Sunday, August 8, 2021

चारणकथा

 चातुर्मास आला नि त्यातही श्रावण आला की " आटपाट नगर होतं " किंवा " ऐका गणेशा तुमची कहाणी " अशा कथा कहाण्यांची आठवण हमखास येतेच.प्रत्येक कहाणी काहीतरी समजावून शिकवून जाणारी असते .या कहाण्यांचा विचार करताना , मध्यंतरी काही कारणामुळे राजस्थानी लोकसाहित्याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या त्या आठवल्या. त्यात एक जोगदेव यांची गोष्ट मला आवडली. ती सांगते.

         आपण जसं वारकरी हा  शब्द वापरतो तसं राजस्थानात चारण हा शब्द रूढ आहे.चारण म्हणजे परमेश्वरावर अटळ श्रध्दा असलेला आणि माणूसकी जपणारा संप्रदाय. अशाच चारण झालेल्या  जोगदेवांची ही एक गोष्ट.
         या जोगदेवांकडे राजस्थानातला एक प्रांत सांभाळायला होता .त्यामुळे एक प्रकारे त्यांचीच सत्ता तिथे होती.  अतिशय प्रेमाने आपल्या जनतेला ते सांभाळत होते आणि परमेश्वर भक्तीत लीन होते .चारण असल्यामुळे त्या धर्माचे पालनही ते  पुरेपूर करत होते. 
मात्र असं असूनही सर्व लोककथांमध्ये त्यांचे उल्लेख  'बाघी 'म्हणून आले आहेत .याचं कारण असं की त्यांचा इलाका आपल्या राज्याला जोडायचा घाट भावनगरच्या राजाने घातला होता . आणि जोगदेव यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे ते राजाचे आणि राज्याचे शत्रू ठरले .म्हणून ते बाघी .बाघी म्हणजे बंडखोर. पण बंडखोर असले तरी ते मातृभूमिकरता,राजकीय समीकरणांकरिता. एरवी त्यांनी आपला चारणधर्म मात्र कधी सोडला नाही .
       एकदा ते प्रवासात असताना एका गावात एका परिचिताच्या घराजवळ पोहोचले .परिचिताने त्यांना पाहिले आणि लगेच जवळ येऊन "भोजन के लिये चलिए "असा आग्रह केला .मात्र जोगदेव म्हणाले की "अभी समय नही है । फिर कभी आऊंगा। ".
      तो परिचित म्हणाला की ,"  मै भी तो चारण हूँ। और मेरे दर तक आकर अगर कोई भूखा प्यासा लोटे ये तो चारणधर्म के विरूध्द है । यह तो हो ही  नही सकता। "  मग जोगदेवांना प्रश्न पडला की काय करावे? त्यांनी सांगितले की त्यांना बाघी घोषित करून त्यांना पकडण्यासाठी भावनगरचा राजा स्वतः त्यांच्या मागावर इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांना राजाच्या  हाती सापडायचे नाही. त्यामुळे त्वरा करून  तिथून निघून जाणेच योग्य आहे .
    मात्र हा परिचित असं म्हणाला की ," आप घर पधारिए, स्नान करिये, भोजन करिये और थोडा विश्राम करिये ।तब तक मै खुद आगे चल कर राजा से बात करके आता हूँ।" आणि तो खरच गेला. राजाला भेटला .इकडे येण्याचं कारण विचारलं.
            राजाने जोगदेव यांचे नाव सांगितलं तर तो म्हणाला, "जोगदेव ? ते तर माझ्या घरी आहेत! त्यांचे तर भोजनही अजून व्हायचे आहे!" 
           राजा म्हणाला ," ते बाघी आहेत , राजद्रोही आहेत . तुम्ही जर त्यांना मदत केली तर तुम्ही देखील  राजद्रोही ठराल. तेव्हा त्यांना माझ्या हवाली करा. "      
                      तो परिचित  म्हणाला,"  शक्य नाही ! त्यांना मी माझ्या घरात आश्रय दिला आहे .मी त्यांचा घात करणार नाही."
        राजा म्हणाला ," मग तुमचं काय म्हणणं आहे?"  
      तर चारण म्हणाला ,"की आपणही लांबवर प्रवास करून आले आहात .घरी चला. स्नान करा.माझ्या घरी जोगदेवां बरोबर आपणही भोजन करा. नंतर ते निघून जातील. ते माझ्या घरून निघून गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते करा किंवा  हवं तर त्यांना पकडा.मात्रं माझ्या घरी ते असेपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असेल .मी माझ्या चारणधर्माचे पालन करीन. मग आपण मला राजद्रोही ठरवून शिक्षा केलीत तरी चालेल "
             राजाला फार आश्चर्य वाटलं. त्याने असं वागण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणाला,"  हम चारण है राजाजी । और यही हमारा धर्म है।स्वागत तो मै जोगदेवजी की तरह  आपका भी करूंगा ।  परंतु उनकी रक्षा भी करूंगा ।आप राजा हो । आप अपना कर्म निभाइए और मुझे अपना धर्म निभाने दीजिए  ।" 
     त्याची एकनिष्ठा ,त्याचा प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा बघून भावनगरचा राजा जोगदेवांना न पकडता माघारी परत फिरला आणि निघून गेला. 
       काही काळानंतर याच राजाची राणी  कुठल्यातरी परकीय आक्रमणाच्या  संकटामुळे घरून राजकुमारासह पलायन करून  आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला  परगावी निघाली होती .वाटेत जोगदेवांच्या प्रांतातून तिला जावं लागलं .जोगदेव यांच्या भागातील काही लोकांनी तिला अडवून लुटण्याचं ठरवलं .जोगदेवांना हे कळलं .त्यांनी लोकांना थांबवण्याचा , समजावण्याचा प्रयत्न केला . लुटारू  म्हणाले , "तुम्ही चारण आहात ! तुम्ही तुमच्या मानवता धर्माचे पालन करा .आम्ही चारण नाही.  लुटेरे आहोत!आम्हाला आमच्या धर्माचे पालन करू द्या .  तुम्हाला लुटायचे नसेल तर नका लुटू .पण आम्हाला थांबवू नका . शिवाय ही तर तुमच्या शत्रूची बायको आहे. आम्ही तिला तसं सोडणार नाही."
     हे लोक ऐकत नाहीत असं बघून जोगदेव स्वतः घोड्यावर स्वार होऊन तलवार घेऊन निघाले. त्यांनी राणीला रस्त्यात गाठले आणि स्वतःचा घोडा राणीच्या पालखीबरोबर  ठेवत राणीला तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचवून दिलं .राणीच्या पालखीतला छोटा  राजकुमार रस्त्यात प्रवासाला कंटाळून जोगदेवांना आवाज देऊन म्हणाला, " मामा मुझे आपके घोडेपर बैठना है !" तर जोगदेव यांनी त्याला आपल्या घोड्यावर घेतले .शत्रूच्या मुलाला घोड्यावरुन सुरक्षित ठिकाणापर्यंत पोचवणे आणि राणीने सुद्धा हा शत्रू आहे हे माहीत असून त्याच्या घोड्यावर आपल्या मुलाला बसू देणे यातच चारण समुदायाची परंप्रा वृत्ती- प्रवृत्ती , संस्कृती सामावलेली आहे,असं ही लोककथा सांगते .
             अशा अनेक लोककथा आपल्या भिन्न भिन्न प्रांतातल्या भिन्न भिन्न संस्कृती परंपरा आणि मानसिकता यावर प्रकाश टाकत असतात.  यांचा अभ्यास हा खरोखरच आपल्याला समृद्ध करणारा त्याचबरोबर आपले मनोरंजन करणारा भाग असतो.




No comments:

Post a Comment