याने जावे लागे. तिथली अ‍ॅडमीन एक स्मार्ट मुलगी होती, तिने हातचं न राखता सगळी माहिती दिली, मला सिस्टीम ऑपरेटही करु दिली.


याच आठवड्यात एक मोठे हॉस्पीटल, तिमजली जिम आणि वावा या फूड कंपनीचा सबंध प्लांट आतून बघता आला. एका संध्याकाळी खास भारतीय पोशाखात चीज अ‍ॅंड वाईन पार्टीला हजर राहून आम्ही एक बॅले कम नृत्यनाट्य बघायला गेलो. प्रेमाचा त्रिकोण हे जगभरातलं सर्वाधिक आवडतं कथानक असलेल्या या बॅलेतील कलाकारांचा पदन्यास, तांत्रिक सफाई, पेहराव, नेपथ्य खिळवून टाकणारं होतं. तिकडून आम्ही एका भारतीय उपाहारगृहात डिनरला गेलो. खूप दिवसांनी वाफाळत्या पंजाबी डीशेस आणि तंदूर ’रोटी’ बघून मला एकदम कभी खुशी कभी गममधल्या काजोलसारखं देशप्रेमाचं भरतं आलं. आमच्यासोबत असलेले परदेशी पाहुणे पापड काट्याने तोडून खाताना पाहून आमची हसून पुरेवाट झाली.

Dinner at Indian Restaurant with host families


मग त्यांना आपले पदार्थ हाताने कसे खायचे ते प्रात्यक्षिक करुन दाखवलं. जेवणानंतर जरा दूरवर पार्क केलेल्या गाड्यांच्या दिशेने आम्ही निघालो. मी सिल्क साडी नेसलेली आणि स्लीव्हलेस ब्लाउज. आत हीटर्स असल्याने जाणवलं नाही पण बाहेर थंडीची जीवघेणी लाट आतून गेली. माझे दातच वाजू लागले. पाऊल टाकणं अवघड झालं. काकडल्याने श्वास घेता येईना. एका क्षणी तर मी आता कोसळते असं वाटलं. डॉ. श्रीयाने तिचा स्टोल माझ्याभोवती गुंडाळून मला खेचतच गाडीपाशी नेऊन आत ढकललं. माझे हात चोळले. आतल्या उबेने हळूहळू जीवात जीव आला. त्या क्षणी सियाचेन सारख्या ठिकाणी आपले सैनिक कसे जगत असतील याचा मी जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या चेस्टर गावात बसून विचार करत होते. 


Tuesday, July 13, 2021

थरार

 आम्ही दोघं पहिल्यांदा दुबईला गेलो, तेव्हा निकिता चे इंजीनियरिंग चे लास्ट इयर होते. त्यामुळे तिला आमच्या बरोबर येता आले नाही. मग जेव्हा अक्षयने दुबई सोडायचे ठरवले, तेव्हा आमची दोघींची दुबई ट्रीप ठरली.मी नुकतीच जाऊन आले होते,त्यामुळे एक्साइटमेंट अशी नव्हती फार! पण तेवढीच एकत्र मजा! अर्थात अबुधाबीची काही नवीन ठिकाणे बघायला मिळाली,तिथले  sand storms  अनुभवता आले. शॉपिंगही विदाऊट जेंट्स डिस्टर्बन्स मनसोक्त असे करता आले. 😀

         आम्ही दुबईला रात्री पोहोचलो.दुसऱ्या दिवशी लगेच साईट सिइंगला सुरुवात !पहिल्याच दिवशी Mall of Emirates पाहून, हॉटेलिंग ,शॉपिंग इत्यादी आटपून आम्ही मेट्रोने परत आलो.तिथे मेट्रो खूपच जास्त convenient पडते,टॅक्सी वगैरे पेक्षा! अक्षय ने आम्हाला कार्ड्स देऊन ठेवले होते, जे मेट्रो बस दोन्हीकडे चालतात. मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडलो, बरीच रात्र होत आली होती. आता टॅक्सी करून घरी जाणार होतो, पण तेवढ्यात बस अगदी आमच्या समोर येऊन उभी राहिली, चला,चला करत बस मध्ये चढलो. बसला दोन दारं होती. गर्दी झाल्याने आम्ही मागच्या दाराने तर निकिता पुढच्या दाराने बस मध्ये चढली. आम्ही खूप दूर दूर होतो.फक्त कन्फर्म करून घेतलं की ही चढलीयेना?
          आणि मग इतक्या दिवसांनी भेटल्याने आमच्या गप्पा सुरू झाल्या, त्या जरा जास्तच रंगल्या. आमचा स्टॉप आल्याचे लक्षात आल्यावर अक्षय पटकन उभा राहिला आणि म्हणाला आई उतर, move fast! आणि उतरून गेला. बस मधून उतरताना कार्ड स्वाईप करावं लागतं. तर मी ते करत होते, तेवढ्यात बसचं दार lock होऊन गेलं. मी माझ्या परीने ते उघडण्याचा प्रयत्न करत होते आपल्यासारखं (दादा, बघा तर काय झालं,असं कोणाला म्हणणार?) दार काही उघडेना, क्षणभर काय करावे सुचेना, आणि स्वतःचा राग आला साधं दार उघडता येत नाही बसचं? मग मी जरा मोठ्याने हेल्प मागितली मग कुणीतरी सांगितलं तसं केलं आणि हुश्श! उघडलं एकदाचं दार! मी अक्षरशः उडीच मारली खाली! लगेच बस सुटली!
     (यात काय एवढं विशेष? असं वाटलं ना? थांबा!)
मी खाली उतरले,तशी अक्षय ओरडला ,अगं आई, निकिता कुठेय? म्हंटलं, मला काय माहित? मी कार्ड स्वाईप करेपर्यंत दार कसं लॉक झालं ते सांगितलं. आमच्या एकदम लक्षात आलं की किती भयंकर गोष्ट झाली आहे 🙄 बस मध्ये पुढच्या बाजूला असल्याने निकिता एकटीच बस मध्ये बसून पुढे निघून गेली होती. तिच्याजवळ ना घराचा ऍड्रेस, ना फोन (कारण आपल्या फोनची सिम तिथे चालत नाही.) ना कुठले फोन नंबर! त्या वेळी wa app  होतं, पण फोनच बंद होता ना! रात्रीची वेळ, बरं, तो discovery gardens म्हणून fully residential area!  प्रचंड संख्येने, एकसारख्या दिसणाऱ्या सुरेख आर्किटेक्चर चा नमुना असणाऱ्या अशा सगळ्या बिल्डिंग मला तर दुसऱ्यांदा गेले तरी, कन्फ्युज व्हायचं इतका अवाढव्य एरिया!काहीतरी मेन रोडवरच्या दुकानाची खूण लक्षात ठेवायची मी!
      मला जेव्हा समजलं की काय झालेय ते,माझ्या हाता पायातली तर शक्तीच गेली आणि डोळ्यातून धारा वाहायला सुरुवात झाली. रात्रीची वेळ ,सुनसान रस्ते, परका देश, दुबईलतला पहिलाच दिवस , बरं,कुणाची मदत मागावी, तर जवळ काहीच नाही.
आम्हाला गेल्यागेल्याच अक्षयने सगळे फोन नंबर व ॲड्रेस एका कागदावर लिहून दिले होते आणि बजावलं होतं की, कुठेही बाहेर पडाल तर पासपोर्ट आणि हा कागद जवळ ठेवा.पण पहिल्याच दिवशी असं काही होईल काय कल्पना ?ते सगळं माझ्या पर्समध्येच राहिलं. अचानक टॅक्सी ऐवजी बसमध्ये चढल्यामुळे!🤦🏻‍♀️ बरं, पुढचा स्टॉप कुठे आहे? शेवटचा स्टॉप किती दूर आहे? हे काहीही माहित नव्हतं. कारण अक्षय ही जास्त कारनेच  ट्रॅव्हल करायचा.
             अक्षय ने पटकन निर्णय घेतला. म्हणाला, आई ,मी बसच्या मागे धावत जातो. अरे ,काय वेडा आहेस का तू? बसचा  स्पीड काय? काहीतरीच!त्यावेळी तो  marathon, triathlon runner होता. तरी काय झालं ?त्याने खरंच बसच्यामागे धावायला सुरुवात केली. कल्पना करा, दुबई सारखी gulf country, काळोखे सामसूम रस्ते, डोळ्यासमोर निघून गेलेली बस, त्यामागून धावणारा अक्षय, कसं दृश्य असेल ते! मती गुंग होणे म्हणजे काय ते मला तेव्हा समजलं. आपण आता काहीच करू शकत नाही ,असं वाटून आणखीनच जोरात अश्रुधारा व्हायला लागल्याआणि मी तिथे एका दुकानात खुर्चीवर मटकन् बसून घेतलं. मनात इतके भयंकर आणि वाईट वाईट विचार आले की काय सांगू? आपली मुलगी आपल्याला आता कुठल्या परिस्थितीत भेटेल? (सर्व सिनेमा वेब सिरीज मध्ये पाहिलेलं पुस्तकात वाचलेलं असं सगळं डोळ्यासमोरून जाऊ लागलं.) सगळ्यात वाईट असतं ,ते हेल्पलेस फिलिंग!
        रस्त्यांवर तिथे एरवीही फक्त गाड्याच असतात आणि इतक्या रात्री तर कोणीच नव्हतं रस्त्यावर! काय करेल ही पोरगी? अशा सगळ्या विचारात मी असताना, अचानक मला अक्षय व निकिता समोरून येताना दिसले.मला आधी भासच वाटला, पण नाही दोघे शांतपणे चालत येत होते.
       तर मंडळी,झालं असं की आम्ही उतरल्यावर निकिताने सहज पाहिलं की,आम्ही आहोत ना बसमध्ये? पण तिच्या लक्षात आलं काय झालेय ते! ती पटकन  नेक्स्ट टॉप ला उतरून गेलीआणि काय करावं याचा जास्त विचार न करता,panic  न होता, शांतपणे बस ज्या मार्गाने आली होती त्या मार्गाने मागे चालत राहिली. अक्षय धावत होताच् भेटले दोघेजण! बाल बाल बचे! 🙏