लॉकडाऊनच्या वेळेस लोकांना झूम कॉल, डुओ कॉल, व्हॉटस् अप कॉल ची सवय चांगलीच अंगवळणी पडली होती. प्रत्यक्षात भेटायला जमत नव्हते तर असे वर्चुअली भेटणे, दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.
एका गृपवर मैत्रिणीचा मेसेज आला आमची आठवण येत नाही का? त्याला दुसरीने लगेच जोड दिली, ती विसरली आपल्याला आणि एक रडका इमोजी टाकला. लगेच पहिलीने पण होकार भरत रडका इमोजी टाकला. मला कळे ना हे असे मेसेज यांनी का केले. मग मी पण एक गोंधळलेला, विचारात पडलेला इमोजी टाकला आणि प्रश्नचिन्ह टाकले. तर लगेच पहिलीने सांगितले तू व्हिडिओ कॉल कधी करतच नाही.
हाय रे माझ्या कर्मा! असे बोलून व्हिडिओ कॉल ची गमंतच घालवून टाकली. वाचून मला खूप वाईट वाटले. इतक्या दिवसाची मैत्री अशी अचानक कशी संपेल. आपण फारच लवकर जज्जमेंटल होतो इतरांच्या बाबतीत.
उशीर झाला असेल फोन करायला मान्य आहे पण करोना मुळे घरातील सर्व कामे वाढली होती त्यामुळे उशीर झाला. शिवाय राखी पौर्णिमा होती तर नातेवाईकांना, भावांना फोन करणे आवश्यक होते त्यात लेट झाला. पण तोपर्यंत मैत्रिणी निर्णय देऊन मोकळ्या झाल्या होत्या.भलेही हे अनावधानाने, नकळत घडले असेल पण असेच काही जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा त्यातली बोच जाणवते.
आणि हो हे सर्व निर्णय बहुतांश निगेटिव्ह असतात. कोण, केव्हा, कसा आणि का वागला हे ठरवणारे आपण कोण आहोत? त्या त्या विशिष्ट परिस्थितीत आणि मानसिकतेप्रमाणे, स्वभावाप्रमाणे ती व्यक्ती व्यक्त होत असते. आपण निर्णय घेऊन का मोकळे होतो?
त्यातला एखादा असा माणूस निघतो तो मस्त हलकासा मेसेज टाकून गृपचे वातावरण बिघडू नये याची काळजी घेतो. "हम तुम्हे भूल जाए ये हो नहीं सकता ....
और तुम लोग हमे भूल जाओ ये हम होने नहीं देंगे ..." दुसरा लगेच त्याला साथ देवून "सही पकडे हो" म्हणत वातावरण अजून हलकंफुलकं करतो. किती बरं वाटतं. खर तर कॉल कोणी केला यापेक्षाही गप्पा, हसणे, थट्टा मस्करी होणे हे मुख्य होते आहे ना हे पहावे. आता कायम टेंशन राहील आपली टर्न आली का फोन करायची चला बाई एकदाचा करून टाकू नाहीतर पुन्हा कोणी नाराज होईल. या सारख्या क्षुल्लक गोष्टी मैत्रीत आल्या तर ती निखळ मैत्री राहील का? दुसर्या काही पध्दतीने सांगितले तर मन पण दुखावणार नाही आणि जो मेसेज त्या व्यक्तिपर्यंत पोहोचवायचा आहे तो पण पोहचवता येईल. किंवा आपण पुढाकार घेऊन फोन करायचा. खरं तर अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांच्याशी महिनोंमहिने फोनवर देखील बोलणे होत नाही तरीपण मैत्री आहेच की. मैत्री अशी संपणारी गोष्टच नाही मुळी. केव्हाही फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून तोच आनंद, प्रेम, आपुलकी अनुभवायला मिळते तीच खरी मैत्री! पण कधी कधी जवळच्या लोकांकडून त्यांच्या नकळत आपण दुखावले जातो. असेच आपल्याकडूनही घडू शकते. अशा परिस्थितीत जज्जमेंटल न होता काही गोष्टी सोडून देणे, दुर्लक्ष करणेच योग्य असते, हे कळते पण वळत नाही.
श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लीश नावाचा सिनेमा आठवला त्यातला तिला नेमका एका शब्दाचा अर्थ समजत नाही तो शब्द असतो judgemental या एका शब्दात त्या सिनेमाचे सार सामावले आहे. मानवी स्वभावाचे छोटे छोटे उत्कट प्रसंग मनाला सहजपणे भिडतात खरचं आपण दुसर्या व्यक्तीबद्दल किती पटकन निर्णय घेऊन मोकळे होतो कुठलीही शहानिशा करण्याची गरज पण वाटत नाही आपल्याला. मानवी स्वभावच आहे हा. अगदी शंभरात एखाद दुसरा इतके कमी लोक असे जज्जमेंटल होत नाही. किंवा झाले तरी पॉझिटिव्ह जज्जमेंटल होतात. व्हाॅटअप्सच्या आणि एकूणच सोशल नेटवर्किंग च्या प्रादुर्भावमुळे आपण अजून जास्त जज्जमेन्टल होत चाललो, पटकन व्यक्त होण्याची सोय आता झाली आहे त्यामुळे निर्णय घेऊन मोकळे होतो. ज्याच्या बद्दल असे निर्णय आपण घेतो त्याला काय वाटेल किंवा त्याला वाईट वाटेल हा विचारच नाही केला जात. आणि हे जेव्हा जवळच्या म्हणवणाऱ्यांकडून अनुभवायला मिळते त्यावेळी खरचं खूप यातना होतात मनाला. दुसऱ्यांच्या भावना, अडचणी समजून घ्यायला खूप मोठं मन लागतं आणि भरपूर वेळ असावा लागतो. जो आजच्या सुपरफास्ट काळात फारच कमी जणांकडे आहे. (शिवाय प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे कौटुंबिक, इतर काही कामं, प्रश्न असतात.) 'जज्जमेंटल ' असणं हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकात तो आहेच फक्त आता व्यक्त व्हायला, मत प्रदर्शित करायला सोशलमिडीयाचे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे एवढेच. आपल्या एखाद्या कृतीचा किंवा वागण्याचा कोण काय अर्थ काढेल आणि निर्णय देऊन टाकेल काही सांगवत नाही. म्हणून सावध राहून मत व्यक्त करावे हाच उपाय आहे.
व्हॉट्सअॅपवर आलेली एक कविता या संदर्भात आवडली ती शेअर करावीशी वाटली. कवी कोण माहीत नाही.
" चल नां नातं रिचार्ज करु
आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर
पुन्हा एकदा टॉक टाईम भरु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...
मनामध्ये काही अडलं असेल तर
त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...
माणूस म्हंटंल तर चुकणारच ना
चुका तेव्हढ्या बाजुला सारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...
व्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम
पटलं तेवढं ठेवुन बाकी इग्नोर मारु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...
सुसंवादाची सेल्फी आठवत
रिलेशनमध्ये अंडरस्टॅन्डींग भरु...
चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु......!
अंजली
No comments:
Post a Comment