Saturday, August 14, 2021

टाळी ती वाजावी


 "टाळी वाजवावी

गुढी  उभारावी

वाट ही चालावी

पंढरीची ..."

चोखोबांचा अभंग कानावर पडला आणि त्यातल्या 'टाळी' शब्दावरच माझा जीव अडकला. 
दोन हातांचा क्षणाचा संगम नाद निर्माण करतो, त्यालाच आपण 'टाळी' म्हणतो. टाळी! ती एक किंवा दोन प्रहरांची असते. पण कधी कधी कुणाला उत्साहित करण्यासाठी अथवा शाबासकी देण्यासाठी, टाळ्यांचा 'कडकडाट' सुद्धा केल्या जातो. या टाळी वाजविण्याची गंमत असते बघा, टाळीच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीच्या स्वभावाची कल्पना करता येते. विश्वास बसत नाही? मग आत्ता या क्षणापासून निरीक्षण करायला सुरुवात करा. तुम्हाला वेगवेगळे स्वभाव कळतील. काही अगदी दिलखुलास असतात तर काही तोंडदेखले असतात. काही वरकरणी आनंद पण अंत:करणात असूया घेऊन वावरणारे असतात... हे सगळे प्रकार त्यांच्या टाळी वाजविण्याच्या पद्धती वर्णन लक्षात येतात.

          पुण्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एक सुभाषित लिहिलेलं आहे,...
 'आषाढ घना सम मिळो दाद रसिकांची अन्  उधळण व्हावी अविरत उन्मेषांची'... सुधीर मोघे यांचं हे सुभाषित! प्रतिभेचे उन्मेष साकारणाऱ्या प्रत्येक कलावंताला ही दाद हवी असते. त्याच्या ठायी जबरदस्त टाळ्यांची भूक असते. आणि म्हणूनच आम्ही निवेदक, कार्यक्रमात वारंवार टाळ्यांची दाद मागत असतो...! सादाला प्रतिसादाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? अहो, रंगमंचाची ही दुनियाच न्यारी आहे. इथे स्पॉटलाईटचा झोत अंगावर घेत  वावरणाऱ्या व्यक्तीचं ते सादरीकरणच नव्हे तर तो त्याचा परकाया प्रवेश असतो. रंगमंचावरचा तो क्षण त्या कलाकाराचा असूनही त्याचा नसतो. एक आगळा 'कला- उत्कंठते'नं भारलेला असा 'तो क्षण' असतो. समोरच्या रसिकांपासून चार बोटं उंच असण्याचा... तो क्षण! पण तरी मायबाप प्रेक्षकांच्या समोर नतमस्तक होण्याचा...त्यांच्या प्रतिसादाच्या टाळीची प्रतिक्षा करणारा तो क्षण असतो. नाटक असो अथवा संगीत, नृत्य, चित्र, काव्य... कला कोणतीही असो... काही जागा या टाळीच्या अपेक्षितच असतात. त्या ठिकाणी मन आपसूक प्रतिसादाची अपेक्षा करत असतं. कान टाळीचा आवाज ऐकायला अधीर झालेले असतात पण प्रेक्षागृहातनं टाळीचा निनाद गुंजत नाही, कलावंत खट्टू होतो पण निराश होत नाही. कोलमडत नाही. तसाच हसतमुखानं कार्यक्रम पुढे सुरू ठेवतो. कार्यक्रम झाल्यावर जेव्हा केव्हा रसिकांची भेट होते, तेव्हा ते म्हणतात,"तुमचा त्यादिवशीचा अमुक-अमुक कार्यक्रम खूप छान झाला, फार आवडला." 
आवडला? तर भल्या माणसा त्यादिवशी टाळी का वाजविली नाहीस? असा प्रश्न मनात उभा राहतो. एका टाळीला जोड दुसरीची, दुसरीला तिसरीची... अशी जोड मिळत जाते आणि टाळ्यांचा कडकडाट होतो, जो कलाकाराच्या मनात नवा हुरूप, नवा जोश प्रदान करतो.


टाळीचीही एक संस्कृती असते. काही गावं, काही रसिक हे त्या संस्कृतीचे पाईक असतात. तर काही मात्र कोरडे ठणठणीत! कार्यक्रमाचा प्रारंभ-मध्य दाद देण्याचे असतात, याचा जणू त्यांना गंधच नसतो. कर्तव्य म्हणून शेवटी कशीबशी टाळी वाजविली जाते. शेवटी कलावंताला आवाहन करून ती टाळी मागून घ्यावी लागते. यशवंत देव म्हणतात,...
"दाद द्या आणि शुद्ध व्हा. 
सोडीतो का सूर आम्ही?
 सोडीत व्हा वाहवा तुम्ही" 
ही वाहवाची भूक चांगल्यासाठीच असते. पण कधी कधी टाळी वाईट हेतूनेही दिली जाते. जसे, कोणाचा कार्यक्रम पाडायचा असेल तरीसुद्धा टाळीचा वापर केल्या जातो. ती टाळी कलावंताची एकाग्रता भंग करणारी, लय चुकविणारी असते. त्या टाळीची जोड एका लयीत नसते. हा असा प्रतिसाद कलाकाराला अपेक्षित नसतो. दाद हवी पण ती योग्य ठिकाणी हवी असते. त्यात कंजुषी नको. 

    कलावंत प्रसिद्ध असो की नवागत त्याच्या प्रकटीकरणाला दाद देणारी टाळी वाजायला हवी. पण...
पण... गेल्या दोन वर्षापासून या टाळीची भूक अधुरीच राहीली आहे. कारण? रंगमंच सुने झाले आहेत. प्रेक्षागृह रिकामे आहेत आणि कलावंत बंदिस्त खोलीत छोट्याशा पडद्यावर स्वतःची कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरचा रसिक संख्येने कळतो पण त्याच्या देहबोलीची जाणीव होत नाही. ऑनलाईन कार्यक्रम होत आहेत. मात्र ती तात्पुरती व्यवस्था आहे ज्यामुळे सादरीकरणाला वाट मिळते आहे पण त्यात जिवंतपणा वाटत नाही, कारण त्या क्षणाला सजीव करणारा टाळीचा आवाज कानावर येत नाही.
 फिरून तो पूर्वीचा माहोल अनुभवायला मिळावा टाळ्यांचा कडकडाट व्हावा, अशीच अपेक्षा प्रत्येक कलावंताच्या मनात आहे. आणि आशा आहे तिथे मार्ग नक्कीच असणार. टाळी नक्की घुमणार. या विश्वासाने इथेच थांबते. प्रत्यक्ष दाद नाही पण लेखाला प्रतिसाद म्हणून तुमची ईमोजीची टाळी नक्की उमटेल, ही अपेक्षा मात्र ठेवते... नमस्कार!

- सीमा शेटे-रोठे, अकोला.

No comments:

Post a Comment